Thursday 3 November 2022

जय हरी विठ्ठल ( Jay Hari Vitthal )

            ।। जय हरी विठ्ठल ।।

मिटवूनी दुःख । मिळे आम्हा सुख ।।
विठ्ठलाचे मुख । पाहुनिया ।।

दूर ती पंढरी । पायी चाले वारी ।।
मूर्ती डोक्यावरी । घेऊनिया ।।

विसरुनी भान । चाले रानोरान ।।
मुखी एक नाम । विठ्ठलाचे ।।

आज एकादशी । बैसे तुजपाशी ।।
प्रत्येक दिवशी । करी ध्यान ।।

एकच मागणी । विठ्ठला चरणी ।।
मिळो अन्नपाणी । बळीराजा ।।

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद 9423625769

सर्व माऊलींना प्रबोधिनी एकादशीच्या हार्दीक शुभेच्छा ......!

Monday 31 October 2022

31 ऑक्टोबर दिनविशेष ( Dinvishesh )

31 ऑक्टोबर दिनविशेष ......

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांचा  स्मृतिदिन व लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन .........! 

जीवन परिचय ......👇🏼
••••••••••••••••••••••••••
एक आठवण ......👇🏼
••••••••••••••••••••••••••
जीवन पट .....👇🏼
••••••••••••••••••••••••••

संकलन - नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

सरदार वल्लभभाई पटेल ( Sardar Patel )

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल


31 ऑक्टोबर 2022 रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 147 वी जयंती आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी संपूर्ण देशाला एकात्मतेच्या धाग्यात बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच वल्लभभाई पटेल यांची जयंती देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधान पदी विराजमान झाल्यानंतर 2014 मध्ये प्रथमच देशात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. सरदार पटेल हे स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्रीही होते.  

 सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातमधील नडियाद येथे झाला. लंडनला जाऊन त्यांनी बॅरिस्टरचे शिक्षण घेतले आणि परत येऊन अहमदाबादमध्ये वकिली करू लागले. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. सरदार पटेल यांचे स्वातंत्र्य चळवळीतील पहिले आणि मोठे योगदान 1918 मध्ये खेडा लढ्यात होते. 1928 च्या बारडोली सत्याग्रहातही त्यांनी शेतकरी चळवळीचे यशस्वी नेतृत्व केले. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. 

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्थानांचे एकत्रीकरण करून अखंड भारताच्या निर्मितीमध्ये त्यांचे योगदान विसरता येणार नाही. त्यांनी 562 लहान-मोठ्या संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करून भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. विनम्र अभिवादन

सौजन्य :- इंटरनेट

संकलन :- नासा येवतीकर

आयर्न लेडी प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी ( Indira Gandhi )

       आयर्न लेडी प्रियदर्शनी


प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी नेहरू कुटुंबात अलाहाबाद येथे झाला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांचे वडील होते तर कमला नेहरू ही आई. त्या नेहरू दाम्पत्याच्या एकुलत्या एक कन्या होत्या. आई कमला नेहरू यांच्यासोबत अलाहाबादमधील आनंद भवन येथे इंदिरा मोठ्या झाल्या. त्यांचे बालपण एकाकी आणि दुःखात गेले कारण वडील जवाहरलाल नेहरू हे राजकीय चळवळीत सक्रिय सहभागी असल्याने अनेकदा दूर असायचे किंवा तुरुंगात तर असायचे. तर त्यांची आई नेहमी आजाराने अंथरुणाला खिळलेली होती ; पुढे त्यांचा क्षयरोगामुळे लवकर मृत्यू झाला. इंदिरा यांचा नेहरुंशी मर्यादित संपर्क होता, तोही बहुतेक वेळा पत्रांद्वारे असायचा. इंदिराजींना मुख्यतः घरीच शिक्षक शिकवायला येत होते आणि १९३४ मध्ये मॅट्रिक होईपर्यंत त्या अधूनमधून शाळेत जात होत्या. त्या आणि आई कमला या दोघी रामकृष्ण मिशनच्या बेलूर मठ मुख्यालयात राहायला गेल्या, जिथे स्वामी रंगनाथनंद हे इंदिरा यांचे पालक होते. त्या शांतिनिकेतन येथील विश्व भारती येथे शिकण्यासाठी गेल्या, जे पुढे १९५१ मध्ये विश्वभारती विद्यापीठ बनले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या मुलाखतीदरम्यान इंदिरा यांचे नाव प्रियदर्शनी  ठेवले. संस्कृतमध्ये याचा अर्थ "सर्वकाही दयाळूपणे पाहणारी" असा होतो, आणि पुढे त्या इंदिरा प्रियदर्शिनी नेहरू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
ब्रिटनमधील त्यांच्या वास्तव्यादरम्यान, इंदिरा गांधी वारंवार त्यांचे भावी पती फिरोज गांधी यांना अनेकदा भेटत असत. त्यांना त्या अलाहाबादमधून ओळखत होत्या आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते शिकत होते. त्यांचा विवाह अलाहाबाद येेेथे धर्म रितीरिवाजांनुसार पार पडला, जरी फिरोज हे गुजरातच्या पारशी कुटुंबातील होते. त्यांना राजीव गांधी आणि संजय गांधी ही दोन मुले होती.
इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरू व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते.  इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्यलढ्याच्या संस्कारांतच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानरसेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करीत असे.

१९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात इंदिराजीं यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. १९६५ चे भारत-पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगरच्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात ताशकंद येथे पाकिस्तानचे आयुबखान आणि लालबहादुर शास्त्री यात शांति समझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द संस्मरणीय अशी ठरली. जुलै १९६९ मध्ये त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. सन १९६५ व १९७१ मध्ये भारत-पाक युद्ध, आणि त्यानंतर १९७५ मधील आणीबाणी असे अनेक प्रसंग त्यांच्या कारकिर्दीत घडल्या आहेत. धाडसी निर्णय घेण्यात त्या प्रसिद्ध होत्या. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी, इंदिरा गांधींचे दोन शीख अंगरक्षक, सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांनी सफदरजंग रोड, नवी दिल्ली येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बागेत कथितपणे ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला म्हणून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यात त्या जागेवरच मृत्युमुखी पडल्या. भारत देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या अश्या धाडसी आयर्न लेडीचा स्वतःच्या अंगरक्षकानीच विश्वासघात केला.

प्रियदर्शनी आयर्न लेडी श्रीमती इंदिरा गांधी यांना विनम्र अभिवादन ..... !


सौजन्य :- इंटरनेट
संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Sunday 30 October 2022

प्रियदर्शनी इंदिरा गांधी ( Indira Gandhi )

           विनम्र अभिवादन ......!

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, आयर्न लेडी आणि धाडसी निर्णयामुळे 70 ते 80 च्या दशकात संपूर्ण जगात ज्यांच्या कार्याची ख्याती पसरले असे प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांची आजच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानिमित्ताने माझ्या स्मरणात असलेली ही आठवण. 
31 ऑक्टोबर 1984 मी आठ वर्षाचा असेन आणि दुसरी किंवा तिसऱ्या वर्गात शिकत असतांना ही घटना घडली. पण मला आज ही आठवते त्यांचा अंतिम संस्कार सोहळा. 
भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर त्यांच्याच अंगरक्षकाने गोळ्या झाडल्या आणि त्यात ते मृत्युमुखी पडल्याची बातमी रेडिओवर ऐकण्यात आली. आमच्या घरात रेडिओ ऐकण्याचे प्रमाण जरा जास्त होते. सकाळी सहा वाजल्याची आकाशवाणी सुरू झाल्याची धून, त्यानंतर वंदे मातरम, पहाटेची भक्तिगीते आणि सातच्या प्रादेशिक बातम्या याशिवाय माझी सकाळ कधी झालीच नाही. माझे बाबा सकाळी उठले की पहिले रेडिओ लावायचे आणि ऐकत बसायचे. त्यांना बातम्या ऐकायची खूप सवय होती आणि क्रिकेटचे समोलोचन ऐकण्याची आवड होती. लाईटवरील रेडिओ पेक्षा बॅटरी सेलवर चालणारा रेडिओ त्यांना आवडायचा कारण लाईटचा रेडिओ एकाच ठिकाणी लावून ठेवावे लागते तर बॅटरी सेलवरील रेडिओ कुठं ही नेता येतो. माझ्या आठवणीनुसार पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर गोळ्या झाडल्याची व ते त्यात निधन पावल्याची बातमी सर्वप्रथम आमच्या बाबांनीच ऐकली आणि ते सर्वाना सांगितले. हा हा म्हणता ही बातमी संपूर्ण गावात पसरली. अंत्यसंस्कार TV वर दाखविण्यात येणार असल्याची बातमी कळाली. त्याकाळी आमच्या गावात फक्त दोघांच्या घरी TV होते. आमच्या घरी TV नव्हते पण माझ्या शेजारच्या घरी TV होते ते ही ब्लॅक अँड व्हाईट. अंत्यसंस्कार सुरू होण्यापूर्वीच शेजारच्या घरात एकच गर्दी होऊ लागली. 
अंत्यसंस्कार सुरू झाले आणि इकडे TV वाल्याचे घर हाऊसफुल्ल होऊन गेले. आम्ही लहान मुले सर्वात पुढे, त्यानंतर महिला आणि त्यानंतर पुरुष असा जमाव त्या घरात बसला होता. तिथे पंखा नसल्याने सर्वजण घामाघूम झाले होते. पण सर्वांच्या नजरा त्या TV वर खिळून होते. इंदिरा गांधी यांच्या चेहऱ्याकडे पाहून अनेक महिला आपल्या डोळ्यांतून अश्रू गाळत होते, जणू काही ती त्यांच्या घरातील बाई लेक होती. गावातील अनेक लोकं मरण पावल्यावर त्यांना कोणी जाळत नव्हते तर जमिनीच्या स्वाधीन करत होते. फक्त मोठ्या लोकांनाच त्यांच्या मृत्यूनंतर जाळतात असा समज त्यावेळी बालमनाला वाटत होते. त्या अंत्यसंस्कारात त्या काळचा सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन आणि इंदिराजीचे पुत्र राजीव गांधी यांना अग्नी देताना पहिल्यांदा पाहत होतो. तेवढ्या भाऊगर्दीत हे दोनच चेहरे ओळखीचे वाटत होते. त्यावेळी माझ्याही डोळ्यांत नकळत अश्रू येऊन गेले. इंदिरा गांधी ही भारतातील कोणीतरी महान व्यक्ती होती एवढंच त्यावेळी कळत होते. पण बालपणीच्या मनावर बिंबून गेलेलं ते अंत्यसंस्कार मी जीवनभर कधीही विसरू शकत नाही. 
आज श्रीमती इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन ......!

- नासा येवतीकर, धर्माबाद

आला थंडीचा महिना ( Hivala )

         आला थंडीचा महिना

पावसाळा संपला की हिवाळ्याला सुरुवात होते. दिवाळीच्या सणाला हिवाळ्याची चाहूल लागते. पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करतांना जी थंडी वाजते ती सांगते की, चला हिवाळा महिना सुरू होत आहे. तसं पाहिलं तर हिवाळा हा सर्वांसाठी आल्हाददायक आणि आनंदी असते. दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर नुकतीच शाळा सुरू झालेली असते. अश्या या थंडीत बाल गोपाळाना सकाळी लवकर उठावे वाटत नाही. बघता बघता शाळेची वेळ होते. सकाळचं कोवळं ऊन खाताना वेळ कसा निघून गेला हेच कळत नाही. उन्हात गेलं की ऊन लागते आणि सावलीत बसलं की थंडी वाजते अशी अवस्था या महिन्यात अनुभवायला मिळते. तिकडे शेतकरी देखील आपल्या शेतात रब्बी पिकांची तयारी करतो. खरीप पिके घेऊन अनेक शेतकरी थंडी पडण्याची वाट पाहत असतात. सीमेवर देशाची सुरक्षा करणाऱ्या सैनिकांना डोळ्यांत तेल टाकून पहारा द्यावा लागतो कारण याच थंडीचा फायदा घेऊन शेजारील शत्रू आपल्या देशात घुसखोरी करण्याची शक्यता असते. राजकारणी लोकांना देखील हिवाळी अधिवेशनाची चाहूल लागलेली असते. नवीन लग्न झालेले जोडपे गुलाबी थंडीची मजा घेण्यास आतुरलेले असतात. सकाळी सकाळी योगासन करणारे तसेच मोकळ्या हवेत फिरायला जाणारे यांना हे हवामान खूप अनुकूल वाटते. सकाळचा गार वारा अंगावर घेत ही मंडळी थंडीचा खरा आनंद घेत असतात. याच महिन्यात सीताफळ, पेरू व बोरं यासारखी आंबट गोड फळांचा मोसम सुरू होतो. ही फळे खाल्याने सर्दी नि खोकला लागू शकते पण ही फळे खाल्ली तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. त्यामुळे अति न खाता ही फळे प्रमाणात खावी लागते. एकूणच हा हिवाळा महिना लाभदायी, आरोग्यदायी आणि हितकारक वाटत असले तरी याच हिवाळ्यात अनेक आजार त्रास देत असतात. विशेष करून लहान मुलांना सर्दी, पडसे आणि खोकला यासारखे आजार लवकर होऊ शकतात. म्हणून या काळात लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. स्वेटर, हातमोजे व पायमोजेचा वापर करणे गरजेचे असते. तसेच थंड पदार्थ खाणे टाळणे आवश्यक असते. वयोवृद्ध लोकांचे अनेक जुने आजार याच काळात आपले डोके वर काढतात. आला थंडीचा महिना, शेकोटी पेटवून पेटवा, मला लागलाय खोकला ह्या गाण्याची महती याच काळात कळायला लागते. 

- नासा येवतीकर, स्तंभलेखक
कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...