Friday 16 March 2018

बालपणीचे संस्कार भाग 19


तोडणे सोपे पण जोडणे अवघड

मुलांनो, आपणाला माहीतच आहे की, एखाद्या झाडाचे पान, फुल किंवा फळ एका झटक्यासरशी तोडून वेगळे करतो. परंतु तेच तोडलेले पान, फुल किंवा फळ  झाडाला परत जोडता येते का ?  नाही. आपले जीवनसुध्दा तसेच नाही काय ? परमेश्वराने आपणाला जे आयुष्य दिले त्या आयुष्यात, बालपण, तरूणपण आणि म्हातारपण या तीन अवस्थांतून जीवन जगत असतो. मनुष्य समाजाशिवाय जिवंत राहूच शकत नाही. समाजात राहण्यासाठी आपणाला माणसे जोडावी लागतात. ज्या व्यक्ती माणसे जोडण्यात यशस्वी होतात त्यांचे नाव समाजात आदरपूर्वक घेतले जाते. माणसे जोडणे म्हणजे काय ? असा छोटासा प्रश्न मनात निर्माण होणे सहाजिकच आहे. समाजातील सर्वच लोकांना अधिक सहकार्य करणे, संकटकाळात मदतीला धावणे, शेजारी लोकांच्या सुखदुःखांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन कामात हातभार लावणे, समारंभ सण वा उत्सवाच्या वेळी एकमेकांना शुभेच्छा देणे, इतरांच्या गुणांचा गौरव करणे इत्यादी कामे करून आपण माणसे जोडू शकतो. एक काळा ठिपका असलेल्या पांढऱ्या कोऱ्या कागदावर प्रत्येकाला काळा ठिपकाच दिसत असतो आणि पांढर्‍या कोऱ्या कागदाकडे कोणाचेही लक्षच जात नाही. माणसाचा स्वभाव सुद्धा असाच आहे. प्रत्येक व्यक्तीत चांगले व वाईट हे दोन्ही गुण असतात. परंतु आपण चांगल्या गुणांपेक्षा वाईट गुणाकडे जास्त लक्ष ठेवतो. इतरांचे दोष दाखविण्यातच धन्यता मानतो. स्वतःला श्रेष्ठ समजताना इतरांना कनिष्ठ करतो. या अशा वागण्यामुळे आपण माणसे जोडत नसून तोडत असतो याची जाणीव आपण ठेवणे गरजेचे आहे. प्रसिद्ध नाटककार शेक्सपिअर म्हणतात की, प्रेम सर्वावर करा, विश्वास थोड्यावर ठेवा, पण द्वेष मात्र कोणाचाच करू नका. या जगात भगवंताशिवाय कोणीच परिपूर्ण नाही. त्यास्तव व्यक्तीमधील दोषाकडे कानाडोळा करून त्यांच्यातील सद्गुण तेवढे विचारात घ्यावेत. आपली दीर्घकालीन असलेली मैत्री एका क्षणात, एका शब्दाने, शुल्लक कृत्यामुळे तोडणे सोपे आहे मात्र नवी मैत्री जमवायला किती काळ लागतो. त्यामुळे बोलताना शंभर वेळा विचार करून बोललेले बरे. जन्माला येताना सोबत काही आणले नाही मेल्यानंतर सुद्धा रिकाम्या हातानेच जावे लागते. पृथ्वीतलावर राहते काय तर आपण जोडलेली माणसे तेवढी शिल्लक राहतात याचे भान असू द्यावे.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

बालपणीचे संस्कार भाग 22

मजबूत मन म्हणजेच यश

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असा एक सुविचार प्रसिद्ध आहे. मात्र हा सुविचार त्यांनाच लागू पडतो जे अपयश मिळाल्यानंतर सुद्धा खचून न जाता धाडसाने येणाऱ्या संकटांचा सामना करतात. एखादी नर्तिका आपले पाय अपघातात गमाविल्यानंतर सुद्धा कृत्रिम पायाने पुन्हा नाचू शकते. जसे की सुधा चंद्रन. कर्करोगासारखा आजार झाल्यानंतर तर आपण संपलोच अशी भावना बळावते. तरीही अशा दुर्धर आजाराला तोंड देत त्यावर मात करून खेळाडू मैदानावर हजर होतो तेव्हा संपूर्ण जग त्याची वाहवा करते. जसे की भारतीय क्रिकेट संघातला तडाखेबंद युवा खेळाडू युवराज सिंग. सिनेसृष्टीत पदार्पण केल्याबरोबर कोणत्याच अभिनेत्याला यश मिळत नाही सुरूवातीचे दोन-तीन चित्रपट सपेशल आपटतात. त्या कठीण समयी त्यांच्यासाठी कसोटीचा क्षण असतो. त्यानंतरच्या एका चित्रपटाने ते रात्रीतून सुपरस्टार होतात. उंचपुरा असलेल्या अमिताभ बच्चनला सिनेसृष्टीत सुरुवातीला अनेक प्रकारचे अपयश पचवावे लागले परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही. अपयशाने खचून गेले नाहीत. म्हणूनच आज ते भारतीय चित्रपटसृष्टीचे अजूनही सुपरस्टार आहे. जगात असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी अपयशातून यश मिळवून जीवनात सर्वस्व मिळविले आहे. कारण ते सर्वच मजबूत मनाचे होते. जीवनात येणार्‍या संकटाचा धैर्याने व धाडसाने सामना करण्याची ताकद मजबूत मनच देते. टीकाकारांनी कितीही टीका केली तरी ही त्यांचे मनोधैर्य ते बदलू शकत नाही. अपयशाबाबत ते कुणाकडे तक्रार करीत नाहीत वा रडत बसत नाही. हिमतीने त्यातून मार्ग करतात. प्रत्येक घटनेचा सकारात्मक बाजूने विचार करतो तो जीवनात नक्की यश मिळवितो. कोणत्याही गोष्टीत न न चा पाढा वाचणारे लोक नेहमीच अपयशाच्या दलदलीत रूतलेले असतात. त्यांचा त्यांच्यावरच विश्वास नसतो. कारण त्यांचे मन मजबूत नसून कमजोर असते. कमजोर मनाची माणसे आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्याच्या डोक्यावर मारून मोकळे होतात. अपयश पचविण्याची ताकद त्यांच्या अंगात नसते. संकटाच्या वेळी धाडस न दाखविता भित्र्या भागुबाईसारखे ते पळ काढतात. आपल्या सहकार्यांचे हे गुण ओळखूनच सूर्याजी मालुसरे यांनी लढाईत गडावरील दोर कापून काढले होते आणि म्हणाली होते एक तर लढा नाही तर मरा.
सकारात्मक विचार करणारा कधीच भित्रा बनू शकत नाही आणि त्याचे मनसुद्धा कमजोर राहत नाही. देशात अवकाळी पडलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. तोंडाजवळ आलेला घास निसर्गाने मातीमोल केला आणि राजकारणी लोकांनी आचारसंहितेमुळे परत एकदा शेतकऱ्यांना नागविले. अशा विषम परिस्थितीत राज्यात अनेक शेतकऱ्यांनी विष पिऊन किंवा इतर मार्गाने आत्महत्या केल्या आहेत. त्यांचे मन फारच कमजोर होते. संकटाचा सामना करण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते. पुढे काय होईल या प्रश्नाने त्यांना भंडावून सोडले होते. म्हणून आत्महत्या करणे हा काही पर्याय होऊ शकतो काय उलट त्यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबाची अजून वाताहत होते याचे एकदातरी आत्मपरीक्षण त्यांनी का करू नये. सर सलामत तो पगडी पचास अशी एक म्हण प्रसिद्ध आहे. त्यासाठी एक ना एक दिवस आपले भाग्य उजळेल, आपले दुःख, दारिद्र्य संपेल या आशेवर जो कष्ट करीत जीवन जगतो तो मजबूत मनाचा असतो. आजचा दिवस उद्या राहत नाही. यासाठी प्रत्येकाने धीरूभाई अंबानी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. त्यांची भावी जीवनाची आशा ठेवून स्वप्ने पाहिली नसतील तर आज अंबानी दिसले नसते.
आपली आशा स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा ही आपल्या जीवनाची त्रिसूत्री असावी. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांनी सागर किनारी उडणा-या पक्षांना पाहून मी सुद्धा एके दिवशी असेच हवेत उडेन अशी आशा ठेवली, स्वप्न पाहिले आणि खरोखरच त्यांनी एके दिवशी उडान घेतली सुद्धा. त्यांच्या स्वप्नाने महत्वकांक्षी योजनेने आणि मजबूत मनामुळे ते भारताच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकले. त्यांची आत्मकथा अग्निपंख पुस्तक वाचल्यानंतर कळते. त्यास्तव प्रत्येकाने आपले मन कमजोर न ठेवता मजबूत करण्याकडे लक्ष द्यावे. करण मजबूत मनाचेच लोक उच्च विचारशक्ती व आत्मविश्वास ठेवून काम करतात आणि यशस्वी होतात. म्हणूनच मजबूत मन हाच आपल्या सुखी, समृद्धी व यशस्वी जीवनाचा मंत्र आहे

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

बालपणीचे संस्कार भाग 24

जीवन जगण्याचा खरा आनंद

ध्येयाविना जीवन जगण्याचा अर्थ फक्त जिवंत राहणे असा होतो. अशा प्रकारच्या जिवंतपणाचा स्वतःला तर फायदा होतच नाही शिवाय कुटुंब, समाज, देश यांना सुद्धा फायदा होत नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी ध्येय नक्कीच ठरवावे. मग त्याच्या प्राप्तीसाठी कितीही त्रास सोसावा लागला तरी त्यास सर्व संकटांना तोंड देत जीवन जगण्यातच खरा आनंद आहे. शिक्षणाने मानवी जीवनाचा उत्तम प्रकारे विकास होतो. त्यासाठी प्रत्येकाने उच्चशिक्षण मिळविण्याचे ध्येय जीवनात ठेवल्यास त्यांच्यासोबत देशाचाही विकास होतो. आज आपल्या देशातील शिक्षण प्रणाली ही फक्त नोकरी पुरती मर्यादित आहे. शिकलेल्या प्रत्येक व्यक्तीला वाटते की मला चांगल्या पगाराची नोकरी मिळावी. परंतु ते शक्य नाही. कारण सर्वांनाच नोकरी मिळणे कठीण आहे नोकरीसाठी शिक्षणाचे ध्येय ठेवणे चुकीचे आहे. ज्यांना नोकरी मिळते ते मात्र आता मला अभ्यास करून काय करायचे आहे म्हणत अभ्यासाचा नाद सोडतात. त्यामुळे नोकरदार वर्गाचे जीवन चाकोरीबद्ध बनत चाललेले आहे. मनुष्य हा आजीवन विद्यार्थी असतो ही बाब ज्यांना समजली ते जीवनाच्या त्यांच्या खर्‍या ध्येयाकडे वाटचाल करतात. भारताचे माजी राष्ट्रपती ज्यांना संपूर्ण देश मिसाईलमॅन म्हणून ओळखते ते डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान असतानाही त्यांचा जास्तीत जास्त वेळ वाचनात जात असे. रिकाम्या वेळेचा सदुपयोग करणारे अनेक लोक आपला वेळ अभ्यासात घालवतात. अशा लोकांनाच जीवनात खरा आनंद मिळतो. कारण अभ्यासामुळे त्यांना दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळते. त्यामुळे प्रत्येकाने दररोज किमान दोन नाही तर नाही निदान एक तास तरी आपल्या आवडीच्या विषयावर अभ्यास करीत राहिल्यास जीवनाचा खरा आनंद उपभोगता येईल.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

बालपणीचे संस्कार भाग 23

जीवनात तिघांना मदत करावी

आपल्या जीवनात निदान तीन व्यक्तींना सर्वतोपरी मदत करण्याचा एक प्रयोग आपणासमोर मांडत आहे. कदाचित काहींना हा प्रयोग एक भन्नाट कल्पना किंवा निरर्थक वाढण्याची शक्यता आहे. परंतु आज समाजात असे कितीतरी गरजू लोक आहेत ज्यांना आपल्या मदतीची नितांत आवश्यकता आहे. तन-मन-धन यापैकी कोणत्याही साधनांचा वापर करून इतरांना आपण मदत करू शकतो. या मदतीतून गरजू व्यक्तीला मिळालेला दिलासा आपणास कितीतरी आत्मिक समाधान मिळवून जातो आणि हे समाधान कितीतरी संपत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे.
सिकंदर सर्व जग जिंकण्यास निघाला होता. त्याच्याजवळ भरपूर पैसा व संपत्ती होती परंतु परतला मात्र तो रिक्त हातानेच. आपणही एक दिवस रिक्त हातानेच जाणार आहोत. तेव्हा थोड्या गरजू लोकांना मदत केली तर आपले नाव समाजात सदोदित राहून जाईल. गरजू व्यक्तीला मदत केल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ती व्यक्ती नक्कीच धन्यवाद म्हणेल. आपण ते धन्यवाद स्वीकारून ओशाळून न जाता लगेच त्याला इतर तिघांना जसे जमेल तसे मदत करण्याचा मंत्र द्यावा. या मंत्राचा जर समाजात प्रसार होऊ लागला तर सध्या समाजात चालू असलेल्या बऱ्याच अनैतिक गोष्टी कमी होण्यास मदत मिळेल. जीवनात तिघांना मदत करणे हा निदान मंत्र आहे त्यास आपण अंशतः बदल करीत दिवसापासून सुरुवात करून वर्षापर्यंतच्या कालावधीत समाविष्ट केल्यास बराच काही बदल आपल्या आजूबाजूला दिसून येईल.
तेव्हा चला तर मग या मंत्राची सुरुवात स्वतःपासून करूया. महात्मा गांधीजी यांनी म्हटलेच आहे की, एखादा प्रयोग व प्रकल्प सुरु करायचा असेल त्याचा निकाल  चांगला लागावा असे वाटत असेल तर त्याची सुरुवात स्वत:पासून करावी. जीवनात तिघांना मदत करायची शपथ घेऊया व सर्व समाज सुखी करू या.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Wednesday 14 March 2018

गड आणि किल्ले

गड किल्ले - इतिहासाचे मूक साक्षीदार

आपल्या भारतीय परंपरेला एक इतिहास आहे. आणि हा सर्व इतिहास आपणास गड आणि किल्ल्याच्या शिल्लक असलेल्या अवशेषावरुन लक्षात येते. अनेक इतिहासतज्ञ या पुरातन वस्तूवरुन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आज उपलब्ध असलेले गड आणि किल्ले हेच खरे तर इतिहासाचे मूक साक्षीदार आहेत. परंतु आपण सर्वजण याची कोणी काहीच काळजी करताना दिसत नाहीत. पहिली गोष्ट तर गड आणि किल्ले सुरक्षित आहेत काय ? याचा विचार तर दुरच हे गड किल्ले पहण्यासाठी कोणी जात नाहीत. जे जातात ते या गड आणि किल्याला प्रदूषित करतात. काही हौसी मंडळी गड आणि किल्ल्यावर आपले नाव लिहितात, कोणी चारोळी लिहून ठेवतात, तर कोणी वेगवेगळे चित्र काढून गड आणि किल्याचे सौंदर्य नष्ट करतात. ते एक ऐतिहासिक वास्तु आहे आणि तिचे संरक्षण करण्याची जबाबदारी माझी हे साफ विसरून जातात. अश्या लोकांना वेळीच आवर घालून दंडित करायला हवे. त्यांना दंड लावले की पुढे कोणी असे विचार डोक्यात आणणार नाही. काही मंडळी गड आणि किल्यावर पिकनिक म्हणून येतात. सोबत येताना खाण्याचे भरपूर खाद्यपदार्थ आणतात. त्याचा आस्वाद घेतात आणि तेथेच कचरा टाकून मोकळे होतात. त्यांना फक्त पिकनिकची मजा घ्यायची असते. आपल्या अश्या वागण्यामुळे गड आणि किल्ले पाहण्यास येणाऱ्या पर्यटकाना किती त्रास होईल याचा अजिबात विचार न करणारे खरोखर त्या गड व किल्याचा अभ्यास करतील काय किंवा संरक्षण करतील काय ? हा फार मोठा प्रश्न पडतो. त्याचसोबत या ठिकाणी असे जोडपे दिसून येतात जे की लग्नाच्या पूर्वी एकत्र फिरण्यासाठी येथे येतात. पुण्याजवळील एक दोन किल्याच्या ठिकाणी कॉलेजमध्ये शिकणारी मुले-मुली एकत्र दिसण्याचे प्रकार खुप आढळून येतात. गड आणि किल्याचा वापर हे नवयुवक असे करत असतील तर त्यांच्याकडून याबाबतीत काय अपेक्षा ठेवता येतील. असे प्रकरण तेथे होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा अश्या गैरप्रकारामुळे गड किल्ले पाहण्याऱ्या लोकांची संख्या अगोदरच कमी आहे त्यात अजून घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच सोबत यावर उपाययोजना म्हणून गड किल्ले पाहायला जाणाऱ्या सर्वांचे आधार कार्ड आणि त्याचे मोबाईल क्रमांक सुद्धा घेण्याची सुविधा निर्माण करावी लागेल. काही दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यातील माहूरगडाच्या जंगलात दोन प्रेमी युगुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. यापूर्वी सुध्दा असे अनेक घटना घडलेल्या आहेत. असे प्रकार होऊ नये याची काळजी घेतली तर या किल्याचा इतिहास शाबूत राहू शकतो. अन्यथा बदनामी होण्यास जास्त वेळ लागत नाही. किल्याचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी शासन स्तरावरुन काही ठोस कृती कार्यक्रम तयार होणे देखील अत्यंत महत्वाचे आहे. जास्तीत जास्त लोकांची या गड आणि किल्याकडे लक्ष जाण्यासाठी महत्वपूर्ण योजना तयार करून त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. 
शालेय जीवनात दरवर्षी सहलीचे नियोजन केल्या जाते. या वयातील सहलीत मिळालेली माहिती चिरकाल स्मरणात राहते. मात्र बहुतांश शाळाकडून आयोजित करण्यात आलेल्या सहली ऐतिहासिक स्थळी न जाता प्रेक्षणीय स्थळाना भेट दिल्या जाते. काही शाळा तर शैक्षणिक सहल म्हटले की नुसती डोकेदुखी म्हणून त्या पासून चार हात दूर राहतात. पालक देखील आपल्या पाल्याना अश्या ऐतिहासिक स्थळी घेऊन जात नाहीत. त्यामुळे गड आणि किल्याकडे अभ्यासपूर्ण दृष्टीने पाहण्याऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे आणि प्रेक्षणीय स्थळी पर्यटकांची संख्या भरमसाठ वाढत आहे. त्या ठिकाणी देखील काही इतिहास कळतो नाही असे काही नाही. मात्र मुलांना इतिहास या विषयात आवड निर्माण करण्यासाठी, गड आणि किल्याची माहिती संकलित करण्यासाठी त्यांची शैक्षणिक सहल येथे काढणे आवश्यक आहे. अश्या सहलीचे नियोजन करणाऱ्या शाळेला प्रवासात विशेष सवलत देण्याची प्रथा सुरु केल्यास चांगला परिणाम पहायला मिळेल. त्याच सोबत शाळेला एक प्रमाणपत्र वितरित केल्यास अजून चांगले होईल. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ नावाची संस्था कार्यान्वित आहे, त्या माध्यमातून या गड आणि किल्याचे संरक्षण कसे करता येईल ? तसेच इतिहासाचे मूक साक्षीदार म्हणून वर्षानुवर्षे कसे मदतगार ठरतील याची काळजी देखील घेणे आवश्यक आहे. आपल्या पूर्वीचे लोकं या गड किल्यात जगले आहेत, आपण प्रत्यक्षात हे पाहत आहोत तर आपल्या नंतरची पिढी फक्त चित्रात पाहू शकेल असे होणार नाही याची काळजी प्रत्येकानी घ्यायला हवे. गड किल्यावर वर्षातुन एकदा जावे मात्र तेथे कसल्याच प्रकारची गैरवर्तणुक न करता त्या ठिकाणचे सौंदर्य अबाधित राखूया.

नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Monday 12 March 2018

गुढीपाडवा

विकारी विचारांवर विजयाचा दिवस

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू पंचांगातील मराठी महिन्यातील नववर्षाचा पहिला दिवस. हा दिवस सर्वत्र गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहुर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त म्हणून समजल्या जाते. आजच्या दिवशी सोने, घर, फ्लॅट, वाहन इत्यादी नवीन वस्तू खरेदी करण्याचा प्रघात आहे. आजच्या मुहूर्तावर अनेक जण आपल्या नव्या व्यवसायाचा शुभारंभ देखील करतात. या मुहूर्तावर चालू केलेल्या व्यवसायात, भागीदारीत किंवा गुंतवणुकीत चांगली भरभराटी मिळते असा आजपर्यंतचा अनुभव आहे. शालिवाहन शकाची सुरुवात याच दिवसापासून झाली. याबाबतीत एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की, शालिवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलांने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर मंतरलेले पाणी शिंपडून त्यांना सजीव केले. त्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूचा पराभव केला. या विजयश्रीपासून शालिवाहन शकाची सुरुवात झाली. वास्तविक पहाता ही कथा लाक्षणिक अर्थाने सांगितले जाते. शालिवाहन राजाच्या काळातील लोक हे पूर्णतः पौरुषहीन व पराक्रमहीन बनले होते, आळशी बनले होते, शत्रूचा हल्ला परतवून लावू शकत नव्हते, त्यांना हरवु शकत नव्हते. परंतु शालिवाहन राजाने त्या चेतनाहीन, पौरुषहीन,पराक्रमहीन व आळशी अर्थातच दगड व मातीचा बनलेल्या लोकांत चैतन्य प्रकट केले. त्यांच्यात आत्मविश्‍वास व पराक्रमीपणा जागृत केले आणि शत्रूला पराभूत केले. तेव्हापासून शालिवाहन शक गणना करण्यास प्रारंभ करण्यात आली ते म्हणजे आजचा दिवस होय.
आज सुद्धा आपल्या लोकांची अवस्था शालिवाहनच्या राज्यासारखीच आहे. देशात आज बेरोजगार युवकांची संख्या भरमसाठ वाढलेली आहे. त्यामानाने त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांचे पाय वाममार्गाकडे वळून तो व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यांच्या हातून देशाची उभारणी होण्याऐवजी देश रसातळाला जात आहे. युवकांमध्ये नवीन जग निर्माण करण्याची शक्ती आहे याची जाणीव करून द्यायला पाहिजे,  त्यांचा आत्मविश्‍वास व पौरुषत्व जागी केल्यास प्रगतशील भारताचे चित्र नक्कीच पाहायला मिळेल. बजरंगबलीच्या अंगात सात समुद्र पार करण्याची शक्ती होती. परंतु त्यांच्यात आत्मविश्‍वास नव्हता म्हणून सागराकडे तोंड करून निराश होऊन बसला होता. परंतु जांबुवंतांनी त्या बजरंगबलीच्या शक्तीवर विश्वास होता म्हणून त्यांनी त्यांच्यातील आत्मविश्वास जागे केल्यानंतर पुढे बजरंगबलीने सातासमुद्रापार जाऊन सीतेचा शोध तर घेतलाच शिवाय संपूर्ण लंकेला आग लावून परत सुद्धा आला. कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध प्रारंभ होण्याच्या काही क्षणापूर्वी युद्धाचा त्याग करणाऱ्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने गीतेद्वारे मार्गदर्शन केले. अर्जुनाच्या आतील आत्मविश्वास, पौरुषत्व, पराक्रमीपणा जागा झाला आणि त्यांच्या हातून अधर्माचा नाश झाला. तसा चैतन्य आत्मविश्वास आज प्रत्येकात जागे करायचे आहे. प्रत्येकाच्या आत एक सुप्तशक्ती लपलेली असते, ते जागे करायचे आहे. त्यासाठी कधी शालिवाहन, कधी जांबूवंत तर कधी श्रीकृष्णाची भूमिका प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.
या गुढीपाडव्याच्या संदर्भात रामायणातील एक कथा सांगितली जाते, दक्षिणेकडील प्रजेला वाली नावाचा वानर त्रास द्यायचा. त्याचा बंधू अंगद, त्यांना सुद्धा त्याचा त्रास होत होता. त्याच्या त्रासाला संपूर्ण जनता कंटाळली होती. सीतेच्या शोधार्थ रवाना झालेले भगवान श्रीराम तेथे गेले. त्यांने भगवान श्रीरामाला विनंती केली की, त्या दुष्ट वाली वानराचा बंदोबस्त करावा. तेव्हा भगवान श्रीरामाने जुलमी व असुरी वाली वानराचा पराभव केला. त्या विजयाप्रीत्यर्थ तेथील लोकांनी घरोघरी गुढी उभारून हा आनंदोत्सव साजरा केला, असे सांगितले जाते. तेव्हापासून आजही घरोघरी जी गुढी उभारली जाते ते विजयाचा संदेश देते. आपल्या घरातून, दारातून, तनामनातून आसुरी संपत्तीचा व विचारांचा नाश करून भोगावर योगाचा,  वैभवावर विभूतीचा आणि विकारावर विचारांचा विजय मिळविणे म्हणजेच खऱ्या अर्थाने गुढी उभारल्यासारखे होईल.
आजच्या दिवसाचे शेतकऱ्यांच्या जीवनात देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आजपासून शेतकरी आपल्या नव्या शेती व्यवसायाला प्रारंभ करीत असतो. गतवर्षी झालेल्या जमा-खर्चाचा आढावा घेऊन पुढील वर्षाचे नियोजन करतो. यावर्षी कोणकोणती पिके घ्यायची ? खरिपात कोणती व रबीमध्ये कोणते पिकं घ्यायची ?  सालगडी ठेवणे, शेती बटाव, तिजई किंवा खंडच्या हिशेबाने देणे या बाबींचा व्यवहार करणे, डोक्यावर असलेले कर्ज देणे, नवीन कर्ज घेणे इत्यादी साऱ्या बाबी आजच्या दिवशी पूर्ण केल्या जातात. अर्थात आजच्या दिवशीच शेतकरी पुन्हा एकदा नव्या जोमाने, उत्साहाने आणि उमेदीने कामाला लागतो. दरवर्षी तो आपल्या नशिबासोबत जुगार खेळत असतो. निराश किंवा हताश न होता पुन्हा एकदा आजच्या दिवशी शेतातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याचा संकल्प करतो. शेतकरी आपल्या घरी गुढी उभारून त्याला साखरेचे व खोबऱ्याचे गाठी टाकतात. ज्याप्रकारे शाळेत झेंडावंदनाच्या दिवशी सकाळी ध्वज फडकाविला जातो आणि सायंकाळी सूर्य मावळताना ध्वज उतरवून घेतल्या जाते, अगदी त्याच पद्धतीने या दिवशी घरोघरी प्रत्येकजण आपल्या दारासमोर, अंगणात किंवा घरावर सकाळी गुढी उभारतात व सायंकाळी सूर्य मावळतीला काढून ठेवतात.
मराठवाड्यातील सीमावर्ती भागात आजच्या दिवशी नवीन आंबा, नवीन चिंच, नवीन खोबरा आणि कडुनिंबाचे फुल याचे मिश्रण तयार करून त्याचे रसपान तयार करतात. त्यास या भागात " पचडा "असे म्हटले जाते.  त्याच्या सेवनाने मनुष्यास शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्य लाभते असे पूर्वज सांगतात. लिंबू कडू आहे पण त्याच्या सेवनाने आपण निरोगी राहतो. यातून लाक्षणिक अर्थ एक असाही निघतो की, कित्येक विचार आचरणात आणताना प्रथमतः खूप कष्ट सोसावे लागतात, एवढेच नाही तर नकोसे म्हणजे कटू सुद्धा वाटतात. परंतु तेच विचार आपले जीवन सुंदर बनवितात. याचाच अर्थ जीवनात प्रगतीपथावर जायचे असेल तर काहीवेळा कडू घोट प्यावे लागतात याची सूचना त्यानिमित्ताने मिळते सर्व ते हसत मुखाने स्वीकार करण्यात खरे जीवन आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्व वाचकांना हार्दीक शुभेच्छा.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
nagorao26@gmail.com

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...