Saturday 2 July 2016


11 जुलै - जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त खास पुरवणी
पुरवणी संयोजन : नागोराव सा. येवतीकर
============================
01)
         जगातील प्रत्येक देशात लोकसंख्येबाबत वेगवेगळे विचार प्रणाली आहे. जिथे लोकसंख्या प्रश्न नाही, त्याठिकाणी याबाबत मौन वा त्यास संपोषक विचार आढळून येतात. जिथे लोकसंख्या प्रश्न म्हणून उभी आहे, त्याठिकाणी प्रत्येकाचा मत प्रवाह वेगवेगळा आहे. सोयीवर फार चर्चा होऊ शकत नाही, पण समस्येवर चर्चा होते. समस्येवर चर्चा होणे आवश्यकच आहे. त्याशिवाय त्यावर मार्ग व उपाययोजना सापडणार नाहीत. आपण लोकसंख्येला समस्या समजून चर्चा करू.
        समाज हा सुदृढ विचारांनी बनलेला असतो. सुदृढ विचार हे सर्वसमावेशक असे नैतिक पैलू एकत्रित होऊन अक्षर रूपात अक्षयपणे टिकून राहतात. यालाच आपण चालीरीती, रूढी परपंरा, नियम, कायदे वगैरे म्हणत असतो. या सर्व गोष्टीचे पालन सर्वांनी करावे, हे अपेक्षित आहे. पण स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी समाजात समाज विघातक तत्त्व तयार होत आहेत. याला कारण म्हणजे अहंकार व सत्तेची लालसा मनामनात दाटलेली आहे. सर्वांच्या सर्व इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत, हे माहित आहे. त्यामुळे पूर्ण इच्छा नाहीतर कमीतकमी त्या इच्छेच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करीत आहे. प्रयत्न असफल होताना दिसतात. याला कारण म्हणजे लोकसंख्या होय.
               जग हे प्राकृतिक संपत्तीचा भरमार असलेला विस्तार आहे. पण याच प्राकृतिक संपत्तीचा उपयोगापेक्षा दुरूपयोग होताना दिसते. वर म्हटले की सुदृढ विचारांना नैतिक पैलू पडून नियम तयार होतात. पण ज्यावेळी मनुष्य सवयीचा गुलाम  होऊन विचार करू लागतो, त्यावेळी त्याचे विचार नैतिकचे नाहीतर स्वार्थी असतात. लोकसंख्या वाढणे म्हणजे खरे तर विविध नैतिक विचारात भर टाकण्यासाठी सापडलेला दुवा आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढणे, हे अनैतिक नाही. पण नैतिक विचार येण्यासाठी पोट, मन, मती शांत रहाणे आवश्यक आहे. पोट, मन, मती शांत रहाण्याकरिता, त्यांच्या सर्व गरजा भागविण्यासाठी प्रत्येकाच्या हाती काम, कारणपरत्वे, रोटी, कपडा, मकान या नून्यतम गरजांची पुर्तता होणे आवश्यक आहे. पण समाज दुष्ट विचारांना बळी पडून स्वार्थी विचारात गुंतत जात आहे. कारण वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच यांत्रिक व तांत्रिक प्रगतीमुळे औद्योगिक क्षेत्रात वा सर्वत्र मनुष्य बळाचा वापर कमी होत असल्यामुळे सुशिक्षित तरूण बेरोजगारांची वाढत जात आहे व त्यामुळे लोकसंख्या वरदान की शाप, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.
          लोकसंख्येमुळे नैतिक अधःपतन कसे घडते पहा. बेरोजगारांची संख्या जास्त व काम कमी उपलब्ध आहे. त्यामुळे स्वतःला प्राप्त रोजगार टिकविण्यासाठी धडपडत आहे. खाजगी क्षेत्रात जास्त रोजगार आहे व त्यामुळे त्याठिकाणी कामगार, नोकर अशा मोठमोठया स्थानी काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. खाजगी असल्यामुळे त्यांच्याकडून कर प्राप्त करण्यापलिकडे सरकारचे त्यावर नियंत्रण नाही. शिवाय क्षेत्रातील मालक हे राजकारण, समाजकारण करण्यास मोकळे व त्यामुळे अती लाभाच्या उद्देशाने स्वार्थ विचाराशी जोडले जातात व त्यातील लाभांश प्राप्त करण्याकरिता राजकीय पक्ष त्यांची हुजूरेगिरी करतात. यातून हुजूरेगिरी करणारे पक्ष त्या खाजगी क्षेत्रातील स्वार्थी व्युहरचनेप्रमाणे कार्यरत होतात. खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी हे आपली नोकरी टिकविण्यासाठी मालक जे सांगतो त्याप्रमाणे करीत असतात. म्हणजेच प्रत्येकांनी दास्यत्व स्वीकारले आहे व दास्य भूमिकेत असलेली मती स्वतंत्र व नैतिक विचार करू शकत नाही. त्यामुळे ती इतरांच्या विचारांची गुलाम बनते, हे लोकसंख्येमुळे समाजाला मिळालेला मोठा अभिशाप आहे, असे मला वाटते.
         मला कोणावर टीका करायची नाही. हा प्रत्येकांनी घेतलेला अनुभव आहे, पण त्याकडे कोणी त्या दृष्टीने विचार केला नसावा. हा दृक् श्राव्य क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांबाबत फार घडते. त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. पहा एका दृक् श्राव्य म्हणजे एका खाजगी दूरदर्शनवर काम करणारा व्यक्ती चर्चा सत्रात आपले ठराविक विचार प्रबळपणे मांडत असते व त्याची नोकरी बदलल्यावर तो इतर खाजगी दूरदर्शनकडे नोकरी करताना आपले विचार मांडताना त्याचे विचार हे पहिल्या नोकरीच्या वेळेच्या विचाराशी विरूद्ध असतात. इतका अमुलाग्र बदल नोकरीमुळे, कारण पूर्वीचा मालक पूर्वीच्या विचार धारणेचा व नंतरचे विचार नंतरच्या धारेतला. हे गुलामगिरीचे लक्षण आहे. याला अप्रत्यक्षपणे लोकसंख्या कारणीभूत आहे. त्यामुळे आता सुदृढ विचार लोपत जात आहेत.
         लोकसंख्येत वाढ हे चांगले लक्षण आहे, हे यापूर्वीच नमूद केले आहे. लोकांच्या अव्यवस्थेमुळे लोकसंख्या ही प्रश्न बनून उभी टाकत आहे, असे मला म्हणायचे आहे. मनुष्य बळ मुबलक असताना त्याचा उपयोग होत नाही. हे सर्व अव्यवस्थापनामुळे घडते आहे. त्याकरिता प्रत्येकाला काम व त्यांच्या नून्यतम गरजा पूर्ण होतील इतकी प्राप्ती प्रत्येकाला व्हावी असे व्यवस्थापन केल्यास लोकसंख्या ही  शाप की वरदान अशी चर्चाच होणार नाही.  यात फक्त सरकारला दोष देऊन भागत नाही. प्रत्येकाला नोकरी हवी आहे. नोकरी मिळत असेल तर जरूर करावी. जर नोकरी मिळत नसेल तेव्हा जगण्याची उमेद न सोडता बेरोजगारांनी छोटे छोटे उद्योग सुरू करावेत. आज मोठमोठे उद्योगपती दिसतात, हे एकदम मोठे झाले नाहीत. त्यांनी सुरूवातीला छोटा उद्योग सुरू केला व त्यातून ते मोठे झाले. सर्वांनी असा विचार करून मार्गक्रमण केल्यास समाजाचे व्यवस्थापन घडून येईल. सरकारी यंत्रणा त्यात यशस्वी होईल. टाळी एका हाताने वाजत नाही. पुन्हा समाजाला कारणपरत्वे, जगाला नैतिक पातळीवर  व सुदृढ विचारावर स्थिर करण्याकरिता प्रत्येक सरकार व तेथील नागरिकांनी एकाच वेळी जबाबदारी उचलण्याची प्रतिज्ञा करून त्या पदपथावर चालल्यास जगाचे भविष्य उज्वल आहे. तसा दृढ निश्चय करून आपण जागतिक लोकसंख्या दिन आनंदाने साजरा करू.
   -बंडोपंत कुलकर्णी
सोलापूर
============================
2)
पृथ्वीच्या पाठीवरती हि अफाट झाली गर्दी।
गर्दीतच जन गुदमरती, दुःखात किती तळमळती ।........
वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे ।
या ओळींमुळे लोकसंख्यावाढीमुळे जागतीक पातळीवर मोठी समस्या निर्माण झाली आहे. इ. स. १९०० मध्ये ४० कोटी असलेली जगाची लोकसंख्या इतकी वाढली की , लोकसंख्या विस्फोट म्हणुन ओळखली जाऊ लागली.
वैदयकिय व वैज्ञानिक प्रगतीमुळे आयुर्मान वाढले व मृत्यूदर कमी झाला हे लोक संख्यावाढीचे मुख्य कारण. हिच लोकसंख्या २०३० साली८८७ कोटीपर्यंत पोहचुन १७२ कोटींची भर पडेल .
चंगळवादी विचारसरणीमुळे निसर्गावर अधिक आक्रमण होत आहे. घरे,शाळा,दवाखाने,बॅंक,बागा,रस्ते,पुल,लोहमार्ग,जलशुद्धीकरण,वीजपुरवठा करणार्‍या यंत्रणा अपुर्‍या पडत आहेत, आरोग्यविषयक स्वच्छता राखणे कठीण झाले,शेतजमिनीचे प्रमाण कमी होत आहे,अन्नधान्य ऊत्पादनात घट,समाजात बेकारीचे प्रमाण वाढले,दळणवळण समस्या वाढल्या, वाहन संख्या वाढीमुळे प्रदुषणात वाढ,अपघातांचे प्रमाण वाढले,आवाजाची पातळी वाढली आहे.
भारतात दर दिड सेकंदाला एक मुल याप्रमाणे वर्षाला२.४कोटीबालकांचा जन्म होतो.
पुत्राचा अट्टाहास,वंशाचा दिवा, अंधश्रद्धा, शास्रीय माहीतीचा अभाव,मरणाची भिती अशी अनेक सामा.,आर्थिक, धार्मिक कारणांमुळे लोकसंख्या वाढत आहे.
प्रत्येक नागरिकाने कर्तव्य भावनेने देशहितासाठी लोकसंख्या नियंत्रण योजनेस सहकार्य केले तर भारत जगातील एक महासत्ता बनेल.भारतात कुटुंब नियोजन राबविले जाते त्याची योग्य दखल घेतली पाहीजे,पुत्राचा अट्टाहास सोडला पाहीजे,अंधश्रद्धा व अज्ञान दुर झाले पाहीजे तर भारत जगातील एक महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही
नरेंद्र म्हस्के, शिरपुर
9552980089
============================
3)
आज जगालाही ज्या बाबीची दखल घ्यावी लागली आणि जागतिक स्तरावर जो दिन साजरा करावा लागतो तो म्हणजे लोकसंख्या दिन. वास्तविक पहाता जगात आज जे अराजकतेचे संकट दिसत आहे,जाणवत आहे ते निव्वळ लोकसंख्या वाढीच्या मुळाशी आल्यावाचून रहात नाही.जागतीक पातळीचे सोडा देश,प्रांत,जिल्हा,गांव किंवा घर या सर्वच ठिकाणी वाढणा-या लोकसंख्येचे परिणाम आपणास जाणवतात. आणि आपण अशा परिणामास तोंड देत रोजचे जीवन जगत असतो.
महागाईचा भस्मासुर रोज आपल्याशी खो खो खेळतो आहे.जागतिक लोकसंख्या म्हणजे विश्वातील माणसांची संख्या.लोकसंख्या वाढीची कारणे आणि उपाय याबाबत थोडंस अवलोकन केलं तर आपणास लक्षात येईल की दारिद्र्याचा ओघ केवळ या वाढत्या लोकसंख्येमुळेच तयार झाला आहे.जगाची लोकसंख्या अॉक्टोबर 2011 मध्ये सात अब्ज ऐवढी होती, 20 व्या शतकात विश्वलोकसंख्येतील प्रचंड वाढ विशेष क्रांतिकारक घटना म्हणून याकडे पाहिले जाते.मर्यादित औद्योगीक क्षमता आणि अमर्याद लोकसंख्या यामुळे अन्नधान्य तुटवडा ,अपुरा निवारा रोगराई असे अनेक प्रश्न निर्माण होऊन समस्यामध्ये वाढच होत आहे.लोकसंख्या वाढीची कारणमिमंसा पाहिली तर अंधश्रद्धा हे बहुतेक कारण पुढे येते.मुल म्हणजे ईश्वराची देणगी असून आपण ती स्विकारली पाहिजे, या भाबड्या कल्पनेने भरमसाठ लोकसंख्या वाढत आहे.जीवन जगण्याचा दर्जा खालावत जाउन समाजात अराजकता,अशांतता आणि गुन्हेगारी प्रवृती वाढत चालली आहे.महागाई आणि बेकारी ही वाढलेल्या लोकसंख्येचीच देणगी आहे.रिकामे डोके सैतानाचे घर म्हणतात त्या प्रमाणे बेकारीत जगणा-या तरुणांकडे कसलेही काम नसल्याने,त्यांची डोकी रिकामी आहेत आणि तीच डोकी सैतानी कामे करताना दिसून येतात.अपुरी साधनसामुग्री आणि तिचे हक्कदार अनेक या कारणे भांडनतंट्यात दिवसागणिक वाढ होताना दिसते आहे.आता आपण त्या रिंगणाच्या पुढे गेलेलो असल्याने सल्ला देऊ शकतोत आणि आजच्या तरुणांना विनंती वजा सल्ला आहे की आपले भावी आयुष्य आणि येणा-या पिढीचा भविष्यकाळ कांही प्रमाणात का असेना पण आपणास सुकर करता येऊ शकतो.आपण आपल्या परीने लोकसंख्येवर नियंत्रण ठेऊन देशसेवाही करु आणि आपले हित जोपासून जगण्याचा दर्जा सुधारु.
                  श्री.पडवळ हणमंत सोपान
              मु.पो.उपळे (मा.)ता.जि.उस्मानाबाद
                 8698067566.
============================
4)
          जागतिक लोकसंख्या दिन प्रत्येक वर्षी ११जूलै ला साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम संचालक परिषद द्वारा १९८९ साली पहिल्यांदा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. ११जूलै १९८७ साली जगाची लोकसंख्या जवळपास पाच अब्ज ऐवढी होती. यालाच प्रेरणा घेऊन जागतिक लोकसंख्या दिनांला सुरवात करण्यात आली. लोकांच्या हितासाठी या कार्यक्रमाला समोर सुरू ठेवण्यात आले. जागतिक लोकसंख्या दिन साजरे करण्यामागे उदिष्ट असे की, पूर्ण जगात लोकसंख्या  वाढीच्या मुद्दयावर चर्चा करणे हे आहे.
          कशा प्रकारे 'जागतिक लोकसंख्या दिन' साजरा केला जातो ? जागतिक लोकसंख्या दिनाला मोठ्या प्रमाणात जागतिक पातळीवर जन जागृतीचे कार्यक्रम राबवले जातात. जगात हा सर्वात मोठा कार्यक्रम असतो. प्रत्येक वर्षी या साठी एक थीम ठेवली जाते व त्या थीम वर जन जागृती केली जाते. लोकसंख्या या मुद्दयावर एकत्र काम करून लोकांचे या विषयावर आकर्षण वाढवले जाते. या  कार्यक्रमात लोकसंखेविषयीच चर्चा होत नाही तर विविध विषयांवर चर्चा केली जाते.8
           या कार्यक्रमांत मोठ्या प्रमाणात लोक सहभागी व्हावे म्हणून  वेगळे वेगळे कार्यक्रम ठेवले जातात. उदाहरणात सेमिनार, चर्चा, शैक्षणिक स्पर्धा, निंबध लेखन स्पर्धा, वेगवेगळ्या विषयांवर लोक स्पर्धा, पोस्टर वितरण, गायन, खेळ, भाषण स्पर्धा, कविता, चित्रकारी, नारे, विषय आणि संदेश वितरण इत्यादी. प्रेस कॉन्फरंस, टी. वी. , न्यूज चैनल, रेडिओ आणि टीवीवर लोकसंख्या विषयावर कार्यक्रम या द्वारे जन जागृती केली जाते. या   सर्व गोष्टी जागतिक पातळीवर होतात पण आपण आपल्या भारत देशात कशा प्रकारे जनजागृती करतो हे जास्ती महत्वाचे आहे.
          जगात लोकसंख्येच्या बाबतीत भारत हे दुसर्या क्रमांकाच देश आहे. आपल्या देशात 'हम दो हमारे दो' असा कायदा आहे पण लोकसंख्या वाढीकडे बघून असे वाटते की 'हम दो हमारा एक' असा कायदा पाहिजे. भारतात लोकसंख्या का वाढते याच एक उदाहरण देते. हिंदी सीनेमाचा महानायक अमिता बच्चन यांना दोन अपत्य आहेत. तसचं मुलगाचं हवा असे न म्हणता एकचं मुलगी असलेले सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सचिन पिळगावकर. असे अनेक सुप्रसिद्ध लोक मुलगा मुलगी भदे करत नाही फक्त दोन अपत्य जन्माला घालतात. तर मग मोलमजुरी करून जगणारे लोक ज्यांना दोन वेळचे जेवायला मिळत नाही मात्र त्यांना चार - पाच अपत्य असतात. अस का ? हा त्यांचा अशिक्षितपणा झाला. चार - पाच अपत्यामागचे कारण असे की त्यांना एक तर गर्भनिरोधक, कुंटुब नियोजन या बद्ल माहिती नसते आणि दुसर कारण असं की मुलगी नको मुलगाच हवा. या गोष्टीमुळे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते.
          जन जागृती आम्ही कोणत्या गोष्टीची करतो आणि कशा प्रकारे करतो याला खूप महत्त्व आहे. एखाद्या हॉल मे बसुन सुशिक्षित लोकांनामधे जन जागृती करण्यापेक्षा खेळ्या गावात जाऊन अशिक्षित लोकांना त्या गोष्टी पटवून देणे म्हणजे जन जागृती. लोकसंख्या नियंत्रन करण्यासाठी लौंगिग शिक्षण, स्री-पुरूष समाता, कुंटुब नियोजन, माता - शिशू स्वास्थ, १५ ते२० वर्षाच्या मुली गर्भवती राहणे चुकीचे, गर्भपात या विषयांवर जन जागृती करणे आवश्क आहे.
          या प्रकारची जन जागृती ज्या दिवशी होईल त्या दिवशी लोकसंख्या वाढीला नियंत्रन नक्कीच बसेल. फक्त भारताचीचं लोकसंख्या नाही तर संपूर्ण जगाची लोकसंख्या नियंत्रित होईल.
            
                  कु. भाग्यश्री चलाख
                   नागपूर -9146615473
============================
5)
व्यक्तीचे उत्तम जीवनमान ठरवण्यास जबाबदार  घटकांच्या यांचा परस्पर संबध व त्यांच्यातील परिवर्तनाची प्रक्रिया या गोष्टीचे ज्ञान मिळवुन देण्यास मदत करणारे शिक्षण म्हणजे लोकसंख्या शिक्षण होय.
       आज लोकसंख्या शिक्षणाची गरज का भासती आहे कारण उत्तम जीवन जगण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टीचे ज्ञान, चांगले संस्कार लोकांवर होणे आवश्यक आहे .
आज लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे.1900 व्या शतकात जगाची लोकसंख्या
2 billion होती.2000 साली
6 billion होती आणि 1947 साली भारताची लोकसंख्या 350 million होती अशा प्रकारे लोकसंख्या दर 10 वर्षांनी जनगणना केल्यास आपल्या असे लक्षात येईल कि, जनगणनेचा दर 1.7 % नी वाढलेला दिसुन येतो.
हे सर्व समजण्या साठी लोकांना लोकसंख्ये बाबत शिक्षण देणे काळाची गरज आहे .लोकसंख्येच्या प्रस्फोटा बाबत,जन्मदर व मृत्यूदर यांच्यातील अंतराबाबत,
वयोगटाची जाणीव होण्यासाठी , लोकसंख्येची गुणवत्ता  व उत्तम जीवनमानासाठी, वैज्ञानिक  द्दष्टीकोन निर्माण होण्यासाठी
कुटुंब  कल्याण कार्यक्रमाचा प्रसार होण्यासाठी, नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने
वापर होण्यासाठी, जबाबदार पालकत्व निर्मितीसाठी आणि राष्ट्रीय ऐक्य व परिश्रमासाठी लोकसंख्या शिक्षणाची गरज आहे.
लोकसंख्या वाढल्यामुळे त्याचे दुष्परिणाम काय होतात याची जाणीव प्रत्येक व्यक्तीला असणे आवश्यक आहे . तसेच लोकसंख्या  वाढीमुळे समाजाच्या आर्थिक  व सामाजिक विकासावर त्याचे किती भयानक परिणाम होतात हे ही पाहिले पाहिजे
लोकसंख्या वाढीमुळे सर्वात प्रथम बेकारी वाढते ,आरोग्य  सुविधांचा अभाव निर्माण होतो, पर्यावरणाचा समतोल ढासळतो,सामाजिक विषमता निर्माण होते ,जीवनावश्यक वस्तुंची टंचाई भासते ,राष्ट्रीय  विकास मंदावतो, लोकाना राहण्यासाठी निवारा उपलब्ध होत नाही त्यामुळे झोपडपट्टीची निर्मिती करावी लागते शैक्षणिक संस्थामध्ये गर्दी झाल्यामुळे अव्वाच्या सव्वा फीस भरावी लागते .तळागाळातील लोक एवढी फीस् भरुन आपल्या मुलाना शिक्षण नाही देऊ शकत.शासन संस्थांना मान्यता देऊन शिक्षणाचे बाजारीकरण करते . पर्यायाने  गरीबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही.
म्हणुण आज सर्वांनी लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने पुढील गोष्टी अग्रक्रमाने केल्या पाहिजेत
कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा प्रसार  केला पाहिजे, कुटुंब नियोजन हे राष्ट्रीय कर्तव्य मानले पाहाजे स्री शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे, विवाहाच्या वयात वाढ केली पाहिजे , दोन पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्याना शासकीय सुविधा पासुन वंचित ठेवले पाहीजे.आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काही समाजात कुटुंब नियोजन करत नाहीत तेव्हा सर्वाना कायदा सारखाच असावा नाही तर एकाच समाजाची लोकसंख्या जास्त असेल तर सामाजिक तेढ निर्माण होईल
     तस पाहिलं तर आपण आता 21 व्या शतका कडे वाटचाल करताना औद्योगिकीकरण वाढल्यामुळे अनेक समस्येवर मात केली आहे.
म्हणजेच लोकसंख्येचा भस्मासुर आज कितीही विकट हास्य करु दे 21 वे शतक त्याला स्मित हास्य करण्यास भाग पाडणार आहे .परग्रहावरची वस्ती ,इंटरनेट वरील बाजार खरेदी, बँक व्यवहार , घरात बसुन चालवता येणारे कारखाने , connectschool.com म्हणजे घरच्याघरी शाळा . मग कशाला दिसेल रस्त्यावर गर्दी? कशाला होईल टँफिक जाम यंत्रमानव तर मानवाची सेवा अहोरात्र करणार आहे.दीर्घायुष्य दंतकथा न राहता वास्तवात येणार आहे त्या साठी बुद्धीमान मनुष्य बळाची आवश्यकता आहे.
सौ.मीना सानप ,
बीड  9423715865
============================
6)
11जुलै हा दिवस आपण जागतिक लोकसंख्या दिन म्हणुन साजरा करतो.आणि मग याच एका दिवसापुरताच या विषयावर कारणमिमांसा, उपाययोजना या विषयावर केवळ पोकळ चर्चा होते नि दुसऱ्या दिवशी पेपर जसा एक दिवसाचा राजा अन् दुसऱ्या दिवशी रंक होतो तशी ही चर्चा होते.कधी विचार केला का वर्षीनुवर्ष हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करतोय लोकसंख्या  मात्र काहीच यश मिळालेले  दिसत नाही उलटतर्फी हा आकडा वाढतच चालला आहे कमी होणे जणु आपल्या हातीच राहीले नाही.
               जागतिक स्तरावर वेगवेगळ्या माध्यमातुन यावर उपाययोजना राबवल्या जातात. तशाच आपल्याही देशात राबवल्या जातात.पंरतु आपल्याला का आजतागयात यश प्राप्त होत नाही. या प्रगतशिल देशात अज्ञान, लाज कि शिक्षणाचा अभाव कोणत्या गोष्टी कारणीभुत असाव्यात?
             लोकसंख्या वाढीला अनेक गोष्टी कारणीभुत आहे. अज्ञान,अंधश्रद्धा,शिक्षण अभाव,मुल देवाची देण हे वाक्य,नि मुलगा हट्ट हे आधुनिक कारण.....
      पंरतु या लोकसंख्या वाढीचा दुष्परिणाम समाजावर होत चालला आहे. अराजकता,लुटपाट ,गुन्हेगारी,हत्या या ना अश्या अनेक विकृती समाजाला जडत चालल्या आहेत. संस्कार शुन्य पिढ्या घडत जावुन समाजविघातक पिढीची रूजवण या विक्राळ लोकसंख्या वाढीमुळे होत आहे.
      म्हणुनच आता या नवीन पिढीनेच या लोकसंख्या वाढीला पायबंद घालण्याचा विडा आता उचलवयास हवा व  कमी लोकसंख्या राज्यचा विश्वविक्रम करावे असे वाटते.तरच हा लोकसंख्या  दिन हा खऱ्या अर्थाने सार्थक होईल व अनेकविध जडलेल्या,पोखरून टाकणाऱ्या समस्येपासुन आपली कायमची सुटका होईल व एक सशक्त,निरोगी,सुजान संस्कारक्षम असे पिढीसोबत लोकराज्य तयार होईल.
- कल्पना जगदाळे
बीड 9921967040
============================
7)
जगाची लोकसंख्या सातशे कोटीवर पोहचली आहे लोकसंख्येच्या बाबतीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे त्यापाठोपाठ भारताचा दुसरा क्रमांक आहे भारताची लोकसंख्या एकशे पंचवीस कोटी पर्यत आहे
     वरील आकडेवारी पाहता लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम आपण पहात आहोत  त्यात प्रामुख्याने लोकांचा कल शहरांकडे वाढतोय व त्यामुळे सिमेंटची जंगले वाढत चालली व खेड्यातील ओढ कमी होऊ लागली परिणामी शेतातील उत्पन्न कमी होऊ लागले व अन्न धान्याचा तुटवडा जाणवु लागला
    लोकसंख्येच्या वाढीमुळे पर्यावरण  असंतुलीत झाले पावसाचे प्रमाण कमी झाले लोकांना पाणी मिळेनासे झाले  याचा अनुभव आपण सद्यस्थितीत घेत आहोत त्यामुळेच एक जुलै रोजी झाडे लावण्याचा शासनाचा आदेश  फक्त आदेश करुन चालणार नाही खरतर सक्तीच करायला हवी  आपण पाहतोय महामार्गावरील एव्हडे मोठे मोठे वृक्ष शासनाने तोडले खरतर त्या वृक्षांचे पूनर्भरण करता आले असते मोठे वडाची झाडे होती जेसीबीने दुसरीकडे मोठेमोठे खड्डे घेऊन त्या झाडांचे प्रत्यरोपण करता आले असते असो
    लोकसंख्या वाढीचा परिणाम शिक्षण आरोग्य यावर सुध्दा होतो चांगले शिक्षण मिळाले तर बेकारी कमी होईल बेरोजगारी आली की अनेक वाईट कृत्य व्यक्ती करु शकतो त्यामुळेच गुन्हेगारी वाढत आहे
   अशा खुप काही समस्या आहेत त्यावर एकच उपाय आपले कुटुंब मर्यादीत असु द्या मुलांना चांगले शिक्षण द्या सुसंस्कारित पिढी घडवा मुलगा मुलगी समान माना आणी या लोकसंख्येच्या समस्येपासुन आपल कुटुब आपल गाव तालुका जिल्हा वआपला देश वाचवा येव्हडेच मी याप्रसंगी सांगु इच्छिते
      खेडकर सुभद्रा बीड
        9403593764
============================
8)
[ 99751 90361
आज आपण कुठेही जा-जसे की, कुठल्याही मंदिरात, कुठल्याही दुकानात ,कुठल्याही कार्यालयात,कुठल्याही सार्वजनिक शौचालयात,कुठल्याही मोटार स्थानकात,कुठल्याही आगगाडी स्थानकात,कुठल्याही देशी-विदेशी मद्याच्या दुकानात,इत्यादी हजारो ठिकाणे! तेथे आपल्याला लोकांची गर्दीच दिसेल.हे सर्व सांगण्याचे निमित्त म्हणजे 'जागतिक लोकसंख्या दिन' यावर  विचार मंथन करणे.                     लोकसंख्या दिन जागतिक स्तरावर असो या राष्ट्रीय स्तरावर असो,त्या अनुषंगाने चर्चा करतांना आपल्याला लोकसंख्या वाढीची कारणे,उपाय ,लोकसंख्या वाढीचे तोटे, फायदे,लोकसंख्या वाढ समस्या आहे की वरदान ,लोकसंख्या दिन का साजरा  करावा लागतो ;या ठळक बाबींवर चर्चा करणे गरजेचे वाटते. लोकसंख्या वाढी मागे मोठे कारण असेल तर ते म्हणजे अंधश्रद्धा! माझ्या गावातीलच एक उदाहरण देऊन सांगतो ;गावात एक कुंभार वयस्कर दाम्पत्य होतं .त्या मातेचे अनेक पाळण्यावर  पाळणे हालले.तीन वेळ सलग  मुली झाल्या.लोकांनी सुज्ञपणे सांगितले तर तो म्हणायचा,'काहींनाही हे देवाचे असते ,मला चौथ्यावेळी तरी पोरगा व्हईलच!'म्हणजे अशी मानसिकता लोकसंख्या वाढण्यास कारणीभूत ठरते .तसेच असाही अडाणी लोकांचा समज होतो की ,'त्याने (ई श्वराने)जन्माला घातले तो काय त्या जीवाला उपाशी मारणार का ? चोच दिली म्हणजे दाना देणारचं!'त्याचप्रमाणे कुटुंब नियोजन संबंधी अज्ञानीपणा, गर्भनिरोधक बाबतीलतले मागासलेले अज्ञान,वंशाला दिवा पाहिजे म्हणून अनेक पणत्या विझवत विझवत त्यातीलच काही सलगपणे मुली होऊ देत राहणे,आघाडीच्या काळातील एका नेत्याच्या विधानानुसार वीज भार नियमन(लोड शेडींग)? अशी अनेक कारणे लोकसंख्या वाढीची सांगता येतात.
लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी  लोकांचे ,समाजाचे प्रबोधन करून त्यांची मानसिकता बदलणे हे सर्वात मोठे काम करणे गरजेचे वाटते.ज्याप्रमाणे एक मराठी चित्रपट  सैराट घराघरात पोहचून आबालवृद्धांना त्याविषयी आज माहिती आहे ,त्या पद्धतीने लोकसंख्या मर्यादित ठेवण्याचे महत्वाचे कार्य हे लोंकांच्या ,जण माणसाच्या मनापर्यंत पोहचले पाहिजे. कुटुंब नियोजन करण्याने शरीरावर काही दुष्परिणाम होत नाहीत ,हे समजून सांगता आले पाहिजे गर्भ निरोधक साधनांची संबंधितांनी लाज न बाळगता माहिती घेतली पाहिजे ,दिली पाहिजे.अंधश्रद्धा त्याविषयीची चित्रपट,नाटक,मालिका,पथनाट्य,इ. द्वारा मनोरंजन करीत समूळ नष्ट केली पाहिजे.'छोटे कुटुंब सुखी कुटुंब' घोषवाक्य केवळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर नव्हे तर माणसाच्या मनावर कोरले गेले पाहिजे,रंगवले पाहिजे!
लोकसंख्या वाढ ही एक आपल्या समोर दत्त म्हणून उभी असलेली सर्वात मोठी समस्या आहे .त्या समस्येमुळे सर्व क्षेत्रातील विकासाभिमुख योजना राबवतांना अडचणी येत आहेत पुरवठा कमी अन मागणी जास्त यामुळे व्यवस्थेवर ताण पडून एकातून दुसरी समस्या निर्माण होतांना दिसून येते .त्यामुळे या लोकसंख्या वाढ समस्येचे वेळीच गांभीर्य लक्षात घेतले नाही तर आपल्या जगावर त्याचे गंभीर दुष्परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत!
तथापि काही देशात  लोकसंख्या वाढ ही समस्या नसून त्याकडे वरदान म्हणून बघितले जाते पण तशा देशात कुशल मनुष्यबळ हवे असते म्हणून कदाचित!मला नाही वाटत आपल्या देशात काम -कष्ट करणारी लोकं जास्त असेल?तेव्हा येथे समस्या म्हणूनच आपण त्याकडे बघतो! लोकसंख्या दिन साजरा करण्या मागे उदात्त हेतू असतो की लोक जागृती व्हावी,लोकांचे प्रबोधन व्हावे पण आजकाल असे होते की लोकसंख्या दिन साजरा होतांना लोक दीन होतांना दिसतात .केवळ कागदी घोडे नाचवण्याच्या फंदात न पडता खऱ्या अर्थाने आपण ज्यावेळी रोजच लोकसंख्या दिनाची आठवण ठेऊन 'काम' करू ,त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने तन-मन-धना ने 'जागतिक लोकसंख्या दिन'साजरा करीत आहोत ,असे म्हणायला हरकत नाही!! 
- रामदास देशमुख
वाशिम-सांगली 9975190361
============================
9)
खरेतर जागतिक लोकसंख्या दिन हा समस्त मानवजातीला विवेकी विचार करण्यास उद्युक्त करणारा दिवस आहे. आपल्या मानवी चुकांमुळे आपले, पर्यावरणाचे किती नुकसान होते आहे हे जाणण्याचा हा दिवस. वेळीच सावध होऊन आपली जनसंख्या वाढ रोखता नाही आली तरी ती मर्यादित करणे आणि भावी पिढीच्या अस्तित्वाला धोका पोहोचू नये याची आवश्यक काळजी घेणे हे जाणवू देणारा इशारा दिवस आहे. मानवी जनसंख्या वाढीची कारणे काय?
विज्ञानामुळे घटलेला मृत्युदर, वाढलेला जन्मदर, आयुष्य मर्यादेत झालेली वाढ, धार्मिक, वांशिक अस्मितेसाठी मनुष्यबळ वाढविण्यास जहालवाद्यांचे हेतुतः मिळालेले उत्तेजन ही कांही ठळक कारणे आहेत.
अमर्याद जनसंख्या वाढीने निर्माण झालेले गंभीर प्रश्न वा समस्या -
भौगोलिक - जमीनक्षेत्र निवासी वापरासाठी कमी पडणे, कृषीचे अन्नधान्योत्पादन अपुरे पडणे, पेयजल कमतरता,
सामाजिक - धान्य टंचाई ने महागाई होणे, बेकारांची संख्या वाढणे, भ्रष्टाचार वृद्धी, गुन्हेगारी चा चढता आलेख, नागरी सुविधांवर अतिरिक्त ताण, वाहतुक साधनांचा अतिरेकी वापर केल्याने प्रदूषण वाढ चिंताजनक पातळीवर पोहोचणे, अनारोग्य, मानसिक आजारांमध्ये काळजी वाटण्याइतकी वाढ.
आशिया खंडातील देशांमध्ये जनसंख्या वृद्धी चिंताजनक आहे. चीनने साम्यवादी विचारधारेतून सक्तीचे कुटुंबनियोजन राबविले. तिथे एक अपत्याचीच परवानगी होती.
भारत संदर्भात पहावे तर स्व. इंदिरा गांधी यांनी लोकसंख्या वाढीची भीषणता वेळीच ओळखली होती. कुटुंब नियोजन धोरण दूरदर्शीपणाने अवलंबले. मात्र अतिउत्साहाच्या भरात ही एक चांगली चळवळ नाहक बदनाम झाली. त्यांच्या राजकीय विरोधकांनी त्याचेच भांडवल केले. इतक्या वर्षानंतरही कुटुंबनियोजनाचे महत्व कमी झालेले नाही. मात्र, राजकीय इच्छाशक्ती नसल्याने लोकांमध्ये अजूनही पुरेशी समंजसता नाही हे खेदाने म्हणावे लागेल.
जागतिक लोकसंख्या दिन भारतासाठी निर्वाणीचा इशारा आहे. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे.
- बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे ४११०४४
============================
10)
     पृथ्वीवर दाटीवाटीनी राहणारा हा मनुष्यप्राणी स्वत :च्या आयुष्याला स्वतंत्रपणे एक वेगळे वळण देण्याचाअट्टाहास करतो आहे.भारतात प्रत्येक जातीधर्माचे लोक राहतात. धर्म प्रवृत्ती नुसार लोकसंख्या वाढीस प्रोत्साहन तर आहेच परंतु त्याचा परिणाम मात्र लोकसंख्या वाढीवर होत आहे.
             सामान्य माणुस, विचारवंत,दलित, तत्वाने झपाटलेला धर्म प्रणालीच्या तत्वाने वेढलेला माणुस एक ना अनेक विचारानी प्रेरित झालेला खूप मोठा  समुदाय या पृथ्वीवर राहतो.
               समाज मुळी बनतो तो एका विशीष्ट चालीरिती रुढी परंपरेने .आता मात्र प्रत्येक विचारांचा गट निर्माण झाला आहे.वर्षानुवर्षे चालत येणा-या समाजाच्या घडणीला  आता नवनवीन विचारांची उभारणी मिळत आहे.नवीन विचारांची पेरण होत असताना समाजातील प्रत्येक घटक स्वतंत्र होत असताना. संस्कार व संस्कृती टिकेल का? याचा विचार होईल याची जाण ठेवली  पाहिजे.
               लोकसंख्या  भरमसाठ वाढली
माणुस स्वत :च्या सुखसोयीच्या पाठी लागला आहे.नवनवीन घराच्या निर्मीतीसाठी जंगलतोड करून स्वत :ची गरज भागवत आहे.पण प्राण्यांची घरे मात्र मोडत आहे.रोजगार मिळवण्यासाठी शहराकडे ओढा वाढला खेडी ओसाड पडली.शहरीकरण वाढले.म्हातारी माणसे एकाकी झाली.लोकसंख्या वाढीमुळे सर्व. साधारण मनुष्यप्राण्याची संख्या वाढली.बुद्धीजीवीवर्ग मात्र कमी झाला.बुद्धी जीवी प्राण्यांना मर्यादा पडतात .देशाच्या प्रगतीला अडसर निर्माण होत आहे. लोकसंख्या वाढीमुळे नुकसान जास्त आहे.
              स्नेहलता कुलथे
               7588055882
============================
11)
११ जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून मानण्यात येतो. संपूर्ण जगाची लोकसंख्या सुमारे सातशे कोटी आहे.लोकसंख्येचा भस्मासूर हा मानवी जीवनाला मिळालेला मोठा शाप आहे.
लोकसंख्येच्या बाबतीत चीन हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश मानण्यात येते त्याखालोखाल दुसरा नंबर भारताचा लागतो ही अत्यंत गंभीर बाब आहे,
      वाढत्या लोकसख्येचा हा प्रश्न माणसातील अज्ञान, अशिक्षितपणा ,अंधश्रध्दा ह्यामुळे विशेष सतावतोय त्याचप्रमाणे , लहान वयात विवाह करणे,मुलगाच हवा या अट्टटाहासापोटी स्त्रियांची पिळवणूक ही ही कारणे आहेत.
  समाजात विषमतेची दरी वाढत चाललीय .शिक्षणाचा अभाव तसेच शिक्षण महागलेय तसेच समाजातील अनाचार ,अत्याचार मुलींचे शोषण हे प्रकार वाढत चाललेत त्यामुळे लहान वयात मुलींचे लग्न लावून दिले जाते. स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन समाजातीलचालीरिती यामुळे लोकसंख्या वाढ होतच चाललीय.नि प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चाललाय
   या लोकसख्या वाढीमुळे समाजात श्रीमंत गरिब अशी दरी वाढत चाललीय. महागाईचा भडका उडालाय.जमिन पाणी तसेच अन्न ,वस्त्र ,निवारा या मूलभूत गरजांचाही तुटवडा जाणवू लागला आहे.
नविन जीव जन्माला येणे नि नवनविन शोधांमुळे आहेत त्यांचे जीवनमान वाढीस लागल्यामुळे जन्ममरणाचा आलेख विषम होत चाललाय नि लोकसंख्या वाढ होत चाललीय.
पैसा हे सर्वस्व मानल्यामुळे नाती दुरावत चाललीत समाजात गुन्हेगारी वाढत चाललीय.राजकारण समाजकारण ढवळून निघालेय.समाजविघातक गोष्टी समाजात रुढ होऊ लागल्यात.
मुलगाच हवा , वंशाचा दिवा या हव्यासापायी लोकसंख्यावाढ होतेय.
      वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी समाजात जागृती झाली पाहिजे समाजसुधारकांनी आपृण सवांनी पुढे येऊन समाजाला सुशिक्षित केले पाहिजे मुलगा असो वा मुलगी एकच पुरे अशी शिकवाण आत्मसात केली पाहिजे  देशात तळागाळात जाऊन शिक्षणापासून वंचित समाजाला जागृत केले पाहिजे. अंधश्रध्दा निर्मूवन केले पाहिजे.
स्त्रियांना सुशिक्षित केले पाहिजे,त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करुन त्यांना त्यांच्या पायावर उभे केले पाहिजे अन्याय अत्याचाराला बळी न पडता संकटाला सामना करण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी आले पाहिजे.
बालगुन्हेगारी अपरवृत्ती रोखली पाहिजे. सर्वांना शिक्षणाने सुसंस्कत केले पाहिजे रोजगार मिळवून दिला पाहिजे लेखणीद्वारे सामाजिक चळवळ उभारली पाहिजे,
कीर्तन प्रवचन तसेच नाटक चित्रपट याद्वारे लोकसंख्येचा भस्मासूर काबूत आणण्यासाठी समाजाला जागृत केले पाहिजे
  नविन पिढीला या बाबतीत हाताशी धरुन समाजात लोकसंख्यावाढीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत तरच या अमाप लोकसंख्या वाढीला आळा घालता येईल
हम दो हमारा एक ही घोषणा घोषणा न रहाता तिचा अंगीकार केला पाहिजे हाच यावरचा उपाय आहे असे मला वाटते
- प्राची देशपांडे
9860314260
===========================
12)
११जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणुन साजरा केला जातो.या दिवशीच लोकसंख्या दिन का साजरा केला जातो ,हे शोधावयाचे झाल्यास लोकसंख्या वाढीचा इतिहास अभ्यासावा लागेल. ११जुलै१९८७ रोजी जगाची लोकसंख्या ५०० कोटी झाली आणि जगाला खडबडुन जाग आली.लोकसंख्या वाढीची दखल घ्यावी लागली.११जुलै हा दिवस युनोने 'जागतिक लोकसंख्या दिन'म्हणुन जाहिर केला.तेंव्हापासुन आपण हा दिवस लोकसंख्या जाणीव जागृती दिवस म्हणुन साजरा केला जातो.
     कोणत्याही देशाची लोकसंख्या ही त्या देशाची साधनसंपत्ती असते.लोकसंख्येची रचना ही वयानुसार,लिंगानुसार,भौगोलिक रचनेनुसार,ग्रामीण, शहरी व साक्षरतेनुसार पाहिली जाते.कोणत्याही देशाची लोकसंख्या जास्त असेल तर साधनसंपत्ती वर ताण पडतो व लोकांच्या गरजा पुरविल्या जात नाहीत.याउलट लोकसंख्या कमी असेल तर मनुष्यबळाअभावी साधनसंपत्तीचा विकास होत नाही.पण लोकसंख्या ही त्या देशाच्या साधनसंपत्तीच्या प्रमाणात असेल तर साधनसंपत्तीवर ताण पडत नाही व साधनसंपत्ती वायाही जात नाही.परिणामी देशाचा विकास वेगाने होतो.म्हणजेच कोणत्याही देशाची लोकसंख्या ही कमी किंवा जास्त असु नये इष्टतम अशीच असावी.
       'भारत हा विकसनशील देश आहे' विकसनशिल देशाच्या बाबतीत  अतिरिक्त लोकसंख्या हा विकासाच्या मार्गातील महत्वाचा अडसर बनला आहे.भारताने विविध क्षेत्रात लक्षणिय प्रगती केली आहे पण प्रगतीची फळे सर्वसामान्यांपर्यंत पाहोचलेली नाहीत.कारण देशाच्या उत्पन्नाच्या बराच भाग लोकांच्या मुलभुत गरजा पुरविण्यामध्येच होतो.परिणामी विकासकामासाठी संपत्तीचा वापर  अत्यल्प होतो.
         'बुद्धिचे निस्सारण'ही लोकसंख्या वाढीमुळे निर्माण झालेली भारतातील खुप मोठी समस्या आहे.भारतातील हुशार मुलांना शैक्षणिक सुविधा पुरवून त्यांच्या शिक्षणावर प्रचंड खर्च करुन त्यांना डॉक्टर,इंजिनिअर बनविले जाते.पण हेच लोक नौकरीसाठी इतर देशांमध्ये स्थलांतरीत होतात.त्यामुळे हा लोकसंख्या वाढीचा दुष्परिणाम मानला जातो.
      लोकसंख्या ही त्या देशाची साधनसंपत्ती असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे जपान.चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे.या देशाने मनुष्यबळाचा योग्य वापर करुन प्रचंड प्रगती साधली आहे.भारतामध्ये फक्त अक्षरांची साक्षरता येऊन चालणार नाही तर आचार विचारांची साक्षरता येणे गरजेचे आहे. केवळ कायदे करुन व बंधने घालुन लोकसंख्येवर नियंत्रण ठेवता येणार नाही.
      भारताचे  दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम आझाद यांनी २०२० साली भारत हे राष्ट्र महासत्ता बनेल असे भाकीत केले होते.त्याचे कारण म्हणजे भारत हा प्रचंड लोकसंख्येचा देश आहे २०२० साली जगातील एकुण तरुणांपैकी ४०% तरुण लोकसंख्या भारतातील असणार आहे.त्या मुळे आपला देश तरुणांचा देश म्हणुन ओळखला जाणार आहे.कोणत्याही देशाचे भवितव्य हे तेथील तरुणांवर अवलंबुन असते.त्यामुळेच भारत तरुण मनुष्यबळाच्या जोरावर महासत्ता बननार आहे त्याचे आपण सर्वचजण साक्षीदार होऊयात!
      संगीता भांडवले
       वाशी, उस्मानाबाद
      9923445306
============================
13 )
          जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी आपण ११ जुलै ला साजरा करत असतो.संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विकास कार्यक्रमांतर्गत 1989 सालापासून  जागतिक लोकसंख्या साजरा करण्यात येवू लागला आहे. तेंव्हाची एकूणच लोकसंख्या आणि त्यात होणारी दिवसागणिक झपाट्याने होणारी वाढ हा मोठा महाकाय प्रश्न समोर ठेवून लोखसंख्या वाढीच्या मुद्यावर कारणे , दुष्परिणाम आणि उपाय योजना व्हाव्यात ; तत्कालच्या दूरदृष्टि लोकांनी काळाच्या पावलांचा अचूक वेध घेत " जागतिक लोकसंख्या दिन " साजरा करण्याची मुहर्त मेढ़ अतिशय समर्पक रित्या रोवली आहे.
        जागतिक लोकसंख्या दिन साजरा करावा  लागतो आहे तो केवळ आणि केवळ लोकसंख्या वाढीच्या विस्फोटामुळे , वाढीच्या  महाकाय अराजकता निर्माण करण्याच्या नकारात्मक भावनेतून आणि म्हणून या दिनाचे आयोजन , संयोजन हे त्या ध्येय -उद्दिष्ट साध्य होण्यासाठीची सकारात्मक मानसिकता ठेवून पाऊल टाकावे लागतेय.
      पूर्वी अशी एक म्हण होती की, विधात्याने जन्म दिला आहे म्हणजेच त्याने  चोच तयार केली आहे तर चारा ही तयार केला असणारच म्हणजेच  फक्त आयत्या बिळावर नागोबा वाणी ही अवस्था असेल हे मात्र ही बुरसटलेली विचारसरणी सांगते. पण हेच वाक्य २१ व्या एकविसाव्या शतकाच्या उंबरठयावर साफ चुकीचे वाटते.कारण गत आणि चालू वर्षीच्या  दुष्काळाची दाहकता एवढी भीषण होती की , चारा म्हणजेच अन्न तर सोडाच पण घोटभर पाण्यासाठी जंगली मुक्या प्राण्यांना नव्हे तर कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मानव जातीला ही दाहिदिशा पाण्यासाठी भटकंती करावी लागली.आणि म्हणून याची विधायक चर्चा ,उहापोह  ,वाद- विवाद  समाजाच्या तळागळापर्यंत  अगदीच भीषण परिस्थिती समोर ठेवून योग्य नि निर्णायक  साधकबाधक चर्चा होयाला हवी.
             याच लोखसंख्या वाढीचे जेवढे म्हणून काही दुष्परिणाम असतील , तेवढे आपल्याला आणि येणाऱ्या कित्येक भावी पिढ्यांना विषमतावादी दाहक चटके सोसावे लागतील याचे  सोयर सूतक नाही..! या सत्ताधारी नि राजकारणी किंवा समाजकारणी लोकांना आहे. जशा चष्मा लावाल  तसे जग दिसते अगदीच त्याच उक्तिप्रमाणे जो पर्यंत हे भ्रष्ट आणि खालच्या पातळीचे गढुळ राजकारण आणि या सर्व सिस्टम भाग असणारे  बाबू . आणि शिवाय मुख्य म्हणजे सत्ताधारी मतांचा जोगवा आणि त्यांची ही कधीही न भरणारी मतांची हापापलेली झोळी आखड़ती घेणार नाहीत, तोपर्यंत कितीही असे दिन  उत्साहात साजरे करा याला अर्थ प्राप्त होणार नाही.विनाकारण हे प्रयत्न वायाच  जातील यात काही शंका नाही.यातून फलनिष्पती ही मोठाच शून्य असणार.कारण ही नळाखाली लावलेली घागर सवाशी नसून उलटी -पालथी आहे , ती केंव्हाच भरली जाणार नाही.हे निर्विवाद सत्य आहे.आणि म्हणून आणि अशा समाज विघातक, राक्षसी प्रवृत्तीच्या या भयानक महाविस्फोटाला तुम्हा - आम्हाला नव्हे तर येणाऱ्या आणि भावी राष्ट्राच्या ,माणुसकीच्या भविष्याच्या पिढ्यांना भीषण वास्तव अगदी जवळून प्रकर्षाने सामोरे गेल्याशिवाय , अनुभवल्याशिवाय गत्यंतर तर नक्कीच नाही.
लोकसंख्या वाढीची कारणे
निसर्ग नियम - बदल हा निसर्गाचा अधिनियम आहे. प्रजनन आणि सृजनशीलता हे जरी निसर्गाचे वरदान असले तरी त्याला आपण म्हणजे मानवाने आपल्या कार्यक्षेच्या मर्यादा ठेवल्या नाहीत.अनाधी अनंत काला पासून ते आज तागायत बहु पत्नी पद्धत चालू आहे. आणि त्यातूनच पर्यायाने मुले ही देवा घरची फुले .हीच उंदरां-मांजराच्या पिलावळी प्रमाणे जन्मास घालताहेत. हीच सुकुमार फुले ज्या वयात शिक्षण ,सुसंस्कार ,बाळकडु  घ्यावयाचे असतात तेंव्हा शहरी भागातील झोपडपटयामधुन काच -पत्रा -भंगार गोळा करत किंवा दरोदारी भिक मागत फिरतात . टीचभर पोटाची खळगी हाच त्यांच्या साठी मोठा यक्षप्रश्न असतो . हेच त्यांच्या जगण्याचे मूळ भूकेचे विश्व असते.
वैद्यकीय सेवा सुविधांचा अभाव - जरी आरोग्य क्षेत्रात अमूलाग्र बदल नव्हे क्रांति झाली असली तरी काही प्रमाणात त्याला ही मर्यादा आहेत. अजूनही खेड़ो - पाडी वाडी , वस्ती , तांडयावर वैद्यकीय सेवा सुविधांचा लाभ प्रत्यक्ष गरजू लोकांपर्यंत पोहचतच नाही.आणि मग त्यातून गर्भ निरोधक गोळ्या , कंडोम किंवा तत संबधी पुरवठा करणाऱ्या एकूणच यंत्रणेची उदासीनता आणि एक प्रकारचा  न्यूंनगंड यामुळे पालकांच्या पोट पाणी पिकण्याला ख़त पाणी मिळते.
वंशाचा दिवा हट्ट - हट्ट असा आहे की तो काही केल्या सरत नाही. ग्रामीण भागात  कुत्रं- मांजर व्हावं .मूल पाहिजे . त्यातून मुलगी नको .दिवटाच पाहिजे हीच मानसिकता मुळावर घाव घालते आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात आणि विशेषत: आजची शिक्षित स्त्रीच वंशाच्या दिव्याच्या हट्ट धरते आहे . आणि म्हणून त्यातून चौथी -पाचवी नव्हे तर चक्क सातवी -आठवीच्या पाठीवर हे दिव्य तेजोमय वलय प्राप्त करुन पुत्ररत्न प्राप्त होते.
अज्ञान - अज्ञान  हेच  कशा कशा विषयी असावे हेच मोठे न उलघडलेले अज्ञानच आहे. समोर धोका आहे हे ओळखून सुद्धा जोखीम का पत्कारतात हेच उमगत नाही . आणि बऱ्याच अंशी सज्ञान  लोकांच्या अज्ञानातून अनेक निष्पाप- कुकर्म घडतात.
अंधश्रद्धा - श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी आणि म्हणून विज्ञानवादी  युगाचा कितीही पगडा वाढत चालत असला तरी समाज मनाला भुरळ घालणारी ही अंधश्रद्धा . शहरी भागात सिग्नल वर लिंबू , बिब्बवे , मिरच्या, काळे दोरे -गंडे  दररोज घेतल्याशिवाय पुढे मार्गक्रमण  करत नाहीत. आणि का म्हणून मनातून अंधश्रद्धा रिटायर्ड होण्याचे नाव घेत नाही हेच धोरण मुळीच कळत नाही.
धर्मांधता - कोणत्याही जाती धर्मावर जागतिक पातळी पर्यंत टिका न करता केवळ आपली संख्या हा आकड़ा धरून अल्पसंख्याक कोण आणि बहूसंख्यांक कोण याचा ताळमेळ नसल्याने विविध धर्माचे गुरु ,साधू महाराज ,मौलवी ,  पोप हे चुकीच्या पद्धतीने समाजाला नेण्याच्या काम त्यांच्या चुकीच्याच धोरणांमुळे होते आहे. मुळात कोणत्याही धर्माची अशी शिकवण तर बिलकुलच नाही.
बदलते हवामान - पूर्वी मुलां मुलींच्या वयात येण्याचा एक विशिष्ट  कालावधी  होता . तो किमान पक्षी 16 वर्षे गृहीत धरला तरी आज यात आहार -खाण्या पिण्याच्या ,अरोग्याच्या सवयी आणि एकूणच पर्यावरणचा र्हास यातून 12 वर्ष धोक्याचं म्हणण्याची पाळी आली आहे.
माध्यमांचा वावर नि वापर - आजकाल तंत्रज्ञानाने प्रगतीची गरुडझेप घेतली आहे.म्हणून क्षणार्धात होत्याचं नव्हतं आणि इथलं तिथं - मग  यामध्ये काही चांगल्या आणि वाईटाचा निश्चित सामावेश झाला. एकूणच समाज मनावर  वाईटाचा ठसा ,आदर्श लवकर उमठतो.
गरीबी - सर्वेक्षणातुन अशी माहिती समोर आली आहे की ,जिथे पोटभर खायचे वांदे तिथे  प्रजनन क्षमता आणि लैंगिक भूकेची वासना जास्त असते.आणि जिथे अन्न पाणी सर्व सुख सोयी सुविधा मुबलक प्रमाणात आहेत तिथे वंध्यत्व आलेले असते . स्थूलपणा आणि चरबी मोठ्या प्रमाणात गर्भ धारणेला आडसर ठरतात. आणि म्हणून *सरोगेसीचा* नवा पर्याय उपलब्ध झाला आहे . त्यातूनच पुन्हा गुन्हेगारी बोकाळणार हे मात्र निश्चित.तर गरीबी हा लोकसंख्या वाढीमधील सर्वात मोठा गुन्हेगार आहे.
*बालविवाह - आजही जात पंचायती बाल विवाहांच्या साक्षीदार आहेत.त्यांना ना कायद्याचा  ना समाजाचा धाक आहे. त्यातूनच बालविवाह ही प्रथा ,रूढ़ ,चाली ,रीती ,परंपरा ,प्रत्येक मागासलेल्या जाती मधूनच नव्हे तर उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या जाती ही यामध्ये यात मागे नाहीत हे वास्तव आहे.
*कुमारी माता - दिवस उगवतो तो समस्या नि उपाय यांचा खजिना घेवुनच .पण समस्या मोठी अन उपाय छोटे वाटतात.त्यातील हीच एक कुमारी मातेची आकडेवारी दिवसेंदिवस डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. पर्यायाने तिचं आणि बाळाचं उभं आयुष्य हे एका वेगळ्या काटेरी वाटेच्या वळणावर जावून धडकते.नव्हे अपघाती उपचार घेते.
*पाश्चत्य संस्कृती अंधानुकरण - पाश्चात्य संस्कृती ही चांगळवादी शारीरिक आकर्षणाची आणि एकूणच भयावह वाटणारी आहे. तीचेच पडसाद आज प्रसार माध्यमातून खेड्या पाडया पर्यंत झपाट्याने पोहचत आहेत. आणि हेच अंधानुकरण शहरी जीवन समोर ठेवून सत्ताधिकारी,  नेते राबवितात की काय असा प्रश्न पडतो आहे ? त्यातूनच आता *नाईट लाइफ* हा प्रकार नव्याने भारताच्या इंडियात रूढ़ होतो आहे.
*समाजाची मानसिकता - कायदा आला की मग त्यातून बाहेर पडण्यासाठी हक्काची पळवाट आली. स्व:ताला फसवणार्यांची संख्या जास्त आहे. जो पर्यंत स्वः ताच्या मुलाचा बाप जर त्याचा बाप म्हणून इतर दुसर्यांचे नाव टाकायचे बंद करणार नाही.तो पर्यंत पर्यायाने देश आणि समाज फसणारच. आणि मग कसला आलाय विकास आणि कशली आलीय उन्नती -प्रगती...?
*लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम -
उपासमार - लोकसंख्या वाढीमुळे उपासमारी हे एक भयानक वास्तव चित्रण समोर येते आहे. उपासमार हे एक महाकाय संकट प्रगत राष्ट्राच्या उभारणीतील प्रचंड मोठा अडसर ठरू पाहतो आहे. कारण आज ग्रामीण, आदिवासी , दुर्गम , डोंगराळ  भागातच काय तर शहरातल्या झोपड़पट्टीच्या गल्ली बोळातुन चुलीचा धुर निघत नाही किंवा फोडणीचा वास दरवळत नाही. आज हाता -तोंडाची अपवादाने चुकून भेट होते आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. आणि म्हणून बऱ्याच घरात सकाळचे भेटले तर भेटले रात्रीच्या जेवणांचा  प्रश्न भेडसावत असतो, नव्हे रात्रीच्या जेवणाची भ्रांत पडलेली असतेच असते.
*गुन्हेगारी - पोटाला अन्न नाही, हाताला काम नाही, आणि म्हणून वेळ जात नाही.म्हणून रिकाम्या डोक्यात कु -विचारांचे थैमान नंगानाच करते . अगदीच विचारांचे आग्यामोहोळ  घोंगायला लागतो. त्यातून मग गुन्हेगारी जगतांची ओढ़ व आकर्षण निर्माण होते. मग त्याला गुन्हेगारी जगताविषयी विलक्षण आकर्षण निर्माण होवून तो त्या गुन्हेगारी  जगतांकडे एक करिअर म्हणून पाहतो .तेंव्हा  त्यांचे आदर्श दाउद , शकील ,राजन आणि आता मल्ल्या हे ठरू पाहत आहेत.
*पर्यावरणाचा र्हास - लोकसंख्या  वाढीमुळे पर्यावरणाचा र्हास आणि त्यातून मग निसर्गाचा प्रकोप . निसर्ग साथ देत नाही. निसर्गाची किंमत केली तर तोच निसर्ग त्याच्यावर अवलंबून असणाऱ्याची किंमत निश्चित करतो . नाहीतर तो सर्वाना वाऱ्यावर सोडतो. आणि तो वारा दुष्काळी , त्सुनामी , आणि बेफाम सुसाट असतो. म्हणजेच माळीण , केदारनाथ बद्रीनाथ  ही  अगदी ज्वलंत उदाहरणे आहेत.
         याचा गैरफायदातुनच तरुणांची माथी भड़कावून काही धर्म मार्तण्ड  बेरोजगार ग्रामीण आणि शहरी तरुणाईला भुरळ घालत विधायक असणाऱ्या तरुण शक्तीला  विघातक प्रवृत्तीकडे दलदलीच्या चिखलाच्या खाईत बळजबरीने ढ़कलण्यात येते आहे .
         एवढेच काय तर नक्षलवादी -आतंकवादी कारवायाचे बाळकडू सुद्धा येथीलच ही चुकीची सिस्टम देते .  यावर कोणाचे ही नियत्रंण दिसून येत नाही. यातून त्यांच्या या नक्षली -आतंकी वागण्याचे पडसाद अगदी पुढील कित्येक पिढ्या चटके सोसतत विनाकारण निष्पचाचा बळी घेतात ही मोठी लोखसंख्या वाढीची दुष्परिणामाची  शोकांतिका आहे.
*लोकसंख्या वाढीवर उपाय योजना - सर्व रोगांवर आणि परिणामांवर वेळ हेच एक मेव रामबाण जालीम औषध परिणामकारक असू शकते. म्हणून लोखसंख्या वाढीवर वेळ हा ही मलम बऱ्यापैकी कारणीभूत ठरू शकतो.त्यात विशेषतः अतिशय अडाणी,  अशिक्षित , ग्रामीण शिवाय शहरी झोपडपट्टी शहरी भागातील समाज मन जाणीव जागृती घडवून आणली गेली तरच खऱ्या अर्थाने लोखसंख्या वाढीच्या कारणांची मीमांसा ही करता येईल.
        विद्यमान सरकारने लोक चळवळींचा पाठिंबा घेत लोकांच्या मनात जो हा लोकसंख्या वाढीचा भस्मया रोगांचा प्रादुर्भाव  कमी केला पाहिजे. यासाठीच अगदीच प्रांजळ पणाने प्रयत्न व्हावेत. त्याच बरोबर सरकारी धोरणांची निश्चित आखणी व्हावी  आणि त्यांची कड़क अमलबजावणी करत ह्या अशा उपाययोजना होणे क्रमप्राप्त आहे.
         विज्ञानाचा चमत्कार आणि विविध स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य विभागाच्या तळागळातील नौकरदार सेवाकऱ्यांनी अगदीच आदिवासी , दुर्गम पाड्यापर्यंत सर्व अरोग्याच्या आणि तत संबधी सर्व साधनांचा वापर करण्याचे तंत्र आणि माहितीचे प्रात्यक्षिक सचित्र ऑडियो, वीडियो दाखवून स्व: ताच्या आणि  समाजाच्या न्याय हितासाठी मनातील जाळी, जळमटं दूर करावीत म्हणजे खऱ्या अर्थाने विज्ञान अंधश्रद्धेवर निश्चित मात केल्याशिवाय राहणार नाहीत.
              आज ही राजकारणी आणि पदाधिकारी पद आणि खुर्चीची लालसा कायम बाळगुन आहेत.नोकरदारांना तीन पेक्षा जास्त अपत्य आहेत.ते चक्क बापांच्या नावात घोळ घालत कायद्याच्या पळवाटा  पायदळी तुडवत पलायन करताहेत. ह्याच चुका जणु समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या डोळ्यात मिर्चीची पूड दिवसा ढवळ्या राजरोजपणे भरत आहेत. त्यासाठी लोकांना कायद्याचा धाक आणि धसका बसवा म्हणून कायद्याची कड़क आणि प्रभावी अमलबजावणी व्हावी हीच रास्त अपेक्षा.
          कुटुंब नियोजनाच्या संधी ह्या केवळ स्त्री वर्गाला अनिवार्य न करता त्या पुरुष प्रधान संस्कृतीच्या पुरुषांना अनिवार्यच कराव्यात. त्यातून विशेषतः नव युवक तरुणांचे विशेष कार्यशाळेच्या माध्यमातून उदबोधन व्हावे.
          सरकारी गर्भपात केंद्राची संख्या नियमांना  चौकटीत वाढविण्यात यावी. त्यातून चूकीच्या गर्भधारणा , कुमारी माता आणि इतर सर्व अनावश्यक गर्भाची सोय होईल पण गर्भलिंग निदानाची कड़क कार्यवाही यातून सुटू नये हे अधोरेखित व्हावे. तरच भारत इंडिया होण्याच्या दृष्टीने सुधारित पाऊल पडेल.
                   शिवाय सर्व समाजातील धर्म गुरूंची एकाच छताखाली धर्म परिषद घ्यावी म्हणजे पुढील धोके आणि पर्यावरण र्हासाचा, समस्यांचा पाढा वाचावा. म्हणजे ते त्यांच्या धार्मिक कार्यक्रमातुन समाजाची मूळ मानसिकता बदल नव्हे क्रांति करण्याच्या दृष्टीने उपदेश शिकवणीचे डोस,मात्रा लागू करतील.
       यातील सर्वात मुख्य अविभाज्य घटक म्हणजे स्त्री. स्त्री ला स्वः ची जाणीव व्हावी.तिच्या मूळ सहनशीलतेच्या स्वभावाची मानसिकता क्रांति रूपाने बदलावी. ती केवळ पुरुषाच्या उपभोगाची जिन्नस , वस्तु नाही किंवा ती फक्त आणि फक्त प्रजनन यंत्र नसून या विश्वातील ती अनन्य साधारण महत्व प्राप्त असलेली जादुई दैवी शक्ति आहे. हे तिच्या संबध स्त्री जातीच्या निष्पाप ,निरागस , अन्यायी मनावर ठामपणाने बिंबवावे लागेल. म्हणजेच ती या पुरुषार्थी पगडा असलेल्या पुरुष प्रधान संस्कृतीचा घराघरातून विरोध  करण्याचा विडा उचलेल. तेंव्हाच बदलाचे वारे सुसाट वेगात आंतरराष्ट्रिय पातळी पर्यंत वाहताना दिसतील.
       विविध समाज हितोपयोगी कल्याणकारी संघटनांच्या अर्थातच NGO च्या मदतीने युवक -युवतींची वासंतिक शिबिरे, जाहिर चर्चासत्रे ,सेमीनार,शैक्षणिक , निंबध लेखन , गीत गायन , वक्तृत्व , चित्रकला, व्यंगचित्र स्पर्धा या आणि पोस्टर वितरण , लोक चलवळीतील नाटके, पथनाट्य , अशा नानाविविध प्रकारच्या माध्यामातुन समाज मनाचा अचूक वेध आणि ठाव घेण्यात यावा.
      सोशल मिडीयाचा ही योग्यरित्या  पुरेपूर प्रमाणात वापर व्हावा. शिवाय लोकशाहीच्या चौथा खांब असणारी प्रचार आणि प्रसार माध्यमांचा ही अगदी प्राइम टाइम प्रसारणाचे नियोजन होवून दर्जेदार कार्यक्रमाची रुपरेखा आणि एकूणच सर्व बाबींचा  साकल्याने विचार व्हावा. त्याशिवाय खऱ्या खुऱ्या जागतिक लोखसंख्या दिनाचे महत्व तळागाळातील सर्व सामान्य मायबाप जनतेला पटल्याशिवाय राहणार नाही.हे ही तितकेच खरे...!!!
आप्पासाहेब सुरवसे
   लाखणगांवकर
09403725973
============================

Monday 27 June 2016



*पालकसभा : स्‍तुत्‍य उपक्रम*

शिक्षण विकासाच्‍या प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी यांच्‍यासोबत पालक हा ही घटक अत्‍यंत महत्‍वाचा आहे.  विद्यार्थ्‍यांच्‍या शैक्षणिक विकासात पालकांचे स्‍थान विशेष आहे.  पालकाच्‍या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि कौटूंबिक या सर्व बाबींचा परिणाम विद्यार्थ्‍यांच्‍या शैक्षणिक प्रगतीवर दिसून येतो. शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागातील पालकांचा अभ्‍यास केल्‍यास एक बाब प्रकर्षाने दिसून येते. ते म्‍हणजे शहरी भागातील पालक विद्यार्थ्‍यांच्‍या शिक्षणाबद्दल अधिक जागरूक असतात. त्‍या मानाने ग्रामीण भागातील पालक विद्यार्थ्‍यांकडे लक्ष देत नाहीत. त्‍यामुळे त्‍यांना विद्यार्थ्‍यांची प्रगती कधीच कळत नाही. ग्रामीण भागात जागरूक झालेले पालक गावातील शाळा सोडून शहरांतील मोठ्या खाजगी शाळेकडे किंवा इंग्रजी शाळेकडे वळत आहेत. त्‍यामूळे गावातील सरकारी शाळेत फक्‍त गरिबांची मुलेच शिक्षण घेत असल्‍याचे चित्र सध्‍या सर्वत्र दिसून येत आहे. आपल्‍या पाल्‍यांना खाजगी किंवा इंग्रजी शाळेत प्रवेश देतांना खिशाला कितीही चाट सहन करतात आणि सरकारी शाळेत प्रवेश दिलेल्‍या आपल्‍या मुलांवर हीच मंडळी एक रूपाया सुद्धा खर्च करीत नाहीत ही वस्‍तूस्थिती नाकारून चालणार नाही.
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्‍यांची गुणवत्‍ता सुधारावी यासाठी नांदेड जिल्हा परिषदेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवत्‍ता विकास अभियान गेल्यावर्षी प्रारंभ केले होते. समाजातून आणि पालकामधून या अभियानास चांगला प्रतिसाद मिळाल्यामुले यावर्षी हे अभियान जशास तसे दुस-या टप्‍यात नुकतेच सुरू करण्यात आले. या अभियानातील अनेक उपक्रमांपैकी महत्‍वाचा उपक्रम म्‍हणजे पालकसभा.
शाळेतील विद्यार्थ्‍यांची गुणवत्‍तेची सद्यस्थिती काय आहे?  या बाबत पालकांना जाणीव देऊन त्‍यांचे लक्ष विद्यार्थ्‍यांकडे असावे या दृष्‍टीकोनातुन याची निर्मीती करण्‍यात आली असावी असे प्रथम दर्शनी वाटते. खाजगी किंवा इंग्रजी शाळेतच फक्‍त अशा पालकसभा होतात असे नाही तर सरकारी शाळेतून सुद्धा प्रत्‍येक महिन्‍याच्‍या शेवटच्‍या शनिवारी प्रत्‍येक जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत पालक सभेचे आयोजन केले जाते. शाळा, विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासन यांच्‍या बाबतीत पालकांमध्‍ये जाणीव जागृती तयार केली जाते. त्‍यामुळे शाळेला गावाचा आधार मिळू शकतो. याच माध्‍यमातून शाळा विविध लोकांच्‍या मदतीने समृद्ध बनविता येऊ शकते.
या पालकसभे मध्ये अभियानात समाविष्‍ट असलेल्‍या लक्षवेधी नमस्‍कार, टि.व्‍ही. न पहाणे, गुणवत्‍ता विकास चाचणी आणि अभ्‍यासक्रमांचे नियोजन या कार्यक्रमासंबंधी पालकांसोबत शिक्षकांचे संवाद होणे अपेक्षित धरले आहे.

* लक्षवेधी नमस्‍कार – भारतीय संस्‍क्‍ृतीत नमस्‍काराला अनन्‍य साधारण असे महत्‍व आहे.  घरात एखादा पाहुणा आला किंवा रस्‍त्‍यावर कोणी ओळखीचा व्‍यक्‍ती भेटला असता त्‍यांना आपण नकळत पणे नमस्‍कार करतो.  एखाद्या वेळी अनावधानाने नमस्‍कार करायचे राहून गेले तर त्‍यांच्‍या मनात आपल्‍या विषयी वाईट मत तयार होतात.  नमस्‍कार करण्‍याचे दोघांना पण आत्मिक समाधान मिळते.  शत्रुला सुद्धा प्रेमाने जिंकता येते असे जे म्‍हटले जाते ते या ठिकाणी लागु पडते.  शत्रुला वैरभाव विसरून आपण नमस्‍कार घातल्‍यास तो सुद्धा आपणाला नमस्‍कार करणार हे नक्‍की.  म्‍हणजेच वैरभाव संपून त्‍या ठिकाणी प्रेम निर्माण होते.  नमस्‍कार करण्‍याचे संस्‍कार मुलांना शालेय जीवनांपासून लागावी यासाठी लक्षवेधी नमस्‍कार उपक्रम प्रत्‍येक सरकारी शाळेत गेल्‍या दोन वर्षापासून राबविले जात आहे.  घरातुन शाळेला जाताना आपल्‍या आई-वडीलांना नमस्‍कार घालण्‍याची विसरून गेलेली संस्‍कृती पुन्‍हा सुरू करण्‍यात आली.  रस्‍त्‍याने येणा-या जाणा-या गावक-यांना नमस्‍कार केल्‍याने त्‍यांचे आशिर्वाद विद्यार्थ्‍यांना मिळत आहे.  शाळेतील शिक्षक व इतर मोठ्या व्‍यक्‍तींना नमस्‍कार करतांना विद्यार्थ्‍यांना वेगळाच आनंद मिळतो, विद्यार्थ्‍यांमध्‍ये सौजन्‍यशिलता आणि विनयशिलता निर्माण करण्‍याचे काम लक्षवेधी नमस्‍कार द्वारे केले जात आहे.  म्‍हणूनच याची माहिती पालकांना होणे अगत्‍याचे आहे.  पालकांनी आपल्‍या मुलांकडे विशेष लक्ष दिल्‍यास या उपक्रमाचे फलीत नक्‍कीच बघायला मिळेल यात शंकाच नाही.

* टि.व्‍ही. न पाहणे –
आबालापासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच या टी.व्‍ही. ने वेड लावले आहे.  घरात टी.व्‍ही. नाही असे एक ही घर शोधून ही सापडणार नाही. आज प्रत्‍येकाच्‍या घरात कोप-यातील जागा टी.व्‍ही.ने बळकाविले आहे. सध्‍या कृष्‍णधवल संपून रंगीत टी.व्‍ही. चा जमाना असल्‍यामूळे घरांतील प्रत्‍येक आई, बाबा, बहिण, भाऊ सर्वच जण टी.व्‍ही. चे चाहते झाले आहेत. सायंकाळच्या वेळी जर घरात टी.व्‍ही. चालू नसेल तर काही तरी हरवल्‍यासारखे वाटते.  मात्र या टी.व्‍ही. पाहण्‍याचा फटका घरातील लहान मुलांना होत असतो. त्‍यांच्‍या अभ्‍यासाची वेळ सायंकाळी ०७ ते ०९ या वेळात असते आणि नेमके त्‍याच वेळी अत्‍यंत महत्‍वाचे सिरियल किंवा मालिका चालू असतात. त्‍याचा विपरीत परिणाम शाळेमध्‍ये शिकणा-या विद्यार्थ्‍यांवर होतो याचा मात्र बरेच पालक विचारच करीत नाहीत. या टी. व्‍ही. पाहण्‍याच्‍या वेडामूळे दिवसेंदिवस मुलांची गुणवत्‍ता कमी कमी होत चालले आहे. एका जागी बसून मुले लठ्ठ होत आहेत असे ही काही ठिकाणी बघायला मिळत आहे. विचार करण्‍याची शक्‍ती कमी कमी होत चालली आहे. या सर्व बाबींचा विचार करून पालकांनी सायंकाळी सात ते नऊ या वेळांत टी.व्‍ही.बंद ठेवावा आणि मुलांच्‍या अभ्‍यासाला प्रोत्‍साहन द्यावे, ही बाब पालक सभेतून सर्व पालकांना समजावून सांगण्‍याचा हेतू आहे, जो की खूपच चांगला आहे.  वास्‍तविक पाहता सायंकाळी सात ते नऊ याच वेळात नाही तर शाळा सुरू असतांना टी.व्‍ही. रिचार्जच केल्‍या जाऊ नये आणि सुट्याच्‍या काळात फक्‍त  टी.व्‍ही. पाहणे केल्‍यास अजून उत्‍तम राहील.  यासाठी पालक वर्गांनी आपल्‍या मनावर ताबा ठेवायला हवा.

* गुणवत्‍ता विकास चाचणी –
पंधरवड्यात शिकलेल्‍या भागावर आधारित इयत्‍ता दुसरी ते आठवी वर्गातील सर्वच विषयांना स्‍पर्श करणारी गुणवत्‍ता विकास चाचणी म्‍हणजे मुलांच्‍या गुणवत्‍तेची चाचपणी होय. अशा पद्धतीने एका महिन्‍यात दोन चाचण्‍या घेऊन त्‍याची योग्‍य तपासणी केल्‍यानंतर पालकांना हे विद्यार्थ्‍यांच्‍या उत्‍तरपत्रिका या पालकसभेतून त्‍यांच्‍या निदर्शनास आणावयाचे आहे.  अभ्‍यासात पुढे असलेल्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या पालकांचा सर्वांसमोर यथोचित सत्‍कार करून अभ्‍यासात मागे असलेल्‍या किंवा अप्रगत असलेल्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या पालकांना याद्वारे प्रोत्‍साहित करायचे आहे. फक्‍त खाजगी किंवा इंग्रजी शाळेतूनच अशा चाचणीचे आयोजन होत नसून सरकारी शाळेत सुद्धा होतात याची जाणिव पालकांना या निमित्‍ताने करून द्यायचे आहे.  सरकारी शाळांबाबत समाजातील लोकांचा दृष्‍टीकोन बदलला जावा आणि या शाळांना परत अच्‍छे दिन यावे यासाठी नांदेड जिल्‍हा परिषदेचा पालक-सभा हा एक स्‍तुत्‍य उपक्रम भविष्‍यात नक्‍कीच नवी दिशा मिळवेल यात शंका नाही

नागोराव सा.येवतीकर
मु.येवती, ता.धर्माबाद
९४२३६२५७६९

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...