नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आजच्या कार्यक्रमात आपण राष्ट्रीय सुरक्षा दिन या विषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
🇮🇳 National Safety Day - राष्ट्रीय सुरक्षा दिन
दरवर्षी ४ मार्च रोजी भारतात ‘राष्ट्रीय सुरक्षा दिन’ साजरा केला जातो. कामाच्या ठिकाणी, रस्त्यावर, उद्योगधंद्यात तसेच दैनंदिन जीवनात सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
१९७२ साली National Safety Council (NSC) या संस्थेची स्थापना झाली. त्यानिमित्ताने ४ मार्च हा दिवस ‘राष्ट्रीय सुरक्षा दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.
या दिनाचे मुख्य उद्देश म्हणजे कामगार आणि नागरिकांमध्ये सुरक्षा नियमांबाबत जागरूकता निर्माण करणे, औद्योगिक अपघात कमी करणे, रस्ते सुरक्षा आणि वैयक्तिक सुरक्षिततेवर भर देणे, आपत्कालीन परिस्थितीत योग्य उपाययोजना करण्याचे प्रशिक्षण देणे.
सुरक्षेचे काही प्रकार, जसे की, औद्योगिक सुरक्षा, रस्ते सुरक्षा, अग्निसुरक्षा, घरगुती सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा
मग यात शाळा व विद्यार्थ्यांची भूमिका काय असावी ? शाळांमध्ये सुरक्षा शपथ घेणे, जनजागृतीसाठी रॅली काढणे, पोस्टर स्पर्धा आयोजित करणे आणि प्रात्यक्षिके आयोजित करणे. विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळावे, रस्त्यावरून चालताना उजव्या बाजूने चालावे आणि रस्त्यावर अपघात झाल्यास 108 या टोल फ्री क्रमांकावर फोन लावावे, हे तुम्हांला चांगलेच माहित आहे. अग्निसुरक्षा नियम समजून घ्यावे, कुठे आग लागली असेल तर 101 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा. तसेच काही आपत्कालीन क्रमांकांची माहिती ठेवणे देखील आवश्यक आहे. जसे की, पोलीसांना फोन लावण्यासाठी 100 डायल करावे, राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक आहे 112 तर चाईल्ड हेल्पलाईन नंबर आहे 1098.
“सुरक्षा प्रथम” हा संदेश या दिवसातून दिला जातो. अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन आणि जागरूकता आवश्यक आहे. सुरक्षित समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सुरक्षा दिन आपल्याला चांगली सवय लावण्याची प्रेरणा देतो. नियम पाळल्यास आणि सजग राहिल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात. त्यामुळे सुरक्षितता हीच यशस्वी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे मुलांनो तुम्ही सर्व नियम लक्षात ठेवून वागाल ना ! व्वा ! खूप छान ! मला माहित आहे, तुम्ही एक जागरूक आणि सजग नागरिक बनून सर्व नियम लक्षात ठेवून वागणार आहात.
मुलांनो, तुम्हांला ही माहिती छान वाटली ना ! नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - रस्त्यावर अपघात झाल्यास कोणत्या टोल फ्री क्रमांकावर फोन लावावे ?
बरोबर उत्तर आहे, रस्त्यावर अपघात झाल्यास 108 या टोल फ्री क्रमांकावर फोन लावावे.
दुसरा प्रश्न - रस्त्यावरून चालताना कोणत्या बाजूने चालावे ?
बरोबर उत्तर आहे, रस्त्यावरून चालताना उजव्या बाजूने चालावे.
तिसरा प्रश्न - १९७२ साली कोणत्या संस्थेची स्थापना झाली ?
बरोबर उत्तर आहे, १९७२ साली National Safety Council (NSC) या संस्थेची स्थापना झाली.
चौथा प्रश्न - कुठे आग लागली असेल तर कोणत्या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा ?
बरोबर उत्तर आहे, कुठे आग लागली असेल तर 101 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - चाईल्ड हेल्प लाईन नंबर सांगा पाहू.
बरोबर उत्तर आहे - 1098 हा चाईल्ड हेल्प लाईन नंबर आहे.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची पण.... नमस्कार. 🙏
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769