Saturday 24 June 2017

शाळा उरल्या फक्त नावनोंदणीसाठी

शाळा उरल्या फक्त नावनोंदणीसाठी

नुकतेच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले. जे विद्यार्थी या परीक्षेत लक्षणीय यश मिळविले आहे त्यांचे सर्वप्रथम अभिनंदन करणे गरजेचे आहे कारण त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना आज मिळाले असे म्हणायला काही हरकत नाही. आई वडिलांचे जे स्वप्न होते ते सुध्दा त्यांनी सत्यात उतरविले त्यामुळे ते ही कृतार्थ झाले असतील यात शंकाच नाही. प्राथमिक वर्गापासून पालक आणि विद्यार्थी यांनी घेतलेली मेहनत आणि कष्ट याचे आजच्या निकालानंतर चीज झाले आहे.  मात्र एक बाब दरवर्षी मनाला खटकत असते, ते म्हणजे मेहनत एकाची आणि श्रेय मात्र दुसरेच घेत असतात असे का होते ? निकाल लागल्या दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्र बातम्या ऐवजी कोचिंग क्लासेसच्या जाहिरातीने भरून जातात. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना क्लासेसचे संचालक अभिनंदन करतानाचे फोटो घेतात आणि त्याद्वारे पुढील मुलांना आकृष्ट करण्यासाठी जाहिरात करतात. वास्तविक पाहता कोचिंग क्लास घेणारे विद्यार्थ्याकडून मोठ्या प्रमाणात फीस घेतात तर मग पालकानी त्यांना फुकटामध्ये जाहिरात करण्याची परवानगी तरी का द्यावे ? याचा कोणी पालक विचार करीत नाही. खरोखर क्लासेसवाले जर फुकटामध्ये शिकवण दिली असेल तर त्यांना आपला फोटो देऊन जाहिरात करू द्यायला काही हरकत नाही. मात्र ज्यानी हजारो रुपये घेऊन आपल्या मुलाला शिकविले असेल तर त्यांना फुकटात असे जाहिरात करण्याची पालकानी परवानगी देऊ नये कारण याचा त्यांना परत फायदा होणार असतो. म्हणून त्याचा फायदा आपल्याला देखील होणे गरजेचे आहे असे वाटत नाही काय ?
हे झाले कोचिंगच्या बाबतीत पण शाळा, विद्यालय किंवा महाविद्यालयाकडून कोठे जाहिरात दिसते का ? कोचिंग क्लासमधून झळकलेले विद्यार्थी हे कुठल्या ना कुठल्या शाळेचे किंवा महाविद्यालयाचे विद्यार्थी असतीलच ना ! पण ते याबाबतीत कसल्याच प्रकारची जाहिरात करताना दिसून येत नाहीत. कारण मुलांच्या या यशात त्यांचा काहीच वाटा नसेल काय ? शाळा, विद्यालय आज फक्त प्रमाणपत्रासाठी शिल्लक राहिले आहेत की काय अशी ही शंका कधी कधी राहून राहून मनात येत असते. कोचिंग क्लासवाले सर्व विषय आणि सर्व काही मुलांना शिकवित असतील तर शाळा आणि विद्यालयाचे काम उरले ते काय ? कोचिंग क्लास संचालकाना उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देता येत नाहीत तर ह्या शाळा आणि विद्यालय बंदच पडले असते. कोचिंग क्लासमुळे शाळेतील शिक्षकांना खुप आराम मिळत आहे. कारण शेवटी निकाल शाळेचा वाढत आहे. गुरुजींनी कसल्याही प्रकारची मेहनत न घेता त्यांच्या विषयाचा निकाल 80 टक्केच्या वर लागत आहे. यामुळे शाळेतील शिक्षकांना आत्ता वर्गावर फक्त शिकविल्यासारखे करायचे आहे. पालक सुद्धा तक्रार करणार नाहीत कारण त्यांच्या मुलाना सर्व काही येते तर मग शिक्षक शिकवित नाही असे ते म्हणूच शकत नाही. तेरी भी चुप मेरी भी चुप असा काहीसा प्रकार घडत आहे. आत्ता शाळा ह्या फक्त नावनोंदणीसाठी उरल्या आहेत, असे वाटते. मुलांचे नाव कोणत्या तरी शाळेत टाकायचे आणि शहरात क्लास करीत बसायचे असा प्रकार ही आज बघायला मिळत आहे. या सर्व प्रकारात गरीब पालकांच्या मुलांचे खुप हाल होत आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे ती मुले खाजगी कोचिंग क्लास लावू शकत नाहीत आणि वर्गात शिक्षक तेवढे मन लावून शिकवित नाहीत. काही तरी थातुर मातुर बोलून वेळ मारुन नेतात. याचा सर्वात जास्त त्रास अर्थात या गरीब मुलांना होतो. याचा एक अर्थ असा ही निघतो की आजचे शिक्षण गरीबासाठी आहे असे निश्चितपणे म्हणता येत नाही. त्यामुळे गरीबांची मुले जे की मागेच राहत आहेत. यावर काय उपाय करता येईल याची चर्चा होणे आवश्यक आहे. इकडे शाळेत एका वर्गातल्या एका तुकडीत किती विद्यार्थी असावेत हे प्रशासन पाहत असते. तसे एका कोचिंग क्लासच्या वर्गात किती विद्यार्थी असावेत याचा काही नेम नाही. त्यावर कोणाचेच बंधन नाही. हे कुठे तरी बदल व्ह्ययला हवे. राज्यात बेरोजगार मुले भरपूर आहेत तेंव्हा सर्वाना यात संधी मिळायला हवी. एकाच कोचिंगमध्ये मेंढरं भरल्यासारखे विद्यार्थी बसविले जातात असे चित्र बघायला मिळते. पालकाकडून कोचिंगच्या नावाखाली भरपूर पैसा उकळला जातो. दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूट केली जाते. शहरात जिकडे पहावे तिकडे ह्या कोचिंग क्लास जाहिरातीचे फ्लेक्स बैनर बघायला मिळतात. यावरून एकच निष्कर्ष निघतो की आजच्या शाळा ह्या फक्त नावनोंदणी साठी उरल्या आहेत. भविष्यात असेच चालू राहिले तर शाळा आणि विद्यालयाला खुप धोका असू शकतो. त्यामुळे वेळीच सावध होणे अत्यावश्यक आहे. शाळा आणि महाविद्यालयानी देखील आपल्या शाळेतील यशस्वी मुलांची जाहिरात करणे आवश्यक आहे असे वाटते.

*पावसाळ्यात शिक्षकांची परीक्षा*

*पावसाळ्यात शिक्षकांची परीक्षा*

वादळ वारे आणि क्षणात जोराचा पाऊस यामुळे शाळेवरील टीन उडाले, 15 मिनीटा पूर्वी शाळा सुटल्याने शिक्षकांसह विद्यार्थी बालंबाल बचावले अश्या आशयाची एक बातमी वाचण्यात आली आणि काही काळ तरी अंगावर शहारे उभे राहिले. शाळेवर असलेले टीन वाऱ्यांने उडून गेले आणि पूर्ण शाळा उजाड झाली. होत्याचे नव्हते झाले. खरोखरच शाळा चालू असती आणि असा प्रकार जर घडला तर विद्यार्थी आणि शिक्षक अडचणीत येऊ शकले असते. म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसात मुख्याध्यापक आणि शिक्षकांची एक प्रकारे परीक्षाच असते असे म्हणणे चुकीचे वाटत नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात आपल्या घराची जशी काळजी घेतो आणि घराची डागडुजी करतो तशी शाळेची देखील आवश्यक नाही काय ? पालक आपले पाल्य सहा तासासाठी शिक्षकांच्या हवाली करतात. तेंव्हा त्यांच्या सुरक्षेची काळजी अर्थात शिक्षकांवर येऊन पडते यात शंका नाही. तसे तर शाळेच्या वेळात मुलांना काही जरी झाले तरी त्यास पूर्णतः शिक्षकच जबाबदार असतो असे सरळ सरळ बोलले जाते. शाळेतून घरी जाताना रस्त्यात ठोकर लागून जरी पडला तरी त्यास शिक्षकांस जबाबदार धरले जाते. त्यामुळे शिक्षकास प्रत्येक वेळी खुप जागरूकपणे वागावे लागते.
पावसाळ्याच्या दिवसात खास करून जेथे पक्की शालेय ईमारत नसेल तेथील शिक्षकांनी काही अपघात होऊ नये याची काळजी घेणे सर्वासाठी चांगले असते. ईमारत शाळा भरण्यायोग्य नसेल तर तात्काळ मुख्य कार्यालयास तसे कळविणे आवश्यक आहे. आपण वरिष्ठ कार्यलयास न कळविता त्या धोकादायक वर्ग खोलीत बसणे म्हणजे शेखचिल्लीच्या कामासारखी आपली गत होय. मुलांच्या जीवाशी खेळ न करता वरिष्ठानी देखील या संबंधित शाळेतील धोकादायक वर्गखोल्या पाडण्याचे आदेश देऊन त्या ठिकाणी नविन खोली बांधकाम केल्यास सोईचे होते. ग्रामीण भागातील बहुतांश शाळा 30-40 वर्षापूर्वीचे बांधकाम केलेले आहेत. त्यांचे आयुष्य देखील संपले आहेत असे ईमारत पाडणे आवश्यक आहे.
शाळेच्या जवळ नाला किंवा नदी असेल तर पुराचा अंदाज घेऊन शाळा सुरु ठेवणे संयुक्तिक वाटते. जर पावसाचा जोर जास्त असेल आणि नदी किंवा नाल्यास पूर येण्याची शक्यता असल्यास कोणाची पर्वा न करता मुलांना शाळेतून लवकर सोडण्याची हिम्मत शिक्षकांनी ठेवणे आवश्यक आहे. त्यास गावकरी विशेष करून साथ द्यावे. येथे सुद्धा शिक्षकांना दोषी ठरविले जाते आणि त्यांचा हकनाक बळी दिला जातो. शाळेच्या वर्गखोल्या धोकादायक आहेत त्याठिकाणी मुलांना बसविणे धोक्याची असल्याची माहिती मुख्याध्यापक मंडळीकडून वरिष्ठ कार्यालयास कळविले जाते मात्र त्या कार्यलयाकडून कसल्याच प्रकारची हालचाल होत नाही ही वस्तूस्थिती आहे. शिक्षण विभाग किती मोठा आहे आणि त्या विभागात अभियंते कार्यरत नाहीत. त्यांना इतर विभागातील अभियंत्या वर अवलंबून रहावे लागते. जे आहेत ते फार कमी आहेत. त्यामुळे आज अनेक शाळेतील मुले धोकादायक वर्गखोलीत आपला जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. अश्या ठिकाणी काही अपघात झाल्यास फक्त एकट्या मुख्याध्यापक किंवा शिक्षकांस जबाबदार न धरता सर्वाना दोषी धरावे. त्या शिवाय ही यंत्रणा या बाबी गंभीर्याने घेत नाहीत. दूसरी बाब शाळा लवकर सोडणे याविषयी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार मुख्याध्यापकाना नाही. वेळ आणि प्रसंग पाहून सुट्टी दिल्यास त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली जाते यामुळे कधी कधी शिक्षक निर्णय घेऊ शकत नाही. अश्या बाबीची स्पष्टता अधिकारी लोकांनी शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना दिली तर ते आत्मविश्वासाने काम करू शकतात. पावसाळ्याच्या दिवसात शाळेत काही विपरीत प्रसंग घडू नये आणि काही झाल्यास त्यावरील सर्व उपाययोजनाची तयारी सर्व शाळा प्रमुखानी करून घेणे आवश्यक आहे असे वाटते. जसे की जवळपास असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा फोन क्रमांक, एखाद्या खाजगी वाहन चालकांचा फोन क्रमांक, शाळेच्या शेजारील व्यक्तीशी चांगली ओळख आणि त्याचा ही फोन क्रमांक, पावसाळ्याच्या दिवसात विंचु, कीडे, साप खोलीत निघण्याची शक्यता ओळखून परिसरातील सर्पमित्र असलेल्या व्यक्तीचा क्रमांक आपल्या दप्तरी असणे केव्हाही योग्य राहते. शाळेत आलेली सर्व मुले आपली लेकरे आहेत ही भावना मनात ठेवून शिक्षकांना कार्य करावे लागते.

- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद

Thursday 22 June 2017

कविता वीज

⚡⚡ *वीजमरण* ⚡⚡
            - ना. सा. येवतीकर

मृग नक्षत्रा ची सुरुवात
सर्वत्र काळेकुट्ट ढग
काही क्षणात पाऊस पडणार
मोर पिसारा फुलवून नाचणार
गावातील पोरं पाण्यात बागडणार
आई सोबत शेतात गेलेली
लहान पिल्लू काखेत भिजणार
या पावसात हे सर्व घडणार

असे वाटले असताना क्षणात
नको असलेले घडले
आकाशात वीज चमकले
ढगांचा झाला गडगडाट
कुठे तरी वीज पडली
लोकं बोलू लागली
क्षणात एक बातमी आली
राम्याच्या आईवर वीज पडली

काखेतले लेकरु बिलगून
तशीच चिकटुन होती
रडत नव्हती की हसत नव्हती
क्षणात या पावसाने साऱ्या
गावचा आनंद हिरावून नेला
तोच नेहमीचा पाऊस आत्ता
नकोनकोसा वाटू लागला

⚡⚡⚡⚡⚡⚡⚡

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...