Saturday 7 July 2018

दप्तरमुक्त शाळा

*दप्तरमुक्त शाळा : एक आव्हान*

शाळा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते विद्यार्थी, शिक्षक, मैदान आणि विद्यार्थ्यांच्या सोबत असलेले दप्तर. खरोखरच दप्तराशिवाय शाळा कोणी विचार देखील करू शकत नाही. कारण विद्यार्थ्याजवळ दप्तर नसेल तर मुलगा शाळेत जाऊन करणार तरी काय ? हे पालकांच्या मनात आलेले प्रश्न आहेत. पालकांच्या या प्रश्नाला राज्यातील अनेक शिक्षकांनी वेगवेगळे उपक्रम राबवून मुलांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमीच केले नसून मुलांना दप्तरमुक्त केले आहे. या दप्तरमुक्त उपक्रमामुळे मुलांमध्ये एक वेगळा उत्साह संचारला असून शाळेत कधी ही न येणारी मुले शाळेत येऊ लागली हे विशेष. मुलांना शाळेत अगदी मोकळेपणाने खेळायला, बोलायला, नाचायला खूप आवडते. पण पालक आणि शिक्षक विद्यार्थ्यांवर एवढे बंधन टाकतात की, विद्यार्थी आपले बालपण हरवून टाकतात. अभ्यासा सोबत मौजमस्ती देखील करणे आवश्यक आहे. एक किस्सा मला आज ही आठवतो, दुसऱ्या दिवशी परीक्षा असतांना आमचे ओळखीचे एका काकांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याचा सल्ला दिला आणि आम्ही तो पूर्ण केला. तो पेपर सर्वात चांगला सुटला. याचा अर्थ आपले मन प्रसन्न आणि आनंदी असेल तरच अभ्यास चांगला होतो. दबावाखाली किंवा टेंशनमध्ये वाचलेले देखील लक्षात राहत नाही. म्हणून विद्यार्थ्यांना मुक्तपणे शिकू दिलोत तर त्याची प्रगती वेगाने होते. म्हणून एक दिवस त्यांच्यासाठी शाळा भरवायाची. रोज तर आपण त्यांना शिकवितो त्यामुळे ते ऐकतात. पण एक दिवस त्यांचे ऐकले आणि त्यांच्या मनाप्रमाणे केल्यास शाळेत नक्कीच काही तरी बदल होतील असा विश्वास अनेक उपक्रमशील शिक्षकांना आहे. म्हणूनच ते दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा भरविण्याचे ठरविले आहे. हा उपक्रम शनिवारीच का ? इतर दिवशी का नाही ? कारण शनिवार हा बहुतांश शाळेत अर्ध्या दिवसांची शाळा असते. म्हणजे सुमारे साडेतीन तास शाळा चालते. या वेळांत शाळेतील सर्व मुलांसोबत गप्पा, गाणी आणि गोष्टी केल्यास मुलांची अभिव्यक्ती होऊ शकते. मुलांच्या इतर गुणांचा शोध लावता येतो. पुस्तकाशिवाय देखील जगात खूप काही शिकण्यासारखे आहे याची जाणीव मुलांमध्ये तयार होते. या निमित्ताने ज्या गोष्टी नियमित वर्गात पूर्ण होत नाहीत ते पूर्ण करता येतात. रवींद्रनाथ टागोर किंवा अण्णाभाऊ साठे शाळेत न जाता कसे शिकले ? याचा शोध दप्तरमुक्त शाळेत जाऊन सापडतो. मुलांना नकळत जे शिकविले जाते ते पटकन लक्षात राहते. मुद्दाम शिकविले गेलेल्या गोष्टी काही मुलांच्या पचनी पडत नाहीत. दररोज तेच ते पुस्तक, गृहपाठ, अभ्यास म्हटले की मुलांध्ये स्फूर्ती किंवा चेतना दिसत नाही. मात्र असे काही उपक्रम शाळेत सुरू झाले की, त्याचा अनुकूल परिणाम सर्वत्र दिसून येतात. तसे पाहिले तर दप्तरमुक्त शाळा मुलांसाठी आनंददायी आणि मजेशीर आहे मात्र शिक्षकांसाठी नक्कीच नाही. कारण येथे मुलांना काही ही काम सांगता येत नाही. पुस्तक शिकविणे सोपे आहे मात्र विविध उपक्रम राबवून मुलांना आनंदी ठेवणे खूपच अवघड काम आहे. कारण पुस्तक काढा आणि वाचा असे या दिवशी म्हणता येत नाही. शिक्षकांना पूर्ण वेळ मुलांसोबत राहावे लागते. कोण काय करतोय यावर देखील लक्ष ठेवावे लागते. इतर दिवशी पेक्षा वेगळे काही तरी मुलांना अनुभव द्यावे लागते म्हणून या दिवसाची तयारी आधीपासून करून ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक शनिवारी मुलांसाठी वेगवेगळी कृती निवड करावे लागते जसे की भाषिक खेळ असेल, मैदानी खेळ असतील किंवा वर्गात बसून जे खेळ घेतले जातात ते घेणे. अवांतर वाचन प्रक्रियेमध्ये एका शनिवारी गोष्टीचे पुस्तक वाचणे, वृत्तपत्र वाचन करणे, मासिक वाचणे, चित्रांचे रंगभरण करणे इत्यादी बाबी करता येतात. एखाद्या शनिवारी बालसभा आयोजित करून त्यांच्या मार्फत काही गोष्टी करून घेता येतात. तसेच एखाद्या वेळी निसर्गाचा अनुभव देण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात जाऊन डबा पार्टीचे आयोजन देखील करता येऊ शकते. या ठिकाणी शिक्षकांची कल्पकता खूप मोठे कार्य करून जाते. हे सर्व शिक्षकांच्या डोक्याला ताप जरी वाटले किंवा हे एक आव्हान म्हणून स्वीकार केलोत तर दप्तरमुक्त शाळेमुळे सर्व काही सोपे सोपे झाल्यासारखे वाटेल. तेंव्हा चला तर मुलांच्या आनंदासाठी, शाळेची उपस्थिती आणि गुणवत्ता वाढीसाठी दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा उपक्रम राबवूया.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Friday 6 July 2018

शालेय पोषण आहार

मध्यान्ह भोजन योजनेत सुधारणांची गरज

शाळेतील मुलांची उपस्थिती वाढावी यासाठी सरकारने अनेक योजना राबविते त्यातीलच एक म्हणजे शालेय पोषण आहार योजना हे एक. केंद्रशासन व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण देशात मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात येते. शासनाची या योजनेमागे ध्येय आणि उद्दिष्ट खूप चांगले आहेत. या योजनेमुळे काही अत्यंत गरीब विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण मिळू लागले आणि विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती काही प्रमाणात वाढीस लागले हेही सत्य आहे. अगदी सुरुवातीला मुलांना सुकडी किंवा दूध दिल्या जायचे त्यानंतर नव्वदच्या दशकांत तीन किलो प्रतिमाह तांदूळ देण्याची योजना तयार करण्यात आली. याहीपुढे जाऊन सन 2003 पासून मुलांना शालेय पोषण आहार योजनेत एका विद्यार्थ्याला 100 ग्रामप्रमाणे अन्न शिजवून देण्यासाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आले. सुरुवातीला फक्त खिचडी शिजवून देण्याची पद्धत होती पण कालांतराने त्यात बदल होऊन वरणभात, वाटाणा, मटकी, हरभरा मुगडाळ यांचा समावेश झाला. ठराविक कालावधीनंतर यात बदल होत गेले मात्र या योजनेची जबाबदारी बदलण्यात आली नाही. मुख्याध्यापक हा सर्वात जबाबदार घटक तेंव्हापासून जे समजले जात होते ते आज ही समजले जाते. या योजने अंतर्गत अनेक दुर्घटना घडले मात्र पर्यवेक्षणीय यंत्रणेत काही बदल झाला नाही. कित्येक मुख्याध्यापक या योजनेमुळे आत्महत्या केले असून अमरावती जिल्ह्यातील विजय नकाशे यांची आत्महत्या कोणी ही विसरू शकत नाही. या तांदळामुळे अनेकजण भ्रष्टाचार करायला शिकू लागले. शालेय पोषण आहार हे कित्येक जणांचे कुरण ठरले आहे. शिक्षण विभाग
गात भ्रष्टाचार करण्यासारखे असे काही खास क्षेत्र नव्हते, त्यामुळे हा विभाग यास अपवाद होता. मात्र या योजनेमुळे शिक्षक मंडळींना आणि सोबत त्या यंत्रणेतील सर्वांना खाण्याची सवय लागली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. काही वेळा मनात नसताना आणि काही वेळा जाणून बुझुन यात गैरव्यवहार होत आले आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकासाठी ही शालेय पोषण आहार योजना केंव्हा ही डोकेदुखीच आहे. मात्र सरकार याबाबीकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही. लातूर जिल्ह्यातील 141 मुलांना खिचडीमधून विषबाधा झाल्याची बातमी नुकतेच वाचण्यात आले. स्वयंपाक करणाऱ्या बाईचा निष्काळजीपणा आणि मुख्याध्यापकांचे दुर्लक्ष असा ठपका प्रथम दर्शनी कोणीही ठेवतो यात शंका नाही. पण मुख्याध्यापकांनी खरोखरच कुठे कुठे लक्ष द्यावे ? योजना खूप चांगली आहे तरी सुद्धा या योजनेत काही त्रुटी आहेत ज्यामुळे एक ना एक दिवस असा प्रसंग ओढवेल याची भीती शैक्षणिक वर्तुळात प्रारंभीपासूनच प्रत्येकाच्या मनात आहे. वरील घटना कोणत्याही राज्यासाठी नक्कीच चांगली नाही परंतु या घटनेपासून शासन काही बोध घेऊन त्यात सुधारणा करेल ? शासनाने या योजनेत नेमके काय सुधारणा करावी याबाबत शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, अधिकारी, शिक्षक, पत्रकार आधीची चर्चा व विचार विनिमय करून त्यात सुधारणा करणे गरजेचे वाटते.

यंत्रणा बदलावी - सध्या मध्यान्न भोजन योजनेवर शाळेचे मुख्याध्यापक शहेच या यंत्रणेचे प्रमुख आहेत. वास्तविक पाहता मुख्याध्यापकाकडे शाळा नियंत्रणात सोबत इतरही भरपूर कामे असतात. यामुळे या योजनेकडे लक्ष देणे शक्य होत नाही. शाळेतील एखाद्या शिक्षकांकडे या कामाची जबाबदारी दिली जाते तेव्हा त्याने अध्यापन करावे की रोजच्या तयार होणाऱ्या जेवणाकडे लक्ष द्यावे हे एक कोडंच आहे. तरी आजतागायत ही पद्धत जशास तसे चालूच आहे. आजपर्यंत दुःखदायक अशी घटना घडली नाही परंतु आजच्या घटनेनंतर मुख्याध्यापक व शिक्षकांच्या छातीत निश्चितपणे धडकी भरली असेल यात शंका नाही. स्वयंपाक करणारे व्यक्ती गावातीलच असतात त्यामुळे त्यांना काही म्हणता येत नाही. समितीचे मंडळी आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांचा त्यांच्याशी काही ना काही संबंध असतोच त्यामुळे ही मंडळी शिक्षकांना दबावात तरी ठेवतात किंवा पाहून न पाहिल्यासारखे करा असा सल्ला देतात. पोषण आहार शिजविणाऱ्या व्यक्तीचे देयक काढण्यासाठी धडपड मुख्याध्यापकांनी करावी आणि त्यासाठी त्याला काय मिळते ? महिनाभर मुलांची उपस्थिती ऑनलाइन भरावे, स्वतःचा डाटा खर्च करायचे. आवक जावक सर्व माहिती भरावी. लागणारी सर्व कागद आपण खर्च करायचे आणि अमुक पैसा लागतोय असे म्हटल्यावर त्यांनी लाचलुचपत विभागाकडे संबंधितांची तक्रार करायची आणि लाचेच्या जाळ्यात टाकायचे असे एक प्रकरण नुकतेच घडले आहे. सर्व शिक्षक संघटना आणि इतर मंडळीनी याचा निषेध व्यक्त केला असला तरी असे काही होत असेल आणि काम करणाऱ्या लोकांना त्रास होत असल्यास सर्वप्रथम शासनाने यंत्रणेत प्रामुख्याने बदल करावा. शाळाप्रमुखाकडे या कामाची जबाबदारी न देता खाजगी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून हे काम करून घेतल्यास ते निश्चितपणे जबाबदारीपूर्वक भोजन तयार करतील. या सर्व प्रक्रियेवर मुख्याध्यापकांचे नियंत्रण असेल ज्यामुळे झालेला खर्च तपशील मिळेल. मात्र त्याचे देयक तयार करणे व सादर करणे हे पूर्णतः त्या संस्थेवर जबाबदारी ठेवल्यास बराच काही फरक पडेल असे वाटते. शाळेवरील मुख्याध्यापक किंवा शिक्षक त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे तेवढे काम दिल्यास खूप काही त्रास कमी होईल. मिळालेल्या वेळेचा उपयोग विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढविण्यासाठी तरी करता येईल. म्हणून सरकारने याविषयी गांभीर्याने अभ्यास करून शाळेतील मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना शालेय पोषण आहार योजनेतून लवकरात लवकर कायमची मुक्ती द्यावी, एवढेच सुचवावे वाटते.

धान्याचा पुरवठा स्थानिक पातळीवरून व्हावा - सध्या मध्यान्ह भोजन योजनेसाठी लागणाऱ्या धान्य व इतर पदार्थाचा पुरवठा जिल्हास्तरावरून केला जात आहे. निविदा काढून पुरवठा करण्याचे कंत्राट मिळविलेली व्यक्ती धान्याचा पुरवठा योग्य करतीलच ? याचीही खात्री नाही. परत धान्य तपासून घेण्याची जबाबदारी अर्थातच शाळा प्रमुख मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकाची असते. आलेला माल खराब आहे म्हणून परत केले तर धान्य लवकर मिळेल याची खात्री नसते. त्यामुळे बरेच शाळाप्रमुख धान्य परत न करता उतरवून घेतात. मात्र अधिकारी मंडळी या धान्याची वर्षातून एकदा तरी तपासणी करीत नाहीत ही फार मोठी शोकांतिका आहे. एखादे वेळी तपासणी केलेच तर त्यात धान्य खराब आढळल्यास त्या कंत्राटदाराला नोटीस मिळण्याच्या ऐवजी कर्मचाऱ्यांना त्यात दोषी ठरवून नोटीस दिली जाते. हे खरोखरच चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्यासारखे नव्हे काय ? त्यास्तव शाळेकडची ही यंत्रणा पूर्णतः बंद करून स्थानिक सेवाभावी संस्थेकडे प्रक्रिया सोपवावी. तसेच जिल्हा स्तरावरून पुरवठा करण्यापेक्षा पूर्वीप्रमाणेच स्थानिक स्वस्त धान्य दुकानादाराकडे पूर्वीप्रमाणे दिल्यास फ्रेश माल तरी मिळेल, असे वाटते.

भौतिक सुविधांचा अभाव - बहुतांशी शाळेत भौतिक सुविधांचा अभाव ठळकपणे दिसून येतो. हात स्वच्छ धुण्यास ज्या शाळेत पाणी नाही तेथे पिण्याचे पाणी कुठून मिळणार ? वर्गाच्या अध्यापन करण्यासाठी पुरेशी जागा नाही तेथे विद्यार्थ्यांना खाण्यासाठी कुठे बसावे ? प्राथमिक शाळेत सेवकच मंजूर नाही तेव्हा या जेवणाच्या वासाने शाळेत येणाऱ्या कुत्री, शेळी इत्यादी जनावरांना कोण आवर घालणार ? स्वयंपाक करणारी व्यक्ती नेहमी स्वच्छ राहतील याची काय खात्री ? येथे काम करताना काय त्रास होतो याची जाणीव फक्त यंत्रणेतील लोकांनाच आहे, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे या म्हणीनुसार.
शासनाने ही योजना बंद करावी असे मुळीच नाही, मात्र आज ज्या पद्धतीने ही योजना राबविल्या जात आहेत यात काहीतरी सुधारणा करणे गरजेचे आहे. वरील उपाययोजनांपैकी अजून काही उपाय असू शकतात. गरज आहे सर्वांनी एकत्र येऊन यावर चर्चा करण्याची व यावर तोडगा काढण्याची.

नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Tuesday 3 July 2018

परिपाठ

परिपाठ म्हणजे शाळेचा आत्मा

वर्गात पाऊल टाकता क्षणीच रोज जे आनंदाचे चेहरे दिसतात ते आज दिसत नव्हते. सकाळची वेळ होती तरी मुलांच्या चेहऱ्यावर नाराजी कसे काय ? याचे कोडे मला पडले होते. वर्गात मुलामुलींचे बसण्याच्या जागेवरून वाद झाले असतील, पण ती शंकासुद्धा निरर्थक झाली. शेवटी न राहवल्यामुळे " इतना सन्नाटा क्यू है .... भाई ?" या भावनेतून वर्गाला प्रश्न केला. तरीही सारा वर्ग स्तब्ध आणि शांत. जणूकाही आज संपाचा दिवस आहे आणि विद्यार्थ्यांनी सर्वांनी मिळून शालेय कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. कोणी तोंड उघडायला तयार नाही. वर्गनायिका असलेली पूजा जागेवर उभे राहत शांततेचे कारण सांगितले, " सर, आज आपल्या वर्गाचा परिपाठ होता, परंतु तो परिपाठ न झाल्यामुळे आम्ही सर्वजण नाराज आहोत." खरे कारण कळाल्यावर क्षणभर मी सुद्धा विचारात पडलो. आदल्या दिवशी रविवारची सुट्टी असल्यामुळे सोमवारच्या परिपाठाचे नियोजन शनिवारीच मुलांना करून दिली होती. सुट्टीच्या दिवशी चांगली तयारी करा आणि सुंदर परिपाठ सादर करा असे मुलांना सांगितलं होतं. त्याअनुषंगाने मुलांनी भरपूर तयारी केली होती परंतु बाहेर पडणार्‍या धो धो पावसाच्या सरीने मुलांच्या सर्व तयारीवर पाणी टाकले होते. त्यांची मेहनत वाया जाऊ नये यासाठी वर्गातच परिपाठ साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि फक्त वर्ग मर्यादित परिपाठ संपन्न झाला. परंतु जी मजा किंवा आनंद मैदानातील परिपाठ मधून मिळते ते या वर्गातून नक्कीच मिळत नाही, याची मनात जाणीव जागृती झाली. एका टोलनंतर एक टोल पडू लागले. दिवस संपला. मुले आपापल्या घरी गेली आणि आम्ही आमच्या घरी. परंतु आज सकाळी जे घडले त्या विचाराने आजचा दिवस अस्वस्थ वाटत होते. कोणत्याही कामात रुची वाटत नव्हती. वारंवार मनात एक आणि एकच प्रश्न पडत होता. वर्गखोलीत केलेला परिपाठ आणि मैदानावर केलेला परिपाठात असा काय फरक आहे ? विचार करीत करीत घरी आलो, विचारप्रक्रिया चालूच होती.
चार भिंतीच्या आतल्या वर्गखोली दिले जाणारे शिक्षण मुलांच्या मनावर तेवढे प्रभाव टाकू शकत नाही जेवढा प्रभाव उघड्यावर म्हणजे मैदानात घेण्यात येणाऱ्या परिपाठमधून टाकला जातो. शालेय वेळापत्रकातील सर्वात महत्त्वाची तासिका म्हणजे परिपाठ आहे. संपूर्ण वेळापत्रकातून परिपाठ जर वजा केले तर त्या शाळेत काही रस आहे असे वाटत नाही. दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. शाळेच्या दिवसाची सुरुवात प्रत्येक ठिकाणी परिपाठ या उपक्रमाने केला जातो. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी परिपाठ नावाचा उपक्रम थोड्याफार प्रमाणात राबविला जात होता. त्याला स्वरूप किंवा योग्य अशी दिशा नव्हती. काही मोठ्या शाळेतून गुरुपुष्प नावाचा उपक्रम दर गुरुवारी केल्या जात असे. ज्यात संस्कारक्षम गोष्टी सांगणे व श्लोक म्हणण्याची पद्धत होती. हळूहळू सुधारणा होत होत परिपाठ ही संकल्पना व त्याची उद्दिष्टे लक्षात येऊ लागले. संपूर्ण महाराष्ट्रात परिपाठ उपक्रमाची संकल्पना विद्याग्राम या नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. गोविंद नांदेडे यांच्या उपक्रमातून देण्यात आला. आजही सर्वत्र याच पुस्तकाच्या आधारे परिपाठ घेतला जातो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. बहुतांशी शाळेत जागेअभावी आणि विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे परिपाठ घेतल्या जात नाही. ज्या ठिकाणी दररोज परिपाठ घेतल्या जातो त्या ठिकाणच्या मुलांना एक दिवस परिपाठ झाला नाही तर रुखरुख वाटते. नैतिकता घसरली आहे अशी समाजातून जी ओरड चालू आहे त्यास आळा घालण्याचे काम या परिपाठाच्या माध्यमातून करणे शक्य आहे. 
शाळा आणि परिपाठ यांचा एकमेकांचा खूप जुना संबंध आहे. परिपाठाशिवाय शाळा सुरू करणे म्हणजे मूर्तीविना मंदिर असल्यासारखे होय. परिपाठ ज्या शाळेत सुरेख पद्धतीने चालतो त्या शाळेत पटनोंदणी, उपस्थिती आणि गुणवत्ता 100 टक्के दिसून येते. दिवसाची सुरुवात छान मनोरंजनात्मक पद्धतीने सुरू झाली तर मुलांना दिवसभर थकवा येत नाही. परिपाठ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमामुळे विद्यार्थी या वेळात शाळेत उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागण्यासाठी परिपाठ एक उपयोगी तंत्र म्हणून वापरता येऊ शकते. कोणते विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात हुशार आहेत याची सर्वात प्रथम जाणीव येथे होते. काही विद्यार्थी खूप छान गीत गायन करू शकतात. मात्र वर्ग अध्यापन करतांना विशेष लक्षात येत नाही. पण जेव्हा परिपाठ मध्ये प्रार्थना किंवा समूहगीत गायनासाठी विद्यार्थी समोर येतात तेंव्हा ते मनमोकळेपणाने गायन करतात. देशाविषयी असलेले अभिमान राष्ट्रगीत, संविधान आणि प्रतिज्ञाच्या माध्यमातून बाळगणे शिकविता येऊ शकते. काही शाळेत मुलांचे वाढदिवस साजरा करतात. अश्या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि शाळा यांचा जवळचा संबंध निर्माण होऊ शकतो. परिपाठ हा 15-20 मिनिटांचा असतो पण खरा विद्यार्थी याच ठिकाणी घडतो. विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्राविषयी आदर भावना तयार करणे, राष्ट्रगीत म्हणताना स्तब्ध उभे राहणे, समाजात समता, समानता, बंधुता निर्माण करणे, एकमेकांविषयी प्रेम निर्माण होणे, सभाधीटपणा, वक्तशीरपणा, श्रमप्रतिष्ठा, स्वच्छता आणि आरोग्य ही मूल्ये रुजविण्याचे काम याच परिपाठामधून केल्या जाते. मुलांमधील सुप्त गुणांचा शोध त्याच ठिकाणी घेतला जातो.  परिपाठातून मुलावर झालेले संस्कार दीर्घकाळ टिकणारे असतात. परिपाठ म्हणजे शाळेचा आत्मा आहे म्हणून प्रत्येक शाळाप्रमुखांनी, शिक्षकांनी परिपाठाकडे एक संस्कार केंद्र म्हणून लक्ष द्यावे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
(लेखक नांदेड जिल्हा परिषदेत उपक्रमशील।प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. )

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...