Thursday 4 May 2017

दोन लेख

*आर्थिक व्यवहार सुरळीत होतील ?*

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 08 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे आणि हजार रूपयाच्या नोटा वर बंदी आणली आणि एका रात्रीत देशामध्ये अनेक लोकांच्या संकटाला सुरुवात झाली. फक्त पन्नास दिवसात सर्व काही सुरळीत होईल असे आश्वासन पंतप्रधानानी जनतेला दिले. मात्र तसे काही झाले नाही. या नोटाबंदीच्या काळात अनेक लोकांना फटका बसला तर काही लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. त्यामुळे त्यांचे घर वाऱ्यांवर आले. नोटाबंदीमुळे सामान्य जनतेला अच्छे दिन पाहण्यास मिळेल असे वाटत होते मात्र आज दोनशे दिवसाचा काळ उलटला तरीही बँकेतील आर्थिक व्यवहार अजुनही सुरळीत झाले नाही. बँकेत पैश्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहून देखील पाहिजे तेवढी रक्कम मिळत नाही त्यामुळे जनता पुरती वैतागली आहे. काही ठिकाणी तर काउंटरला क्रमांक येईपावेतो पैसे संपून जात आहेत त्याचा मनस्ताप वेगळाच आहे. मोंढा मार्केट मध्ये शेतकऱ्यांनी आपला माल विकल्यानंतर त्यांच्या हातात महिना दीड महिन्यानंतर तेही पाच-पाच हजार रूपयाच्या हिशोबात मिळाले त्यामुळे त्याचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. स्वतःच्या हक्काचे पैसे आपल्या बँक खात्यावर असून ही वेळेवर मिळत नसल्यामुळे जनतेमधून संताप व्यक्त केल्या जात आहे. 
त्याच सोबत बँकेतील गर्दी कमी व्हावी यासाठी एटीएम निर्माण करण्यात आले होते. मात्र नोट बंदीचा फटका याठिकाणी सुध्दा जाणवत आहे. पूर्वी हवी तेवढी रक्कम एटीएममधून मिळत असे मात्र नोटाबंदी जाहिर झाल्यापासून एटीएमवर निर्बंध घलण्यात आले आणि एटीएममध्ये पैश्याचा तूटवडा जाणवू लागले. सुरुवातीला फक्त अडीच हजार, त्यानंतर चार हजार आणि मग आज चाळीस हजार रुपया पर्यंत रक्कम उचलू शकत आहे मात्र एटीएममध्ये पैसेच नसल्याने जनता त्रस्त होत आहे. रोज एटीएमकडे नागरिक चकरा मारत आहेत मात्र त्यांच्या पदरी निराशेच्या खेरीज काहीच मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याउलट बाजुच्या तेलंगाना राज्यात एटीएममध्ये पैसे उपलब्ध असल्याचे दिसून येते. या भागातील काही गरजू मंडळी थेट तेलंगाना मध्ये जाऊन आपल्याला हवी असेल तेवढी रक्कम आणित आहेत. मात्र विनाकारण जाण्यायेण्याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे.
ज्यांच्या घरी एखादे लग्न कार्य किंवा कार्यक्रम आहे ती मंडळी मात्र पैश्याअभावी पुरती वैतागली आहे. प्रत्येक कामाला पैसे लागतात आणि प्रत्येक ठिकाणी ऑनलाइन व्यवहार करणे शक्य नाही. विविध कारणामुळे जनतेला ऑनलाइन व्यवहार देखील अडचणीचे ठरत आहे. बहुतांश दुकानात अजुनही स्वीप मशीन उपलब्ध केल्या गेले नाहीत आणि ज्या ठिकाणी मशीन उपलब्ध केले आहेत ते शंभरामागे दोन रुपये जास्तीचे बील आकारत आहेत. एकीकडे ऑनलाइन पेमेंट करा म्हणायचे आणि जनतेकडून शंभरामागे दोन रुपये जास्त घेणे हा कुठला न्याय आहे हे ही कळत नाही. आमचे पैसे असून आम्हालाच मिळत नाही ही अवस्था सध्या निर्माण झाली. येत्या एका महिन्यात शेतकरी मंडळीचे शेतातील कामे सुरु होणार आहेत. बी-बियाणे आणि औषधाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या हातावर पैसा असणे अत्यावश्यक आहे अन्यथा ज्यांच्या साठी एवढा खटाटोप केला तीच व्यक्ती दुरावण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच कदाचित याचे परिणाम सरकारवर उलटे होऊ नये त्यापूर्वी बँकेतील आणि एटीएममधील स्थिती पूर्ववत करणे अत्यावश्यक आहे, असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769
••••••••••••••••••••=======•••••••••••••••••••
*युवकांच्या हाती हुंड्याची दोरी*

स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर ही हुंडयासारखी सामाजिक समस्या आजही ज्वलंत आणि उग्र स्वरुप धारण केले आहे. लातूर जिल्ह्यातील शीतल वायाळ या मुलीने आपल्या वडिलांकडे लग्नासाठी पैसे नाहीत, वडिलांची घालमेल पहावत नाही म्हणून स्वतः चे जीवन संपविले. तिच्या बळीने हा प्रश्न समाजापुढे एका वेगळ्या स्वरुपात समोर आले आहे. हुंड्यामुळे कोण कोण त्रस्त होत असतो ? याची जराशी कल्पना यामुळे आली. समाजात आजही हुंडयापायी कोणाचे लग्न थांबणे, नववधुंचा छळ करणे, या सर्व हुंडाबळीच्या घटना आपण डोळ्याने आजही पाहतो आणि वाचन करीत आहोत. समाजातून हुंडा पध्दती समूळ नष्ट करणे  म्हणजे समाजातील रुढी आणि परंपरा यांच्याविरुध्द दिलेला एक लढाच नव्हे काय ?
प्रत्यक्षात समाजात काय घडते ? वधू पिता आपल्या मुलींसाठी वर शोधत फिरत असतो. चांगले स्थळ मिळावे यासाठी तो सर्व प्रयत्न करतो. प्रत्येक वधू पित्याची ईच्छा असते की आपली मुलगी ज्या घरी पाठवित आहोत ते घर सुख समृद्धिचे असावे, तिला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन सोयरीक जुळविली जाते. मग त्यासाठी हवी ती किंमत मोजण्याची तयारी वधूपिता दर्शवितो. याच गोष्टीचा फायदा वरपक्षाकडील मंडळी घेतात. त्यातल्या त्यात मुलगा सरकारी नोकरी किंवा चांगल्या हुद्यावर आणि पगारीवर असेल तर मग मनाला वाटेल ती रक्कम मागितली जाते. सध्या डॉक्टर, इंजिनियर, पोलिस आणि शिक्षक नवरदेवाचे भाव गगनाला भिडले आहेत.
लग्नाच्या प्रक्रियेत सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नवरदेव. त्याने जर मनात आणले तर ही हुंडा पध्दत समूळ नष्ट होऊ शकते. लग्न जुळते वेळी ही नवरदेव मंडळी याविषयी ब्र ही काढत नाहीत त्यामुळे ही पध्दत फोफावत चालली आहे. सध्या जे युवक लग्न करण्यासाठी बोहल्यावर चढणार आहेत त्यांनी हुंडा न घेता साध्या पध्दतीने लग्न करून घेतल्यास त्याची नोंद समाज नक्की घेईल. प्रत्येक नवरदेवाने याविषयी एक वेळ तरी आत्मचिंतन करावे. आपल्या एवढ्या शिक्षणाचा काही अर्थ राहणार नाही असे वाटते. हुंडा न घेतल्याने समाजात जे मान सन्मान आणि स्वतः ला जो मानसिक समाधान मिळते ते किती ही पैसा देऊन मिळविता येत नाही, हे सत्य आहे. वधूने किंवा वधूच्या पित्याने हुंडा घेणाऱ्या नवरदेवाला मुलगी देणार नाही अशी शपथ घेऊन काही फायदा होईल असे वाटत नाही त्या ऐवजी नवरदेव किंवा त्यांच्या आई-वडिलांनी हुंडा घेणार नाही ही शपथ जास्त फलदायी ठरेल असे वाटते. जे युवक असे लग्न करतील अश्या कुटुंबाचे समाजाने नागरी सत्कार करावा म्हणजे हुंडा न घेता लग्न करण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल आणि जे अनपेक्षित घटना घडत आहेत ते घडणार नाहीत. हुंडा ही आपणच पेरलेले बी आहे तर त्याचे उच्चाटन आपणालाच करावे लागेल, एवढे मात्र खरे आहे.

नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769

Monday 1 May 2017

बालविवाह

*बालविवाह रोखता येतील ?*

विवाहासाठी आता वयाचा दाखला अनिवार्य करत असल्या बाबतचे वृत्त वाचून आनंद वाटला. याबाबतीत एनसीपीसीआर'चे सदस्य यशवंत जैन म्हणाले की, बालविवाह प्रतिबंधक कायद्याची स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर अंमलबजावणी न होणे ही निश्‍चितच चिंतेची बाब आहे. त्यामुळे विवाह करताना वयाचा दाखला आता अत्यावश्यक करण्यात येत आहे. पुरोहित किंवा विवाह लावणारा धर्मगुरू अथवा घरातील कोणत्याही जबाबदार व्यक्तीने लग्नाच्या वेळी दारक-दारिकांच्या वयाचे प्रमाणपत्र दाखविले पाहिजे. त्यामुळे बालविवाह प्रथा मोडित निघण्यास मदत होईल. खरोखरच असे झाले तर बालविवाहाची पध्दत हळूहळू संपुष्टात येईल. देशात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम-२००६ चा कायदा असून देखील त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे हे सर्व प्रकार वाढत आहेत म्हणून आता विवाहबंधनात अडकणार्‍या नवदाम्पत्यांना वयाचा दाखला अनिवार्य करण्याचा विचार शासन करीत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. 
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने या संदर्भात राज्य सरकारांना निर्देश देत मुलींचे वय १८ पेक्षा कमी आणि मुलांचे २१ पेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींचे विवाह रोखण्यासाठी वय प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक करण्याचे सूचविले आहे. त्यानुसार सरकार यावर काय पाऊल उचलणार हे अजुन निश्चित झाले नाही. आंध्रप्रदेशातील पंचायतींमध्ये विवाह नोंदणीच्या वेळी वयाचे प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक करण्यात आले आहे, त्यामुळे बालविवाह रोखण्यात यश मिळत असल्याचे जैन यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले. लग्नाच्या नंतर नोंदणी करण्याऐवजी लग्नाच्या पूर्वी ग्रामपंचायत, नगरपालिका आणि मनपा यांच्या कार्यालयाकडून वधू आणि वराकडील मंडळीनी मुलींचे आणि मुलांचे वय तपासून त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिल्यास अजुन सोइस्कर होईल असे वाटते. जे मुले-मुलीं वयाची अट पूर्ण करणार नाहीत ते लग्न झाल्या वर नोंदणी कार्यालयात येणारच नाहीत. पण लग्नापूर्वी ना हरकत मिळणे म्हणजे एक प्रकारे लग्न करण्याचा परवाना असे समजण्यास हरकत नाही. जसे वाहन चालविण्यासाठी परवाना आवश्यक असतो त्या नुसार विवाह परवाना आवश्यक नाही का वाटत ? या पध्दतीद्वारे मुलगी 18 वर्षाची आणि मुलगा 21 वर्षाचा झाला की त्यांची नोंदणी करून कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन ठेवले की लग्न करण्यासाठी मोकळे. ज्यावेळी एखादे स्थळ एकमेकाना पसंद पडेल त्यावेळी दोन्ही पक्षांनी एकमेकांची ना हरकत प्रमाणपत्र पाहून सोयारिक जुळवून घेणे सोपे होईल. बहुतांश वेळा नविन लग्न झालेली मंडळी आपल्या विवाहाची नोंदणी करीत नाहीत असे सर्रास दिसून येते. त्यामुळे सर्वप्रथम विवाहाची नोंदणी करणे सर्वाना बंधनकारक करणे आवश्यक आहे. 
भारतात वयाची आठरा वर्षे पूर्ण करणारी व्यक्ती भारतीय नागरिक होऊ शकते आणि त्यांना मतदान करण्याचा अधिकार मिळतो. त्यासाठी त्यांना निवडणूक ओळखपत्र दिल्या जाते. हे ओळखपत्र देताना निवडणूक आयोग पूर्ण काळजी घेते. परंतु यात विवाह झालेल्या मुलींच्या वयाच्या बाबतीत काळजी घेतली जात नाही. लग्न होऊन सासरी आलेल्या मुलींचे नाव या मतदार यादीत लग्नपत्रिका पाहून समाविष्ट केल्या जाते. कारण भारतात वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या मुलींचे लग्न करणे कायद्याने आवश्यक आहे. तिचे लग्न झाले अर्थात ती वयाची 18 वर्षा ची अट पूर्ण केली असा ढोबळ अंदाज बांधून तिचे नाव मतदार यादीत समाविष्ट केल्या जाते. ही पध्दत कुठे तरी बंद झाली पाहिजे. लग्नाची अधिकृत नोंदणी पत्र पाहिल्याशिवाय मुलींचे नाव निवडणूक मतदार यादीत समाविष्ट करण्यात येवू नये असा नियम तयार झाले तरी थोड्या प्रमाणात बाल विवाहाला आळा बसू शकतो, असे वाटते. बालविवाह रोखण्यासाठी फक्त सरकारने काही करावे किंवा शासनाने कठोर कायदे तयार करावे असे नाही तर प्रत्येक मुलां-मुलींच्या पालकानी याबाबतीत सजग होऊन विचार करणे आवश्यक आहे. कमी वयात लग्न लावल्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होतात याची जाणीव पालकानी करून घ्यावी आणि समाजातील जागरूक लोकांनी याबाबतीत लोकांचे वेगवेगळ्या माध्यमातून उदबोधन करावे. बालविवाहच्या बाबतीत जनजागृती ही अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या देशाला समृद्ध करण्यासाठी बालविवाह पध्दत समूळ नष्ट करणे अत्यावश्यक आहे. चला तर मग आपल्या परीने जसे होईल तसे बालविवाह थांबविण्यासाठी उपाय शोधू या..!

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद
  9423625769

Sunday 30 April 2017

जीवनात श्रमाचे महत्त्व

            जीवनात श्रमाचे महत्त्व

ज्या युगात फक्त बटन दाबले की, चुटकीसरशी अनेक कामे होतात, अशा संगणक युगात आज आपण सर्वजण वावरत आहोत. त्यामुळे काम करून घाम गाळणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. काम करणे हे कमीपणाचे मानले जात असून शारीरिक कष्ट करणाऱ्या श्रमिकांना यंत्र युगाच्या काळात निकृष्ट मानल्या जात आहे आणि बसल्या ठिकाणी बौद्धिक कष्ट करणाऱ्याना श्रेष्ठत्व दिल्या जात आहे. परंतु असे करणे म्हणजे एक प्रकारे श्रमाचा व त्या श्रमिकांचा अपमान नव्हे काय ? बौद्धिक कष्टाइतकेच शारीरिक कष्ट सुध्दा महत्वाचे आहे. काबाडकष्ट केल्यामुळेच मानवाची प्रगती होते. आयत्या वाढलेल्या कुरणात चरणे एखाद्या पशुला शोभते माणसाला नक्कीच नाही. त्यास्तव कष्ट वा श्रम मग ते कोणतेही असो ते मनापासून करावे. वरवर केलेल्या कामात आनंद तर मिळत नाहीच तसेच त्याचे फळ ही मिळत नाही. मनातून केलेल्या कामाची कुणालाही बोझा वाटत नाही. मात्र तेच काम अनिवार्य किंवा बंधनात टाकले की कधी एकदा संपते असे वाटते. उदा. शाळेतील मुलांना त्यांच्या आवडीनुसार अभ्यासाचे किंवा इतर काम लावल्यास ते त्यात तल्लीन होऊन काम करतात. याउलट हे काम केलेच पाहिजे असा हेका धरल्यास किंवा बंधन टाकल्यास तो अभ्यास किंवा इतर काम त्याला कंटाळवाणे व नीरस वाटते
एखादे काम सुरु करण्यापूर्वी त्याचे ध्येय ठरविणे  सुद्धा गरजेचे आहे. ध्येयाविना काम करणे म्हणजे ढोरासारखे काम करण्यासारखे आहे. त्यामुळे उचित ध्येय प्राप्तीसाठी नियोजनपूर्वक केलेले कामच यशस्वी होऊ शकते. त्यासाठी सर्वप्रथम कामाचे नियोजन करणे महत्वाचे ठरते. शालेय जीवनातील विद्यार्थ्याना या नियोजनाची ओळख झाली तर त्यांचे प्रत्येक काम यशस्वी होताना दिसून येते. बहुतांश विद्यार्थी दहावी वा बारावीच्या परीक्षा तोंडावर आली किंवा त्या वर्षी भरपूर मेहनत घेतात, अभ्यास करतात, सराव सुध्दा भरपूर करतात. मग अशा विद्यार्थ्याना घवघवीत यश मिळेल असे सांगता येईल काय ? कारण तहान लागली म्हणून विहीर खणण्यापेक्षा आपणास कधी तरी तहान लागणार आहे म्हणून जो आधीच विहीर खणुन ठेवतो त्याची खऱ्या अर्थाने तहान भागते. त्यास्तव फक्त महत्वाच्या वर्षी अभ्यास करून चालणार नाही. त्यासाठी प्रारंभी पासून अभ्यासाचे नियोजन केल्यास कमी श्रमात नक्कीच यश मिळू शकते. मनात नुसते संकल्प वा स्वप्नाचे महल बघितल्यास आपले कोणतेच मनोरथ पूर्ण होणार नाही. दे रे पलंगावरी भावनेतून आपण विचार करत असू तर ते आपल्या जीवनासाठी नक्कीच घातक आहे. त्यासाठी नेहमी प्रयत्न करत रहाणे अत्यंत गरजेचे आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटले आहे की, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तोचि देव जाणावा. प्रयत्न करा, कार्य करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. प्रयत्न केल्यास वाळूतून देखील तेल गळू शकते. त्यासाठी सर्वप्रथम स्वतः ची कामे स्वतः करायला शिकणे महत्वाचे आहे.
कुटुंबात वावरताना एक बाब प्रकर्षाने जाणवते, लहान असलेली मुले त्यांना कसल्याच प्रकारच्या कामाची जाणीव नसताना आपण मुलांची आणि मुलींच्या कामाची विभागणी करतो. घरामध्ये एखादा मुलगा ज्याला कामाची काहीच कल्पना नाही असा तो झाडू घेऊन घर साफ करीत असेल तर घरातील आईं किंवा जे कोणी श्रेष्ठ असतील ते नकळत म्हणून जातात, अरे ते झाडू ठेव बाजूला, ते तुझं काम नाही. अश्या अनुभवातुन मग मुलांच्या आणि मुलींच्या कामाचे वर्गीकरण सरळ आपल्या घरापासून जे सुरु होते ते देशाच्या संसदेच्या दारापर्यंत जाऊन पोहोचते. कोणत्याही कामाची अंगवळण जर टाकायचे असेल तर त्यांना सर्व प्रकारची कामे देणे वा सांगणे गरजेचे आहे. घरातील केर साफ करणे, भाजी निवडणे, सांडपाणी भरणे, अंथरुण टाकणे व त्याचा घड्या करणे, आंघोेळीसाठी पाणी गरम करणे, छोटे कपडे धुणे, कपड्यास इस्त्री करणे, दुकानातून सामान आणणे, बाजारातून भाजीपाला आणि वर्त्तमानपत्र आणणे, इत्यादी सर्व कामे वर्गीकरण न करता घरातील मुलां-मुलींना लावल्यास त्यांच्यात या कामाच्या बाबतीत विभागणी होणार नाही. ज्या घरात फक्त मुलगा किंवा मुलगीच असेल तर त्या घरात कामाचे वर्गीकरण करता येते काय ? नक्कीच नाही. या लहानपणाच्या वयात जर मुलांना कामाच्या बाबतीत स्वावलंबी बनविलो तरच त्याचे दूरगामी चांगले परिणाम निश्चितपणे बघायला मिळतात. याबाबतीत भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे जीवन चरित्र वाचले तर लक्षात येते की, त्यांनी जीवनात काम वा श्रमाला महत्वाचे पहिले स्थान तर दिलेच शिवाय ते स्वतःची कामे स्वतः पूर्ण करण्यात धन्य मानित म्हणूनच तर ते भारताच्या महत्वपूर्ण अशा पंतप्रधान पदापर्यंत पोहोचु शकले.
समर्थ रामदास स्वामी यांनी कष्टाची महती सांगताना ' कष्टेविना नाही फळ ' असे स्पष्टपणे सांगितले आहे. खरे तर सध्याच्या काळात घाम गाळून कष्ट करणाऱ्याची संख्या खुपच कमी झाली आहे, असे वाटते. सर्व काही जागेवर विनासायास मिळावे अशीच प्रत्येकाची अपेक्षा बनत चालली आहे. समाज मनाची ही स्थिती बदलण्यासाठी लहानपणापासून ते मोठे होईपर्यंतच्या कष्टाच्या गोष्टी वदवून घेऊन संस्कार करण्याचे प्रयत्न होतात परंतु प्रत्यक्ष कृती मात्र शून्य असते. बऱ्याच जणाना कासल्याच प्रकारचे कष्ट न करता आपले पोट भरले जावे असे वाटते. यात बिनभांडवली धंदा म्हणजे भीक मागणे. शरीर धड धाकट असून देखील अनेक जण भीक मागताना दिसतात. कष्ट करणे जीवावर येत असल्याने दुसऱ्यांस मागून खाणे, दुसऱ्यांसमोर मदतीसाठी हात पसरणे हाच त्यांचा दिनक्रम असतो. सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जसे की रेल्वे स्टेशन, बस स्थानक किंवा एखादे धार्मिक स्थळ ही त्यांची ठरविलेली ठिकाण आहेत. जेथे भिकाऱ्याचा वावर सर्वात जास्त होतो. या बाबीचा त्रास प्रवाश्याना आणि भाविकाना होतो. पण यावर काही उपाययोजना होत नाही. हे विदारक चित्र पाहून मन विषण्ण होते. यातील काही जण खरोखरच अपंग असतील ही वा काही जणाना काहीच करता येत नाही. पण अश्याची संख्या फार कमी आहे. यापेक्षा धडधाकट भिकाऱ्यांची भरणा अधिक असतो. अशा लोकांना भीक देऊन आपण एकप्रकारे त्यांच्या या व्यवसायाला प्रोत्साहन देत असतो, असे नाही का वाटत ? परीक्षेत कॉप्या करून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी विना कष्टाचे फळ मिळावे अशी अपेक्षा करणाऱ्याचे आणखी एक उदाहरण. लॉटरीने नशीब खुलते म्हणून घरातील एक-एक भांडी-कुंडी विकून केवळ लॉटरी खेळणारे अनेक महाभाग सापडतात. कष्ट करण्याची जणू त्यांची काहीच तयारी नाही असे ही काही जण समाजात भेटतात. सामान्यांची अशी वृत्ती का व्हावी याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. फुकटची मिळविण्याची वृत्ती सोडून प्रत्येकाने कष्टाची सवय लावून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
भगवान गौतम बुध्द यांनी आळस हा माणसाचा शत्रू आहे असे म्हटले आहे. जी माणसे कष्टाळू आणि मेहनती असतात त्यांना रिकामा वेळच मिळत नाही. सदा न कदा ते कामात व्यस्त असतात. तर त्याउलट आळशी माणसे एक तर काम करीत नाहीत आणि करणाऱ्या व्यक्ती ला करू देत नाहीत. म्हणून अश्या लोकांपासून चार हात दूर राहणे केव्हाही चांगले असते. रिकाम्या डोक्यात भूताचा वास असतो. काही काम नसले की नसती उठाठेव केली जाते जे की जीवनाच्या प्रगतीत खुप मोठे अडसर ठरते. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्ती पर्यंत प्रत्येकाचे कष्ट करण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. लहान मुलांचे कष्ट म्हणजे आपला शाळेतील अभ्यास वेळेवर पूर्ण करून घरकामात आई-बाबांना मदत करणे. घरातील लहान सहान कामे स्वयंस्फुर्तीने पूर्ण करणे, काम करणाऱ्या लोकांविषयी मनात आदर ठेवणे आवश्यक आहे. कोणतेही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असूच शकत नाही. प्रत्येक काम आपणास काही तरी देऊन जातो. बहुतांश ठिकाणी शालेय वयातील मुले हॉटेल मध्ये किंवा इतरत्र काम करताना दिसून येतात. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते अगदी लहान वयात कष्ट करण्यास सुरु करतात. त्यामुळे फार कमी वयात वयस्कर वाटतात. ज्या वयात जे काम करायला हवे तेच काम केल्यास शरीर सुध्दा साथ देते. बालमजूरी प्रतिबंधक कायदा असुन देखील बाल कामगारांची संख्या अजुन देखील कमी झाले नाही. नोकरी करणाऱ्या कर्मचारी मंडळीनी प्रामाणिकपणे आपले काम पूर्ण करणे हेच त्यांचे खरे कष्ट आहे. मात्र काही कर्मचारी लवकरात लवकर श्रीमंत व्हावे म्हणून पैश्याच्या हव्यासा पायी लाच घेतात. अश्या लोकांना कष्ट करून कमाविलेल्या पैश्यासारखे या पैश्याची किंमत कळत नाही. वाटेल तसे पैश्याची उधळपट्टी केल्या जाते. त्यामुळे यांच्या घरातील संस्कार सुध्दा लुप्त होतात आणि त्यांची येणारी पिढी निष्क्रिय निघते. कारण त्यांना श्रमाचे महत्त्व कळलेले नसते. भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा असलेल्या लोकांनाच श्रमाचे महत्त्व कळलेले असते म्हणून तर त्यांना चटनी भाकर देखील गोड लागते आणि इकडे खाण्यास सर्व काही असुन मधुमेह किंवा विविध कारणा मुळे ते खाऊ शकत नाहीत. एकीकडे पोटासाठी पाय पीट होते तर दूसरी कडे खालेले पचविण्यासाठी सकाळी संध्याकाळी पायपीट करावी लागतें.
कोणतेही काम श्रेष्ठ वा कनिष्ठ नसते. काम करणाऱ्या माणसाविषयी प्रत्येकानी आपल्या मनात कृतज्ञता बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. आज शारीरिक श्रम करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस घटत चालले आहे
ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. सर्वजण बौद्धिक श्रमावर आधारित जीवन जगण्यास सुरुवात केली तर शारीरिक श्रमाने उत्पादित होणारे पदार्थाची गरज जे जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे ते काम कोण करणार ? प्रत्येक जण कामाची टाळाटाळ करीत असेल तर भावी आयुष्य कसे असेल ? याचा विचार देखील फारच कठीण वाटते. म्हणून उभ्या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी असो वा इतर छोटे मोठे काम करणारे कामगार यांच्याविषयी त्यांच्या श्रमाचे मोल पैश्याच्या मापामधून न बघता कधी तरी माणुसकीच्या नात्यातून पाहायला शिकणे अत्यंत महत्वाचे आहे असे वाटते. महात्मा गांधीजीनी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही कामाची सुरुवात स्व म्हणजे आपल्या पासून करावी. आपण एक जण पुढे पाऊल उचला हजारो पाय तुमच्या सोबत येतील.
आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन त्यानिमित्त आपणास शक्य होईल ते काम आपण तर करावेच त्यासोबत श्रम, काम करणाऱ्या लोकांविषयी मनात आदर ठेवू या आणि त्यांचा सन्मान करू या या दिवसाचे हेच खरे फलित आहे असे वाटते.

नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...