Sunday, 15 February 2026

दिनविशेष माहिती - 19 फेब्रुवारी ( Chatrapti Shivaji Maharaj )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक : छत्रपती शिवाजी महाराज
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती तर आईचे नाव जिजाऊ होते. राजमाता जिजाऊंनी त्यांना रामायण-महाभारताच्या कथा सांगून स्वाभिमान, धैर्य आणि धर्मनिष्ठा यांचे संस्कार दिले. दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी युद्धकला आणि प्रशासनकौशल्य आत्मसात केले. शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचे कुलदैवत तुळजाभवानी होते.
त्या काळात भारतावर परकीय सत्तेचे वर्चस्व होते. सामान्य जनतेवर अन्याय होत होता. अशा वेळी शिवाजी महाराजांनी “हिंदवी स्वराज्य” स्थापण्याचा निर्धार केला. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी पहिला किल्ला जिंकला तो म्हणजे तोरणा. छत्रपती शिवाजी महाराज यांना तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, हंबीरराव मोहिते, नेताजी पालकर, येसाजी कंक, जीवा महाला, कान्होजी जेधे, शिवा काशीद असे अनेक जीवाला जीव देणारे मावळे मिळाले. त्यामुळे रायगड, प्रतापगड, पुरंदर, सिंहगड, असे अनेक किल्ले जिंकले. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजानी बलाढ्य अफजलखानाचा वध केला. गनिमी काव्याच्या तंत्राने बलाढ्य शत्रूंवर विजय मिळवला. शिवाजी महाराज हे केवळ एक शूर योद्धे नव्हते, तर ते आदर्श राज्यकर्ते आणि लोकनायक होते. 
महाराजांचे राज्य हे लोकाभिमुख होते. त्यांनी शिस्तबद्ध लष्कर, सक्षम आरमार आणि न्यायप्रिय प्रशासन उभे केले. स्त्रियांचा सन्मान राखणे आणि सर्व धर्मांचा आदर करणे हे त्यांच्या राज्यकारभाराचे वैशिष्ट्य होते. ६ जून १६७४ रोजी रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांना "जाणता राजा" म्हणून ओळखले जाते. स्वराज्याचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी ८ मंत्र्यांचे अष्टप्रधान मंडळ तयार केले. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यांचा जन्मदिवस सर्वत्र शिवजयंती म्हणून साजरी केली जाते.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे दिनांक ३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर निधन झाले. 
मुलांनो, शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला ध्येय, स्वाभिमान आणि संघटनशक्ती यांचे महत्त्व शिकवते. त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करून आपणही प्रामाणिक, धैर्यवान आणि राष्ट्रनिष्ठ नागरिक बनूया.

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्यावर झाला ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्यावर झाला ?

दुसरा प्रश्न - छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या पहिल्या किल्याचे नाव काय ? 
बरोबर उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या पहिल्या किल्याचे नाव तोरणा किल्ला.

तिसरा प्रश्न - छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी कोणाचा वध केला ? 
बरोबर उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी बलाढ्य अफजलखानाचा वध केला ? 

चौथा प्रश्न - "जाणता राजा" म्हणून कोणास ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांना "जाणता राजा" म्हणून ओळखले जाते.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजानी पारशी भाषेऐवजी कोणत्या भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले ?
बरोबर उत्तर आहे - स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजानी पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 18 फेब्रुवारी ( Gopal Hari Deshamukh )


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
गोपाळ हरी देशमुख हे महाराष्ट्रातील प्रख्यात समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते. त्यांना “लोकहितवादी” या टोपणनावाने ओळखले जाते. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, रूढी-परंपरा आणि अन्यायकारक प्रथा यांच्यावर कठोर टीका करून समाजजागृतीचे कार्य केले.
गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८२३ रोजी पुण्यात एका वतनदार घराण्यात जन्म झाला. त्यांचे मूळ आडनाव 'सिद्धये' होते, तर घराण्यातील वतनामुळे 'देशमुख' हे नाव प्रचलित झाले. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेतले. त्यांना मराठी, संस्कृत तसेच इंग्रजी भाषेचे ज्ञान होते. ते स्वभावाने प्रखर बुद्धिमान व चिकित्सक वृत्तीचे होते. समाजातील दोष दूर करून लोकांमध्ये प्रबोधन घडवून आणणे हेच त्यांचे ध्येय होते.
त्यांनी 'प्रभाकर' साप्ताहिकातून लिहिलेल्या 'शतपत्रां' द्वारे तत्कालीन भारतीय समाजातील जातिभेद, बालविवाह, बहुपत्नीत्व अशा अनिष्ट रूढींवर कठोर टीका केली. या पत्रांमुळे त्यांना 'लोकहितवादी' म्हणून ओळखले जाऊ लागले. त्या काळात समाजात प्रचलित असलेल्या अनेक चुकीच्या समजुतींवर त्यांनी तर्कशुद्ध विचार मांडले. त्यामुळे काही लोकांनी त्यांचा विरोधही केला; परंतु त्यांनी आपल्या विचारांपासून माघार घेतली नाही.
गोपाळ हरी देशमुख यांनी स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे, त्यांना समान हक्क मिळाले पाहिजेत, असे त्यांचे ठाम मत होते. तसेच त्यांनी विधवा पुनर्विवाहाला समर्थन दिले. त्यांच्या लेखनामुळे समाजात नवीन विचारांची जागृती झाली.
वयाच्या २१ व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले. पुढे त्यांनी न्यायाधीश म्हणूनही प्रामाणिकपणे काम केले. त्यांच्या कार्यामुळे त्यांना समाजात मानाचे स्थान मिळाले. 
त्यांनी पानिपतचा युद्ध, कलयुग, जातिभेद, लंकेचा इतिहास यांसारखी पुस्तके लिहिली. ते केवळ लेखक नव्हते, तर कृतीशील समाजसुधारक होते.
गोपाळ हरी देशमुख यांचे ९ ऑक्टोबर १८९२ रोजी निधन झाले. त्यांच्या विचारांचा प्रभाव पुढील समाजसुधारकांवरही पडला. त्यांनी महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाची बीजे रोवली.
अशा या लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचे जीवन आपल्याला सत्य, न्याय आणि समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा देते. त्यांच्या कार्यामुळे ते महाराष्ट्राच्या इतिहासात सदैव स्मरणात राहतील.

आज गोपाळ हरी देशमुख यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपणनावाने ओळखले जाते.

दुसरा प्रश्न - गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या भाषेचे ज्ञान होते ?
बरोबर उत्तर आहे, गोपाळ हरी देशमुख यांना मराठी, संस्कृत तसेच इंग्रजी भाषेचे ज्ञान होते

तिसरा प्रश्न - गोपाळ हरी देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, गोपाळ हरी देशमुख यांचे मूळ आडनाव 'सिद्धये' होते.

चौथा प्रश्न - गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लेखन केले ?
बरोबर उत्तर आहे, गोपाळ हरी देशमुख यांनी 'प्रभाकर' साप्ताहिकातून लेखन केले.

शेवटचा पाचवा प्रश्न - लंकेचा इतिहास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? 
बरोबर उत्तर आहे - लंकेचा इतिहास या पुस्तकाचे लेखक गोपाळ हरी देशमुख आहेत. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 17 फेब्रुवारी ( Vasudev Fadke )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

वासुदेव बळवंत फडके
ब्रिटिश सरकार विरुद्ध सर्वात पहिल्यांदा आंदोलन करणारे आणि भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटविणारे आद्य क्रांतीकारक म्हणजे वासुदेव बळवंत फडके. 
त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८४५ रोजी रायगड जिल्ह्यातील शिरढोण या गावी झाला. लहानपणापासूनच कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवार बाजीचे प्रशिक्षण मिळाले. त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना प्रबळ होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला ते रेल्वे विभागात नोकरीस होते, नंतर ते इंग्रजाच्या लष्करी विभागात कारकून पदावर नियुक्त झाले. परंतु इंग्रज सरकारच्या अन्यायकारक कारभारामुळे त्यांना तीव्र वेदना होत होत्या. भाकरीसाठी चाकरी करणार नाही असे म्हणत त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि इंग्रज सरकारच्या विरोधात जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली. विशेषतः १८७० च्या दशकात भयंकर दुष्काळ पडला. त्यात हजारो लोक उपासमारीने मृत्यूमुखी पडले. शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती, तरीही इंग्रज सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ही परिस्थिती पाहून वासुदेव फडके यांच्या मनात स्वराज्य स्थापनेची ज्वाला प्रज्वलित झाली.
वासुदेव फडके यांनी ठरवले की, अन्याय सहन करण्यापेक्षा त्याविरुद्ध लढा देणे आवश्यक आहे. त्यांनी शेतकरी, धनगर, कोळी आणि इतर वंचित समाजघटकांना एकत्र करून सशस्त्र पथक तयार केले. त्यांनी इंग्रजांच्या सरकारी खजिन्यांवर धाड टाकून मिळालेला पैसा गरजू लोकांसाठी वापरला. त्यांचा उद्देश वैयक्तिक लाभ नव्हता, तर भारताला परकीय सत्तेतून मुक्त करणे हा होता. म्हणूनच त्यांना भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक म्हटले जाते. वासुदेव फडके हे दत्तात्रयाचे उपासक होते. त्यांनी दत्त महात्म्य नावाचा सात हजार ओव्याचा ग्रंथ लिहिला. 
ब्रिटिश सरकार त्यांच्या कार्यामुळे घाबरले आणि १८७९ साली त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला चालवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना अरेबिया येथील एडन येथील कारागृहात पाठविण्यात आले. तेथेही त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. कठोर कारावास आणि हालअपेष्टा सहन करत असतानाच १७ फेब्रुवारी १८८३ रोजी त्यांचे निधन झाले. १९८४ साली भारतीय टपाल खात्याने वासुदेव फडके यांचे चित्र असलेले ५० पैश्याचे तिकीट प्रकाशित केले. 
फडके यांचे जीवन आपल्याला शिकवते की, देशासाठी त्याग आणि धैर्य आवश्यक असते. त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी आयुष्य अर्पण केले. त्यांच्या बलिदानामुळेच पुढील क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली आणि स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र झाला.
आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे जगत आहोत, ते अशा महान क्रांतिकारकांच्या त्यागामुळेच. चला, त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपणही देशप्रेम, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांचा अंगीकार करूया.
आज वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - वासुदेव फडके यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, वासुदेव फडके रायगड जिल्ह्यातील शिरढोण या गावी वासुदेव फडके यांचा जन्म झाला.

दुसरा प्रश्न - वासुदेव फडके यांना काय म्हटले जाते ?
बरोबर उत्तर आहे, वासुदेव फडके यांना भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक म्हटले जाते.

तिसरा प्रश्न - वासुदेव फडके यांना ब्रिटिश सरकारने केव्हा अटक केली ?
बरोबर उत्तर आहे, १८७९ साली वासुदेव फडके यांना ब्रिटिश सरकारने अटक केली.

चौथा प्रश्न - अटक झाल्यानंतर वासुदेव फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवण्यात आले
बरोबर उत्तर आहे, अटक झाल्यानंतर वासुदेव फडके यांना एडन येथील कारागृहात ठेवण्यात आले

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - वासुदेव फडके यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - १७ फेब्रुवारी १८८३ रोजी वासुदेव फडके यांचे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 19 फेब्रुवारी ( Chatrapti Shivaji Maharaj )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !   मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण ...