*न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे*
महादेव गोविंद रानडे हे आधुनिक महाराष्ट्राचेअत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. समाजसुधारक, न्यायमूर्ती, अर्थतज्ज्ञ, इतिहासकार, लेखक आणि विवेकवादी विचारवंत अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय समाजाच्या परिवर्तनासाठी आयुष्यभर कार्य केले.
महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ जानेवारी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांच्यावर संस्कृत, धर्मग्रंथ व भारतीय परंपरांचा प्रभाव होता. पुढे त्यांनी पुणे व मुंबई येथे उच्च शिक्षण घेतले. इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय होते. पाश्चात्त्य शिक्षणामुळे त्यांना विवेकवाद, लोकशाही व मानवतावादी विचारांची ओळख झाली.
रानडे यांची १८९३ साली मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. न्यायमूर्ती म्हणून त्यांनी कायद्याची अंमलबजावणी करताना सामाजिक न्याय, नैतिकता व मानवतावाद यांना विशेष महत्त्व दिले. त्यांनी कायद्याकडे केवळ नियम म्हणून नव्हे, तर समाजहिताचे साधन म्हणून पाहिले.
महादेव गोविंद रानडे यांनी मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. त्यांनी एकेश्वरवाद, नैतिकता, विवेक व सामाजिक समतेचा पुरस्कार केला. भारतीय समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, अस्पृश्यता, बालविवाह आणि स्त्रियांचे दुय्यम स्थान यांविरुद्ध ठामपणे आवाज उठवला.
विधवाविवाहाचा पुरस्कार करणे हे त्या काळात धाडसाचे मानले जात होते; तरीही रानडे यांनी या विषयावर लेखन, व्याख्याने व संघटनात्मक कार्य केले. स्त्रीशिक्षणाशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता.
रानडे यांच्या सामाजिक कार्यात त्यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांचा मोलाचा वाटा होता. बालविवाहामुळे त्यांचे शिक्षण थांबले होते; मात्र रानडे यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी शिक्षण घेतले व पुढे त्या स्त्रीशिक्षण, विधवा पुनर्वसन व महिला संघटनांच्या कार्यात अग्रणी ठरल्या.
महादेव गोविंद रानडे हे एक प्रखर अर्थचिंतक होते. स्वदेशी उद्योग, सहकार, औद्योगिकीकरण व शिक्षण यांद्वारे देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो, असे ते मानत.
रानडे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेशी संबंधित होते. ते मवाळ राजकारणाचे समर्थक होते. ब्रिटिश सत्तेशी संघर्षाऐवजी चर्चा, सुधारणा व घटनात्मक मार्गाने स्वराज्य मिळवावे, असा त्यांचा दृष्टिकोन होता. गोपाळ कृष्ण गोखले यांसारख्या नेत्यांवर त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव पडला.
रानडे यांचे लेखन इतिहास, धर्म, अर्थशास्त्र व समाजसुधारणा या विषयांवर आधारित होते.
त्यांच्या लेखनात भारतीय परंपरा व पाश्चात्त्य विचारसरणी यांचा समन्वय दिसून येतो. समाजात बदल हळूहळू, पण मूलभूत पातळीवर घडवून आणला पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता.
इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अध्यक्षही होते.
महादेव गोविंद रानडे हे केवळ एका व्यक्तीचे नाव नसून, ते आधुनिक महाराष्ट्राच्या विवेकवादी परंपरेचे प्रतीक आहेत. समाज सुधारण्यासाठी धैर्य, संयम, ज्ञान व करुणा आवश्यक असते, हे त्यांनी आपल्या जीवनकार्याने सिद्ध केले. त्यामुळेच भारतीय समाजप्रबोधनाच्या इतिहासात त्यांचे स्थान अढळ आहे.
दिनांक १६ जानेवारी १९०१ रोजी पुणे येथे महादेव गोविंद रानडे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक दूरदर्शी विचारवंत गमावला. तथापि, त्यांच्या विचारांचा वारसा आजही समाजसुधारणा, स्त्रीशिक्षण, आर्थिक नियोजन व विवेकवादाच्या क्षेत्रात मार्गदर्शक ठरतो.
आज त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन
*संकलन*
No comments:
Post a Comment