Thursday 31 October 2019

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात.
अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत. यामध्ये काळी जादू, तंत्र-मंत्र, जादूटोणा, नरबळी, नजर टोक, तसेच भूत- प्रेत, पिशाच्च या संबंधित अंधविश्वास, अफवा पसरवणे व कृती करणे तसेच या कृतींचाही इतर प्राणी जीवनावर विपरीत परिणाम होणे म्हणजेच अंधश्रद्धा फोफावणे. भारतात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. अंधश्रद्धेमुऴे निरपराध जीवांचे बळी जातात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा माणसाच्या स्वभावाच्या जीवनाचे दोन पैलू आहेत. सुरुवातीस श्रद्धा वाटत असलेली बाब हळूहळू अंधश्रद्धेत कधी परावर्तित होते, याची कल्पनासुद्धा येत नाही. भारत देश हा दैववादी देश आहे. याठिकाणी ईश्वराला मानणाऱ्याची संख्या जेवढ्या प्रमाणात आहे त्याच प्रमाणात भूतदयेला मानणारे ही आहेत. जे लोक ईश्वर आहे म्हणतात तेच लोक भूत सुद्धा आहे म्हणतात आणि सुरू होतो श्रध्दा आणि अंधश्रद्धा याचा खेळ. लोकांच्या मनात ईश्वरविषयी ओढ असते आणि भूताविषयी भीती. हे सर्व अगदी लहानपणापासून मुलांच्या मनावर प्रतिबिंबित होत असते. प्रत्येकाच्या घरातून बालपणी मुलांवर याविषयी नकळत संस्कार होत जाते. त्यामुळे ते त्या रिंगणाच्या बाहेर जाऊच शकत नाही. काही ढोंगी लोकांमुळे अशिक्षितांमुळे व जुन्या परंपरा आणि विचारसरणीमुऴे अंधश्रद्धेचे प्रमाण वाढत जाते. समाजातील अज्ञानाचा फायदा घेवून विघातक वृत्तीकडून होणारे शोषण थांबविण्यासाठी महाराष्ट्राने २०१३ साली कठोर कायदा केला आहे. याचे संंक्षिप्त नाव महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा, २०१३ असे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र दाभोळकरशाम मानव अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाला हा कायदा करावा लागला. भारत सरकारला जादूटोणा विधेयक तयार करण्याची पाळी आली, हीच फार मोठी नामुष्की मानावे लागेल. या विधेयकामुळे गैर प्रकारावर आळा घालविता येईल अशी आशा सरकारला व या विधेयकाच्या अनुयायी लोकांना वाटत असेल मात्र लोकांच्या मनात असलेली अंधश्रद्धा यामुळे घालविता येईल काय ? याविषयी ठामपणे सांगता येत नाही. कारण लोकांच्या मनात असलेली अंधश्रद्धा या विधेयकामुळे मनात दाबली जाईल, पण कायमचे नष्ट होणार नाही.
आमच्या शेजारी राहणाऱ्या एकाने नवीन दुचाकी गाडी विकत घेतली. त्यानंतर सर्वाप्रमाणे त्यांनी सुद्धा या गाडीची यथायोग्य पूजा करून त्यास गंध लावून, त्याच्या समोर नारळ फोडून, त्या गाडीस मिरच्या, लिंबू, बिब्या, काळे केस असे पदार्थ एकत्र करून बांधले. त्याठिकाणी एक मुलगा हे सर्व पाहत उभा होता. जेमतेम सहा-सात वर्षाचा असेल तो, त्याने त्याच्या वडिलांना विचारले की, हे असे का करतात ? त्या निरागस मुलाने निष्पाप भावनेने प्रश्न विचारला मात्र त्या वडिलांना त्याचे नेमके उत्तर देता आले नाही. थातुरमातुर उत्तर देऊन वडिलांनी वेळ काढून नेली. त्यामुळे त्या मुलांच्या मनातील प्रश्नांची उकल काही होऊ शकले नाही. हे असेच चालत आले. लोकं करतात म्हणून आपण ही करावे, या अंधनुकरणाचे वागणे दिवसेंदिवस वाढतच आहे. असे केले नाही तर आपणाला व आपल्या गाडीला अपघात होण्याची शक्यता असते आणि खरोखरच असे केले तर गाडीचा अपघात होणारच नाही का ? ज्यांचे अपघात झाले त्यांनी असे केले नाही म्हणून झाले काय ? मोबाईलचे हेडफोन कानात टाकून गाडी चालविल्यास अपघात होणारच. त्यासाठी गाडीला मिरची किंवा लिंबू बांधणे किंवा न बांधणे हा भाग येत नाही. अशी अंधश्रद्धा लोकांच्या मनातून हे विधेयक संपविणार आहे काय ? लोकांच्या श्रद्धेचा गैरवापर करून काही महाभाग लोकं जे स्वतः स्वयंघोषित स्वामी किंवा संत जाहीर करतात ही मंडळी त्यांना अंधश्रद्धा च्या खाईत ढकलतात. या विधेयकाने त्यांच्यावर अंकुश ठेवता येईल. परंतु त्यांच्याविषयी बोलण्यास कोणी तयारच होत नसतील तर त्यांचे कोण वाकडे करणार आहे. यासाठी प्रत्येकाच्या मनातून सर्वप्रथम अंधश्रद्धा दूर करावी लागेल. त्याशिवाय असे किती ही विधेयक जरी तयार झाले तरी काही फरक पडणार नाही.
लहानपणच्या वयात मुलांवर चांगल्या प्रकारची संस्कार टाकण्यात आली तर त्याचा मोठेपणी नक्कीच फायदा होऊ शकतो. शिक्षण हे असे एक माध्यम आहे ज्यामुळे बऱ्याच अंधश्रद्धा समूळ नष्ट होण्यास मदत मिळते. त्यामुळे मुलांच्या प्राथमिक शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचा आणि अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा फायदा निश्चितपणे होतो. तसा प्रयत्न शासनापासून घरापर्यंत सर्वांचा होणे आवश्यक आहे. तसे झाल्यासच विद्यार्थ्यांच्या मनात अंधश्रद्धा डोकावणार नाही. याविषयी संबंधित एखादा पाठ्य घटक प्रत्येक वर्गात समाविष्ट केल्यास अध्यापन व अध्ययन प्रक्रियेत त्याचा उलगडा निश्चितपणे करता येईल.
भारतात धर्म परंपरेनुसार काही शाळा स्थापना होतात आणि चालविल्या जातात. त्या शाळेतून त्या त्या धर्माच्या चाली रीती परंपरा त्यानुसार मुलांना शिक्षण दिल्या जाते. त्यामुळे त्या मुलांच्या मनातून अंधश्रद्धा संपविता येईल काय ? वास्तविक पाहता मुलांना जे प्राथमिक शिक्षण दिल्या जाते ते मुळात धार्मिक बाबीवर नसावेच. मुलांना राष्ट्रीय शिक्षण द्यावे. त्यामुळे त्यांच्या मनात राष्ट्राविषयी व येथील विविध पंथाच्या, धर्माच्या, जातीच्या लोकांविषयी आपुलकी, प्रेम निर्माण होईल. एका शाळेत रुजू झालेले विज्ञान निष्ठ शिक्षक त्या शाळेतील दर शुक्रवारी होणारी सरस्वती मातेची पूजा-अर्चा ही प्रथा बंद पाडली. त्यांचे म्हणणे होते की, शाळेतून अशी पूजा-अर्चा करणे म्हणजे अंधश्रद्धा ला खतपाणी घातल्या सारखे होय. त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा यास विरोध दर्शविला. ते शिक्षक स्वतः हिंदू धर्माचे होते. मग त्यांनी ही प्रथा बंद करविली ते योग्य की अयोग्य ? या विषयी खूप चर्चा झाली. योगायोगाने एके दिवशी ते शिक्षक अचानक आजारी पडले तो दिवस ही शुक्रवारचा आणि लगेच शाळेत चर्चा होऊ लागली. " पहा, सरस्वतीची पूजा बंद करविली म्हणून ते आजारी पडले. माता सरस्वतीने त्यांना धडा शिकविला." ही चर्चा त्यांच्या कानापर्यंत पोहोचली, तसे ते मनातून हादरले. दहा-पंधरा दिवसानंतर त्यांनी शुक्रवारचा दिवस ठरवूनच शाळेत रुजू झाले. सदरील शिक्षक येणार नाहीत या विचाराने नियोजित वेळापत्रकाप्रमाणे वर्गात विद्यार्थी सरस्वती माताच्या प्रतिमेचे पूजन केले आणि प्रसाद वाटत असताना ते आले आणि त्यांनी ब्र देखील काढले नाही. त्यांच्या मनात भीती निर्माण केली ते सहकाऱ्यांच्या चर्चेतून. त्यास्तव देवा विषयी स्वतः च्या मनात असलेली श्रद्धा व भीती इतरांना सांगून आपण त्यांना अंधश्रद्धेच्या वाटेकडे घेऊन जात नाही काय ? निदान लहान मुलांच्या मनात तरी याविषयी योग्य अशी भावना तयार करावी ज्यामुळे त्यांच्या मनात अंधश्रद्धेचे बीज पेरल्या जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
शासकीय कर्मचारी तरी निदान अंधश्रद्धेला बळी पडू नये,  असे बोलल्या जाते. मात्र याच लोकांच्या माध्यमातून समाजात अंधश्रद्धा फोफावली जात आहे, हे ही तेवढेच सत्य आहे. जिल्ह्याच्या ठिकाणच्या कार्यालयातील अर्थ विभागात काही कामानिमित्त जाणे झाले होते. कार्यालयात अजून कोणी ही आलेले नव्हते. म्हणून मी त्या विभागातील रिकाम्या खुर्चीवर बसलो. थोड्याच वेळांत तेथील कर्मचारी आला. आपल्या टेबलाखाली ड्राव्हर ओढली आणि त्यातून अगरबत्ती काढली. मला वाटले की एखादे फाईल काढेल पण त्यांनी त्यांच्या खुर्चीच्या उजव्या बाजूला असलेल्या लक्ष्मीमाता आणि बालाजीच्या फोटोला अगरबत्ती ओवाळून नमस्कार केला. त्यानंतर माझ्याकडे मोर्चा वळला. मी हे सारे दृश्य पाहून अवाक झालो. मी ज्यांच्या सोबत या कार्यालयात गेलो होतो त्याचे त्याला काहीच वाटले नाही. मी त्यास प्रश्न विचारला हे काय आहे ? त्याने मला समजाविताना म्हणाला की, अर्थ विभाग आहे, लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून ते रोज सकाळी पूजा करतात आणि कामाला सुरुवात करतात. त्याच्या उत्तराने माझे समाधान झाले नाही व त्याचा तेंव्हा अर्थ ही कळाले नाही. तेथे तर फक्त कागद देऊन कागदरूपी चेक द्यायचे काम असताना त्यांना लक्ष्मी कशी प्रसन्न होईल ? या प्रश्नाने मी हैराण होतो. परंतु जेमतेम एखादा महिना उलटला असेल नसेल त्याच अर्थ विभागातील त्याच कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याने एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची बातमी वाचण्यात आली. जिल्हा परिषदेने त्या कर्मचाऱ्यास निलंबित केले. तेंव्हा कळून चुकले की लोकं कशासाठी काय करतात ? वास्तविक पाहता शासकीय कार्यालयात देव-देवतांची पूजा अर्चा करणे योग्य आहे का ? याची उकल अजून ही झाले नाही. गल्लो गल्लीत, गावागावात, शहरात, नगरमध्ये गणपती मूर्तीची स्थापना करून त्याची पूजा अर्चा करणे एकवेळ समजू शकतो परंतु शासकीय कार्यालयात गणपतीची स्थापना व त्याची पूजा अर्चा मोठं मोठ्या अधिकारी वर्गाकडून करण्यात आले तर ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा , अश्या प्रसंगातून समाजात काय संदेश जातो ? याचा विचार मात्र कोणीच करत नाही. घटना तश्या फारच छोट्या आहेत परंतु त्यावर विचारविनिमय केल्यास बऱ्याच काही बाबीवर याचा परिणाम होताना दिसून येतो. या व अश्या अनेक घटना समाजात नेहमीच घडत असतात त्याकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी निर्माण झाल्यास अंधश्रद्धा विधेयकाची आपणास गरज भासणार नाही. आपण अंधश्रद्धाळू लोकच बुवाबाजीला प्रोत्साहन देत असतो. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार या म्हणीप्रमाणे आपण अंधश्रद्धा च्या विळख्यात सापडलोच नाही तर आपणाला कोणी फसविणार नाही.

( वरील सर्व घटना अनुभवातल्या आहेत मात्र त्यात थोडी काल्पनिक झालर देऊन अंधश्रद्धा कशी फोफावत जात आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवाला मानू नका, पूजा-अर्चा करू नका असे माझे मुळीच म्हणणे नसून त्यातून योग्य असा संदेश जाईल असे कार्य करावं एवढंच सुचवावे वाटते. )

- नागोराव सा. येवतीकर
अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती, धर्माबाद

Wednesday 30 October 2019

सायकल .......!


*सायकल ......*


शारीरिक शक्तीने चालविले जाणारे दोन चाकी वाहन म्हणजे सायकल. लहानपणी ती सर्वांचीच आवडती. अनेक ठिकाणी हे वाहतुकीचे, व्यायामाचे आणि खेळाचे मुख्य व स्वस्त साधन आहे. हे साधन तीन तसेच चार चाकी ही असु शकते. सहसा सायकल पायांनी चालविता येणारी व लोखंडी फ्रेम असणारी असते. यात दोन प्रकार मोडतात. तीन चाकी सायकलला रिक्षा असे म्हटले जाते. सहसा ते माणसांना आणि सामान वाहून नेण्यासाठी वापर केला जातो. आपल्या वयाचा कोणी सायकल चालवत असे तर आपल्या मनात देखील सायकल चालविण्याची उत्कट इच्छा निर्माण व्हायची. पण सायकल खरेदी करण्याऐवढं पैसे जवळ असायचे नाही म्हणून एक तर त्या सायकलवाल्या मुलांशी मैत्री करायची आणि एखादं चक्कर मिळवायची. गावात काही दुकानदार छोटी छोटी चार पाच सायकल ठेवायची आणि घंटाच्या हिशोबाने सायकल फिरविण्यास किरायाने द्यायचे. खाऊसाठी दिलेला पैसा मग या किरायाच्या सायकलसाठी खर्च करायचं. घंटा ओलांडून गेल्यास तो जास्तीचे पैसे घेई म्हणून तीन चार वेळा त्याला विचारायचं झाला का घंटा, तो नाही म्हणे पर्यंत फिरवीत राहायचं. सुट्टीच्या दिवसांत आम्ही सारेच मुलं सायकल फिरवायचो त्यामुळे किरायाची सायकल देखील कधी कधी वेळेवर मिळायची नाही. छोटी सायकल चालविणे सोपे असायचे, त्याच्यासाठी कोणी शिकविणे गरजेचे नसायचे पण मोठ्यांची सायकल चालवणे जरासे अवघड जायचे. मग सुरुवातीला कोणी तरी सायकलला धरायचे आणि चालवायचे. एकदा तोल सांभाळता आले की मग मोठी सायकल देखील चालवायचो. सुरुवातीला कैंची सायकल चालवायची म्हणजे सीट च्या खाली एक दंडी असायची त्यात पाय घालून चालवायची. काही दिवसांनी सीट वर बसून सायकल चालवायची जरी पायडलला पाय पुरत नसेल तरी. जेंव्हा मोठी सायकल चांगली चालविता येऊ लागली की मित्रांना डबल सीट बसवून सायकल चालवायची. असा सायकल चालविण्याचा प्रवास चालू असायचा. त्याकाळी मोटारसायकल फार कमी पाहायला मिळायचे. लग्न कार्यात नवरदेवाला खास करून सायकल दिल्या जायचं. जवळच्या शहरात जाणे असो वा शेताला जाणे असो त्यासाठी सायकलचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होता. प्रत्येकाच्या घरी एखादं सायकल हमखास असायची, त्याची जागा आज मोटारसायकलने घेतली आहे. गावातले एखादं कोणी व्यक्ती सायकल मागितले की त्यांना ते दिले जायचे कारण त्याला सायकल दिल्याने आपला काही खर्च व्हायचा नाही. कारण त्याला ना पेट्रोल लागतो ना डिझेल, त्यामुळे मागेपुढे काही विचार न करता मागितल्या बरोबर सायकल मिळायची. गावात कोणाचं मृत्यू झाला असेल तर त्याची बातमी सगेसोयरे, नातेवाईक यांना सांगण्यासाठी सायकलवर जावे लागत असे. दळणवळण साठी बैलगाडीच्या नंतर सायकलचा क्रमांक लागत होता. सायकलवरून कोणाचा अपघात झाला तरी कोणाचा मृत्यू झालेले आजपर्यंत ऐकण्यात नाही. जास्तीत जास्त खरचटते किंवा मुका मार लागतो.

सायकल हे पर्यावरण पूरक आहे कारण याला कोणत्याच प्रकारचे इंधन लागत नाही, त्यामुळे प्रदूषण होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्याचसोबत सायकल चालविण्यासाठी हातपाय हलवावे लागते त्यामुळे आपला शारीरिक व्यायाम देखील होतो. जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवणे पर्यावरणासाठी व वैयक्तिक आरोग्यासाठीसुद्धा उत्तम आहे. सध्या या धावपळीच्या जीवनात सायकलला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. आत्ता व्यायामशाळेत सायकलने आपली वेगळी जागा निर्माण केले आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये सायकलिंग चे महत्व वाढलेले आहे. सायकल लहानांपासून ते वृद्ध व्यक्ती चालवू शकतात. सायकल उत्पादनासाठी पंजाब आणि हरियाना ही राज्ये अग्रेसर आहेत. अगदी सुरुवातीला अटलास ही एकच कंपनी सायकल बनवत असे. आज सायकल वापरणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली. आम्हांला माध्यमिक शाळेत शिकत असतांना सायकल मिळायची आणि ती एकच सायकल शिक्षण पूर्ण होईपर्यंत सोबत असायची. स्वतःची नोकरी लागल्यावरच हातात गाडी यायची आणि ते ही स्वतःच्या पैश्याने. शाळा महाविद्यालयात जाणारी मुलं देखील सायकल ऐवजी गाडीची मागणी करतांना दिसत आहेत. तसेच आजची पालक मंडळी पैश्याने समृद्ध असल्या कारणाने ते आपल्या मुलांना गाडी घेऊन देत आहेत. मात्र पालकांनी यावर एकवेळ विचार करावा आणि आपल्या मुलामुलींना शाळा महाविद्यालयात किंवा शिकवणीला जाण्यासाठी गाडी ऐवजी सायकलचा पर्याय निवडावा. त्यामुळे एक फायदा होऊ शकतो, आपल्या मुलामुलींची शारीरिक हालचाल होईल, आणि इंधन भरण्यासाठी पॉकेटमनी द्यावे लागणार नाही. शालेय जीवनातील मुलांसाठी सायकलचे महत्व आपण जाणून घ्यावे आणि सायकलच वापरण्याची सक्ती करावी. तरुण वयातील ही मुले हातात गाडी आल्यामुळे बेफामपणे गाडी चालवितात, ज्यामुळे स्वतःच्या मुलामुलींना दुखापत होतेच शिवाय दुसऱ्यांना देखील त्रास होतो. जीव कोणाचेही असेल ते अनमोल आहे, असे हकनाक जीव जाण्यापासून वाचवावे.

*सायकलच्या इतिहासातील काही नोंदी

उत्तराखंडच्या 72 वर्षे वय असलेल्या मोहम्मद अहमद ज्यांना 'देशप्रेमी' अहमद म्हटले जाते त्यांनी सायकल वर भारतभ्रमण केल्याची नोंद आहे.
छत्तीसगढच्या दिल्ली यूनिवर्सिटी मधील विद्यार्थी मोहम्मद आफताब फरीदी भारताच्या सैनिकांच्या सन्मानासाठी दिल्लीहुन आपली सायकल यात्रा चालू केली होती. गोल्ड मेडलिस्ट आफताब फरीदी संपूर्ण भारत भ्रमणचा रेकॉर्ड बनविण्याच्या निर्धाराने बाहेर पडला
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील जवळगाव येथील धोंडीराम ने विना ब्रेक ची सायकल घेऊन संपूर्ण भारतभर प्रवास केला आहे. सडक सुरक्षा आणि बेटी बचावचा संदेश त्यांनी आपल्या प्रवासात जनतेला दिला.
आजकालचे युवक सायकल चालविण्यात संकोच करतात. महागडी गाडी आणि कार चालविण्यात त्यांना स्वतः ची शान वाटते. सायकल चालविल्यामुळे आरोग्य चांगले राहते. प्रदूषण होत नाही. सायकल चालविणे सर्वासाठी चांगले आहे, त्यामुळे सर्वांनी असा विचार करणे आवश्यक आहे असे बिहार राज्यातील मुजफ्फर जिल्ह्यातील सैनिक शाळेतील विद्यार्थी सचिन राज यांनी म्हटले आहे जो की स्वतः सायकल वर भारतभ्रमण केला आहे.
विदेशातील काही मंडळी विश्व भ्रमण करण्यासाठी सायकलचा वापर केल्याची नोंद इतिहासात मिळते
पुणे जिल्ह्यातील वेदांगी कुलकर्णी जिचे वय अवघे 20 वर्षे तिने सायकलने सर्वात लवकर विश्व भ्रमण करणारी पहिली आशियाई नागरिक बनली तिने 29 हजार किलोमीटर सायकलने प्रवास केला आहे. तिने 159 दिवसांत 14 देशात रोज 300 किमी प्रवास करून विश्वभ्रमण पूर्ण केली. 
जगामध्ये पहिली सायकल १८१६ मध्ये पेरीस मधील एका कारागीरने तयार केल्याची नोंद आहे

- नासा येवतीकर, 9423625769

Sunday 27 October 2019

आठवणीतील दिवाळी

आठवणीतली दिवाळी

लहानपणी दिवाळी सणाचे खूप आकर्षण असायचे. खास करून फटाक्यांसाठी ही दिवाळी लक्षात असायची. शाळेला सुट्या लागल्या पासून दिवाळीची मौजमजा चालू व्हायची. तोटे आणि मोठे बॉम्ब फोडायची भीती वाटायची पण ते मिळायचे देखील नाही. आवडते फटाके म्हणजे टिकल्या वाजविणे. मोठ्या दगडावर टिकली ठेवायची आणि दुसऱ्या छोट्या दगडाने ती वाजवायची. कधी कधी अंगठा आणि पहिलेबोट यात टिकली धरून दगडावर घासायची. टिकलीचा आवाज झाला की आनंद व्हायचा. यात कधी कधी नखाला दुखापत व्हायची, पण असे साऱ्यांना करता येत नसायचे म्हणून अभिमान वाटायचं. पुढे काही वर्षांनी टिकली वाजवायचे बंदूक आले आणि त्याच्या पाठोपाठ रोलच्या टिकल्या आल्या. झाड लावणे आणि भुईचक्कर फिरविण्यासाठी सुरसुरीचा वापर करणे एवढंच काय ते दिवाळीचे फटाके. जेमतेम पन्नास रुपयांत दिवाळीचे फटाके यायचे आणि त्यातच मौज मानून घ्यायचं. गावात काही श्रीमंत मंडळी होती जे की खूप फटाके वाजवित असत, आणि मी दुरून पाहून आनंद घ्यायचो. माझे काही मित्र हातात तोटे धरून वाजवत असत. असे करतांना एक दोनदा त्यांचे हात भाजल्याचे माझ्या आज ही आठवणीत आहे. माझ्या एका मित्राने वरच्या खिशात तोटे भरले, हातात उदबत्ती घेतली आणि वाजवू लागला. त्याला काही कळण्याच्या आत त्याच्या वरच्या खिशात कुठूनतरी ठिणगी पडली आणि खिशात फटाके वाजायला सुरूवात झाली तसे तो उड्या मारू लागला. त्याचा दिवाळीचा नवा कोरा शर्ट खराब झाला. काही सेकंदात तो अंगातून शर्ट काढला म्हणून विघ्न टळलं, नाही तर त्याचा अंग नक्कीच भाजला असता. काही खोड्या काढणारे मित्र ही होते सोबतीला. एखाद्याच्या पाठीमागून त्यांच्या पायाखाली तोटे लावायचे आणि मजा बघायची. कधी कधी असे करतांना त्याला शिव्या देखील मिळायचे पण तो काही तसे करायचं सोडायचं नाही. दिवाळीच्या आदल्यादिवशी गावात जे दुकानंअसायचे ते लक्ष्मीपूजन करायचे आणि सायंकाळी खूप फटाके वाजवायचे. ते पाहतांना खरंच खूप मजा यायची. त्याच दुकानासमोर मग मोठी माणसे आणि लहान मुले पत्ते ( जुआ ) खेळायची. दुसऱ्या दिवशी सकाळी भल्या पहाटे उठून अंगाला उटनं लावून अंघोळ करायचं. दिवाळीसाठी घेतलेले नवीन कपडे अंगात टाकून खेळायला बाहेर पडायचं. या दिवशी खास करून एक क्रिकेटची मॅच असायची. गावापासून दूर तलावात जाऊन सर्व मित्र क्रिकेट खेळायचं आणि घरी आल्या बरोबर बोटवे आणि वरण भात खाण्याचा बेत असायचा. सायंकाळी आमच्या गावात लक्ष्मी मंदिरात पूजा असायची आणि त्यासाठी गावातल्या सर्व सुवासिनी बायका डोक्यावर दोन माठ आणि त्यात वर दिवा लावून आळंक्या काढायचे. त्यावेळी सुद्धा खूप फटाकेवाजविले जात असे. दिवाळीच्या निमित्ताने गाव सोडून गेलेले अनेकजण मूळ गावी येत असत त्यामुळे गाव भरून जात असे. पण आज तसे काही दिसत नाही. गावातली दिवाळी आज हरवल्यासारखी वाटते. फटाक्यांचा आवाज वाढलंय मात्र प्रेमाचा जिव्हाळा हळूहळू कमी होत चाललंय. दिवाळीचे हे क्षण जरी आज आठवले तरी मन प्रसन्न होऊन जाते.

सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा .....!

- नासा येवतीकर, धर्माबाद
संयोजक, फ्रेश मॉर्निंग बुलेटीन
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...