Wednesday, 12 March 2025

होळी व धुलीवंदन ( Holi & Dhulivandan )

*🔫 होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा 🔫*
फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळी हा सण आपल्या आयुष्यात अनेक रंग घेऊन येतो. होळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यातून मोठ्या आनंदात आणि उत्साहाने साजरा केला जातो. पण कृत्रिम रासायनिक रंगांचा, अंड्याचा, पिशव्यांचा बेशिस्तपणे वापर केला जातो. या कारणामुळे पर्यावरणाला व माणसाला त्रास होतो. म्हणून स्वत:ची काळजी घेऊन इको फ्रेंडली होळी खेळली पाहिजे.

 नासा येवतीकर, स्तंभलेखक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आमची होळी आणि धूलिवंदन

झजरी दादा, झजरी दादा
फाल्गुन महीना सुरु झाला की आमच्या बच्चे कंपनी ला खुप आनंद व्हायचा कारण सर्वात आवडणारा आमचा होळी चा सण जवळ आलेला असायचा. होळी च्या पंधरा दिवासपूर्वीच आम्हाला वेध लागायाचे. तीन चार मित्र मिळून एक गट केल्या जायचे. सुताराजवळ जाऊन दोन छान लाकडे तासुन घ्यायचे, ज्यास आज टिपरी म्हणतात हे कळले. ते दोन लाकडे एकमेकावर आपटून प्रत्येकाच्या घरा समोर जाऊन *झजरी दादा, झजरी दादा* हे गीत म्हणत असू. हे गीत मराठी व तेलगू मिश्रित होती. 

आम्ही लहान असतांना हे गीत म्हणत घरोघरी ज्वारी मागत असू. आपल्यासाठी सदरील गीत येथे देत आहे.

*होळीची एक आठवण*

झजरी दादा, झजरी दादा
आल्यान गोफण, पल्यान डोळा
डोळ्याचं राखण काय रे दादा
रुंगरुंग पिला रुपया दंडा
दंडा कादू रा दमेली मोंगा
मोंगा कादू रा मोतका निडा
निडा कादु रा निमला बाई
बाई कादु रा पोराडू जुट्टू
जुट्टू कादू रा मिशाला पोट्टू
हडेल पडेल जिंका पिला
पट्टा पेई ते पाम पिला
मुसलदो तसलदो
मुडू कोत्तलं रोयल तेच्या
अचल पचल कारम नूऱ्या
आकिटल्या पेटते आईक मन्या
गुटल्या पेटते गुटूक मन्या

हे गीत म्हणून खांद्यावर असलेल्या झोळीमध्ये घरातील माई, ताई, अक्का वाटीभर ज्वारी टाकायचे. हे दिवस म्हणजे प्रत्येकांच्या घरी शेतातून ज्वारी आलेली असायची त्यामुळे ज्वारी देताना कोणी कुरकुर करायचे नाही. जर कोणी दान दिले नाही तर त्यांच्या नावाने बोंबा मारुन पुढे जायचो. असे आम्ही रोज पंधरा दिवसात पूर्ण गाव पिंजुन काढायचो. जवळपास एक-दीड पायली ज्वारी जमा व्हायची. ते सर्व ज्वारी दुकानात विकून मिळालेल्या पैश्यात खोबऱ्याचे व साखरचे प्रत्येकाला एक-एक मिळेल असे घ्यायचो आणि उरलेल्या पैश्यात रंग घेत असू. होळी च्या सायंकाळी आम्ही सर्व मित्र मारोतीच्या पारा जवळ जेथे होळी तयार केलेली असायची तेथे जमा व्हायचो. वेगवेगळ्या नावाने मग बोंबा मारायचो. गावातील मानकरी वाजत गाजत येऊन होळी पेटवायचा. आम्ही होळी तील जाळ घरी नेऊन छोटी होळी करायचे आणि त्यात खोबरा व हरभरा भाजून खायचो. मग रात्री जेवताना पूरणपोळी आणि कढ़ी ची मजा काही औरच असायची. दुसऱ्या दिवशी सकाळ होण्याची वाटच पाहत असू. सकाळपासून मग मित्रा मध्ये रंग खेळण्याची मजा यायची. कोणी कोणास ओळखू येणार नाही एवढा रंग लावले जायचे. दुपारपर्यंत रंग खेळून झाल्यावर स्नान करून मग घरातच बसायचो. आज परत ते सर्व दिवस आठवू लागले. ते मित्र परत दिसू लागले. परत एकदा छोटे व्हावे आणि खुप मजा करावे असे वाटते. 

आपली आठवण अशीच येत राहो, मित्रांनो आपणा सर्वाना होळी आणि धूलिवंदनच्या रंगबिरंगी शुभेच्छा.
- नासा येवतीकर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कविता - विविध रंगाची होळी

आली आली बघा हो होळी
खाऊ चला पुरणाची पोळी
अवगुण सारे दहन करून
करु या त्याची राखरांगोळी

आज होळीचे करून पूजन
देऊ पुरणपोळीचा नेवैद्य
खायला कुणा कमी न पडो
मिळत राहो गोडगोड खाद्य

फाल्गुन महिन्याचा चंद्र
आकाशी दिसतो कसा शुभ्र
वसंत ऋतूला होते प्रारंभ
हवामान कोरडे नि निरभ्र

होळीच्या दुसऱ्या दिवशी 
असतो विविध रंगाचा खेळ
विविध रंगात विभागलेल्या
लोकांना एकत्र येण्याची वेळ

लाल पिवळा निळा हिरवा
रंगाने एकमेकांना रंगू या
एकमेकांच्या सुखदुःखात
एकत्रित साजरी करू या

पाण्याचा अपव्यय टाळा
अंडे फेकून मारू नका
कोरड्या रंगाने होळी खेळा
रंगपंचमी बेरंग करू नका

- नासा येवतीकर, 9423625769

होळी आणि धुलीवंदनाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कविता - होळी करू या ....

होळी करू या दुर्गुणाची
होळी करू या संशयाची
होळी करू या कुविचारांची
होळी करू या दुराचाराची
होळी करू या द्वेषाची
होळी करू या आळसाची
होळी करू या कपट बुद्धीची
होळी करू या वासनेची
होळी करू या लालसेची
होळी करू या मत्सरेची
होळी करू या व्यसनाची
होळी करू या भ्रष्टाचाराची
होळी करू या वाईट संगतीची
होळी करू या वाईट बाबींची
चला होळी करू या .....

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
...... होळी रे होळी .....

होळी आली रे बघ होळी आली
नाना रंगाची झोळी घेऊन आली

मनातला राग द्वेष काढून टाक
सांगत आला आहे लाल रंग
सकारात्मक विचार करून वाग
बोलतो आहे हिरवा हिरवा रंग
विचारात क्रांती करण्या आली
होळी आली रे बघ होळी आली

सर्वाना आपल्यात सामावून घे 
संदेश देत आहे बघ रंग निळा
इतरांच्या दुःखाचे निवारण कर
आदेशाने सांगतोय रंग काळा
वागण्यात बदल करण्या आली
होळी आली रे बघ होळी आली

धैर्याने संकटाला तोंड देत राहा
प्रेरणा देत आहे तुला केसरी रंग
प्रगतीसाठी अविरत चालत राहा
प्रोत्साहित करतोय पिवळा रंग
जगण्याची उर्मी देण्या आली
होळी आली रे बघ होळी आली

जीवनातील दुःख विसरायला लावी
आठवण करून देती बालमित्रांची
जात-पात धर्म-पंथ बाजूला सारी
सर्वधर्मसमभावची ओळख ही देती
होळी आली रे बघ होळी आली

आबालापासून वृद्धापर्यत सर्वाना आवडणारी
रंगात न्हाऊन निघती अवघी सृष्टी ही सारी
सर्व सणात आहे ही आगळी वेगळी
होळी आली रे बघ होळी आली

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ही माहिती आपणास आवडली असेल तर 9423625769 या क्रमांकावर whatsapp करावे.

Tuesday, 11 March 2025

जीवन गाणे (Jeevan Gaane )

जीवन गाणे - आनंदी तराणे
चित्रपटातील गाणे असो वा इतर कोणतेही गाणे कुणाला आवडत नाहीत. लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनाच गाणे खूप आवडतात. मुळात मनुष्य लहानाचा मोठा होता ते गाणे ऐकतच. गाण्याचा आणि माणसाच्या आयुष्याचा फार जवळचा संबंध आहे. बाळाला छान झोप लागावी म्हणून आई छानशी अंगाई गीत गात असते जसे की निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई ...... त्या गुणगुण्याचा आवाज कानी पडताच बाळ अलगद आपले डोळे मिटतो आणि झोपी जातो. थोडं मोठा झाल्यावर जेव्हा तो चालू आणि पळू लागतो त्यावेळी त्याला बडबड गाणे एकविले जाते आणि बोबड्या बोलीतून बोलाविले जाते. तो आपल्या बोबड्या बोलीत जेव्हा एखादे गाणे म्हणतो तेव्हा आई-वडिलांना किती आनंद होतो. अर्थात गाणे सुरात म्हटले पाहिजे असा आपला अट्टाहास कधीच नसतो आणि तो नसायला ही नको हवे. त्यानंतर मूल ज्यावेळी शाळेत प्रवेश करतो त्यावेळी त्याला अनेक कविता व गाण्याची ओळख होत जाते. पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात त्या मुलांचा आवडता भाग म्हणजे गाणे. जे शिक्षक या वर्गातील मुलांना जास्तीत जास्त गाणे ऐकू घालतात ते त्या मुलांचे सर्वात प्रिय बाई किंवा गुरुजी म्हणून ओळखल्या जातात. गाण्यात काय ताकद आहे ? हे त्या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांना चांगलेच ठाऊक असायला हवे. शाळेच्या प्राथमिक वर्गात मुले जे काही काही शिकतात ते त्यांच्या चिरकाल स्मरणात राहतात, त्यात गाण्याची खूप मोठी भूमिका असते. आज पन्नाशी ओलांडलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या बालपणाविषयी विचारले तर ती व्यक्ती बालपणीची स्मरणात असलेली एखादी कविता गाऊन दाखवितो. यावरून गाण्याची ताकद आपणाला समजून येईल.
माणसाचे वय जसजसे वाढत जाते तसतसे गाण्याची आवड देखील बदलत जाते. पूर्वीच्या काळी गाणे ऐकण्यासाठी रेडिओ हे एकच माध्यम होते. आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणारे गाणी ऐकण्यासाठी कान आसुसलेले असायचे. बऱ्याच आकाशवाणी केंद्रावरून त्याकाळी पत्रव्यवहारावर आधारित आपली आवड किंवा आपकी पसंद अश्या कार्यक्रमात तून गाणी ऐकविले जात असे. आपले आवडते गीत ऐकावे म्हणून बरेच रसिक मंडळी पत्राद्वारे आपल्या आवडीचे गाणे लिहून पाठवत असत यासाठी आजही सिलोन व विविधभारती या आकाशवाणी केंद्राची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मध्यंतरीच्या काळात टेपरेकॉर्डर आल्याने आपल्या मनावर गाणे ऐकण्याची सोय झाली. कॅसेटच्या माध्यमातून अनेकजण आपल्या आवडीचे गाणे ऐकू लागले. गुलशन कुमार यांची टी सिरीज नावाची कंपनी याच काळात भरभराटीस आली होती. अश्याच काळात फक्त गाण्याचा शो म्हणून ऑर्केस्ट्रा खूप चालला होता. अनेक कलाकारांना यामुळे स्टेज शो करण्याची संधी ही मिळाली होती. अनेक जणांनी यातून आपले करिअर देखील घडविले. पण गाण्याच्या या स्टेज शोला देखील गळती लागली. त्यानंतर टीव्हीचा जमाना सुरू झाल्यावर लोकांना गाणे ऐकण्यासोबत बघण्याची संधी उपलब्ध झाली. ज्यावेळी दूरदर्शन ही एकच वाहिनी देशभरात बघितले जायचे त्यावेळी येथे प्रसारित होणारी हिंदी सुमधुर गाण्याची रंगोली कोणी ही विसरू शकत नाही. ह्या कार्यक्रमाने प्रत्येकाच्या रविवारची सकाळ प्रसन्नतेने सुरुवात व्हायची. एका तासाभराच्या कार्यक्रमात एखादे गाणे दिवसभर मनात रुंजी घालायचं. याच टीव्हीमुळे टेपरेकॉर्डर मागे पडून व्हीसीआर पुढे आलं. त्यातून रसिक मंडळी आपले आवडते गाणे वाट्टेल तेव्हा टीव्हीवर पाहू लागले. मग डीव्हीडीचा जन्म झाला. मग श्रोते खूप गाणे एका डीव्हीडी मध्ये पाहू लागले. असे करता करता मोबाईलची क्रांती झाली आणि रेडिओ, टेपरेकॉर्डर, व्हीसीआर, डीव्हीडी हे सर्व एका अडगळीत कोपऱ्यात जाऊन बसले. आज एका क्लीकवर आपणाला आवडणारी गाणी ऐकू शकतो आणि पाहू शकतो. त्याला ना वेळेचे बंधन आहे ना काळाचे. पण अर्थातच जुन्या काळात ठराविक वेळेत मिळणारी मजा या मोबाईलच्या जमान्यात नक्कीच नाही. 
तरी देखील गाणे हे मनाला आनंद व समाधान देणारी एक बाब आहे. म्हणून प्रत्येकाने आपले आवडते गाणे ऐकायला व पाहायलाच पाहिजे. अजून त्यापुढील संतोष मिळविणारी बाब म्हणजे आपला आवाज कसे ही का असेना ते गुणगुण करायला पाहिजे. जसे की एक मराठी गीत आहे, मनाच्या धुंदीत लहरीत ये ना, सखे गं साजनी ये ना. तसे आपण ही गाण्याच्या धुंदीत लहरीत जगायला शिकले पाहिजे. मनावरील ताणतणाव, चिंता, काळजी आणि नैराश्य दूर करण्यासाठी आपल्या मनपसंत गायक गायिका यांच्या आवाजातील सुमधुर आणि कर्णमधुर गाणे ऐकायला पाहिजे. घरात निवांत क्षणी अगदी बारीक आवाजात किशोरदा, रफी साहेब आणि लता दीदी यांचे गाणे घरातील वातावरण अजून प्रसन्न केल्यासारखे वाटते. मित्रांनो, आपल्या जीवनात समाधान मिळविण्यासाठी गाणे ऐकणे हा एक सुंदर पर्याय तुम्हांला कसा वाटतो ? यावर एकवेळ जरूर विचार करावा. 

- नासा येवतीकर, स्तंभलेखक, धर्माबाद
9423625769

आधार ( Aadhar )

आधार जीवनाचा सौंदर्य संस्कृत भाषेत एक श्लोक आहे  आधारो हि जीवनस्य, संकटे दीपकः स्मृतः। साहाय्यं कुरु सर्वेषां, भव जीवनसंगतः॥ आधा...