Saturday 12 May 2018

लेख क्रमांक 03

लेख क्रमांक 03
दिनांक 13 मे 2018 रविवार

यशस्वी जीवनासाठी शिस्तीचे महत्व

भारतीय क्रिकेट संघासाठी दोन दशकाहून जास्त वेळ देशासाठी खेळलेला मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना न ओळखणारा एकही व्यक्ती भारतातच नाही तर जगात शोधूनही सापडणार नाही. ते एका रात्रीतून एवढे महान फलंदाज बनले नाहीत. त्यांना एवढे जे अमाप यश, कीर्ती, प्रसिद्धी मिळाली ते अनेक वर्षे तपश्चर्येचे फळ आहे. त्यांच्यामध्ये यश मिळविण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची तयारी होतीच शिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे नियमित सराव करण्याची जी शिस्त त्यांच्या अंगी होती त्यामुळेच ते जगातील सर्वोत्तम फलंदाज बनू शकले. सराव करताना थोडा जरी आळस दाखविला असता तर ते कदाचित जगातील सर्वोत्तम फलंदाज बनू शकले नसते. जगात असे कितीतरी लोकांची उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या शिस्तीच्या बळावर अशक्यप्राय समजली जाणारी गोष्ट सिद्ध करून दाखविले आहेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपणाकडे ज्ञान, बुद्धिमत्ता, जिद्द, चिकाटी, श्रम करण्याची तयारी याच्यासोबत काटेकोर शिस्त असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या वैयक्तिक जीवनात आणि रोजच्या दिनचर्येत कसल्याही प्रकारची शिस्त नसेल किंवा त्याची आपणास सवय नसेल तर ठरलेल्या वेळात एखादे काम पूर्ण करूच शकत नाही. शिस्तीची सवय विद्यार्थिदशेपासून आपणाला लागली पाहिजे. यामध्ये शिस्तीकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा तोटा भावी आयुष्यात नक्कीच संभवतो. शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे नियमित शाळेत उपस्थित राहणे या एका शिस्तीच्या सवयीचा परिणाम भविष्यात जेथे कोठे आपण काम करण्यासाठी नोकरी पत्करतो त्या ठिकाणी दिसून येते. कार्यालयात उशिरा येणारे व कामाचा आळस करणारी मंडळी विद्यार्थीदशेत असताना नक्कीच शिस्तीचे पालन केलेले नसतात. त्यामुळे त्यांच्यावर ही नामुष्की येते. शाळेतील गृहपाठ व दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करणे हीसुद्धा एक शिस्तच आहे. त्याचाही परिणाम भविष्यात आपणाला दिसून येतो. त्यासाठी आपण विद्यार्थीदशेत असताना शिस्तीचे पालन करणे अत्यावश्यक आहे. शाळेत विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करण्यासाठी गुरुजींना प्रसंगी कठोर व्हावे लागते. परंतु शासनाने सध्या शाळेतून कठोरपणा वर बंदी घातली आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी शाळेतील शिस्तीच्या नियमाचे पालन करताना दिसून येत नाही. त्याचे प्रतिकूल परिणाम भविष्यात बघायला मिळू नये याची भीती वाटते.
आपण आपल्या जीवनाचे ध्येय ठेवले आहे ते प्राप्त करण्यासाठी नेहमी त्याच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. लक्ष ठेवण्याचे काम शिस्तीमुळे सोपे होते. थोडे जरी लक्ष विचलित झाले किंवा डळमळीत झाले तर ध्येयप्राप्तीचा रस्ता अवघड बनतो तर कधीकधी असफलता येण्याची सुध्दा शक्यता असते. जसे की वाहन चालविताना आपले लक्ष पूर्णपणे रस्त्यावर ठेवावे लागते. वाहन चालविताना आपले लक्ष थोडे जरी विचलित झाले तर छोटे-मोठे अपघात घडून आपण जखमी होतो तर काही प्रसंगी आपल्या जीवास मुकावे लागते. त्यामुळे ठरविलेल्या जागेवर पोहोचू शकत नाही. त्यास्तव आयुष्यात शिस्त फारच महत्त्वाची समजली जाते. या शिस्तीमुळे जेव्हा आपणास दिलेली कामे आपण वेळेपूर्वी किंवा किमान वेळेत पूर्ण करतो तेंव्हा वरिष्ठाकडून पाठीवर शाबासकीची थाप पडल्यावर आत्मविश्वास वाढीस लागतो. मिळालेल्या आत्मविश्वासामुळे आपल्या पुढील।अनेक कामे अचूकपणे वेळेत पूर्ण करता येतात आणि आपली समाजात कार्यालयात चांगली प्रतिमा तयार होण्यास मदत मिळते.
अभ्यास करण्याची सवय ही सुद्धा एक शिस्त आहे. एखादी बाब समजून घेण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिस्तीमुळेच घडले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्यांचे पुस्तकावर सर्वात जास्त प्रेम होते सदानकदा ते पुस्तकाशी चिकटून राहत असे म्हणून त्यांना यश, कीर्ती मिळाली. " एकांतातील शंभर वर्षे " या कादंबरीचे लेखक ग्रबियल गार्षीया मार्केझ यांनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले व दीड वर्षानंतर खोलीच्या बाहेर आले ते या कादंबरीसह. ही कादंबरी खूप गाजली आणि त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्याजवळ असलेली गुणवत्ता व शिस्त याच मुळे ते महान साहित्य कलाकृती निर्माण करू शकले. आपण जीवनात शिस्तीला महत्त्व दिले नाही तर सर्वसामान्याप्रमाणे साधारण आयुष्य जगावे लागते. आपणाला आपले आयुष्य कसे जगायचे आहे ? याची स्वतःची नियमावली स्वतः तयार करून त्या नियमावलीचे पालन करीत गेल्यास आपले जीवन नक्कीच सुंदर व सुखदायक होईल यात शंकाच नाही. सकाळी लवकर उठणे, नियमित व्यायाम करणे, वेळेवर जेवण करणे व लवकर झोपणे या रोजच्या शारीरिक क्रियेत शिस्त असेल तर आपले शरीर सुदृढ राहण्यास मदत मिळते. शरीर चांगले असेल तर मनही चांगले असते. इंग्रजीत एक म्हण आहे sound in body is sound in mind याप्रमाणे.
महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देण्याच्या आपल्या शिस्तीमुळे अनेक कामे यशस्वीपणे झटपट पूर्ण होतात. त्याऐवजी मित्रांसोबत गप्पा मारणे, चित्रपट पाहणे, खेळत राहणे यात आपण रंगून गेलो तर आपल्या शरीराला व मनाला तीच सवय लागते. आपले अनेक महत्त्वाची कामे खोळंबण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी आपले काम पूर्ण झाल्याखेरीज इतर बाबीकडे लक्ष देणार नाही अशी शिस्त शरीराला व मनाला लावण्याचा प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अंगी असलेल्या शिस्तीमुळे भारताला हिंसा न करता स्वातंत्र्य मिळाले. अहिंसेद्वारे स्वातंत्र्य मिळविता येते हे महात्मा गांधी यांना वाटत होते आणि त्याच मार्गाने जाण्याची शिस्त त्यांनी भारतीयांच्या मनात निर्माण केली. काही क्रांतीकारकानी चौरीचौरा येथील पोलीस ठाणे जाळून हिंसेचा मार्ग स्वीकारला होता तेव्हा महात्मा गांधी अस्वस्थ झाले. त्यांना भारतीय क्रांतिकारकाचे बेशिस्त वर्तन आवडले नाही, त्यामुळे जनतेला त्यांनी सांगितले की, या मार्गाने आपणाला स्वातंत्र कधीच मिळणार नाही. क्रांतिकारकानी त्यानंतर कधीही अहिंसेचा मार्ग सोडला नाही.
आपल्या रोजच्या क्रियेमध्ये सुद्धा शिस्त अत्यंत महत्त्वाचे आहे. आपलेले चालणे,  उठणे, बसणे आणि हसणे या सर्व क्रियांमध्ये शिस्त असेल तर आपण समाजात उठून दिसू शकतो. काम करीत असताना किंवा एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभाग घेताना आपला मोबाईल बंद किंवा सायलेंट मोडवर ठेवण्याची सवय ही सुद्धा एक शिस्त आहे. मनाला तशी सवय लागून गेली की आपल्या मोबाईलच्या रिंगमुळे वातावरण भंग होऊ नये. तर केव्हाही घराबाहेर पडताना त्याची काळजी घ्यावी. परंतु बहुतांशी ठिकाणी बहुतेक जणांकडून त्याचे पालन होताना दिसून येत नाही. लहान-सहान गोष्टी आपल्या जीवनात रोज घडतात त्यात शिस्त ठेवली तर त्याचा त्रास आपणाला तर होणारच नाही शिवाय इतरांनाही होणार नाही. तेव्हा चला तर मग आपल्या शरीराला व मनाला चांगली शिस्त लावू या आणि आपले जीवन यशस्वी करू या.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Tuesday 8 May 2018

गरज तेथे मदत करा

लेख क्रमांक 02
दिनांक 12 मे 2018 शनिवार

*गरज तेथे मदत करा*

जीवनात सुख-शांती व समाधानाच्या प्राप्तीसाठी प्रत्येक जण देवाला साकडं घालतात. नवस करतात. मागणी पूर्ण झाली की काहीजण देवाला अन्नाचा अभिषेक करतात तर काही भंडारा करून अन्नदानाचे कार्य करतात. अन्नदान करणे हे चांगले कार्य आहे परंतु अण्णांचे दान कुणाला द्यावे ? ज्यांना अन्नाची खरी गरज आहे त्यांना अन्नदान दिल्यास आपल्या पदरी पडेल. आत्मिक समाधान मिळेल. परंतु आपल्या हातून असे घडतच नाही. गरीब दरिद्री व खंगलेल्या लोकांना आपण पंगत मधेप्रवेश देत नाही. त्यामुळे आपण देवाकडे केलेला नवस पूर्णत्वास जातो का ? त्याऐवजी आपल्या नवसपूर्तीसाठी गरजवंत लोकांना सर्वतोपरी मदत करणे आवश्यक आहे
त्यामुळे गरजवंताची जीवन सुसह्य होईल. प्रत्येक गावात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने भंडारा सारख्या कार्यक्रमातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. त्यातून गावातील व शेजार गावातील श्रीमंत या सर्वांना त्याचा लाभ दिला जातो किंवा घेतला जातो. परंतु यात खरोखरच किती गरजवंत राहतात ? याचा आकडा जर काढला त्या बोटावर मोजता येतील एवढीच संख्या आढळून येते. महाप्रसाद आवती आपले मानसिक भावना चिकटून असल्यामुळे यात फेरबदल करण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही. फेरबदल करण्याचा विचार कोणी एकाने व्यक्त केला तर त्यात सर्व समाज वेढ्यामध्ये काढतात. देशात आज एक वेळच्या जेवणाची सोय नसलेल्या जनतेची संख्या खूप मोठी आहे. अशा भुकेल्या लोकांची व्यवस्था करण्याची फक्त शासनाची जबाबदारी ठरवून आपण मोकळे राहणे योग्य आहे का ? माणुसकीच्या नात्याने आपण त्यांच्याविषयी एकदा तरी विचार का करू नये ? याबाबत प्रत्येक सदर व्यक्तीने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.
आज देशात कित्येक सेवाभावी संस्था आहेत जॅकी खऱ्या गरजवंतांना मदत करतात. जेव्हा देशावर भूकंप किंवा नैसर्गिक संकटे आली त्या रिलिफ फंडाच्या माध्यमातून त्यांना मदतीचा हात देण्यात आले. संरक्षण करीत असताना अनेक जवानांना वीरमरण येते त्यावेळी त्यांचा परिवार पूर्णपणे कोसळतो. मात्र त्या माध्यमातून देशातील सर्व नागरिकांनी पैशाची मदत दिल्यास त्यांचा परिवार पुन्हा उभा राहू शकतो विचार करून इतरत्र खर्च होणारा पैसा अशा माध्यमातून एकत्र केल्यास ते खर्‍या गरजवंताला निश्चितपणे मिळू शकेल.? काही सेवाभावी संस्था आर्थिक प्रश्नामुळे रेंगाळत असतात. कुणाकडे मदतीचा हात मागवला तर त्यांना फारच कटू अनुभव येत असतो. संस्थेचे लोक जेव्हा जातात तेव्हा समोरचा व्यक्ती त्यांच्याकडे नाक मुरडतात किंवा बघूया पुन्हा असे उत्तर ऐकायला मिळते. खरोखरच जर संस्थेचे कार्य कौतुकास्पद असेल तर अशा संस्थेला मदत करणे निश्चितच आपले चांगले कार्य नव्हे का ? आपल्या मनात असलेल्या कल्पना त्यांना सांगून त्यांच्या संस्थेमार्फत काही चांगले कार्य करता येईल काय? याचा विचार करून त्यांना मदतीचा हातच नव्हे तर त्यात सक्रीय सहभाग घेतल्यास त्या रेंगाळलेल्या संस्थेचे पुनर्जीवन तर होईलच शिवाय पूर्वीच्या कार्यकर्त्यात एक नवा उत्साह संचारला.? ज्याप्रकारे आपण जेवण प्रारंभ करण्यापूर्वी देवासाठी पहिला घास बाजूला ठेवतो. त्याच प्रकारे आपल्या रोजच्या कामातून नाही तर नाही निदान मासिक कमाईतून ही रक्कम देवासाठी काढावे ही प्रथा बर्‍याच जणांनी अवलंबिली सुद्धा असेल. परंतु जमा झालेली ती सर्व रक्कम देवाचा कार्यासाठी या ना त्या निमित्ताने करतात. त्यापेक्षा त्या देवाची पैशातून काही गरजवंत व्यक्तींना मदत केल्यास त्यात मिळणारे समाधान फार मोठे आहे.
नवसपूर्तीसाठी देवाच्या पायऱ्या चढावेच  लागते हा पायंडा पण बदलू शकतो. गाडगे बाबा हे प्रत्येक माणसाच्या अंगात देव आहे असे म्हणत. कारण जेव्हा कुणी दगडात नाही मंदिरात नाही ना लाकडात नाही तर देव प्रत्येकात आहे. प्राणिमात्रांची सेवा करतो तो खऱ्या अर्थाने देवांची सेवा करतो. Service to man is service to god असे इंग्रजीत म्हटले आहे ते काही चुकीचे नाही. संतांच्या मार्गदर्शनाचे मर्म आपणास अजूनही कळलेले नाही हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे. तुज आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी असे संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे याची अनुभूती वारंवार आपल्या जीवनात येत असते. जी व्यक्ती अत्यंत गरजू लोकांना हवी ती मदत करतात त्यांच्यावर देव कधीच नाराज होत नाही. जयंती पुण्यतिथी उत्सव किंवा गावातील धार्मिक कार्यक्रम या करण्यात येतो त्यातील काही टक्के वाटा प्रत्येक आणि बाजूला ठेवून जर देशातील बऱ्याच गरजवंताची एकवेळची भूक मिटवू शकले तर ती एक प्रकारे आपल्या देशाला चांगली मदत होऊ शकेल तशी विचारशक्ती आपणा सर्वांना प्रदान होऊन हीच सदिच्छा

नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

तंत्रज्ञान दिवस

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन त्यानिमित्त प्रासंगिक लेख

*मोबाईल क्रांती आणि परिणाम*

एकविसाव्या शतकातील संगणक व भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल या तंत्रज्ञानाचा शोध आणि विकासामुळे मानवाचे जीवन पूर्णपणे बदलून गेले आहे. अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत, यात संगणक आणि  मोबाईलचा सुद्धा आज समावेश झाला आहे. मोबाईल या तळहाताएवढ्या असलेल्या यंत्राने संपूर्ण जगाला खिशात घातले आहे. घरात एक तरी मोबाईल नाही असे एक ही घर आज शोधूनही सापडत नाही. घरात जितके सदस्य असतील तेवढ्याकडे मोबाईल नावाची वस्तू असतेच असते. पदोपदी त्याच्याशिवाय आज अनेक काम खोळंबत आहेत असे प्रत्येकाला वाटत आहे. एका क्लिकवर जगातील कुठलीही माहिती क्षणात मिळणे आणि हव्या त्या व्यक्तीशी क्षणात संपर्क साधणे ही किमया या आधुनिक तंत्रज्ञानामुळे सहज, सुलभ आणि सोपे झाले आहे. यामुळे मानवांची बरीच शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास वाचणे किंवा त्रास कमी झाला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. पूर्वी गावात एखादा व्यक्ती मृत्यू पावला तर गावातील आठ-दहा लोकांना पैसे देऊन त्यांच्याकरवी अंत्यविधीचा निरोप त्यांच्या नातलगापर्यंत पोहोचविल्या जात असे. दूर अंतरावर असलेले नातेवाईक अंत्यविधीचा निरोप मिळाल्यानंतर इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वी तेरवीचा दिवस सुद्धा उजाडत असे, असे काही अनुभव पूर्वीचे लोकं देतात.  दळणवळण व माहिती तंत्रज्ञान यांचा प्रचार व प्रसार या काळात झाला नव्हता त्याकाळातील वरील स्थितीचा अनुभव आजच्या काळात नक्कीच लागू पडत नाही. कारण आज दळणवळण सोबत माहिती तंत्रज्ञानात सुद्धा लक्षणीय अशी प्रगती झाली आहे. त्यामुळे आज गावात कोणी मृत्यू पावला तर त्या संबंधीचे निरोप देण्यासाठी लोकांना नातलगाकडे पाठवण्याची काही आवश्यकता नाही. करण मोबाईलमुळे हे काम खुप सोपे झाले आहे. त्याहीपुढे जाऊन फेसबुक किंवा व्हाट्सअप्पसारख्या सोशल एप्स वापर करून सुध्दा आपला निरोप पाठविता येऊ शकतो. यामुळे आज जग जवळ आल्यासारखे वाटत आहे. मोबाईल हे एक असे यंत्र आहे जे की लहान मुलांना आकर्षित करतेच याशिवाय घरातील प्रत्येक सदस्याना वेड लावते. जोपर्यंत आपण मोबाईलपासून दूर राहू आपणाला सुख, समाधान, चैन आणि आनंद या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. परंतु जसेही आपण मोबाईलधारक बनतो आपले सुख, समाधान, चैन आणि आनंद या गोष्टी हळूहळू आपणापासून दूर होण्यास सुरुवात होते. 24 तास त्या मोबाईलच्या तंद्रीत कधी फेसबुक अपडेट करण्यात तर कधी व्हाट्सआप वरील मेसेज वाचण्यात, व्हिडीओ बघण्यात आपला वेळ जात असतो. सोशलमीडियात अधून-मधून कंमेंट करावेच लागते आणि एखादी तरी पोस्ट करावेच लागते या चिंतेत सतत मोबाईलला चिकटून राहण्याची सवय कधी लागते हे कळतच नाही. शालेय व महाविद्यालयीन जीवनातील मित्र-मैत्रिणी सोशल मीडियाचा वापर केला नाही तर सतत तगादा लावतात. त्यामुळे युवकांना स्मार्टफोन मोबाईलधारक बनणे गरजेचे आहे असे वाटते. 
आज या मोबाईलमुळे घरात अनेक गोष्टी सहज घडून येत आहेत. पूर्वी प्रत्येक घरात आलार्मची एक घड्याळ रहात असे. ज्यामुळे पहाटे अभ्यासासाठी उठणे सोपे बनत होते. आज मात्र त्या आलार्मच्या घड्याळाची काहीएक गरज उरली नाही. कारण मोबाईल मध्ये अशी व्यवस्था केलेली आहे. आलार्म सोबत पूर्वी प्रत्येकाच्या घरी रेडिओ नावाची करमणूक करणारी वस्तु हमखास आढळून येत असे. ज्या काळात वृत्तपत्र सहज उपलब्ध होत नसत त्याकाळात रेडिओवरील सकाळ व सायंकाळच्या बातम्या ऐकल्याशिवाय चैन पडत नसे. परंतु आज घराघरातील रेडिओ धूळखात पडलेला असून मोबाईल वरील रेडिओने सर्वांना कानसेन बनवून टाकले आहे. सकाळी सहा वाजता दारावर वृत्तपत्र येण्याची आज व्यवस्था आहे तरी त्याच्याअगोदर मोबाईल द्वारे विविध वृत्तपत्र वाचन करून वाचक मोकळा होत आहे. त्यासाठी त्याला वाचनालयात जाण्याची गरज नाही. हाताच्या मनगटावर घड्याळ बांधल्याशिवाय घराबाहेर कोणी बाहेर पडत नसे.  किती वाजले ? असे कोणी विचारले असता लगेच डोळ्यासमोर डावा हात आणून वेळ सांगण्याचे दिवस आज राहिले नाहीत. आज जो तो किती वाजले ? असे विचारले असता मोबाईल काढून वेळ सांगतात. घड्याळयाला पूर्वी चावी द्यावी लागायची किंवा त्यात सेल टाकावी लागायची. या दोन्ही गोष्टी मोबाईलने मोडीत काढली आहे. प्रवासात जाताना उच्चभ्रू मंडळी कानात काहीतरी ठेवून गाणे ऐकायचे आणि त्यास वॉकमन असे म्हटले जायचे. सामान्य व्यक्तीला तेव्हा वाटायचं की मीसुद्धा वॉकमन घेईन. कारण चालता-फिरता गाणे ऐकण्याची मजा काही औरच. परंतु हे वॉकमन सामान्य लोकांना काही परवडण्यासारखे नव्हते. कारण वॉकमनला चालविण्यासाठी कॅसेट आणि मसाला म्हणजे सेलची गरज भासत असे. आठ-दहा गाणे ऐकले की ते सेल समाप्त व्हायचे. त्यामुळे हे वॉकमन फारच खर्चिक होते त्यामुळे गरीबांची हौस मात्र पूर्ण होत नसे. मात्र या मोबाईलने गरिबांची हिच हौस अशी काही दूर केली वॉकमन नावाचे यंत्र आज शोधूनही सापडत नाही. मोबाईलमध्ये भरपूर गाणे साठवून ठेवण्याची क्षमता असल्यामुळे टेपरेकॉर्डर, व्हीसीआर, डीव्हीडी यासारखे अनेक यंत्र मागे पडले. त्यामुळे आज घरातील वरील वस्तू काही प्रमाणात दिसून येतात असे म्हणण्यापेक्षा दिसतच नाहीत. या छोट्याशा मोबाईलने अशी क्रांती केली की, बाजारपेठेतील अनेक वस्तूंना हद्दपारच केले नाही तर त्यांचे अस्तित्वच संपुष्टात आणले. याहीपुढे जाऊन मोबाईल अजून कुणाला हद्दपार करणार हे येणारा काळच ठरवेल. 

तंत्रज्ञानाचा परिणाम :- 
मानवाचा उत्तरोत्तर विकास व्हावा म्हणून विज्ञानाने विविध प्रकारचे संशोधन करून नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले. त्याचा वापर जेवढा चांगल्या कामासाठी केला जातो तेवढाच वाईट कामासाठी सुद्धा केला जातो. दहा ते पंधरा वर्षांपूर्वीची स्थिती आणि आजची सामाजिक स्थिती यात तफावत आढळून येते त्याचे एकमेव कारण म्हणजे तंत्रज्ञानाचा उत्तरोत्तर होत असलेला विकास. पूर्वी 25 पैश्यातील जे की आज पन्नास पैसे झाले आहे अशा पोस्टकार्डावर कळविलेली खुशाली आठवड्यानंतर पोस्टमनचा मदतीमुळे कळत असे. आज मात्र त्या कार्डला कोणी विचारतही नाही. कारण आज मोबाईलच्या संदेशाच्या माध्यमातून क्षणात आपली खुशाली किंवा माहिती स्वकीय मंडळींना दिला जातो. याचा वापर चांगला होत असेल तर खरंच हे उत्तम आहे. परंतु काही मंडळी याचा गैरवापर करून मुलींचा छळ काढण्यासाठी, अश्लील व घाणेरडे संदेश पाठवून या माध्यमाला खराब करण्याचा प्रयत्न करीत असतात. यावर कुठे तरी नियंत्रण आणणे आवश्यक आहे. सण-उत्सव किंवा समारंभानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी, वाढदिवस असो किंवा लग्नाचा वाढदिवस असो त्यांच्याही शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी हा प्रकार अगदी चांगला वाटतो. आजकाल तर काही मंडळी लग्नाच्या असो वा वास्तुशांती यासारख्या मोठ्या किंवा छोट्या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिका म्हणून याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपला वेळ आणि शारीरिक श्रम दोन्ही वाचवीत आहेत. ज्या लोकांना या माध्यमाचे महत्व किंवा किंमत अजून पर्यंत कळालेले नाही अशा अज्ञानी, अडाणी,  निरक्षर लोकांकडून याचा गैरवापर वाढत आहे. मोबाईलमध्ये असलेल्या कॅमेराचा वापर चांगला  होण्याऐवजी त्याचे गैरवापरच जास्त होताना दिसून येत आहेत. फेसबुक आणि व्हाट्सअप्प जगात खूपच लोकप्रिय आहे मात्र याठिकाणी कोणतेही फोटो किंवा संदेश पोस्ट करून त्यांचे नाव बदनाम केले जात आहे तसेच समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही महाभाग मंडळी पॉर्न फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करीत आहेत ज्यामुळे पाहणाऱ्याच्या मनात उत्तेजित भावना निर्माण होणे साहजिकच आहे.
पूर्वी चित्रपट पाहायचे म्हटले तर थिएटरमध्ये गेल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे थिएटर सुद्धा हाऊसफुल्ल राहात होती. आज मात्र त्याच्याविरुद्ध बघायला मिळत आहे. विविध वाहिन्या, डीव्हीडी, सीडी या माध्यमातून प्रत्येक जण घरी हवे ते चित्रपट पाहू शकत होते. याहीपुढे जाऊन संगणक आणि इंटरनेटमुळे एका क्लिकवर कोणतेही चित्रपट पाहण्याची व्यवस्था केली आहे. त्यातल्या त्यात मोबाईलने तर कहरच केला आहे. संगणकाला काही मर्यादा तर होत्या परंतु स्मार्टफोनमुळे सर्वच मर्यादा संपुष्टात आल्या आहेत. कुठेही आणि कोणत्याही वेळी इंटरनेटचे पूर्ण नेटवर्क मिळत असल्यामुळे याचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढीस लागला. पूर्वी लोकं ब्लू चित्रपट पाहताना अमुक लोकांना अटक करण्यात आली अशा मथळ्याचे बातम्या वाचण्यात येत होते. आज मात्र ते वाचन करण्यात येत नाहीत कारण ब्लू चित्रपट असो किंवा इतर चित्रपट सर्व प्रकारची सेवा स्मार्टफोनच्या स्वरूपात खिशात असल्यावर कोण कशाला थिएटरमध्ये चोरून चित्रपट पाहिल. मात्र अश्या बातम्या ऐवजी आज दररोज विनयभंग आणि बलात्काराच्या घटना वाढीस लागले आहेत. दिल्लीत धावत्या बसमध्ये मुलीवर झालेल्या बलात्काराने संपूर्ण देश हादरला होता. शासनाने त्यावर कायदाही तयार केला परंतु बलात्कार थांबण्याऐवजी वाढू लागले आहेत. वास्तविक शासनाने मोबाईलच्या नेट वापरावर बंदी आणायला पाहिजे. आजच्या मोबाईल नेट वापरणाऱ्या व्यक्तींच्या मनात वारंवार अश्लील व बीभत्स चित्र आणि उत्तेजना निर्माण होत आहे. या उत्तेजित मनाला शांत करण्यासाठी हे लोक बलात्कारासारखे उपाय शोधत आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. देशातील बलात्कार किंवा विनयभंग सारखे अनैतिक गोष्टी रोखायचे असेल तर सर्वात प्रथम मोबाईल वरील इंटरनेट बंद करणे गरजेचे आहे. हे होत नसेल तर निदान सर्वच पॉर्न साईटवर बंदी आणावी. जर कोणी तसे अश्लील व बीभत्स चित्रपट पोस्ट केल्यास त्यांच्यावर पोलीस कार्यवाही करावी. जर हे असेच चालू असेल तर भविष्यकाळ अवघड राहणार आहे. अश्या साईटवर बंदी घातली गेली तरच भविष्यात  संस्कारित पिढी बाहेर पडू शकते अन्यथा कुसंस्कारी पिढीच बाहेर पडणार यात शंका नाही. तंत्रज्ञानाचे संशोधन विकासासाठी व्हावा, त्यातून वाईट असे घडू घडू नये आणि अन्यथा त्याचा शोध न लागलेला बरा असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...