Friday 16 August 2019

लघुकथा - कुलदीपक

कुलदीपक

शिल्पाला मुलगा झाला ही बातमी तिच्या सासूच्या कानावर गेली तशी तिची सासू कमलाबाई खूपच आनंदून गेली. वंशाला दिवा मिळाला म्हणून शेजारी पाजारी आनंदाने सांगत सुटली. शिल्पा सरकारी दवाखान्यात होती, सोबत तिचा नवरा दीपक देखील हजर होता. घरातील काम आटोपून कमलाबाई लगेच दवाखान्यात जाण्यासाठी निघाली. तिला खरोखरच आज खूप आनंद झाला होता. कारण ही तसेच होते, तिला देखील चार मुलींच्या नंतर दीपक झाला होता. तर सुनेला देखील चार मुलीनंतर आज मुलगा झाला. वंश चालविण्यासाठी मुलगा हवाच हा कमला बाईच्या सासूचा तिला तगादा होता, तोच तगादा तिने आपल्या सुनेकडे लावून धरला. तिला सगळ्या गोष्टीची जाणीव होती पण ती त्यातून काही शिकली नाही आणि आपला हट्ट पूर्ण करून घेतली. काही वेळांत ती दवाखान्यात पोहोचली, पाळण्यात तिचा नातू हात पाय हलवत खेळत असतांना पाहून तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळाले. नातूच्या आनंदात ती सारेच विसरून गेली होती. या वंशाच्या दिव्याला जन्म देणारी सून कशी आहे याची विचारपूस करण्याचे तिला जराही भान राहिले नाही. थोड्या वेळाने ती भानावर आली आणि आपल्या दीपकला विचारू लागली, " सुनबाई कुठे आहे ? बाजूच्या रूममध्ये ठेवलं आहे का ? " यावर दीपक काही बोलत नव्हता, खाली मान घालून उभा होता, त्यांच्यामध्ये बोलण्याची शक्तीच नव्हती. तिथे उभे असलेल्या नर्सने सांगितले की, " बाळाची आई आता या जगात नाही राहिली, बाळाला जन्म देताक्षणी काही वेळांत तिचा मृत्यू झाला. " हे ऐकून कमलाबाईला अस्वस्थ वाटू लागले. हाय रे देवा हे काय झाले ? असे ओरडत कपाळावर हात मारत रडू लागली. पण वेळ निघून गेली होती. आता काही जरी केले तरी बाळाची आई शिल्पा काही परत येणार नव्हती. दीपकने आईला खूप समजावून सांगितलं होतं पण कमलाबाई त्याचे काही एक ऐकत नव्हती, वंशाचा दिवा पाहिजे म्हणजे पाहिजे असा तिचा हट्ट होता. त्याच हट्टापायी आज शिल्पा जग सोडून गेली होती. तिशीच्या वयात तिचं संपूर्ण आयुष्य संपून गेलं. शिल्पा दिसायला सुंदर जरी नसली तरी नाकी डोळे छान असल्यामुळे पहिल्याच मुलगी पाहणे कार्यक्रमात दीपकने तिला पसंद केले होते. दीपक शहरातील एका दुकानात काम करत होता. तिला देखील दीपक पसंद होता. त्या दोघांचे थाटामाटात लग्न पार पडले. त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला. तिला दिवस गेल्याचे कळताच सासूबाईला खूप आनंद झाला. ती नेहमी म्हणायची, " बाई, मला नातूच हवा." तिचं हे नेहमीचे बोलणे ऐकून शिल्पाला टेंशन येत असे. मुलगा किंवा मुलगी होणे आपल्या हातात नाही असे ती आपल्या सासूबाईला सांगायची पण ती आपला हट्ट काही सोडत नसे. त्या दिवशी खूपच पोटात कळ उठल्यामुळे दीपक तिला घेऊन सरकारी दवाखान्यात गेला. तिची प्रसूती झाली आणि मुलगी झाली. मुलगी झाली हे कळताच शिल्पाच्या चेहऱ्यावर काळजीची एक लकेर उठून दिसत होती. सासूबाई आता खूप बोलणार याची तिला भीती वाटत होती. मात्र त्याच वेळी दीपक तिला धीर देत होता. सासूबाईला मुलगी झाल्याची गोष्ट कळाली तसे ती हुप्प होऊन बसली. घरात सून आली सोबत लक्ष्मी घेऊन आली तरी तिचे तिला काही सोयरसुतक नव्हते. ती आपल्या सुनेचा तिरस्कार करू लागली. शिल्पाचा यात काही एक दोष नव्हता तरी देखील तिला याचा त्रास सहन करावा लागत होता. असेच दिवस सरत होते. शिल्पाला दुसऱ्यांदा दिवस गेले तसे पुन्हा सासूबाईचा एकच तगादा चालू होता. " मला नातू हवा." शिल्पाचे दुर्दैव असे होते की यावेळी देखील तिला मुलगीच झाली. दीड वर्षाच्या अंतरात ही दुसरी मुलगी झाली होती. कुटुंब नियोजन करण्यावर दीपक आणि शिल्पा यांचे एकमत झाले होते मात्र कमलाबाई यास विरोध करत होती. " नातू म्हणजे वंशाचा दिवा आहे. त्याशिवाय घर कसे चालणार ? ते काही नाही, नातू हवाच ". आईच्या हट्टापुढे दीपकला देखील काही करता येत नव्हते. त्यानंतर शिल्पाला एक वेळा गर्भपाताचा सामना करावा लागला आणि नंतर दोन मुली झाल्या. यामध्ये तिचे शरीर पूर्णपणे खंगुन गेले. सासूबाईला काही म्हणावं तर ती म्हणत असे, " चार मुलीवर मला दीपक झालंय, तुला ही तसंच होईल. या घराची तशी परंपरा आहे. पाच लेकरं जन्मास घालून ही मी कशी ठणठणीत आहे. तुला काय होईल ?" असे ती नेहमी बोलायची. तिच्या तब्येतीकडे अजिबात लक्ष दिले नाही. दिवसेंदिवस तिची तब्येत खालावत चालली होती. डॉक्टरने देखील तिच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते मात्र सासूबाईने त्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. शेवटी जे होऊ नये तेच झालं. नातूच्या हट्टापायी शिल्पाला आपला जीव गमवावा लागला. नातू झाल्याचा आनंद झाला मात्र या बाळाला सांभाळणारी आई या जगात राहिली नाही याचे दुःखही वाटत होते. वंशाच्या दिव्यासाठी नाहक हट्ट केला याचा राहून राहून कमलाबाईला पश्चाताप वाटत होता. दीपक भान हरवल्यासारख शून्य नजरेने छताकडे पाहत उभा राहिला. त्याच्या डोळ्यासमोर चार मुली आणि या नवजात मुलाचे जीवन मरणाचा प्रश्न कसा सोडवावे याची काळजी लागली होती.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Thursday 15 August 2019

पौर्णिमा - अमावस्या

पौर्णिमा - अमावस्या आणि सण

मराठी महिने एकूण बारा आहेत. प्रत्येक महिना तीस दिवसांचा असून शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे दोन पक्ष आहेत. दर पंधरा दिवसांनी पौर्णिमा आणि अमावस्या तिथी येत असते. प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा कोणत्या ना कोणत्या सणाने प्रसिद्ध आहे. मराठी महिन्याची सुरुवात चैत्र पक्षाने होते आणि या महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंती असते. हिंदू धर्मातील लोकं भल्या पहाटे सूर्य उगवण्याच्या अगोदर मारोती म्हणजे हनुमानाची यथोचित पूजा करतात. प्रत्येक गावात हनुमानाचे मंदीर असतेच असते. या दिवशी गावोगावी भंडाऱ्याचे आयोजन करून महाप्रसाद वाटप केला जातो.
वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे म्हटले जाते. गौतम बुद्धांनी सर्व सुख, सोयी, सुविधा याचा त्याग करून जनकल्याणासाठी ते बाहेर पडले. आपल्या अनुयायांना जीवन जगण्याचे सार सांगितले. त्यांची आठवण करण्याचा हा दिवस बौद्ध धर्मीयांत उत्साहात साजरा केला जातो.
स्त्रियांचा वटपौर्णिमा सण जेष्ठ महिन्यात येतो. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून या दिवशी सुवासिनी स्त्रिया वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात.
आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरू पौर्णिमा असे म्हटले जाते. महर्षी व्यास यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. शिष्यांनी गुरूला वंदन करून आशीर्वाद घेत असतात.  श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण येतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून औक्षण करते. बदल्यात भाऊ तिला काही भेटवस्तू देतो आणि आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देखील. तसेच यास नारळी पौर्णिमा असे ही म्हटले जाते. कोळी समाजातील लोकं यादिवशी समुद्राला नारळ अर्पण करतात. रात्रीला जागरण करून चंद्र दुधात पहायचे आणि त्याचे प्राशन करण्याचा कोजागिरी पौर्णिमा आश्विन महिन्यात येतो. कार्तिक महिन्याचा पौर्णिमेला गुरू नानक जयंती येत असते. शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक होय. या दिवशी गुरुद्वारा मध्ये त्यांच्या धर्मग्रंथाचे पठन केले जाते. श्री दत्तात्रयाची जयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. माहूर गडावर असलेल्या दत्तात्रय मंदिरात खूप मोठी यात्रा भरविली जाते. माहूर गडावर या दिवशी मुंगयाच्या रांगेसारखे भक्तांची रांग दिसून येते. पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हटले जाते. तिला हजारो डोळे होते म्हणून शाकंभरी असे नाव पडले. दुर्गा मातेचे ते रूप आहे. मराठी वर्षातील शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन, या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात आणि होळीचा सण साजरा करतात. गावोगावी लाकडाची होळी तयार करून पेटविली जाते तर काही ठिकाणी रावणाचा पुतळा तयार करून त्याला जाळले जाते. त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते त्यास धूळवंड असे ही म्हणतात.
पौर्णिमेप्रमाणे काही महिन्यात अमावस्येला सण येतात जसे की, श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात आणि या दिवशी बैलांचा पोळा सण साजरा करतात. शेतकरी लोकांसाठी हा एक महत्वपूर्ण सण आहे. भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हणतात. आपल्या पूर्वजांना आठवण करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पित्राचे जेवण करतात.  दिवाळी सणाच्या अगोदर आश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन हा सण उत्साहात साजरा केला जातो. व्यापारी लोकांसाठी हा महत्वाचा सण समजले जाते. दुसऱ्या दिवशी पाडवा म्हणजे दिवाळी असते. पौष महिन्यातील अमावस्येला मौनी अमावस्या ( जैन) म्हणतात. या दिवशी संपूर्ण दिवसभर मौन धारण करणे गरजेचे असते. काही वेळा मौन राहणे खूप महत्वाचे आहे याची शिकवण या सणामुळे मिळते.
अशा रीतीने मराठी महिन्यातील प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्या कोणत्या ना कोणत्या सणाने साजरी केली जाते.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...