Tuesday 14 August 2018

स्वातंत्र्य दिन विशेष लेख

विचार बदला, देश बदलेल

आज भारताचा 72 वा स्वातंत्र्य दिन. ह्या सोनेरी दिवसाची पहाट पाहण्यासाठी कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. आजच्या दिवशी आपण ह्या सर्व थोर क्रांतिकारक आणि महात्मा मंडळीची आठवण करतो.
" भारतमाता की जय " असा नारा देतांना त्या छोट्याशा शिरीषकुमारची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तो शाळकरी वयाचा म्हणजे जेमतेम 10 वर्षाचा होता. इंग्रजांचा विरोधात नारे दिल्यामुळे आणि भारतमातेची सेवा केल्यामुळे त्याला इंग्रजांनी ठार केले. परदेशी कपड्यांच्या गाडीसमोर स्वतःचे बलिदान करणारे बाबू गेनूला आपण कसे विसरू. शिरीषकुमार व बाबू गेनू आज आपल्यात नाहीत परंतु त्याच्या आठवणी, त्याचे कार्य अजूनही स्मरणात आहे. आपण ते कधीच विसरु शकत नाही. 
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी अनेक जणांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ उभी केली व देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. त्यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांनी पुणे येथील भिडेच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. समाजातील रुढ, परंपरा व सनातन पद्धतीच्या काळात फुले दाम्पत्याना खूप हालअपेष्टा सोसावे लागले. तरीही त्या॑नी न डगमगता शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्याचे महान काम केले त्यास्तव शैक्षणिक क्षेत्रातील त्याचे कार्य विसरून चालणार नाही. हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले हे तर लक्षात राहतेच शिवाय त्यांना घडविणारी राजमाता जिजाऊ यांची आठवण पदोपदी येत राहते. सहा महिन्यांचे तान्हे बाळ पाठीशी बांधून इंग्रज लोकांशी दोन हात करणारी आणि मेरी झाँसी नहीँ दूँगी अशी ठणकावून सांगणारी राणी लक्ष्मीबाई चे शौर्य आमच्यासाठी नेहमीच प्रेरणा देत राहील. गरीब व अनाथांची आई मदर तेरेसा हे त्यांच्या अविरत सेवेमुळे कायम स्मरणात राहतात. या सर्वच लोकाना जाऊन इतकी वर्षे झाली तरी त्यांचे नाव आपण स्मरणात ठेवतो, आठवण करतो, त्यांना विसरत नाही. कारण त्या॑नी कामाच असे केले आहे की त्यास कोणीच विसरू शकत नाही यालाच म्हणतात मरावे परी कीर्तिरूपे उरावे. 
आपणाला सुद्धा असेच काही लोकांच्या आठवणीत, स्मरणात रहावे असे कार्य करणे गरजेचे आहे. तसा निर्धार आपण करायला हवे. प्रसिद्ध विचारवंत साईरस म्हणतो की, ' कीर्ती मिळविण्यासाठी चांगल्या प्रकारची पुष्कळ कामे करावी लागतात ; मात्र अपकिर्ती होण्यासाठी एक वाईट काम पुरेसे असते'. अनेक लोक जन्मतात आणि किती तरी लोक रोज मरण पावतात. परंतु ज्यांनी समाजाच्या उपयोगी पडेल असे काम केले आहे त्यांचीच समाजामध्ये कीर्ती आणि नाव शिल्लक राहते. स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या व धडपडणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबातील सदस्यच तेवढे लक्षात ठेवू शकतात. त्यामुळे हेन्नी एस. सटन यांनी म्हटल्याप्रमाणे ' कीर्ती मिळवायचे असेल तर दुसऱ्याचे अश्रू पुसण्यचे प्रयत्न करा'. आपण जेंव्हा इतरांचे दुःख समजून घेऊन त्याना हातभार किंवा दिलासा देतो तेंव्हा त्याच्या मनात आपल्याविषयी करुणा, प्रेम, माया आणि ममतेची भावना निर्माण होते आणि नक्कीच आपली कीर्ती होते. या जगात आपण रिकाम्या हाताने आलोत आणि रिकाम्या हातानेच परत जाणार आहोत ही जगज्जेता सिकंदराची शिकवण विसरून चालणार नाही. 
आपण खुप नशीबवान आहोत की स्वातंत्र्य उत्तर काळात आपला जन्म झाला. गुलामगिरी म्हणजे काय असते याची जरा सुध्दा आपणास जाणीव झाली नाही. आपण स्वातंत्र्यलढाचा इतिहास फक्त पुस्तकातुन वाचन करतो आणि तेच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी तर अमुक तारीख आणि अमुक व्यक्ती माझ्या लक्षात राहतच नाही असे ही बोलून जातो. जुलमी इंग्रजांच्या गुलामगिरीत लोकांनी काय हालअपेष्ट सहन केल्या असतील ? त्यांचा इतिहास वाचूनच अंगावर काटा उभा राहतो. सुखदेव, राजगुरु आणि भगतसिंग यांची नावे ऐकली की मनात स्फूर्ती निर्माण होते. भारतमाता की जय म्हटल्यामुळे शाळकरी शिरीषकुमारला इंग्रजांनी गोळ्या झाडल्या आणि आज आमच्या तोंडातुन भारतमाता की जय बारीक़ आवाजात निघतो. कारण आपणाला स्वातंत्र्य फुकटात मिळालेले आहे.त्यामुळे त्याचे आपणास काही एक किमत नाही. म्हणतात की फुकटच्या वस्तूची किमत विकत घेतल्याशिवाय कळत नाही.
आज आपणास प्रत्येक गोष्टीचे स्वातंत्र्य आहे. इंग्रज लोक भारतातुन निघून जाऊन 72 वर्षाचा काळ गेला. या 72 वर्षात भारताने लक्षणीय प्रगती केली नाही हे जरी सत्य असले, तरी संपूर्ण जग भारत देशाकडे विकसनशील देश या नजरेतून पाहते. आज भारतात मनुष्यबळ तर आहेच शिवाय बुद्धिमान लोकांची संख्या सुध्दा भरपूर आहे. त्यामुळे जग आपल्याकडे बुद्धिमान व हुशार युवकांचा पुरवठा करणारा देश म्हणून पाहतो. आपल्या देशात युवकासाठी रोजगार नाहीत म्हणून होणारी ओरड सर्वत्र आहे. विदेशात काय रोजगार मोठ्या प्रमाणावर आहेत काय ? अर्थात या प्रश्नाचे उत्तर सुध्दा नाही, असेच मिळणार. सर्वाना रोजगार मिळत नाही जो यासाठी पात्र असेल ज्याच्या जवळ बुद्धिमत्ता आहे त्याला जगात कोठेही रोजगार मिळेल यात शंका नाही. परंतु स्वातंत्र्य जसे फुकट मिळाले तसे सर्व काही फुकट मिळाल्यास जीवन सुखी होईल, असे स्वप्न रंगविणारे युवक देशाच्या प्रगतीत काय हातभार लावतील ? ते फक्त रडण्याचे काम करतील. कारण त्यांना आयती खायची सवय लागली. युवकांच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. तसा युवकांनी देखील स्वतः प्रयत्न करणे गरजेचे. देशाने आपणास खुप काही दिले याची एकदा जाणीव निर्माण करा. आपल्या देशाची प्रगती करणे आपल्या हातात आहे. कधी तरी आपल्या स्वतः पुरता विचार करणे बाजूला ठेवून, कोण आपणास काय दिले यापेक्षा मी देशासाठी काय केलो याची एकदा तरी गोळा बेरीज आपण केली आहे काय ? ज्याप्रकारे मिसाइल मैन तथा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे की, देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे काय ? हा प्रश्न सर्वानी आपल्या स्वतः च्या मनाला दिवसातुन एकदा तरी विचारावे. देशाच्या सेवेसाठी माझे योगदान काय आहे ? याचा विचार आपण करणे आवश्यक आहे. जन्म देणारी आई आणि ज्या भूमीवर आपण जन्म घेतला ती भारतमाता अश्या दोन माता प्रत्येकाच्या जीवनात असतात. म्हणूनच प्रसिद्ध गझलकार सुरेश भट म्हणतात की गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला, चंद्र सूर्य तारे. या प्रकारे आपण जन्मदात्री आईची सेवा मनापासून करतो तसे भारत मातेची सुद्धा सेवा करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहेत. सीमारेषेवर डोळ्यात तेल घालून देशाचे संरक्षण करणारे सैनिकच फक्त देश सेवा करीत नाहीत, तर आपण सुद्धा आपापल्या परीने देशाची सेवा करू शकतो. सैनिक लोकांमध्ये ज्याप्रकारे देशभक्ती निर्माण केल्या जाते तसे इतर नागरिकांमध्ये सुद्धा निर्माण होणे अत्यावश्यक आहे. आपण ज्या देशात राहतो त्या देशाने तयार केलेल्या घटनेनुसार आपणास वागावे लागते. त्याविरुद्ध वागलो तर निश्चितपणे आपण काहीतरी चूक करीत आहोत किंवा गुन्हा घडत आहे असे वाटते. नियमाचे उल्लंघन न करता प्रामाणिकपणे वागणे यातून एक प्रकारे देशसेवाच घडते. आपले कर्तव्य आपण न विसरता काम करीत राहिलो तर त्यातून देशाची सेवा घडते. प्रत्येकांनी आपल्या देशाचे नाव उज्ज्वल व्हावे म्हणून प्रामाणिकपणे कार्य करायला हवे. सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात कुचराई न करता काम करणे गरजेचे आहे. राजकारणी लोकांनी जनतेचे कल्याण आणि विकास होईल असे काम केल्यास ती खरी देशसेवा ठरेल. व्यापारी मंडळींनी आपल्या व्यवहारात शुद्ध व्यवहार ठेवल्यास आपल्या व्यापाराची कीर्ती होईल आणि देशाचे नाव होईल. खेळाडू तर आपल्या खेळाद्वारे देशाचे नाव जगभर पोहोचवत देशाची सेवा करत असतात. आज देशामध्ये सर्वत्र भ्रष्टाचार फोफावला आहे. यअमुक ठिकाणी लाच घेताना कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली, अश्या बातम्या रोज निदान एक तरी वाचायला मिळते. जे लोक अधिक पैसा मिळविण्याच्या दृष्टीने किंवा लवकरात लवकर श्रीमंत व्हावे या उद्देशाने सामान्य नागरिकांना पैशाचा तगादा लावतात. लाच दिल्याशिवाय काम पूर्ण करीत नाहीत, अशी मंडळी देश सेवा करतात काय ? जेव्हा त्यांना अटक झाल्याची बातमी बाहेर येते तेव्हा त्यांच्या संपूर्ण परिवाराची बदनामी होते. ते ज्या विभागात काम करतात त्या विभागाची सुद्धा नाचक्की होते. ज्या गावात किंवा तालुक्यात ते काम करतात त्या गावाचे वा तालुक्याचे नाव देखील खराब होते. ज्या ठिकाणी आपल्यावर डाग लागतो त्या ठिकाणी आपण आपल्याशी जोडलेल्या सर्वच घटकावर डाग लागतोच लागतो. याद्वारे आपली देशसेवा होते का ? भ्रष्टाचार करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने याविषयी एकदा तरी विचार करावा. प्रत्येकजण या दृष्टिकोनातून विचार केल्यास भारतात भ्रष्टाचार संपवायला वेळ लागणार नाही. जगात भारताला घोटाळ्याचा देश असे म्हटले जाते. प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपले कर्तव्य पूर्ण करीत जनतेचे काम केल्यास ते एक प्रकारे देशसेवाच ठरेल असे वाटते. आपण जर एका वेगळ्या दिशेने विचार केलो तर आपणास पुढील तीस वर्षात नक्कीच वेगळा भारत दिसेल ज्यावेळी आपण सर्व आपल्या भारतीय स्वातंत्र्याची शतकी साजरी करू. आपले विचार बदला देश आपोआप बदलेल. देशाला बदलण्याच्या काळजीत आम्हीच बदलायला तयार नाही.

- नागोराव सा. येवतीकर
( लेखक नांदेड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक आहेत.)
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...