Saturday 30 November 2019

कविता - मामाचे गाव

मामाचे गाव

मामाचे गाव 
खूपच छान
भेटतो सारे
होऊन लहान

मामाचे गाव
आहे लहान
लोकं सारी 
आहेत महान

मामाचे घर 
अगदी लहान
खेळायला मोठे 
अंगण छान

मामाच्या घरची
मिरची भाकर
खातांना वाटते
गोड गोड साखर

मामाच्या घरी 
दिवा वातीचा
तरी ही शोभून 
दिसते रात्रीचा

मामाच्या घरात 
नाही मुळीच टीव्ही
एकमेका संवाद
दुसरा पर्याय नाही

मामाच्या घरी आहे
मोठा काळा कुत्रा
चोरांना पळवून लावी
नव्हता मुळीच भित्रा

मामाच्या घरात
छोटेसे मनीमाऊ
दूध पितांना झालो
आम्ही भाऊ भाऊ

मामाचे गाव
आहे दूर दूर
जाताना मनात
नेहमी हूर हूर

मामाचे गाव
माझ्या मनात
कोरून ठेवलंय
हृदयाच्या कप्प्यात

मामाचे गाव
आवडते भारी
बालपणीचे मित्र
भेटतात सारी 

- नासा येवतीकर
9423625769

कविता - विठ्ठलाचा ध्यास

।। विठ्ठलाचा ध्यास ।।

मनी लागे आस
भेटावया खास
लागला तो ध्यास
विठ्ठलाचा

दूर ती पंढरी
मुखी नाम हरी
पायी चाले वारी
वारकरी

ऊन वारा पाणी
कुणी अनवाणी
संग अन्नपाणी
घेऊनिया

ओढ पंढरीची
पर्वा ना जीवाची
नाम जपायची
पांडुरंगा

सोडुनिया घर
चालला तो दूर
लागे हूर हूर
मनाचिया

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

पुस्तक

।। पुस्तक ।।

पुस्तक म्हणजे ज्ञानाचा झरा
पुस्तक म्हणजे माझा मित्र खरा

पुस्तक बोलतो माझ्याशी
पुस्तक ज्ञान देतो सगळ्यांशी

पुस्तकांचे असावे एक घर
वाचत बसावे दिवसभर

पुस्तक देतो स्नेह आणि प्रेम
आईच्या प्रेमासारखंच सेम

एकटा असतो जेंव्हा घरात
डोळे खुपसून असती पुस्तकात

पुस्तकाला करू नका दूर
त्याशिवाय मनाला लागते हूर

चला पुस्तकांशी मैत्री करू
आपल्या डोक्यात ज्ञान भरू

- नासा येवतीकर

विठ्ठल विठ्ठल

।। विठ्ठल विठ्ठल ।।

नाम विठ्ठल
काम विठ्ठल
माझे दाम ही
विठ्ठल विठ्ठल

कर्म विठ्ठल
मर्म विठ्ठल
माझा धर्म ही
विठ्ठल विठ्ठल

पुढे विठ्ठल
मागे विठ्ठल
माझ्या या देही
विठ्ठल विठ्ठल

उठता विठ्ठल
झोपता विठ्ठल
माझ्या सर्वस्वी
विठ्ठल विठ्ठल

चालता विठ्ठल
बोलता विठ्ठल
काम करता ही
विठ्ठल विठ्ठल

नासा येवतीकर, धर्माबाद

Friday 29 November 2019

पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे



कुटुंब ही मुलांची पहिली शाळा असते. आई ही त्याची पहिली शिक्षिका असते तर वडील त्याचे दुसरे शिक्षक. वयाची सहा वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजे शिक्षणासाठी शाळेत जाण्यापूर्वी तो घरातच वावरत असतो. या वयात मुलांना चांगले काही ऐकायला आणि बघायला मिळाले तर आपले मूल नक्की बुद्धिमान होऊ शकते. खास करून आईने मुलांना नेहमी काही ना काही ऐकू घालावे. उदाहरण म्हणून आपण राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन विचारात घेता येईल. मा जिजाऊ यांनी बाल शिवाजी यानाा लहानपणी रामायण आणि महाभारत यातील शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे राजे घडले. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांसाठी थोडा वेळ अवश्य काढावे. मुलांना असुरक्षित वाटणार नाही याची काळजी घ्यावी. कुटूंबातील वाद किंवा कलह मुलांच्या मनावर विपरीत परिणाम करत असतो. म्हणून कुटुंबात नेहमी प्रेमाचे आणि खेळीमेळीचे वातावरण असायला हवे. 
आपण लावलेले रोपटे चांगले वाढावे म्हणून त्यास आपण नित्यनेमाने पाणी टाकतो. सूर्यप्रकाशात त्याची वाढ चांगली होते. मुलांच्या बाबतीत देखील असेच आहे. मुलांच्या निकोप वाढीसाठी आईने पाण्याचे काम करावे तर वडिलांने सूर्यप्रकाश व्हावे. वयाच्या दहाव्या वर्षेपर्यंत मुलांकडे विशेष लक्ष दिले की पुन्हा त्यांच्याकडे खास लक्ष देण्याची गरज भासत नाही. तेंव्हा नुकतेच पालक झालेल्या आई वडिलांनी ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. 
- नासा येवतीकर, 9423625769

Tuesday 26 November 2019

*।। समजदार नागरिक ।।*

*।। समजदार नागरिक ।।*

टाकू नका इथे तिथे कोठे केरकचरा
त्यामुळे होत नाही पाण्याचा निचरा
आपण सारे प्लास्टिकचा वापर टाळू या
निसर्गाचे नियम सारेच जण पाळू या

आपले जरासे समजपूर्वक वागणे 
वाढविते निसर्गातील सर्वांचे जगणे
बाहेर निघताना एक गोष्ट करू या
कापडी पिशवी सोबत बाळगू या

समजदारीचे आपले एक पाऊल
भावी पिढीला मिळेल खरी चाहूल
प्रत्येक गोष्टीचे सर्वांनी भान ठेवू या
आपण जगून इतरांना ही जगवू या

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद
9423625769

शिक्षकांना स्वातंत्र्य हवं

शिक्षकांना स्वातंत्र्य असावे

देशाचे भवितव्य शाळेतून घडत असते कारण येथेच देशाचा भावी आधारस्तंभ बनणारा विद्यार्थी शिक्षण घेत असतो. याच माध्यमातून समाज देखील घडत असतो म्हणून शाळा आणि तेथील सर्व यंत्रणा सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. पन्नास वर्षांपूर्वी ची शैक्षणिक स्थिती आणि आजची शैक्षणिक स्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे. मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, पन्नास वर्षांपूर्वीचे शिक्षक आणि आजचे शिक्षक यात देखील खूप फरक जाणवतो. आजचे शिक्षक पूर्वीच्या शिक्षकांपेक्षा खूप बुद्धिमान असून देखील पूर्वीच्या शिक्षकांप्रमाणे अध्यापन करू शकत नाहीत किंवा पूर्वीच्या शिक्षकांप्रमाणे विद्यार्थी घडवू शकत नाहीत. काय कारण असू शकते ? यावर विचारमंथन होणे आवश्यक आहे. 
त्याकाळी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला नव्हता त्याकाळी शिक्षण घेणे खूप मोठे आणि अवघड काम समजले जायचे. शाळा शिकणे हे येरागबाळ्याचे काम नाही असेच सर्वाना वाटायचे. शिक्षणासाठी त्यांना घरदार सोडून खूप दूरवर जावे लागायचे. त्यांना शिक्षणाचा छंद लागलेला असायचा आणि ते मिळविण्यासाठी ते अक्षरशः वेडे व्हायचे. त्यासाठी कसलाही त्रास झाला तरी ते सहन करायचे. गुरुजींनी शिक्षा केली म्हणून ते कधी पळून गेले नाहीत तर उलट त्यांची छडी वाचविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळाले होते. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांना कळून चुकले म्हणून तर अपार कष्ट सोसत अनेकांनी त्याकाळी शिक्षण घेतले. एक गोष्ट येथे लक्षात येते की, त्याकाळी शिक्षकांना कोणाची भीती नव्हती, त्यांना कोणाचा त्रास नव्हता. त्यांच्या डोळ्यासमोर एकच लक्ष्य होतं ते म्हणजे विद्यार्थी शिकला पाहिजे. त्यांना कोणाचेही दडपण नव्हते, ते अगदी मनमोकळेपणाने मुलांना शिकवायचे. माणसाच्या मनावर कशाचे दडपण नसेल तर माणूस उत्तम कलाकृती तयार करू शकतो, ते ही स्व इच्छेनुसार. तेच जर त्याच्यावर जबरदस्ती केली किंवा त्याच्या डोक्याला ताण देऊन काम करायला लावले तर तो उत्तम कार्य करेल याची खात्री नसतेच. दबावाखाली तो काही तरी चुकतो, कंटाळा तरी करतो किंवा कामचुकार पणा देखील करू शकतो. आज शिक्षणाच्या वर्तुळात काय घडत आहे तर हेच घडत आहे. आजच्या काळातला कोणताच शिक्षक आपल्या इच्छेनुसार कार्य करू शकत नाही. त्याला आखीव आणि रेखीव काम सोपविले जाते आणि हे एवढं झालंच पाहिजे असा ताण दिला जात आहे. मनमोकळेपणाने आज शिक्षकांना जगणे खूप अवघड आहे. दिलेल्या रस्त्याने गेलं तरच वेतन मिळणार अन्यथा नाही, अशी बंधने त्याच्यावर टाकण्यात येत असल्यामुळे आजचा शिक्षक मानसिक तणावाखाली वावरत आहे. स्वतः च्या मनाने जगण्याची त्याची पद्धत आज बंद झाली आहे. अधिकारी वर्गांचा त्याच्यावर खूप मोठा प्रभाव आहे. त्या प्रभावाखाली शिक्षक पूर्णपणे दबला जात आहे. घरातल्या कुटुंब प्रमुखांविषयी मनात प्रेम असण्याऐवजी भीती असेल तर घरातील लोकं तणावाखालीच वावरत असतात. अशीच काहीशी स्थिती आज निर्माण झाली आहे. हे केलंच पाहिजे असा आदेश शिक्षकावर काढला जातो. शासनाची सर्व कामे पहिल्या प्राधान्याने करायची आणि शिकविणे दुय्यम स्थानावर गेले आहे. शिक्षणाच्या विकासासाठी काय करता येईल यावर कधीही कोणी बोलत नाही मात्र इतर कामे शिक्षकांकडून कसे पूर्ण करता येतील याचा प्रामुख्याने विचार केला जातो. प्राथमिक शिक्षणाकडे साफ दुर्लक्ष केले जाते आणि दहावीचा निकाल चांगला लागला पाहिजे यासाठी कॉपी मुक्ती सारखी योजना राबवितात. झाड लहान असताना काळजी घेऊन त्याला खतपाणी योग्य प्रमाणात दिल्यास ते झाड मोठे झाल्यावर अपेक्षेप्रमाणे फळ देईल. पण प्राथमिक वर्गात अध्यापन करण्यासाठी पुरेशी शिक्षक संख्या देत नाहीत. दोन ते तीन वर्गासाठी एका शिक्षकांची नियुक्ती केली जाते तेंव्हा खरंच आपण याठिकाणी चुकत नाही का ? असे एकही शिक्षणतज्ञाना वाटत नाही, याचे आश्चर्य वाटते. प्राथमिक वर्गात पुरेशी शिक्षक संख्या असल्यास पुढील वर्गात अध्यापन करणे कठीण जात नाही. पण याच गोष्टी कडे अनेकांचे अजूनही लक्ष गेले नाही. आज ही महाराष्ट्रात आशा अनेक शाळा आहेत जेथे चार वर्ग एक किंवा दोन शिक्षक अध्यापनाचे काम करतात. त्याच सोबत शिक्षकांवर अनेक गोष्टीचे दडपण नेहमी टाकले जाते. सध्याचा शिक्षक नेहमीच दडपणाखाली वावरताना दिसतो. मागील काही दिवसांत याच दडपणाखाली काही शिक्षकांनी आत्महत्या केलेल्या घटना देखील घडले आहेत. 
शिक्षक तणावमुक्त असल्या शिवाय विद्यार्थी घडणार नाहीत, हे उघड सत्य आहे. म्हणून सर्वात पहिल्यांदा शिक्षकांना तणावमुक्त करून त्यांना स्वातंत्र्य मिळवून द्यायला हवे
- नागोराव सा. येवतीकर

लघुकथा - कळी उमलण्याआधीच ....!

कळी फुलण्याआधीच .....

घरात आज मांगल्याचे स्वरूप आले होते. सारेच जण अगदी आनंदात वावरत होते. फक्त गीताचे वडील पांडुरंगालाभ सोडून. नातेवाईकांना पाहून तो हसण्याचा प्रयत्न करत होता मात्र चिंतेची एक लकेर त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. गीताचा छोटा भाऊ गणेश इकडून तिकडे उड्या मारण्यात व्यस्त होता. त्याला देखील नवा कोरा ड्रेस मिळाला होता त्यामुळे तो जाम खुश होता. घरात आज खूप पाहुणे आले होते आणि त्यांच्या सोबत आलेल्या लहान बच्चे कंपनीमुळे तो खरोखरच आनंदी झाला होता. गीता दीदीला आज नवरी सारखं सजवले होते म्हणून तो अधूनमधून तिला सारखं म्हणत होता, " दीदी आज तुझं लग्न आहे का ? " पण दीदी या प्रश्नाला काहीच उत्तर देत नव्हती. गीताचे आत्या मामा मावशी काका हे सारे पाहुणे रात्रीच आलेले होते तर उर्वरित पाहुणे सकाळी सकाळी उतरले होते. निमित्त होतं, गीता दीदी मोठी झाली होती म्हणजे उपवर झाली होती. ही बातमी गीताच्या आईकडून पहिल्यांदा बाबाला कळाले. मग बाबांनी तसा निरोप पाहुण्यांना कळविले. एक तारीख निश्चित करण्यात आली, कार्यक्रम करण्याचा. गीता ज्यादिवशी उपवर झाली त्यादिवसापासून तिचे बाहेर जाणे बंद करण्यात आले. ती गावातल्याच सातव्या वर्गात शिक्षण घेत होती. तिची शाळा देखील बंद झाली. शाळेतील मॅडम त्यांच्या घरी जाऊन त्यांची भरपूर समजूत काढली पण सारे व्यर्थ ठरले. घरातील वाडवडील मंडळीनी तिला शाळेत पाठविण्यास नकार दिले. तसं गीताच्या मनात शिकण्याची खूप इच्छा होती मात्र तिच्या इच्छेचा विचार करणारा कोणी नव्हता. मुलगी उपवर झाली की सर्वात जास्त चिंता आणि काळजी मुलीच्या बापाला होत असते. कधी एकदा तिचे हात पिवळं करावं असे त्याला होऊन जाते. त्याला कदाचित कारण ही तसंच असू शकते की, रोजच्या पेपरमधल्या बातम्या वाचल्या की काळजात धस्स करतंय. मुलीचे लग्न होईपर्यंत बापाच्या काळजाला एक घोर लागलेले असते. कमी शिकलेल्या आई-बाबांना तर जरा जास्तच काळजी वाटायाला लागते. उपवर झालेल्या मुलीकडे गल्लीतले पोरं ही वाईट नजरेने पाहत असतात. गीताच्या बाबतीत ही तेच घडू नये म्हणून पांडुरंग काळजी करत होता. कार्यक्रमात खूप पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी आली होती. कोंबडे आणि बकरे कापून सर्वाना मेजवानी देण्यात आली. गीता दिसायला सुंदर होती, त्यात आज अजून सुंदर दिसत होती. दृष्ट लागावी असे तिचे सौन्दर्य उजळून दिसत होते. त्याच पाहुण्यामध्ये एक पाहुणा गीताला पाहून आपल्या घरची सून करून घेण्याची माहिती दिली. तशी ही माहिती पांडुरंगाच्या कानावर गेली. सारं कार्यक्रमाची आवरा आवर झाल्यानंतर गीताच्या आई ला ही बातमी पांडुरंगाने सांगितली तशी ती देखील आनंदी झाली. दुसऱ्या घरात बसून गीता हे सारं ऐकत होती. तिच्या मनात चलबिचल चालू झालं होतं. तिला काही तरी बोलायचं होतं, मात्र कोणाला बोलणार ? ती मनातल्या मनात घाबरून गेली होती. दुसऱ्यांदा शाळेतील मॅडम तिला शाळेत घेऊन जाण्यासाठी आले होते, यावेळी मात्र आईने सरळ गीताचे लग्न ठरले आहे असे सांगितले. हे ऐकून मॅडमला धक्काच बसला. ते निमुटपणे शाळेत परत गेले. गीताला मॅडम शी बोलायचे होते मात्र तशी संधी मिळालीच नाही. एके दिवशी पाहुणे आले नि बघून गेले. ही फक्त औपचारिकता होती. गीता पसंद असल्याचा त्यांनी निरोप दिला. गीताच्या मनात काय आहे ? याचा कोणी ही विचार केला नाही. पाहुण्याचं घर खूप मोठं होतं, त्यांचा एकुलता एक मुलगा होता, भरपूर पैसा, धन दौलत होती. हे सारं पाहून पांडुरंग मागचा पुढचा विचार न करता स्थळ पसंद असल्याचे कळविले. दिवसेंदिवस गीता विचारात गढून राहू लागली. उपवर होण्यापूर्वी ची गीता आता दिसत नव्हती. निद्रानाश झाला होता, डोळे सुजल्यासारखे वाटत होते. ती मोकळ्या मनाने नाचू शकत नव्हती, फिरू शकत नव्हती. ती पार बंधनात अडकून पडली होती. काही वेडेवाकडे करावं तर आपल्या आई-बाबाचे काय ? हा विचार करून ती शांत राहत होती. काही दिवसातच तिचे वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षात लग्न झाले ते ही तिशीच्या वयातील पुरुषासोबत. गीता ही कोवळी पोर तर तो तिशीचा पुरुष. जोडा काही शोभून दिसत नव्हता पण असे स्थळ पुन्हा मिळणार नाही म्हणून पांडुरंगाने हे लग्न लावून दिले. बापाची काळजी मिटली पण पोरीची चिंता सुरू झाली. तिला घरात कोणत्याच गोष्टीची काळजी नव्हती. सर्व काही सुख सोयी सुविधा होत्या. मात्र तिचा नवरा रोज पिऊन घरी यायचा. त्याला कशाचेही होश राहायचे नाही. त्याच धुंदीत तो गीतासोबत झोपायचा. तिला कधी प्रेमाचा एक शब्द देखील कधी बोलायचा नाही. लग्न झाल्यानंतर पाच सहा महिन्यात तिला गर्भ राहिलं. तिचं वय किती आणि ती आता आई बनणार होती. ही बातमी ऐकून घरीदारी सर्वाना आनंद झाला. मात्र गीताच्या चेहऱ्यावर कोणातच भाव दिसत नव्हता. नऊ महिने पूर्ण झाले होते गर्भाला. तिला खूप त्रास होऊ लागला होता. म्हणून ह्या वेदना अश्याच असतात म्हणत तिचे सांत्वन करू लागले. एके दिवशी खूपच वेदना होत होत्या म्हणून गावातीलच बाळंत करणाऱ्या बाईला बोलून आणण्यात आलं.  तिला वेदना असह्य होऊ लागल्या, त्याच त्रासात ती तडफडून शेवटी आपला देह ठेवला. गर्भ सुद्धा तिच्या सोबतच मेलं. दोन्ही जीव शांत झाले होते. वयाच्या पंधरा वर्षाच्या आत गीताचे जीवन संपुष्टात आलं. नशीबालाच दोष देत पांडुरंग रडत बसला होता. गीताची अंत्यविधी शाळेसमोरून जात असताना सारेच दुःखामध्ये डोळ्यात अश्रू आणून तिला पाहत होते. आई बाबांच्या अज्ञानामुळे अजून एक कळी फुलण्याआधीच गळून पडल्याचं दुःख मॅडमला होत होतं. 
- नागोराव सा. येवतीकर

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...