Friday 26 February 2021

मराठी भाषा गौरव दिन


।।  मराठी भाषा दिवस ।।

मी वाचतो मराठी
मी जगतो मराठी
माझ्याच डोळ्यादेखत
संपताना पाहतो मराठी

मी हसतो मराठी
मी रडतो मराठी
माझ्या डोळ्यादेखत
अश्रू गाळतो मराठी

मी चालतो मराठी
मी पळतो मराठी
माझ्या डोळ्यादेखत
असहाय होतो मराठी

मी बोलतो मराठी
मी लिहितो मराठी
माझ्या डोळ्यादेखत
अडखळतो मराठी

माझ्या नसानसात मराठी
माझ्या मनामनात मराठी
माझ्या डोळ्यादेखत
तरीही दुबळा ठरतो मराठी

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

।। मातृभाषा ।।

मला आवडते माझ्या
आईची बोली भाषा
कुठेच कठीण वाटत नाही
साधी सोपी असते मातृभाषा

घरात जे बोलली जाते
तीच समाजात बोलली जाते
नेहमी शब्द कानावर येती
बोलतांना सहज शब्द आठवते

मनातल्या कल्पना नि भाव
माझ्या भाषेत मांडता येते
पाठांतराची काय गरज
बोलले ते सर्व समजून जाते

दुसरी भाषा शिकायला
लागतात विशेष कष्ट
स्वभाषेतूनच शिकावं अन्यथा
 स्वतःची भाषा होते नष्ट

- नासा येवतीकर, धर्माबाद
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून द्यावे

शाळेतील मुलांना दोन विषयाची खुप भीती वाटते. एक म्हणजे गणित आणि दुसरे म्हणजे इंग्रजी. पालकाना देखील या विषयाच्या बाबतीत काळजी लागलेली असते. कसे ही करून या विषयात आपली मुले प्रावीण्य व्हावेत म्हणून जीवाचा आटापिटा करताना पालक दिसून येतात. मुळात या विषयाची एकप्रकारे धसकीच घेतलेली असते. वास्तविक इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. जगातल्या लोकांचा एकमेकाशी संपर्क व्हावा आणि त्यांचा संवाद व्हावा या उद्देश्याने याचा स्विकार केला गेला. तसे इंग्रजीने प्रत्येक देशात शिरकाव केलेला आहे. असे एक ही देश शोधून ही सापडणार नाही जेथे इंग्रजी भाषा बोलली जात नाही. भारतात सुध्दा इंग्रजी ही भाषा बोलली जाते. त्यास तृतीय भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मातृभाषेला प्रथम तर हिंदी भाषेला द्वितीय भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. भारत देशात कुठे गेल्यावर संवाद करण्याची समस्या येऊ नये यासाठी मातृभाषेनंतर हिंदी आणि इंग्रजी ही भाषा वापरली जाते. समाजात वावरत असताना बोलण्याच्या बाबतीत समस्या येऊ नये यासाठी भाषेचा वापर केला जातो. सांकेतिक खुणाच्या आधारावर संवादाची प्रक्रिया पूर्ण होणे कठिण आहे. याबाबीचा जर विचार केला तर आपण इंग्रजीला अवास्तव महत्त्व देत नाही काय ? किंवा नको तितकी काळजी करून मनात भीती निर्माण करून घेत नाही काय ? अशी शंका मनात निर्माण होते. आज राज्यातील प्राथमिक शिक्षणाकडे एक वार नजर फिरविली तर लक्षात येते की, आपली मातृभाषा मराठी आणि जेथे मराठीतून अध्यापन केले जाते अश्या शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना भविष्यात इंग्रजी चांगली यावी म्हणून इंग्रजी शाळेत प्रवेश करीत आहेत. 10-15 वर्षापूर्वी फक्त शहरापुरते मर्यादित असलेल्या इंग्रजी शाळेचे पेव ग्रामीण भागात देखील पोहोचले आहे. खेड्यातील शेती काम करून आपले घर चालविणारे शेतकरी मंडळी आपल्या पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश देत आहेत. आपल्या मुलांना कोणत्या शाळेत शिकवावे असा प्रश्न आपल्या समोर पडला असेल आणि त्याच वेळी कुणी तरी सांगतो खुप हुशार आहे मुलगा टाक त्यास इंग्रजी शाळेत. दुसऱ्यांचे ऐकून आणि पाहून ही मंडळी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश देतात. दोन-तीन वर्षानंतर डोळे उघडतात, त्या शाळेची फी परवडत नाही किंवा मुलांना ते शिक्षण झेपत नाही आणि त्या मुलांना इंग्रजी शाळेतून काढून मराठी माध्यमात प्रवेश देतात. मात्र या परिस्थितीमध्ये मुलांची काय स्थिती होते याचा कोणी ही विचार करीत नाही. 
पण एकंदरीत इंग्रजी आणि मातृभाषा याचा विचार केल्यास प्राथमिक शाळेतील मुलांसाठी कोणत्या भाषेतुन शिक्षण घ्यावे ? हा मोठा प्रश्न आहे. अनेक विचारवंत आणि तज्ञ मंडळी या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात की, मुलांना आपल्या मातृभाषेत प्राथमिक शिक्षण द्यावे. कारण समजणाऱ्या भाषेत घेतलेले ज्ञान लवकर लक्षात येते आणि त्याचे आकलन ही होते. याउलट दुसऱ्या भाषेत शिक्षण घेतांना अनेक शब्द ओळखीचे नसतात त्यामुळे भाषा समजणे अवघड जाते तर संवाद करताना देखील अनंत अडचणी येतात.
वास्तविक पाहता विषयाचे ज्ञान एकदा कळाले तर त्याला कोणत्याही भाषेत व्यक्त करता येते. म्हणजेच बुध्दीचा विकास हे खुप महत्वाचे आहे आणि ते मातृभाषेतून शक्य आहे. इंग्रजी भाषेतुन शिक्षण म्हणजे सर्कसमधील रिंगमास्टर ज्याप्रकारे प्राण्याला धडे शिकवितो अगदी त्याच प्रकारे ही मुले वागतात. स्वतःचे डोके किंवा कल्पकता याचा वापर करीत नाहीत. ही मुले हुशार असतीलही परंतु जी नवनिर्मिती करायला हवी ती करत नाहीत. म्हणजे त्यांचे ज्ञान फक्त परिक्षेपुरते मर्यादित असते. कोणत्या भागाला किती गुण आहेत ? यावर त्यांचा अभ्यास चालत असतो तेंव्हा भविष्यात ही मुले यशस्वी होतील असे वाटते काय ? संस्कार नावाची वस्तू शालेय शिक्षणातून मिळावी अशी अपेक्षा ठेवणे रास्त आहे. पूर्वीच्या शिक्षणातून तसे संस्कार जाणीवपूर्वक होत असत मग आज समाजातील नैतिकता रसातळाला का गेली आहे ? आजची संस्कृती कुठे चालली आहे ? याचे उत्तर कोठे मिळेल. अर्थातच आजच्या शिक्षण पध्दतीकडे पाहिल्यावर तेथेच याचे उत्तर मिळते. पूर्वीसारखे शिक्षण आणि पूर्वीसारख्या पध्दती आज आस्तित्वात नाहीत. शिक्षणाचे झालेले बाजारीकरण हे ही एक कारण असू शकते. मातृभाषेतुन शिक्षण घेणारे विद्यार्थी थोडे तरी त्यांच्यावर संस्कार केलेले दिसून येतील मात्र इंग्रजी भाषेत शिकणारी मुले त्यांना संस्कृतीची ओळख होत नाही. त्यांच्यावर वेगळ्याप्रकारचे संस्कार टाकले जातात हे ही एक महत्वाची बाब आहे. परंतु आजपर्यंत या बाबीकडे कुणी गंभीर्याने पाहिले नाही. जे आपल्या मराठी शाळेत चालते ते त्या शाळेत चालत नाही. अश्या फार कमी शाळा आहेत जेथे आपल्या संस्कृती नुसार शिक्षण दिल्या जाते. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणची भाषा आहे हे मान्य परंतु त्या अगोदर आपल्या समाजात आपल्या लोकांशी जो व्यवहार करायचे आहे ते आपल्याच भाषेत करावे लागेल हे मात्र खरे आहे. इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मुलाने घरात काही प्रश्न विचारले तर पालकांना त्याचे उत्तर देता येत नाही. उद्या तुझ्या गुरुजींना विचार असे पालकांचे उत्तर असते. त्यासाठी इंग्रजी भाषेचे जे अवास्तव महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि त्याची भीती देखील त्याविषयी पालकानी जागरूक होऊन विचार करणे आवश्यक आहे आणि आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्याविषयी अग्रक्रमाने विचार करणे देखील योग्य आहे, असे वाटते. आज जागतिक मराठी भाषा गौरव दिवस त्यानिमित्ताने प्रत्येक पालकांपर्यंत हा संदेश पोहोचवू या की, आपल्या मुलांना निदान प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून द्या. 

- नागोराव सा. येवतीकर, 
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

( लेखक नांदेड जिल्हा परिषदेत विषय शिक्षक आहेत )
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*।। आम्ही मराठी ।।*

आम्ही ऐकतो मराठी
आम्ही बोलतो मराठी
आम्ही वाचतो मराठी
आम्ही लिहितो मराठी

मराठी आमची मातृभाषा
मराठी आमची बोलीभाषा
मराठी आमची ज्ञानभाषा
मराठी आमची राजभाषा

मराठी आहे आमची शान
मराठीचा जगात मान
मराठीचा आम्हां अभिमान
मराठी हेच आमचे स्वाभिमान

तुकारामांची गाथा मराठी
एकनाथांची भारुडे मराठी
बहिणाबाईची कवने मराठी
शाहिरांचा पोवाडा मराठी

मनामनात दिसे मराठी
घराघरांत बोले मराठी
क्षणाक्षणात भेटे मराठी
प्रत्येकांच्या हृदयात मराठी

आम्ही मराठी तुम्ही मराठी
बोलणारे आम्ही सारे मराठी

- नासा येवतीकर, ९४२३६२५७६९
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मराठी राजभाषा दिनानिमित्त प्रासंगिक लेख

मराठीचा विकास आपल्याच हाती

मराठी ही महाराष्‍ट्राची राजभाषा आहे. मात्र आपल्‍याच राज्‍यात आपण आपल्‍या मराठी भाषेला पदोपदी ठार करीत आहेत. बहुतांश वेळा आपण गांभीर्याने विचार न करता भाषेचा वापर करीत असतो, त्‍यामुळे भाषेची पुरती वाट लागून जाते. ज्‍यांना भाषेच्या प्रत्‍येक शब्‍दांत असलेल्या  सौंदर्य आणि सामर्थ्‍यांची जाणीव नसते, त्‍यांना वाक्‍यरचनेशी किंवा शब्दाशी काही देणे-घेणे नसते. अशा लोकांच्‍या भाषेमूळे मराठी भाषा रसातळाला जात आहे, म्‍हणणे चूकीचे ठरणार नाही. आज प्रत्‍येकजण आपल्‍या पाल्‍यांना मराठीच्‍या शाळेत शिकविण्‍या ऐवजी इंग्रजी मिशनरीच्‍या शाळेत शिकविण्‍याकडे जास्‍त कल दिसून येत आहे. संपूर्ण जगात इंग्रजी भाषा बोलणा-यांची संख्‍या  सर्वात जास्‍त आहे.  इंग्रजी लिहिता-बोलता आली तर आपले मूल जगाच्या  स्‍पधेत टिकू शकतो. माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षणातील इंग्रजी सोपी वाटावी म्‍हणून त्‍याला K.G. पासून इंग्रजीचे धडे शिकविण्‍यास प्रारंभ केल्‍या जाते. सध्‍या पालकांचा असा एक भ्रम झाला आहे. की, प्राथमिक  शिक्षण  इंग्रजी माध्‍यमातून झाले की त्‍याला पुढील शिक्षण काही कठीण वाटत नाही.परंतु वास्‍तव काही अलट आहे.मातृ भाषेतून शिक्षण घेतल्‍यामूळे मुलांची संकल्‍पना अधिक स्‍पष्‍ट होतात. त्‍यास घोकंपटटी किंवा वारंवार अभ्‍यास करावे लागत नाही. विषयाची  संकल्‍पना मुलांना कळाली तर ते अगदी बिनधास्‍त पणे व्‍यक्‍त करू शकतात आणि त्‍यासाठी मातृभाषेतील  टापटीपपणा आणि होमवर्क पूर्ण करण्‍याची पध्‍दत एवढे दोनच बाबी कोटेकोरपणे पाळले जातात. शिकविणारी तज्ञमंडळी उपलब्‍ध नसल्‍यामूळे थातूर मातूर शिकविले जाते याकडे मात्र साफ दुर्लक्ष केल्‍या जाते. पालकांकडून भरपूर प्रमाणात फिस च्‍या स्‍वरूपात पैसा उकळणे आणि त्‍या बदल्‍यात मात्र त्‍या मुलांना काहीच मिळत नाही. हे वास्‍तव चित्र आहे. याउलट एखादी इंग्रजी शाळा असू  शकते जे की पालक व विद्यार्थ्‍यांच्‍या सर्व आशा  पूर्ण करू शकेल. मात्र  याबाबीमूळे मुलांवर अपण अन्‍याय करीत नाही का ? याबाबीचा विचार कोणताही पालक करतांना आढळून येत नाही. या बाबतीत समाजातील काही शिक्षणतंज्ञ किंवा जाणकार लोकांनी पालकांचे योग्य मार्गदर्शन करून त्‍यांची होणारी आर्थिक व मानसिक पिळवणूक थांबविणे गरजेचे आहे. इंग्रजी माध्‍यमात शिकणा-या मराठी मुलाची भाषा जर ऐकायला मिळाली तर त्‍याची फारच कीव येते कारण त्‍यांना मराठी  शब्‍दांचे अर्थ नीट  कळत नाहीच शिवाय अक्षरांचे लेखन सुध्‍दा नियमानुसार करीत नाहीत. 
पालक वर्ग नेहमी शेजा-यांशीच तुलना करत असतात. संत तुकाराम महाराज यांनी शेजा-यावर प्रेम करा असा संदेश दिला आहे. मात्र ही मंडळी शेजा-यांशी नेहमी तुलनात्‍मक दृष्‍टीने पाहतात. शेजा-याचा मुलगा इंग्रजी माध्‍यमात शिकत असेल आणि रेन रेन कम अगेन म्‍हणत असेल तर आपले मूल सुध्‍दा असे गीत म्‍हणावे असे त्‍यांना वाटते परंतू त्‍या इंग्रजीच्‍या मुलांना रेन  रेन कम अगेन चा अर्थ कळत नाही तो फक्‍त यांत्रिक पध्‍दतीने गात असतो परंतू आपला मराठी शाळेतील मुलगा ‘ येरे येरे पावसा ’म्‍हणताना त्‍याच्‍या चेह-यावरचे भाव स्‍पष्‍ट दिसतात. कारण त्‍याचा अर्थ त्‍याला कळालेला असतो. लहान वयात जी भावना, संकल्‍पना स्‍पष्‍ट होते ती आयूष्‍यभर सोबत राहते तसेच संकल्‍पना समजून घेण्‍यासाठी मातृभाषा कधीच ओझे वाटत नाही इंग्रजी सारखी. इकडे मराठी माध्‍यमाच्‍या शाळांतील मुलांची स्थिती खुपच चांगली आहे, असेही छाती ठोकून सांगता येत नाही. कारण येथील मुलांची स्थिती सुध्‍दा मराठीच्‍या बाबतीत फारच वाईट आहे. मराठी भाषेला नीट समजून न घेता दरवर्षी एका नवीन वर्गाची पायरी चढत शाळेच्‍या बाहेर पडलेला जेव्‍हा समाजात व्‍यवहार करण्‍यास प्रारंभ करतो निरक्षर व्‍यक्‍तीपेक्षा साक्षर व्‍यक्‍तीच मराठी भाषेला  पदोपदी मारत असतांना आढळून येतो. 
मात्र (मातृ) देवो भव, कार अपघातांत त्‍यांचा  अंत्‍य (अंत) झाला, पाणी  हे द्रव्‍य (द्रव) आहे. आज शिक्षक दीन (दिन) आहे, सचिनचा कर्म (क्रम) सौरभ नंतर येतो इत्‍यादी  वाक्‍याचे  बारीक निरीक्षण केल्‍यास कंसातील शब्‍दामुळे वाक्‍याचा अर्थ स्‍पष्‍ट होतो मात्र भाषेचे ज्ञान नसलेले  किंवा  अर्धवट ज्ञानी मंडळी एक प्रकारे भाषेचे चिरफाड करून वाक्‍याचे अनर्थ करून टाकतात. हे म्‍हणजे कसे आहे, गाडी  नीट चालवता येत नसलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या हातात गाडी देऊन अपघात करून घेण्‍यासारखे नाही का ? ज्‍याप्रकारे गाडी चालवण्‍यासाठी परवानाची गरज भासते अगदी त्‍याच प्रकारे भाषेची मांडणी करणा-या व्‍यक्‍तीला विशेष ज्ञान असल्‍याचा परवाना आवश्‍यक नाही काय ? 
लहानपणा पासून मुलांच्‍या बोलण्‍याकडे विशेष लक्ष देवून त्‍यांच्‍यात वारंवार सुधारणा घडवून आणण्‍याची जबाबदारी प्रत्‍येक पालकांनी घेणे आवश्‍यक आहे. प्राथमिक शाळेतून शिक्षण घेतांना मुलांना मराठीच्‍या जास्‍तीत जास्‍त शब्‍दाची तोंड ओळख कशी होईल ? याचे नियोजन प्रत्‍येक भाषा विषय शिकविणा-या शिक्षकांनी केले पाहिजे. शब्‍द पाहिले, ऐकले आणि लिहिले तरच त्‍याच्या कायम स्‍मरणात राहील. मराठी शब्‍दांच्‍या बाबतीत अगदी प्राथमिक शिक्षणाच्‍या पाया पासून श्रवण भाषण,वाचन आणि लेखन या (LSRW) चार टप्‍यानुसार चालते आणि शिक्षकांचे सुक्षम निरीक्षण असेल तर मुलांमध्‍ये भाषेचे फार कमी चुका होतील. परंतु विशेष करून येथेच दुर्लक्ष केल्‍या जाते आणि भविष्‍यात याच मुलांच्‍या हातून भाषेची चिरफाड होतांना दिसून येते. मराठी भाषा फार सोपी वाटत असेल तरी  या विषयात अनुत्‍तीर्ण होणा-यांची संख्‍या  फार मोठी आहे. कारण स्‍वत:च्या भाषेत या मुलांना वर्णन करता येत नाही. त्‍यांना वेळेवर पर्यायी अर्थ पूर्ण शब्द आठवत नाहीत किंवा खरा शब्‍द  कसा आहे? हे ही लक्षात येत नाही. भाषेनुसार सन 1960 साली मराठी राज्‍याची निर्मिती झाली. परंतू गेल्‍या पन्‍नास वर्षात मराठीचा व्‍हावा तेवढा विकास झाला नाही. कारण या समस्‍येकडे कुणीच गांर्भीर्याने लक्ष देत नाहीत. यासाठी समाजातील प्रत्‍येक घटक तेवढाच जबाबदार आहे. त्‍यामुळे मराठीची प्रगती व्‍हावी, त्‍याचा विकास व्‍हावा,त्‍याची चीरफाड होवू नये असे वाटत असले तर प्रत्‍येकाने आज जागे होणे अत्‍यंत गरजेचे आहे. शाळेतून विशेष करून मराठी भाषा शिकविणा-या शिक्षकांनी याविषयी गांभीर्याने दक्षता घेवून मुलांच्‍या भाषिक कौशल्‍याचा विकास करावा. इयत्‍ता पहिली व दुसरीमध्‍ये अनुलेखन ,तिसरी व चौथ्‍या वर्गात शुध्‍दलेखन आणि पाचवी ते आठव्‍या वर्गापर्यंत प्रत्‍येक  विद्यार्थ्‍यांना शुध्‍द लेखन योग्‍य प्रकारे करता यावे असा किमान उद्देश डोळ्या समोर ठेवून कार्य केल्‍यास मुलांत वारंवार होणा-या चूका नक्‍कीच टाळता येतात. बहुतांश वेळा मुलांची श्रवण प्रक्रिया योग्‍य प्रकारे विकसीत न झाल्‍यामुळे समान आवाजाच्‍या शब्‍दात  मुले घोळ करतात जसे खाक-काक, मखर–मकर , खेळ-केळ ,भार–बार, घार–गार , झरा–जरा ,झाग–जाग,धार–दार ,भाई–बाई , साफ–साप,फळ-पळ, संग-संत,बंध-बंद, फर–पर ,खल-कल, भाग–बाग, साथ–सात , पथ–पत,कोश-कोष , इत्‍यादी शब्‍द ज्‍यांची ध्वनी जवळपास सारखी वाटते आणि शब्‍दाचा अर्थ बदलतो. यानंरत मराठीत असेही काही शब्‍द आहेत ज्‍यांच्‍या -हस्‍व व दीर्घ इकार व उकार मुळे वाक्‍याचा अर्थच बदलून जातो. जसे की, आदी–आदि, आयत- आयात, आर्त–आर्द, स्त्री-इस्‍त्री, कोश–कोष, दिन–दीन, नियत-नीयत, केशर–केसर, पास–पाश, पिक–पीक, बहु–बहू, लक्ष-लक्ष्‍य, विष–वीस ,चालक-चालाक, इ.  अशा बारी‍क सारीक बाबींकडे विषय शिक्षकांनी लक्ष दिल्‍यास  मुलांच्‍या मराठी लेखनात  नक्‍कीच सुधारणा होवू शकेल. 
मराठी भाषेचा विकास व्‍हावा व प्रगती व्‍हावी असे मनातून वाटत असले तर प्रत्‍येकांनी विशेष प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. शालेय वयात इंग्रजी शब्‍दार्थ पाठांतर करीत असल्‍याचे आपणा सर्वांना आजही आठवते. मात्र मराठी शब्‍दार्थ पाठांतर आपण  करतो कां? अर्थातच याचे उत्‍तर नाही असेच येते. इंग्रजी शब्‍दाची जास्‍तीत जास्‍त ओळख व्‍हावी म्‍हणून ऑक्‍सफर्डची डिक्‍शनरी प्रत्‍येकजण एकदा तरी  हाताळलेला असतो. मात्र मराठीची शब्‍दासंपत्‍ती वाढवी म्हणून निदान मराठी विश्‍वकोषाचे खंड हे  दूरचीच  गोष्‍ट आहे निदान वसंत आबाजी डहाके यांचा शालेय मराठी शब्‍दकोशाचा शंभरामागे एखादा मराठी  व्‍यक्‍ती हाताळतो. मराठी भाषेसाठी ही फार मोठी शोकांतिका आहे. त्‍यास्‍तव प्रत्‍येकाने आपली शब्‍दसंपत्‍ती कशी  वाढविता येईल  याचा  जरूर विचार करावा.  यासाठी मुलांना लहानपणापासून विविध प्रकारचे  मराठी शब्‍दकोडे सोडविण्‍याचा  छंद  कसा  लागेल  याकडे  विशेष  लक्ष द्यावे. वारंवार कोडे  सोडविल्‍यामुळे खेळत खेळत  मराठी भाषेच्‍या  अनेक शब्‍दांची  व त्‍याच्‍या  अर्थाची  ओळख होते.  मराठी भाषेच्‍या विकासासाठी  व भाषेची चिरफाड टाळण्‍यासाठी प्रत्‍येकांनी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. प्रसिद्ध कवी विष्णु वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस दिनांक 27 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण राज्यात मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केल्या जाते. त्या निमित्ताने प्रत्येकाने मराठीत बोलेन, मराठीत लिहिन आणि मराठीतच चालेन असा एक संकल्प करू या मराठीच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी तेंव्हाच कुठे मराठी जगेल.

नागोराव सा. येवतीकर 
मु. येवती  ता. धर्माबाद 
9423625769

( लेखक नांदेड जिल्हा परिषदेत विषय शिक्षक आहेत. )
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

माझी माय मराठी

माझी माय मराठी
जिने मला शिकविले
चालायला बोलायला
वाचायला नि लिहायला

माझी माय मराठी
जिने मला शिकविले
चांगले वागायला
नि चांगले पाहायला

माझी माय मराठी
जिने मला शिकविले
सर्वस्व अर्पण करायला
इतरांना मदत करायला

माझी माय मराठी
जिने मला शिकविले
मोठ्यांना सन्मान द्यायला
देशाच्या विकासात
हातभार लावायला

माझी माय मराठी
जिने मला शिकविले
नैतिकतेने जगायला
नि दुसऱ्याला जगवायला

माझी माय मराठी
जिने मला शिकविले
असंख्य अशा गोष्टी
जीवन समृद्ध करायला

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...