Saturday 19 May 2018

लेख क्रमांक 09 दैव

दैवं चैवात्र पंचमम

जीवनात दैवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यासाठी दैवाची साथ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने दैवाचे महत्व स्वीकारावेच लागेल. माणूस भलेही स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून त्या अक्कलहुशारीचा डंका पिटवत असेल, पण त्यामागे त्याचे दैव काम करीत असते. स्वतःच्या हिमतीवर, स्वबळावर हे सारे निर्माण केले आहे असे मानणारा व्यक्ती दैवावर विश्वास ठेवत नाही. परंतु जो दुःखी आहे, अनंत कष्ट उपसून सुद्धा ज्याला यश मिळाले नाही ती व्यक्ती मात्र दैवावर अविश्वास दाखवित रडत बसते. आज आपलं सगळच चांगला आहे, बुद्धी देखील चांगली आहे. परंतु भविष्यकाळ उज्ज्वल बनवायचा असेल तर कुशल रहावेच लागते. गेल्या जन्मात जी काही कर्मे केली त्याचे यथायोग्य फळ दैव रूपाने या जन्मात प्राप्त झाले आहे. एखाद्या श्रीमंताच्या घरी जन्मलेल्या बालकांना पाहून सहज म्हटल्या जाते की, काय दैेव आहे त्याचे, जन्मल्याबरोबर करोडपतींच्या यादीत आहे. जीवनात दैव फार मोठे काम करते.  सामान्य माणसाने विचार केला ना समजेल की जीवनात दैव किती महत्त्वाचे आहे ?
खेडेगावात उद्योगधंदे नसतात. हाताला काम नसते म्हणून खिशात पैसा नसतो. श्रीमंत जर व्हायचे असेल तर भरपूर काम करावे लागते आणि भरपूर प्रमाणात काम फक्त शहरातच मिळू शकते. त्यासाठी खेडेगावातील बेरोजगार युवकांची लोंढे शहराकडे धाव घेतात. मोठ्या शहरात आल्यानंतर प्रत्येकालाच लहान मोठ्या स्वरूपात काम मिळते. परंतु ज्यांचे दैव चांगले असते त्यांची वर्षानुवर्षे प्रगतीच होत राहते. काही वर्षानंतर तो त्या शहरातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीतील पंक्तीत सुद्धा बसतो. शहरात आलेले सर्वच जण करोडपती होतात असेही नाही. ज्यांचे दैव चांगले अशांनाच यश मिळते. ज्यांचे दैव नाही ते रिकाम्या हाताने परत फिरतात. जीवनात दैवाला देखील स्थान आहे हे लक्षात ठेवूनच जीवन व्यवहार केला पाहिजे. वरील उदाहरण फक्त शहरात येणार्‍या बेरोजगार युवक एवढ्यापुरताच मर्यादित असून प्रत्येक क्षेत्रात असेअनुभव बघायला मिळतात.
वैयक्तिक जीवनात तर दैवाचे महत्त्व आहेच पण ऐतिहासिकदृष्ट्या देखील विचार केला तर अशा कित्येक घटना आहेत की जिथे दैव आहेच असे मानावे लागेल. परंतु इतिहासकार त्यास दैव मानीत नाहीत ही बाब वेगळी. छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्र्याच्या तुरुंगात बंद केले होते.  किल्ल्यामधून बाहेर पळून जाण्यासाठी महाराजांनी कमालीची युक्ती योजली. येथून दररोज मिठाईच्या पेट्या आत बाहेर जात असत. रखवालदार त्यांची रोज कसून तपासणी करीत असत. एके दिवशी महाराज एका पेटीत बसले. रखवालदार पहिल्या एक-दोन पेट्यांची तपासणी केली परंतु त्यानंतरच्या पेट्या त्यांनी तपासले नाहीत. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना तेथून पलायन करता आले, हे दैव नव्हे का? महाराजांच्या दिमतीला दैव राहिला नसता तर त्यांची वरील युक्ती असफल ठरली असती की नाही ?  असा विचार केला तर....
भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राजकारणात आले नसते तर ते एका शाळेवर शिक्षक राहिले असते असे त्यांनी एका भाषणात बोलतांना व्यक्त केले. त्यांचे दैव यांना शिक्षक बनवू दिले नाही कारण त्यांना भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपतीपदावर बसायचे होते. म्हणून असे म्हटले जाते की दैवापुढे कोणाचे काही चालत नाही. दे रे हरी पलंगावरी म्हणत बसले तरी दैव इकडे धावून येत नाही. काही ही न करता आपण दैवाला नेहमी दोष देत राहतो. तसेच जीवनात दैवाला आपण पहिले स्थान देतो. वास्तविक  दैवाचे स्थान पाचवी आहे. संस्कृत मध्ये याविषयी सुंदर वर्णन केले आहे त्याची आठवण सर्वांनी नेहमी ठेवावीत.

अधिष्ठानं तथा कर्ता करणंच प्रथग्विधम
विविधाश्च पृथक चेष्टा दैवं चैवात्र पंचमम

याचा अर्थ अधिष्ठान पहा,कर्ता पहा, मग त्यानंतर जे यश मिळते ते दैवामुळे असे म्हणायला हरकत नाही. तेंव्हा चला तर मग आपल्या दैवाला दोष न देता काम करीत राहू आणि शेवटी दैवाकडे पाहू या.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

लेख क्रमांक 08 अतिथी

अतिथी देवो भव

अतिथी सत्काराचा मूळ हेतू म्हणजे माणसांमध्ये देण्याची वृत्ती फुलविणे हा आहे. आज माणसांमध्ये देण्याची वृत्ती संपुष्टात आली आहे म्हणून नीतिशास्त्र कार म्हणतात " दाता भवती वा न वा".  दाता कोणी होईल की नाही शंकाच आहे. भारतीय संस्कृतीला फार प्राचीन काळापासूनची परंपरा आहे. त्या परंपरेनुसार आपण " अतिथी देवो भव " अतिथीला देव माना असे म्हटले जाते. त्यानुसार आजपर्यंत अतिथी मंडळीचा यथायोग्य सन्मान व व्यवस्था केल्या जात असे. परंतु आज समाजात असे चित्र फार कमी बघायला मिळत आहे. असे का ? त्याला अनंत कारणेही आहेत, नाहीत असे नाही. अतिथी म्हणजे वेळ-काळ सांगून न येणारा पाहुणा. सहा महिने ठाण मांडून बसतो त्यास अतिथी म्हणत नाहीत. जो पाहूणा त्या घरात दुसरा दिवस राहत नाही तो अतिथी. याविषयी संस्कृत मधील ओळी लक्षात घ्यावे
" न विद्यते द्वितीया तिथी : यस्य स : अतिथी "
तेव्हा अतिथी घरात आल्यानंतर त्याला देण्याची, त्याची समाधान करण्याची वृत्ती निर्माण करणे आवश्यक आहे.
दिवसेंदिवस आपली देण्याची वृत्ती कमी होत आहे. दुसऱ्यांना काहीच न देता घेण्याची वृत्ती माणसाकडे वाढतच जात आहे, ज्यामुळे समाजातील नैतिकता घसरत आहे. इतरांना काहीतरी देण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी संस्काराची आवश्यकता आहे. आपण बाजारातून येताना घरात खाऊ आणतो. घरी आल्याबरोबर घरातील लहान मुले हातातील पिशवी घेतात आणि त्यातील खाऊ काढून घेतात. तो इतरांचा विचार न करता ताबडतोब खाण्यास सुरुवात करतात. घेण्यासाठी त्याच्यावर काही संस्कार करण्याची गरज नाही. पण त्याचाच हाताने इतरांना वाटण्याची क्रिया करताना नकळत संस्कार होऊन जातात. काही पालक आपल्या मुलांवर अति लाड करतात त्यामुळे ते बिघडतात म्हणजेच त्यांच्यावर संस्कार होत नाहीत. पालक त्यांच्यामध्ये देण्याची वृत्ती निर्माण करू शकत नाहीत कारण अति लाड आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात संस्कार नावाची वस्तू शोधूनही सापडत नाही. घरातील सदस्यांची संख्या जेवढी जास्त तेवढा जास्त प्रमाणात त्यांच्यावर संस्कार होतात हा एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये लोकांना अनुभवास येतो.
घरातील संस्कार लोप पावत चालल्यामुळे आज प्रत्येक जण खाण्याच्या मागे लागून खानसाहेब झाले आहेत. देण्याची अथवा दानाची भावना आज लुप्त झाली आहे. आपली जुनी परंपरा आहे की माणूस एकटा कधीच जेवत नाही. जेवण्यापूर्वी ताटाजवळ पहिला घास ठेवण्याची प्रथा आजही बघायला मिळते. कोणी म्हणतात पहिला घास देवाचा तर शास्त्र म्हणते " स्वचंडालभूतपतितवायसे " याचा अर्थ कुत्रा,चांडाळ, भूत, पतित कावळा सर्वांसाठी माणूस पहिल्या घासाचा अन्न बाजूला ठेवतो. आजच्या बुफे किंवा डायनिंग टेबलावरच्या जेवणाच्या पद्धतीत माणूस आपले संस्कार पार विसरून जात आहे. पहिला घास बाजूला ठेवत नाहीत ते अतिथीचा आवभगत कसे करतील ?
ग्रामीण भागात आजही संस्काराचे काही चांगले अनुभव बघायला मिळतात. गावात एखादा अतिथी व्यक्ती आल्यास त्याची योग्यप्रकारे विचारपूस करून त्याची सोय करतात. तर इकडे शहरांमध्ये अतिथी दिसला की संधी साधून त्याची फसवणूक केली जाते. त्याची सर्वप्रकारे गैरसोय केल्या जाते. माणसाची नीती पूर्णपणे बदलून जाते कारण येथे अशाच प्रकारचे संस्कार केले जातात. घरात, गल्लीत, परिसरात शहरात सर्वच जण विवेकहीन वागतात. मग ते अतिथीला योग्य सन्मान देऊ शकतील काय ? याचे उत्तर अर्थातच नाही. तेथे त्यांना सुद्धा असंख्य समस्या असतात. साधे ते प्रेमाने चौकशी सुद्धा करत नाहीत. जर केलेच आणि तो अतिथी आपणास चिकटला तर त्याची सोय कुठे करू याची भीतीसुद्धा मनात असते.
प्राचीन काळात अतिथींना देव माना असे संस्कार होत असत. परंतु आज काळ वेगळा आहे. आज लोकांच्या अनेक समस्या आहेत त्यातुन त्यांची सुटका होणे अशक्य आहे. त्यामुळे अतिथीला देव मानणाऱ्याची संख्या फार कमी झाली आहे. याउलट अतिथीला दूर करा म्हणणार्‍या प्रवृत्तीच्या लोकांची संख्या वाढीस लागली ही चिंताजनक बाब आहे.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

ठेविले अनंते तैसेचि राहावे

ठेविले अनंते तैसेचि राहावे

व्यक्तीचा स्वभाव जन्मल्यापासून मरेपर्यंत वयापरत्वे सारखे बदलत राहते. लहानाचे मोठे होत असताना अनुभवाची शिदोरी घेत घेत व्यक्ती मोठा होतो. काही लोकांचा स्वभाव सुंभ जळाला तरी पीळ जात नाही या उक्तीप्रमाणे नेहमी तशीच राहते. " ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान " असे संत तुकाराम महाराजांनी लोकांना उपदेशपर सांगितले आहे. त्याचाही काही जणांवर निश्चितपणे प्रभाव जाणवतो. काही व्यक्ती मात्र जीवनात आलेल्या कटू अनुभवातून काहीतरी तथ्य शिकून आपल्या स्वभावात थोडा फार बदल करतात. ते लोक एका अर्थी परिस्थितीशी जुळवून घेतात. ज्यांचे स्वभाव बदलतात तेच कोणत्याही परिस्थितीशी समायोजन करू शकतात. ज्यांचा मूळ स्वभाव कुत्र्याची शेपूट वाकडे ते वाकडेच अशी राहते ते जीवनात हेकेखोर, तापट, रागीट स्वभावाची व्यक्ती बनतात. समाजात अशी त्यांची ओळख होते ती कायमस्वरूपी राहते.
अगदी लहानपणापासूनच व्यक्तीचा स्वभाव पदोपदी अनुभवाला येत असतो. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीचा वापर या स्वभावावरूनच केल्या जाते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्रत्येक लहान मुलांमध्ये एक सहज स्वभाव आढळून येतो ते म्हणजे नको म्हटलेले करून पाहणे. आई-वडीलांनी  हे करू नका असे म्हटले की केले तर काय होते ? याची उत्सुकता व जिज्ञासेमुळे नको म्हटलेले तो नक्की करून पाहतो. हुशार असलेले पालक मुलांच्या या उत्सुकता व जिज्ञासेचा फायदा उचलत नको-नको म्हणत त्यांच्याकडून हव्या त्या क्रिया सहजरीत्या करून घेतात. आज जेवण करू नको असं म्हटलं की त्या दिवशी तो थोडा जास्तच जेवण करणार हे ठरलेलं गणित आहे. तेथे पालकांची कल्पकता फारच कामाला येते.
असंच बालपण सरताना काही गोष्टींची जाणीव होत जाते तसा तो तारुण्यात पदार्पण करतो. या वयात अतिआत्मविश्वास हा स्वभाव सरसकट सगळ्याच तरुणांमध्ये दिसून येतो. गोष्ट पूर्ण करण्यापूर्वी मी ते सहजरित्या करू शकतो. आत्मविश्वासाने विविध स्वप्न रंगविण्याचे काम या वयातील सर्व युवकांचे बनलेले असते. यात त्यांचा मुळीच दोष नसतो, याठिकाणी दोष आहे तो त्या वयातील स्वभावाचा. जे युवक अशा वयात आपल्या स्वभावावर संयम ठेवून वागतात त्यांचे स्वप्नभंग होत नाही आणि तो जीवनात यशस्वी होतो. या वयातील युवक " डर के आगे जीत है " या आशेने भन्नाट काम करू इच्छितात. परंतु यात सर्वांनाच विजय मिळत नाही हेही तेवढेच खरे आहे.
तारुण्यातून व्यक्ती जेव्हा संसारात पडतो तेव्हा अनुभवाच्या शिदोरीवर त्याचे स्वभाव बदलत राहतात. विवाह म्हणजे फक्त महिलांसाठी दुसरे जन्म नसून पुरुषांचा सुद्धा आहे. विवाहानंतर दोघांनाही आपापल्या स्वभावाशी जुळवून घ्यावेच लागते. संसारात लहान-सहान गोष्टी नेहमी घडतात ज्यामुळे कुरबुर होत राहते. अशा वेळेसच स्वभावाची कसोटी लागते. घरात माहेराकडील मंडळी आली की आपली सौ. लगबगीने कामाला लागते आणि श्री थोडासा हिरमुसला होतो. याउलट सासरकडील मंडळी आली की उलट चित्र बघायला मिळते. असे प्रत्येक श्री आणि सौ यांच्या संसारात निदान एकदा तरी पाहायला मिळते. स्वभाव बदलला नाही किंवा परिस्थितीशी दोघांनीही जुळवून घेतले नाही तर संसाराचं वाटोळं व्हायला वेळ लागत नाही. संसार म्हणजे एका रथासारखे आहे. रथाचे दोन्ही चाक व्यवस्थित असतील तरच रथ चालू शकतो अन्यथा फसून बसतो. आज ज्यांचे संसार वार्‍यावर हवेत गिरक्या खात आहेत त्यांच्याशी विचारपूस केल्यास त्यांचा संसार असे होण्यामागे श्री किंवा सौ यापैकी कुणाचा तरी एकाच्या स्वभावामुळे असे झाले हे लक्षात येते.
स्ववभावच्या बाबतीत वृद्धापकाळाकडे जरासं लक्ष दिले तरी एक बाब प्रकर्षाने जाणवते घरातील मुख्य असलेले व्यक्ती आज गौण झाल्याचे त्यांना दुःख मनामध्ये सलते. त्याना वाटते की आपण पूर्वीप्रमाणे सर्वकाही करावे. वय वाढले तरी त्यांचा स्वभाव बदलत नाही. त्यांचा त्यांना जेवढा त्रास होतो तेवढाच कुटुंबातील इतर सर्वांना सुद्धा होतो. वयापरत्वे काम आणि जबाबदारी बदलत असतात. त्या बदलानुसार त्यांनी आपला स्वभाव बदलला तर निश्चितपणे कोणालाही त्रास होणार नाही. आश्रमात राहणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत ही खरोखरच दुःखद बाब आहे. वृद्धाश्रमातील ही वाढत चाललेल्या संख्येमागे अन्य अनेक कारणे असू शकतील त्यात त्यांचा स्वतःचा न बदललेला स्वभाव काही अंशी तरी नक्की असतोच याचा प्रत्येकाने जरूर विचार करावा लागेल.
व्यक्तीचा स्वभावाला औषध नाही असे म्हटले जाते. व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या सभोवताली असणाऱ्या परिसरावर, कुटुंबावर आणि मित्रांवर सुद्धा अवलंबून असतो. कुटुंबात ज्या प्रकारचे वातावरण असते त्यानुसार कुटुंबातील व्यक्तींचा स्वभाव बनत जातो. जन्मत:च कोणी सोबत स्वभाव घेऊन जन्माला येत नाही असे म्हटले जाते मात्र अनुवंशिक गुणानुसार व्यक्तीला जन्मतः काही गुण मिळतात त्यात स्वभावाचाही समावेश होतो. परंतु खरोखरच व्यक्तीचा स्वभाव चांगला व्हावा असे वाटत असल्यास जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास तसे होऊ शकते. नेहमी चांगल्या परिसरात राहावं म्हणून आपण त्याच परिसरातील घर निवडतो ज्या ठिकाणी चांगल्या स्वभावाची लोकं राहतात. कारण आपल्या व कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीवर स्वभावाचा फरक दिसून येतो तसेच शालेय आणि कॉलेज जीवनात चांगल्या स्वभावाचा मित्रांचा सहवास मिळणे प्रत्येकांच्या भावी आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सुसंगती सदा घडो या संत रामदासांच्या उक्तीची याठिकाणी खास करून आठवण येते. वाईट स्वभावाच्या मित्रांच्या संगतीने आपलं आयुष्य वाईट होते याची जाणीव प्रत्येक व्यक्तीला असते. शेवटी एक सारख्या स्वभावाच्या व्यक्तीची जुळवणी फार लवकर होते.
आपल्या स्वभावात अनुकूल बदल करण्यासाठी स्वतः जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास आपले आयुष्य अजून सुंदर होऊ शकते त्यास्तव प्रत्येकाने ठेविले अनंते तैसेची रहावे काय ? याचा जरूर विचार करावा.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Friday 18 May 2018

लेख क्रमांक 06 युवा आरोपी

लेख क्रमांक 06

*युवा आरोपींचे पुनर्वसन आवश्यक*

कोल्हापूरच्या शाहूवाडी पोलीस लॉकअपमधून चार कैदी पसार झाल्याची आजची बातमी वाचण्यात आली. नेहमीप्रमाणे ही देखील बातमी म्हणून नजरेआड टाकली मात्र त्या चार आरोपीचे फोटो मला।बातमी वाचण्यास प्रवृत्त करीत होते म्हणून ती बातमी पूर्ण वाचली. तेंव्हा मनाला एक धक्का बसला कारण ती चार ही आरोपी विशी च्या आतले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नुकतेच मिसरूड फुटू लागले होते. त्यांच्या पुढे खूप मोठे आयुष्य पडून आहे आणि एवढ्या लहान वयात ते चार ही मुलांवर घरफोडी, दरोडा यासारखे गुन्हे दाखल झालेली आहेत. खरोखरच ही बाब देशाच्या विकासासाठी घातक नाही काय ? ज्या युवकांचे हात देशाच्या विकासात हातभार लावण्यासाठी आवश्यक आहेत तेच हात दरोडा आणि घरफोडीसाठी वापरले जात आहेत. आज देशात असे किती तरी युवक आहेत ज्यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते वाम मार्गाला लागले आहेत. काही युवक व्यसनाधीन झाले आहेत आणि आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी ते कोणता ही मार्ग स्वीकारण्यास तयार असतात. त्यांना त्याचे काही देणे घेणे नसते. काही ठिकाणी तर अश्याच युवकांच्या हातून पैशासाठी खून सुद्धा घडले आहेत. भारत देश हा सर्वात तरुण लोकांचा देश आहे असे म्हणताना छाती फुलून येते आणि त्याचवेळी सर्वात जास्त बेकारी असलेला देश म्हणताना लगेच गळून पडते. दिवसेंदिवस बेरोजगार युवकांची संख्या लाखों च्या पटीत वाढत आहे आणि रोजगार मात्र हातच्या बोटावर मोजता येतील असे निर्माण होत आहे. एका जागेच्या नोकरीसाठी हजारोंच्या संख्येत अर्ज येत आहेत. यावरून देशातील बेरोजगारी लक्षात येते. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध विभागात 72 हजार पदे भरणार असल्याचे जाहीर केले. ही बातमी ऐकून बेरोजगार युवकांच्या आशा नक्कीच पल्लवित झाल्या असतील यात शंका नाही. मात्र देशात वीस ते पंचवीस वर्षाच्या आत असलेल्या आरोपीना समुपदेशन करून अश्या युवकांच्या हाताला काम दिल्यास ते भविष्यात काही चांगले कार्य करू शकतील अन्यथा त्यांची पिढी तर वाया जाणारच सोबत त्यांच्या नंतर येणारी पिढी सुद्धा वाया जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. वाढत्या वयात नकळत आरोपी झालेल्या युवकांचे पुनर्वसन आवश्यक आहे, असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

लेख क्रमांक 05 बदल्या

*अखेर शिक्षकांच्या बदल्याना सुरुवात*

मे महिना म्हटले की बदल्यांची सुगी असते. प्रत्येक विभागात कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. तसे विशेष करून शिक्षकांच्या बदल्याकडे सर्वांचे खास लक्ष लागलेले असते. शिक्षक हा सर्वांच्या ओळखीचा आणि जिवाभावाचा कर्मचारी असतो. गावातल्या प्रत्येक क्षेत्राशी त्याचा संबंध येतो. गावात काही अडचण निर्माण झाली तर लोकं शाळेतील शिक्षकांकडे मदतीसाठी धावून येतात. लोकांची मदत मागण्याची कारणे अनेक असू शकतात. त्यामुळे कधी पूर्ण होते तर कधी अपूर्ण राहते. पण शिक्षकांच्या शब्दाला आजही गावात मान आहे, यात शंका नाही. तसे आजकाल शिक्षकांचे संबंध फक्त गावपूरतेच मर्यादित राहिले नसून आजचा शिक्षक थेट मंत्रालयापर्यंत पोहोचला आहे. पंचवीस तीस वर्षांपूर्वीच्या शिक्षकांच्या बदल्याविषयी थोडी फार माहिती घेतली तर लक्षात येईल की सूर्य छाप जर्दाच्या चिटोरीवर शिक्षकांचे नाव लिहून बदल्या झाल्या आहेत. लोकप्रतिनिधीच्या आजूबाजूला असलेल्या लोकांद्वारे ह्या बदल्या व्हायच्या. पूर्वीचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते माणुसकी तसेच संबंध या गोष्टी लक्षात घेऊन काम करीत असत. परंतु शिक्षकांच्या बदल्यात लोकप्रतिनिधींचा हस्तपेक्ष सर्वांसाठी एक डोकेदुखी बनली होती. प्रामाणिक आणि इमानदार अधिकाऱ्यांना या बदल्याच्या कालावधीत रजेवर जावे लागायचे. त्याशिवाय बदल्या होत नव्हत्या. म्हणजे अधिकारी वर्गासाठी कमाई कमी आणि डोकेदुखी जास्त होते. त्यांच्या मनात नसेल तरी बदल्याच्या प्रक्रियेवर सह्या कराव्या लागत असे. त्यामुळे पैसेवाले सर्व चांगल्या ठिकाणी बदली करून घेत असत आणि जे पैसे खर्च करू इच्छित नाही त्यांना मात्र अवघड क्षेत्रांत किंवा शहरापासून दूर नोकरी करावे लागत. पण या सर्व बाबीला फाटा देऊन पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या स्तरावरून होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या यावर्षी प्रथमच ग्रामविकास मंत्रालयातून होत आहेत. शासनाचा हा निर्णय खरोखरच स्तुत्य आणि वाखाणण्याजोगे आहे. या प्रक्रियेमुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय आणि सहज बदल्या संपन्न होत आहेत. आत्तापर्यंत राज्यतील दहा एक जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या 25 मे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया पूर्ण होण्याचे संकेत आहेत. अगदी सुरुवातीला या प्रक्रियेचा अभ्यास न करता अनेक शिक्षक संघटना आणि इतर शिक्षक मंडळींनी यास विरोध केले होते. मात्र सरल ऑनलाईन प्रणालीच्या बळावर यावेळी शिक्षकांच्या बदल्या करून दाखविण्यात येत आहे. प्रत्येकांनी आपल्या पसंदीचे आवडीचे 20 गावांची यादी दिलेली असल्यामुळे शिक्षकांच्या इच्छेनुसार बदली होत असल्याचे चित्र निर्माण होत आहेत. ज्यांची बदली झाली आहे ते निश्चित आहेत तर ज्यांची बदली होणे शिल्लक आहे ते मात्र अस्वस्थ आहेत. त्यांचे हृदयाचे ठोके वाढत चालले असून रात्रीची झोप उडाली आहे. मात्र यावर्षी शिक्षकांच्या होत असलेल्या बदल्या न भूतो न भविष्यती अश्याच आहेत असे म्हणावेसे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि.नांदेड
9423625769

Sunday 13 May 2018

लेख क्रमांक 04

लेख क्रमांक 04
दिनांक 14 मे 2018 सोमवार

*तुज आहे तुजपाशी*

जीवनात प्रत्येकाला सुख हवेहवेसे वाटते तर दुःखाचा ससेमिरा कोणालाही नकोसा वाटतो. संत तुकाराम महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे " सुख पाहता जवापाडे,  दुःख पर्वताएवढे " सुख मिळवण्यासाठी मग आपली रात्रंदिवस नेहमी धडपड चालू असते. बहुतांश जणांना वाटते की भरपूर संपत्ती, गाडी, टुमदार बंगला, उंची फर्निचर, अंगावर दागिने, चांगले कपडे, खिशात महागडे मोबाईल मिळाले की आपण सुखी राहू. परंतु जसे दिसते तसे नसते. वर उल्लेखिलेल्या सर्वच्या सर्व वस्तू त्यांच्याजवळ आहेत त्याला विचारले की तू सुखी आहेस का ? समाधानी आहेस का ? तर त्याचे उत्तर नाही असे येते. कारण वरील कल्पना केलेल्या सुखी वस्तू थोड्याच अवधीत दुःख द्यायला सुरुवात करतात. या सर्व महागड्या वस्तूंची काळजी घेण्यात त्यांच्या जीवनातून सुख कधी निघून गेले ?  हे कळतच नाही. सदानकदा चिंतेच्या विचारात गढून गेलेल्या व्यक्ती खरोखरच सुखी असू शकते का ?
यापेक्षा विपरीत परिस्थितीत असलेला व्यक्ती ज्याच्याजवळ वरीलपैकी काहीही नाही, त्याची स्थिती भुकेला कोंडा अन निजेला धोंडा अशी गरीब व दरिद्रीची आहे ती व्यक्ती श्रीमंत व्यक्ती पेक्षा नक्कीच सुखी असतो. गरिबी व दारिद्र्यामुळे त्याला कष्ट करावे लागते त्यामुळे या व्यक्तीला भूक सुद्धा लागते आणि झोपही शांत लागते. याला कोणत्या महागड्या बाबींच्या सुरक्षेची काळजी करण्याची गरज राहत नाही. त्यामुळे मन स्थिर राहते व समाधानी राहते. म्हणूनच तो सुखी राहतो. गरिबीमुळे समाजात त्याचे चित्र थोड्या वेगळ्या पद्धतीने रंगविण्यात आले आहे. मात्र श्रीमंत लोकांपेक्षा गरीब व्यक्ती कधीही धनाने नव्हे तर मनाने श्रीमंत व सुखी असतो. कस्तुरीच्या शोधाप्रमाणे श्रीमंत लोक सुखाच्या मागे धावत राहतात. परंतु सुख त्यांना काही केल्या मिळत नाही. काखेत कळसा गावाला वळसा म्हणीप्रमाणे सुखाची परिभाषा न समजल्यामुळे सुखाच्या मागे पळणाऱ्या लोकांसाठी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांनुसार " तुज आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी " असे म्हणावेसे वाटते. त्यास्तव सुखाला समजून घेणे क्रमप्राप्त आहे
जीवनात सुख मिळवायचे असेल तर आपल्याजवळ असलेल्या गोष्टीत संतुष्ट आणि समाधानी राहणे आवश्यक आहे. आपले मन कल्पवृक्षाखाली बसलेल्या व्यक्तीसारखे आहे. ज्याची कामना कधीच पूर्ण होत नाही शेवटी त्याचा अंत होतो पण त्याला सुख किंवा समाधान मिळत नाही. कारण आपली इच्छा कधीच संपत नाही. अति सुखाची लालसा हे माणसाचे जीवन रसातळाला नेते. रोज एक।सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापून त्याच्या पोटातील सर्व अंडी एकदाच प्राप्त करू इच्छिणार्‍या व्यक्तीच्या हातात अतिलालसेमुळे काय मिळाले ? अति तेथे माती. त्यास्तव अति संपत्ती किंवा इतर वस्तु प्राप्तीची लालसा ही सुखाला झाकोळून दुःख देऊन जाते. या बाबींची जाणीव सर्वप्रथम ठेवावी लागते.
मनात लालसा ठेवू नये आणि त्याचसोबत आपण जीवनात सुखी राहावे असे वाटत असेल तर आपणाला शक्य होईल तेवढ्या तन-मन-धनाने इतरांना मदत करावी. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे आपण कोणाच्या दुःखात मदत केल्यास आपल्या दुःखात कोणीतरी धावून येतील. दुखी व्यक्तींना मदत केल्याने जे समाधान मिळते ते प्रत्यक्ष अनुभवल्यानेच कळते. त्याची मोजदाद कशातच करता येत नाही. इतरांविषयी द्वेष, मत्सर, वैरभाव न ठेवता नेहमी गोड बोलावे. बहुतांश वेळा बोलण्यातून सुद्धा पदरी निराशा येते. त्यामुळे बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोललेले केव्हाही बरे. इतरांचे काही चांगले करता येत नसेल तर निदान त्याचे वाईट तरी करू नये, इतरांचे दुःख वाटुन घ्यावे व आपले सुख मुक्तहस्ते द्यावे.
नेमके आपण याच्या उलट वागतो त्यामुळे आपण नेहमी दु:खी वाटतो. याउलट संत-महात्मे निर्धन असून सुखी वाटतात कारण त्यांना जीवन जगण्याचा खरा सार कळलेला असतो. तुज आहे तुजपाशी याचा शोध लागला की रात्रीला झोप येण्यासाठी झोपेची गोळी घेण्याची काहीच गरज नाही

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...