Saturday 31 December 2016

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

मी सावित्री बोलतेय

नमस्कार .....
मी सावित्रीबाई फुले माझा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी पाठविण्याचे ठरविले. मात्र मी होते अक्षरशत्रू, मला वाचताही येत नव्हते आणि लिहिताही. पण ज्योतिबानी खुप कष्ट घेऊन मला शिकविले, अन मला ही शिकण्याची हौस होतीच. मला शिकावे असे वाटले आणि मनावर घेऊन मी लवकरच शिकले. पुण्यातील शाळेत शिकविण्यासाठी मी तयार झाले. पण समाजातील काही कर्मठ लोक मात्र यास विरोध करू लागले. मुलींनी शाळा शिकू नये म्हणून काही लोक मुलींना शाळेत तर पाठवत नव्हतेच शिवाय मी शाळेला जात असताना लोक मला शिव्या शाप देऊ लागले. माझ्या अंगावर शेण टाकू लागले. मला दगड गोट्याने मारू लागले. तरीही मी मागे सरले नाही, की डगमगले नाही. मी मुलींना शिकविण्यासाठी रोज शाळेत जाऊ लागले. ज्यातून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मी आणि माझे पती ज्योतिबा यांनी मिळून लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले पहायला मिळत आहे, याचा मला अभिमान वाटते. आज असे कोणतेही क्षेत्र नाही की जेथे महिलाचा सहभाग नाही. पण 200 वर्षापूर्वी असे चित्र नव्हते. स्त्री म्हणजे चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादित होती. घराच्या उंबरठ्याबाहेर पडायची सुद्धा तिला परवानगी नव्हती. ती घरातील एक शोभिवंत वस्तू समजली जायची. शिक्षणाने मानवी जीवनाचा विकास होतो हे महात्मा फुले यांनी जाणले होते म्हणून त्यांनी सर्व प्रकारचे प्रयत्न करून महिलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट घेतले, त्यामुळे महिलांची आज प्रगती दिसून येत आहे. माझ्या जीवनात जे काही दुःख आणि कष्ट आले ते दुःख सर्व महिलांच्या जीवनात येत असतात. म्हणून महिलानी मागे येऊ नये. जीवनात आलेल्या संकटाला फक्त महिलाच यशस्वीपणे तोंड देऊ शकतात. तेवढी ईश्वरदत्त देणगी सहनशक्ती तिला प्राप्त असते. माझ्या जीवनात ज्योतिबा आले नसते तर मी तुमच्या सारखेच सर्वसामान्य सावित्री राहिली असती क्रांतिज्योति कधीच झाली नसती. म्हणून मला आज एकच गोष्ट सांगावेसे वाटते की आपल्या मुलींना शिक्षणापासून दूर करू नका. तिला खुप शिकवा. तिचे शिक्षण हे तिच्या एकटी पुरते मर्यादित नसते तर ती आपल्या घरातील सर्वाना शिक्षण देण्याचा विचार करू शकते. मात्र तेच जर निरक्षर स्त्री असेल तर ती आपल्या घरातील कोणत्याच सदस्याच्या शिक्षणाची काळजी करणार नाही. शिकलेली आई घरादाराला पुढे नेई असे म्हटले जाते ते काही उगीच नाही.
पूर्वी पती मेल्यानंतर त्याच्या मागे पत्नीचे खुप हाल व्ह्ययचे. तिला विद्रूप केल्या जायचे. तिला समाजात कोठेही मानाचे स्थान मिळायचे नाही. त्या सर्वासाठी खुप कष्ट घेतले परंतु आज ही समाजात काही मोठा बदल झाला आहे दिसत नाही. आज शिकलेला समाज असून देखील अशिक्षित लोकांच्या पलीकडे वागत आहेत हे पाहून मनाला खुप खंत वाटते. जन्माला येणारी मुलगी असेल तर तिचे गर्भ पोटातच संपवायचे पातक शिकलेला समाज करताना पाहून दुःख वाटते. मुलगा हवा या हट्टापायी कित्येक मुलींचे गर्भ खुडणाऱ्या लोकांना काय म्हणावे ? मला वाटते त्यास कारण समाजातील चालू असलेल्या चालीरीती हे कारणीभूत असू शकतात. मुलीचा बाप म्हणजे डोक्याला ताप अशी विचारधारा समाजात मोठ्या प्रमाणात दिसून येते. मुलींच्या बापाला काय कष्ट आहेत हे मुलांच्या बापाला नक्कीच कळणार नाही त्यासाठी जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे या उक्तीनुसार मुलीच्या बाप होऊन पहावे लागेल. जोपर्यंत लग्नात वधू पक्षा कडून घेण्यात येणारी  हुंडा पध्दत बंद होणार नाही तोपर्यंत हे असेच चालत राहणार असे वाटते. मुळात लग्न ही प्रक्रिया पारंपरिक व पुरातन  पध्दतीने आज ही चालू आहेत. जसे पूर्वी लग्न लावले जायचे अगदी त्याच प्रकारे आज ही लग्न लावले जातात.यात कुठे तरी बदल करणे अपेक्षित आहे. आजच्या विवाह पध्दतीमध्ये वेळ आणि पैसा दोन्हीही वारेमाप खर्च होतो मात्र त्याची खंत कोणालाच नाही. पोरीचा बाप जर गरीब असेल तर या लग्नविधीमध्ये त्याचा जीव अगदी मेटाकुटीला येतो. त्याच मुळे कदाचित त्यास मुलगी नको असते की काय अशी शंका येते. शासन ही मुलीला वाचविण्यासाठी लेक वाचवा लेक शिकवा यासारखे अभियान राज्यात राबवित आहे. तरी मुलींच्या शिक्षणात म्हणावा तेवढा फरक पडला नाही. स्त्री भ्रूण हत्येवर बंदी घातली तरी दर हजारी पुरुषा मागे स्त्रियांची संख्या काही वाढली नाही. आज ही तिला दुय्यम स्थान मिळते.
साहित्य क्षेत्रात महिलांची म्हणावी तशी प्रगती नाही. ज्याप्रमाणात पुरुष मंडळी लिहितात आणि प्रकाशात येतात त्या प्रमाणात महिला लिहितात पण प्रकाशात येत नाहीत. काही वर्तमानपत्र महिलासाठी खास जागा ठेवतात किंवा पुरवणी सुध्दा काढतात जेणे करून सर्व स्त्रियांना लेखनाची संधी दिली जावी. पण येथे ही त्याच त्या महिला नियमित लेखन करतात. कविता किंवा लेख लिहिण्याच्या माध्यमातून प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याची संधी मिळविता यावी असा उद्देश्य असतो. परंतु महिला कोणत्या ना कोणत्या वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्धिपासून दूर राहतात. मनात एक वेगळी अनामिक भीती राहते. अश्या या परिस्थिती मध्ये सुद्धा काही महिला प्रसिद्धि माध्यमाच्या क्षेत्रात पुरुषापेक्षा काकणभर जास्त चांगले काम करीत आहेत याचे मात्र मला अभिमान वाटत राहते. महिलेच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम आहे. घराबाहेर पडणारी स्त्री मनातल्या मनात घाबरून राहत असते. रात्री ची वेळ ही तर स्त्रियासाठी जीवघेणीच असते. यापूर्वी दिल्ली शहरातील निर्भया प्रकरण कसे घडले हे आपण जाणून आहोतच. रोजचे वर्त्तमानपत्र उघडले की महिलांवर होणारे अत्याचाराची बातमी प्रकाशित झाल्याशिवाय पेपर पूर्ण होत नाही अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. महिला शिकली, सवरली आणि कमावती सुध्दा झाली पण अजुनही ती स्वतः मुक्त झाली नाही. ज्या दिवशी ती स्वतः चे निर्णय घेईल तो तिच्या जीवनात सोनियाचा दिन असेल.
हे सर्व जेंव्हा मी उघड्या डोळ्याने पाहते तेंव्हा मला अस्वस्थ वाटायला लागते. मला पुन्हा एकदा जन्म घ्यावे लागेल की काय असे ही कधी कधी वाटते. पण माझी काही गरज नाही, फक्त तुम्ही तुमच्या मुलींना उच्च शिक्षण देऊन तिला तिच्या पायावर उभी राहण्याची क्षमता तयार करा तोच माझा पुनर्जन्म असेल.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  9423625769

Tuesday 27 December 2016

महिलांचे उज्ज्वला भविष्य

महिलांचे उज्ज्वला भविष्य

गरिबाच्या स्वयंपाकघरात नि:शुल्क एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ४.१५ लाख कुटुंबीयांची स्वयंपाकघरे धूररहित झाली आहेत अशी एक बातमी नुकतेच वाचण्यात आली आणि आनंद झाला. गरीबांच्या घरी चूल कशी पेटते आणि साधा चहा जरी करायचे म्हटले तर किती त्रास सोसावा लागतो हे त्यांच्या घरी गेल्यावरच कळते. त्याशिवाय कळत नाही. त्यामुळे या गरीबांच्या घरात सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळाच चूल पेटते. एकदा चूल पेटले की सारा स्वयंपाक करूनच बाजूला होतात. कारण वारंवार चूल पेटविणे अशक्य असते. या चूलीचा त्रास सर्वाना होतो. स्वयंपाक करणाऱ्या महिलांना तर होतोच शिवाय घरात सर्वत्र धूर पसरल्यामुळे त्याचा त्रास घरातील इतर मंडळीला देखील होतो. त्यातल्या त्यात सरपण जर ओले असेल तर सांगता सोय नाही. पावसळ्याच्या दिवसात चूल पेटता पेटत नाही. चूलीत फुंकुन फुंकुन जीव जाण्याची वेळ येते. पण जाळ काही होत नाही. यामुळे या दिवसात प्रत्येक महिलेला चुलीचा त्रास नक्की जाणवतो आणि यापेक्षा धूर न होणारी चूल मिळाली तर किती बरे होईल अशी अपेक्षा प्रत्येकाना होते. एलपीजी गॅस हे एक असे चूल आहे ज्याठिकाणी अजिबात धूर होत नाही आणि आटोपशीर स्वयंपाक होऊ शकतो. पण गरीब घरातील लोकांना हे विकत घेणे फारच खर्चिक आहे असे वाटते. पण सरपण किंवा इतर ईंधनापेक्षा एलपीजी गॅस सहज उपलब्ध होणारे आणि स्वयंपाकाचा कसलाही त्रास होऊ न देणारे इंधन आहे याची जाणीव या लोकांना नसल्यामुळे ते या बाबीपासून कोसो दूर होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार मधील पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुढाकाराने एक धडक कार्यक्रम हाती घेतला असून देशभरातील दारिद्ररेषेखाली जीवन जगणाऱ्या ५ कोटी कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रातील १४ लाख गरीब कुटुंबांनी यासाठी अर्ज केले असून त्यापैकी १०.८६ लाख अर्ज मंजूर करण्यात आले. त्यात ४ लाख १५ हजार कुटुंबाकडे गॅस कनेक्शन त्यांच्या घरी पोहोचवून देण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. आकडेवारी कडे लक्ष दिल्यास असे दिसून येते की पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज (७८,७५७) प्राप्त झाले होते , त्याखालोखाल सोलापूर (७६,७४४), नांदेड (७२,८५९), नाशिक (७१,३७३) आणि अहमदनगर (७०,०५२) या जिल्ह्यातील लोकांनी गॅस कनेक्शन मिळण्यासाठी अर्ज केले. मात्र  अर्जाच्या तुलनेत विचार केले असता लातूर जिल्ह्यात सर्वाधिक गॅस कनेक्शन (२९,४४३) देण्यात आले. त्याच्या नंतर सांगली (१७,७८७), अहमदनगर (१७,४६६), धुळे (१७,६३२) आणि पुणे (१७४६६) या जिल्ह्यातील लोकांना गॅस कनेक्शन देण्यात आले. अर्ज मंजूर झालेल्या अर्जदारास काही महिन्यातच कनेक्शन देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. घरगुती गॅस कनेक्शनमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. यावर्षी आॅक्टोबरपर्यंत ८१ टक्के कुटुंबाकडे घरगुती गॅस कनेक्शन आहे. एकूण २.३८ कोटी कुटुंबांपैकी २.०९ कोटी कुटंब गॅसवर स्वयंपाक करतात. संपूर्ण देशात जिल्हास्तरावर ६०० नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. अधिकाऱ्यानुसार ते फिल्ड काम करतात. ते अर्जदार व गॅस वितरणादरम्यान समन्वयाचे काम करताना योजनेच्या अन्य पैलूंवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. म्हणून त्यांना या योजनेचा कणा समजला जात आहे. ज्यामुळे समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत ही योजना पोहोचेल असा विश्वास वाटतो आहे. मात्र तरी ही यात काही अडथळे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गॅसचा वापर वाढू लागल्यामुळे त्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. गॅस चे दर वाढतील ज्याचा फटका मध्यमवर्गीय लोकांना बसू शकतो. गरीब लोकांचे जीवन परावलंबी होऊन जाते. लोक आळशी होतात. कारण आज शेतातून येता येता सरपण आणणात. शेणाचा वापर करतात, वाळलेले लाकुड किंवा इतर काही साधनाचा वापर करून स्वयंपाक केल्या जात असे ते बंद पडेल असे वाटते. हिवाळ्याच्या दिवसात चूली जवळ बसून जेवण करण्याची मजा काही औरच. त्याची लय या गॅसच्या स्वयंपाकला येणार नाही हे ही सत्य आहेच. कष्टकरी महिलेचे प्रतिक म्हणजे चूलीवर केलेला स्वयंपाक होय. या नैसर्गिक चूलीवर स्वयंपाक केलेल्या अन्नाची चव इतर कोणत्याही इंधनावर केलेल्या स्वयंपाकमध्ये येणार नाही हे निर्विवाद सत्य आहे.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  9423625769

Monday 26 December 2016

जीवन सुंदर आहे.

..... जीवन सुंदर आहे ......

"या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" हे रेडियो वरील गाणे ऐकत असतानाच एक बातमी वाचण्यात आली. एका वीस वर्षीय युवतीने नदीत उडी मारुन आत्महत्या केली. त्या बातमीने रेडियो वरील गाण्याचे माझे लक्ष पार उडून गेले आणि त्या मुलीच्या अश्या कृतीने तिच्या आई-बाबावर आणि त्या परिवारावर काय प्रसंग ओढवाले असेल याची साधी कल्पना जरी केली तरी ह्रदय धडधड करायला लागले, छातीचे ठोके वाढले. नेमके आयुष्याला आत्ता सुरुवात होऊ लागली होती आणि तिने आपल्या हाताने आपले आयुष्य नष्ट करून टाकली. 
जीवन सुंदर आहे ते जगता आले पाहिजे असाच काहीसा संदेश त्या गितातून देण्याचा कवीचा प्रयत्न आहे. आपण जीवन जगण्याचा कधीही मनातून प्रयत्न करीत नाही. आपण आपली जीवन क्रिया समजून घेतली नाही त्यामुळे त्याचा त्रास आपणास नक्की होतोच. त्यासाठी सर्व प्रथम आपण आपल्या परीने आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्नच करायला हवा. फार लवकर हताश होणे, नाराज होणे यामुळे मनात नैराश्य निर्माण होते. मग आपले विचार एका वेगळ्याच दिशेने धाव घेते. मनात न्यूनगंड निर्माण होते. त्या मुलीला घरात काही त्रास होता का ? नव्हता ? हे प्रश्न महत्वाचे नाही तर या टोकापर्यंत ती का गेली ? याचा ही विचार केला पाहिजे. वास्तविक पाहता अश्या घटना सहजासहजी किंवा एका क्षणी घडलेल्या नसतात तर खुप दिवसापासून त्यांच्या मनात याची सल बोचत असते. वारंवार त्याच विषयावर चिंतन करून मन बधीर होत राहते आणि असे पाऊल उचलले जाते.
त्यामुळे कुटुंबात वादविवाद, भांडण असे प्रकार शक्यतो होऊ देऊ नये. घरातील सर्वाशी प्रेमाने वागत रहावे शक्यतो या गोष्टी पाळले तर असे प्रकार होत नाहीत. मुलींनी सुद्धा फार लहान गोष्टी मनावर न घेता सामंजस्यपणाने विचार करून परिवारामध्ये आंनदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. मग पहा खरोखरच जीवन सुंदर असल्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.

*आत्महत्या हा पर्याय नाही*

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सध्या समाजात असलेली एक मोठी समस्या बनून पुढे येऊ पाहत आहे. सरसरी दररोज तीन शेतकरी विविध कारणामुळे मृत्यूला जवळ करीत आहेत. शेतकऱ्यांना निसर्गाची ही साथ मिळत नाही ना सरकारची साथ यामुळे तो समस्याग्रस्त बनत चालला आहे आणि त्याच विवंचणेत आत्महत्या शिवाय दूसरा पर्याय त्याला सुचेना झाले. यावर्षी शेतात भरघोस पीक येईल आणि डोक्यावर असलेले कर्ज संपून जाईल या विचारात दरवर्षी नव्या उमेदीने तो शेतात राबतो पण त्यांच्या कपाळी सुख लिहिलेले नाही तर कसे सुख मिळणार ? घरात खाणारी तोंडे जास्त आणि कमविणारा मात्र तो एकटा त्यामुळे घराचा पूर्ण भार त्याच्यावर असणार हे ठरलेले आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी त्यांना कुटुंबातील, परिवारातील आणि मित्राचा आधार असायला हवे. आज ना उद्या समस्या संपतील या आशेवर जगणे आवश्यक आहे, मात्र चिंता ही स्वस्थ बसू देत नाही. पण खरोखर आपण आत्महत्या केली आणि आपले जीवन संपविले तर आपल्या समोर ज्या काही समस्या होत्या त्यापासून आपली कायमची सुटका होईल मात्र त्याच समस्या आपल्या कुटुंबातील आणि परिवारातील सदस्यना अजून गंभीर स्वरुपात भेडसावते याचा एक वेळ विचार केलाय का ? नाही. जीवनातील कोणत्याही समस्यावर आत्महत्या किंवा जीवन संपविने हा पर्याय होऊच शकत नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्या डोक्यावरील कर्जाचा किंवा शेतातील नापिकीचा जास्त डोक्यात न घेता काम करीत रहा. भगवान के पास देर है मगर अंधेर नहीं ही गोष्ट लक्षात ठेवा.
जीवन खूप सुंदर आहे, त्याला फक्त योग्य दिशेने चालण्याचा प्रयत्न करीत रहावे. फक्त शेती न करता त्यासोबत काही लघू उद्योग करता येईल काय याचाही विचार करून तसा जोड व्यवसाय केल्यास आपल्या जीवनाला नक्कीच उभारी मिळेल. आज दुधाचा व्यवसाय करणारी शेतकरी मंडळी झालेला नुकसान दुसऱ्या व्यवसायतुन भरून काढू शकतात आणि त्यासाठी आपणास काही वेगळी प्रक्रिया करावे लागत नाही. शेळीपालन व्यवसाय ही आपणाला अगदी सहजपणे करता येईल त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. असे काही व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्यांनी विचार केल्यास हे जीवन किती सुंदर आहे याची प्रचिती येईल.

*परिक्षेपेक्षा जीवन महत्वाचे*

विद्यार्थ्याच्या जीवनातील एक महत्वाचा भाग म्हणजे परीक्षेत मिळविलेले यश. त्यासाठी तो वर्षभर जीव तोडून रात्रंदिवस अभ्यास करतो आणि केलेल्या अभ्यासाची दोन किंवा तीन तासात आपली स्मरणशक्ती पणाला लावून परीक्षा द्यायची. ती परीक्षा चांगली झाली तर विद्यार्थी खुश राहतो आणि तीच परीक्षा थोडी अवघड किंवा कठीण गेली असे वाटले की मुले नाराज होतात. त्यांचे कुठेही मन लागत नाही. निकाल लागण्यापूर्वीच "पेपर अवघड गेला म्हणून बारावीच्या विद्यार्थ्यांने केली आत्महत्या" अशी बातमी वृत्तपत्रात वाचायला मिळते. ज्या आई-बाबा नी मग ते गरीब असो श्रीमंत त्यांनी आपल्या भविष्याचा आधार म्हणून आपणास पालन पोषण केले आहे आणि एवढं शिक्षण पण दिले आहे. मी जर आत्महत्या केली तर माझ्या आई-बाबावर काय बितेल ? त्यांचे हाल कसे होतील ? आई-बाबा क्षणभरा साठी रागावतात कारण आपली मुले वाइट मार्गाला जाऊ नये, मुलांचे भविष्य उज्जवल व्हावे यासाठी प्रत्येक पालक धडपड करीत असतो. गरीब आई-बाबा तर आपल्या पोटाला चिमटा देऊन आपल्या शिक्षणावर पैसा खर्च करतात. फाटक के कापड वापरतात मात्र मुलांना सर्व हवे नाही ते बघतात. तेंव्हा खरोखरच विद्यार्थ्यांनी परिक्षेचा पेपर अवघड गेला किंवा परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून जीवन संपविणे योग्य आहे का ? याचा प्रत्येक विद्यार्थ्यांने विचार करणे आवश्यक आहे.
दहावी आणि बारावीची परीक्षा जीवनात अत्यंत महत्वाचे आहेत याबाबत काही दुमत नाही. ह्या परीक्षा जीवनाला वळण देतात त्यामुळे या कडे पालक आणि विद्यार्थी गांभीर्याने लक्ष देतात नव्हे दिलेच पाहिजे. परंतु त्याची तयारी फक्त दहावी किंवा बारावीच्या वर्षात करून चालणार नाही हे ही लक्षात घ्यावे. प्राथमिक वर्गापासून मुलांच्या अभ्यासाकडे पालकानी लक्ष द्यायला हवे. मुलांना दडपण वाटेल अशी आपली वागणूक मुलांच्या आयुष्यासाठी घातक ठरु शकते. मुलांची आवड निवड लक्षात घेऊन त्यांच्या सोबत मैत्रीपूर्वक वागल्यास मुले आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलणार नाहीत. विद्यार्थ्यांनी सुद्धा पालकांच्या आणि परिवारातील सर्व सदस्यचा विचार करून आपले वर्तनुक ठेवावी. एका परीक्षेत अपयश मिळाले म्हणून नाराज न होता कश्यामुळे अपयश मिळाले याचा मागोवा घेऊन त्रुटी पूर्ण करावे आणि पुन्हा नव्या जोमाने परिक्षेला तोंड द्यावे. त्यावेळी जे यश मिळेल त्याची जीवन भर संपणार नाही. आपल्या हातून एक सुंदर विश्व निर्माण होणार आहे आणि त्याचे श्रेय अर्थातच आपणास मिळणार आहे. तेंव्हा चला कवी केशवसुत यांचे कवितेतील ओळी सदा स्मरणात ठेवू या " जुने जाऊ द्या मरणालागुनी जाळुनी किंवा पुरुनी टाका"

जीवनातील यशस्वी पुरुष

दोन बायका एका छताखाली जीवन जगुच शकत नाहीत हे निर्विवाद सत्य आहे. मग त्या दोन बायका सासू-सुन असेल जावा-ननंद असो वा दोन जावा. ज्यांच्या घरात ही जोडी आनंदाने एकत्र राहतात असे दिसेल त्यांना उत्कृष्ट परिवार म्हणून घोषित करण्यास काही एक हरकत नाही. यांचे एकमेकांना कधीच
पटत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन यांचे वाद आणि भांडण होत राहतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंब व परिवार काळजी व चिंता ग्रस्त होऊन जातो. घरातील सदस्य म्हटल्यावर सर्वावर सारखेच प्रेम असते आणि हक्क सुद्धा सारखेच. एकीला बोलावे तर दुसरीला राग घरातील पुरुषाची अवस्था अडकित्यात सापडलेल्या सुपारी सारखी होते. काय करावे हेच सूचत नाही. इकडे आड आहे अन इकडे विहीर.
अश्या विपरित परिस्थिती मध्ये पुरुषाची खरी सत्वपरीक्षा ठरते. पुरुष शेवटी आपल्या आई-बहीन यांचेच ऐकतो बायकोचे काहीच ऐकत नाही असा आरोप सासरची मंडळी तिच्याकडून बोलताना करतात. पत्नी समजून घेईल या आशेवर पुरुष घरातील मंडळी कडून बोलते झाला की त्याची अवस्था धोबी का कुत्ता घर ना घाट का अशी होऊन जाते. एखाद्या घरात पुरुष आपल्या बायकोचे ऐकून वागतो तेंव्हा त्याला आपल्या जवळचीच मंडळी खुप नावे ठेवतात. हा बायकोचा ऐकणारा बाईलगा झालाय. बायकोपुढे याला काहीच दिसत नाही. लहानाचा मोठा केला तर साधी विचारपुस नाही की चौकशी नाही. असे वेगवेगळे आरोप आत्ता घरातील लोकच लावतात तेंव्हा पुरुषानी वागावे तरी कसे असा प्रश्न सतावितो. याच वैमनस्य मधून कुटुंबातील कलहाने एकाचा मृत्यू अश्या आशयाची बातमी वाचली की कुटुंबातील हे चित्र डोळ्यासमोर येते. वास्तविक पाहता बायकोला पुरुषानी विश्वासात घेऊन एकांतात जर समज दिली तर हे वाद मिटू शकतात. मी करतो मारल्यासारख आणि तू कर रडल्या सारख ही *सर्जिकल पध्दत* वापरली तर आपले जीवन यशस्वी होऊ शकेल.वाद विवाद भांडण तंटा प्रत्येकाच्या घरी आहे. असे एकही घर सापडणार नाही जेथे भांडण नाही. त्यामुळे घरातील समस्याचा निपटारा पुरुषानी योग्य प्रकारे हाताळणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्या सुंदर जीवनाचे तीन तेरा वाजले म्हणून समजा.

- नागोराव सा. येवतीकर, 
   मु. येवती ता. धर्माबाद 
   09423625769

Sunday 25 December 2016

साहित्य दरबार वैचारिक लेखमाला स्पर्धेतील माझा लेख


Good Bye 2016

माझ्या नजरेत 2016 वर्ष


पाहता पाहता 2016 वर्ष संपले. वेळ कुणा साठी कधीही थांबत नाही. सेकंद काटा सरकतो, तो मिनीट काट्याला हलवतो, मिनीट काटा तास काट्याला पुढे ढकलतो आणि तास जसे जसे पुढे जातो तसे तसे दिवस संपतात. दिवस सरु लागले की वर्ष संपायला येते. म्हणजेच या प्रक्रियेत सेकंदाला खुप महत्त्व आहे कारण तेथून आपली क्रिया प्रारंभ होते. वर्षा मागून वर्ष सरत गेले तसे 2016 हे ही वर्ष सरले पण या 2016 वर्षाने माझ्या नजरेस काय दिले ? या वर्षात मी काय शिकलो किंवा अनुभव घेतला याचा थोडक्यात सारांश घेण्याचा हा प्रयत्न.

भारत स्वातंत्र्य होऊन 69 वर्षाचा कालावधी उलटून गेली परंतु भारता समोरील काही ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक अजुनही झाली नाही. पुढील काही वर्षात तरी होईल किंवा नाही याबाबत ही काही सांगता येत नाही. भारत-पाकिस्तानचा काश्मीर बाबत काही तोडगा निघत नाही. त्यामुळे रोज सैनिकांमध्ये गोळीबार ची धुमश्चक्र चालूच आहे. भारतातील कोणाच्या ना कोणाच्या घरातील दिवा विझत आहे. देशाच्या संरक्षणसाठी सैनिक जीवाची बाजी लावत आहे. यावर्षी बरेच सैनिक लढाईत मृत्यू मुखी पडले. आपल्या शेजारी किंवा गाव शेजारी मधील सैनिक मृत्यू मुखी पडल्यावर आपणास खरे दुःख कळून आले. शहीद झालेल्या वीर पुत्रास श्रध्दांजली अर्पण करून त्यांचे दुःख कळणार नाही. हे कुठे तरी थांबले पाहिजे. जागतिक शांतताचे पुरस्कार्त्यनी याविषयी लक्ष देऊन ही समस्या सोडविली पाहिजे. अन्यथा हे असेच चालू राहील आणि विनाकारण आपले युवक जवान मारले जातील. त्यामुळे यावर्षी प्रकर्षाने प्रत्येक भारतीय व्यक्तीला जाणवलेले दुःख म्हणजे भारतीय जवानाचे बळी. 

भारतातील जातीयता हा एक न संपणारा विषय. यावर्षी पूर्ण ताकदीने डोके वर काढल्याचे जाणवले. आरक्षण आणि इतर मुद्दे लक्षात घेऊन मराठा समाजाने मूक मोर्चाचे आयोजन जिल्हा पातळीपासून राज्य पाताळीपर्यंत करून समाजातील प्रत्येक घटकाचे आपल्या कडे लक्षवेधून घेण्यात यशस्वी झाले. शासनाने देखील त्यांच्या मूक मोर्चाचे कौतुक केले. मोर्चा काढायाचे आणि सर्वत्र घाण व्हायचे हे जे चित्र पूर्वी होते ते चित्र या मोर्चाने पार बदलून टाकले. कुठला गोंधळ नाही, झालेला कचरा साफ करणे, इतर लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे, लोकप्रतिनिधी कुठे ही समोर दिसले नाही त्याऐवजी सामान्य जनता बाल गोपाळ, महिला ह्या आघाडीवर दिसत होते. यामुळे लोकांना खुप चांगली शिकवण मिळाली. सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करेल किंवा नाही माहित नाही मात्र लोकांची एकजुट दाखविण्यात त्यांना यश मिळाले. ही जमेची बाजु धरल्यास याचे समाजात प्रतिकूल परिणाम बघायला मिळाले. त्यांचा आरक्षण पाहिजे म्हणून मोर्चा तर इतर त्याच्या विरोधात मोर्चा. प्रत्येकजण आपल्या जातीचा किंवा समाजाचा मोर्चा काढून समाजाचे शक्तिप्रदर्शन करण्याची शर्यत लागल्यासारखे मोर्चे निघाले. जे की सामाजिक समतेच्या अगदी विरुध्द आहे. स्वतः पुरते विचार करणाऱ्याची संख्या वाढू लागली. जे की देशाच्या विकासासाठी खुप घातक ठरू शकते. यावर्षी हे समाजातील प्रत्येक जात आणि जमात निहाय काढण्यात आलेले मोर्चे लक्षात राहण्यासारखे झाले आहे. त्याचे काय परिणाम होतील ते पुढील वर्षात पहायला मिळतील असे वाटते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 08 नोव्हेंबर रोजी रात्री 08 वाजता नोटा बंदी जाहीर केली. हे कोणताही भारतीय विसरु शकणार नाही. ज्या व्यक्तीला या नोटा बंदी चा त्रास झाला असेल तो तर आजन्म सुध्दा विसरणार नाही अशी ही ऐतिहासिक घटना 2016 मध्ये घडली. ज्याची नोंद इतिहास ही घेईल. देशातील काळा पैसा संपवावे आणि भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्यासाठी मोदी सरकार ने उचललेले पाऊल खुप कठीण होते याची जाणीव त्यांना होती पण देशातील जनतेला अच्छे दिन यावे म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय किती चांगला होता हे पन्नास दिवसाच्या काळात दिसून आले. कित्येक श्रीमंत लोक जे की आपल्या जवळ पैसा बाळगुन होते त्यांच्या पाया खालची जमीन सरकली, कित्येक व्यापारी कर न भरता आपला पैसा दाबून ठेवत होते. खरा व्यवहार कधीही दाखवत नव्हते. अश्या सर्व लोकांना एका ट्रैकवर आणण्याचे काम कैशलेश व्यवहार मुळे आले आहे. जनतेला थोडा त्रास होईल पण भविष्य चांगले असेल तर त्रास ही सोसायला हवे. त्यामुळे 2016 मधील न विसरणारी घटना म्हणजे पाचशे आणि हजार रूपयाच्या नोटावर आणलेली बंदी.

भारतीय लोकांवर चित्रपटाने नेहमीच भुरळ घातलेली आहे. काळ बदलत गेला तसे नट-नटी ही बदलत गेले मात्र प्रेमकहाणी ला तेंव्हा जेवढा प्रतिसाद मिळत होता तेवढाच प्रतिसाद आज ही मिळतो आहे, ही सत्य बाब आहे. दरवर्षी कोणता न कोणता चित्रपट सगळ्याचे लक्ष वेधुन घेतो आणि वर्षभर त्याच चित्रपट, कलाकार आणि गाणे याविषयी चर्चा होत राहते. प्रत्येक वर्षी हिंदी चित्रपटाची चलती राहते मात्र यावर्षी मराठी मधील नागराज मंजुळे यांचा चित्रपट सैराट ने सर्वाना तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले. पटकथा, संवाद, गाणे आणि इतर सर्व बाबीने हा चित्रपट सर्वत्र गाजला. नविन कलाकार घेऊन चित्रपट यशस्वी नव्हे तर यशोशिखर गाठणे खुप अवघड असते. मात्र पहिल्या वहिल्या चित्रपटाने रिंकू राजगुरु ला देश स्तरावर पुरस्कार मिळावे यातच या चित्रपटाचे यश लपलेले आहे. वर्ष संपेल तरी सैराटची जादू अजुनही ओसरली नाही. जशी सपना-वासू ची जोडी एक दूजे के लिए प्रसिध्द झाली. या चित्रपटानंतर सैराट चित्रपटमध्ये गाजलेली परश्या-आर्ची ची जोडी लोकांच्या लक्षात राहील असे वाटते.

थोडसे खेळ जगताकडे पाहिलो तर अनेक घटना डोळ्यासमोरुन तरळतात. भारतीय क्रिकेट संघासाठी विराट कोहली हा एक कसोटी कर्णधार म्हणून पर्याय उपलब्ध झाला आहे. यावर्षी विराटने आपले पूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रीत केल्यामुळे इंग्लैडच्या संघाला व्हाईटवाश देता आले. तसेच आयसीसीच्या रैंकिंगमध्ये आर.अश्विन या भारतीय क्रिकेटपटु ला अव्वल स्थान मिळाले एवढेच नाही तर आयसीसी क्रिकेटर ऑफ द इअर आणि आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इअरसाठी त्याच्या नावाची घोषणा झाली हे प्रत्येक भारतीयासाठी नक्कीच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे, यात शंकाच नाही. आशिया चषक टी - 20 मध्ये भारतीय महिला संघाने पाक महिला संघाचा पराभव करीत चषक भारताच्या नावे केला आहे, हे ही अभिमानास्पद आहे. करुण नायर सारखा त्रिशतक फटकावणारा सर्वात युवा फलंदाज भारताला लाभला. वीरेंद्र सेहवाग नंतर अशी कामगिरी करणारा हा दूसरा खेळाडू. 19 वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताने श्रीलंकेवर 34 धावांनी विजय मिळवित चषक आपल्या नावावर केले त्यामुळे भारताचा या खेळातील दबदबा कायम राहिला. भारताची बॅडमिंटनपटु पी. व्ही. सिंधूने मिळविलेले यश प्रत्येक भारतीय खेळाडूला नक्कीच प्रोत्साहित करेल.

जरा साहित्य क्षेत्रात काय घडामोडी घडल्या याचे अवलोकन करू या. साहित्य क्षेत्रात डोंबिवलीमध्ये होणाऱ्या 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.अक्षयकुमार काळे 700 मतांनी विजयी झाले. परभणीचे प्रसिद्ध लेखक आसाराम लोमटे यांच्या ‘आलोक’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा मराठी भाषेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला. भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार बंगाली भाषेतील प्रसिध्द कवी शंख घोष यांना जाहीर झाला अश्या अनेक सुखदायी चांगल्या गोष्टी घडल्या तर काही गोष्टी कधीही त्याची झीज भरून निघणार नाही अश्या घडल्या ज्यात ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे पुण्यात निधन झाले. ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे वयाच्या 78 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तामिळनाडुच्या मुख्यमंत्री आणि दक्षिण भारतात अम्मा या नावाने सुप्रसिध्द असलेल्या जयललिता यांचे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात निधन झाले. पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कारांचे मानकरी असलेले गायक, संगीतकार एम. बालमुरलीकृष्ण यांचं 86व्या वर्षी निधन झाले. 

जुने जाऊ द्या मरणालागुनी जाळूनी किंवा पुरुनी टाका कवी केशवसुताच्या ओळीनुसार झाले गेले विसरून नविन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज राहु या. गेल्या वर्षी झालेल्या चूका पुन्हा यावर्षी होणार नाहीत याची काळजी घेतली तर प्रत्येक वर्ष आपणास आनंद देत राहील असा विश्वास वाटतो.

येणारे नविन वर्ष 2017 सर्वासाठी सुखदायी आणि उत्साहवर्धक असो, स्वच्छ भारतात स्वच्छ व्यवहार करणारे असो अशी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो.

- नागोराव सा. येवतीकर

  मु. येवती ता. धर्माबाद

  9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...