Thursday 15 February 2018

बालपणीचे संस्कार भाग 04


पाणी म्हणजे जीवन आहे

मुलांनो, पाण्याचे दुसरे नाव म्हणजे जीवन. पृथ्वीवर पाणी राहिले नसते तर जीवसृष्टी राहिली नसती आणि आपणही राहिलो नसतो. पृथ्वीवरील सर्वच सजीवांना त्यांचा वाढ आणि विकास होण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. पृथ्वीचा 71 टक्के भाग हा जरी पाण्याने व्यापलेला असला तरी फक्त 3 टक्के एवढेच पाणी फक्त वापरण्यास योग्य आहे. दरवर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे आपणावर वारंवार जलसंकटे निर्माण होत असतात. आपण वेगवेगळ्या प्रकारे पाण्याचा अपव्यय करतो. मुबलक पाणी उपलब्ध असताना उधळपट्टी करतो आणि पाणी टंचाईच्या काळात डोळ्यात पाणी आणून पाणी कोठे मिळते काय ? याचा शोध घेतो. असेल तर दिवाळी नाही तर होळी या उक्तीप्रमाणे आपले वागणे आहे. आपण आपल्या रोजच्या वागणुकीमध्ये बदल केला तरी खुप काही होऊ शकते. घरातील पिण्याचे पाणी असो वा सांडपाणी त्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी आपण आजपासून घेतली तर भविष्यात आपणाला त्याचा त्रास जाणवणार नाही. तशी सवय आपणास लहानपणापासून म्हणजे शालेय जीवनात असणे आवश्यक आहे. हीच सवय पुढे पाणी बचत करण्यास कामी येऊ शकते. पाणी हे कधी ही शिळे होत नाही याची माहिती शालेय मुलांच्याद्वारे आईपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. सांडपाण्याचा निचरा करताना त्यावर काही फुलझाडे आणि फळझाडे जगविण्याचा प्रयत्न जरूर करावा. त्यामुळे आपणास रोज चांगली चांगली फुले आणि फळे मिळू शकतात. शाळेतून परत घरी जाताना वॉटरबैगमध्ये शिल्लक असलेले पाणी रस्त्यावर न फेकता एखाद्या झाडाला टाकावे म्हणजे झाडांची निगा राखली जाते. घरात आलेल्या पाहुण्याना ग्लास भरून पाणी देण्यापेक्षा अर्धा ग्लास पाणी द्यावे. म्हणजे त्यांना गरज असेल तर पुन्हा मागतील. पण ग्लास भरून पाणी दिलोत आणि त्यांनी थोडेसे पाणी प्याले तर बाकीचे पाणी फेकावे लागते. आपण स्नान करताना एका बकिटमध्ये मावेल एवढ्या पाण्यातच स्नान करावे. बहुतांश मुले दोन-तीन बकिट पाणी भरून स्नान करतात, ही सवय मोडित काढणे आवश्यक आहे. शॉवरखाली स्नान करताना वेळेचे बंधन पाळल्यास पाण्याची बचत होईल. नळाखाली हात-पाय आणि तोंड धुण्याऐवजी मग किंवा जगाचा वापर केल्यास कमी पाण्यात हे काम होऊ शकते. अश्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लहानपणी गांभीर्याने लक्ष दिल्यास त्याचा भविष्यात नक्की फायदा होतो. त्यामुळे तहान लागली म्हणून विहीर खणत बसण्यापेक्षा त्याची तयारी आधी पासून करू या

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बालपणीचे संस्कार भाग 05


शिस्तीचे महत्त्व आणि सवय 

मुलांनो, आपणाला शिस्त म्हटले की राग येतो. घरात शाळेत वा परिसरात कुठे ही जा आपणाला प्रत्येकजण शिस्तीचेच धडे देतात. खरोखर आपल्या जीवनात शिस्तीला एवढे महत्त्व आहे काय ? तर याचे उत्तर मिळते होय. जीवनात आपणाला यशस्वी व्ह्ययचे असेल तर आपल्याजवळ ज्ञान, बुद्धिमत्ता, जिद्द, चिकाटी, प्रचंड श्रम करण्याची तयारी याच्यासोबत काटेकोरपणे काम करण्याची शिस्त असणे गरजेचे आहे. त्याशिवाय आपले जीवन व्यर्थ आहे असे समजायचे. आज आपण जेवढ्याही महान व्यक्तीचे नाव स्मरणात ठेवतो जसे की, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि तुमचा आमचा सर्वांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हे सर्वच जण आपल्या जीवनात कधीही शिस्त मोडली नाही. त्यामुळेच तर ते महान आहेत. आपल्या रोजच्या दिनचर्येत कसलीही शिस्त नसेल तर ठरविलेल्या वेळात एखादे काम पूर्ण करूच शकत नाही. मग शालेय मुलांसाठी शिस्त म्हणजे काय असते ? शाळेच्या वेळापत्रकानुसार शाळेत उपस्थित राहणे, गणवेषामध्ये शाळेत जाणे, शाळेत दिलेला गृहपाठ व अभ्यास न विसरता पूर्ण करणे, आई-वडील आणि मोठ्याना दररोज नमस्कार करणे, सर्वांशी प्रेमाने बोलणे आणि वागणे इत्यादी ही यादी अजुन लांबलचक होऊ शकते. शिस्तीचे काही नियम स्वतः तयार करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा, असे वागल्यामुळे काय होते ? असाही प्रश्न मनात येत असतीलच. शालेय जीवनात शिस्तीत वागले की, त्या शिस्तीचे रूपांतर हळूहळू सवयीत होते आणि आपण एक आदर्श नागरीक म्हणून जीवन जगू शकतो. सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपी जाणे यात शिस्त असेल तर व्यक्ती अलार्म न लावता उठू शकतो आणि वेळ न पाहता झोपी जातो. शिस्तीचे सवयीमध्ये रूपांतर झाले की, आपले मन द्विधा मनस्थितीत कधीच येत नाही. तर चला मग आपण शिस्तीत वागू या आणि समृद्ध भारत देश घडविण्यास मदत करू या..!

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक 
मु. येवती ता. धर्माबाद 9423625769  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बालपणीचे संस्कार भाग 06

*यशस्वी जीवनात वेळेचे नियोजन*

भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून वेळेचे महत्त्व सांगितलेले आहे. शालेय जीवनात आपण वेळेचे महत्त्व जाणून न घेता त्याचा अपव्यय म्हणजे वाया घालवित राहलो, तर भविष्यात यशस्वी जीवन कधीच जगु शकत नाही. जगात कुणी श्रीमंत असतील वा गरीब असतील सगळ्याजवळ वेळ मात्र समसमान आहे. जे कुणी वेळेचा सदुपयोग करतील तेच जीवनात प्रगती करू शकतील. जगात तीन गोष्टी प्रसिध्द आहेत ज्या की एकदा गेल्या नंतर परत मिळविता येत नाहीत. त्या म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण, तोंडातून बाहेर पडलेला शब्द आणि सर्वात महत्वाची म्हणजे गेलेली वेळ. आजची गेलेली वेळ कितीही पैसा खर्च केला आणि कितीही धडपड केली तरी परत मिळविता येत नाही. त्यामुळे आपणाजवळ उपलब्ध असलेल्या वेळेचे योग्य नियोजन करता येणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपी जाईपर्यंत उपलब्ध वेळाचे वेळापत्रक तयार करावे. ज्याप्रकारे शाळेतील वेळापत्रकाप्रमाणे तासिका आणि अभ्यासक्रम यांचे नियोजन केले जाते. त्यामुळेच शाळेतील सर्व प्रक्रिया योग्य पध्दतीने घडत असतात. आपल्या जीवनातील सकाळी झोपेतुन उठणे, खाणे, खेळणे, शाळा, शिकवणी, टी. व्ही. पाहणे आणि अभ्यास करणे या सर्व क्रियांच्या वेळा वेळापत्रकात नमूद करून त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केल्यास वर्षभरात ठरविलेली सारेच ध्येय साध्य होताना दिसून येतात. फक्त दहावी आणि बारावी हे अति महत्वाचे वर्ष आहे म्हणून बाकीच्या वर्षात अभ्यास न करता याच वर्षात खुप अभ्यास केल्याने यश मिळत नाही. अभ्यासात सातत्य आणि नियमितपणा ठेवल्यास महत्वाच्या वर्षी कोणत्याही विषयाची भीती वाटत नाही आणि अभ्यास डोईजड वाटत नाही. मित्राशी गप्पा मारत बसणे, जास्त वेळ टी व्ही पाहणे आणि खेळणे इत्यादी प्रकारात वेळेचे नियोजन केल्यास त्याचा नक्कीच उपयोग होतो. आपल्या मेंदुला आणि मनाला वेळापत्रकाची सवय लागली की, "हे काम पूर्ण करा " अशी म्हणण्याची वेळ कोणावरसुद्धा येणार नाही.

- नागोराव सा. येवतीकर 
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बालपणीचे संस्कार भाग 07


पाऊलवाट भाग 07

गर्वाचे घर खाली

मुलांनो, माझ्यासारखा कुणीच नाही अशी भावना जेंव्हा आपल्या मनात निर्माण होते तेंव्हा आपला अहंकार जागा झाला असे म्हणण्यास हरकत नाही. परंतु त्याच वेळी एखादं दुसरा कोणी आपल्या पेक्षा वरचढ आपणाला भेटला तर मात्र त्यावेळी जो त्रास होतो त्याची जाणीव कदाचित स्वतःलाच येऊ शकते. त्यामुळे आपण किती ही श्रेष्ठ असलो तरी नेहमी कनिष्ठ समजत राहिलो तर आपणास अहंकाराचा त्रास होणार नाही. अहंकारी व्यक्तीला दुसऱ्याचा अहंकार कधीच सहन होत नाही, असे प्लुटार्क या तज्ञानी म्हटले आहे. विशेष करून या अहंकाराची भावना बालवयात प्रबळपणे दिसून येते. शालेय जीवनातील मुले माझ्यासारखा मीच या भावनेतून वागत असतात. त्यांच्या तोडीस तोड कोणी मिळाला की, एक तर हिरमुसले होतात किंवा त्याचा द्वेष करतात. म्हणून या वयातच आपण अहंकाराचा नायनाट करायला शिकणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून शाळेत खेळविल्या जाणाऱ्या मैदानी आणि बैठे खेळात, विविध स्पर्धात्मक परीक्षेत, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेत सांस्कृतिक कार्यक्रमातील गायन, नृत्य, अभिनय, नकला आदि प्रकारच्या स्पर्धेत स्वयंस्फूर्तिने सहभागी व्हावे. यामुळे आपल्या अंगातील कौशल्य आणि उणिवा यांची जाणीव होऊन स्वतःचे आस्तित्व स्वतःला कळते. स्पर्धेत होणाऱ्या हार-जीतमुळे जीवनातील चढ-उतार आणि सुख-दुःखाची आपसुकच आपणाला कल्पना येते. आपण एखादे चांगले काम केले वा यश मिळविले तर त्याचा आपणास गर्व होणार नाही याची काळजी पदोपदी घ्यायला हवी. मराठीतील प्रख्यात साहित्यिक व मराठी भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स. खांडेकर यांनी म्हटले आहे की, एखाद्या पराक्रमाचा अभिमान जरूर असावा पण त्याचा उन्माद असू नये. प्रत्येकाना कशाचे नाही तर कशाचे अभिमान जरूर असते आणि तो असावाच मात्र त्या अभिमानाचा अहंकारात रूपांतर होऊ देऊ नये. कारण आपल्याला माहितच आहे गर्वाचे घर नेहमी खालीच राहते. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात की, अहंकार नाशावर प्रार्थना हेच सर्वोत्तम उपाय आहे. म्हणून आपण सर्वानी दिवसातून एकदा तरी प्रार्थना करण्यासाठी वेळ दिल्यास आत्मिक समाधान तर मिळेलच त्याशिवाय अहंकार आपल्या जीवनात प्रवेश करणार नाही.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बालपणीचे संस्कार भाग 08

सत्यं वद: खरे बोला

लहानपणापासून आपणाला एक धडा वारंवार शिकविला जातो ते म्हणजे नेहमी खरे बोलावे, खोटे कधी बोलू नये. शाळेत जाण्यापूर्वी घरात आई-वडील, भाऊ-बहिण यांच्याकडून नेहमीच खरे बोला याची शिकवण घेऊन आपण जसे ही शाळेत जातो तेथे शिक्षक ही आपणाला तेच धडा शिकवितात. खरोखरच खरे बोलणे एवढे महत्वाचे आहे काय ? निश्चितच त्याचे उत्तर होय आहे. एक खोटे (असत्य) लपविण्यासाठी हजारदा खोटे बोलावे लागते. तेंव्हा सत्य बोलण्याची सवय ठेवा म्हणजे कसलीही चिंता करावी लागणार नाही आणि आपण काय बोललो हे लक्षात ही ठेवावे लागणार नाही, असे आर्य चाणक्यानी आपणाला फार पूर्वी उपदेश दिलेला आहे. शाळेत असताना आपणाला याचा वारंवार अनुभव आलेला असेलच. शाळेला यायला उशीर का झाला ? गृहपाठाची वही का आणली नाही ? यासारख्या प्रश्नांची खरी उत्तरे दिल्यास आपणाला कशाची ही भीती वाटत नाही मात्र त्याची खोटी उत्तरे दिली तर आपल्याला नेहमी काळजी लागून राहते की, माझा खोटेपणा उघडे तर पडणार नाही ना ! अशी शंका नेहमी मनात राहत होती. खोटे बोलणाऱ्याची स्थिती चोरांच्या मनात चांदणे या म्हणीप्रमाणे असते. कधी कधी आपली खोटे बोलणे पकडल्या गेली की, खुप वाईट वाटते. खोटे बोललेले दीर्घकाळ टिकून राहत नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे. एक दोन वेळेस खोटे बोलून चालून जाईल मात्र यामुळे खोटे बोलण्याची सवय लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. खोट्याचा जरी विजय झाला, तरी तो क्षणभंगुर असतो असे प्रसिद्ध विचारवंत लियोनार्ड यांनी म्हटले आहे. याचा अनुभव जीवन जगताना आपणास अनेक वेळा येतो. खोटे बोलल्यामुळे क्षणभर आनंद ही मिळतो पण त्याचे परिणाम आयुष्यभर सोबत राहतात. वारंवार खोटे बोलू लागलो तर त्याचा परिणाम असा होतो की, एखादे वेळी जरी आपण खरे बोलत असू तरी ते पुढच्याना खोटेच वाटत राहते. म्हणजे ही " लांडगा आला रे आला " गोष्टीतील मेंढपाळासारखी अवस्था होते. शेख सादी यांनी म्हटल्याप्रमाणे खोटे बोलणे हे तलवारीने केलेल्या जखमेप्रमाणे असते. जखम तर भरून येते मात्र त्याची खूण कायम राहते.
खरे बोलण्याची सवय ही घरातून होत असते. घरातील प्रत्येक व्यक्ती खरे बोलण्याविषयी जागरूक असणे अत्यंत महत्वाचे आहे. लहान मुलांवर खरे बोलण्याचे सा संस्कार घरातूनच दिले जातात. घरातील प्रत्येक सदस्याच्या बोलण्याचे आणि वागण्याचे सूक्ष्म निरीक्षण करतात आणि त्याच पध्दतीने वागण्याचा प्रयत्न करतात. विशेष करून माता भगिनी यांनी खरे बोलण्याचा कटाक्ष पाळावा. मुले जास्तीत जास्त वेळ आई च्या सोबत असतात त्यामुळे त्यांनी मुलांवर खोटे बोलण्याचे संस्कार होणार नाहीत याची काळजी घेतली तर मुले खरी बोलणारी निघतात. आजकाल ची मुलं आई-वडिलांना बनवाबनवी करण्यात पटाईत आहेत. या बाबीचा कुठे तरी आत्मपरीक्षण होणे अत्यावश्यक आहे. तसे राजकारणी लोकांना खोटे बोलण्या चे सांगावे लागत नाही म्हणून लहानपणी कोणी खोटे बोलले की, हा भविष्यात नेता बनेल असे हसण्यावरी नेऊन बोलत असे. राजकारणात खरे बोलणाऱ्या नेत्यांची काहीच किंमत नसते असे आजवरच्या अनुभवावरुन लक्षात येते. मात्र जो जनतेला विसरतो किंवा खोटी आश्वासने देतो जनता अश्या नेत्यांना त्यांची खरी जागा दाखवितात हे ही सत्य आहे. काही मंडळी आपल्या व्यवसायाशी निगडित खोटे बोलतात. ते त्यांचा व्यवसाय असतो, त्याशिवाय त्याची भरभराटी होत नाही. मात्र तेथे देखील त्याचा अतिपणा वाढला की एक ना एक दिवस माती होणार हे ठरलेले आहे. म्हणून जे सत्यमेव जयते चा अर्थ समजून घेतात तेच जीवनात यशस्वी होतात. तुमच्या जवळ पैसा, संपत्ती, मोठे घर, जमीन, जुमला, दागदागिने किती मोठ्या प्रमाणात आहे याला काहीच किंमत नाही. तर तुमचे बोलण्यावर किती जण विश्वास ठेवतात हे महत्वाचे आहे. लोकांचा आपल्या वरील विश्वास पैश्याला बघून नसतोच तो असतो आपल्या सत्य बोलण्यावर. राजा हरिश्चंद्र यांना आपण सर्वजण सत्यवान राजा म्हणून ओळखतो कारण त्यांनी जीवनात नेहमी सत्यच बोलत राहिले, खोटे कधीच बोलले नाहीत. आपण सुध्दा खरे बोलण्याची सवय लावून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. गौतम बुध्दांनी सर्वाना सत्यं वद: म्हणजे खरे बोला याचे आचरण करायला सांगितले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी इंग्रजा विरुद्ध लढा देताना नेहमी सत्याचा आग्रह केला. माझे सत्याचे प्रयोग हे त्यांचे पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्या जीवनात सत्य किती महत्त्वाचे आहे हे कळून येईल. काही वेळा नकळत चूका होऊ शकतात मात्र वारंवार तीच चूक करणे म्हणजे ते घोडचूक होते. म्हणून फ्राउड यांचा उपदेश म्हणतो की, जो मनुष्य खोटे बोलायला घाबरतो, तो कशालाच घाबरत नाही हे  ध्यानात घेऊन आपण यापुढे खरे बोलू या आणि आपले जीवन निर्भय बनवू या.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे

मुलांनो, काम केल्यानेच मनुष्य मोठा होत असतो. रिकामा बसून किंवा फक्त बोलल्याने जीवनात काही प्राप्ती होत नाही. पंचतंत्रात असे म्हटले आहे की, मनुष्याच्या रूपामुळे किंवा कुळामुळे त्याचा गौरव वाढत नाही. तर माणसाच्या कर्तृत्वामुळे, त्याच्या कार्यामुळे त्याचा गौरव वाढतो. आपण जसे बोलतो त्याप्रमाणे वागले पाहिजे. अन्यथा कुणी आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत. शब्दाला कृतीचे तारण नसेल तर शब्द वांझ ठरतात असे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. म्हणूनच दलितांच्या कल्याणासाठी त्यांनी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर नागपूरच्या पावन दीक्षा भूमीत हजारो अनुयायासोबत बौध्द धर्माची दीक्षा घेतली. त्यांच्या प्रत्येक शब्दाला कृतीची जोड होती म्हणून तर ते दलितांसाठी ईश्वरासमान झाले आहेत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीमुळे मानवी जीवन आनंदी होते असे म्हणताना राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आयुष्यभर साधेपणाने राहिले. देशातील अनेक लोकांना अंगभर कपडे मिळत नाहीत तेंव्हा मी पूर्ण कपड्यानिशी कसा राहू म्हणून त्यांनी कपड्याचा त्याग करून पंचा स्वीकारला आणि देशातील लोकांसाठी चरख्यावर सुत कातण्यास सुरुवात केली. गरीबातल्या गरीब व्यक्तीचा त्यांनी विचार केला. याचा अर्थ जे लोक फक्त बोलत नाहीत तर त्या नुसार कृती करतात आणि वागतात ते खरोखरच महान होतात. केवळ गडगडाट करणारे मेघ कधी पाऊस देत नाहीत म्हणूनच गर्जेल ते बरसेल काय ? असे म्हटले जाते ते काही चूक नाही. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनी जसे बोलले तसे वागले आणि चालले म्हणून समाजात आज त्यांचे स्थान सर्वांच्या हृदयात आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले असे संतानी सांगून ठेवले आहे. अस्पृश्यता पाळू नका असा संदेश देणारे संत एकनाथ महाराजानी तप्त तापलेल्या वाळूवरील हरिजन बालकांस कडेवर उचलून घेतले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्य लोकांसाठी घरातील पाण्याचा हौद मोकळा केला. त्याचा परिणाम त्यांना भोगावे लागले परंतु त्याची त्यांना फिकीर नव्हती, कारण ते क्रियाना महत्त्व देणारे होते. विचाराला आचाराची जोड असली की आपल्या हातून चांगले कार्य होते. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात की, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे अर्थात काही ही न करता नुसते बोलणे काही कामाचे नाही.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

A02 वाचन

वाचन प्रेरणा दिवस

ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे आणि ज्ञान हे वाचनातून मिळते. ज्याचे वाचन अधिक त्याचे ज्ञान सुध्दा अधिक. आपणाला ज्ञान हे वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या मार्गाने मिळविता येतो. मात्र वाचनातून जे ज्ञान मिळते ते चिरकाल टिकणारे असते. प्रसिध्द विचारवंत ऑझक टेलर म्हणतात की, मनुष्याची वाढ ही अवयवानी होत नाही, तर विचारांनीच होते आणि विचारांना वाचनांनी सहज सहकार्य मिळते. जीवनातील अंधकार नाहीसे करण्यासाठी प्रत्येकाना वाचन करता आलेच पाहिजे. याचमुळे तर आपण आपल्या मुलांना वयाच्या सहाव्या वर्षी वाचन-लेखन शिकण्यासाठी शाळेत प्रवेश देतो. त्या ठिकाणी मुलांवर वाचनाचे संस्कार केले जातात. वाचन काय करावे आणि कसे करावे याची प्राथमिक माहिती ज्याला असते तोच उत्तम प्रकारे वाचन करू शकतो. आपल्या मनात चांगले विचार यावेत असे जर आपणास वाटत असेल तर त्यासाठी प्रथम चांगले वाचन करणे आवश्यक आहे. प्रसिध्द विचारवंत टॉलस्टॉय यांनी म्हटल्याप्रमाणे अश्लील पुस्तके वाचणे म्हणजे विष प्यायल्याप्रमाणे असते. यामुळे स्वतःचे नुकसान तर होतेच शिवाय समाजाचे आणि देशाचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात की, पुस्तके वाचन करणे म्हणजे आपले मन निर्मळ करणे होय. पुस्तकातल्या विविध बाबीचा थेट परिणाम वाचकांच्या मेंदूत जाऊन भिडतो. जी व्यक्ती वाचन करते तीच व्यक्ती विचार करू शकते. आजच्या संगणक आणि सोशल मीडियाच्या जगात वाचन संस्कृती कमी व्ह्ययला लागली त्यामुळे नैतिकता सुध्दा लयाला जात आहे. सर्व काही वाईट बाबी त्यांच्या डोळ्यासमोर येत असल्यामुळे त्याला चांगले काही सुचत नाही. जीवनात वाचनाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. वाचनामुळे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यासारखी महान व्यक्ती आपणास लाभली. आज वाचन प्रेरणा दिवसा निमित्त आपण रोज एक तास तरी वाचन करण्याचा संकल्प करू या तेच डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त खरी आदरांजली ठरेल.

-नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

A01 वाचन

वाचा आणि विचार करा

*वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने.......!*

वाचनाने माणूस समृद्ध होतो. त्यातल्या त्यात नियमित वाचन केल्यामुळे ज्ञानात देखील वाढ होते. पण ही वाचन करण्याची आवड कशी निर्माण करावी आणि वाचन कौशल्य कसे विकसित करावे याबाबत कोणी बोलताना दिसत नाहीत किंवा मार्गदर्शन देखील करताना आढळून येत नाहीत. त्यामुळे या विषयी थोडी चर्चा करण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखातून केला आहे.
प्राथमिक वर्गातील मुलांची वाचन क्षमता वाढली तर त्यांची प्रगती निश्चितपणे होऊ शकते त्यामुळे मुलांची वाचन गती कशी वाढविता येईल यावर थोडा विचार होणे आवश्यक आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड आणि योग्य गती मिळविण्यासाठी खालील प्रकारच्या उपाय योजना करण्यात आले तर त्याचे निश्चित असे परिणाम पाहायला मिळतात.
मुलांना रोज पाच वाक्ये वाचन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यापासून सुरुवात करावी. वाचनासाठी तसे वातावरण तयार करणे आवश्यक आहे. अगदी सुरुवातीला लहान लहान गोष्टीची पुस्तके त्यांना वाचण्यास द्यावी. सुरुवात सोप्या वाक्याने केली तर मुलांमध्ये वाचनाची गोडी लागते. त्यानंतर हळूहळू जोडाक्षर किंवा मोठे शब्द असलेले वाक्य वाचण्याचा सराव करून घ्यावे. सध्याच्या काळात मुलांचे वाचनाकडील लक्ष फार कमी झाले आहे. ही वाचन संस्कृती वाढविण्यासाठी शाळेतून विशेष प्रयत्न व्ह्ययला पाहिजे. आज मुले भरपूर लिहितात मात्र वाचन करा असे म्हटले की कंटाळा करतात. लहानपणी वाचनाची सवय लागली तर मोठेपणी ही सवय त्यांच्या कामी येऊ शकते. म्हणून शाळाशाळामधून रोज एक तास वाचनासाठी राखीव ठेवून मुलांना त्यांच्या आवडीचे पुस्तक वाचण्याची संधी दिली जावी. जेथे लहान वर्ग आहेत तेथे वाचलेल्या पुस्तकांची नोंद शाळानी ठेवायची आणि उच्च प्राथमिक वर्गात मात्र मुले वाचलेल्या पुस्तकांची नोंद ठेवल्यास योग्य परिणाम भविष्यात पाहायला मिळतो.
मुलांचे वाचन करून घेताना काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्यावे म्हणजे वाचन योग्य दिशेने होईल. अगदी सुरुवातीला वाचन करताना प्रत्येक शब्दावरुन पहिले बोट फिरवावे त्यामुळे आपले लक्ष त्या शब्दावर राहते आणि मन एकाग्र राहण्यास मदत मिळते. सुरुवातीला मोठ्याने प्रकट वाचन करावे त्यामुळे त्या शब्दाचे ध्वनी मुलांच्या लक्षात राहील. त्यानंतर मूक वाचनाचा सराव केल्यास वाचन चांगल्या पध्दतीने करता येते. असे वाचन करण्याचा भरपूर सराव झाल्यावर पुढे चालून मौन वाचन करताना जसे शब्दावरुन बोट फिरवत होतो तसे बोट न फिरवता फक्त डोळे फिरवावे. त्यामुळे आपली वाचनाची गती वाढत राहते. एका मिनीटात आपण किती शब्द वाचतो यावर आपली वाचनाची गती ठरविली जाते. अशा क्रियेचा सर्वात जास्त फायदा म्हणजे आजुबाजुला किती ही गोंधळ असला तरी आपले लक्ष विचलित होत नाही, मन एकाग्र राहते. प्राथमिक वर्गात मुलांचे वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी समान आवाज असलेले शब्द, शेवटचे अक्षर समान असलेले शब्द, जोडशब्द, गमतीदार शब्द अशा शब्दांचे वाचन केल्यास त्याचा नियमित वाचन करताना फायदा होतो जसे की, अक्कल शब्दाचे वाचन झाल्यावर त्याच्या सारखेच आवाज असलेले नक्कल, शक्कल, टक्कल अश्या शब्दाचे वाचन केल्यास मुलांची वाचनाची गती नक्की वाढेल. तसेच त्यांची शब्दसंपत्ती देखील वाढ होईल. जेवढे जास्त शब्द मुलांना ओळखीचे होतील तेवढे त्याची वाचनाची गती चांगली होते. त्याचसोबत वाचनात नियमितपणा असणे आवश्यक आहे. डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्त वाचन प्रेरणा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्ताने एक-दोन दिवस वाचायचे आणि बाकी इतर दिवशी विसरून जायचे असे झाले तर वाचनात योग्य गती मिळत नाही. खरी वाचन प्रेरणा घ्यायची असेल तर महात्मा गांधी,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्यासारखे नियमित वाचन करीत रहावे लागते. तीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. म्हणून रोज किमान एक तास वाचन करण्याची दिवसातील एक वेळ ठरवावी आणि त्याच वेळी वाचन करीत रहावे.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
जि प प्रा शा चिरली
ता बिलोली जि नांदेड 
94236

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...