Friday 29 May 2020

C P Shankrod


*विद्यार्थी प्रिय शिक्षक सी. पी. शंकरोड*
-----------------------------------------------
दि. 31 मे रोजी नियत वयोमानाने वयाची 58 वर्षे पूर्ण केल्यामुळे विद्यार्थी प्रिय असलेले सी. पी. शंकरोड सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या शैक्षणिक वाटचालीचा घेतलेला हा आढावा. 
-----------------------------------------------
धर्माबादपासून दहा किमी अंतरावर असलेल्या छोट्याश्या येवती या गावात एका शेतकरी कुटुंबात पापन्ना आणि चंद्रभागाबाई यांच्या पोटी दिनांक 13 मे 1962 रोजी चिनन्ना उर्फ विठ्ठल यांचा जन्म झाला. शेती होती पण पिकत नव्हते. त्यामुळे खूप कष्ट करावे लागत असे. खुप काम करावे लागत होते. लहानपणापासून काम करण्याची त्यांची प्रवृत्ती होती. प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झाले. त्यांची घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती. या परिस्थितीत त्यांचे मावळे जे की नंतर सासरे बनले त्यांच्या मदतीने व मार्गदर्शनामुळे एप्रिल 1979 मध्ये कुंडलवाडी येथील प्रशालेतून द्वितीय श्रेणीत दहावी उत्तीर्ण झाले. त्याकाळी दहावी नंतर डी. एड. करण्याकडे सर्वांचे लक्ष असायचे. तसे त्यांनी देखील दहावी नंतर डी. एड. ला अर्ज केले. हदगाव येथील डी. एड. कॉलेजला त्यांचा नंबर लागला होता पण गावापासून हदगाव खूप दूर आहे म्हणून त्यांनी तेथे गेले नाहीत. एक वर्ष बेकार राहिल्या नंतर पुढील वर्षी परत त्यांनी डी. एड. साठी अर्ज भरले. सुदैवाने धर्माबादच्या डी. एड. कॉलेजमध्ये त्यांचा नंबर लागला आणि दोन वर्षांचा अभ्यासक्रम मिळेल ते काम करत त्यांनी पूर्ण केली आणि नोकरीच्या शोधात फिरू लागले. 15 सप्टेंबर 1982 रोजी नायगाव ( बा. ) येथील जनता हायस्कुलमध्ये त्यांची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली. वारकरी संप्रदायातील त्यांचे घर होते. लहानपणापासून त्यांना गायनाची आवड होती. त्याचा फायदा शिक्षक निवड मुलाखतीत झाले. तुमची आवड काय ? या प्रश्नाला त्यांनी गायनाचे आवड असल्याचे सांगितले आणि या झोपडीत माझ्या या कवितेचे सुंदर गायन केले. लगेचच त्यांची निवड झाली. एक वार्षिक वेतनवाढ घेऊन 15 डिसेंबर 1983 मध्ये  बिलोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सालेगाव येथे रुजू झाले. या गावातील लोकांचा संबंध आज ही कायम आहे. 
किनवट तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा शिवणी येथे दिनांक 18 ऑगस्ट 1984 रोजी त्यांना नव्याने पदस्थापना देण्यात आली. किनवट तालुका हा आदिवासी व जंगलाचा तालुका. येथे नोकरी करणे म्हणजे जीव धोक्यात घालणे होय. येथील नोकरीला काळ्या पाण्याची शिक्षा समजले जायचे पण नोकरी आहे, करावी तर लागणार, घरची परिस्थिती पाहून त्यांनी मागेपुढे विचार न करता नोकरी करण्यासाठी घराबाहेर पडले. शाळेचा पत्ता विचारत विचारत ते इस्लापुरला जाऊन पोहोचले. तेथील एका दगडावर शिवणी 17 किमी  पाहून त्यांच्या छातीत धस्स झालं. बाप रे ! काय करावं ? त्याकाळी बस नव्हते की कोणती रिक्षा नव्हती. मग त्यांनी किरायाने एक सायकल घेतली आणि शाळेच्या दिशेने निघाले. त्याठिकाणी एक वर्ष काम केल्यावर परत कमी करण्यात आले. 01 जुलै 1985 रोजी बिलोली तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सालेगाव केंद्र सुजलेगाव येथील नोकरीचे दुसरे आदेश मिळाले. येथून मात्र सेवेतून कमी करण्यात आले नाही आणि नियमित सेवा करण्यात आली. येथील पाच वर्षांच्या सेवेनंतर गावापासून तीन किमी अंतरावर असलेल्या जि. प. हायस्कुल येताळा येथे सप्टेंबर 1990 ला त्यांची बदली झाली. सुरुवातीपासून हायस्कुलच्या शाळेचे आकर्षण होते. येथे काम करण्याची संधी मिळावी असे त्यांना वाटत होते आणि ते स्वप्न पूर्ण झाले होते. नोकरी चालू असतांना घराकडे देखील त्यांचे लक्ष होते. त्यांच्या पश्चात तीन भावंडे व एक बहीण होती. त्यांची देखभाल करण्याची सर्वस्वी जबाबदारी घरातील सर्वात मोठे असल्यामुळे त्यांच्यावरच होती. या सर्व प्रक्रियेत त्यांनी आपल्या शिक्षणाकडे देखील दुर्लक्ष केले नाही. नायगाव बाजारच्या शरदचंद्र महाविद्यालयातुन त्यांनी पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर बी. एड. देखील उत्तीर्ण झाले, ज्याचा फायदा त्यांना पदोन्नतीसाठी झाला. स्काऊट गाईडचे प्रशिक्षण घेऊन जिल्हा स्काऊट मेळाव्यातुन शाळेला अनेक पारितोषिक मिळवून दिले. कुस्ती या खेळ प्रकारात विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी विभागीय पातळीपर्यंत मजल मारली होती. कुटुंब नियोजन कार्यक्रम सारख्या राष्ट्रीय कार्यात त्यांचा सहभाग होता. सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांना विशेष रुची होती. साक्षरता अभियानाच्या काळात त्यांनी कला पथक प्रमुख म्हणून काम करतांना येताळा व करखेली परिसरातील 30 ते 35 गावात त्यांचे सहकारी कोंडलवाडे सर सोबत उन्हाळी सुट्टीत जनजागृती करण्याचे काम केले. लावणी, अभंग, ओव्या, गोंधळ अश्या विविध कलांच्या माध्यमातून लोकांचा जागर करण्याचा प्रयत्न केला गेला. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत दरवर्षी एक दोन विद्यार्थी पात्र ठरण्यामागे सरांचा मोठा हातखंडा असायचा. सरांना गायनाची आवड होती त्यामुळे ते विद्यार्थ्यांना विविध गाण्याचे सूर लावून सराव घेत असत. त्यांच्या जवळ असलेल्या कौशल्यामुळे कुठल्याही कार्यक्रमात त्यांना सहभागी करून घेतल्या जात असे. 
बी. एड. चे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे त्यांना पहिली पदोन्नतीची संधी मिळाली. 1997 मध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा रत्नाळी येथे केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती मिळाली. केंद्र आणि केंद्रातील इतर 10 शाळांचा कारभार सांभाळणे खूप अवघड बाब होती. जेवढे मोठे पद असते तेवढेच मोठ्या जबाबदाऱ्या येऊन पडतात. येथे चार वर्षे प्रशासन सुरळीत ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नाचा अनुभव घेतले. ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते पण या चार वर्षाच्या काळात ते विद्यार्थ्यांपासून दूर गेले. या चार वर्षानंतर सप्टेंबर 2000 मध्ये त्यांची बदली धर्माबाद शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कन्या शाळेत झाली. ही शाळा बंद पडते की काय अश्या स्थितीत होती. कारण या शाळेत फक्त मुलींनाच प्रवेश दिला जात होता. पण सरांनी या शाळेची सूत्रे हातात घेतली आणि तत्कालीन गटशिक्षणाधिकारी अँड. प्रकाश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींच्या शाळेत मुलांनाही प्रवेश देण्यास सुरुवात केली. भर चौकात जाहिरात करून त्यावर्षी त्या शाळेची पटसंख्या साडे तीनशेच्या वर नेली. त्यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बेळकोणीकर हे शाळेचे अध्यक्ष होते. त्यांचे आणि सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने हे शक्य झाले. जिल्हा बाल महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन परत एकदा शाळेचे वैभव त्यांनी मिळवून दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सन 2002 मध्ये बिलोली पंचायत समितीकडून तालुका गुरुगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. माणसाने काम करत जावे यश आपल्या पाठीमागे येत असते, अशी त्यांची विचारधारा होती.
परत एकदा माध्यमिक शिक्षक म्हणून पदोन्नती मिळाल्याने दिनांक 13 जुलै 2004 रोजी धर्माबादच्या जिल्हा परिषद प्रशालेत त्यांची नेमणूक झाली. याठिकाणी त्यांनी अनेक महत्वपूर्ण आणि उल्लेखनीय असे काम केले. सर्वप्रथम विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी डोअर टू डोअर जाऊन त्यांनी भेटी दिल्या आणि संख्या वाढविली. कॉपीमुक्तीच्या काळात ही दहावीचा निकाल वाढवत राहिले. या शाळेत शिकणारी मुलं गरीब घरातील आहेत म्हणून त्यांनी तांत्रिक शिक्षण सुरू केले. ज्यांचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना झाला. पहिली ते दहावी वर्गातील ज्यांना आईबाबा नाहीत, अनाथ असतील, गरीबतल्या गरीब विद्यार्थ्यांचा शोध घेऊन सर्व सहकार्याच्या मदतीने आणि दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने गरीब विद्यार्थ्यांना एखादा शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य किंवा आर्थिक मदत ही देऊ केले. सहशालेय आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन पालकांच्या विश्वासास ते पात्र ठरले. त्यांचे सहकारी स्व. नरेंद्ररेड्डी कंचरला यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2015 ते 18 या तीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी येथील वर्ग दोन मुख्याध्यापक पदाचे कार्यभार देखील यशस्वीपणे सांभाळले होते. या काळात त्यांना अनेक चढ-उताराचे प्रसंग आले पण ते डगमगले नाहीत. प्रशासन चालवत असताना देखील त्यांनी सर्वाना सोबत घेऊन, कोणाचे मन दुखावू न देता काम केले. म्हणून तर आज त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन नांदेडच्या जिल्हा परिषदेने त्यांना सन 2010-11 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा गुरुगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. 
सेवानिवृत्तीला दोन वर्षे शिल्लक असतांना विषय समायोजनात त्यांची करखेली येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथे बदली झाली. याठिकाणी देखील त्यांनी आपल्या मागल्या अनुभवावरून अनेक उपक्रम राबविले. गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याची परंपरा याठिकाणी ही चालू ठेवली. करखेली येथे सांस्कृतिक कार्यक्रम न होता दोन दशकांचा काळ उलटला होता. पण सरांनी दोन वेळा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन शाळेला आर्थिक मदत ही मिळवून दिली. गेल्या 38 वर्षाच्या सेवेत त्यांनी ज्या ठिकाणी गेले त्याठिकाणी आपल्या साखळीत माणसे जोडण्याचे काम केले आहे. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत. त्यांच्या बरोबरच्या मित्रांना घेऊन त्यांनी गावात भजनी मंडळ तयार केले होते. गावात भजन करण्यासाठी ते सर्वात पुढे राहत. ते स्वतः गायक आणि पेटी वादक होते. गावात कोणतेही धार्मिक कार्यक्रम राहिले की सर तिथे जातीने उपस्थित राहत. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेने चालणाऱ्या स्वाध्याय कार्यक्रमात ते उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. गेल्या कित्येक वर्षांपासून ते स्वाध्याय करत आले आहेत. आज 31 मे रोजी नियत वयोमानाने ते सरकारी सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. सेवेने जरी निवृत्त झाले तरी ते मनाने अजून ही तरुण आहेत. भविष्यात त्यांच्या हातून असेच धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक आणि राष्ट्रीय कार्य घडत राहो, परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो हीच यानिमित्ताने सदिच्छा व्यक्त करतो. 

शब्दांकन :- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद
9423625769

Tuesday 26 May 2020

विलासराव देशमुख जयंती

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांची आज जयंती. त्यानिमित्ताने कोटी कोटी प्रणाम 

*।। विलासराव देशमुख ।।*

लातूर जिल्ह्यातील बाभळगाव
तेथे जन्मले अष्टपैलू विलासराव

दगडोजी देशमुखांच्या घरी
पुत्र जन्मले सुशीलादेवीच्या उदरी

एकोणतीसाव्या वर्षी आले राजकारणात
सरपंच बनून सुरुवात केली बाभळगावात

त्यांच्याकडे होती बोलण्याची कला
मंत्रमुग्ध करून टाकत असे सकला

खूप प्रेम करायचे आपल्या परिवारावर
तशीच अपार श्रद्धा तुळजाभवानीवर

विधानसभेत पोहोचले ऐंशीला पहिल्यांदा
काँग्रेस पक्ष वाढीस दिला खांद्यास खांदा 

कार्यभार सांभाळली अनेक मंत्रीपदाची 
दोनदा काम पाहिले मुख्यमंत्री पदाची

त्यांची तिन्ही लेकरे ही निघाली गुणी
चित्रपटासह चमकली राजकारणी

मुंडे-देशमुखांची जोडी अभेद्य होती
त्यांच्या मैत्रीचे किस्से अजूनही आठवती 

यकृताचा मोठा आजार त्यांना जडला
बहुआयामी नेता महाराष्ट्राने गमावला

- नासा येवतीकर, नांदेड 9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...