Wednesday 17 January 2018

मार्कंडेय जयंती विशेष लेख

महर्षी मार्कंडेय : पद्मशाली समाजाचे कुलदैवत

ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे भृगु महर्षी. या भृगु महर्षी आणि त्यांची पत्नी कयार्थी यांना भार्गवी, धाता आणि विधाता अशी तीन अपत्ये होती. भार्गवी म्हणजे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी. धाता व अयाती यांना प्राणूडु नावाचा पुत्र होता. तर विधाता आणि नियती यांच्या पुत्राचे नाव होते मृकंड. भगवान शंकराचे परमभक्त असलेले मृकंडला एकही पुत्र नव्हते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी शंकर भगवानची कठोर तपस्या केली. त्यांच्या या कठोर तपश्चर्येला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले. तेव्हा मृकंड यांनी पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली. तेव्हा  भगवान शंकर म्हणाले, " तुमच्या भाग्यात पुत्रप्राप्ती नाही, परंतु माझी एवढी कठोर तपश्चर्या केल्यामुळे, मी आपणास एक पुत्र देत आहे. मात्र त्याचे आयुष्य फारच कमी आहे. तो अल्पायुषी आहे. तो फक्त सोळा वर्षे जगेल." मृकंड आणि त्याची पत्नी मरूधावती यांनी ते मान्य केले आणि भगवान शंकर तथास्तू म्हणून लुप्त झाले.
दिवस-महिना करीत काही वर्ष उलटले. मृकंडच्या घरी एका मुलाने जन्म घेतला. त्याचे नाव मार्कंडेय असे ठेवण्यात आले. शिक्षण घेण्यासाठी मार्कंडेय यांना ऋषीमुनींच्या आश्रमात पाठविण्यात आले. तल्लख बुद्धिमत्तेचा मार्कंडेय सगळी विद्या घेऊन वयाच्या पंधराव्या वर्षी आपल्या घरी परतले. घरातील उदास व नाराजीचे वातावरण पाहून मार्कंडेय चिंताग्रस्त झाले. एवढे दिवसापासून दूर राहिलेले मुल घरी परतल्यावर अाई-बाबा खुश होतात, आनंदून जातात. मात्र माझे आई-बाबा का आनंदी नाही ? याचा ते विचार करू लागले. मार्कंडेयच्या आई-वडिलांना माहीत होते की, मार्कंडेय हा अल्पायुषी आहे. सोळा वर्षे पूर्ण झाले की, तो इहलोकातून परलोकात जाणार. पण हे त्या मार्कंडेयला कसे सांगणार ? परंतु मार्कंडेयने आई-वडिलांजवळ नाराजीचे कारण जाणून घेण्याचा हट्ट धरला. आई-वडिलांनी मार्कंडेयला संपुर्ण कहाणी सांगितली. तेव्हा मार्कंडेय यांनी निश्चय केला आणि आपल्या आई-वडिलांना सांगितले, ' मला काहीही होणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा. ' असे सांगून आई वडिलांची आज्ञा व आशीर्वाद घेऊन भगवान शंकराची तपश्चर्या करण्यासाठी मार्कंडेय घराबाहेर पडले
  भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी मार्कंडेय यांनी महामृत्युंजय मंत्राची रचना केली आणि त्याची सलग एक वर्ष जप करीत राहिले. वयाची सोळा वर्ष पुर्ण झाले. त्यांची मृत्यूची वेळ जवळ आली. तेव्हा साक्षात यमराज त्यांना घेऊन जाण्यासाठी आले. त्यावेळी मार्कंडेय शिवभक्तीत तल्लीन होते. जसेही यमराजने मार्कंडेय यांचे प्राण घेण्यासाठी पुढे आले तसे मार्कंडेय यांनी शिवलिंगाच्या भोवती घट्ट आलिंगन घेतले.  त्यावेळी स्वतः शंकर भगवान त्या ठिकाणी प्रकट झाले आणि यमराजाला म्हणाले की, " या बाळाचे प्राण तुम्ही नेऊ शकत नाही, मी या बालकास दीर्घायुष्य प्रदान करीत आहे." हे ऐकून यमराज मार्कंडेयचा प्राण न घेता जीवदान देऊन परत गेला. त्यानंतर भगवान शंकर म्हणाले," मार्कंडेय, आपणाकडून लिहिण्यात आलेल्या महामृत्युंजय मंत्र आपणास खूप प्रिय असून भविष्यात जो कोणी या मंत्राचा स्मरण करेल त्यांना माझा आशीर्वाद सदैव मिळत राहील. या मंत्राचे जप करणारा व्यक्ती मृत्यूचा भीतीपासून मुक्त होईल आणि भगवान शंकराची कृपा त्यांच्यावर सदैव राहील." हेच ते बालक जे की पुढे महर्षी मार्कंडेय या नावाने ओळखले जाऊ लागले
महर्षी मार्कंडेय ऋषी हे भारतातील पद्मशाली समाजाचे कुलदैवत आहेत. भारतात आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक व केरळ अश्या संपूर्ण दक्षिण भागात वास्तव्य आढळून येते. या समाजातील लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे कापड विणणे हे आहे. मार्कंडेय ऋषींचे वंशज भावना ऋषी यांनी कमळाच्या तंतूपासून धागा बनवून कापड तयार केले आणि ते देवांना वाहिले. यावरूनच पद्म म्हणजे कमळ आणि शाली म्हणजे कापड असे पद्मशाली नाव पडले असे म्हटले जाते. महर्षी मार्कंडेय ऋषीची जयंती पद्मशाली समाजबांधव फार मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करतात. महाराष्ट्रातील गडचिरोलीपासून वीस किलोमीटर अंतरावर चंद्रपूर मार्गावर मार्कंडेय नावाचे ठिकाण आहे ज्या ठिकाणी लहान मोठे शिवलिंग पडलेले दिसून येतात. हजारो वर्षांपासून हे मंदिर उभी आहे. महाराष्ट्रात सोलापूर, नांदेड, जालना, चंद्रपूर आणि ठाणे जिल्ह्यात पद्मशाली बांधव फार मोठ्या प्रमाणात आढळून येतात. आज महर्षी मार्कंडेय ऋषीची जयंती त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद 
9423625769

Monday 15 January 2018

साहित्यसेवा

साहित्यसेवा हेच खरे साहित्यिकांचे काम

साहित्यासाठी भाषा खुप महत्त्वाची आहे. भाषेचा विकास साधण्यासाठी साहित्यातून बोलीभाषेचा वापर करायलाच हवे. बोलीभाषेतून मग प्रमाण भाषेकडे वाटचाल करता येते. आपले विचार व्यक्त करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य वापरत असतो. काही जण आपल्या मनातील विचार भाषणाच्या माध्यमातून व्यक्त करतात तर काही लेखनाच्या माध्यमातून व्यक्त करतात. भाषणामधून जे व्यक्त होते ते संग्रही ठेवणे जरा कठीण जाते मात्र लिखित स्वरूपातील विचार चिरकाल टिकून राहतात. आज आपण संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्या काळातील साहित्य लिखित स्वरुपात असल्यामुळे वाचन करू शकतो. कागदाचा शोध लागण्यापूर्वी माणसे तोंडातोंडी माहिती लक्षात ठेवत असत. पाठांतर करण्यावर जास्त भर राहत असे. एकाजवळ असलेली माहिती दुसऱ्यांजवळ तोंडीच जात असे, त्यास गुरुकुल पध्दत असे म्हटले आहे. अश्मयुगीन काळातील लोक झाडाची पाने, साल आणि दगड गोट्याचा वापर करून काही नोंदी करत असत. काही कालावधी उलटल्यानंतर कागदाचा शोध लागला आणि लिखित साहित्याला चांगले दिवस बघायला मिळाले. प्रसिध्द कवयित्री बहिणाबाई चौधरी अशिक्षित होत्या मात्र त्यांचे कवन अप्रतिम होते. त्यांना लिहिता वाचता येत नव्हते पण त्यांच्या नात्यातील एका व्यक्तिने ते सर्व लिहून ठेवले म्हणून आज ते साहित्य आपणास वाचायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक संतानी त्यांच्या प्राकृत मराठी भाषेत आपले साहित्य लिहून ठेवले म्हणून आज ते सर्व साहित्य आपणास दिशा देण्यासाठी खुपच उपयोगी ठरत आहेत. त्यांनी स्वतःच्या प्रसिद्धिसाठी नाही तर लोककल्याणासाठी साहित्य लिहून ठेवले. साहित्यात अनेक प्रकार आहेत जसे की, कविता, कथा, चारोळी, ललित आणि वैचारिक लेख इत्यादी. अश्या अनेक माध्यमातून व्यक्ती आपले विचार जतन करू शकतो. भारतीय परंपरेत असे अनेक साहित्यिक मंडळी होऊन गेले त्यांच्या नावाची यादी करीत बसलो तर कागद अपूरे पडेल. त्यांनी प्रसिद्धिची हाव न ठेवता विपुल साहित्य लिहून ठेवले म्हणून मराठी साहित्य आज समृद्ध बनले आहे, एवढे मात्र खरे आहे. आज साहित्याची काय स्थिती आहे किंवा साहित्य किती जतन केल्या जात आहे ? तर याचे उत्तर म्हणजे आज साहित्य विपुल प्रमाणात तयार होत आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून जतन केल्या जात आहे. मात्र पूर्वीप्रमाणे दर्जेदार साहित्य निर्माण होत नाही अशी खंत अधुनमधून ऐकायला मिळते. साहित्य निर्माण करणे हे येरागबाळ्याचे काम नाही. खुप शिक्षण घेतलो म्हणजे साहित्य निर्माण करता येते असे मुळीच नाही. साहित्य निर्माण करण्यासाठी स्वतःजवळ तशी प्रतिभा असावी लागते, त्यासाठी वर्षानुवर्ष तपश्चर्या करावी लागते, नविन शिकण्याची जिद्द ठेवावी लागते, अपार मेहनत करण्याची तयारी असावी लागते, या सर्वासोबत विनम्रता असणे आवश्यक आहे तरच आपले साहित्य दर्जेदार निर्माण होते. आज प्रत्येकजण प्रसिध्दीच्या लालसेपोटी अक्षराला अक्षर जोडून, यमक जुळवून साहित्य तयार करीत आहेत. लगेच त्यास स्थानिक वृत्तपत्रामधून प्रसिध्दी मिळाले की झाले साहित्यिक. लगेच आपल्या नावसमोर किंवा नावाखाली बिरुदावली मिरवण्यास तयार. हे तर काहीच नाही काही साहित्यिक मंडळी इतरांचे साहित्य आपल्या नावावर प्रकाशित करून स्वतःची वाहवा मिळवितात. त्यामुळे ते खरोखरच साहित्यिक होतात काय ? हा प्रश्न सुटत नाहीच. आजकाल सोशल मीडियामुळे खुप साहित्य तयार करता येत आहे आणि अनेक साहित्य जतन करून ठेवता येत आहेत. म्हणून आपले साहित्य प्रसिध्द व्हावे म्हणून लेखन न करता आपल्या मनाच्या समाधानासाठी पहिल्यांदा लिहिण्याचा प्रयत्न करावे. मनोरंजनातून लिहिलेले साहित्य दर्जेदार बनते. त्यानंतर लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी लिहावे म्हणजे आपल्या साहित्याला आपोआप प्रसिध्दी मिळेल. जे जे आपणासि ठावे, ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करुनी सोडावे, सकळजन या उक्तीनुसार सर्व लोकांना काही बाबी कळाव्यात म्हणून साहित्य निर्माण करावे. स्वतःच्या नावाच्या प्रसिध्दीसाठी जो लिहितो तो मुळात लिहित नसून आपला स्वार्थ शोधत असतो. म्हणून साहित्यिक मित्रांना माझी नम्रतेची विनंती आहे की प्रसिध्दीसाठी कधी ही साहित्य लिहू नका. आपल्या लेखनीद्वारे समाजाचा, गावाचा, राज्याचा त्याचप्रमाणे देशाचा विकास होईल असे साहित्य निर्माण करणे आवश्यक आहे. जातीजातीत किंवा धर्माधर्मात तेढ निर्माण होईल असे कोणतेही लेखन प्रसिध्दीच्या मोहापायी प्रकाशित करू नये. त्यामुळे आपणास तर त्रास होतोच शिवाय आपल्यामुळे इतरांना देखील त्रास होऊ शकतो. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की, शब्द हे तलवारी सारखे धारदार शस्त्र आहे, जरा जपून वापरा. शब्दाने मन जसे जोडली जातात तसे तोडली देखील जातात. तेंव्हा चला प्रसिध्दीची जरा देखील आस न धरता निर्भेळ साहित्याची सेवा करूया आणि आपले साहित्य आपल्या नंतर येणारी पिढी अभ्यासेल असे तयार करू या.

- नागोराव सा. येवतीकर 
प्राथमिक शिक्षक 
मु. येवती ता. धर्माबाद 
9423625769

प्रत्येक शाळेला संरक्षण भिंत

*प्रत्येक शाळेला संरक्षणभिंत हवे*

प्रत्येक गावात स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असते. पूर्वीच्या शाळा कोणाच्या घरात, ओसरीवर किंवा झाडाखाली भरविली जात असे आणि सर्वाना शिकवायला एकच शिक्षक असायचा. मात्र हळूहळू हे चित्र बदलत गेले. आज प्रत्येक गावात शाळेसाठी किमान दोन वर्गखोल्या आणि दोन शिक्षक आहेत. गावाला या शाळेचा खूप आधार असतो. अडी अडचणी ला गावातील लोक याच शाळेचा आधार घेतात. गावातील एखादे छोटे मोठे लग्न असो किंवा इतर काही कार्यक्रम प्रत्येकजण शाळेच्या मैदानाचा आणि वर्गखोलीचा हमखास वापर करतात. सरकारी शाळा ही सार्वजनिक मालमत्ता असते त्यामुळे शिक्षक मंडळी देखील कोणाला काही बोलू शकत नाहीत. मात्र ज्या शाळेला संरक्षण भिंत आहे त्या शाळेची सुरक्षितता जास्त प्रमाणात आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांची परवानगी घेतल्याशिवाय येथे काही करता येत नाही. त्यामुळे शाळेत बाहेरच्या बाजूला असलेली रंगरंगोटी टिकून राहते. शाळेचे मैदान कोणी खराब करू शकत नाही. मैदानातील बाग विविध फुलझाडांनी बहरून आणता येते. मनात जे काही आणले ते सिद्धीस नेता येते. शाळेचे सौदर्य देखील।खुलून दिसते. याउलट संरक्षण भिंत नसेल तर मात्र अनेक संकटाला तोंड द्यावे लागते. शिक्षक आणि विद्यार्थी दिवसभर शाळेत स्वच्छता करून ठेवतात. शाळा सुटल्यानंतर काही क्षणात गावातील उनाड मुले शाळेत विविध खेळ खेळून शाळेचा परिसर अस्वच्छ करतात. काही तरुण मुले तंबाखू आणि गुटखा खाऊन शाळेच्या दारात थुंकतात. त्यामुळे सकाळी त्याचा उग्र वास दरवळत असतो. काही मद्यपी मंडळी शाळेच्या आवारात दारू पितात आणि दारूची बाटली मैदानात फोडून काचा पसरवितात. याहीपुढे जाऊन काही महाभाग वर्गात दारूची बाटली फोडतात आणि सकाळी गुरुजीला काम लागावे असे करतात. शाळेतील शौचालय तर कधी ही पहा तेथे घाण केल्या जाते. शिक्षक मुलांच्या मदतीने स्वच्छ करून घेतात तर काही विघ्नसंतोषी लोक शौचालय विद्रुप करून ठेवतात. शाळेचा बाह्य भिंतीवरील अनेक चित्रे आणि नकाशे विद्रुप केली जातात. वृक्षारोपण किती ही वेळा करू द्या तेथे एक ही वृक्ष लागवड होऊ शकत नाही. गावातील लोकं जाण्याचा रस्ता शाळेतूनच, जनावरे जाण्याचा रस्ता शाळेतूनच, गाड्या आणि वाहने जाण्याचा रस्ता देखील शाळेतूनच त्यामुळे शाळेतील मुलांना शिक्षक कोणत्याही प्रकारचे संरक्षण देऊ शकत नाही. काही शाळेतील अत्यंत महत्त्वपूर्ण साहित्य चोरीला गेल्याची बातमी जेंव्हा वाचण्यात येते तेंव्हा खूप दुःख वाटते. आज गावोगावी च्या शाळा डिजिटल मध्ये रूपांतरित होत आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळेत एक लाखांच्या आसपास डिजिटल साहित्य असते. मात्र त्याची सुरक्षितता रामभरोसे आहे. शाळेतील काही खेळ किंवा कृतीयुक्त बाबी घेण्यासाठी शाळेचे मैदान काहीच कामी येत नाही. ततेच जर संरक्षण भिंत असेल तर शिक्षक आणि विद्यार्थी सुरक्षितपणे ज्ञानार्जन करू शकतात. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, आमदार आणि खासदार यांनी शासनाला याबाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याविषयी निवेदने देऊन प्रत्येक शाळेला संरक्षण भिंत बांधून देण्यासाठी खास तरतूद करण्याची सूचना केल्यास शाळेची सुरक्षितता वाढेल असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
( लेखक उपक्रमशील शिक्षक आहेत. )
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...