Saturday 1 May 2021

02/05/2021 Dogs story

राजू आणि कुत्र्याचे पिल्लू
शाळेतून येता येता राजूला रस्त्यावर एक छोटंसं कुत्र्याचे पिल्लू दिसलं. त्याच्या आसपास कोणीच नव्हतं. तो एकटाच होता, त्याची आईपण जवळ नव्हती, त्याला भूक लागली असेल असे राजूला वाटले म्हणून त्याने आपल्या बॅगमधील खाऊचा डबा काढला. त्यात एक दोन बिस्कीट होते. दुपारच्या सुट्टीत खाल्ले नव्हते म्हणून ते शिल्लक होते. डब्यातून दोन बिस्कीट काढला आणि त्या छोट्या कुत्र्याच्या पिल्लूला खायला दिला. ते खाल्यावर त्याला जरा बरे वाटले म्हणून तो रस्त्याच्या एका बाजूला जाऊन बसला. ते कुत्र्याचं पिल्लू खूपच सुंदर होतं, त्यांचा रंग गव्हाच्या रंगासारखं होतं आणि नाकावर काळा रंग होता, दिसायला गुबगुबीत होता म्हणून तर राजूला तो खूपच आवडला होता. त्याला बाय बाय करून तो आपल्या घरी आला. त्यादिवशी त्याच्या मनात तो कुत्रा घर करून राहिला होता म्हणून त्याचे मन कुठेही लागत नव्हते. रात्रीला देखील त्याला झोप लागली नाही. सकाळ कधी होते आणि त्या कुत्र्याच्या पिल्लूला कधी एकदा भेटतो असे त्याला झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तो लवकरच तयार झाला. आज खाऊच्या डब्यात चार बिस्किटे जास्तच घेतली तेव्हा आई त्याला ओरडली " राजू, नुसते बिस्किटे खाऊन राहणार आहेस का ? पोळी-भाजी काही खाणार आहेस की नाही " 
यावर राजू म्हणाला " हो आई, सर्वच खातो, काळजी नको, बाय" असे म्हणून तो बॅग खांद्याला लटकावला आणि शाळेला निघाला. राजू चौथ्या वर्गात शिकणारा एक हुशार आणि अभ्यासू मुलगा. एकुलता एक होता पण त्याने कधी हट्ट करून आपल्या आई-बाबांना त्रास दिला नाही. त्याचे वडील एका खाजगी कंपनीत कामावर होते. सकाळी लवकर जात असत आणि रात्रीला उशिरा येत असत. राजुची आई मात्र खूपच प्रेमळ होती. शाळेतून घरी आली की ती त्याचा अभ्यास करवून घेई आणि छान छान गोष्टी सांगत गप्पा मारत असे.
घरापासून काही अंतर चालून गेल्यावर काल त्याला ते कुत्र्याचे पिल्लू दिसले होते म्हणून तो त्याला शोधू लागला. पण त्याला कुठेच दिसत नव्हतं. कुत्र्याचे पिल्लू दिसत नाही हे पाहून त्याला दुःख वाटू लागले. तो नाराज झाला होता पण तेवढ्यात काही अंतरावर ते कुत्र्याचे पिल्लू शेपूट हलवत हलवत राजूकडे येत असल्याचे त्याने पाहिले. तेव्हा राजू खूप आनंदी झाला. बॅगमधील खाऊच्या डब्यातून दोन बिस्किटे त्याला खाण्यास दिली आणि आनंदाने शाळेला गेला. शाळेत आज त्याला खूपच वेगळं वाटत होतं. आपण काहीतरी मोठं काम केलोय असे त्याला मनोमन वाटत होतं. 
मोरे सर वर्गात आले आणि त्यांनी शिकवायला सुरुवात केली. मुक्या प्राण्यांवर प्रेम करा असे आपल्या संतांनी सांगून गेले आहेत. असे मोरे सर बोलत होते आणि राजू मनोमन खूप खुश झाला होता. सायंकाळी शाळेतून घरी जाताना परत त्या कुत्र्याच्या पिल्लूला त्याने आपल्या खाऊच्या डब्यातील दोन बिस्किटे दिली. राजूने बिस्किट खाणे बंद केले आणि आपले बिस्किटे त्या कुत्र्याच्या पिल्लाला देऊ लागला. राजूची आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाची छान मैत्री जमली. शाळेतून येता जाता राजू त्याला बिस्किट खायला द्यायचा आणि ते पिल्लू राजूजवळ येऊन घुटमळत बसायचा. कुत्र्याच्या पिल्लाला राजुची ओळख झाली होती. तो दूरवर येताना पाहून त्याच्याकडे तोंड करून शेपूट हलवत उभा राहायचा.
त्या दिवशी रविवार होता. राजूने आपल्या आईला त्या रस्त्यावरील कुत्र्याच्या पिल्लूबद्दल पूर्ण माहिती सांगितली आणि म्हणाला, " आई, त्या कुत्र्याच्या पिल्लाला आपण घरी आणू या ना, प्लिज" यावर आई म्हणाली, " नको बाळा, आपल्या बाबांना हे मुळीच आवडत नाही" हे ऐकून तो खूप नाराज झाला. राजुचे बाबा जरा कडक शिस्तीचे होते. त्या दिवशी रविवारची सुट्टी होती. त्यामुळे राजूला देखील सुट्टी होती. पण त्या कुत्र्याच्या पिल्लूला काय माहीत ? आज रविवारची सुट्टी असते. तो राजू ज्या रस्त्याने येतो त्या रस्त्यावर डोळे लावून बसला पण तो काही आलाच नाही. ते पिल्लू खूप नाराज झाले. त्याला भूक लागली होती. काही तरी खायला मिळते का म्हणून तो रस्त्यावर इकडे तिकडे भटकू लागला. पण त्याला काहीच भेटले नाही. तेवढ्यात त्याला रस्त्याच्या मधोमध काहीतरी पडल्याचे दिसले आणि तो ते खाण्यासाठी तो पळत सुटला. तेवढ्यात दुसरीकडून खूप वेगात आलेल्या कारने त्या कुत्र्याच्या पिल्लाला उडवले. ते कुत्र्याचे पिल्लू जागेवरच गतप्राण झाले. कुणी तरी त्या कुत्र्याच्या पिल्लाला उचलून रस्त्याच्या एका बाजूला केलं. 
राजूला त्या दिवशी दिवसभर चैन पडले नाही. ते पिल्लू आज काय खाल्ले असेल ? उपाशीच झोपला असेल का ? असे नाना विचार त्याच्या डोक्यात घोळत होते. त्याला घरी आणलं असतं तर बरं झालं असतं असा विचार करतच तो झोपी गेला. सकाळ झाली. तो नेहमीप्रमाणे आपली बॅग घेऊन शाळेला निघाला. त्याठिकाणी आल्यावर तो इकडे तिकडे पाहू लागला. पण त्याला कुठेच कुत्र्याचे पिल्लू दिसत नव्हते. राजूला पाहताच ते पिल्लू धावत त्याच्याकडे येत होतं. पण आज तसे काही घडत नव्हते. काही तरी विपरीत घडलं असणार अशी शंकेची पाल राजुच्या मनात चुकचुकली. बराच वेळ वाट पाहून देखील ते पिल्लू आले नाही तेव्हा राजूने तेथील एका माणसाला त्या पिल्लू विषयी विचारलं, " अहो काका, येथे एक छोटं कुत्र्याचं पिल्लू होतं, ते कुठं गेलंय, दिसत नाही" यावर त्या माणसाने काल रस्त्यावर घडलेली घटना राजूला सांगितली. ते पिल्लू आता या जगात नाही हे ऐकून तो खूप नाराज झाला. शाळेत गेल्यावर देखील त्याचे कुठेही मन लागत नव्हते. दिवसभर तो त्या पिल्लाच्या विचारात मग्न होता. घरात देखील त्याचे मन लागत नव्हते, यावर त्याची आई म्हणाली, " काय झालं राजू, बरं वाटत नाही का ? एवढा उदास का आहेस ? " यावर राजू काही बोलला नाही डोळ्यातून अश्रू गाळत राहिला. तेव्हा आईने त्याला जवळ घेतले आणि प्रेमाने विचारल्यावर तो म्हणाला, " आई, ते कुत्र्याचे पिल्लू मेलंय गं ! " हे ऐकून आईला देखील खूप दुःख झालंय. राजुची इच्छा आपण पूर्ण केली असती तर ते कुत्र्याचं पिल्लू देखील वाचलं असतं आणि राजू देखील आनंदी राहिला असता असे आईला वाटू लागले. 

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

कथा आवडली तर comment मध्ये लिहा

Friday 30 April 2021

02/05/2021 avkali

कविता - अवकाळी पाऊस
कुणाला न सांगता येतो वेळी अवेळी
अश्यालाच जग म्हणतंय अवकाळी

त्याचे वागणे जरासे असते चित्रविचित्र
साऱ्यांचे बिघडवून टाकतो चांगले चित्र

सुरळीत काम चालू असतांना तो येतो
साऱ्या नियोजनावर पाणी फेरून जातो

मोजता येत नाही एवढं होते नुकसान
क्षणासाठी येतो नि सर्व होती परेशान

मान्सूनसारखे तो देखील हजेरी लावतो
कोणी दुःखी होतो कोणा सुखावून जातो

येणारे संकट काही केल्या टळत नाही
नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड
9423625769

29/04/2021 corona self disipline

कोरोना आणि स्वयंशिस्त
घरात धिंगाणा करणाऱ्या मुलांविषयी आईबाबा एक वाक्य नेहमी म्हणतात, याचे शाळेत जाण्याचे दिवस कधी पूर्ण होतात की ? तसं तर आई बाबांना देखील माहीत असतं की वयाची सहा वर्षे पूर्ण झाली की मूल शाळेतील पहिल्या वर्गात प्रवेशित होतो. तरी देखील मुलांचे आईबाबा तसे का म्हणत असतील ? तर याचे उत्तर अगदी साधे आणि सोपे आहे. मूल शाळेत प्रवेश घेतला की त्याची घरात धिंगाणा करण्याची प्रवृत्ती हळूहळू कमी होते आणि शहाण्या लेकरसारखं तो वागायला लागतो. काय शिकवलं जातं त्या पहिली दुसरी वर्गाच्या शाळेत ? तेथे मुलांना वाचायला शिकवलं जातं, लिहायला शिकवलं जातं, बोलायला शिकवलं जातं आणि महत्वाचं म्हणजे त्याला स्वयंशिस्त शिकविली जाते. होय, प्राथमिक शाळेतून मुलांना स्वयंशिस्त प्रामुख्याने शिकवली जाते. मात्र ती जशी जशी अंगाने व शरीराने मोठी होत जातात तसे तसे स्वयंशिस्त विसरून जातात, ही फार मोठी शोकांतिका आहे. तसं तर पहिल्या वर्गात येणार सहा वर्षाचे मूल घाबरत घाबरत येते. त्याच्या मनात शाळेची आणि शिक्षकांची भीती असते. वरच्या वर्गातील मुलांकडे पाहत पाहत ही मुले शाळेतील वातावरणाशी समरस होत असतात. शिक्षकांची एक रणनीती असते. संपूर्ण वर्गाला किंवा शाळेला शांत करायचे असेल आपल्या नियंत्रणाखाली आणायचे असेल तर कुण्या तरी एकावर खूप राग आणि मोठी शिक्षा करावी लागते. हे बघून बाकीचे सारे चिडीचूप होतात. सर्कसमध्ये रिंगमास्टर जसे काम करतो तसे काम प्राथमिक वर्गांना अध्यापन करणारे शिक्षक करतात. ( आज तसे शिक्षण नसून आनंददायी शिक्षण आहे, हा भाग वेगळा ) आपल्या वर्गातील वा शाळेतील मुलांना वाचायला किंवा लिहायला नाही आले तरी चालेल पण त्यांच्यात स्वयंशिस्त असायलाच पाहिजे अशी धारणा शिक्षकांमध्ये असते. सकाळी घंटी वाजले की विद्यार्थी शाळेत आलेच पाहिजे, शिक्षकांनी शिट्टी वाजवली की सारे विद्यार्थी एका रांगेत उभे राहिले पाहिजे, सावधान-विश्राम झाले की आदेशानुसार राष्ट्रगीत म्हटले पाहिजे विद्यार्थी हे सर्व आपल्या शरीराला लावलेल्या स्वयंशिस्त सवयीमुळे करत असतो. शाळेत अभ्यासासोबत स्वयंशिस्त प्रत्येक शाळेतून शिकवल्या जाते. पुढील भावी जीवनावर या स्वयंशिस्तीचा परिणाम दिसायला लागते. जे विद्यार्थी शाळेत स्वयंशिस्त पाळलेली असतात ते मोठेपणी देखील स्वयंशिस्त पाळून देशाचे, राज्याचे आणि समाजाचे नियम पाळतात. 
गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. पहिल्या लाटेत लोकांनी खूप जबाबदारी पूर्वक राहिले किंवा सुरुवातीला या कोरोनाची मनात खूप भीती होती. म्हणून शासनासह जनतेनी देखील स्वतःला घरात बंदीस्त केले होते. पण कोरोना आजार म्हणजे सर्दी, पडसं आणि खोकला आहे. त्याला काही जास्त मनावर घ्यायचं नाही असा गोड गैरसमज करून घेतल्यामुळे लोकं निष्काळजीपणाने वागण्यास सुरुवात केली. म्हणूनच दुसऱ्या लाटेत देशभरात लाखो लोक कोरोना पॉजिटिव्ह निघत आहेत. हजारो लोकं मृत्युमुखी पडत आहेत. मरण पावलेल्या लोकांना सरण लावण्यासाठी देखील रांगेत जावे लागत आहे. किती कठीण काळ आला आहे, याची जाणीव आपणा सर्वांना आहे. मात्र तरीदेखील अजूनही जनता सरकारच्या नियमाचे पालन करताना दिसून येत नाही. शाळेत शिकविण्यात आलेली स्वयंशिस्त आता प्रत्येकांनी उपयोगात आणली पाहिजे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखायाचा असेल तर त्याची साखळी तोडावी लागते. ती साखळी तोडण्यासाठी स्वतःला घरात कैद करावे लागेल. शासनाला नाईलाजास्तव संचारबंदी आणि लॉकडाऊन करावे लागत आहे कारण आपण नागरिकांनी स्वयंशिस्तीने वागणे विसरून गेलो आहोत. घराबाहेर पडतांना तोंडावर मास्क वापरावे, पोलिसांना घाबरून असे करू नका तर ती एक स्वयंशिस्त आहे. आपल्या शरीराला तशी सवय लागलीच पाहिजे. घराच्या बाहेर पडताना तोंडावर मास्क वापरणे. काही कामासाठी जर आपण बाहेर गेलोच तर सुरक्षित अंतर ठेवणे आपल्यासाठी आवश्यक आहे. बाहेरून आल्यानंतर आपले हात-पाय स्वच्छ धुणे आणि सोबत मास्क देखील धुतले पाहिजे. बरेचजण हात-पाय धुतात आणि मास्क तसेच घरात नेतात त्यामुळे हा विषाणू घरात पसरत आहे. घरात वावरताना देखील थोडे जागरूक होणे आवश्यक आहे. एकाच कुटुंबातले जरी असाल तरी एकमेकांचे उष्टे अन्न खाऊ नका. पाणी पिण्यासाठी दररोज एकच ग्लास वापरावे. शक्यतो आपले जेवलेले ताट आपण स्वतः धुवून बाजूला ठेवलं तर अजून चांगलं. या काळात टीव्हीवरील बातम्या पाहून काळजाची धडधड वाढविण्यापेक्षा कानाला सुमधुर वाटणारे गाणे ऐका, चांगले चित्रपट पहा, पुस्तके वाचा, मनपसंद खेळ खेळावे यामुळे आपल्या मनाला विरंगुळा मिळेल. कोरोना रोग हा साधा आजार आहे मात्र ते अंगावर काढणे वाईट आहे तसेच कोरोना आजाराची धसकी घेतल्यामुळे अनेकजण आपल्या जीवाला मुकत आहेत. म्हणून मित्रांनो या कोरोना विषम काळात आपल्या शरीराला स्वयंशिस्त लावून घ्यावे म्हणजे देशात वाढणारी ही समस्या काही प्रमाणात कमी करता येईल. घरी राहा सुरक्षित राहा, आवश्यक काम असेल तर बाहेर जावे, नियमित हात स्वच्छ धुवावे, बोलताना सुरक्षित अंतर ठेवावे, तोंडावर मास्क वापरावे अश्या साध्या साध्या गोष्टीच्या सवयीचे स्वयंशिस्त लावून तसे वागले पाहिजे तरच या कोरोनाला आपण हरवू शकतो. आपली एक जरी चूक झाली तर आपल्यासोबत आपल्या कुटुंबाला, नातलगांना, समाजाला, गावाला, राज्याला आणि पर्यायाने देशाला धोका निर्माण होऊ शकते.

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद जि. नांदेड
9423625769

30/04/2021 dole

डोळ्यांची भाषा 
ती बोलत तर काहीच नव्हती
फक्त तिचे डोळे बोलत होते
मनातले सारे भाव सांगत होती
मला सारे ते कळून देखील
काहीच करता येत नव्हते
कारण ती आज माझी नव्हती
तर दुसऱ्याची प्राण झाली होती
माझ्याविषयी कळवळा आहे
चुपचाप ती डोळ्यातून सांगते
माझ्या मनात देखील आहे आस्था
माझ्या डोळ्यातून तिला कळते
आमच्या दोघांची संवादाची भाषा
फक्त डोळ्याने डोळ्यालाच समजते

- नासा येवतीकर,धर्माबाद जि.नांदेड
 9423625769

Thursday 29 April 2021

01/05/2021 majha maharshtra

महाराष्ट्र भूमीची कहाणी
देशात आहेत अनेक राष्ट्र
त्यात माझा हा एक महाराष्ट्र
एक मे एकोणिशे साठाला
निर्माण झाला राज्य महाराष्ट्र
महाराष्ट्राची खास आहे लावणी
महाराष्ट्र भूमीची अनोखी कहाणी

त्याची राजधानी मुंबई शहर
आर्थिक घडामोडीचे मुख्य नगर
उपराजधानी आहे नागपूर
पुणे आमचे सांस्कृतिक शहर
येथील लोकांची आहे साधी राहणी
महाराष्ट्र भूमीची अनोखी कहाणी

विठ्ठलाचे मंदीर पंढरपूरात
ग्रंथसाहिब नांदेडच्या गुरुद्वारात
अंबामाता वसली कोल्हापुरात
तुळजाईचे दर्शन तुळजापूरात
सप्तश्रृंगी देवीचं गाव आहे वणी
महाराष्ट्र भूमीची अनोखी कहाणी

बापुजीची कुटी आहे वर्ध्यात
आमची उटी सातारा जिल्ह्यात
जंगल पसरला आहे गडचिरोलीत
वाघांचा व्याघ्रप्रकल्प ताडोब्यात
खानदेशाची भाषा आहे अहिराणी
महाराष्ट्र भूमीची अनोखी कहाणी

वंदन करू शिर्डीच्या साईबाबांला
सबका मालिक एक सांगती सर्वाला
सागरी किनारा लाभला कोकणला
गोदावरी उगम पावते नाशिकला
औरंगाबादला प्रसिद्ध वेरूळची लेणी
महाराष्ट्र भूमीची अनोखी कहाणी

संत महात्मे लाभले या राज्याला
पुण्य गौरव मिळाले या धरतीला
राज्याने कीर्ती दिली खेळाला
देशात नवी ओळख महाराष्ट्राला
माय मराठी आहे आमची वाणी
महाराष्ट्र भूमीची अनोखी कहाणी

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625768

सर्वगुणसंपन्न माझा महाराष्ट्र

आजपासून एक्याऐंशी वर्षांपूर्वी म्हणजे एक मे एकोणिशे साठ रोजी भाषावार प्रांत रचनेनुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. बहुसंख्य मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आले. संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर दीक्षाभूमीसाठी प्रसिद्ध असलेले नागपूर ही उपराजधानी झाली. तसे मुंबई आणि नागपूर हे दोन्ही शहर महाराष्ट्रातील प्रमुख शहरात गणले जातात. मुंबई ही राज्याचीच नव्हे तर देशातील देखील महत्वाचे शहर आहे. गेटवे ऑफ इंडिया, बॉलीवूडची चंदेरी दुनिया, वानखेडे स्टेडियम, सीएसटी, यासारख्या अनेक स्थळामुळे मुंबई सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते. संत्र्याच्या उत्पादनासाठी नागपूर शहर प्रसिद्ध आहेच त्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे दीक्षाभूमीवर लाखों अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती, म्हणून देखील हे शहर प्रसिद्ध झाले आहे. त्याखालोखाल ज्या शहराचे नाव घेतले जाते ते म्हणजे पुणे होय. पुणे तिथे काय उणे असे या शहराच्या बाबतीत बोलल्या जाते. पुणे हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहर आहे. अनेक सारस्वत मंडळी पुण्यातून निर्माण झाले. आज ही पुणे शहर आपल्या संस्कृतीला नावाप्रमाणे टिकवून ठेवले आहे. राज्यातील महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणं उन्हाळ्यात पर्यटकांनी भरून जातात. शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंह यांची समाधी गुरुद्वारा म्हणून प्रसिद्ध आहे जे की नांदेड येथे आहे. शीख धर्मातील लोकांसाठी हे स्थळ काशी म्हणून प्रसिद्ध आहे. पंजाबमधून लाखो भाविक दरवर्षी नांदेड येथे ये-जा करतात.
राज्यात एकूण छत्तीस जिल्हे असून कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर असे राज्यात प्रशासकीय कामासाठी एकूण सहा विभाग करण्यात आले आहेत, ज्यामुळे अनेक कामांची विभागणी होऊन काम सुरळीत पार पडण्यास मदत मिळते. 
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळ्खले जाते. येथील भूमीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, समर्थ रामदास स्वामी यासारखे अनेक संत होऊन गेले. त्याचसोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या सारख्या समाजसुधारक संतांनी देखील येथील भूमी पवित्र झाली आहे. लोकांच्या कल्याणासाठी झटणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या थोर महापुरुषांनी आपल्या कार्याने आणि विचाराने महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. महाराष्ट्रातील जनता या महापुरुषांच्या कार्याला आणि विचाराला कदापिच विसरू शकणार नाही. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देखील महाराष्ट्राच्या अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपले संपूर्ण जीवन अर्पण केले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोपाळ गणेश आगरकर, आदी क्रांतिकारकाविषयी आमच्या मनात नेहमीच कृतज्ञतेची भावना तेवत असते. साहित्याच्या क्षेत्रात देखील कवयित्री बहिणाबाई चौधरी, अण्णाभाऊ साठे, वि. स. खांडेकर, गदिमा, ना. सी. फडके, कुसुमाग्रज, प्र. के. अत्रे, भा. रा. तांबे, सुरेश भट, बालकवी, केशवसुत इत्यादी साहित्यिकांनी उत्तम साहित्य निर्माण करून ठेवले आहे, ज्याच्या बळावर आज नवीन साहित्यिक नवे साहित्य निर्माण करत आहेत. खेळाच्या बाबतीत देखील महाराष्ट्रातील खेळाडूचे अनन्यसाधारण महत्व आहे. सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, खाशाबा जाधव यासारख्या खेळाडूंनी महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नाव जगाच्या नकाशावर कोरून ठेवले आहे. तर चित्रपट क्षेत्रातील भालजी पेंढारकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, दादा कोंडके, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे माधुरी दीक्षित, उषा नाडकर्णी, लता मंगेशकर, आशा भोसले, पंडीत भीमसेन जोशी यासारखे अनेक कलाकारांनी आपल्या कला कौशल्याने महाराष्ट्राचे नाव सर्वदूर पोहोचविले आहे. सह्याद्री पर्वत रांगेतील कळसूबाईचे शिखर अनेक गिर्यारोहकाना नेहमी खुणावत असते. कर्नाळा पक्षी अभयारण्य, ताडोबाचे व्याघ्रप्रकल्प, स्व. बाबा आमटे यांचे आनंदवन, यासारखे अनेक स्थळ महाराष्ट्रात पर्यटकांना आकर्षित करत असतात. राज्याला सातशे वीस किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे ज्यामुळे राज्याला अनेक बाबतीत समृद्धता मिळाले आहे. कोयना, जायकवाडी, भंडारदरा यासारख्या धरणामुळे राज्य सुजलाम सुफलाम होण्यास मदत मिळाली आहे.  उद्योगधंद्यात देखील महाराष्ट्र मागे नाही. मुंबई, पुणे, सोलापूर, इचलकरंजी, औरंगाबाद या शहरातील उद्योगाने अनेक कामगारांच्या हाताला काम देऊन उद्योगाच्या क्षेत्रात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. पर्यटकांना आकर्षित करणारे महाराष्ट्र हे एक प्रमुख राज्य आहे. औरंगाबाद येथील अजिंठा व वेरूळच्या लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून लोकं येत असतात. त्याचसोबत राज्यात असलेले अनेक किल्ले आणि गड हे देखील पर्यटकांना आपल्याकडे नेहमीच भुरळ घालत असतात. तिरुपती बालाजी नंतर दुसरे देवस्थान म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा यांचे मंदीर होय. सबका मलिक एक असा संदेश देणारे साईबाबा हे सर्व धर्मियांचे दैवत आहे. येथे अनेक लोकं दरवर्षी दर्शनासाठी गर्दी करतात. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तश्रृंगी देवी हे साडे तीन पीठ स्थळ अनेक महिलांसाठी प्रेरणेचे स्थान आहेत. वारकरी संप्रदायाचे विठ्ठल भक्त दरवर्षी आषाढी आणि कार्तिकेला पंढरपूर येथे पायी वारी करण्यासाठी येतात. शेगावचे गजानन महाराजाचे मंदीर स्वच्छतेच्या बाबतीत सर्वाना एक मार्गदर्शक ठरेल असे ठिकाण आहे. तेथे गेल्यानंतर जे आत्मिक व मानसिक समाधान मिळते ते कदाचित कुठे ही मिळत नसेल. कोकणची किनारपट्टी, तेथील हापूस आंबा, नारळ आणि इतर वृक्ष पाहिल्यावर डोळ्याचे पारणे फिटतात. त्याचसोबत महाराष्ट्रातील अजून घटना घडली, देशातील सर्वप्रथम रेल्वे ठाणे - मुंबई दरम्यान धावली होती, ज्यामुळे इतिहासात याची ठळक नोंद घेतली आहे. कारण आज देशातील रेल्वेचे जाळे पाहिलं तर त्यात महाराष्ट्राचे स्थान अग्रस्थानी दिसून येते. महाराष्ट्रात दर कोसावर भाषा बदलत जाते. मुंबईची भाषा वेगळी तर पुण्याची भाषा वेगळी. मराठवाड्याची भाषा अनेकांना अवघडल्यासारखे वाटते तर विदर्भाची भाषा प्रेमळ वाटते. खानदेशाची अहिराणी भाषा आणि पश्चिम महाराष्ट्रातील रुबाबदार भाषा आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. तसे महाराष्ट्रात गोदावरी, कोयना, कावेरी, चंद्रभागा, भीमा अश्या अनेक नद्यांनी समृद्ध केले आहे तर अमरावती, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातल्या जंगलाने विविध प्राणी, पशु-पक्षी यांना खरा आधार दिले आहे. विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे लोकं या महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत. शिक्षणाच्या बाबतीत देखील महाराष्ट्र मागे नाही. मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद इत्यादी शहरात शाळा, विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठ, कृषी विद्यापीठ विद्यार्जनासाठी निर्माण करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे असतील किंवा पोपटराव पवार यासारखे व्यक्तींच्या आदर्शावर आज महाराष्ट्रातील ग्रामीण जनता पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतर मुख्यमंत्री बनलेल्या वसंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, शरद पवार, सुधाकरराव नाईक, मनोहर जोशी इत्यादी लक्षात राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यास अनेक योजना आखल्या आणि त्या कार्यान्वित देखील केले. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मा. उद्धव ठाकरे साहेब जे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत, ते काम पाहत आहेत. त्यांच्या हाती सत्ता आल्यापासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगासह महाराष्ट्र देखील पादांक्रांत केले आहे. मा. उद्धव ठाकरे साहेबांची खरी कसोटी या क्षणी पाहायला मिळत आहे. या कोव्हीड-19 काळातील एक कणखर मुख्यमंत्री म्हणून इतिहास त्यांची नोंद घेईल इतके सुंदर कार्य चालू आहे. महाराष्ट्र दर्शन करायला निघालं तर आयुष्य देखील कमी पडू शकते, एवढं समृद्धता राज्यात आढळून येते. मी महाराष्ट्रयीन असल्याचा मला नेहमीच अभिमान आहे. असा माझा हा महाराष्ट्र सर्वगुणसंपन्न असून देशात आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण करून ठेवले आहे. आज महाराष्ट्र दिन त्यानिमित्ताने आपणा सर्वांना हार्दीक शुभेच्छा ....!

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड 9423625769


महाराष्ट्र माझा


देशात उंचावलेली आहे मान

देशाचे हृदय महाराष्ट्र माझा

संपूर्ण देशात गाजावाजा

जय जय महाराष्ट्र माझा


आपली भाषा आपले लोक

आपला प्रांत आपले राष्ट्र

चालावा आपला व्यवहार

असा हा आपला महाराष्ट्र


येथील लोकं बोलती मराठी

येथे व्यवहार होतो मराठी

पुस्तकाची भाषा ही मराठी

महाराष्ट्राची राजभाषा मराठी


मुंबई आहे राज्याची राजधानी

येथे घडते आर्थिक कहाणी

नागपूर राज्याची उपराजधानी

संत्री खाऊन गाती गोड गाणी


राज्यात एकूण छत्तीस जिल्हे

आहेत अनेक गड आणि किल्ले

राष्ट्रावर झाले आहेत अनेक हल्ले

घाबरणार कसे महाराष्ट्राची पिल्ले


सोनियाचा मे महिन्याचा एक

राज्यात नांदती लोकं अनेक

गुण-गौरव गातसे माय लेक

माझा महाराष्ट्र सर्वात नेक


- नासा येवतीकर, विषय शिक्षक, 

कन्या शाळा धर्माबाद, 9423625769


।। माझा महाराष्ट्र ।।

महात्मा फुले शाहू आंबेडकर
लाभले टिळक नि आगरकर
देशासाठी केली अपार सेवा
राज्याचे नाव पोहोचले जगभर

या थोर समाजसुधारकासह
होती महाराष्ट्र संतांची भूमी
भारताच्या स्वातंत्र्यासाठी आले
राज्यातील अनेक वीर कामी

छत्रपती शिवाजी राजे यांनी
निर्मिले मराठ्यांचे स्वराज्य
त्यांची प्रेरणा घेऊनच झालं
मराठी भाषिक लोकांचे राज्य

देशाच्या प्रगतीमध्ये हातभार
मुंबई शहर असतो अग्रेसर
देशाच्या विकासात महाराष्ट्र पुढे
प्रत्येक शहराची दिशा विकासाकडे

एक्याऐंशी वर्षांपूर्वी झाली होती
महाराष्ट्र राज्याची निर्मिती
मुंबई बनली राज्याची राजधानी
तर नागपूर ठरले उपराजधानी

महाराष्ट्राला आहे एक इतिहास
प्रत्येक जिल्ह्याचे स्थान वेगळं
प्रत्येक जिल्हा वैशिष्टयपूर्ण
पर्वत डोंगर जंगल हे सगळं

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद, 9423625769




Monday 26 April 2021

26/04/2021 photos

माझ्या 45 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्राफिक्सच्या माध्यमातून मिळालेल्या शुभेच्छा

akbar birbal marathi katha

बादशाह अकबर आणि बिरबलची कहाणी

मेणाचा वाघ

हिवाळ्याचा महिना चालू होता. अकबराचा दरबार पूर्ण भरला होता. त्या दरबारामध्ये शेजारच्याच राजाने पाठवलेला एक सेवकही उपस्थित होता.
त्या राजाने स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी त्या सेवकाजवळ एक मेना पासून बनवलेला वाघ एका पिंजरा मध्ये बंद करून पाठवला होता आणि असे सांगण्यात आले होते की पिंजरा न खोलता या वाघाला बाहेर काढून दाखवा.
दरबारामध्ये बीरबल नसल्यामुळे अकबर विचारात गुंतला होता की या समस्यांमधून मार्ग कसा काढावा. जर आपण या वाघाला बाहेर काढले नाही तर सर्व लोक आपल्यावर हसतील. एवढ्यात बुद्धिमान चतुर आणि हुशार बिरबल दरबारामध्ये येऊन सर्व सूत्रे आपल्या हाती घेतो.
तेव्हा बिरबलाने एक गरम सळई मागवली आणि ती पिंजऱ्यामध्ये घालून तो मेना पासून बनवलेला वाघ वितळविला. बघता बघता मेन वितळून बाहेर येऊ लागले. अकबर-बिरबलाच्या कल्पनेवर खूप प्रसन्न झाला आणि पुन्हा त्या राजाने अकबराला आव्हान दिले नाही.

तात्पर्य बुद्धीच्या जोरावर कितीही मोठ्या समस्येवर मात केली जाऊ शकते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विहिरीतल्या पाण्याची मालकी कोणाची

एकदा एका माणसाने आपली विहीर गावातील एका शेतकऱ्याला विकली. दुसऱ्या दिवशी तो शेतकरी विहिरीतील पाणी काढण्यासाठी विहिरीजवळ आला तेव्हा त्या माणसाने शेतकऱ्याला विहिरीतील पाणी काढण्यासाठी मनाई केली आणि म्हणाला मी तुला हि विहीर विकली आहे त्यातील पाणी नाही, हे ऐकून तो शेतकरी दुःखी झाला आणि मदत मागण्यासाठी अकबराकडे गेला
बादशहा अकबराने थोडा विचार करून बिरबलाला दरबारात बोलावले आणि या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सांगितले. सर्व हकीकत ऐकल्यानंतर बिरबलाने त्या माणसाला बोलावले ज्याने शेतकऱ्याला विहीर विकली होती. नंतर त्या माणसाला विचारण्यात आले की तू शेतकऱ्याला या विहीरीतून पाणी का काढून देत नाहीस तू तर ही विहीर शेतकऱ्याला विकली आहेस ना? तेव्हा तो म्हणाला मी शेतकऱ्याला फक्त विहीर विकली आहे त्यातील पाणी नाही.
तेव्हा बिरबल हसत म्हणाला की तू फक्त विहीरच शेतकऱ्याला विकली आहेस आणि पाणी नाही तेव्हा तुला या विहिरींमध्ये पाणी ठेवण्याचा काहीही अधिकार नाही तेव्हा तू लगेच या विहिरीतील पाणी काढून ने नाहीतर त्याचे व्याज शेतकऱ्याला दे. एवढे ऐकून तो माणूस समजला की आपले या महाचतुर माणसासमोर काहीही चालणार नाही तेव्हा त्याने आपली चूक कबूल केली आणि त्या शेतकऱ्याला व्याजही दिले. बिरबलाच्या या न्यायावर अकबर ही खुश झाला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
डोळे असूनही आंधळे माणसे

राजाचा दरबार भरलेला असताना राजाने आपल्या सर्व मंत्र्यांना विचारले की आपल्या राज्यांमध्ये डोळे असलेल्या आंधळ्या लोकांची संख्या किती आहे. त्यावर सर्व मंत्री एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले आणि कोणालाही याचे उत्तर सांगता येत नव्हते. त्याच दरबारामध्ये बिरबल ही उपस्थित होता. बिरबलाला ही हा प्रश्न विचारण्यात येतो.
तेव्हा बिरबल म्हणतो राजे मला याचे उत्तर देता येणार नाही परंतु आपल्या राज्यात डोळे असलेल्या आंधळ्याची संख्या भरपूर आहे. राजाने विचारले, असे तु ठामपणे कसे सांगू शकतो? त्यावर बिरबल म्हणतो, राजा मला दोन दिवसाची मुदत द्या मी तुम्हाला या दोन दिवसांमध्ये अशा लोकांची नावे आणून देतो.
दुसऱ्या दिवशी बिरबलाने आपला बिछाना अंगणात आणला आणि त्याचे राहिलेले अर्धे काम पूर्ण करू लागला. बिरबलाने रस्त्यावरून चाललेल्या एका माणसाला बोलावले आणि कागद-लेखणी घेऊन बसण्यास सांगितले.
रस्त्यावरून जाणारी सर्व लोक बिरबलाला येऊन विचारत होती की, हे काय चालले आहे?. बिरबलाने त्या सर्व लोकांची नावे लिहून घेण्यास सांगितले. बघता बघता ही माहिती संपूर्ण गावामध्ये पसरली. त्यामुळे गावातील सर्व लोक येऊन पाहू लागले की बिरबल हे काय करत आहे. 
या गोष्टीची राजाला ही उत्सुकता होती त्यामुळे राजाही येऊन बिरबलाला विचारू लागला की बीरबल हे काय चालू आहे. तेव्हा बिरबलाने राजाचे नाव त्या कागदावर सर्वात वर लिहिण्यास सांगितले. दोन दिवसानंतर बिरबल तो कागद घेऊन दरबारात पोहोचला.
तेव्हा राजाने विचारले या कागदावर माझे नाव सर्वप्रथम का आहे? बिरबल म्हणाला मी माझ्या बिछान्याचे काम करत होतो हे पाहत असूनही लोक मला विचारत होते आणि तुम्हालाही उत्सुकता असल्यामुळे तुम्हीही माझ्या घरी आलात, तुम्ही राजा असल्यामुळे तुमचे नाव सर्वप्रथम असावे अशी माझी इच्छा होती. 
राजा हसून म्हणाला की तू खूप हुशार आणि बुद्धिमान आहे शेवटी तू अशा लोकांची नावे शोधून काढली ज्यांना डोळे असूनही ती आंधळी आहेत.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कावळ्यांची संख्या

एके दिवशी अकबर बादशहा सर्वांच्या आधी दरबारामध्ये पोचले. आणि मागून येणाऱ्या सर्व मंत्र्यांना विचारू लागले की आग्रा मध्ये कावळ्यांची संख्या किती आहे?. हे ऐकून सर्व मंत्री शांत झाले. कोणालाही याचे उत्तर देता येत नव्हते. चुकीचे किंवा बरोबर कोणीही उत्तर देत नव्हते. तेव्हा बिरबल दरबारामध्ये हजर होतो.
त्यालाही हाच प्रश्न विचारण्यात येतो. बिरबलाने पटकन उत्तर दिले ही मागच्याच वर्षे कावळ्यांची जनगणना करण्यात आली होते. आग्रा मध्ये एकूण पंधराशे कावळे आहेत. 
अकबर बादशहा कावळ्यांचे स्पष्ट संख्या ऐकून चकित झाला आणि म्हणाला तू कावळ्यांची संख्या केव्हा मोजली? मला त्याचा संदर्भ दे. तुझ्यापाशी दोन दिवसाचा वेळ आहे या दोन दिवसांमध्ये तू पूर्ण विचार करून मला त्यांची संख्या सांग नाहीतर तुला दहा हजार सुवर्णमुद्रांचा दंड भरावा लागेल.
हे ऐकून बिरबल म्हणाला मी मोजलेल्या संख्या बरोबरच आहे त्यामध्ये तेव्हाच तफावत असेल जेव्हा आग्रा मधून काही कावळे बाहेर गेले असतील किंवा काही बाहेरचे पाहुणे कावळे आग्रा मध्ये आले असतील.
बिरबलाचे हे बोलणे ऐकून राजा खूष झाला आणि त्याला दहा हजार रुपये सुवर्णमुद्रा बक्षीस म्हणून दिल्या.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पृथ्वीचा मध्य

अकबर बादशहाचा एक मंत्री अकबर बादशहाचे बिरबल विरुद्ध कान भरत होता. तो म्हणाला बादशाह तुम्ही बिरबलाला उगाचच ठेवले आहे त्याचे काही कामच नाही. त्यावर बादशहा म्हणाला बिरबल ! बिरबल तर फार हुशार व्यक्ती आहे. तो प्रत्येक प्रश्नाची उत्तरे इतकी सहजपणे आणि उत्कृष्ट पद्धतीने देतो.
त्यावर तो मंत्री म्हणाला महाराज जर बिरबलाने मी केलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित दिली तर आपण त्याला मानू.
प्रश्न १ पृथ्वीचा मध्य कोठे आहे? प्रश्न २ आकाशात तारे किती आहेत? प्रश्न ३ पृथ्वीवर स्त्री-पुरुषांची संख्या किती आहे?
लगेच बादशहाने बिरबलाला आमंत्रण पाठविले. बिरबल लगेच दरबारामध्ये उपस्थित झाला. झालेली हकीकत बिरबलाला व्यवस्थित रित्या सांगण्यात आली.
बिरबल विचार करू लागला नंतर त्याने एक लाकडाची काठी आणली आणि ती दरबारामध्ये रोवली आणि म्हणाला हा आहे पृथ्वीचा मध्य विश्वास बसत नसेल तर मोजून पहा.
आकाशामध्ये तारे किती आहेत याचे उत्तर देताना बिरबलाने एक बकरी आणली आणि ती दरबारामध्ये ठेवली आणि म्हणाला महाराज या बकरीच्या अंगावर जेवढे केस आहेत तेवढेच आकाशामध्ये तारे आहेत विश्वास बसत नसेल तर मोजून पहावे.
तिसऱ्या प्रश्नाची म्हणजे स्त्री व पुरुषांची संख्या किती आहे याचे उत्तर देताना बिरबल म्हणाला स्त्री-पुरुषांची संख्या तेव्हाच समान होईल जेव्हा ह्या मंत्र्याला आपण ठार मारू कारण हा ना तर स्त्री आहे ना तर पुरुष.
हे ऐकताच तो मंत्री दरबार सोडून पळून गेला व अकबराने बिरबलाच्या सत्कार केला आणि प्रशंसा करत राहिला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बैलाचे दूध

दरबार भरला होता आणि दरबाराचे काम चालू होते. दरबार संपल्यानंतर अकबराने बिरबलाला सांगितले बिरबल मला बैलाचे दूध पाहिजे आहे. तू मला ते आणून दे. एका वैद्यांनी मला एक औषध सांगितले आहे त्यासाठी बैलाचे दूध लागणार आहे तू काहीही करून मला बैलाचे दूध आणून दे. यावर थोडा विचार करून म्हणाला महाराज मला दोन चार दिवस द्या मी त्यामध्ये तुम्हाला बैलाचे दूध आणून देण्याचा प्रयत्न करीन.
यावर अकबर म्हणाला सात-आठ दिवस घे पण मला बैलाचे दूध आणून दे. हे झाल्यानंतर बिरबल त्याच्या घरी गेला. काही वेळाने तो त्याच्या मुलीला म्हणाला मी सांगेन तसे करायचे. महाराज अकबर यांच्या महालाच्या बाजुलाच एक नदी आहे त्या नदीवर मध्यरात्री जाऊन जोरात कपडे धुवायचे त्याचा आवाज अकबर यांच्यापर्यंत गेला पाहिजे.
वडिलांचे बोलणे ऐकून दुसर्या दिवशी मध्यरात्री बिरबलाच्या मुलीने तसेच केले. ती मध्यरात्री त्या नदीवर गेली आणि तिथे जोरात कपडे आपटून लागली. या होणाऱ्या जोरदार आवाजामुळे अकबराची झोप मोड झाली आणि तो क्रोधित झाला. त्याने शिपायांना आदेश दिला जो कोणी मध्यरात्री जोरात आपटून कपडे धूत आहे त्याला तात्काळ माझ्याकडे घेऊन या.
शिपायांनी त्यांच्या महाराजांचा आदेश पाळला आणि त्या मुलीला घेऊन ते महालात आले. महालात आल्यानंतर अकबराने विचारपूस केली एवढी गरजच काय एवढ्या रात्री कपडे धुवायची?
त्यावर त्या मुलीने घाबरत घाबरत उत्तर दिले काल मला खूप काम होते कारण माझ्या वडिलांना मूळ झाले. त्यामुळे माझा सर्व दिवस याच कारणामुळे व्यक्त केला. म्हणून माझी इतर कामे झाली नाहीत त्यामुळे मी एवढ्या रात्री माझी कामे करण्याचा निर्णय घेतला म्हणून मी मध्यरात्री कपडे घेऊन नदीवर धुण्यासाठी आले.
यावर अकबर बोलला काय बोलतेस!!! पुरुषाला मूल कसे होईल?
त्यावर त्या मुलीने उत्तर दिले 'हो महाराज तुमचे बरोबर आहे जसे बैल दूध देऊ शकतो तसेच पुरुष देखील मुले देऊ शकतोस ना?'
यावर लगेच अकबराला कळाले की व्यक्ती बहुदा बिरबलाने पाठवली असावी. नंतर त्या मुलीने अकबराला संपूर्ण गोष्ट सांगितली आणि अकबराने आपली चूक मान्य केली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हा नोकर चोर आहे

एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलाकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली आहे. माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी दहा नोकर आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले पण त्यातील एकजणही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.
बिरबल त्या व्यापार्‍याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठ्या आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे. या काठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व काठ्या समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उद्या मला परत करा. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल.
दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो. त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसर्‍या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या.
त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले. त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, 'हा नोकर चोर आहे. त्यानेच तुमचे दागिने चोरले.' शेवटी त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापार्‍याचे दागिने परत केले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मोठा माणूस होशील

 गावात असलेल्या नातेवाइकांकडे आठ-दहा वर्षांचा महेशप्रसाद आपल्या ‍वडिलांसोबत जायला निघाला, म्हणून आई त्याला म्हणाली, बाळा जेवण करून जा. तेव्हा तो आईला म्हणाला, ''आई, मला बिलकुल भूक नाही आहे, तर जेवणात वेळ फुकट कशाला घालवू?'' नंतर महेश व त्याचे वडील परगावच्या रस्त्याला लागले. काही अंतर चालून गेल्यानंतर भुकेने महेशच्या पोटात कावळे ओरडायला लागले. इतक्यात रस्त्याच्या एक कडेला ब्रह्मदेवाचे मंदिर दिसले, म्हणून महेशचे वडील त्याला घेऊन मंदिरात गेले.
मंदिराच्या गाभार्‍यातील ब्रह्मदेवाच्या चतुर्मखी म्हणजे चार मुखे असलेल्या मूर्तीला वडील भक्तिभावाने नमस्कार करू लागले, तेव्हा भुकेने कासावीस झालेला महेश रडू लागला. हे बघून वडिलांनी त्याला विचारले, ''महेश, का रे बाळा असा का बर रडतोस आहे ?''
आई आपल्याला जेवण करून जा, असे सांगत असूनही आपण तिचे ऐकले नाही. आणि आता जर वडिलांना सांगितले, तर ते आपल्यास रागवतील, अशी भीती वाटून हजर जबाबी महेश वडिलांना म्हणाला, ''बाबा, मला एकच नाक आहे व सर्दी झाल्यानंतर ते वाहू लागले की, पुसून-पुसून नाकी नऊ येतात, तर मग या चार मुखे असलेल्या ब्रह्मदेवाला सर्दी झाली आणि याची चारही नाके एकाच वेळी वाहू लागली, तर याचे कसे हाल होत असतील ? त्याच्या त्या वेळी होणार्‍या फक्त कल्पनेनेच मला रडायला येत आहे.''
आपला मुलगा का रडत आहे, हे माहीत असल्यामुळे त्याने सांगितलेली सबब ऐकताच वडील आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, ''बाळा, तू पुढे फार मोठा माणूस होशील.''
तसेच एकदा महेश सोळा वर्षांचा असताना एकटाच रानातील रस्त्याने परगावी चालला होता. इतक्यात एका झाडीतून एक वाघ बाहेर आला आणि त्याच्या अंगावर धावला. तेव्हा त्याच्याशी महेशने कडवी झुंज देऊन त्याला पळून जाण्‍यास भाग पाडले. तेव्हापासून अंगात वीराचे असलेल्या महेशला लोक मोठ्या प्रेमाने 'वीरबल' असे म्हणू लागले, आणि पुढे वीरबल म्हणता-म्हणता त्याचे नाव बिरबल झाले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बिरबलची खिचडी


दिल्लीची जबरदस्त थंडी चराचराला गोठवुन टाकत होती. अशा त्या भयंकर थंडीच्या मोसमात अकबरानं बिरबलाला विचारलं, 'बिरबल, या थंडीच्या दिवसात एखादा एखादा माणूस शंभर मोहोरांसाठी त्या समोरच्या तलावात स्वत:ला गळ्यापर्यंत बुडवून घेऊन, रात्र काढील काय रे?'
'कुणी सांगाव ? परिस्थितीनं गांजलेला पण प्रकृत्तीनं ठणठणीत असलेला एखादा माणूस हे दिव्य करायला तयार होईलसुध्दा.' बिरबल बोलून गेला. दुसऱ्याच दिवशी बिरबलाला असा मनुष्य आढळला. तो त्याला बादशहाकडे घेऊन गेला. बादशहा त्याला म्हणाला, 'कुठल्याही तऱ्हेची ऊब न घेता, उघड्या अंगान सबंध रात्र त्या तलावात, गळ्यापर्यंत बुडलेल्या स्थितीत काढायची, ही अट तुला मान्य आहे ना ?' त्या गरजू माणसान ती अट मान्य केली आणि बादशहाने ठेवलेल्या शिपायांच्या जागत्या पहाऱ्यात, त्या तलावातील बर्फ़ागार पाण्यात त्याने ती सबंध रात्र घालवली.
मग शंभर सुवर्ण मोहोरांचे इनाम घेण्याच्या आशेने तो माणूस राजवाड्यावर गेला असता, बादशहानं त्याला विचारलं 'काय रे ? थंडी एवढी जबरदस्त पडली असताना, तू तलावाच्या गार गार पाण्यात सबंध रात्र कशी काय काढलीस ?'
तो मनुष्य म्हणाला, 'आपल्या वाड्याच्या सर्वात वरच्या मजल्यावरचा दिवा मला दिसत होता. त्याच्यावर दृष्टी खिळवून, मी गेली रात्र कशीतरी घालवली' त्याच हे विधान ऎकून बादशहाचा हुजऱ्या म्हणाला, ' खाविंद, आपला वाडा त्या तलावापासून अर्धा मैल असला, तरी त्याच्या वरच्या मजल्यावर जळत असलेल्या दिव्याकडे हा टक लावून बघत राहिल्याने, त्याची ऊब याला थोड्याफ़ार प्रमाणात का होईना-मिळाली. म्हणजे याने 'कुठल्याही तऱ्हेची ऊब न घेता तलावाच्या पाण्यात रात्र काढण्याची अट मोडलेली आहे. तेव्हा याला कसल्या शंभर सुवर्ण मोहोरा द्यायच्या ?' हुजऱ्याच्या या म्हणण्याला बादशहांनी दुजोरा दिला आणि तो गरीब मनुष्य हिरमुसल्या मनानं परत गेला.
मात्र त्याच दिवशी त्याने बिरबलाची भेट घेतली आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाची त्याला माहिती दिली. बिरबलाने त्याला थोडा धीर धरायला सांगून, घरी जायला सांगितले. दुसऱ्या दिवशी बराच उशीर झाला, तरी बिरबल दरबारात आला नसल्याचे पाहून, बादशहानं दरबारी मंडळीकडे त्याची चौकशी केली; तेव्हा एकजण हसत हसत म्हणाला, 'खाविंद, आपल्या लाडक्या बिरबलाचं डोकं फ़िरलयं ! यमुनेकाठी २० हात उंचीचे तीन खांब अगदी एकमेकांजवळ पूरुन त्यावर त्याने खिचडीसाठी धान्याची एक हंडी ठेवलीय, आणि खाली जमीनीवर त्याने गवताची एक बारीकशी शेकोटी पेटवलीय !'
हा अजब प्रकार ऎकून आश्चर्यचकीत झालेला बादशहा स्वत: बिरबलाकडे गेला व त्याला म्हणाला, 'बिरबल, अरे, एरवी तू एवढी चतूर असताना, आज तुझ्या डोक्यात हे वेडकसं काय शिरलं ? अरे, जमिनीवर पेटवलेल्या या गवताच्या छोट्या शेकोटीची धग त्या वीस हात उंचीवर ठेवलेल्या खिचडीच्या भांड्याला लागणं शक्य आहे का ?'
बिरबल म्हणाला, 'का नाही लागणार ? आपल्या वाड्याच्या वरच्या मजल्यावरील दिव्याच्या ज्योतीची धग जर अर्ध्या मैलावर असलेल्या त्या तलावातील माणसाला लागते, तर या शेकोटीची धग अवघ्या वीस हात उंचीवर ठेवलेल्या माझ्या खिचडीच्या हंडीला का लागू नये ?'
बिरबलाच्या या उत्तरानं बादशहाच्या डोक्यात 'प्रकाश' पडला, आणि त्याने त्या तलावात रात्र काढलेल्या माणसाला बोलवून, त्याला शंभरऎवजी दोनशे सुवर्ण मोहरा दिल्या.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मूर्ख प्रश्न

एकदा दरबार चालू असताना बादशहाच्या मनात एक विचार आला. त्याने दरबालातील सर्व कामे बाजूला ठेऊन बिरबलला विचारले, बिरबल एखाद्या नालायक माणसाशी गाठ पडली तर काय करावे? बिरबल खूप कामात होता. कामाच्या वेळी बादशाहाने असा विचित्र प्रश्न विचारलेले बिरबलला आवडले नाही. परंतु काहीही न बोलता त्याला गप्प बसून आपले कामही करता येण्या सारखे नव्हते. “महाराज आपल्या या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ह्याच वेळी मिळेल.
बिरबल दरबारातील आपल काम उरकून घरी गेला आणि आपल्या एका मित्राला घरी बोलवलं. तो म्हणाला उद्या तू माझ्या बरोबर बादशहाच्या दरबारात ये. बादशहा तुला प्रश्न विचारतील तू काही बोलू नकोस. बादशहाने कितीही प्रयत्न केले तरी तू तोंड उघडू नकोस. घरी आल्यावर मी तुला इनाम देईन.
दुसऱ्या दिवशी मित्राला घेऊन बिरबल बादशहाच्या दरबारात गेला. बादशहाला मुजरा करून तो म्हणाला महाराज आपल्या कालच्या प्रश्नाच उत्तर माझा हा मित्र देईन. विचारा त्याला प्रश्न.
बादशाहने त्याला प्रश्न विचारला एखादया नालायक माणसाशी गाठ पडली तर शहाण्या माणसाने काय करावे? बिरबलचा मित्र काही न बोलता चुळबुळ करत राहिला. बादशहाने आपला प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला. परंतु बिरबलचा मित्र गप्पच.
शेवटी बादशहा चिडला तो बिरबलाला म्हणाला, काय मूर्ख पणा चालवला आहे. तुझा मित्र तर काहीच बोलत नाही. बिरबल नम्र पणे म्हणाला महाराज , माझ्या मित्राने आपल उत्तर दिले आहे. नालायक माणसाबरोबर गाठ पडली तर गप्प राहावे. बादशहाला उत्तर मिळाले. परंतु बिरबलने आपलयाला नालायक ठरविल्या मुळे तो मनातून खजील झाला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विचित्र परीक्षा

बऱ्याच दिवसानंतर बादशाहाला आपल्या सरदारांची विचित्र परीक्षा घेण्याची लहर आली. त्याने आपल्या सरदारांना मांजरीची गोजिरवाणी पिल्ल दिली. तो म्हणाला आज पासून बरोबर सहा महिन्यांनी हि पिल्ल घेऊन दरबारात यायच आहे. ज्याचे मांजर श्रेष्ठ ठरेल त्याला बादशाह कडून मोठ बक्षीस दिल जाईल.
प्रत्येक सरदार आपलयाला मिळालेल्या मांजराचे पिल्लू घेऊन घरी गेले. घरातल्या माणसांना त्यांनी बादशाहाने ठेवलेल्या बक्षीसाबद्दल सांगितले. मांजराला चांगली मिठाई व दुध खाऊ पिऊ घाला अशी घरतल्या माणसांना सूचना दिली.
प्रत्येक सरदाराच्या घरी मांजरांचा खुराक चालू झाला. हळू हळू मांजराच्या अंगावर तेज येऊ लागल. ती चांगली गुबगुबीत दिसू लागली. मात्र बिरबलान आपलयाला मिळालेल्या मांजराला असा खुराक दिला नाही. घरातल्या साध्या अन्नावर त्याला वाढववील. उंदीर पकडायला शिकवलं. बिरबलाचे मांजर उंदीर पकडण्यात तरबेज झाले. मात्र ते हडकुळे राहिले.
अकबर बादशहाने एक चांगला दिवस ठरवून सर्व सरदारांना आपआपली मांजर दरबारात घेऊन यायला सांगितले. प्रत्येक जन आपआपली मांजर घेऊन दरबारात आला. अकबरान सर्व मांजरा वरून नजर फिरवली. बिरबलाच्या हातातील हडकुळे मांजर पाहून बादशाहाला हसू आले. आपले हसू दाबीत बादशहा म्हणाला “बिरबल सर्व सरदारांची मांजर गुबगुबीत दिसत असताना तुझे मांजर हडकुळे का?”
बिरबल आपल्या मांजरी वरून हात फिरवत म्हणाला, “खाविंद आपण मांजराची परीक्षा तर घ्या.” उंदीर पकडन हे मांजराचे काम आहे. त्यात ते पटाईत असायला हवे. बादशाहने मान हलवली आणि नोकराला दरबारात उंदीर सोडायला सांगितले. पंधरा वीस उंदीर दरबारात धाऊ लागले. प्रत्येक सरदाराने त्या दिशेने आपली मांजर सोडली. बिरबलाच्या मांजराने तर बिरबलाच्या हातातून उडी मारली. ते उंदराच्या मागे सुसाट धावत सुटले. त्याने दोन तीन उंदीर मारले देखील. इतर गलेलठ्ठ मांजरे फक्त आपल्या गोंडेदार शेपट्या फुगवून तशाच जागेवर बसून पाहून लागली. त्यांनी फक्त आपल्या मिशा फेंदारल्या होत्या आणि अंग फुगविले होते. सरदार त्यांना पुढे ढकलत होते. परंतु जागेवरून हलण्याची त्यांची तयारी नव्हती.
बादशहाने बिरबलच्या मांजराला श्रेष्ठ ठरवून बिरबलाला भल मोठ बक्षीस दिल.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विहिरीचे लग्न

एकदा बादशहा आणि बिरबल मध्ये खूप कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात बादशहा बिरबलाला म्हणाला तू राजधानी सोडून चालता हो. तुझी मला मुळीच गरज नाही.
बिरबल अतिशय स्वाभिमानी होता. तो ताबडतोब राजधानी सोडून निघून गेला आणि एका गावात वेश बदलून राहू लागला.
बरेच दिवस उलटून गेले तरी बिरबल राजधानी मध्ये परतला नाही. बादशाहला मात्र सारखी त्याची उणीव भासे, त्याची कामे अडून राहू लागली आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे बादशाहला त्याच्या शिवाय करमत नव्हते. अन्न गोड लागत नव्हते. बादशाहाने अनेक प्रकारे बिरबलाचा शोध घेतला. परंतु बिरबल सापडत नव्हता.
बिरबलाला कसे शोधून काढावे यावर बादशाहने खूप विचार केला. बादशाहने बिरबलाच्या सहवासात बरेच दिवस घालवले होते. त्यामुळे बादशाहालाही त्याला शोधून काढण्याची युक्ती सुचली. त्याने प्रत्येक गावात दवंडी पिटली. राजवाड्यातील विहिरीचे लग्न करावयाचे आहे.
लग्न समारंभ थाटात होणार आहे. तरी प्रत्येक गावाच्या लोकांनी आपआपल्या विहिरीसह उपस्थित रहावे. जे उपस्थित राहणार नाही त्यांना जबरदस्त दंड केला जाईल. सर्व लोक चिंतेत पडले कुणालाच काही सुचेना.
बिरबल ज्या गावात राहत होता त्या गावातले लोकहि चिंतेत पडले होते. गावच्या पुढारींना या समस्येला कसे तोंड द्यावे समजत नव्हते. ठिकठिकाणी चर्चा सुरु झाल्या लोकांची मते घेतली जाऊ लागली. अशाच एका सभेला शेतकऱ्याचा वेश घेतलेला बिरबल हजर होता. त्याने गावकरींना जाण्याची युक्ती सांगितली.
गावकरी खुश झाले. एक दिवस गावातील पाच-सहा प्रमुख पुढारी उंची वस्त्रे घालून दिल्लीला गेले. दरबारात बादशहा पुढे हात जोडून ते म्हणाले, “खाविंद आपल्या आज्ञेप्रमाणे आणि निमंत्रण स्वीकारून आपल्या राजवाड्यातील विहिरीच्या लग्नाला आमच्या गावाच्या झाडून सर्व विहिरींना घेवून आम्ही हजर झालो आहोत.”
आमच्या गावच्या विहिरी वेशी बाहेर थांबल्या आहेत. तेव्हा आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे राजधानीतील काही प्रमुख विहिरींना त्यांचे स्वागत करण्यासाठी वेशी पर्यंत पाठवावे. त्याचे बोलणे ऐकून बादशहा जोरात हसला आणि ओरडला, बिरबल सापडला!
बादशहा म्हणाला, अजून पर्यंत एकही गावाचे लोक राजधानीत आले नाही. तुम्हीच प्रथम हजर झाला. तुम्हाला हि युक्ती कोणी सांगितली?
“एका शेतकऱ्याने महाराज!”, गावकऱ्यांनी नम्रपणे उत्तर दिले. तो शेतकरीच माझा बिरबल आहे. बादशाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ताबडतोब त्याने माणसांबरोबर लवाजम्यासहित काझीला पाठवले. बिरबलला राजधानीत सन्मानाने आणण्याचा हुकुम दिला.
बिरबल बादशाच्या महालात आला आणि त्याने बिरबलाला मिठी मारली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पाच मूर्ख

अकबर बिरबल सभेत बसून गोष्टी करत होते. तेव्हाचं अकबर म्हणाला मला या राज्यातील 5 मूर्ख शोधून दाखवं. राजाचा आदेश ऐकून बिरबलाने शोध सुरू केला. एका महिन्यानंतर बिरबल दोन लोकांना घेऊन परतला तर अकबर म्हणाला, मी तर तुला 5 मूर्ख आण्यासाठी सांगितले होते आणि तू फक्त दोनचं घेऊन आला.
पहिला मूर्ख: यावर बिरबल म्हणाला, सम्राट! हा पहिला मूर्ख आहे. मी याला बैलगाडीवर बसून जड बॅगचं ओझं डोक्यावर घेताना पाहिले. कारण विचारल्यावर हा म्हणाला की बैलाला जास्त ओझं नको म्हणून मी ते डोक्यावर घेतलं आहे. या प्रकारे हा पहिला मूर्ख आहे.
दुसरा मूर्ख: हा दुसरा मूर्ख जो आपल्या म्हशीला गवत खिलवण्यासाठी गच्चीवर घेऊन जातो. कारण विचारल्यावर म्हणाला की गच्चीवर गवत उगते म्हणून मी म्हशीला वरती नेतो. हा माणूस गच्चीवरील गवत कापून फेकू शकत नाही आणि म्हशीला वर घेऊन जातो म्हणजेच की हा दुसरा मूर्ख आहेत.
तिसरा मूर्ख: सम्राट! आपल्या राज्यात इतके काम आहे, पूर्ण राज्याची नीती मला संभालायची आहे. असे असूनही मी या मूर्खांना शोधण्यासाठी एक महिना वाया घालवला म्हणून तिसरा मूर्ख मीच आहे.
चौथा मूर्ख: सम्राट! पूर्ण राज्याची जबाबदारी आपल्यावर आहे. सुपीक डोके असणार्‍यांकडून आपण कामाची अपेक्षा ठेवू शकतो आणि मूर्ख लोकं आमच्यासाठी मुळीच कामाचे नाही तरीही आपण मूर्खांच्या शोधात आहे या अर्थी आपण चौथे मूर्ख आहात.
पाचवा मूर्ख: सम्राट! आता मी सांगू इच्छित आहोत की सगळ्यांना इतके काम आहेत. आपआपल्या नोकरी-धंध्यातील इतके महत्त्वाचे काम सोडून जो हा किस्सा वाचत आहे आणि पाचवा मूर्ख कोण हे माहीत करण्यासाठी अजून ही वाचतोय तोच पाचवा मूर्ख आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जे होते ते चांगल्यासाठीच

एकदा अकबर आणि बिरबल शिकरीला जात असतात, तलवार काढताना अकबर चा अंगठा कापला जातो… अकबरला खूप त्रास होतो, तो ओरडायला लागतो… तो शिपायांना वैद्य घेऊन या म्हणून म्हणून… शहरात पाठवतो… तेवढ्यात बिरबल त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, ”महाराज…शांत व्हा…जे होतं ते चांगल्यासाठीच होतं…”
अकबर ला राग येतो…तो जास्तच चिडतो…आणि शिकयांना सांगतो ” जा बिरबल ला घेऊन जा…रात्रभर उलटं टांगून ठेवा….आणि सकाळी-सकाळी फाशी द्या ” सर्व शिपाई तिथून निघून जातात….अकबर एकटाच जंगलात असतो….तो एकटाच पुढे शिकार करायला जातो…!!
पुढे काही आदिवासी त्याला पकडून घेऊन जातात, आणि त्याला डांबून ठेवतात.. अकबर ची बळी ते देणार असतात…त्यासाठीची विधी करण्यात आदिवासी मग्न होतात…तितक्यात एका आदिवासी ची नजर अकबर च्या तुटलेल्या अंगठ्याकडे जातो व तो ओरडून सर्वांना सांगतो ,” हा अशुद्ध आहे…आपण याची बळी नाही देऊशकत… याचा अंगठा तुटलेला आहे…
आदिवासी अकबर ला सोडून देतात…आणि त्याला बिरबल चं बोलणं आठवतं,’ जे होतं ते चांगल्यासाठीच होतं..’ तो धावत पळत त्याच्या महलात येतो, बिरबल ला फाशी होणारच असते तितक्यात तो तिथे जाऊन बिरबलला घट्ट मिठी मरतो आणि सर्व हकीकत सांगतो….आणि म्हणतो, ” मला माफ कर….तुझ्यामुळे मी वाचलो…आणि बघ माझ्यामुळे तुझी काय हालत झाली….”
” बिरबल हसतो आणि म्हणतो, ”नाही महाराज….जे होते ते चांगल्यासाठीच होता…” अकबर स्तब्ध होतो आणी विचारतो असं कसं…तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला…चांगलं कसं झालं??? त्यावर बिरबल म्हणतो, ” महाराज…मी जर तुमच्यासोबत शिकरीला आलो आसतो तर त्यांनी माझा बळी दिला असता…..म्हणून म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं….

तात्पर्य: मित्रांनो, आयुष्यात असे क्षण येतील जेंव्हा तुम्ही खचून जाणार, पण लक्षात ठेवा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं….कदाचित पुढे त्याचा ऊपयोग तुमच्या चांगल्यासाठी होईल…!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बोलून चालून गाढवच

बिरबलाला तंबाखू खाण्याचा नाद होता. हुक्की आली, ती तो मधूनच तंबाखूची चिमूट तोंडात टाकून बराच वेळ ती चघळत असे.
एकदा तो आणि बादशहा परप्रांतात गेले होते. सांयकाळच्या वेळेस ते फिरायला म्हणून गावाबाहेर गेले तेव्हा त्यांना वाटेत एक तंबाखूचे शेत दिसले. त्यात तंबाखूची रोपटी चांगलीच तरारून उठली होती. अशातच एक गाढव तेथून चालले असता मधूनच ते गाढव तंबाखूच्या झाडाचा वास घेई आणि न खाताच पुढे निघून जाई. असे त्याने दोन-चार वेळा केले, बिरबलाला टोमणा देण्याच्या हेतूने बादशहा म्हणाला, ”बिरबल, बघितलंस ना? तो गाढवसुद्धा तंबाखूला तोंड लावीत नाही.”
तेव्हा बिरबल म्हणाला, ”महाराज, अहो ते बोलून-चालून गाढवच. त्याला तंबाखू खाण्याची मजा काय कळणार?”
बिरबलाने आपल्याला फिरवून टोमणा मारल्याचे पाहून बादशहा फारच केविलवाणा झाला

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
स्वप्न

एकदा अकबर बादशहाचा दरबार भरलेला असतो. तेथे बिरबल सुद्द्धा असतो. तेव्हा अकबर बादशहा सर्व दरबारातील लोकांना त्याला पडलेले स्वप्न सांगतो.
अकबर बादशहा म्हणतो : मला आज रात्री स्वप्न पडले की, ” मी एका मधाच्या डबक्यात पडलेलो, आणि बिरबल एका चिखलाच्या डबक्यात पडलेला होता. ”
त्यावर बिरबल म्हणतो : ”बादशहा मला हि असेच स्वप्न पडलेले होते, पण त्यात तुम्ही मला आणि मी तुम्हाला चाटत होतो.”
त्या नंतर कधी बादशहाने बिरबलची थट्टा-मस्करी केली नाही.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कंजूष माणूस

एकदा एक कवी श्रीमंत माणसाकडे गेला .त्याने आपल्या सर्व कविता गावून दाखविल्या कवीला वाटले आपलेला काही तरी बक्षिस मिळणार परंतु तो श्रीमंत माणूस अतिशय चिकू होता .तो कवीला खुश करण्यासाठी म्हणाला तुमच्या कविता एकूण मी फारच खुश झालो आहे .उद्या तुम्ही परत माझ्या घरी या म्हणजे मी हि तुम्हाला खुश करून टाकेन बक्षीस मिळाले नाही म्हणून कवीला वाईट वाटले परंतु परंतु उद्या बक्षीस भेटेल या आशेवर कवी घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी न चुकता तो त्या श्रीमंत माणसाच्या घरी हजर झाला .परंतु बराच वेळ झाला तरी श्रीमंत त्याला बक्षीस देण्याच नाव काढीना अखेर कवी घरी जाण्यासाठी उठला तेव्हा श्रीमंत म्हणाला कविराज आपण मला काल कविता ऐकवून खुश केलत तस तुम्ही उद्या माझ्या घरी या मी तुम्हाला खुश करून टाकेन अस म्हणून खुश केल प्रत्यक्षात तुम्ही मला काही दिल नाही .मी हि तुम्हाला काही दिल नाही आपला व्यवहार संपला या आता परत केव्हातरी बिचारा निराश होऊन निघून गेला एकदा संधी साधून घडलेली हगिगत बिरबलाला सांगितली बिरबलाने त्या श्रीमंत माणसाशी ओळख करून घेतली मैत्री वाढवली आणि एक दिवस त्याला आपल्या घरी जेवायला बोलवले कवीलाही त्याने आमंत्रण दिले सर्व मंडळी बिरबलाच्या घरी जमा झाली .तो कंजूष घरी येण्यापूर्वी सर्वांनी जेवून घेतले आणि ते गप्पा मारू लागले थोड्या वेळाने तो श्रीमंत हि घरी आला व त्या गप्पात सामील झाला.
परंतु बराच वेळ झाला तरी बिरबल जेवनाच नाव घेईना न राहवून श्रीमंत म्हणाला जेवायचं नाही का? त्यावर बिरबल म्हणाला आपलेला फक्त खुश करण्यासाठी म्हणालो उद्या माझ्या घरी जेवायला या कंजूष श्रीमंत जे समजायचे ते समजला आणि काही न बोलता निघून गेला

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जे होते ते चांगल्यासाठी

एकदा अकबर आणि बिरबल शिकरीला जात असतात, तलवार काढताना अकबर चा अंगठा कापला जातो… अकबरला खूप त्रास होतो, तो ओरडायला लागतो… तो शिपायांना वैद्य घेऊन या म्हणून म्हणून… शहरात पाठवतो… तेवढ्यात बिरबल त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, ”महाराज…शांत व्हा…जे होतं ते चांगल्यासाठीच होतं…” अकबर ला राग येतो…तो जास्तच चिडतो…आणि शिकयांना सांगतो ” जा बिरबल ला घेऊन जा…रात्रभर उलटं टांगून ठेवा….आणि सकाळी-सकाळी फाशी द्या ” सर्व शिपाई तिथून निघून जातात….अकबर एकटाच जंगलात असतो….तो एकटाच पुढे शिकार करायला जातो…!! पुढे काही आदिवासी त्याला पकडून घेऊन जातात, आणि त्याला डांबून ठेवतात.. अकबर ची बळी ते देणार असतात…त्यासाठीची विधी करण्यात आदिवासी मग्न होतात…तितक्यात एका आदिवासी ची नजर अकबर च्या तुटलेल्या अंगठ्याकडे जातो व तो ओरडून सर्वांना सांगतो ,” हा अशुद्ध आहे…आपण याची बळी नाही देऊशकत… याचा अंगठा तुटलेला आहे…” आदिवासी अकबर ला सोडून देतात…आणि त्याला बिरबल चं बोलणं आठवतं,’ जे होतं ते चांगल्यासाठीच होतं..’ तो धावत पळत त्याच्या महलात येतो, बिरबल ला फाशी होणारच असते तितक्यात तो तिथे जाऊन बिरबलला घट्ट मिठी मरतो आणि सर्व हकीकत सांगतो….आणि म्हणतो, ” मला माफ कर….तुझ्यामुळे मी वाचलो…आणि बघ माझ्यामुळे तुझी काय हालत झाली….” बिरबल हसतो आणि म्हणतो, ”नाही महाराज….जे होते ते चांगल्यासाठीच होता…” अकबर स्तब्ध होतो आणी विचारतो असं कसं…तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला…चांगलं कसं झालं??? त्यावर बिरबल म्हणतो, ” महाराज…मी जर तुमच्यासोबत शिकरीला आलो आसतो तर त्यांनी माझा बळी दिला असता…..म्हणून म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं…. ”
तात्पर्य-
मित्रांनो, आयुष्यात असे क्षण येतील जेंव्हा तुम्ही खचून जाणार, पण लक्षात ठेवा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं….कदाचित पुढे त्याचा ऊपयोग तुमच्या चांगल्यासाठी होईल…!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
राजाचा पानवाला

अकबर बादशहाला रोज विडा खाल्ल्याशिवाय चैन पडत नसे. विशेषतः शौकतअलीने तयार केलेले पान त्याला खूपच आवडायचे. तो नेहमी शौकतअलीचे या गोष्टीसाठी कौतुक करी. त्यावेळीं जाड्या शौकतअली बादशहाला अगदी वांकून सलाम करीत असे. 
तो म्हणाचा, ‘‘मी या कलेत पारंगत झालो, कारण माझ्या वडिलांनी ही विद्या मला शिकवली. वयाच्या आठव्या वर्षापासून मी पान लावतो आहे. ते आपल्या पसंतीला उतरते, हे माझे परमभाग्य आहे. माझ्या अंगांगात ही कला भिनली आहे. आणि आपल्याकडून तिचे कौतुक झाल्याने मी धन्य झालो आहे.’’
बादशहा अकबर कुठेही जाताना शौकतअलीला आपल्याबरोबर घेऊन जायचे. जेवणानंतर ते हमखास पान खात असत. अशीच तीन वर्षे गेली.
एके दिवशी शौकतअलीच्या हातून पानांत चुना थोडा जास्त पडला. बादशहाने ते पान खाल्ल्यावर त्याची जीभ भाजली. 
त्यामुळे पान थुंकून देत तो म्हणाला, ‘‘तुझे पान खाल्ल्याने माझी जीभ भाजली. विडा करण्यात माझा हात कोणीही धरू शकणार नाही, असे म्हणत असतोस. त्यावेळी तुला लाज वाटली नाही?’’
शौकतअली भीतीने थरथर कांपू लागला.
आपली भाजलेली जीभ सारखी बघत बादशहा म्हणाला, ‘‘शौकतअली, आत्ताच्या आत्ता जाऊन तुझी पिशवी भरून चुना आण. समजलं?’’
या अपराधासाठी बादशहा आपल्याला तुरूंगात टाकतील कीं आपला शिरच्छेद करतील, असा विचार करीत शौकत दुकानांत गेला.
पिशवी चुन्याने भरल्यानंतर दुकानदाराने विचारले, ‘‘एवढा चुना कां नेतोस?’’
‘‘मलाही माहित नाही. बादशहाने मागवला आहे.’’ नेमका त्याच वेळी महेशदास तिथे आला. त्याने विचारले, ‘‘बादशहांनी इतका चुना कां मागवला आहे?’’
पिशवी चुन्याने भरल्यानंतर दुकानदाराने विचारले, ‘‘एवढा चुना कां नेतोस?’’
‘‘मलाही माहित नाही. बादशहाने मागवला आहे.’’ नेमका त्याच वेळी महेशदास तिथे आला. त्याने विचारले, ‘‘बादशहांनी इतका चुना कां मागवला आहे?’’
‘‘बादशहांनी अशी आज्ञा कां केली, ते मलाही समजत नाही’’ शौकतअली दीनवाण्या स्वरांत म्हणाला.
‘‘बादशहांनी यापूर्वीं कधी अशी आज्ञा केली होती कां?’’ महेशदासने विचारले.
शौकतअली म्हणाला, ‘‘कधीच नाही.’’
‘‘मग एक काम कर. भरपेट तूप पिऊन जा.’’ महेशने उपाय सांगितला.
‘‘आधीच मी जाड्य़ा, त्यांत माझे पोट सुटलेले आहे. तूप पिऊन जायला सांगून माझी खिल्ली उडवता कीं काय?’’ शौकतने विचारले.
‘‘मी तुझी खिल्ली उडवत नाही. तुझ्या चांगल्यासाठी सांगतो आहे. बादशहांच्या समोर जाण्यापूर्वी पोटभर तूप अवश्य पी. असे केल्यानेच तुझा प्राण वाचेल. मला आता लवकर निघायला हवे’’ असे म्हणून महेशदास तेथून निघाला.
शौकतअली विचारांत पडला. चुन्याची पिशवी घेऊन घरी आला आणि बायकोकडून तूप मागवले. मग ते पोटभर प्यायला.
‘‘हे काय करताहात? असे बायकोने विचारले. तो कांही न बोलताच घाईने बाहेर पडला आणि बादशहांसमोर हजर झाला.
त्याच्याकडे न पहाताच ‘‘आलास?’’ असे म्हणून बादशहाने एका दरबार्‍याला सांगितले, ‘‘याला बाहेर घेऊन जा व तो चुना खायला घाल.’’
‘जहापन्हां, सगळा चुना खाल्ला तर मी मरेन. चुना पोट जाळतो’’ असे म्हणून शौकत रडू लागला.
‘‘हीच तुझी शिक्षा आहे’’ अकबर बादशहा गंभीरपणे म्हणाला. दरबारी त्याला बाहेर घेऊन आला व त्याला चुना खाण्याची आज्ञा केली.
राजाज्ञेचे उल्लंघन कसे करणार? म्हणून दोन्ही मुठी भरून चुना त्याने खाल्ला. आणि तेवढा चुना खाऊनच तो बेशुद्ध पडला. इतक्यांत, बादशहा तेथे आले व शौकतला पाहून म्हणाले, ‘‘अजून हा जिवंत आहे?’’
महत्प्रयासाने अली उठला व म्हणाला, ‘‘तूप प्यायल्यामुळे वाचलो, खाविंद.’’
‘‘तूप कां प्यायलास?’’ बादशहाने विचारले.
‘‘मी चुना खरेदी करत असताना महेशदास नांवाचा एक तरुण तेथे आला व त्याने सल्ला दिला कीं, तूप पिऊन महाराजांसमोर जा. बरे झाले, मी त्याचे ऐकले’’ शौकत म्हणाला.
‘‘तो महेशदास कोठे आहे? लवकर जा आणि त्याला माझ्याकडे घेऊन ये’’ अकबराने हुकूम केला.
थोड्य़ाच वेळांत शौकतअली महेशदासला घेऊन तेथे आला. त्याला पहाताच बादशहा म्हणाला, ‘‘छान बिरबल, तर हे तुझे काम आहे. शौकतअलीला तूप प्यायला कां सांगितलेस?’’
‘‘शौकतअलीने तूप पिऊन येऊ नये, अशी कांही आपली आज्ञा नव्हती. खाविंद, माफ करा. आपण अलीला पिशवीभर चुना आणण्याची आज्ञा केलीत. तेव्हांच मला अंदाज आला कीं, आपण त्याला शिक्षा देण्यासाठीच ही आज्ञा केली आहे. म्हणूनच मी त्याला तूप पिऊन येण्याचा सल्ला दिला. नाहीतर तो लगेचच मरण पावला असता’’ बिरबल म्हणाला.
‘‘तो मेला असता तर तुझे काय बिघडले? जास्त चुना घालून याने माझ्या जिभेला चटका दिला. त्याला शिक्षा झालीच पाहिजे.’’ अकबर म्हणाला.
‘‘शौकतअलीच्या मृत्यूने माझे कांहीच बिघडले नसते. त्यामुळे आपलेच नुकसान झाले असते. गेली तीन वर्षे तो आपल्या सेवेत आहे. आपण मला कित्येक वेळा सांगितले आहे कीं, त्याने तयार केलेले पान उत्तम असते. अशी व्यक्ती मरण पावली तर सर्वोत्तम पानवाला कसा मिळेल? तो आपल्यावर अवलंबून आहे. माणसाच्या हातून सहज चूक घडूं शकते. अनवधानाने झालेली चूक माफ करणे, हेच आपल्यासारख्या बादशहालाच शोभते’’ बिरबल म्हणाला. शौकत अलीने वांकून पुन्हां मुजरा केला.
ते पाहून बादशहा म्हणाला, ‘‘वांकून जमिनीला डोके टेकवायला सांगितले असते, तर बरे झाले असते. तीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा ठरली असती.’’
नंतर क्षणार्धाने बादशहा अकबर हंसून अलीला म्हणाला, ‘‘ठीक आहे. जे झाले, ते झाले. ताबडतोब आम्हा दोघांसाठी उत्तम पान तयार करून दे.’’

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बिरबलाचा मृत्यू कसा झाला ? 

तुम्ही, मी आपण सर्वजण अकबर बिरबलाच्या गोष्टी ऐकतच लहानाचे मोठे झालो. यातील बिरबल ही व्यक्ती अतिशय हुशार,चतुर,कुशाग्र बुद्धिमत्ता असलेली. आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीच्या गळी उतरवायचं असं कौशल्य बिरबलाकडे होतं की समोरची व्यक्ती कुणी सर्वसामान्य असो किंवा खुद्द अकबर बादशाह असो, बिरबलाच्या बुद्धीचातुर्यापूढे सपशेल दंडवत घालायचाच अशा या विद्वान व चतुर बिरबलाचा मृत्यू कसा झाला हे जाणून घ्यायचय ? असं म्हणतात की बिरबलाला अकबर फक्त प्रधानच नव्हे तर राजा बनवू इच्छित होता. ही गोष्ट तेंव्हाची आहे जेंव्हा हिमाचल प्रदेशातील कांगडावर राजा जयचंद्र चे राज्य होते. इसवी सन १५७० ला राजा जयचंद्राने दिल्ली व आग्रा शहरात हवेली बांधून घेतली होती. मुघल व कांगडा राज्यात विस्तव सुद्धा अडवा जात नसे व काही ऐकीव गोष्टींनुसार हेच कारण होते अकबराने राजा जयचंद्रला कैद करण्याचे राजा जयचंद्रास कैद करण्यामुळे जयचंद्राचा मुलगा बिथरला. त्याने स्वतःला राजा घोषित केले व अकबराविरुद्ध उठाव केला. अकबराने राजा जयचंद्राचा मुलाचा बीमोड करण्यासाठी आपल्या आधिपत्याखाली असलेल्या पंजाब प्रांतातील सुभेदार हुसेन कुली खान यांस कांगडा वर हल्ला करण्याचे आदेश दिले.

अकबराच्या आदेशानुसार सुभेदार कुली खान सैन्य व युद्ध सामग्री घेवून कांगडा कडे निघाला. कांगडा ला हादरा देण्यासाठी कुली खानने एक योजना आखली. प्रथम त्याने दिल्ली प्रांतातील कोटलाच्या किल्ल्यावर हल्ला चढवला कारण कांगडावर हल्ला करताना कुलीखानला या कोटला नजीकच्या किल्यावर तैनात असलेल्या कांगडाच्या सैन्यतुकडीचा व्यत्यय नको होता. या युद्धात मुघलांची सरशी झाली व दोन दिवसांनंतर मुघलांचा सैन्याने कुलीखानच्या नेतृत्वाखाली कांगडावर हल्ला केला व तेथील एका किल्ल्यास वेढा दिला. कांगडाचे सैन्यबल तोकडे होते व त्यांचा मुघलांसमोर टिकाव मुश्किल होता. मुघलांचा कांगडावर विजय जवळजवळ निश्चित होता तोच एक बातमी अकबराला मिळाली की पंजाब प्रांतात मुघलांविरुद्ध उठाव झाला त्यामुळे नाइलाजाने अकबराने कुलीखानला हे बंड मोडून काढण्याचे आदेश दिले. पण अकबराला एक बाब सलत होती ती म्हणजे, जवळजवळ काबिज केलेले कांगडा त्याला पूर्णपने जिंकता आले नव्हते. काहीही करून त्याला हाती आलेले कांगडा गमवायचे नव्हते. त्याने राजा जयचंद्र व त्याचा मुळाशी बोलणी सुरू केली व या चर्चेदरम्यान अनेक तह व अटी ठरवल्या गेल्या.ठरल्याप्रमाणे बिरबलास किल्ल्याचा प्रवेश द्वाराजवळ एक मस्जिद बांधून देण्यात आली आणि मुबलक प्रमाणात सोने-नाणे देण्यात आले अर्थात बिरबल आता राजा झाला होता. अनेक इतिहासकारांनी त्याचा उल्लेख राजा असा केलेला तुम्हाला पाहायला मिळेल. पण बिरबलास आपण संपूर्ण राज्य देवू शकलो नाही ही खंत अकबराच्या मनात होती म्हणून त्याने बिरबलाला आपल्या विशेष सैन्यातील एक तुकडी उपहारस्वरूप दिली. सर्व काही सुरळीत चालू असतांना एके दिवशी अकबराला एक वार्ता समजली की अफगाणिस्तानातील बाजौर या प्रांतात काही दरोडेखोर व लुटारू सामान्य नागरिकांचा साधन संपत्तीची लूट करत आहेत. लोकांना त्या भागात राहणे मुश्किल बनले असून अनेक नागरिकांनी लुटारू व दरोडेखोरांच्या भीतीने स्थलांतर केले असून बाजौर जवळजवळ उजाड झाले आहे. ही बातमी समजताच अकबरने आपल्या एका सरदारास ज्याचे नाव जेनखान कुका असे होते त्यास लुटारूंचा बीमोड करावयास पाठवले सोबत सैन्य व युद्धासाठी आवश्यक सामग्री ही दिली. जेन खान मजल दरमजल करत अफगाणीस्तानच्या दिशेने जात होता. प्रचंड जंगल व दुर्गम भाग पार करत करत तो अखेर अफगाणला पोहोचला तिथे पोहोचल्यावर सर्वप्रथम मुघलांचा सामना अफगाणी यूसुफझाई कबिल्याशी झाला.

मित्रांनो, अफगाण हे शूर व लढवय्ये असतात. ते अतिशय चिवट झुंज देतात पण जेन खान व मुघलांना याची कल्पना नव्हती. अफगाणी लोकांची युद्धनीती वेगळी होती. ते समोरासमोर युद्ध न लढता गोरीला युद्धतंत्राचा अवलंब करत होते. आधीच झाडांवर चढण्यात माहिर असणारे अफगाणी अशा युद्धाचा अजिबात अनुभव नसलेल्या मुघलांवर भारी पडत होते. जेनखानने कल्पना ही केली नव्हती की ही मोहीम इतकी अवघड असेल. मुघल सैनिक अफगाणी योद्ध्यांसमोर हतबल झाले होते. मुघल पराभवाच्या छायेत होते. जेन खानला काहीच कळेना की यातून मार्ग कसा काढावा. अखेर त्याला एक युक्ती सुचली. त्याने अकबर बादशाहास पत्र पाठवले व खोटा संदेश दिला की आपण जवळजवळ युद्ध जिंकत आलो आहोत व आणखीन थोड्याशा सैन्याचा मदतीने आपण ही मोहीम फत्ते करू. अकबराने हे सारे खरे मानले व तो जेनखानाच्या मदतीसाठी आणखीन सैन्य पाठवण्याबाबत विचार करू लागला. त्याला जेंव्हा जेनखानचा संदेश मिळाला तेंव्हा दरबारात अबूल फजल व बिरबल हे दोघेच हजर होते. अबूल फजलने जेनखानचा मदतीस जाण्याची इच्छा व्यक्त केली पण अकबराने त्यास मनाई केली. पण जेंव्हा बिरबलने जेनखानच्या मदतीस जायची इच्छा व्यक्त केली तेंव्हा तो बिरबलास नकार देवू शकला नाही व बिरबलास काही सैन्य देवून अफगाणिस्तानास रवाना केले. बिरबल हा महान राजनीतिज्ञ जरूर होता पण तो युद्धनीतीमध्ये तितकासा पारंगत नव्हता. तरीही बिरबलची फौज जिद्दीने लढली व त्या दिवशी मुघल अफगाणांवर भारी पडले. संध्याकाळ झाली व नियमानुसार युद्ध विराम जाहीर करण्यात आला रात्र झाली, बिरबल दुसर्‍या दिवशीच्या युद्धाची रणनीती ठरवू लागला. इकडे अकबराने अबूल फतेह या सरदरास बिरबलाच्या मदतीसाठी ससैन्य अफगाणीसतनाला रवाना केले. अकबराने अबूल फतेहास बिरबला च्या सहाय्यासाठी रवाना केले खरे पण अबूल फतेहसुद्धा युद्धनीतीत फारसा पारंगत नव्हता तसेच मुघल व अकबरासाठी चिंतेची आणखीन एक बाब म्हणजे अबूल फतेह,बिरबल व जेनखान यांचे आपआपसात फारसे जमत नव्हते. मुद्दा कुठलाही असो, या तिघांचे कधीच एकमत होत नसे

अफगाणिस्तानात तिघे जेंव्हा एकत्र भेटले तेंव्हा बिरबलने एक रणनीती ठरवली पण नेहमीप्रमाणे या तिघांचे एकमत होऊ शकले नाही व ते तिघेही वेगवेगळ्या वाटेने निघाले. बिरबल आपल्या वाटेने निघाला व ३-४ कोस प्रवास करून रात्री मुक्कामी आपल्या सैन्यासाह एका ठिकाणी त्याने डेरा टाकला. आणि इथेच घात झाला. पुढे जे होणार होते ते बिरबलच्या ध्यानीमनीही नव्हते.

कारण….. ती रात्र बिरबलच्या आयुष्यातली अखेरची रात्र होती. कारण बिरबलाने ससैन्य जिथे डेरा टाकला तिथे अफगाणी आधीच दबा धरून बसले होते. अफगाण्यांनी मुघल सैन्यास चहूबाजूंनी घेरले व बाण आणि दगडांचा वर्षाव केला. मुघल सैन्यामध्ये अफरातफरी माजली मुघल सैरावैरा पळू लागले, घोडे बिथरले होते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मुघल छावणीत हल्लकल्लोळ माजला होता. तीर आणि दगडांनी अनेक मुघल सैनिक घायाळ झाले व काही सैनिक तर जागीच ठार झाले होते. त्यातच एका बाणाने बिरबलाचा वेध घेतला. त्या काळोख्या रात्रीत बिरबलाने स्वतःला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला पण बिरबलाचा काळ जवळ आला होता व त्या रात्री एका महान राजनीतीज्ञ, कुशल व कर्तव्यनिष्ठ अशा महान बिरबलाचा मृत्यू झाला.

मित्रांनो अकबराने घेतलेल्या या एका निर्णयामुळे महान बिरबलाचा मृत्यू झाला. अर्थात अकबराला तरी याची कुठे कल्पना होती की आपण आपल्या दरबारातील रत्नास मृत्युचा दाढेत पाठवतोय. अकबर बिरबलाच्या अनेक कथा अतिशय प्रसिद्ध आहेत पण बिरबलचा मृत्यू नेमका कसा झाला याविषयी फारशी माहिती कुणाला नाही. आम्ही या लेखातून तुम्हाला ही माहिती देण्याचा केलेला हा प्रयत्न

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संकलन :- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

26/04/2021 Shubhecha

*मा. नासा सरांना जन्मदिनाच्या मोरपंखी शुभेच्छा ...*

🌹🎂🌹🎂🌹🎂🌹

🌹जन्मदिन🌹

जन्मदिन आज खास
नासा सर गुणवंत
आम्हां आदर्श गुरूजी 
तेज तारा प्रज्ञावंत

साहित्यिक महामेरू
नासा सर संवेदनी
मिळो सुख क्षण सारे
तुम्हां सोनेरी जीवनी

वृत्ती प्रांजळ सालस
व्यक्तिमत्त्व सुज्ञ थोर
सामाजिक समस्यांचा 
वाटे मनी खूप घोर

श्रेष्ठ समूह प्रमुख
दावी सर्वां यशोदीप
ऋषीतुल्य ऋजू भाव
स्तंभलेख नेत्रदीप

मन व्यापक उदार
अष्टपैलू सारस्वत
लाभो दीर्घायु उदंड
मिळो प्रतिष्ठा नि पत

नित्य प्रतिभा लेखणी
घ्यावी गरूड भरारी
देते मनस्वी शुभेच्छा
लाभो यशोकीर्ती सारी

✍️ श्रीमती अर्चना गरूड
ता. किनवट , जि. नांदेड
मो.क्र. 9552963376
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
*************************
साहित्य सेवक मा. आ. ना. सा. येवतीकर सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दि. २६/०४/२०२१

शीर्षक. :-" लाभो उदंड आयुष्य"

साहित्याचे जाणकार
विचारात प्रगल्भता
शारदेचा आशीर्वाद
स्वभावात ती रूजूता //१//

लाभो उदंड आयुष्य
दिन आज सोनियाचा
दैनंदिन व्यासंगाला
शुभ हस्त सकलांचा //२//

तारांकित ही लेखणी
सारस्वत्य मूर्तिमंत
शब्दरुपी औक्षणाने
व्हावे तुम्ही कीर्तिवंत //३//

चंद्र फुलावा कलेने
यश लाभो जीवनात
विजयाची ही पताका
फडकावी साहित्यात //४//

आयु आरोग्य संपदा
लाभो तुम्हा चिरकाल
देते शुभेच्छा सरोज
सदा असो उष:काल //५//

रंग गहिऱ्या प्रेमाचे
सांधलेत साहित्याशी
विश्वासाने संपादिले
नाव साहित्य क्षेत्राशी //६//

साहित्याचा हा वारसा
चालो पुढती अखंड
सर्व इच्छा होवो पूर्ण
लाभो आयुष्य उदंड //७//

सौ. सरोज सुरेश गाजरे
भाईंदर
*************************
आपल्याकडे  एक मूल्यमापन पद्धती
आहे "सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन"
आ.नासाजी यात अगदी व्यवस्थित बसतात...सतत खंड न पडू देता त्याचे
उपक्रम अविरत चालु असतात..अतिशय स्तुत्यच.. मी त्याना नेहमी म्हणतं असते..सरजी, खरच.तुम्ही लिहून घेता आमच्याकडून 
नसता आम्ही तर विसरून पण जातो की आम्हाला काही लिहीता येतं.
         उपक्रमाला प्राधान्य देणारे व सर्वांना नेहमी ,"लिहीते व्हा, वेळेत लिहा "म्हणारे सरजी ..त्यांचा हा आदेश की सूचना?पण सगळे कसे 
मन लावून लिहितात.मानतात त्याना
         माझी व त्यांची ओळख "साहित्य दर्पण "या ग्रुप मध्ये झाली.
आमच्या मुअ.खेडकर मॅम नी मला त्या ग्रुप मध्ये अॅड केले होते.
मी सहावीला असताना लिखाण केलेले .कविता, नंतर मला लिहीता येते हे तर मी जवळ जवळ विसरले होते.त्यात संसारातून वेळ मिळेल तर शपथ....ग्रुप मध्ये अॅड झाले व चांगलेच लिखाण सुरू झाले....
आणि लेख कविता...सत्र सुरू झाले.
दुर्दैवाने तो ग्रुप बंद झाला.आता मात्र मला काही चैन पडेना...नासा.सरांनी
स्पंदन कुही ग्रुप सुरू केला व त्यात मला अॅड केले.खूप आनंद झाला.
पुन्हा जोमाने लिखाण सुरू झाले.
त्यानंतर सरांनी "साहित्य सेवक"नावाचा ग्रुप तयार केला.त्यात ही अॅड केले .नवनवीन उपक्रमांची सरबती सुरू झाली.व्वा सरजी....झोपलेल्याना जागे करून त्यांच्या कडून साहित्य निर्मीती करून घेण्यात सरांचा हातखंडा ..मी मागे म्हटलं ,"सरजी तुमचा हा गुण खरोखर
वाखाणण्याजोगा आहे.खरच, तुम्ही
आम्हाला देत जा आदेश....
           सर्वाना लिहीते ठेऊन स्वतः साहित्य निर्मीती करणे,कविता लिखाणाचा प्रयत्न खूप आवडलं.
वेगवेगळ्या अॅपवर लिखाण प्रसिद्ध करणे ...त्यातील सातत्य व्वा...
खरोखर मला तर त्यांचे हे गुण खूप आवडतात.मला येत नाही म्हणून 
एका जागी बसणा-या पैकी सरजी नाहीत."प्रयत्ने वाळुचे कण रगडीता
तेल ही गळे"या म्हणींचा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसतो.
       विद्यार्थ्यांना देखील त्यांनी उपक्रमात सहभागी करून घेतले आहे
लहान वयात विद्यार्थ्यांना लिखाणाचे संस्कार देणारे आदर्श गुरूजी .
      " कामात असावे सातत्य
       शिकलो आम्ही आता
       अहो नासा सर तुम्ही 
       सुरेल गीत पण  गाता"
अशा ह्या आदर्श मुर्तीला वाढदिवसा निमीत्त स्नेहमय शुभेच्छा आपणास दीर्घायुष्य लाभो व समाजोपयोगी असे 
साहित्य आपले हातून निर्माण होवो
ही सदिच्छा, खूप खूप शुभेच्छा 🙏

स्नेहलता कुलथे बीड🌹
7588055882
*************************
ज्ञानाचा तव डंका वाजे
सागर तुम्हा बघून लाजे

पाहणा-यांच्या माना दुखती
झेप अशी ही तुमची असती

प्रश्न  पडती पक्षांनाही 
पाहून आपली उंच भरारी

 कीर्ती -उन्नती ऐसी होवो   
काळही एकटक बघत राहो.

कर्तुत्वाचा अग्निबाणा 
भेदा ध्येयाचे आसमान

 यशाच्या चारही दिशा उजळू दे
लख्ख प्रकाश चोहीकडे 
पसरू दे…

अष्टपैलू लेखक --प्रांजळ कवी--साहित्याचे साधक  आणि ज्ञानरत्न
ना.सा.येवतीकर सरांना.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक 
हार्दिक शुभेच्छा

- अजय शिवकर, पनवेल
*************************
नमस्कार 🙏 लेखक, कवी, साहित्य रत्न ना. सा. येवतीकर सर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभाशीष. सुख, वैभव, आरोग्य  व दीर्घायुष्य लाभो. ही ईश्वर चरणी मनःकामना! पुढील साहित्य कार्यासाठी त्यांना खूप खूप सह्रदय  शुभेच्छा! व त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!अभिनंदन! जेठेवाड सर, आपण लिहिलेला लेख त्यांच्या साहित्य व अष्टपैलू कार्यावरील लेखाजोखा असून साहित्य चळवळीतील एका निष्णात, प्रांजळ, साधक व लोकप्रिय व्यक्तिमत्वाची सखोल ओळख करून देणारा आहे. आपलेही मनःपूर्वक अभिनंदन!...

* ना. सा. हे माझे प्रिय विद्यार्थी असून त्यांच्या समाज उद्बोधक व साहित्य क्षेत्रातील उपरोक्त सर्वच गोष्टींचा मला सार्थ अभिमान वाटतो. असो... पुनःश्च आपल्या दोघांचेही मनस्वी अभिनंदन!अभिनंदन!....

.............आपला विनम्र .............
आडबलवाड पांडुरंग शंकरराव 
(माध्यमिक शिक्षक) हु. पानसरे हायस्कूल,  धर्माबाद.जि.नांदेड मो. नं. 9158551975
*************************
दिलखुलास, दिलदार, मनमिळाऊ, आदर्श व्यक्तीमत्वाचे धनी, साहित्य सेवक समुहाचे समूह प्रशासक, स्तंभलेखक, आमचे आदर्श... मान. *श्री.नागोराव सा. येवतीकर सर*, धर्माबाद आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... 💐💐

जन्मदिवस यावे निरंतर
साजरे व्हावे शतकोत्तर.....!! 

शब्द सरिता वाहत राहो
सदैव तुमची  उत्तरोत्तर ......!!

व्यक्ती दिलदार, मनमिळाऊ 
देती वाचन संस्कृतीचा खाऊ....!!

सदोदित घेती शोध नवा
आम्हाला वाटतो त्यांचा हेवा....!!

लाभावे आयुष्य सुखीसमाधानी
हिच मनोकामना ईश्वर चरणी...!!

त्यांच्या मार्गाचा घेऊ ध्यास 
जादुची पिशवी मिळाली खास..!!

भरभराटीचे जावो जीवन तुमचे 
औचित्य साधून जन्मदिवसाचे..!! 

नित्य नव्याचा शोध घ्यावा 
असाच असावा आदर्शाचा ठेवा..!!

              *शूभेच्छूक*
श्री. सुंदरसिंग साबळे पक्षीमित्र गोंदिया
*************************
*💐अभिष्टचिंतन💐* .                   **नासा साहित्य विश्वातील एक उगवता तारा .*                                                                                     खरंच साहित्याचे निस्वार्थ सेवक,नागोराव .................... एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व साहित्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध  नाव, संपूर्ण महाराष्ट्रात नासा या नावाने सुपरिचित, अनेक वर्तमानपत्रातील त्यांचे  अभ्यासपूर्ण लेखन वाचनीय, एक सिद्धहस्त कवी ,सुंदर हस्ताक्षराचे धनी, नेहमी प्रसन्न,असेआमचे मित्र रूममेट, ज्यांच्या  सहवासामुळे आम्हाला थोडीशी लेखनाची सवय लागली अर्थात नासा यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐🙏🏼🎂            शुभेच्छुक                      
*शिवाजी अन्नमवार*               
महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटना
*************************
नमस्कार सर " साहित्याचे खरे उपासक नासा येवती कर " हा लेख वाचला.आपण सरांचे विषयी त्यांचे बालपण ,शालेय शिक्षण,माध्यमिक ,महाविद्यालयीन शिक्षण यांची सखोल माहिती त्याची तेलगू मातृभाषा असून सुध्दा त्यांनी मराठी भाषे वर त्यांचे जास्त प्रेम होते.त्यांना आजपर्यंत विविध प्रकारची साहित्य व शैक्षिणक क्षेत्रातील पारितोषिके मिळालेली आहेत.त्यांच्या विविध सामाजिक विषयावर कथा,कविता,लेख,कांदबरी, ई बुक, इ मासिक प्रकाशित झाली आहेत त्यांचे आज ४५ वर्ष पूर्ण होत असताना एवढी साहित्य क्षेत्रात घेतलेली झेप गौरवास पात्र आहेत.त्यांना लोकसंग्रह करण्याचा त्यांच्या छंदामुळे करोनाच्या काळात नवीन लेखक कविना साहित्य सेवक समुहामध्ये व्यासपीठ मिळवून दिलेले आहे.त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही त्यांच्या विषयी छान लेख लिहून त्यांचे विषयी आम्हाला माहिती नसलेली माहिती मिळाली म्हणून तुमचे अभिनंदन व पुढील लेखनास लाख लाख हार्दिक शुभेच्छा....आपला  वाचक..जी.एस.कुचेकर पाटील भुईंज तालुका वाई जिल्हा सातारा मोन.७५८८५६०७६१.
*************************
नासा सरची प्रथम मी एक कविता एका पेपरमध्ये वाचली होती व ती कविता छान अर्थबोध रचना आहे असा अभिप्राय त्यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर पाठविलेला होता त्यांनी लगेचच मला कॅमरून बोलले छान लीहता आहेत आमच्या साहित्य सेवक ग्रुप मध्ये तुम्हाला मी घेऊ का मी लगेच होकार दिला तेव्हा पासून माझी आणि सरांची ओळख झाली तेव्हा पासून दररोज एक दिलेल्या विषयावर लेख आणि कविता पाठवून त्या दोन्ही वेळी दोन्ही ई बुकात प्रकाशित झालेल्या आहेत.पुन्हा प्रेरणा मासिकांमध्ये ही माझी कविता प्रकाशित केली.सरांचे कडे विविध गुण आहेत जसे नवीन मित्र कमविणे, मित्रांना लेखनासाठी प्रवृत्त करणे,त्यांना व्यासपीठ मिळवून देणे,नवलेखकाच्या पाठीवर शाबासकीची शब्दरूपी थाप टाकने. विविध वर्तमान पत्रात लेख पाठविणे मदत करणे असे त्यांचेकडे विविध गुण असून आज पर्यंत त्यांची विविध पुस्तके प्रकाशित झालेली आहेत सर्व साहित्य ज्ञानाचे भांडार सर्व मित्रांनी असेच वाटून घेवून त्याचा आपल्या समाजासाठी लेखणीच्या मदतीने प्रसार करावा.कसल्याही प्रकारचा गर्व गंध नसलेले माझे नव तरुण साहित्यातील गुरुवर्य नासा सर यांचा साहित्याचा वेलू असाच गगनाला पोहोचवा.नासा सर यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक लाख लाख शुभेच्छा...

आपलाच शुभेच्छुक...
जी.एस. कुचेकर पाटील सेवा निवृत मंडळ अधिकारी भुईंज तालुका वाई जिल्हा सातारा मो.न.७५८८५६०७६१.





26/04/2021 arun deshpande

साहित्ययात्री - नासा सर
---------------------------------
आज नासा तथा ना.सा.येवतीकर या उमद्या व्यक्तीचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने त्यांचा एक वडीलधारा स्नेही- मित्र म्हणून शुभाशीर्वाद देतांना 
पुढील लेखन प्रवासासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो आहे.

आपल्या सर्वांचे मित्र आणि आजच्या
साहित्य क्षेत्रातील एक सर्वपरिचित
व्यक्तिमत्व- नासा सर" .
या चार अक्षरांच्या अद्याक्षरांनी जनमानसावर ठळक ठसा उमटवला आहे.

मित्रांनो-  NASA" या अंतराळ क्षेत्रात अतिशय प्रसिद्ध प्रयोगशाळेला, जगभरात
सन्मान दिला जतो, कारण "प्रयोगशीलता" हे या NASA" वैशिष्ट्य आहे..अगदी सेम टू सेम हीच ओळख
 आपल्या नासा सरांची आहे".

ते एक प्रयोगशील शिक्षक आहेत- साहित्यिक आहेत. असंख्य विदयार्थी , शिक्षक मित्र, साहित्यिक या सर्वांना सोबत घेऊन जाणारे ते सर्वप्रिय कॅप्टन आहेत.
हे मी मोठ्या अभिमानाने आणि कौतुकाने सांगेन.

२०१९ की २०२० - च्या जानेवारीत त्यांच्या शाळेत रोज एक कविता " हा कविता लेखन-उपक्रम" कवी-कवयित्रींच्या कविता मिळवून नासा सरांनी यशस्वी संपन्न केला.

०१ जानेवारी रोजी "नव वर्ष स्वागत"या माझ्या कवितेने हा उपक्रम सुरू झालाय,
ही आठवण केवळ अविसमरणीय आहे.

मी आणि नासा सर जुने स्नेही-मित्र आहोत, त्यांच्या सर्वच उपक्रमात माझा लेखन सहभाग असतो .

तसेच इंटरनेटवर असलेल्या मातृभारती मराठी, प्रतिलिपी मराठी, ई- साहित्य प्रतिष्ठान " या ई-साहित्य विषयक माध्यमातून आम्ही
सह-लेखक म्हणून सक्रिय आहोत,
या लेखन प्रवासात नासा सरांच्या ई-बुक्स ना मी माझ्या प्रास्तविक शुभेच्छा लिहल्या आहेत .

नासा सरांनी नवोदित साहित्यिकाना
लेखक होण्याची संधी दिली, अशा काही
ई बुक्ससाठी प्रास्तविक लिहावे "अशी
नासा सरांची सूचना " माझ्यासाठी प्रमाण आदेश असतो".

हे करून घेणे "त्यांचा मूळ स्वभाव आहे",
कारण "सतत आपल्या माणसासाठी काही करणे" ही अंतःकरणातील तळमळ "नासा सरांना कधीच स्वस्थ बसू देणारी नाही.

नासा सरांच्या मित्र-परिवारात ,"माझा समावेश असणे "ही सुखद भावना आहे,
माझा साहित्यिक बहुमान "आहे.

नासा सरांचा नवीनतम कविता संग्रह-
"जीवनगाणे" लवकरच येतो आहे"
या कविता वाचून शुभेच्छा देतांना मी
म्हणेन - 
आनंदाच्या सुरावटीच्या कविता " नासा या साहित्ययात्रीचे खरे "जीवनगाणे"
आहे.
ई- मासिक "प्रेरणा"साठी खुप खुप शुभेच्छा💐

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नासा सर
💐💐💐💐💐🎂🎂🎂💐💐💐
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
------------------------------------------------

26/04/2021 bharati sawant

साहित्य विश्वात मदतीचा हात देणारे नासा येवतीकर
लॉकडाऊनच्या काळात घरात बसल्या बसल्या काय करावे ? या विचारात असताना साहित्य सेवक समुहात मी सहभागी झाले आणि याठिकाणी स्तंभलेखक, कवी, कथाकार, उत्तम निवेदक आणि प्राथमिक शिक्षक नासा येवतीकर यांचा परिचय झाला. दुसऱ्यांच्या लेखणीला बळ देण्यासाठी ते नेहमीच कसोशीने प्रयत्न करतात. लेखात काही चुका किंवा दुरुस्त्या असतील तर ते तसे काम करून देतात आणि वृत्तपत्रात देखील प्रसिद्धीसाठी पाठवून देतात. एवढेच नाही तर ते प्रत्येकाला वर्तमानपत्राच्या ई-मेल्स, फोन नंबर देतातच आणि कोणाचे लेख किंवा कविता वृत्तपत्रात छापून आले असेल तर त्याचे कात्रण देखील पाठवतात. लॉकडाऊनच्या काळात गेल्या वर्षी त्यांनी साहित्यसेवक  समूह  स्थापन केला आणि उपक्रमांना सुरुवात केली. रोज एक विषय देऊन लेख लिहिण्यास प्रेरित केले. त्यामुळे माझे जवळ जवळ ४२ लेख लिहून झाले. त्यानंतर त्याचेही ई बुक प्रकाशित केले. कोणाला ऑनलाईन पुस्तक प्रकाशन सोहळा करावयाचा असेल तर उत्तम सूत्रसंचालन करण्यात नासा सरांचा एक नंबर, खूप सुंदर नियोजन करून ऑनलाईन प्रकाशन सोहळा पूर्ण करतात. आतापर्यंत आमच्या समुहात अनेकांच्या ई बुकचे ऑनलाईन प्रकाशन झाले आहे. समूहातील बरेच मंडळी नवोदित आहेत पण रोज एक लेख लिहून आपल्या लेखणीत समृद्धता आणले आहेत. आज समूहातील कित्येकजणांचे लेख महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रात प्रकाशित होत आहेत, त्यामागे नासा सरांची प्रेरणा आणि मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे आहे. 
     दुसऱ्यांना लिहिण्याचे बळ देताना, त्यांची ही लेखणी सातत्याने झरझरत असते. रोज एक तरी लेख आणि कविता लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न खूपच कौतुकास्पद आहे. त्यातूनच त्यांचे लिखाण आणि ई-बुक  यांचा अमर्याद साठा झाला आहे. आजमितीला त्यांच्या नावावर एकूण 10 पुस्तके प्रकाशित झाल्याची नोंद आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक वृत्तपत्रात त्यांचे लेख प्रकाशित झाले आहे. ऑनलाईन आणि सोशल मीडियाचा चाणाक्षपणे वापर करत असतात. त्यांचे सर्व साहित्य वाचकांना अगदी मोफतपणे वाचन वाचण्यासाठी नेहमीच उपलब्ध असतो. लेखकांच्या लेखणीला प्रेरणा मिळण्यासाठी त्यांनी हल्लीच 'प्रेरणा ई बुक' सुरू केले आहे. त्यालाही भरघोस यश मिळत आहे. सामाजिक कार्य करत असताना ते स्वतः शिक्षक आहेत म्हणून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणुन नेहमीच प्रयत्नशील असतात. विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना क्रियाशील ठेवतात. शाळेतील फलकावर निरनिराळ्या साहित्यिकांनी रचलेल्या बालकविता रोज एक कविता उपक्रमात लिहून मुलांच्या प्रतिभाशक्तीला प्रेरणा देत असतात. त्यातुनच कवी, लेखक उदयास येण्याचे स्वप्न ते पहातात. विद्यार्थ्यांना घडवत असतानाच  
समूहातील साहित्यिक सहकाऱ्यांना नेहमीच उत्सफुर्त करतात. सर्वांनी काही ना काही लिहावे म्हणून निरनिराळे उपक्रम समुहात नेहमीच राबवत असतात. त्यांच्या लेखणीला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पण त्यांचा त्यांनी कधी ही गर्व केले नाहीत. अडीअडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. 
नासा येवतीकर सरांचा आज 26 एप्रिल रोजी 45 वा वाढदिवस आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

सौ. भारती सावंत, मुंबई
9653445835

26/04/2021 nagesh shevalkar

शैक्षणिक आणि साहित्यिक नेतृत्व : नासा 
     नासा! ही दोन अक्षरे मिळून तयार झालेला शब्द उच्चारला की, जगभरातील सर्वांच्या डोळ्यासमोर येते ती एक आंतरराष्ट्रीय संस्था! अंतरिक्षाच्या क्षेत्रात भरीव योगदान देणारी एक संस्था!
         नासा हा शब्द उच्चारला की, महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात विविध प्रयोग करणारी, शिक्षकांना प्रशिक्षित करणारी सोबतच अनेकानेक सामाजिक चळवळीत सहभागी असणारी एक व्यक्ती डोळ्यासमोर येते. सोबतच या व्यक्तिचे साहित्य क्षेत्रातील बहुमोल आणि सातत्यपूर्ण लेखनही पटकन नजरेसमोर तरळते. नासा हे टोपण नाव असले तरी त्यांच्या नावाचे आणि वडिलांच्या नावाचे आद्याक्षर मिळून हे नाव तयार झाले आणि पाहता पाहता सर्वदूर पोहोचले. नागोराव हे त्यांचे नाव आणि सायन्ना हे वडिलांचे नाव या दोहोंचा संगम होऊन नासा येवतीकर हे नाव सर्वतोमुखी झाले.
        मराठवाड्यातील जिल्हा नांदेड, तालुका धर्माबाद, गाव येवती! महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांना जोडणारे हे गाव! मातृभाषा तेलगू परंतु मराठी भाषेवर नागोराव यांचे जीवापाड प्रेम! सायन्ना येवतीकर यांच्या घरात २६ एप्रिल १९७६ यादिवशी जन्मलेल्या बालकाचे नाव नागोराव! वडील सायन्ना हे पेशाने शिक्षक! साहित्यिक म्हणून कुणाचाही वारसा न लाभलेले नासा साहित्य क्षेत्राकडे आकर्षित झाले. नुसतेच आकर्षित झाले नाहीत तर या क्षेत्रात त्यांनी भरीव, नेत्रदीपक अशी कामगिरी केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक वृत्तपत्रातून त्यांचे सामाजिक लेखन सातत्याने प्रकाशित होत असते. त्यांचे लेखन हे सामाजिक प्रबोधनचा वारसा चालवते. त्यांच्या लेखनीला विषयाचे वावडे नाही. विविध विषयावर लेखन करण्यात नासांचा हातखंडा आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
            डिजिटल अर्थात ऑनलाईन साहित्य ही आता काळाची गरज झाली आहे. हळूहळू का होईना लेखक आणि वाचक या साहित्य प्रकाराकडे वळले आहेत. लाखो लोक भ्रमणध्वनी, संगणक इत्यादी माध्यमातून आपली वाचनाची तृष्णा भागवताना दिसत आहेत. वाचकांची आवड लक्षात घेता शेकडो लेखकांनीही ह्या माध्यमाला पसंती दिली आहे. काळानुरुप होणारे बदल स्वीकारणे ही काळाची गरज असते. जो असे बदल घडवून आणतो त्याच्याकडे यशस्वीता धावत येते. नासा यांनी या ऑनलाईन माध्यमांचा पुरेपूर उपयोग करुन घेतला आहे हे त्यांनी ज्या आघाडीच्या ऑनलाईन प्रकाशन संस्थांवर साहित्य प्रकाशित केले त्यावरून लक्षात येईल. आज वाचकाने कोणत्याही ऑनलाईन प्रकाशन संस्थेवरील लेखकाची यादी पाहिली की अनेक संस्थांवर 'नासा' हे नाव ठळकपणे दिसून येईल. हजारो नव्हे लाखो वाचक त्यांच्या साहित्याचे वाचक असल्याचे लक्षात येईल. ही संख्या क्षणागणिक वाढत जाते.
         नासा यांचा अजून एक गुणविशेष म्हणजे ते स्वतःपुरते पाहत नाहीत तर अनेक लेखकांना व्यासपीठ मिळावे म्हणून ते नेहमी प्रयत्नशील असतात. 'साहित्य सेवक' हा त्यांनी स्थापन केलेला व्हाट्सएप समूह! साहित्याचे सेवक या नावातच सारे काही सामावलेले आहे. नासा यांच्या कल्पक नेतृत्वातून आणि सुयोग्य नियोजनात्मक अंमलबजावणीतून समूहावर अनेक साहित्य कार्यक्रमाची मेजवानी असते. त्यामुळे या समूहात राज्यभरातील अनेक लेखक जोडले गेले आहेत. कविता, कथा, पुस्तक प्रकाशन अशा विविधांगी कार्यक्रमामुळे हा समूह लेखकप्रिय झाला आहे. अनेक लेखकांच्या ऑनलाईन पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम नासांनी या कोरोनाच्या कालावधीत घडवून आणले आहेत. कोरोनामुळे लेखक- वाचक यांच्या जीवनात आलेली मरगळ अशा कार्यक्रमांमुळे काही अंशी दूर करण्यात नासा कमालीचे यशस्वी झाले आहेत.
साहित्याच्या क्षेत्रासोबत शैक्षणिक क्षेत्रात देखील ते कमालीचे लोकप्रिय आहेत. विविध उपक्रमाद्वारे प्राथमिक शाळेतील चिमुकल्या मुलांच्या मनात जिज्ञासा निर्माण करतात. रोज एक कविता या उपक्रमाने महाराष्ट्रातील अनेक बालकवी-कवयित्रींच्या कविता शाळेतील फलकांवर लिहून काही विद्यार्थ्यांच्या मनात कवितेविषयी उत्सुकता निर्माण केले आहे. स्वतः कवी मनाचे असल्याने त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा कवीची प्रतिभा पाहण्याचा प्रयत्न केला आहे.
              आज नागोराव सायन्ना येवतीकर यांच्या वयाला पंचेचाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत. साहित्य क्षेत्राचा विचार करता हे वय तसे तरुण! त्यामुळे नासा यांना साहित्य, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात खूप काही करता येण्यासारखे आहे. त्यांची तळमळ, निष्ठा, अभ्यास, आत्मविश्वास, कल्पकता पाहता ते या क्षेत्रात प्रचंड योगदान देतील यात तिळमात्र शंका नाही. स्वतःसोबत इतरांना पुढे नेणे हा त्यांचा गुण अधोरेखित करताना त्यांनी भरघोस यश मिळवावे, त्यांना निरोगी आयुष्य लाभावे ही ईशचरणी प्रार्थना! ना. सा. येवतीकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
                                                   
नागेश सू. शेवाळकर, पुणे
(९४२३१३९०७१)

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...