Sunday 24 March 2024

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव*
प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्याचप्रकारची सृष्टी आपल्या नजरेस पडू शकते. प्रेम म्हटले की आपल्या समोर एक प्रियकर आणि एक प्रेयसी हेच चित्र पहिल्यांदा उभे राहते. याशिवाय प्रेमाचे अन्य कोणतेही चित्र लवकर तयार होत नाही. चित्रपटातून देखील याच विषयावरील प्रेम भडक करून दाखविले जाते त्यामुळे तीच भावना जनमाणसांत उठून दिसते, यात शंका नाही. मात्र प्रियकर आणि प्रेयसी यांच्या व्यतिरिक्त जगात अन्य ठिकाणी देखील उत्कट प्रेम दृष्टीस पडते, ती दृष्टी कवी जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे यांना मिळाली म्हणूनच ते प्रेम उठाव करू शकले. उठाव हा शब्द क्रांतीशी जोडल्या जातो. उठाव करणे म्हणजे अन्यायाविरुद्ध उभे राहणे, अन्याय सहन न करणे असा त्याचा अर्थ घेतला जातो. प्रेमात कसला आला उठाव ? असा प्रश्न वाचकांच्या मनात येणे साहजिकच आहे. कवीच्या भाषेत सांगायचे म्हणजे ' मानवाची घालमेल, मनाच्या अंतरीचे दुःख, व्यथा, वेदना, यांनी मनात साठवून ठेवलेली खदखद याचे रूपांतर असंतोषात होते. आपल्या विरुद्ध झालेल्या किंवा होऊ पाहणारा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय इ. अन्याय आणि अत्याचार यांच्याविरुद्ध उठवलेला आवाज म्हणजे उठाव होय.' 
अल्बर्ट एलिस या मनोविकास शास्त्रज्ञाच्या मते, प्रेम भावना ही आनंद, दुःख, राग, भीती इत्यादी सर्वसामान्य भावनांसारखी एक आहे. प्रेम उठाव मधील कविता वाचतांना पदोपदी याची जाणीव होत असते. 
संपूर्ण विश्व हे प्रेमावर अवलंबून आहे. प्रेमाशिवाय जीवन जगणे कोणालाही शक्य नाही. तरुणपणाच्या काळात प्रेम जरा जास्त उफाळून येत असते. म्हणूनच कवी आपल्या खास या चारोळीत म्हणतात, 
*प्रत्येकाच्या आयुष्यात , प्रेम होत असतं*
*प्रत्येकाच्या तारुण्यात, कोणीतरी खास असतं*

प्रेमात पडलेली माणसं सर्व काही विसरून जातात. प्रेमात एवढी ताकत आहे की, अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करून दाखवतात. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली माणसं सर्वस्व विसरून जातात ही भावना सांगताना कवी नातं यामधून व्यक्त होताना म्हणतो,
*हृदयाचं नातं तुझ्यासोबत जोडले*
*जगाशी नातं मी सारच तोडले*

प्रेमात विफल झालेली माणसं आपली जीवनयात्रा संपवितात, काही वेडेपिसे होतात असा आजवरचा अनुभव आहे म्हणून कवी आपल्या प्रेयसीला म्हणतो, 
*देवू नको प्रेम चकवा*
*टाकू नको डाव फसवा*


मुलांचं आणि आईचं नातं जगावेगळं आहे. त्याचं प्रेम अवर्णनीय असे आहे. संसाराचा गाडा हाकताना आपल्या आईने सोसलेले कष्ट आणि केलेलं काम मूल कधीही विसरू शकत नाही. कवीची आई देखील अनेक हालअपेष्टा सहन करीत संसार केला असल्याचे अनुभव सांगताना आभाळ होताना माय या दीर्घ कवितेत कवी म्हणतो, 
*झाडाझडती ही तुझ्या जिंदगीची, गरिबीला गरीबीची*
*तवा सोबत तुझ्या हाताची, कष्टाची मोलमजुरीची*
*खंबीर लढताना माय, तुला मी पाहिलय माय*

प्रेमाचा झरा आटला की मायेचा ओलावा संपतो. याउलट जोपर्यंत एकमेकांवर अतूट प्रेम असेल तोपर्यंत विश्वास कायम राहतो आणि दोघांमध्ये असलेले नाते देखील अतूट राहते. याविषयी प्रेम या चारोळीत कवी म्हणतो,
*प्रेम संपले की नाते तुटते*
*प्रेम टिकले की नाते जुळते*

कवीच्या मनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा आहे. या महान व्यक्तीमुळे आज देशात समता प्रस्थापित होताना दिसत आहे. तरी देखील अजूनही देशात अनेक ठिकाणी भेदाभेद दिसून येते. आपलं भारत देश परत एकदा सुजलाम सुफलाम होण्यासाठी कवी संदेश देताना म्हणतो, 
*आपण सारे भेद टाळूया ।*
*विषमतेला मूठमाती देऊ या ।।*
लेखणी, शब्द माझे, जखम, बेधुंद, रणसम्राट, डोहात, वसंत, खुणा, थेंब, उठाव, मन, पत्ता, शराब, फसवून, दगाबाज, झोका या विषयावरील सर्वच चारोळ्या कमी शब्दांत खूप अर्थ सांगणारे आणि वाचकांच्या मनात खोल रुजणारे आहेत. राहिली हृदयात आणि निळे निशान हे दोन्ही गजल खूपच सुंदर आणि अर्थगर्भित आहे. त्याचसोबत अस्वस्थ, आग, उणीव, घोर, साखळदंड, भीमबाबा, पाऊस, जगणं, प्रीत, बेधुंद, उदास हात, टाकलं ठरवून, या विषयाच्या कविता देखील वाचनीय आहेत. संग्रहात एकूण 39 कविता असून सर्वच अर्थाने परिपूर्ण आणि प्रेमाची महती सांगणाऱ्या आहेत. कमी शब्दांत जास्त अर्थ सांगण्याचा कवीचा प्रयत्न खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. डॉ. प्रेरणा उबाळे यांनी या कवितासंग्रहाची प्रस्तावना केली आहे तर प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे, डॉ. गंगाधर मेश्राम, प्रा. योगिता कोकरे, प्रतिक्षा प्रजापती थोरात, भटू हरचंद जयदेव यांनी या काव्यसंग्रहाला शुभेच्छा दिल्या आहेत. कवी नवनाथ रणखांबे यांच्या या कवितासंग्रहाचे प्रेमी रसिक वाचक नक्कीच स्वागत करतील अशी अपेक्षा करतो आणि त्यांच्या भावी लेखनाला मनस्वी शुभेच्छा देतो. 

पुस्तक - प्रेम उठाव
कवी - नवनाथ रणखांबे
प्रकाशन - शारदा प्रकाशन, ठाणे
पृष्ठे - ६२
मूल्य - ९० ₹ 

पुस्तक परिचय - नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद
9423625769

Saturday 23 March 2024

पुस्तक परिचय - जगणे इथेच संपत नाही ( Jagne ithech Sanpat Nahi )


*जगण्याची आस सांगणारा कवितासंग्रह - जगणे इथेच संपत नाही*


माणसांचे जीवन अनेक सुखदुःखांच्या धाग्यांनी विणलेलं एक वस्त्र आहे. कधी सुखाची किनार आहे तर कधी दुःखाची. जीवनात येणाऱ्या अनेक प्रसंगातून माणूस काही ना काही शिकत राहतो. आलेले अनुभव वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करतो. चित्रकार आपल्या कुंचल्यातून या भावना व्यक्त करत असतो तर कवी मनाचा माणूस कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना मांडत असतो. कवी हणमंत पडवळ हे देखील असे एक कवी आहेत ज्यांनी आपल्या जीवनात आलेल्या अनेक सुखदुःखांच्या अनुभवाना,  त्यांच्या डोळ्याने पाहिलेल्या निसर्ग सौन्दर्य असेल वा समाजातील लोकांचे हाल असेल याचे चित्रण अतिशय मार्मिक शब्दांत ' जगणे इथेच संपत नाही ' या पहिल्या कवितासंग्रहात केले आहे. म्हणूनच कवी आपल्या मनोगतात म्हणतो की, भावनांच्या ओलाव्यात शब्दांची पेरणी केली तर कवितेच्या झाडाला सुंदर फळे लागतात. मनात भावनांची गर्दी दाटली की ते लगेच शब्द रूपाने कागदावर उमटले जाते आणि अनुभवसंपन्न अशी रचना जन्मास येते अशी कवीची धारणा आहे ते त्यांच्या कविता वाचतांना लक्षात येते. कवीने आपल्या रचना लिहितांना ओढून ताणून शब्द लिहिलेलं नसून त्यांच्या हृदयातून आलेल्या भावना आहेत. कवी स्वतः व्यवसायाने शिक्षक असल्याने त्यांना अनेक प्रसंग, घटना आणि स्थळ यांचा अनुभव मिळालं आहे. कविता करण्यापूर्वी ते छोटे छोटे नाट्यलेखन करत होते. यातूनच त्यांना कविता लेखन करण्याचा छंद लागला आणि त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहे.
आपलं आयुष्य म्हणजे एक कोडं आहे. जीवन जगत असतांना अनेक कठीण प्रसंग येतात, त्याला न घाबरता त्याचा सामना करणे आवश्यक आहे, असा संदेश देतांना जगणं या कवितेत कवी म्हणतो,

जगत आलो ... जगायचं पुढं
आपणच आपलं सोडवायचं कोडं

जीवनात आलेले अनेक अनुभव, कडू-गोड प्रसंग आणि जे न देखे रवी ते देखे कवी या उक्तीनुसार कवी आपल्या मनातील भावना व्यक्त करतो. कवितेचा जन्म या कवितेतून कवी म्हणतो,

वेदनेची कळ काळजाला टोचते
तेव्हाच मला कविता सुचते

प्रत्येक संकटाला आणि दुःखाला तोंड देणे हाच यशस्वी जीवनाचा पाया आहे. संकटाला भिऊन पळणारा कधीच यशस्वी होत नाही हाच संदेश बळ ऊर्जेचे या कवितेत कवी देताना म्हणतो,

काय करतील काटे
बधीर माझ्या पायाला
पुन्हा नव्याने सुरू केला
मी रस्ता चालण्याला

स्वाध्याय चळवळीचे प्रणेते परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांनी माणसात देव पहा असे सांगितले आहे तर संत गाडगेबाबा यांनी देखील तसाच काही संदेश दिलेला आहे. आई-वडील हेच खरे आपले दैवत आहेत. पण या लोकांना अजूनही ही गोष्ट का कळत नाही ? असा प्रश्न कवींच्या मनात पडला. म्हणून कवी उद्विग्न होऊन देवाच्या शोधात रचनेत कवी म्हणतो,
माळावरल्या दगडांना आम्ही राऊळात नेले
घरातील दैवतांना आम्ही आश्रमात सोडले

प्रार्थनेमुळे मनाला समाधान मिळते. असे म्हटले जाते की, दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या
दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. आपण सर्वजण आपल्या सुखासाठी देवाजवळ प्रार्थना करत असतो मात्र कवी प्रार्थना या कवितेत देशावरील सीमेवर डोळ्यात तेल घालून, आपले जीव धोक्यात घालून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी प्रार्थना करतो,

रोजच जीव तुझा धोक्यात
केवळ देशासाठी
कर जोडतो देवाला आज
फक्त तुझ्याचसाठी
मुलींच्या जन्माबाबत आणि स्त्रियांवरील अत्याचाराबाबत कवीचे मन खूप संवेदनशील आहे असे त्याच्या कविता वाचून लक्षात येते. ज्या वस्तूपासून आपणाला समृद्धी मिळते त्याच वस्तू माणसं का नष्ट करतात ? असा एक प्रश्न कवीला पडतो. अंधारातील वात या रचनेतून कवी म्हणतो,

अंधारात प्रकटते एक वात
वातीलाच का विझवतात माणसे ?

जन्म देणारी आई जगात सर्वश्रेष्ठ आहे. पण कुटुंबाचे पालनपोषण करणारा बाप देखील तितकाच महत्वाचा आहे. वडिलांचे महत्व विशद करतांना कवी खूप सुंदर विश्लेषण करतो,

बाप वाटे उत्साहाचा मळा
तसा तो निर्धाराची शाळा
थकवा ना विसावा त्याला
मायेचं पांघरूण लावितो लळा

चाकाचा शोध लागला, दळणवळण वाढली, लोकांच्या राहणीमान मध्ये सुधारणा झाली पण झोपडीत जे सौख्य लाभते ते कुठे ही मिळत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या झोपडीत माझ्या या कवितेची प्रकर्षाने आठवण होते. भारत स्वातंत्र्य होतांना राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी देखील खेड्याला विसरू नका असा संदेश दिला होता. कारण खरा भारत हा खेडयात वसलेला आहे. झोपडी या कवितेत कवी देखील वाचकांना असाच संदेश देतो,

सुधारणेचे हे कसले वारे
उगाच नुसता बोलबाला
बापूजी का मग म्हणले होते
लोकहो, खेड्याकडे चला
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो शेतात राबतो, कष्ट करतो, घाम गाळतो म्हणून तर सर्वांना खाण्यासाठी दोन घास मिळतात. पण हाच जगाचा पोशिंदा मात्र उपेक्षित राहतो अशी खंत आत्मवृत्त या कवितेतून कवी व्यक्त करतो,

काळ्या ठिकार छातीवर
असे घामाचं शिंपण
काळ्या काळ्या मातीमधी
सालो साल नशिबाचं रोपण
काव्यसंग्रह शीर्षक असलेल्या जगणे इथेच संपत नाही या कवितेतून कवी वाचकांना खूप चांगला संदेश देतो. निरुत्साही, नाउमेद झालेल्या व्यक्तींच्या मनात या रचनेतून स्फूर्ती निर्माण होते. कवी म्हणतो,

घाव घालून आडवे केले झाड
खोडालाही फुटली पालवी
खुलून पालवी वाऱ्यावर डोले
सांगून जाते झाड काही
जगणे इथेच संपत नाही
या कवितासंग्रहात विविध विषयांवर आधारित एकूण 81 कविता आहेत. प्रसिद्ध साहित्यिक व कवी योगीराज माने यांची प्रस्तावना या काव्यसंग्रहाला लाभले असून डॉ. शिवाजी शिंदे यांनी पाठ राखण केली आहे. अरविंद शेलार यांनी अतिशय सुंदर असे मुखपृष्ठ तयार केले असून परीस पब्लिकेशनकडून हे काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आले आहे. एकूण 104 पृष्ठ असलेल्या काव्यसंग्रहाची किंमत - 150 ₹ आहे. कवी हणमंत पडवळ यांच्या कविता वाचतांना वाचक मंत्रमुग्ध होऊन जाते. वाचक या काव्यसंग्रहाचे नक्कीच स्वागत करतील अशी आशा आहे. कवीच्या पुढील काव्यलेखनासा मनस्वी शुभेच्छा ......!

पुस्तक परिचय -
नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

पुस्तक परिचय - पाऊस ( Paus )

शब्दांच्या सरीत चिंब करणारा पाऊस कवितासंग्रह
कवितामधून संस्कार आणि प्रबोधनाचे मौलिक संदेश जनमानसांच्या मनात पेरणारे सुप्रसिद्ध कवी गणेश भाकरे यांना समर्पित केलेला उत्तम सदाकाळ यांचा पाऊस कवितासंग्रह म्हणजे शब्दांच्या रिमझिम सरीमध्ये चिंब होण्याची मुलांना मिळालेली एक सुवर्णसंधी. यापूर्वी त्यांचा गंमतगाणी या बाल कवितासंग्रहाचे बालविश्वात जोरदार स्वागत झाले होते. कवी हे पुणे जिल्हा परिषद मध्ये आदर्श शिक्षक असून त्यांना आत्तापर्यंत उत्कृष्ट बालसाहित्यिक पुरस्कारासह अन्य पुरस्कार मिळाले आहेत. राज्यातील अग्रगण्य वृत्तपत्रातून त्यांचे साहित्य प्रकाशित झाले असून बालकथा व कादंबरी लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांचे बालकथासंग्रह ( ३० ), बालकवितासंग्रह ( २ ), बालकादंबरी ( ३ ), कथासंग्रह ( 15 ), कादंबरी ( ६ ), ललित ( 1 ), अनुवादित कथासंग्रह ( ८ ), अनुवादित कादंबरी ( 1 ) असे विपुल साहित्य प्रकाशित झाले आहेत. पाऊस या कवितासंग्रहाला जेष्ठ साहित्यिक डॉ. विजयाताई वाड यांनी मलपृष्ठावर अभिप्राय देऊन एकप्रकारे त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. 
लहान लहान बालकांचे मन समजून घेऊन त्यांना समजेल अश्या सोप्या भाषेत कविता लिहिणे जरा कठीण बाब आहे. बालकांसाठी कविता लिहितांना त्यात गेय असावे लागते, एक लय असावा लागतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कमीतकमी शब्दांचा वापर करावा लागतो. यासर्व बाबीचा बारीक सारीक विचार करून कवींनी एकापेक्षा एक सुंदर कविता केल्या आहेत. कवीचे संपूर्ण बालपण खेडेगावात गेल्याने तेथील निसर्ग, सण समारंभ, नातेसंबंध त्यांनी जवळून अनुभवले आहे आणि तेच त्यांच्या रचनेतून बाहेर आले आहे. करी मनोरंजन जे मुलांचे,जडेल नाते प्रभुशी तयांचे असे परमपूज्य साने गुरुजी यांनी म्हटले आहे. कवींनी देखील या ओळीला अनुसरून कविता लिहिल्या आहेत.
 पाऊस म्हटलं की लहान मुले अगदी आनंदात नाचतात, उड्या मारतात. त्यांना पावसात भिजायला खूपच आवडते. वाहत्या पाण्यात कागदी नाव सोडण्याचा खेळ न खेळलेला मूल शोधूनही सापडत नाही. या कवितासंग्रहातील पाऊस ही कविता इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. यात कवी म्हणतो
*अंगणात साचले पाण्याचे तळे*
*कागदाची होडी पाण्यावर पळे*
*मुलांचा खेळ रंगात आला*
*धो धो धो धो पाऊस आला*

आपणा सर्वांना येरे येरे पावसा, तुला देतो पैसा हे गाणे माहीत आहे. आपणही आपल्या मुलांना ते गीत तालासुरात म्हणून दाखवितो. पण कवी हिरवा वसा कवितेत मात्र मुलांना वेगळेच गाणं देतात
*येरे येरे पावसा*
*दरवर्षी असा*
*सुखी कर धरती*
*घे हिरवा वसा*

निसर्गाच्या नियमाने आपण सर्वजण वागलो तर निसर्ग देखील साथ देत असतो. पण निसर्गाच्या बद्दल कृतज्ञ होण्याऐवजी आपण कृतघ्न होत चाललो आहोत. पावसाचा रुसवा या कवितेत मुलांना समजेल अशा भाषेत वर्णन केले आहे. तर वृक्षारोपण या कवितेतून झोपलेल्या माणसाला जागे करण्याचे काम केले आहे. 
*झाडे लावून आपण*
*निसर्ग आपला टिकवायचा*
*झोपी गेलेल्या माणसाला*
*थोडा शहाणपण शिकवायचा*

श्रावण महिन्यातील हिरवळ डोंगर, नदी नाले, भात पिकांची शेती, इंद्रधनुष्य असे स्वर्गापेक्षा सुंदर असे दृश्य फक्त खेडेगावात दिसते असे श्रावण, श्रावणात  आणि आला श्रावण आला या कवितेत कवी निसर्गाचे गुणगान करतो. 
थंडीच्या दिवसांत या कवितेतून कवी घरात काय काय बदल होतात ? कोण काय करतात ? याचे सुंदर असे वर्णन केले आहे. 
*थंडीच्या दिवसात सुगरण आजी*
*तळत बसते खमंग भजी*

चिऊचे बाळ, वसंत, थोरला भाऊ, आजा, हिरकणी, आजी, आधारवड, अनाथ, शाळा, फोन, खारुताई, गावाकडील मज्जा, दुवा, सकाळ, ह्या कविता मुलांना वेगळाच आनंद देऊन जातात. 
फुलात फुल जाईचे, जगात प्रेम आईचे असे आईविषयी बोलल्या जाते. आजपर्यंत अनेकांनी आईवर कविता, कथा कादंबरी लिहिल्या आहेत. तसे आईचे त्याग आहेच त्यात काही शंका नाही पण त्याच तोडीला बाबा देखील असतात. मात्र ते सदाच उपेक्षित राहिले आहेत. आई घराच्या आत सांभाळते तर बाबा घराचा आधार असतो म्हणून कवी आधारवड या कवितेत म्हणतो,
*कष्टात सदा गुंतलेल्या*
*बाबांना कसे विसरावे*
*गुण आईचे गाताना*
*बाबांचेही गीत व्हावे*

हिंदू संस्कृतीमध्ये सणाला विशेष महत्व आहे. या सणांच्या निमित्ताने घराघरांत लहान मुलांवर नकळत संस्कार केले जातात. ग्रामीण भागात आज ही प्रत्येक सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. शहरात मात्र हळूहळू सणांचे महत्व कमी होताना दिसत आहे. त्याअनुषंगाने कवीने रचलेल्या नागपंचमी, रक्षाबंधन, गणपती बाप्पा, दिवाळी, होळी, ख्रिसमस म्हणजे नाताळ या सणा विषयीच्या कविता उल्लेखनीय आहेत. 
एकूणच सर्वच कविता सरस, सुंदर व वाचनीय आहेत. कवीच्या हातून भविष्यात असेच सुंदर बाल कविताची निर्मिती होत राहो आणि बालकांना वाचनाचा आनंद मिळो ही मनस्वी सदिच्छा .....! 

पुस्तकाचे नाव - पाऊस ( बाल कवितासंग्रह )
कवी - उत्तम सदाकाळ
प्रकाशन - दिलीपराज प्रकाशन
पृष्ठे - 50
किंमत - 140 ₹

पुस्तक परिचय - नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद
9423625769

पुस्तक परिचय - अलेक्सा ( Aleksa )


कथेतून मूल्यशिक्षण देणारे पुस्तक अलेक्सा 
अखिल भारतीय बालसाहित्य पुरस्कार प्राप्त, मुळत: महाराष्ट्रातील वरोरा येथील रहिवाशी पण सध्या हैद्राबाद येथे वास्तव्यास असलेली, माध्यमिक शाळेतून प्रिन्सिपल पदावरून निवृत्त झालेली, ज्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि तेलगू या चार भाषेत कथा, कविता, ललित लेख, पद्य पथ नाटिका, कादंबरी, बालकथा, बालकविताचे गेल्या 40 वर्षात विपुल लेखन केले आहे अशा आंतरराष्ट्रीय बहुभाषी कवयित्री लेखिका मीना खोंड यांची अलेक्सा ही कादंबरी ई साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केली आहे. या कादंबरीला महाराष्ट्रात मुलांच्या जगात प्रसिद्ध असलेल्या किशोर मासिकाचे संपादक श्री किरण केंद्रे यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. लेखिकेने यापूर्वी देखील बालसाहित्यात मोलाची अशी कामगिरी केलेली आहे. अलेक्सा कादंबरी म्हणजे अनेक लाडक्या बालमित्रांसाठी ही अनोखी भेट आहे. या ई बुकमध्ये एकूण 10 बालकथाचा समावेश करण्यात आले असून  या कथा वैज्ञानिक, स्वछता आणि निसर्ग संवर्धन करण्याविषयी मुलांना नक्की प्रेरित करतील. अलेक्सा या पहिल्याच कथेत अथर्व आणि आजी यांच्या संवादातून संगणकाची पूर्ण माहिती मिळते. मुलांना मोबाईल, टॅब, आयपॅड यांच्यासोबत अलेक्सा हे देखील आवडायला लागते कारण ती विचारलेली माहिती क्षणात समोर ठेवते. संवाद खूपच छान पद्धतीने मांडण्यात लेखिकेला यश मिळाले आहे. शाब्बास या कथेतून मुलांच्या हातून होणारी लहानशी चूक काय अनर्थ घडवू शकतो याची प्रचिती येते. मग संजू कसा सुधारतो हे वाचनीय आहे. माणसातली माणुसकी या कथेत राजुच्या मनातील संवेदना जागी करते. आज समाजात लोप पावत चाललेली माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी ही कथा खूपच उपयोगी पडेल असे वाटते. पूर्वीच्या काळी जो चिवचिव असा चिमण्यांचा आवाज यायचा ते गायब झाले आहे याची सल चिऊताई या कथेतून मिळते. नुसते बागेत जाऊन येणारे मुलं खूप आहेत मात्र चला बागेत जाऊ या कथेतील मुलं मात्र बागेकडून खूप काही शिकतात आणि वृक्ष संवर्धन करण्याची शपथ घेतात. काव्यात्मक पद्धतीने झाडाचे महत्व सुंदररित्या विषद करण्यात आले आहे. गणेशोत्सव सर्व मुलांचा आवडता सण. याच निमित्ताने मातीची गणपती करायची, त्यात काही बिया ठेवायचे, ती मूर्ती घरातल्या कुंडीत विसर्जित करायची, काही दिवसांनी त्यातून रोप उगवेल त्याला वाढवायचं किती भन्नाट कल्पना मांडली खरी पूजा या कथेत. रक्षाबंधनचा सण देखील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाने साजरा केला जातो. आश्रमातील भाषणाच्या स्वरूपात मांडलेली राखी कथा मनाला भावून जाते. सूर्य ऊर्जेचा वापर वाढला पाहिजे, मुले विचारप्रवण झाली पाहिजे, संशोधन केली पाहिजे हे सोलर मुन ही कथा वाचताना वाटते. मुलांना इन्स्टंट फूड खाण्याची खूप आवड असते. जर अन्न घटकांचे गोळ्या करून दिले तर देशातील सारे मुलं आरोग्याच्या व शरीराच्या दृष्टीने मजबूत होऊ शकतील असा आशावाद त्यांनी इन्स्टंट फूड या कथेतून व्यक्त केला आहे. मुलांच्या जेवणाच्या बाबतीत घरोघरी खूप मोठा प्रश्न आहे, त्यावर त्यांनी शोधलेला हा उपाय परिणामकारक वाटून जातो. सहल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर ठरलेलं चित्र येते. मात्र लेखिकेने वाचकांच्या सर्व अंदाज चुकवित एका वृद्धाश्रमात सहल घेऊन जाते आणि तेथील लोकांच्या अनेक समस्या आणि वेदना कळाल्यावर मुलांच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. पुस्तक एकदा हातात घेतलं तर ते पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवावे असे वाटत नाही. ई बुक च्या स्वरूपात असलेले हे पुस्तक लहान मुलांना नक्की आवडेल अशी मला पूर्ण खात्री आहे. लेखिकेला पुढील लेखनास मनःपूर्वक शुभेच्छा ..... आपणास हे ई बुक ई साहित्य प्रतिष्ठानच्या वेबसाईटवरून डाउनलोड करता येईल किंवा लेखिका मीना खोंड यांच्याशी संपर्क करून त्याची ऑनलाईन प्रत घेता येईल.  

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

पुस्तक परिचय - प्रतिबिंब ( Pratibinb )

समाजातील चित्रांची प्रतिमा म्हणजे प्रतिबिंब
आपण कसे दिसतो ? हे पाहण्यासाठी प्रत्येकजण आपली प्रतिमा आरशात पाहतात. तसं पाण्यात देखील आपली प्रतिमा दिसते. पण खरी जी प्रतिमा तयार होते ती आपल्या वागण्यावर, बोलण्यावर, चालण्यावर आणि आपल्या मनात येत असलेल्या भावनांवर. आपले प्रतिबिंब आपल्या विचारांवर अवलंबून आहे. अशीच एक अनेक विचारांची मालिका डोक्यात घेऊन प्रा. शि. ल. जोगदंड यांचे प्रतिबिंब नावाचे काव्यसंग्रह नागठाणा ता. उमरी येथील नंदादीप प्रकाशनने प्रकाशित केले आहे. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात कविता वाचनाच्या छंदातून पुढे कविता म्हणण्याचा, लोकगीत, भारुडे, ओव्या आणि अभंग पाठांतर करण्याच्या नादातून कवीमनाचा माणूस प्रा. शि. ल. जोगदंड घडत गेले. लहानपणापासून त्यांनी अनुभवलेले सर्व गोष्टीचे प्रतिबिंब या काव्यसंग्रहातील कवितेतून स्पष्ट होतात, म्हणूनच या पुस्तकाला त्यांनी दिलेलं शीर्षक योग्य व अचूक वाटते. प्रसिद्ध ग्रामीण कथाकार ग. पि. मनुरकर सर यांचा त्यांना मिळालेला आशीर्वाद बहुमोलचा आहे. माणूस असं काही घडवून करतो म्हणजे साहित्य घडत नाही. त्यासाठी योग्य वेळ आणि योग्य काळ याचे गणित जुळावे लागते. नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. भगवान अंजनीकर यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन जोगदंड सरांना ही काव्यनिर्मिती करण्याचे सुचत गेले. सुप्रसिद्ध कादंबरीकार देविदास फुलारी सरांची या पुस्तकाला खूप सुंदर अशी प्रस्तावना लाभली आहे. सदरील काव्यसंग्रह सन 2015 मध्ये प्रसिद्ध झाले असून त्यात असलेल्या एकूण 47 कविता आजच्या काळात देखील तंतोतंत लागू पडतात. 
कवी शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख त्यांच्या डोळ्यासमोरून जाता जात नाही. म्हणूनच आपल्या पहिल्याच व्यथा शेतकऱ्याची या कवितेत त्यांनी बँकेकडून मिळणारे कर्ज, सावकाराचा कर्ज काढून केलेली शेती आणि त्यातच अति पावसाने झालेलं नुकसान त्या स्थितीचे सत्य वर्णन मांडले आहे. 

शेतकऱ्यावर गळ्याला फास लावण्याची वेळ आली
पॅकेजसाठी राजकारणी भांडून घेऊ लागली

अंधश्रद्धेमध्ये बळी जाणारे सर्वात जास्त कोण आहेत ? तर स्त्रिया. फार लवकर ते कोणावरही विश्वास ठेवतात आणि फसतात. स्त्री आणि बुवाबाजी या कवितेत ते वाचकांनाच प्रश्न विचारतात की,

बारा राशीवर भविष्य चालतंय का ?
बुवा भविष्याचं अचूक गणित सांगतील का ? 

माणूस मुबलक पाणी असल्यावर त्याचा वापर कसे ही करतो. त्याचे काही नियोजन नसते, असेल तर दिवाळी नाही तर शिमगा. नदी, नाले, ओढे, तलाव या सर्वाचा वापर करताना माणूस काहीच विचार करत नाही हेच त्यांच्या गंगामाई बोलू लागली तर या कवितेतून वाचायला मिळते. ते सुचवतात की

अरे माणसा माणसा कर पाण्याचे नियोजन
त्यातून होईल सर्व सजीवांचे समाधान

देवाने सृष्टी निर्माण करताना सर्व बाबीचा विचार करून मानवी देह तयार केला. विचार करण्याची शक्ती फक्त मानवाला दिली. त्यांचा वापर चांगल्या कामांसाठी करण्याऐवजी तो पशु पेक्षाही खालच्या पातळीवर जाऊन विचार करतोय अशी खंत त्यांनी पाखराची किमया या कवितेत व्यक्त केली आहे. 

तुला दिली रे देवानं जीभ छान
तरी तुझं बोलणं घाण
ते घे सुधारून

घरातला आज खेळत असलेला मुलगा म्हणजे त्या घराचा भावी काळातील आधार असतो. पण पालकांनी त्याच्यावर अपेक्षेचे ओझे टाकून त्याला वाकून टाकू नये. पालकांनी मुलांना समजून वागले तर त्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळू शकते असा आशावाद प्रिय पालकांनो या कवितेतून व्यक्त करताना म्हणतात

मुलांच्या पाठीवर फिरवा मायेचा हात
त्यातूनच देईल तो आयुष्यभर तुम्हाला साथ

मुलगी जन्माला येऊ नये म्हणून सोनोग्राफी नावाचं एक राक्षस तयार करण्यात आलंय. पूर्वीच्या काळी असे काही तंत्रज्ञान नव्हते. म्हणून स्त्री-पुरुष यांचा लिंगदर समान होता. पण या विज्ञानांच्या क्रांतीने माणसाची नैतिकता हरवली आहे अशी मनातली खदखद विज्ञानाचे गुण-दोष या कवितेतील ओळीतून व्यक्त केले आहे. 

डॉक्टर दादा विज्ञानाचा वापर कर जपून
नाही तर ठरेल विज्ञान अमृत कुंभ विषासमान 

बोर्डाच्या परीक्षेच्या निकालावर एक दृष्टिक्षेप टाकले तर लक्षात येते की, मुलींची उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. मुली ह्या मुलांपेक्षा कष्टाळू, अभ्यासू आणि चिकाटी असतात. मुलगा-मुलगी भेद मानू नका, मुलगी जन्माला येऊ द्या, लेक वाचवा लेक शिकवा या कवितेत ते संदेश देतात

मुलगी म्हणून तुच्छ लेखू नका
मुलगा म्हणून उच्च मानू नका
मुलगा-मुलगी आहेत समान
मुलांपेक्षा मुलीची कीर्ती आहे महान

आजचा पुढारी या कवितेतून त्यांनी राजकारणातल्या पुढारी लोकांचा समाचार घ्यायला देखील विसरले नाहीत. त्यांना विविध प्राण्यांची उपमा दिलेली आहे. 

आजचा पुढारी म्हणजे
दुतोंडी मांडूळ होय
दोन्ही पक्षाकडे वावरणारा

प्रेम म्हणजे काय ? याचे उत्तर या कवितेतून त्यांनी दिला आहे. प्रेमाचा नुसता देखावा काही कामाचे नसून प्रेम हे निस्वार्थी, त्यागी आणि निखळ असेल तर आपले जीवन सार्थक होते असे त्यांनी म्हटले आहे. 

प्रेमात असावी रंगाची उधळण, मैत्रीची गुंफण
वडिलांचं धैर्य, आईच्या हृदयाची कोमलता
लक्ष्मणासारखा बंधुप्रेम सुदाम्याची मैत्री

श्रावण महिन्यात बेलाची पाने शंकराला वाहिली जातात. बेलाची झाडं बोलू लागली अशी कल्पना करून छान संदेश दिलेले आहे. 

शिव शिव म्हणता म्हणता
दुसऱ्याचा का जीव घेता

आजचे शिक्षण म्हणजे फक्त नोकरीसाठी आहे. सर्वाना नोकरी देखील मिळत नाही. ज्या लोकांची काही तरी लिंक असते अश्या गुणवंत नसलेल्या लोकांनाच आज नोकरी मिळते अशी खंत व्यथा शिक्षणाची कवितेतून मांडले आहे. 

पदव्या कितीही कमावल्या तरी लागतो तिथे वशिला
असेल वशिला तर नोकरी मिळते म्हशीला

संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे म्हटले आहे. वृक्ष माझा सखा सोबती या कवितेत कवी 
वृक्षासारखा नाही सोबती
वाटसरूना आश्रय देती असे म्हटले आहे. 

देणाऱ्यानं देत जावं या कवितेत कोणाकडून आपणास काय काय घेता येते याचे सुंदर असे वर्णन केले आहे. चंद्राकडून शीतलता घ्यावी, 
मातेकडून वात्सल्य घ्यावं, 
राघवाकडून बोलणं शिकावं 
असे अनेक उदाहरण त्यांनी या कवितेत दिले आहेत. 

एकंदरीत समाजात चालू असलेल्या अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा, शेतकऱ्यांचे होणारे हाल, शिक्षणाची अवस्था, स्त्री भृण हत्या असे एक नाही अनेक विषयावरील कवींच्या मनातील विचार काव्याच्या स्वरूपात ' प्रतिबिंब ' या पुस्तकातून व्यक्त झाले आहे. कवी शि. ल. जोगदंड सरांना पुढील काव्य लेखनास मनस्वी शुभेच्छा. 

पुस्तकाचे नाव :- प्रतिबिंब
कवीचे नाव :- प्रा. शि. ल. जोगदंड
नंदादीप प्रकाशन, नागठाणा

पुस्तक परिचय
- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

पुस्तक परिचय - कोल्हेवाडीचा बाजार ( Kolhewadicha Bazar )

बालमनाला आनंदी करणारा काव्यसंग्रह " कोल्हेवाडीचा बाजार "
लहान मुलांसाठी कथा आणि कविता लिहिणे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. इतरांची बालकविता वाचताना किती सोपी आहे, मी पण लिहू शकतो असे मनाला एकदा वाटून जाते पण लहान मुलांच्या भावविश्वात जाऊन त्यांना समजेल आणि उमजेल अश्या भाषेत कविता लिहिणे सर्वाना जमणार नाही. नांदेड आकाशवाणी केंद्रावरून अनेकवेळा काव्यवाचन देखील केले आहे. नांदेड जिल्ह्यातील  नायगाव बा. येथे जन्मलेले पण सध्या उदगीर येथे वास्तव्यास असलेले कवी शंकर बोईनवाड यांनी खूप छान कविता लिहिल्या आहेत, हे त्यांचे कोल्हेवाडीचा बाजार ही बालकविता संग्रह वाचल्यानंतर लक्षात येते. तसं पाहिलं तर हा त्यांचा दुसरा बालकविता संग्रह आहे. यापूर्वी म्हणजे तब्बल 23 वर्षांपूर्वी म्हणजे सन 1998 मध्ये त्यांचा पहिला वहिला ' चिव चिव चिमणी ' हा बालकविता संग्रह प्रकाशित झाले आहे. कै. भारतभूषण गायकवाड यांच्या सहवासात त्यांनी कथा व कविता लेखनास सुरुवात केली. तसेच कवी प्रा. इंद्रजित भालेराव, प्रा. डॉ. सुरेश सावंत, कवी देविदास फुलारी, प्रा. डॉ. के. हरिबाबू, प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शन, प्रेरणा आणि सहकार्याने या काव्यसंग्रहाची जडणघडण झाली आहे. या काव्यसंग्रहाला प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांचे आशीर्वाद लाभले आहे तर सदरील काव्यसंग्रह कवींनी आपले बालमित्र असलेले उपजिल्हाधिकारी श्री प्रवीणजी फुलारी यांना अर्पण केले आहे.  कॉलेज जीवनापासून शंकर बोईनवाड यांना वाचन आणि लेखनाची अत्यंत आवड आहे. सुरुवातीच्या काळात पत्रकारिता करणारे शंकर बोईनवाड हे सध्या साप्ताहिक शालेय संकल्पचे संपादक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी पत्रकारितेत अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. 
कोल्हेवाडीचा बाजार या बालकाव्यसंग्रहात एकूण 22 कवितांचा समावेश केलेला आहे. लहान मुलांना आवडणाऱ्या प्राणी, पक्षी, निसर्ग, आकाश, चंद्र, पाऊस, वारा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कवीने मुलांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना उपदेश करण्यापेक्षा त्यांच्या ओठावर हसू यावे आणि आनंदाने त्यांनी नाचावे असा प्रयत्न त्यांच्या प्रत्येक कवितेत दिसून येते. 
आपला वाढदिवस साजरा करणे प्रत्येक मुलाला आवडते. हीच बाब लक्षात घेऊन पुनमचा वाढदिवस या कवितेतून मुलांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. माकडाचा दवाखाना ही कविता वाचताना मुलांना नक्की आनंद मिळणार आहे. डॉक्टरांच्या सल्याशिवाय स्वतःवर किंवा इतरांवर कधीही काही ही उपचार करू नये असा मौलिक सल्ला ते मुलांना देतात. गाढवाची फजिती ही कविता वाचतांना मुले हसल्याशिवाय राहणार नाहीत.

डब्यातले खडे खड खड वाजू लागले
गाढव जीव मुठीत घेऊन पळू लागले 
कवितेतील या ओळीमुळे मुले आनंदी होतील. पुस्तकाचे शीर्षक असलेली कोल्हेवाडीचा बाजार कवितेत बाजाराचे यथार्थ वर्णन केले आहे. मुलांना यातून नकळत भाजीपाल्याची माहिती मिळणार आहे. बोबडे बोलणाऱ्या मुलांचे जेवढे कौतुक होते तेवढेच त्याच्या बोबड्या बोलीने अडचणी निर्माण होतात. कवी मराठवाड्यातील आणि विशेष करून नांदेड जिल्ह्यातील असल्याने अडकूल ( पोहा ), ढबू असे शब्दप्रयोग केले आहे. घरात व परिसरात वावरणारे मांजर, उंदीर, कुत्रा, गाढव तसेच रानातील माकड या प्राण्यावरील कविता देखील वाचनीय आहेत. शाळा एके शाळा करणाऱ्या मुलांना सुट्टीचे खूप अप्रूप वाटते. त्यातल्या त्यात सुट्ट्यात मामाच्या गावाला जायचे म्हटलं तर यांचा चेहरा बघण्यासारखा असतो. मामाच्या गावाला या कवितेतून माहिती होते. अचानक शाळेला सुट्टी मिळाली तर मुले आनंदाने उड्या मारतात. काही मुलांना शाळा असूच नये रोज सुट्या असावे असे वाटते या आशयाच्या कविता वाचताना मुलाचे मन अजून आनंदी होते. खादाड बंडू कविता वाचताना मुलांच्या तोंडावर हसू फुटल्याशिवाय राहणार नाही.  सिंहगड, जेजुरी आणि अजिंठा लेणीचा प्रवास सहल या कवितेतून केला आहे.

या काव्यसंग्रहात एकापेक्षा एक सरस, मजेदार आणि विनोदी कविता आहेत. कवितेला अनुसरून दोन ते तीन चित्रे प्रत्येक कवितेला दिले आहेत जे की वाचकांना आकर्षित करतात. श्री जी. बी. मुक्कनवार यांची अक्षरजुळवणी खूपच छान आहे तर श्री दत्तकुमार स्वामी यांनी काढलेले मुखपृष्ठावरील वाघ, सिंह, माकड, कोल्हा, पोपट आणि ससा याचे रंगीत चित्र आकर्षक आहेत. कवीमित्र शंकर बोईनवाड  पुढील लेखनास मनस्वी शुभेच्छा ....!

पुस्तकाचे नाव :- कोल्हेवाडीचा बाजार
कवीचे नाव :- शंकर बोईनवाड
प्रकाशक :- गुरूमाऊली प्रकाशन, उदगीर
पृष्ठे :- 28 किंमत :- 51 ₹

पुस्तक परिचय 
नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

पुस्तक परिचय - कोरोना निवास ( Korona Niwas )

कोरोना काळातील इतिहास सांगणाऱ्या कथांचा संग्रह कोरोना निवास
संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरस या विषाणूने प्रत्येक नागरिकाला हादरवून सोडले. चीन मधील वूहान शहरात डिसेंबर 2019 मध्ये या विषाणूचा शोध लागला म्हणून कोव्हीड - 19 असे त्याचे नामकरण करण्यात आले. प्राण्यांपासून पसरलेला हा रोग माणसाला देखील झपाट्याने संसर्गित करू लागला. माणसाचा माणसाशी साधा संपर्क झाला किंवा सहवासात देखील आल्यास या रोगाचा प्रसार होऊ लागला म्हणून या रोगाची प्रत्येकाला भीती वाटू लागली. ह्या रोगाची लागण आपणाला होऊ नये यासाठी प्रत्येकजण विशिष्ट काळजी घेऊ लागला. लोकांचा एकमेकांशी संपर्क होऊ नये म्हणून जगातील प्रत्येक देशाने संचारबंदी लागू करून कित्येक दिवस, महिने करत वर्षभर लॉकडाऊन केले आहे. यामुळे घराघरांत जे काही रामायण-महाभारत घडले आहे ते अनेकांनी आपल्या कविता, वैचारिक लेख, ललित आणि कथांच्या माध्यमातून साहित्याची निर्मिती केली. कोरोना काळातील घटना इतिहासात नोंद होईल असेच आहे. कोरोना विषयावर अनेकांनी विनोद निर्माण केले. ट्वेन्टी ट्वेंटी हा वर्ष काहीतरी विशेष कार्य करून लक्षात राहण्याजोगे कार्य करू असे अनेकांनी मनसुबे तयार केले होते मात्र कोरोनाने हा वर्ष आपल्या नावाने करून घेतला. वर्तमानपत्र आणि टीव्हीच्या माध्यमातून या काळात घडलेल्या अनेक गोष्टी लोकांना घर बसल्या कळले. याच काळात आबालापासून वृद्धांपर्यंत सर्वाना लॉकडाऊन, संचारबंदी, विलगीकरण, सॅनीटायझर, मास्क यासारख्या शब्दाची ओळख झाली. अनेकांचे रोजचे जीवन जगणे विस्कळीत झाले. मुलांचे शाळा विद्यालय बंद पडले. देवालय कुलूपबंद झाले. लोकांचे बाहेर फिरणे थांबले. या सर्व घटनांचा सूक्ष्म अभ्यास आणि आपल्या अफाट विनोदबुद्धी निरीक्षणातून नागेश सू. शेवाळकर यांनी कोरोना निवास हा विनोदी कथासंग्रह शॉपीजन डॉट इन या ऑनलाईन प्रकाशनाच्या माध्यमातून गेल्या मे महिन्यात वाचकांच्या समोर आणले आहे. लेखक नागेश सू. शेवाळकर हे एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांचे आतापर्यंत सात कादंबरी, दोन धार्मिक, विनोदी व सामाजिक असे वीस कथासंग्रह, शैक्षणिक व राजकीय विषयावर चार चारोळीसंग्रह, विविध क्षेत्रातील चार महनीय व्यक्तीचे चरित्रग्रंथ, दरवर्षी साठ पेक्षा जास्त दिवाळी अंकात लेखन प्रसिद्ध झाली आहेत. ऑनलाईन क्षेत्रात देखील लेखकांची पकड आहे. मातृभारती, स्टोरी मिरर आणि शॉपीजन सारख्या ऑनलाईन साहित्य मंचावर त्यांचे असंख्य वाचक आहेत. स्टोरी मिरर या ऑनलाईन ई संस्थेद्वारे आयोजित 52 आठवडे लेखन आव्हान स्पर्धेत पाच हजार स्पर्धकांमधून त्यांना विजयी घोषित करण्यात आले होते. त्यांची अनेक पुस्तके महाराष्ट्र शासनाने छापून शाळांमध्ये वितरित केले आहे. 
या विनोदी कथासंग्रहात एकूण सोळा कथा असून लहान मुलांसाठी देखील बालविभागामध्ये एकूण सात कथाचा समावेश करण्यात आला आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहताच वाचकांना पुस्तक वाचण्यास भाग पाडते. घड्याळाचे चित्र म्हणजे माणसावर आज कोरोनामुळे कशी वेळ आली आहे हे दर्शविते तर त्याच घड्याळावर एकजण सुई घेऊन पळत आहे याचा अर्थ कोरोनाला संपवायचे असेल तर लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे असा संदेश यातून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पुस्तकात लसीकरण या विषयाच्या भोवताली बहुतेक कथा गुंफलेल्या आहेत. कोरोना प्रतिबंध करण्यासाठी सरकार लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले मात्र त्याबद्दल समाजात ज्या काही अफवा पसरविण्यात आल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने हे सारे खोटे आहे, हे दर्शविण्यासाठी जेष्ठ नागरिक असलेले अप्पा लसीकरण करून घेतात. त्यानंतर जे काही धमाल होते " हरवला चष्मा सापडली सुषमा " या कथेत वाचण्यास मिळेल. कोरोना पॉजिटिव्ह झाल्यानंतर व्यक्तीला चौदा दिवस विलगिकरण राहणे आवश्यक आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने दवाखान्यात बेड, ऑक्सिजन याची कमतरता भासू लागली. म्हणून मध्यमवर्गीय व्यक्ती घरातल्या घरात ती सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न करू लागले. भविष्यात ही समस्या निर्माण झाली तर आपणाला कोणत्या दवाखान्यात जाण्याची गरज भासू नये म्हणून त्या प्रकारच्या घराचा शोध घेऊ लागला. अस्मिता आणि अभ्यंकर हे मध्यमवर्गीय जोडपे देखील तसा एक फ्लॅट पाहतात पण ते फ्लॅट त्यांना मिळते की नाही हे पुस्तकाचे शीर्षक असलेले " कोरोना निवास " ही कथा वाचल्यानंतर कळते. 
कोरोना काळात काही लोकांना खूप त्रास झाला तर काही लोकांनी याच काळात आपली चांदी करून घेतली. विशेष करून दवाखान्यात कशी लूट चालू होती. स्वतःला अनुभव आल्यावर माणूस कसा बदलतो ? हे फास कोरोनाचा या कथेतून लेखकांनी सुंदररित्या मांडले आहे. तर गोरगरिबांना डावलून श्रीमंतांना पहिली सुविधा देऊ नये असा एक संदेश कोरोना आजी या कथेतून मिळतो. सरकारने तयार केलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यात कोणी कसर केल्यास त्यांना शिक्षा देखील मिळाली. कोरोना नियमांचा सर्वात जास्त त्रास जर कोणाला झाला असेल तर ते लग्न कार्य करणाऱ्या लोकांना. वीस-पंचवीस लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्नाचे कार्य करणे खूप जिकरीचे होते. लग्नाला जास्त मंडळी उपस्थित आहेत म्हणून आयोजकांवर गुन्हे देखील दाखल झाले. असेच एक लग्न कार्य " कोरोना गेला " ही कथा वाचतांना वाचकांना तोंडावर हसू आणल्याशिवाय राहत नाही.
कोरोना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे महत्वाचे आहे त्यासाठी लोकप्रतिनिधी किंवा वॉर्ड नगरसेवक यांनी मोफत लसीकरणासाठी काय नियोजन केले आहे " आली का ? आली का ? " या कथेत पाहण्यास मिळेल. जनतेमध्ये लसीकरणाविषयी जे गैरसमज आहे त्याविषयी भन्नाट अशी कथा " धास्ती कोरोनाची " मध्ये वाचता येईल. लेखकांनी लोकांना आलेले अनुभव आणि सोशल मीडियात प्रसिद्ध झालेल्या अनेक घटनांचा वापर कथेत केलेला आहे. त्यामुळे कथा वाचतांना हे आपल्या आसपास घडत आहे असेच वाटते. सहज सोपी संवाद शैली आणि समर्पक शब्दरचना यामुळे कथा वाचतांना कोठेही निरसपणा वाटत नाही.
कोरोना या नावाचा शोध कसा लागला असेल याचा शोध लेखक स्वतः लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. " कोरोना की करीना " ही कथा म्हणजे लेखकांजवळ असलेली तर्कशक्ती दर्शविते. सामान्य माणूस आपले जीवन कसे जगतो ? काय बघितल्यावर किंवा वाचल्यावर आनंद वाटते याची कल्पना या कथेतून मिळते. या कथासंग्रहात एकापेक्षा एक सरस विनोदी कथा वाचण्यास मिळतात.
कोरोनामुळे शाळा व महाविद्यालय बंद झाली. शिक्षकांचे व मुलांचे शाळेत जाणे बंद झाले. मुले कोरोनाची शिकार होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. सर्वच मंडळी घरात कैद झाल्यावर घराघरांत काय घडले याचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न बालकथा विभागात केले आहे. शाळा महाविद्यालय बंद झाले तसे देवालय देखील कुलूपबंद झाली. विनोद आणि त्याची आजी यांच्यातील संवादातून लॉकडाऊनमध्ये घरात काय घडले आहे याची प्रचिती येते. " चिऊताई दार उघड ना ! " या कथेतून कोरोना काळात लोकांनी स्वछता विषयी कशी जागरूक झाली होती ? हे कावळेदादा आणि चिऊताईच्या माध्यमातून सांगितले आहे. कोरोनामुळे मनुष्य स्वछतेचे सारे नियम पाळत आहे हे या कथेतून कळते. अनेक शाळांच्या शिक्षकांनी व्हाट्सअप्पचा वापर करून मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. तो ही एक अनुभव चव्हाण सरांच्या अनुभवातून " माझी शाळा, कोरोना शाळा " यातून दिला आहे. आजोबांचा अष्टचंद्रदर्शन ऑनलाईन वाढदिवस कसा साजरा होतो हे वाचल्याशिवाय कळणार नाही. कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली. यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर एक प्रकारे अन्याय आहे या आशयाची कोरोना उत्तीर्ण या कथेत वाचण्यास मिळेल.  बहुतांश विद्यार्थ्यांना कसे का होईना परीक्षा हवी होती, असा संदेश कथेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे, जे की स्तुत्य वाटते. सर्व कथा ह्या वाचनीय आणि खळखळून हसविणारे आहेत. ऑनलाईन माध्यमातून पुस्तकाच्या रूपाने बाहेर पडलेल्या या पुस्तकाचे वाचक नक्की स्वागत करतील अशी मला खात्री आहे. शॉपीजन डॉट इनच्या मराठी विभाग प्रमुख ऋचा दीपक कर्पे यांच्या अथक परिश्रमातून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून यात एकूण 105 पाने आहेत. पुस्तकाची बांधणी उत्तम आहे. पुस्तकाची किंमत 153 ₹ आहे. शॉपीजनवर ई पुस्तकाचे प्रकाशन नि:शुल्क असून ई पुस्तकाच्या प्रकाशनासाठी लेखकांकडून कुठलेच शुल्क आकारले जात नाही. आता वाचकांसाठी पुस्तकांची हार्डकॉपी देखील उपलब्ध करून देत आहे. शॉपीजन फक्त एक नाव किंवा संस्था नसून लेखकांचे स्वप्न साकार करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. गुगल प्ले स्टोरवर हे अँप विनामूल्य उपलब्ध आहे. 

पुस्तक परिचय - 
नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

पुस्तक परिचय - हसरे तारे ( Hasre Tare )

मुलांना हसवणारा कवितासंग्रह ' हसरे तारे '
उपक्रमशील शिक्षिका व कवयित्री शुभांगी पवार यांची हसरे तारे हा कवितासंग्रह म्हणजे लहान मुलांसाठी एक छानशी मेजवानी आहे. कवयित्री शुभांगी पवार ह्या कंदी पेढा या टोपणनावाने ओळखल्या जातात. सातारा जिल्ह्यातील खंडोबाची बेघरवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ते शिक्षण सेवक म्हणून काम केले आहे. रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून त्यांचे भाषण प्रसारित झाले असून पुणेरी आवाज रेडिओ 107.8 FM केंद्रावरून कविता व चारोळ्या प्रसारित झाल्या आहेत. त्यांना ट्रॅकिंग करण्याचा देखील छंद असून मिशन कळसुबाई 2019 या ट्रॅकिंग मध्ये सहभाग घेऊन ते यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल औरंगाबादच्या ड्रीम अडव्हेंचर्स संस्थेने त्यांचा सन्मान ही केला आहे. बहर, शिवारातील कविता अश्या अनेक प्रातिनिधिक कविता संग्रहात त्यांच्या कविता प्रकाशित झाले असून दिवाळी अंक, मासिके, साप्ताहिके आणि दैनिकांत नियमित कविता प्रसिद्ध होत असतात.
हसरे तारे हा त्यांचा द्वितीय काव्यसंग्रह असून या कवितासंग्रहात एकूण 28 बालकवितांचा समावेश करण्यात आला असून सर्वच कविता बालकांच्या विश्वाशी निगडित असल्याने मुलांना वाचन करताना आनंद मिळणारे आहेत. या काव्यसंग्रहाला मुंबईच्या संजीवनी राजगुरू यांची प्रस्तावना लाभली आहे. कवयित्री स्वतः प्राथमिक शाळेत शिक्षिका असल्याने चिमुकल्या मुलांशी दररोज संबंध येतो, त्याच अनुभवाच्या बळावर त्यांनी सुंदर काव्यरचना केल्या आहेत. सोशल मीडियातील व्हाट्सअप्पमुळे अनेक नवोदित मंडळी कविता करत आहेत ही खरोखरच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. स्वतः कवयित्री ह्या श्री देवराव चव्हाण व सौ. रंजना लसणे यांच्या बालजगत व्हाट्सअप्प समूहात सक्रिय सहभागी होऊन ज्या बालकविता लिहिल्या त्याचेच एक कवितासंग्रह हसरे तारे प्रकाशित केले आहे. हे वाचून पहिल्यांदा आनंद झाला. सोशल मीडियाचा चांगला वापर केल्याबद्दल समूह संयोजक आणि कवयित्री यांचे अभिनंदन करावेसे वाटते.
कविता करणे तसे सोपे वाटते पण प्रत्यक्षात कविता करताना शब्दच सुचत नसेल तर मनासारखी कविता तयार होत नाही. त्यातल्या त्यात बालकविता करणे त्याहून ही कठीण गोष्ट आहे. मात्र शुभांगी पवार यांच्या कविता वाचतांना सोपी वाटायला लागते. प्रत्येक घरात एक खोडकर बाळ असतोच त्याचे वर्णन खोडकर खंडू या कवितेत वाचण्यास मिळते. शाळेला सुट्टी असल्यावर मुले कोणकोणती मज्जा करतात हे सुट्टीतील मौज या कवितेतून समर्पक शब्द वापरून व्यक्त केले आहे.

सुट्टीतील मौज करायला
तयार झाले छोटे
भातुकलीचा डाव मांडला
केले जेवण खोटे
या ओळी वाचून बालपण आठवल्याशिवाय राहत नाही. निसर्गात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर कवयित्रीने आपल्या मनातील बालभावना कवितेच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. प्रत्येकाने आईला घरकामात मदत करावे असा चांगला संदेश कामातला आनंद या कवितेतून दिला आहे. लहान मुलांना बाहुलीसंगे खेळायला खूप आवडते. बाहुली या कवितेतून सारे चित्र त्यांनी स्पष्ट केले आहे. बैलाचा सण पोळा विषयीची कविता खूप सुंदर वाटली.

सुंदर - चंदर भारी दोघे
पाहायला त्यांना गाव उभे
हिवाळा आला की कानटोपीची आठवण येते आणि आजी आपल्या नातवासाठी कानटोप तयार करते. याचा छानसा अनुभव कानटोपी कवितेतून मिळतो. पुस्तकाचे शीर्षक असलेली हसरे तारे या कवितेत कवयित्रीने मुलांची तुलना आकाशात चमकणाऱ्या ताऱ्याशी आणि देवासाठी राखून ठेवलेल्या सुंदर फुलांशी केले आहे. दीपावली निमित्ताने घराघरात अनेक पदार्थ तयार केले जातात. त्यात आवडीचा पदार्थ म्हणजे चकली, याविषयी कवयित्रीने खूप छान रचना केली आहे. ती वाचतांना तोंडात पाणी आल्याशिवाय राहत नाही. साऊ माझ्या कवितेत सावित्रीबाई फुले यांची आठवण काढतात. पाऊस आला ही कविता लयबद्ध आहे, त्यास तालीत वाचन केल्यास खूप मजा येईल. अननस दिसायला कसा असतो ? याची माहिती अननस रस या काव्यातून मिळते. लहान मुलांचा आवडता देव म्हणजे गणपती बाप्पा. बालगणेश या कवितेत बाप्पा गणेशला लवकर येण्याची विनंती करत आहे. लहान मुलांना दुकानातील कुरकुरे खूप आवडतात. नको मला कुरकुरे या कवितेत मुलांनी कुरकुरे व वेफर्स खाऊ नये असा छान संदेश दिलेला आहे. माझी आनंददायी शाळा ही कविता म्हणजे कवयित्रीची शाळाच जणू या कवितेतून स्पष्ट होते.
धीटूकला ससा, जादुई पेन, गमतीदार गणित असे सुंदर काव्य यात समाविष्ट आहेत. एकूणच सर्वच कविता लयबद्ध आणि वाचनीय आहेत. वाशीमच्या अजिंक्य प्रकाशनने ही पुस्तिका प्रकाशित केली असून यात एकूण 60 पृष्ठ आहेत आणि याची किमंत फक्त 75 ₹ आहे. अरविंद मनवर यांनी सुंदर मुखपृष्ठ तयार केले असून अक्षर जुळवणी देखील उत्तम आहे. काही काही ठिकाणी अनुस्वार द्यायचे राहून गेले आहेत त्यामुळे शब्दांचे वाचन वेगळे होते. पुढील प्रकाशनात ह्या चूका टाळण्याकडे लक्ष द्यावे. शुंभागी विलास पवार उर्फ कंदी पेढा यांना त्यांच्या पुढील साहित्य लेखनास मनस्वी शुभेच्छा ...!

पुस्तक परिचय
नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

पुस्तक परिचय - मातृवेद ( Matruved )

आईची महती सांगणारा मातृवेद कथासंग्रह
लेखिका सविता वाळींबे-शेट्टी लिखित मातृवेद हे दुसरे पुस्तक ई साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केले आहे. यापूर्वी 2017 मध्ये याच ई साहित्य प्रतिष्ठानने त्यांचा जननी हा कथासंग्रह प्रकाशित केला असून ऑनलाईन वर अनेक वाचकांनी यास पसंती दर्शविलेली आहे. लेखिका ह्या मूळच्या मुंबई येथील रहिवाशी असून त्यांना लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यांना पुल देशपांडे, व. पू. काळे, विजया वाड, विजया राजाध्यक्ष, जयवंत दळवी, विजय तेंडूलकर, इंद्रायणी सावकार यांच्या लेखणीत खास रुची आहे. मनातल्या मनात गोष्टी गुंफत राहणे ही लेखिकेची खासियत कथा लिहिण्यास नेहमी प्रेरित करत असते. गेल्या पंचवीस वर्षांपासून ते नियमित लेखन करत आहेत. त्यांच्या कथा विविध मासिकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. मातृत्व या विषयावर ते सभोवती सूक्ष्म नजरेतून पाहतात आणि तेथेच त्यांना कथेचे बीज सापडत राहते. आई या दोन अक्षरी शब्दांत काय ताकद आहे ? हे यांच्या कथा वाचतांना वारंवार लक्षात येत राहते. आपल्या गर्भात नऊ महिने नऊ दिवस बाळाचे संगोपन करणारी आई आणि तिचे मन या विषयी प्रत्येक कथेत एक ओलावा दिसून येतो. आई म्हणजे काय असते ? हे आई झाल्याशिवाय कळणार नाही ही गोष्ट देखील नकळतपणे जाणवते. हिंदू संस्कृतीत चार वेद सांगितले आहेत, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. पण लेखिकेने पाचवा अत्यंत महत्वाचा वेद सांगितला आहे, तो म्हणजे मातृवेद. खरोखरच संतांनी म्हटले आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. राजमाता जिजाऊ नसत्या तर महाराष्ट्राला राजे छत्रपती शिवाजी महाराजासारखा लढवय्या शूर वीर मिळाला नसता. यशोदा राहिली नसती तर हळव्या मनाचे श्याम म्हणजे साने गुरुजी आपणाला लाभले नसते, आशियाम्मा नसती तर भारताची जगात ज्यांनी क्षेपणास्त्रात विशेष ओळख करून दिली असे मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सारखे शास्त्रज्ञ मिळाले नसते. हे सारं त्या आईच्या प्रेमामुळे, संस्कारामुळे शक्य झाले हे विसरून चालणार नाही. 
लेखिका सविता वाळींबे-शेट्टी यांचे मातृवेद हा कथासंग्रह खूपच छान आहे. यात चार कथा लिहिल्या आहेत आणि चार ही कथेत आईच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपल्या पहिल्याच व्यर्थ या कथेत एका गुन्हेगार असलेल्या आपल्या मुलाच्या प्रति आईचे असलेले प्रेम सांगणारी कथा आहे. मुलगा चांगला असो वा वाईट, सुंदर असो कुरूप ते आपल्या आईसाठी चांगलेच वाटते. त्याच वेळी गुंड मुलाचा पाठलाग करताना पोलिसांच्या घरातील वातावरण वाचकांचे मन हेलावून टाकते. तुझ्यासाठी या दुसऱ्या कथेत दत्तक घेतलेली मुलगी आपल्या घराला कशी सावरते. त्याच वेळी दत्तक घेणारे आई-वडील खरेखुरे आई-बाबा बनणार असतात त्यावेळी त्यांच्या मनात विशेष करून आईच्या मनात काय चाललंय हे खूप छान मांडले आहे. शेवटी ती दत्तकपुत्र मुलगी आपल्या घरासाठी काय काय महत्वाचे काम करते ते कथा वाचल्यावरच कळेल.
 कशासाठी एवढा आटापिटा ? या तिसऱ्या कथेत लेखिकेने घटस्फोट झालेल्या कुटुंबात मुलाची आणि आईची घालमेल खूप सुंदररित्या गुंफले आहे. त्याचवेळी आजी असलेली मुलाची आई, शेवटी ती देखील एक आईच आहे, म्हणून ती लेकराची व आईची गाठभेट व्हावी म्हणून काय काय करते ? हे सर्व वाचनीय आहे. वंश परंपरागत ठेवा ह्या शेवटच्या कथेत लेखिकेने स्त्री मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. घरात स्त्रीवर होणारे अत्याचार ती कशी गुमान सोसते हे या कथेतून स्पष्ट केले आहे. स्वतः स्वातंत्र्य सैनिकांची शूर मुलगी असून देखील नवऱ्याच्या अत्याचाराला विरोध करत नाही हे तिच्या मुलीला आश्चर्य वाटते पण शेवटी तीच आई त्या मुलीला बंड करण्यासाठी ताकद ही देते. 
पुस्तक वाचतांना वाचतच राहावे असे वाटते. प्रत्येक आई आपल्या लेकरासाठी काय काय करते किंवा डोक्यावर कोणते संकट घेते प्रसंगी आपल्याच नवऱ्यावर गोळ्या झाडते, खरंच खूप छान पुस्तक आहे. लेखिका स्वतः एक आई असल्याने त्यांनी आईची भूमिका सक्षमपणे मांडले आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक ई साहित्य प्रतिष्ठानने फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण जगातील मराठी वाचकांसाठी ऑनलाईनवर अगदी मोफत उपलब्ध करून दिले आहे. तेव्हा कथा वाचकांनी या कथासंग्रह वाचनाचा जरूर आनंद घ्यावा. लेखिका सविता वाळींबे-शेट्टी यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा .....!

पुस्तक परिचय - 
- नासा येवतीकर, स्तंभलेखक तथा विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769

पुस्तक परिचय - लाल दिनांक ( Lal Dinank )

मुलांचा आवडता लाल दिनांक कथासंग्रह
राज्यशासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त हिंगोली जिल्ह्यातील एक आदर्श शिक्षक व्यक्तिमत्त्व म्हणजे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागेश सु. शेवाळकर. शालेय जीवनासोबत आपले संपूर्ण जीवन त्यांनी साहित्य निर्मिती करण्यासाठी व्यतीत केले आहे म्हणूनच त्यांच्या हातून एकापेक्षा एक सरस अश्या पुस्तकांची निर्मिती झाली आहे. आजपर्यंत त्यांची 30 हुन अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून बारा कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. गेल्या दोन तीन वर्षांपासून दरवर्षी पन्नासहुन अधिक दिवाळी अंकात त्यांचे साहित्य प्रकाशित होते. म्हणूनच डॉ. सुनील पाटील आयोजित आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक लेखक पुरस्कार या संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दहा सर्वोत्कृष्ट लेखकामध्ये नागेश सु. शेवाळकर यांना प्रथम क्रमांकाचे पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यांच्या श्यामच्या छान छान गोष्टी या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आणि प्रत्येक शाळेत पोहोचविले आहे. साठी बुद्धी नाठी असे म्हणतात परंतु लेखकांनी साठी पार केल्यानंतर ही त्यांची लिहिण्याची उर्मी आणि धमक अजूनही कायम आहे. आपल्या जीवनात आलेल्या अनेक सुखदुःखाचे प्रसंग, चढ-उतार या सर्व अनुभवाच्या बळावर ते आपले साहित्य लेखन करतात म्हणून तर वाचकांच्या गळी सहज उतरते. अवघड आणि क्लिष्ट वाटणारे शब्द शक्यतो टाळून सहज सोपी भाषा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच आबालापासून वृद्धांपर्यंत सर्वांना त्यांचे साहित्य मनापासून आवडतात. किशोरवयीन मुलांची वाचनाची भूक भागवावी या उद्देशाने पुण्यातील सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशनने ख्रिसमसच्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबर रोजी नागेश शेवाळकर लिखित " लाल दिनांक " नावाचे बालकथासंग्रह प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक असून घरोघरी भिंतीवर टांगलेले जे कॅलेंडर असते तेच कॅलेंडर घेण्यात आले आणि त्यातील लाला दिनांक म्हणजे सुट्टीचा वार रविवार तसेच इतर सुट्या देखील लाल रंगाने दर्शविले जातात. ते ठळकपणे लक्षात येते. शाळेत जाणाऱ्या मुलांना कॅलेंडरवरील लाल दिनांक खूप आवडतात कारण त्यादिवशी शाळेला सुट्टी असते. तसे तर लाल रंग म्हणजे धोक्याची खूण आहे मात्र कॅलेंडरवरील लाल रंग मुलांना खूप आनंद देतो. महिन्याचा कागद उलटला की, पहिले लक्ष या महिन्यात किती लाल दिनांक आहेत यावरच जाते. याच मुलांच्या भावनेला हेरून लेखकांनी लाल दिनांक पुस्तकाचे शीर्षक असणारी कथा खूप छान पद्धतीने लिहिली आहे. युवराज सारखे शाळेत जाणारे अनेक मुलं याच पद्धतीने वागतात. कॅलेंडर जरी आपण छापत असू तरी त्यातील सुट्याचे लाल दिनांक छापण्याचे अधिकार आपणांस नसतात याची जाणीव या कथेतून करण्यात लेखक यशस्वी ठरतात. या बालकथासंग्रहात एकूण पंधरा कथा आहेत. सर्वच कथा मुलांना त्यांच्या भावविश्वात नेऊन नकळत काही ना काही शिकवण देऊन जातात. पहिली कथा वाचायला घेतली की सर्व कथा वाचन करेपर्यंत वाचक पुस्तक सोडत नाही असे कथानक या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. वाचकांची अचूक नाडी ओळखण्यात लेखक वाकबगार आहेत म्हणून आई, बाबा, आजी, आजोबा, शाळा, घर, खेळ, वाढदिवस या सर्व बाबी आणि जीवनात घडणाऱ्या अनेक बारीकसारीक गोष्टीचे निरीक्षण करून त्याच बाबीवर प्रकाश टाकणाऱ्या कथा या संग्रहात लिहिल्या आहेत. 
अमराठी शाळेत मुलांना फक्त बौद्धिक ज्ञान दिल्या जाते पण शरीराने ते फार कमकुवत राहतात कारण त्या शाळेला एक तर मैदान उपलब्ध नसते किंवा त्यांच्याकडे असे देशी खेळांची माहिती नसते. ज्यामुळे या शाळेतील विद्यार्थी खेळाच्या बाबतीत कमनशिबी ठरतात हे प्रत्येक पालकांचे अनुभव आहेत. याच बाबी लक्षात घेऊन आमच्या मिस ..... आजी ही कथा समीर आणि त्याच्या आजीभोवती फिरत असते. जुन्या काळी खेळले जाणारे अनेक खेळ आता लुप्त होत आहेत, त्या सर्व खेळांना उजागर करण्याची आणि मुलांना ते खेळ खेळविण्याची खरी गरज आहे. शालेय जीवनात मुले मैदानावर उड्या नाही मारले तर काय नोकरी लागल्यावर कार्यालयात उड्या मारणार का ? खेळाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. जी मुले लहान असताना खूप खेळतात, उड्या मारतात त्यांना भावी आयुष्यात आरोग्याच्या बाबतीत कमी तक्रारी जाणवतात. शरीर चांगले असेल तर आपल्या सर्व बाबी चांगले घडतात. शरीर निरोगी तर मुलांचा अभ्यास उत्तम असू शकतो हीच शिकवण या कथेतून लेखकांनी अगदी भक्कमपणे मांडली आहे. 
आजीची माया वेगळीच असते. माधवला आजीला त्रास द्यायला आवडते. त्याच्या मनात नेहमी आजीला त्रास देण्याच्या कल्पना रेंगाळत असतात. त्याला त्यात आनंद मिळतो. आजीला त्रास देणे हे चूक आहे याची जाणीव माधवला करून देणे आवश्यक आहे. म्हणून आजीने लढविलेली शक्कल कामी येते आणि माधव आजीला त्रास न देण्याचा वचन देतो. काही गोष्टी मुलांना अनुभवातून शिकवावे लागते. तोंडी कितीवेळा सांगितले तरी नळी फुंकिले सोनारे, इकडून तिकडे वाहे वारे या म्हणीप्रमाणे ते वागत असतात. त्यांच्यात काही बदल किंवा परिवर्तन घडवायचे असेल तर तसा एखादं प्रसंग किंवा अनुभव त्याच्यासोबत घडवावे लागते. आई-बाबा यांच्या प्रेमासोबत मुलांना आजी-आजोबांचे प्रेम देखील मिळायला हवे, जे की आजकाल हम दो हमारे दो या प्लॅट संस्कृतीच्या विचारामध्ये मुलांना ते मिळत नाही, ते मिळाले तर काय होऊ शकते ? ही बाब त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये प्रकर्षाने दिसून येते. 
लहान मुलांना सर्वात मोठे आकर्षण असते ते म्हणजे त्यांच्या वाढदिवसाचा. वर्षातून एकदा येणारा त्यांचा वाढदिवस त्यांच्या जीवनात आनंद देऊन जातो. वाढदिवसाचा केक, त्यानिमित्ताने जमा होणारी मित्रमंडळी, मित्रांकडून मिळणारे गिप्ट आणि आई-बाबाकडून मिळणारे सरप्राईझ गिप्ट ह्या साऱ्या गोष्टीची उत्सुकता एका वाढदिवसाच्या निमित्ताने असते. पण तोच वाढदिवस एका वर्षाच्या ऐवजी चार वर्षांनी येत असेल तर तेव्हा त्या मुलाच्या मनाची घालमेल काय होते ? वाढदिवस सचिनचा या कथेतून लेखकांनी अनेक गोष्टी साध्य केले आहेत. एक तर मुलांना कथेतून लीप वर्ष म्हणजे काय याची ओळख होते. 29 फेब्रुवारी हा दिवस प्रत्येक वर्षी नसतो तर फक्त चार वर्षांनी एकदा येतो आणि त्यामुळे वर्षाच्या दिवसात एका दिवसाने वाढ होते. ही सारी माहिती मुलांना  नकळत कळून जाते. त्याचसोबत त्याच तारखेला वाढदिवस साजरा करावा असे काही नाही जर रविवारी आपला वाढदिवस असेल तर शाळेत तोच वाढदिवस आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो तसा 29 फेब्रुवारीला असलेला सचिनचा वाढदिवस 28 तारखेला साजरा करण्याविषयीची कल्पना खूप छान रंगविण्यात आली. हुशार आई-वडील, आजी-आजोबा आणि कल्पक शिक्षक असतील तर कोणताच मुलगा आणि विद्यार्थी उदास राहणार नाही याची जाणीव सचिनचा वाढदिवस आणि एक वाढदिवस असाही ... या दोन्ही कथेतून प्रकर्षाने जाणवते. 
साने गुरुजी लिखित श्यामची आई हे पुस्तक न वाचणारा वाचक तसा विरळच. श्यामची आई या पुस्तकाने अनेकांवर संस्कार केले तसे लेखकांवर देखील केले आहे. त्यांच्या लेखनात सानेगुरुजीची छटा दिसून येते. श्यामची आई श्यामला पत्रावळ शिवल्याशिवाय जेवायला देत नाही ही गोष्ट कथेतला श्याम त्याला मिळालेल्या बक्षीसरुपी पुस्तकातून वाचतो. तशीच पत्रावळ पाहिजे म्हणून हट्ट करतो मात्र त्याला पानांची पत्रावळ काही मिळत नाही. पण जेव्हा त्याला समजते की झाडाची सजीव पाने तोडून पत्रावळ करावी लागते त्यावेळी तो तशी पत्रावळ करण्याचा हट्ट सोडतो. यातून लेखकांनी पर्यावरणावरील मुलांचे प्रेम दर्शविले आहे. त्याचसोबत कामात सातत्यपणा ठेवल्यास त्याचे चांगलेच परिणाम पाहायला मिळते. समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटले आहे दिसमाजी काही तरी लिहावे तसे श्यामची आई  श्यामकडून रोज पंधरा ओळी लिहून घेत असत. ज्यामुळे त्याचे अक्षर सुंदर आणि वळणदार झाले होते. त्यामुळे या बक्षिसाचे सारे श्रेय तो आपल्या आईला देतो. प्रत्येक आईला मार्गदर्शन ठरणारी ही कथा आहे. 
लहान मुले अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवतात फक्त त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. सेवानिवृत्त जोशी काका आपल्या प्लॅट मधील मुलांना नेहमी प्रोत्साहित करतात ज्यामुळे पैकीच्या पैकी गुण न घेणारी मुले कठीण परीक्षेत पैकीच्या पैकी गुण घेतात आणि शाबासकी मिळवतात. मुले एकमेकांचे बघत बघत शिकत असतात. संस्कार ही कोणत्या दुकानात विकत घेण्यासारखी वस्तू नाही तर ती कुटुंबातून, परिवारातून आणि समाजातून नकळत प्राप्त होते. तसेच लहानपणी मिळालेले संस्कार चिरकाल टिकून राहतात. म्हणून लहान मुलांवर खास लक्ष देऊन संस्कार टाकावे असा संदेश ते प्रोत्साहन या कथेतून देतात. लेखकांची विनोदबुद्धी ' आठवण एका करामतीची ' या कथेत दिसून येते. दुकानातील गोळ्या आणि दवाखान्यातील औषधाच्या गोळ्या वेगळ्या असतात याची जाणीव मुलांना या कथेच्या माध्यमातून करून देतात. लहानपणी मुलांच्या मनावर ज्या गोष्टी बिंबतात ते मरेपर्यंत त्यांच्या सोबत राहतात. लहान मुलांना आवडणारी कथेतील परी, प्रत्यक्षात कधीच दिसत नाही. पण मुलांना कथेतील विश्व प्रत्यक्षात पाहण्याची इच्छा होते, वाड वडिलांच्या प्रत्येक शब्दांवर, बोलण्यावर त्याचा गाढ विश्वास असतो. म्हणून मुलांच्या कुतूहल निर्माण करणाऱ्या प्रश्नांना अचूक उत्तर देणे आवश्यक आहे. त्याच्या प्रश्नाला चुकीचे उत्तर देऊन त्यांना एकप्रकारे आपण कमकुवत करत असतो. म्हणून मुलांना प्रत्येक घटनेमागील खरे कारण सांगून त्यांना सजग करणे प्रत्येक पालकांचे कर्तव्य असल्याची जाणीव परीकथा मधून करून देतात. आपल्या मुलांवर आई-बाबा हेच चांगले संस्कार टाकू शकतात याची प्रचिती विश्वास जिंकला या कथेत प्रकर्षाने जाणवते. कुणाची परवानगी घेतल्याशिवाय दुसऱ्याच्या वस्तूला हात लावायचे नाही ही शिकवण आपल्या मुलांमध्ये आणण्यासाठी प्रत्येक पालकांनी जागरूकपणे वागले पाहिजे. वाचताना सुंदर वाटणारी ही कथा मुलांवर खूप चांगला परिणाम करून जाते. जीवनात आई-वडील यांच्याशिवाय दुसरा कोणी श्रेष्ठ नाही म्हणून त्यांची सेवा करणे हे प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे. मातृदेवो भव आणि पितृ देवो भव याची महती सांगणारी कथा म्हणजे श्रावणबाळ. पुरस्कार माणसाला प्रेरणा देतात आणि प्रेरणेमुळे अनेक गोष्टी घडतात. लहान मुलांना बक्षीस देतो म्हटलं की अनेक काम ते पटापट करतात. बक्षिसाची किमया या कथेत अमितला त्याची आवडती बॅट बक्षीस म्हणून भेटल्यानंतर शाळेत मारून मुटकून येणारा अमित नियमितपणामध्ये प्रथम क्रमांकाची उपस्थिती राखतो. हे सर्व शक्य झाले ते बक्षीसामुळे. म्हणून नेहमी मुलांना शिव्याशाप, मारझोड करण्यापेक्षा कधी कधी मुलांना बक्षीस देत जावे त्याचे अनुकूल परिणाम पाहायला मिळतात. शाळेच्या ओळखपत्राचा वापर आपण कसा करावा याची ओळख देणारी कथा म्हणजे ओळखपत्र. जसे मोठी माणसं आपापले कार्ड जवळ बाळगतात तसे शाळेत शिकणाऱ्या मुलांनी शाळेचे ओळखपत्र जवळ बाळगावे आणि त्याचा वापर देखील करावा. असा चांगला संदेश ओळखपत्र या कथेतून ते देतात. लहान मुलांचा सर्वात आवडता देव म्हणजे गणपती बाप्पा. याच बाप्पाने लहान मुलांना लिहिलेले पत्र म्हणजे मुलांना दाखविलेली एक योग्य दिशाच आहे. पत्राच्या माध्यमातून लेखकांनी मुलांची कान उघाडणी करून त्यांना पुढे कसे वागायचे आहे याची माहिती दिली आहे. शेवटची कथा म्हणजे नातू माझा  भला या कथेतून संकटकाळात मुलांनीगोंधळून न जाता प्रसंगावधान ठेवून काय केले पाहिजे याची माहिती मुलांना मिळते. पाच मिनिटे उशीर झाला असता तर काय झाले असते मी सांगू शकलो नसतो हे डॉक्टरांचे बोलणे ओंकार किती महत्वाचे काम केला याची प्रचिती देऊन जातो. 
आपल्या घरातील किशोरवयीन मुलांनी हे पुस्तक नक्की वाचायलाच पाहिजे अशी आहे. प्रत्येक गोष्ट मुलांच्या मनाला नक्की स्पर्श करतो, हे पुस्तक वाचल्याशिवाय कळणार नाही. या पुस्तकातून पालकांना देखील अनेक गोष्टी शिकायला मिळतात. म्हणून पहिल्यांदा प्रत्येक आई-बाबांनी हे पुस्तक वाचावे आणि आपल्या मुलांना वाचण्यासाठी द्यावे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी इतर कोणती भेटवस्तू देण्यापेक्षा असे संस्कारक्षम पुस्तक भेट देणे योग्य राहील, असे वाटते. जेष्ठ साहित्यिक नागेश सु. शेवाळकर यांच्या हातून भविष्यात अजून उत्तमोत्तम साहित्य निर्माण होऊन आम्हा वाचकांना अजून साहित्य वाचण्यास मिळो हीच मनस्वी सदिच्छा ...!

पुस्तकाचे नाव :- लाल दिनांक
लेखकाचे नाव :- नागेश सु. शेवाळकर
प्रकाशन :- सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन, पुणे
एकूण पृष्ठ :- 120
किंमत :- 150 रु. 

पुस्तक परिचय
- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक तथा विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769

पुस्तक परिचय - लखलखणारी शाळा ( Lakhalakhanari Shala )

' लखलखणारी सरकारी शाळा '

जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा म्हटले की, प्रत्येकांच्या डोळ्यासमोर एक वेगळेच चित्र उभे राहते. ज्या चित्रात त्या शाळाची, तेथील परिसराची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्याच्या बाबतीतचे चित्रण भयानक दिसून येते. या शाळांची स्थिती कधीच सुधारणार नाही, अशी धारणा प्रत्येकाची बनलेली असते. या शाळांत फक्त गरिबांची मुलेच शिकतात म्हणून यास गरिबांची शाळा असे सुध्दा संबोधले जाते. ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेशिवाय दुसरा पर्याय देखील नसतो. काही श्रीमंत किंवा पैसेवाले मंडळी आपल्या पैशाच्या बळावर शेजारच्या इंग्रजी शाळेत आपल्या मुलांना पाठवितात. वास्तविक पाहता सरकारी शाळा एवढ्या वाईट नव्हते किंवा नाहीत, सध्या वर्ग एक किंवा दोन पदावर काम करणा-या अधिका-यांचे प्राथमिक शिक्षण कोठून पूर्ण झाले ? या प्रश्नांच्या उत्तरांतून कळेल की, ते सर्व जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले आढळून येतील.
पूर्वीच्या शाळेचा इतिहास पाहता सध्याच्या सरकारी शाळा त्या मानाने खूप चांगल्या आहेत. खडू - फळा मोहिम आणि सर्व शिक्षा अभियानामूळे पडक्या घरात, ग्रामपंचायतीत किंवा झाडाखाली भरणा-या शाळा स्वत:च्या इमारतीत भरू लागल्या आज गावोगावी सर्व सोयी सुविधायुक्त शाळा आहेत. शिक्षकांना ये-जा करण्यासाठी रस्ते चांगले झाले आहेत. त्यास्तव त्या गावात त्यांना राहण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच स्वत:कडे वाहन असल्यामुळे तर ये-जा करण्याचा प्रश्नच मिटला. आज शाळेवर अध्यापन करण्यासाठी येत असलेला शिक्षक हा स्वत: हुशार असल्यामूळे स्वत:चे प्रतिबिंब विद्यार्थ्यांत पाहणार, यात आश्चर्य ते काय ? याच विचार प्रक्रियेतून आज राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकतंय असे म्हणणे चूकीचे अन अतिशयोक्तीचे ठरणार नाही. अशीच एक ' लखलखणारी शाळा ' म्हणजे पुणे-लातूर हायवे वरील लातूर तालुक्यात करकट्टा गावापासून पाच किमी. अंतरावर असलेली माटेफळ येथे कार्यरत लेखिका आणि प्राथमिक पदवीधर उपक्रमशील शिक्षिका अनिता जावळे यांनी स्वतः च्या कार्यकर्तृत्वाने आणि सर्वाना सोबत घेऊन या जिल्हा परिषद शाळेचा संपूर्ण कायापालट कसा झाला याचा इतिहास सांगणारे हे पुस्तक लातूरच्या अरुणा प्रकाशनद्वारे विद्यार्थी दिनी प्रकाशित केले आहे. ज्यांनी हे कार्य करण्यास प्रोत्साहन दिले आणि लेखिकेच्या मनात ज्योत पेटविली त्या पंचायत समिती लातूरच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी पुस्तकाला प्रस्तावना देऊन सर्वाना दिव्याचा प्रकाश दिला आहे. शिक्षक मुलांना शिकवितात म्हणजेच काय काय करतात हे ह्या पुस्तकात सांगितले असल्याचा त्यांचा उल्लेख सर्व शिक्षकांसाठी नक्कीच प्रेरीत करेल. कदाचित लेखिकेच्या संपर्कात मा. तृप्ती अंधारे मॅडम आल्या नसत्या तर लेखिका पुस्तकाच्या रुपात बाहेर येऊ शकले असते किंवा नाही याबाबत मनात शंका निर्माण होते. म्हणजेच पुस्तकाच्या निर्मिती मागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब चासकर यांनी या पुस्तकाला शुभेच्छा देताना सरकारी शाळेतील प्रयोगांचे आजवर नीटसे डॉक्यूमेंटेशन झाले नाही ती व्ह्ययला पाहिजे अशी खंत व्यक्त केली. जे की या पुस्तकांच्या निमित्ताने भविष्यात पुढे येऊ शकेल. लेखिकेने पुस्तकात एकूण तीन प्रकरण दिले ज्यातून लेखिका शाळेवर येण्यापूर्वी काय परिस्थिती होती, शाळेत लोकसहभाग कसा मिळविला आणि शाळेत उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी शाळेत कसे रमले असे थोडक्यात पण मार्मिक शब्दात मांडणी केली आहे. प्रत्येक शिक्षक नव्याने जेंव्हा शाळेवर रुजू होतो त्यावेळ च्या आठवणी नेहमी स्मरणात राहतात. तशीच काही आठवण पुस्तक वाचताना प्रत्येक शिक्षकांस होते.
राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार साहेब आणि विभागाचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर साहेब यांनी राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांना दिलेल्या प्रोत्साहनामूळेच आज महाराष्ट्रात डिजिटल शाळा आणि लोकसहभाग याचे राज्यात सर्वत्र डिजिटल शाळांचे वारे वाहत आहेत. संगणक युगाच्या काळात आज प्रत्येकांच्या घरी मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकाचा वापर चालू झाला आहे. घरात ही वस्तू असल्यामूळे त्याचा वापर शालेय मुले सुध्दा करू लागली. जमाने के साथ चलो प्रथेनूसार येथील शिक्षक मंडळींनी सुध्दा प्रवाहात सामिल होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेत. त्यानुसार ‘डिजिटल शाळा’ ही संकल्पना पुढे आली. त्यासाठी लागणारा लाख-दिड लाख रूपयांपर्यंतचा निधी सरकार ऐवजी शिक्षक, गावकरी, तरुण मंडळ, ग्रामपंचायत याच्या लोकसहभागातून त्यांनी कसा जमा केला याचे अनुभव वाचन करणे खरोखरच प्रशंसनीय आहेत.
ज्ञानरचनावाद युक्त शाळा असेल तर प्रत्येक मूल शिकते. घरी राहणाऱ्या इमरान ला शाळेत कसे रममान करण्यात आले ? वडिलांच्या मृत्यूनंतर ही फिजा शाळेत कशी नियमित येऊ लागली ? मतिमंद विशाल शाळेत कसे शिकू लागला ? लेकरांच्या भावविश्वात शिक्षक सहभागी झाला तर काय चमत्कार होतो ते या पुस्तकात नक्कीच वाचायला मिळेल. लेखक मी होणार या सारख्या उपक्रमातून याच शाळेतील इयत्ता सातव्या वर्गात शिकणारा संकेत चव्हाणच्या डोक्यातून गोट्या नावाची कथा बाहेर पडते आणि पुस्तक रूपाने वाचकासमोर ठेवली जाते. यात लेखिकेचे अपार मेहनतीतून मिळालेले खुप मोठे यश दडलेले आहे.
इंग्रजी शाळेला लाजवेल अश्या सरकारी शाळा पहायला मिळतात. पूर्वीसारखा शिक्षक आज नक्कीच नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर मोबाईल, टॅब, लेपटॉप आणि संगणकाचा वापर करीत मुलांना गुणवंत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गरज आहे लोकांनी या सरकारी शाळाकडे चांगल्या दृष्टीने पाहण्याची. सरकारी शाळेतील शिक्षकावर विश्वास ठेवून, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची, नक्कीच ते चांगले करून दाखवू शकतात. बहुतांश गावात लोकांची मदत शाळेला मिळत नाही, शाळेला भरपूर निधी येतो तेंव्हा या शाळेला आम्ही का मदत करायची ? अशी विचार प्रणाली गावातील लोकांची असते म्हणून त्या गावाची शाळा नावारूपास येत नाही. शीतावरून भाताची परीक्षा न करता आपल्या गावातील शाळांचे भविष्य आपणच घडवावे. तालुक्यात, जिल्हयात माटेफळ सारख्या अनेक शाळा आहेत ज्याचा कायापालट शिक्षकांनी आणि गावातील लोकांनी मिळून केला आहे. आपली एक रुपयांची मदत देखील शाळेला लाखमोलाचे काम करून जाते. गावाला शाळेचा आधार आणि शाळेला गावाचा आधार, शाळा आपली आहे ही संकल्पना तयार होण्यासाठी शाळेला थोडा वेळ द्या, शिक्षकाची समस्या समजून घ्या, त्यांना प्रोत्साहित करा, त्यांना गावकरी मंडळीच्या आधाराची खरी गरज असते. या सर्व बाबीची जाणीव लेखिका अनिता जावळे-वाघमारे यांनी ' लखलखणारी शाळा ' या पुस्तकातून करून दिली आहे. प्रत्येक शिक्षकां नी हे पुस्तक वाचायलाच हवे एवढे च नाही तर एक वेळ या शाळेला प्रत्यक्षात भेट ही देण्याचा प्रयत्न करावा. लेखिका अनिता जावळे-वाघमारे यांच्याशी 9545050292 या मोबाईल क्रमांकावर आणि anitajawale1977@gmail.com या ई मेल आय डी वर तसेच anitajavle.blogspot.com या ब्लॉग वर संपर्क करता येईल. माटेफळ शाळेच्या सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा

- नागोराव सा. येवतीकर,
प्राथमिक शिक्षक
जि. प. प्रा. शाळा चिरली
ता. बिलोली जि. नांदेड
9423625769

पुस्तक परिचय - सोनेरी भोपळा (Soneri Bhopala )

*सोनेरी भोपळ्यात चिंटुचा सैर*
पुण्याच्या अरिहंत पब्लिकेशन प्रकाशित आणि 
व्यंकटेश काटकर लिखित कादंबरी सोनेरी भोपळा हाती घेतल्याबरोबर संपल्याशिवाय खाली ठेवावे वाटत नाही. पुस्तकाचे नाव वाचल्यापासून या पुस्तकात काय दडलंय याविषयी मनात कुतूहल निर्माण होते. पुस्तकाचा रंग सुद्धा सोनेरी वाटतो असा आहे आणि त्यावरील एका परीचे चित्र ती मुलाला काहीतरी बोलत आहे आणि बाजूला सोनेरी रंगातील भोपळा विस्मयपणे दोघांना पाहत आहे. आजूबाजूला हिरवेगार जंगल आहे, यातून वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्यात कोल्हापूरचे मुखपृष्ठकार राज बकरे नक्की यशस्वी होतील. म्हणून वाचक लगेच वाचण्यात सुरुवात करेल यात शंका नाही.
           पुस्तक उत्सुकतेने वाचनास सुरु केले कि पहिल्या पानापासून वाचक वर्ग वाचण्यात गुंग होतो. वाचतांना सर्व सोनेरी वाचून डोळे सुद्धा सोनेरीमय होऊन जाते. जसे सूर्याचा सोनेरी रंगाचा प्रकाश, सोनेरी बेट, सोनेरी रंगाची सोनेरी झोपडी, म्हातारीचा रंग सोनेरी, केस सोनेरी लांबसडक, अंगात सोनेरी रंगाची चोळी, दोन्ही हातांना सोनेरी चार-चार बांगडया, सोनेरी रंगाची वाकडी काठी, सोनेरी विळा, असे सर्व सोनेरी-सोनेरी वाचन करतांना सोनेरी भोपळा कसा येतो ?  आणि केव्हा येतो ? याची उत्सुकता वाचकांना लागून राहते अन वाचन ही चालूच राहते.
किशोर वयातील मुलांना त्यांच्या स्वभावानुसार काल्पनिक जगाविषयी प्रचंड आकर्षण असते. कल्पना विश्वात वावरतांना ती स्वप्ने पूर्ण करता येतील काय? याचाही विचार करीत असतात. अपेक्षेप्रमाणे त्या सोनेरी बेटावर तीन परी उतरतात आणि त्यांचे नाव अर्थातच सोनपरीपासून सुरु होते, तिला संपूर्ण कथानक मध्ये मुख्य भूमिकेत ठेवण्यात आले. यावरून लेखकांना एक संदेश द्यायचा असेल कदाचित आपले विचार चांगले असतील तर आपल्या मतांना व विचारांना किंमत मिळते अन्यथा नाही. कहाणी पुढे-पुढे चालत राहते. परी या सोनेरी बेटावर राहू इच्छितात मात्र सोना आजीला त्यांना तेथून पाठवून द्यायचे असते. मग तेथे या पुस्तकाचा मुख्य नायक 'सोनेरी भोपळा' प्रवेश करतो. तेथील गमती-जमती खरंच वाचनीय आहेत. "अय्या कित्ती मोठ्ठा हा भोपळा...!" असे त्या परीचे बोल वाचन करीत असतांना अगदी लहानपणी ऐकलेली 'एवढा मोठा भोपळा' ही  कवितेतील कथा सहज आठवून जाते. अगदी त्याचबरोबर या कथानकमध्ये सुध्दा असे काहीतरी आहे असे वाटायला लागते. सोना आजी मंतर टाकून परींना भोपळ्यात बसविते आणि त्यांचा प्रवास सुरु होतो तसा वाचकांच्या भुवया उंचावल्या जातात.
परी भोपळ्यात बसून आकाशातून विहार करताना पर्यावरणाचे सुंदर वर्णन करण्यात आले, असे वाटते की आपण जंगलातून फिरत आहोत. कथानकाच्या मध्यात चिंटुचा प्रवेश होतो आणि कथा अजून मजेशीर वळण घेते. शाळा आणि तेथील परिसर, शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांचे नाते हे वर्णन वाचनीय आहे. लेखक स्वत: शिक्षक असल्यामुळे या क्षेत्रातील बरीच बारीकसारीक गोष्टी विचारात घेतले आहेत. लहान मुलांना एखादी अनपेक्षित वस्तू भेटल्यावर मुलांना कसे वाटते ? याचे उत्तम चित्रण करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. शाळेची वेळ संपल्यावर मुले जर घरी आले नाहीत तर प्रत्येक आई-बाबाला आपल्या लेकरांची काळजी वाटते. ती चिंटू विषयी त्यांच्या आई-बाबांची काळजी वाचन करताना प्रसंग मनाला नक्की भावतो, नव्हे, डोळ्यातून अश्रू गळतात. चिंटु आणि परी यांची भेट होणे आणि ते संपूर्ण धरती पाहण्यासाठी भोपळ्यात बसून भ्रमण करणे खरोखरच वाचनीय आहे. चिंटू आपल्या घरी काही ही न सांगता परी सोबत जातो तेंव्हा त्यांच्या आई-बाबांची काय अवस्था होते ? शाळेतील मुख्याध्यापक कसे चिंताग्रस्त होतात ? वर्गशिक्षक स्वतःला कसे कोसतात ? चिंटु चे मित्र-मैत्रिणी चिंटू शिवाय कश्याप्रकारे राहतात ? चिंटू परत घरी येतो काय ? घरी आल्यावर काय काय घडते ? या सर्व प्रश्नांची उकल होण्यासाठी सोनेरी भोपळा हे पुस्तक वाचावेच लागेल. कथानक अगदी सुंदर प्रकारे सरकवत नेले आहे. पुढे काय ? याची उत्सुकता मनाला लागून राहते आणि पुस्तक कधी संपले हेच कळत नाही. यात आलेले गीत 
' जंतर मंतर तू रे वाटोळा 
असा तू आमचा सोनेरी भोपळा
छान छान दिसतोस सोन्याचा गोळा
वाटतोस आम्हाला भोळा रे भोळा
आमच्यापुढे तू छोटाच छोटा
कामा मध्ये तर दिसतोस मोठा
नको करूस आत्ता फाजिल लाड
आम्हाला घेऊन लांब सैर काढ
म्हणू नकोस तू इथेच थांब 
घेऊन जा आम्हाला लांबच लांब
खूपच मजेशीर आहे. हे गीत वाचत असताना चल रे भोपळ्या टुणुक टुणुक या गीताची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. या पुस्तकात निसर्गातील विविध रंगाच्या पक्षी, प्राणी, आणि इतर बरेच काही अनाकलनीय गोष्टी भेटतात. 
कथानकाच्या शेवटी सोनपरीने चिंटूला दिलेला उपदेश किशोरवयीन मुलांसाठी फारच उदबोधक आहे. सदैव खरे बोल, चांगले काम कर, दीन दुबळ्याची सेवा कर, आई-वडिलांची सेवा कर, मित्र-मैत्रिणीला अंतर देऊ नकोस, एवढं केलस तर परमेश्वर तुला काही कमी करणार नाही. असा हा संदेश किशोर मुलांसाठी दिलेला आहे, ज्याची आज खरीच आवश्यकता आहे. सोनेरी भोपळा पुस्तक खरोखरच सोन्यासारखे आहे. विशेष म्हणजे या कादंबरीला पाठराखण जेष्ठ साहित्यिक आदरणीय देवीदास फुलारी सरांनी केल्यामुळे कादंबरीला पूर्ण रुप प्राप्त झाले. प्रत्येकानी एक वेळ जरूर वाचावे अशी कथानक एखाद्या टीव्हीवरील मालिके प्रमाणे बहरत जाते. या पुस्तकात एकूण पृष्ठे असून त्याची किंमत 125 रू आहे. त्यांच्या लेखनीतून असेच उत्तमोत्तम साहित्य तयार होवो हीच शुभकामना आणि हार्दीक शुभेच्छा

पुस्तक परिचय -
                  नागोराव सा. येवतीकर
                    स्तंभलेखक
                    9423625769

पुस्तक परिचय - पाऊलवाट ( Paulwat by Digambar Kadam )

*पाऊलवाट : शिक्षण क्षेत्रातील एक दिशादर्शक*
    पुस्तक परिचय – दिगंबर गं.कदम
दिसामाजी काहीतरी लिहित जावे | 
प्रसंगी अखंडित वाचित जावे ।। 
असे संत रामदासांनी म्हटले आहे. ह्या ओळी मला वाटते शिक्षकांना उद्देशून, अखंडपणे वाचन करणाऱ्या वाचक प्रेमीसाठी म्हटले असावे. शिक्षकांनी तर आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात नेहमीच वाचन करावे असे वाटते . कारण आजची पिढी खूप पुढे गेलेली आहे, अशा परिस्थितीत शिक्षकांनी नेहमी अपडेट असावे आउटडेट असता कामा नये. आजचा विद्यार्थी संगणक जाणतो आहे. त्यातून त्याला हवे असणारे ज्ञान प्राप्त होत आहे. शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या पुढचे ज्ञान हवे म्हणून शिक्षकांनी नेहमीच वाचनाच्या अगदी जवळ गेले पाहिजे. असा शिक्षकच विद्यार्थ्यांचा आवडीचा गुरुजी होऊ शकतो. त्याच्याजवळ माहितीचे भांडार असणे ही काळाची गरज झाली आहे. यातलेच एक उत्तम, सुसंस्कारित गुरुजी म्हणून ज्याचे नाव घेतले जाते ते म्हणजे धर्माबाद येथील प्राथमिक शिक्षक नागोराव सा. येवतीकर. शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलाचे वारंवार स्वरूप जाणून घेऊन ते विद्यार्थ्यांच्या अंगी कसे बाणवता येतील याचे प्रात्यक्षिक ते नेहमीच करत असतात. त्यांच्या *पाउलवाट* या पुस्तकातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना एक नवी दिशा मिळते असे एक सर्वांग सुंदर पुस्तक त्यांनी लिहून शैक्षणिक क्षेत्रात एक प्रकारची क्रांतीच केली आहे ,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
    शिक्षण क्षेत्रात जी धडपडणारी शिक्षक आहेत, त्यात नागोराव येवतीकर हे एक. पाऊलवाट हे वैचारिक दर्जाचे पुस्तक प्रत्येक शिक्षकाने वाचावे व संग्रही  ठेवावे असे आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर शिक्षकास आपणही काही तरी करावे असे वाटते. शिक्षक हा नेहमी चौफेर दृष्टी ठेवणारा असावा असे लेखकाना वाटते. अगोदर स्वतः माहिती करून घ्यावी आणि नंतर ते आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहचण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. प्रांरभीच सांगतात,  
जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे | शहाणे करुनी सोडावे सकळ जन |
  या पुस्तकात त्यांनी तीन टप्पे पाडले आहेत. त्यातील पहिला टप्पा म्हणजे आपले दैवत विद्यार्थी. विद्यार्थ्यांनी बचत कशी करावी. यात फक्त पैशाचीच बचत एवढा संकुचित अर्थ न ठेवता विजेची बचत, पाण्याची बचत, कागदाची बचत, वेळेची बचत हे अतिशय साध्या सोप्या शब्दात त्यांनी वर्णन केले आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त असावी. शिस्तीत केलेले काम चांगले होते. शिस्त ही असलीच पाहिजे. सत्य बोला, बोलणे महत्त्वाचे नाही तर कृतीला ही महत्त्व आहे . कृतीशिवाय उक्ती ही कामाची नाही दुसऱ्यावर विसंबून राहू नये, राग धरू नये. मित्र सावधानतेने निवडावेत. मित्रावरून आपली परीक्षा होते. जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे. यावर देखील नागोराव येवतीकरानी आपली मते मांडली आहेत. अंधश्रद्धा निर्मुलन यावर भाष्य करताना पाप आणि पुण्य काय असते याचे विवेचन त्यांनी पाऊलवाट मध्ये केले आहे . लोभामुळे माणसाचे किती अधःपतन होते आहे ते ही गमावून बसतो .म्हणून लोभ धरू नये,  तसा क्रोधाला जवळ येऊ देऊ नये असेही ते सांगतात. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी किडा होऊ नये .मैदानी खेळ खेळावेत. शरीर सुदृढ असेल तर मन सुदृढ असते. मग मस्तिष्क बरोबर चालते .जे जे वाचले, पाहिले, ते ते कायम लक्षात राहते .म्हणून शरीराची काळजी घ्या असेही ते सांगतात. विद्यार्थ्यानी नेहमी सकारात्मक विचार करावा नकार हा शब्द त्यांच्या जवळ येऊच नये. कारण संत तुकाराम महाराज सांगतात
असाध्य ते साध्य | करिता सायास कारण अभ्यास | तुका म्हणे || 
अलीकडे मुले आई-वडिलांना विसरायला लागलीत. त्यांचे प्रती, ज्येष्ठाप्रती आदराची भावना ठेवा. कृतज्ञतेची भावना ठेवा. कृतज्ञतेची भावना ठेवून उतराई होण्याचा प्रयत्न करावा हे नीतिशास्त्र  विद्यार्थ्यांनी आत्मसात केले तर वृध्दाश्रम ओस पडतील. प्रत्येक विद्यार्थ्यांना आजी आजोबा भेटतात. त्यांच्याकडून गोष्टी , भजने , गीते  शिकतील . आजीच्या हातच्या भाकऱ्या किती गोड लागतात. ते खाल्ल्याशिवाय कळत नाहीत, म्हणून आई-वडील हीच आपली खरी दौलत आहे, हे लक्षात ठेवण्याचा संदेश यातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. माणसे जोडणे महत्त्वाचे. तोडणे वाईट. एकदा मन वैरी झाले कि कितीही जरी जुळवण्याचा प्रयत्न केला तरी वेल्डिंग ही कायम राहतेच. म्हणून एकजीवपणा आपल्या अंगी ठेवावा. जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे. गरीब असो, श्रीमंत असो, दलित असो कि सवर्ण, त्यांची सेवा करा .खरा ईश्वर त्यांचातच दडलेला आहे. वाचनाची गोडी ही जीवन जगण्यातली गोडी आणते. म्हणून विद्यार्थ्यानी वाचनाचे महत्त्वाचे जाणावे असे वाचाल तर वाचाल या वैचारिक लेखात त्यांनी मोठ्या मार्मिकपणे विवेचन केले आहे.
पाऊलवाटाचा दुसरा टप्पा आहे पालकासाठी . पालकांनी विद्यार्थ्याचे मित्र बनावे. वाढदिवसाला मेणबत्त्या विझवण्यापेक्षा वृक्षलागवड करून वाढदिवस साजरा केल्यास किती तरी वृक्ष तयार होतील. विद्यार्थ्यांच्या अंगी संस्कार असणे गरजेचे आहे. संस्काराच्या बाबतीत कुठेही तडजोड करू नका. याचेही विवेचन त्यांनी आपल्या पुस्तकात केले आहे. सुख आणि दु:ख एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत दोन्ही काळी माणसाने खंबीर असावे. सुखात आणि दु:खात आनंदी असाल तर जीवन जगण्याची मजा येते. आहारात जेवढे महत्त्व मिठाला आहे, तेवढेच महत्त्व दु:खाला आहे. दु:ख आहे म्हणून तर सुखाची किंमत कळते. आजचा विद्यार्थी बौद्धिक दृष्ट्या खूपच पुढे गेलेला आहे. तेंव्हा त्यांच्या बुध्दीचातुर्याकडे पालकाने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. जे जे होईत ते ते पहावे ही वृत्ती माणसाला अधोगतीकडे नेणारी आहे. एखादी बाब आपल्या वाट्याला येऊ नये म्हणून तिची काळजी घ्यावी. माणूस जन्माला येतो पण माणुसकी जन्माला येत नाही. ती निर्माण करावी लागते. माणुसकी हाच खरा धर्म आहे त्याला विसरता कामा नये असे ही लेखक पालकाना या ग्रंथातुन सांगतात.
पाऊलवाट पुस्तकातील तिसरा टप्पा आहे शिक्षकांसाठी. शिक्षक हा खऱ्या अर्थाने शिल्पकार आहे. त्याला कितीही कष्ट पडले तरी हरकत नाही. शिल्पकाराच्या भूमिकेला बाधा येईल असे कुठलेही कृत्य त्याच्याकडून होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मराठीचा विकास शासन करणार नाही. मराठी भाषेचा विकास तमाम मराठी शिकवणारे शिक्षकच करतील यावर माझा विश्वास आहे, असे लेखक आपल्या *मराठीचा विकास आपल्याच हाती* या लेखात अगदी तळमळीने सांगतात. शिक्षक जेव्हा फळ्यावर लिहितो. तेव्हा विद्यार्थ्याला ते चांगले वाचता आले पाहिजे. बिनचूक, सुंदर, वळणदार अक्षर, हा शिक्षकाचा दागिना आहे. आपल्या विद्यार्थ्यांना साने गुरुजीचे मातृप्रेम द्या. मग पहा शाळेविषयी विद्यार्थांना लळा लागेल. गुरुजीच्या वागण्यातून, बोलण्यातून विद्यार्थ्यांवर नकळत संस्कार घडत असतात. म्हणून शिक्षकाने समाजात शिक्षक, लोकशिक्षक, प्रवचनकार, शिल्पकार ही भूमिका बजावायची आहे. या विषयीची यात मते मांडली आहेत.
    लेखकानी सहज, सोपी, ओघवती भाषा, म्हणी, वाक्प्रचार, उदाहरणे देवून पाऊलवाटला दिशा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हे पुस्तक विद्यार्थी, पालक, शिक्षकासाठी, शिक्षणप्रेमीसाठी, वाचनालयासाठी संग्रही ठेवावे असेच आहे. पुस्तकाची बांधणी व मांडणी अमरावतीचे प्रकाशक शशी प्रिंटर्स रमेश एन. बाहे यांनी उत्तम केली आहे. मुखपृष्ठ उत्तम आणि दिशादर्शक आहे. नागोराव येवतीकरांच्या लेखन प्रवासाला हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून असेच वैचारिक पुस्तके विचार करायला भाग पडतील, अशी आशा.

दिगंबर गं. कदम 
संवेदना, नांदेड हौसिंग सोसायटी 
विजयनगर, नांदेड 
मो. ९४२२८७०३८१

Friday 22 March 2024

पुस्तक परिचय - फुंकर ( Funkar )

मानवी मनातील घालमेल व्यक्त करणारा - फुंकर कवितासंग्रह
        
                मोबाईल स्मार्ट फोन आल्यामुळे आजकाल पुस्तकं वाचणाऱ्यांची संख्या खूप कमी झाली अशी ओरड सध्या ऐकायला येत आहे मात्र पुस्तकं लिहिणाऱ्यांची संख्या या स्मार्टफोनमुळे किंचित का होईना वाढू लागलेली आहे, असे कोणी म्हणताना दिसत नाहीत. पण हे सत्य आहे. स्मार्ट फोन आणि इंटरनेटच्या वापरामुळे वाचक संख्या वाढली. तळहातावरील छोट्याशा मोबाईलवर एका क्लीक मध्ये हवी ती माहिती हवे तेव्हा मिळू लागले त्यामुळे वाचकांची भूक वाढीस लागली. तसेच साहित्याला ताबडतोब प्रसिद्धी मिळत असल्याने लिहिणाऱ्यांची संख्या देखील वाढली. आज समाजात फक्त साहित्यिक क्षेत्राला संपुर्णपणे वाहून घेतलेले अनेक व्हाट्सअप्प समूह आढळून येत आहेत, ज्यातून गोविंद कवळे सारखे नवकवी जन्म घेतांना दिसत आहेत. ही तशी साहित्य क्षेत्रासाठी आनंदाची बाब आहे.
          नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोदावरीच्या काठावर वसलेल्या अगदी छोट्याशा इळेगाव गावातील शेतकरी कुटुंबात कवी गोविंद कवळे यांचा जन्म झाला. वडिलांच्या अकाली निधनामुळे कवीवर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली ज्यामुळे आपले शिक्षण त्यांना अर्धवट सोडावे लागले. संसाराचा रहाटगाडे चालविण्यासाठी काहीतरी काम करणे भागच होते. ते काम करता करता त्यांनी सामाजिक चळवळीत सहभाग घेतला, त्यात अनेक चांगल्या सद्विचारी लोकांचा सहवास घडला ज्यातून कविमनाचा माणूस " फुंकर " च्या माध्यमातून समाजात प्रतिबिंबित झाला. उमरी तालुक्यातील प्रसिद्ध साहित्यिक कै. ग. पि. मनूरकर यांच्या साहित्याने ते पूर्वीच प्रभावित झाले होते आणि त्यांच्यामुळेच लिहिण्याची उर्मी मिळाली असे कवी स्वतः म्हणतात. कवीला कसल्याही प्रकारचा साहित्यिक वारसा नसतांनाही त्यांनी साहित्यिक क्षेत्रात घेतलेली गरुडझेप लक्षवेधी आहे. त्यांच्या अनेक कविता महाराष्ट्रातील अनेक नामवंत दैनिकातून यापूर्वी प्रसिद्ध झाले आहेत. फुंकर हा त्यांचा पहिलावहिला कवितासंग्रह आहे.
       कवी स्वतः शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्यांचे कष्ट, दुःख, हाल-अपेष्टा, निसर्गाची अवकृपा आणि सावकाराकडून होणारी फसवणूक हे सारे त्यांनी याची देही याची डोळा प्रत्यक्ष पाहिले आहे म्हणून फुंकर मधील शेतकऱ्यांविषयीच्या प्रत्येक कवितेत त्याविषयीची तळमळ दिसून येते. म्हणूनच कष्ट करणारा बाप या कवितेत कवी म्हणतो,


शेतात पेरणी करतांना, तोचतो पायात काटा
कोणा सांगेल हे दुःख करतो सहन एकटा
                           

            शेतकरी किती जरी दुःखात राहिला किंवा स्वतः ला कितीही कष्ट सहन करावे लागले तरी दारावर आलेल्या कोणालाही तो माघारी फिरवत नाही, तो इतरांना मदत करायला वा दान करायला विसरत नाही म्हणून कवी शिवार फुलला या कवितेतून म्हणतो,

रास केला धान्याची, लाव हात पायलीला
दे चार चार पसा, आलेल्या आपुल्या दाराला

                                                 शिक्षणाचा गंध सुटला होता, संसाराची जबाबदारी वाढली होती. त्यातही स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत काम करतांना अनेक सद्विचारी लोकांचा सहवास लाभला. श्रीपाद राऊतवाड, नागोराव डोंगरे, गुरू नागोराव तिप्पलवाड, कवी कट्टाचे संयोजक अशोक कुबडे यांच्या ओळखी झाल्यामुळे त्यांच्या लेखणीला खरी गती मिळाली. म्हणूनच कवी जगण्याचा मागमूस मध्ये आपली कृतज्ञता व्यक्त करतांना म्हणतो की,
काय कमावलो काय गमावलो, कसला आला हिशोब
भेटत गेली गुणी माणसे, उजळून आलं नशीब
                                      

               भारत देशाला घडविण्यात संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, कर्मवीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे अनेक थोर, महात्मा, शूरवीर व शैक्षणिक विचारवंतांनी आपले जीवन पणास लावले. त्या सर्व महापुरुषांना काव्यरूपाने कवी वंदन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त मागासवर्गीय लोकांसाठीच नाही तर सर्वांसाठी संविधान लिहून खरे स्वातंत्र्य दिले आहे  ही भावना वंदन तुम्हांस या कवितेतून व्यक्त करताना कवी म्हणतो,
संविधानाचे निर्माते तुम्ही, दिला आम्हा प्रकाश
सर्वावरी माया तुमची, केले मोकळे आकाश
                                     

            स्वच्छतेचे प्रसारक आणि समाजातील अंधश्रद्धा काढून टाकण्यासाठी गावोगावी फिरून समाज प्रबोधन करणारे संत गाडगेबाबा यांच्याविषयी कवी म्हणतो,
हातात असायचे झाडू, मुखात असायचे कीर्तन
त्यातूनच करायचे, समाजप्रबोधन
                                              

            सामाजिक चळवळीत काम करतांना कुटुंबातील सदस्यांना विसरून चालणार नाही. शेवटी त्यांची साथ असेल तरच जीवनातील आनंद दीर्घकाळ टिकून राहतो आणि मानसिक समाधानाचे सुख मिळते. म्हणूनच कवी आपल्या पत्नीवर, लेकीवर स्वप्नातल्या प्रेयसीवर देखील रचना लिहिल्या आहेत. मानवाच्या आयुष्यातील एक सोनेरी पान म्हणजे विवाह. दोन विभिन्न मन एकत्र येण्याचा तो प्रसंग, संसार फुलविण्याचा आनंदी क्षण, तो विसरणे कदापि शक्य नाही. पण तो दिवस नेहमी लक्षात राहावं म्हणून एक कविता लिहीत असल्याची संकल्पना सांगताना लग्नाचा वाढदिवस या कवितेत कवी म्हणतो,
येत आहे लग्नाचा वाढदिवस, उत्साहाने मन भरत आहे
आठवण ठेवू प्रत्येक वर्षी, म्हणून लिहितो आहे
                   या कवितासंग्रहात सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक आणि भावनिक काव्यरचनासह श्रावण, पाऊस, शेतकरी, पांडुरंग, शाळा, मैत्री, महापुरुष असे अनेक विषयाच्या कवितांचा समावेश केलेला आहे. कवीने आपल्या साध्या, सोप्या आणि इतरांना सहज समजेल अश्या भाषेत आपल्या मनातील भावना सुंदररित्या व्यक्त केल्या आहेत. ६४ पृष्ठांच्या कवितासंग्रहात एकूण ५१ रचना आहेत. प्रसिद्ध ग्रामीण कथाकार दिगंबर ग. कदम यांनी या संग्रहाची प्रस्तावना केली असून प्रसिद्ध कवी देविदास फुलारी यांनी पाठराखण केली आहे. या कवितासंग्रहाचे सुंदर असे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी केले तर देगलूरच्या पांडुरंग पुठ्ठेवाड यांच्या गणगोत प्रकाशन संस्थेने हे प्रकाशित केले आहे. या कवितासंग्रहाचे मूल्य १४० ₹ असे आहे.
             एकूणच मानवी मनातील घालमेल सांगणारी व बळीराजाच्या जीवनातील दुःख व्यक्त करणारी ह्या फुंकर कवितासंग्रहाचे साहित्यिक नक्की स्वागत करतील अशी अपेक्षा आहे. तसेच गोविंद कवळे यांच्या पुढील काव्यलेखनासाठी मनस्वी शुभेच्छा ........!

पुस्तक परिचय :-
नासा येवतीकर, भाषा विषय शिक्षक,
कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

पुस्तक परिचय - नजराणा ( Najarana )

विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट गीतांचा " नजराणा " काव्यसंग्रह

अक्षरक्रांती प्रकाशन मुंबई द्वारा प्रकाशित आणि वृषाली सुरेश खाडये यांच्या अथक परिश्रमातून संपादित झालेलं " नजराणा " प्रातिनिधिक काव्यसंग्रह शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांना देखील आनंद देणारा असा आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत आकर्षक असून पुस्तक वाचताना मुलं कसे रममान होतात ? याची प्रचिती प्रत्यक्षात हे पुस्तक वाचतांना मिळेल. एकापेक्षा एक सुंदर व सुरस अश्या कविता यात समाविष्ट आहेत जे वाचताना वाचक नक्कीच दंग होतील. राज्यातील विविध जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापक, कवी आणि कवयित्री यांनी " शाळा व विद्यार्थी " केंद्रबिंदू मानून कविता लिहिल्या आहेत आणि संपादिका वृषाली सुरेश खाडये यांनी उत्तमरित्या संकलन करून त्यावर संपादन करण्याचे काम केले आहे. पर्यावरण, निसर्ग, शाळा, शिक्षक, तंत्रज्ञान, अभंग, देश या विषयावर बालकवितांचा समावेश केलेला आहे. यातील सर्वच कविता वाचनीय, काही लयबद्ध तर काही बडबड गाण्याच्या स्वरूपात आहे. त्यापैकीच काही विशेष म्हणजे दिलीप यशवंत माने आपल्या श्रावण कवितेतून म्हणतात, 

ओथंबून नभ आले
अवनीच्या रे भेटीला
श्रावणात असा सारा
घननिळा बरसला

श्रावण महिन्यात आकाशात काळे काळे ढग जमा होतात आणि धरतीच्या भेटीसाठी आतुर झालेले असतात याचेच वर्णन कवी आपल्या या कवितेतून केले आहे. 
अंगाईगीत सहसा आईच्या मुखातून ऐकायला मिळते मात्र प्रा. प्रकाश पुना चऱ्हाटे यांनी मुलाला झोपविण्यासाठी वडिलांनी म्हणजे बाबांनी गायलेलं अंगाई गीत लिहिले. ते म्हणतात

बैल झोपले वाड्यात, खोप्यामध्ये चिमणदादा
परसातील बागेमध्ये, झोपला रे गुलाब-चाफा
अंगावर घे पांघरूण, वाट आता नको पाहू

शाळेतील विद्यार्थ्यांना आवडणारे प्रतिभा बोबे यांचे अंक गाणे, प्रभाकर शिंदे यांचे बे एके बे हे पाढ्यावरील गाणे लयबद्ध आहेत. ती कविता वाचतांना विद्यार्थ्यांना खूप आनंद मिळणार आहे. संध्याराणी कोल्हे यांच्या पाऊस या कवितेतून कवयित्री म्हणतात की, 

पावसाचे गाणे भिजत भिजत गाऊ
वृक्षासव आपणही आनंदाने न्हाऊ

लहान मुलांना पावसात भिजायला खूप आवडते. त्याच बाबीचा संदर्भ लक्षात घेऊन वृक्षाचे महत्व ही विद्यार्थ्यांना सांगण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. 

पाणी हेच आपुले जीवन
काटकसरीने वापरू हे धन
असा छानसा संदेश सौ. रोहिणी राजेंद्र गायकवाड हे पर्यावरण या कवितेतून दिला आहे. 
साने गुरुजी यांची खरा तो एकचि धर्म ही प्रार्थना महाराष्ट्रातील संपूर्ण शाळेतून गायले जाते. त्याच काव्याचा आधार घेऊन सौ. स्नेहल अमित ओंबळे यांनी खरा तो एकचि धर्म ह्या कवितेतून ते म्हणतात, 

कुणा ना व्यर्थ तोडावे
कुणा ना व्यर्थ मोडावे
समस्ता जीव गणावे
निसर्गा मित्र मानावे

कोणतेही झाड विनाकारण तोडू नये, मोडू नये, प्रत्येक सजीवात जीव असतो हे जाणून घेऊन संपूर्ण निसर्गाला मित्र मानावे असा सुंदर संदेश आपल्या कवितेतून दिले आहे. तंत्रस्नेही शिक्षक, संगणक आणि देशावर आधारित कवितांचाही यात समावेश केलेला आहे. 
प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना बडबडगीते खूप आवडतात. सुनीता पांडुरंग अनभुले यांच्या माणसा जग वाचव .... सायली राणे यांची उंदीरमामा, प्रवीणा वाघमारे यांची वृक्षगीत या बालानो या रे या अश्या अनेक सुंदर बडबड गीतांच्या कविता यात आहेत. भारत देशावर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर देखील कविता येथे वाचायला मिळतात. एकापेक्षा एक अश्या सुंदर व छान छान कविता या काव्यसंग्रहात वाचकांना वाचण्यास मिळतात. 
या काव्यसंग्रहाची पाठराखण प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी केले आहे. सुरज कुदळे, संदीप सोनार, दिलीप जाने, वर्षा चोपदार आदीनी संपादकीय मंडळात काम करून काव्यसंग्रह उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या काव्यसंग्रहात एकूण 65 पृष्ठात महाराष्ट्रातील साठ कवी-कवयित्रींच्या कविता आहेत. या काव्यसंग्रहाचे स्वागतमूल्य 150 रु. आहे. प्रत्येक मराठी शाळेत संग्रही असायलाच हवे असे हे काव्यसंग्रह तयार करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक मुख्याध्यापकानी, शाळा प्रमुखांनी व जाणकार वाचकांनी हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावे त्यासाठी संपादिका वृषाली सुरेश खाडये यांच्याशी 9967001411 या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअप्पद्वारे संपर्क करून सदरील काव्यसंग्रह पोस्टाने मागविता येईल. येत्या काळात असेच अजून छान छान काव्यसंग्रह वाचण्यास मिळो हीच सदिच्छा .....!

पुस्तक परिचय - 

नासा येवतीकर, कवी तथा विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद, जि. नांदेड
9423625769

पुस्तक परिचय - अभंग समतेचे( Abhang Samteche )

विविध अंग मानवाचे, सांगे अभंग समतेचे
मानवी मनाची घालमेल सांगणारा काव्यसंग्रह
महाराष्ट्रातील संत आणि अनेक कवींनी अभंग रचना तयार करून जनप्रबोधन करण्याचे काम केले आहे. कमी शब्दांत जास्त अर्थ सांगण्याचे सामर्थ्य अभंगात आहे. अभंग रचना वाचतांना जरी सहज आणि सोपे वाटत असले तरी ती तयार करतांना खूप कठीण आहे. त्यासाठी कविजवळ दांडगी शब्दसंपत्ती असायला हवी, जे की चंद्रकांत गायकवाड यांचा अभंग समतेचे हा काव्यसंग्रह वाचतांना जाणवत राहतो. तसा त्यांचा हा पहिलावहिला काव्यसंग्रह जरी असला तरी रचना वाचतांना कुठेही तसे जाणवत नाही. मुरलेल्या कविसारखे शिर्षकाला अनुसरून अभंग लिहिले आहेत. संतांनी आपल्या अभंगातून आध्यत्मिक बाबी सांगितल्या आहेत तर चंद्रकांत गायकवाड यांनी आपल्या अभंगातून समाजात समता कशी प्रस्थापित होऊ शकेल ? याचे विचार पेरण्याचा प्रयत्न केला आहे. आज सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात जागोजागी विषमता दिसून येते. ती विषमता संपविण्यासाठी तथागत गौतम बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणे आवश्यक असल्याचे कवी आपल्या रचनेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या सर्वच रचना ह्या इतरांना विचार करण्यास भाग पाडणारे आहेत. स्त्रियांच्या समस्या, रोजीरोटी, मुलगी, माहेर, भूक दारिद्र्य, गरिबी, शेतीभाती, नातीगोती, समाजातील विसंगती यावर त्यांनी आपल्या अभंगातून विचार व्यक्त केले आहे. 
मनुष्याचा विकास फक्त शिक्षणानेच होते असे अनेकांनी सांगितले आहे. शिक्षणाने माणसाच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन प्रकाश पसरतो हे सांगताना विवेक मध्ये कवी म्हणतो

शिक्षणाचे मळे
आनंदाचे खळे
भेदू तम जाळे
विवेकाने

पुस्तकातून मिळालेले जगाचे कल्याण करते. जसे संत गाडगेबाबा माणसात देव शोधा म्हणून संदेश दिले होते तसे कवी आपल्या पुस्तक या रचनेतून म्हणतात

उद्धार नाही हो
देव दर्शनात
पहा पुस्तकात
विश्व सारे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते कारण दिवसरात्र अभ्यास करून त्यांनी देशाचे संविधान लिहिले. याच संविधानामुळे आज भारतातील लोकशाही टिकून आहे. संविधान हे सर्व प्रकारच्या समस्येवर जालीम औषध आहे हे लोकांनी जाणले पाहिजे आणि देशाला दिलेले सर्वात मोठे दान आहे असे सांगताना संविधान मधून कवी म्हणतो, 

उतारा औषध
संविधान जाण
हेची जना दान
भीमराया

भिमा-कोरेगाव येथे झालेल्या घटनेबाबत कवी खूप दुःखी होऊन सिदनाक अभंग रचनेत म्हणतो

माणसांचा गाव
उभारू नव्याने
पशूचे वागणे
नको आता

आज माणसाचे जीवन पशू पेक्षा हिंस्त्र झाले आहे. जो तो गटातटात विभागल्या जाऊन माणुसकी विसरला आहे. म्हणूनच कवीला तसे खेदाने म्हणावे लागते. 
म्हणायला गेलं तर भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्याला संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हटलं जातं. पण तोच पोशिंदा येथे कुपोषित आहे. शेतात पिकणाऱ्या मालाला कधीच भाव मिळत नाही त्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. मातीत काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था आपल्या निरंजन काव्यातून मांडताना कवी म्हणतो

काबाडाचा धनी
मातीत मरतो
तोंडच मारतो
लेकरांचे

माणूस हा समाजप्रिय आहे. समाजशिवाय तो जीवन जगणे अशक्य आहे. समाज म्हटले की नातेसंबंध येतातच. पण काही नाते एवढे स्वार्थी आणि आपमतलबी झाले आहेत की, लोकांना नाते त्या आरश्यासारखे वाटायला लागले असे नाते या काव्यातून मांडले आहे.
  
जोडू नवे नाते
गाऊ नवे गाणे
आरशाचे जिणे
माणसाचे

पोटाची खळगी भरण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, कोणतेही काम करू शकतो. राजेश खन्ना यांच्या रोटी या चित्रपटातून देखील असाच काही संदेश दिला तसाच संदेश लूट या अभंगातून कवी सांगण्याचा प्रयत्न करतो

भूक माणसाला
दावी रूप नवे
जगावे मरावे 
पुन्हा पुन्हा

महाराष्ट्राचे कुलदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. त्यांचा राज्यकारभार करण्याचा दृष्टिकोन प्रजाहितदक्ष असेच होते. पर स्त्री मातेसमान माना असा आदेश ते आपल्या मावळ्यांना देत असत. शीलवंत या काव्यातून कवी शिवराय विषयी म्हणतो 

नर नारी कधी 
भेद नाही केला 
मावळ्यांना सल्ला 
विवेकाने 

पौराणिक कथेतील स्त्रियांच्या जीवनाकडे एक कटाक्ष टाकला तर लक्षात येते की, त्यांना किती छळ सहन करावा लागला होता. पण आधुनिक काळातील स्त्रियांना आत्मनिर्भर बनविण्याचे काम राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यांनी लावलेले स्वातंत्र्याचे दीप आज घरोघरी दीपमाळ बनून सदोदित जळत आहेत. म्हणूनच कवी स्वयंदीप या शिर्षकातून खूप मार्मिक लिहिलं आहे 

सीता द्रौपदीचे
किती झाले छळ 
जिजा साऊ बळ 
आत्मभान

जीवनातील अंधकार दूर करून प्रकाशमय जीवन जगायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे अनेक विचारवंत लोकांनी सांगितले आहे. असत्य काही क्षण आपणांस आनंद देऊ शकतो पण कायमचा नाही म्हणून प्रकाश कवितेतून कवी वाचकांच्या डोक्यात प्रकाश टाकू इच्छितो.  

बारुद दारुखाने
असत्य रिकामे 
ज्ञान प्रकाशाने 
उजळले

मानवी जन्म मिळाले आहे तर त्याचा सदुपयोग करायला हवे. हा जन्म पुन्हा मिळणार नाही. स्वर्गात जाईन की नरकात या सगळ्या गोष्टी निव्वळ भूलथापा आहेत असे म्हणतात

जन्म नाही पुन्हा
हाती मानवाच्या 
स्वर्ग नरकाच्या 
भूलथापा

शिक्षणाने मानवाचा विकास होतो. गरीब-श्रीमंत, उच्च-नीच हा सारा भेद कमी होतो. समाजात मान-सन्मान मिळवायचा असेल तर ज्ञान मिळवणे आवश्यक आहे. असाच संदेश अक्षर या काव्यातून देताना म्हणतो 

अक्षर जागर
जीवनाचा साज 
सौजन्याने आज 
वागविते

जगावर कोरोनाचे संकट आल्यावर माणसाला माणुसकी शिकायला मिळाली. या लाटेत कित्येकजण आपल्या जीवाला मुकले तर काहीजण या संकटातून वाचले. जीवन हे क्षणभंगूर आहे याची प्रचिती या निमित्ताने झाली. म्हणूनच कवी फासे या अभंगातून खूप छान संदेश देतो

फुटू दे, पालवी
नवीन अंकुरी 
तू ही सदाचारी 
हो, ना जरा !

संविधानामुळे एक चांगला भारत देश घडेल असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. मात्र येथील राजकारणी मंडळींनी आपल्या स्वार्थासाठी सर्व समाजात फूट पाडली आणि आपण मात्र आलिशान मजेत जीवन जगत असल्याचे विदारक चित्र शेज या काव्यातून मांडतात

राजस्वार्थापायी
तोडला समाज 
रंगविली शेज 
आलिशान

या राजकारणी लोकांच्या भूलथापाना बळी न पडता सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागावं असा संदेश द्यायला देखील कवी विसरत नाहीत
जनहिता या काव्यातून म्हणतात की, 

प्रेमाची करूया
जीवनी कदर 
जातीचा कहर 
सोडू चला

मुलगा म्हणजे वंशाचा दिवा तर मुलगी म्हणजे परक्याची देणं असा समज पसरत गेल्याने मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. दर हजारी पुरुष मुलांच्या जन्ममागे मुलींच्या जन्माचा दर शंभरने कमी होत आहे. जे की खूपच चिंताजनक आहे. म्हणून कवी खुपच चिंताग्रस्त होऊन अवकळा काव्यातून म्हणतो 

सम नर नारी 
एकच रे खाण 
जन्म एक जाण 
प्रत्येकाचा

पुढे जाऊन लेकी जन्म मधून कवी एक छान संदेश देतो. 

वसुंधरा तुझे 
निर्मितीचे देणे 
स्त्री जन्माचे लेणे 
माय होणे

धरती आणि स्त्री ह्या दोन्ही निर्मितीचे उगमस्थान आहे. याच्यावर अन्याय करून कसे चालेल. प्रत्येक स्त्री ही आई झाल्यावर परिपूर्ण होत असते. म्हणून आई होणाऱ्या मातेच्या उदरातील बालकांना हे जग पाहू द्या. गर्भातच कळी खुडू नका असा छानसा संदेश आपल्या काव्यातून देतात. 
आपल्या संग्रहातील शेवटच्या कवितेत सर्व कवितांचा सार मांडला आहे असे वाटते. कोणालाही खरं बोललं की राग येतो. तोंडावर स्तुती करणारे माणसं प्रत्येकाला आवडत असतात आणि खरं बोलणाऱ्या माणसाशी कोणाचेही लवकर जुळत नाही. येरझारा या अभंगातून कवी म्हणतो

सत्य मांडू जाता
मस्तकात जाळ 
खोट्याचा रे काळ 
सरो बापा

एकूणच अभंग समतेचे काव्यसंग्रहातील सर्वच रचना सहज शब्दातील, सोपी रचना आणि गर्भित आशयाचे आहेत. लातूरच्या डॉ. नरसिंग वाघमोडे यांची या पुस्तकाला सुंदर अशी प्रस्तावना लाभली असून मुखेडचे प्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक दा. मा. बेंडे यांचे पाठराखण लाभले आहे. 

 अभंग समतेचे काव्यसंग्रह
कवी चंद्रकांत गायकवाड
प्रकाशक - पांडुरंग पुठ्ठेवाड, गणगोत प्रकाशन
मुखपृष्ठ - संतोष घोंगडे
अक्षरजुळवणी सौ. कलावती घोडके
मुद्रक रामकृष्ण प्रिंटर्स हैद्राबाद
किंमत 150 ₹

पुस्तक परिचय - गाठीभेटी ( Gathibheti )

मनातील भावनांचा ' गाठीभेटी ' सांगणारा काव्यसंग्रह

शाबासकीची एक थाप अनेक काम यशस्वीपणे करून दाखवते. म्हणूनच शाळेतील शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या केलेल्या कामाचे कौतुक करून त्यांना शाबासकीची थाप देतात. त्या प्रेरणेतून विद्यार्थी घडत असतात. साहित्याच्या क्षेत्रात देखील कोणी जाणकार साहित्यिक गुरू नवोदित कवीला शाबासकीची थाप दिल्यावर चांगला कवी घडतो याचे प्रत्यय कवी प्रल्हाद घोरबांड यांचा गाठीभेटी कवितासंग्रह वाचतांना जाणवते. त्यांचा हा पहिला वहिला कवितासंग्रह असून नांदेड येथील प्रसिद्ध कवी जगदीश कदम यांनी प्रस्तावना देऊन त्यांना एक प्रकारे प्रेरणा दिली आहे तर प्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी यांनी त्यांच्या काव्यसंग्रहाची पाठराखण केली आहे. कवी प्रल्हाद घोरबांड हे गणिताचे शिक्षक असून देखील त्यांची मराठी भाषेतील शब्दसंपत्ती वाखाणण्याजोगी आहे. त्यांचे आजोबा वारकरी संप्रदायाचे असल्याने त्यांच्यावर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या विचारांचा पगडा दिसून येतो. या काव्यसंग्रहात अनेक काव्यातून पांडुरंग भेटीला येतो. म्हणून तर एकच वाट या कवितेतून कवी म्हणतो,

"तुकोबांची गाथा
वाचा ज्ञानेश्वरी
अविट हा धर्म
जिवना उद्धारी"

आपल्या जीवनाचा खरोखरच उद्धार करायचं असेल तर संत तुकाराम महाराज यांची गाथा आणि संत ज्ञानेश्वर यांची ज्ञानेश्वरी यांचे नित्यनेमाने पारायण करणे आवश्यक आहे. कवी स्वतः पांडुरंगाचे परम भक्त असल्यामुळे त्यांना जीवनात जे आनंद मिळाले ते वाचकांना सांगतात. आपल्या पांडुरंग या कवितेत कवी म्हणतो, 

"भक्ती भावाने भजता 
नाही आनंदाला तोटा
दूर करतो व्यथा, पांडुरंग....."

सध्या समाजात जे काही घडत आहे ते खूपच अन्यायकारक आणि क्लेशदायक आहे. हे कवी स्वतः आपल्या डोळ्याने पाहतो आहे, त्याचे दुःख आणि मनातील शल्य आपल्या काव्यातून व्यक्त केले आहे. आई आपल्या बाळाला नऊ महिने नऊ दिवस स्वतःच्या पोटात वाढविते, तिला जन्म देते, लहानाचे मोठे करते पण तेच मूल मोठे झाल्यावर स्वतःच्या आईला विसरून कित्येक महिने भेट घेत नाही. गहिवर या कवितेतून कवी आपले दुःख व्यक्त करतांना म्हणतो की, 

"मायेचा गहिवर 
कंठ आला दाटून
लेक नाही आला
महिने झाले भेटून"

आई ही कधीच कुमाता होऊ शकत नाही. मूल जरी आई बाबांना विसरले असेल तरी ते त्यांना विसरू शकत नाही आणि रागात येऊन शाप देखील देऊ शकत नाहीत, ते देताता तर फक्त आशीर्वाद. म्हणूनच कवी आपल्या ममता या कवितेतून लेकरांना आशीर्वाद देताना म्हणतो की, 

"प्रेमाच्या परतफेडीची 
केली नाही आशा
सुखाने राहा बाळा 
जरी आमची दशा"

आई-बाबा आणि मूल या फारच नाजूक विषयाला कवींनी आपल्या काव्याच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. कवींचा आवडता विषय म्हणजे कविता. मनातील भाव शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणारे एक माध्यम म्हणजे कविता. याविषयी कविता या काव्यातून कवी म्हणतो, 

"कविता ह्या कविताच असतात
शब्दांच्या त्या सविताच असतात
शब्दात भाव, दगडात देव
शोधणाऱ्यालाच दिसत असतात"

कवितासंग्रहाचे शीर्षक असलेली कविता गाठीभेटीमध्ये कवीचे मन कसे असते ? हे सांगितले आहे. नुकतीच तयार केलेली कविता कोणाला तरी ऐकवावी असे प्रत्येक कवीला वाटत असते. याच भावनेतून कवी सुंदर रचना तयार करत असतात. कवी म्हणतो,

"कवी धावतो श्रोत्यांच्या मागे
एखादीच कविता ऐकविण्यासाठी
जसे नामदेव धावले घेऊन
हातात तुपाची वाटी"

शेती, शेतकरी, पाऊस, हिवाळा, उन्हाळा, निसर्ग याविषयी देखील उत्तमोत्तम काव्य या संग्रहात वाचण्यास मिळतात. कवी गोपालक आहे म्हणून गाय विषयी कविता काव्यसंग्रहात असणे अपेक्षित आहेच. काव्यसंग्रहातील पहिलीच कविता प्रसन्न मध्ये ते म्हणतात की, 

"घरात घरात देशी गाय
सात्विक मिळेल अन्न
गायी वाचली तर पर्यावरण वाचेल
सगळे राहू प्रसन्न"

याविषयावर अन्य काव्य देखील वाचनीय आहेत. कवी स्वतः गुरुजी असल्याने त्यांनी गुरुजी या कवितेतून गुरुची महती विशद करतांना म्हणतात की, 

जीवनाला दिशा देऊन
तेच दाखवतात वाट
गुरुजींच्या मार्गदर्शनाविना
चढता येत नाही ज्ञानाचा घाट

देशातील गलिच्छ राजकारण, भ्रष्टाचार आणि वाढत चाललेले अत्याचार यावर देखील आपल्या काव्यातून प्रहार केले आहेत. महात्मा गांधीजीनी दांडी यात्रा करून मीठ मिळवून दिले पण सध्याच्या काळासाठी दंड देणारी यात्रा भरविणे आवश्यक आहे असे ते आपल्या काव्यातून व्यक्त करतात. 
एकूणच या काव्यसंग्रहात एकापेक्षा एक सरस आणि उद्धबोधन करणारे विविध विषयांवरील एकूण एक्याऐंशी काव्य आहेत. सहज आणि सोपी भाषा असल्यामुळे वाचक काव्य वाचतांना समरस होऊन जातो. वारकरी चळवळीतील संत आणि रामायण-महाभारतातील संदर्भ घेऊन केलेले अनेक रूपकात्मक काव्य वाचतांना मन विभोर होऊन जाते. जरी कवी प्रल्हाद घोरबांड यांचा हा पहिलाच कवितासंग्रह असला तरी गेल्या तीन दशकापासून संग्रह करून ठेवलेल्या त्यांच्या मनातील भावनाच्या गाठीभेटी या संग्रहातून वाचण्यास मिळतात. संतोष घोंगडे यांनी काव्यसंग्रहाला साजेशीर असे मुखपृष्ठ तयार केले आहे. भगवा पताका, पांडुरंगाचा गंध, दोन पाऊल, पांढरे ढग आणि दोन पिंपळाचे पान ज्यात एक हिरवेगार आहे तर दुसरे वाळलेले. यातून कवींच्या मनातील अनेक भावना मुखपृष्ठावरील चित्राच्या माध्यमातून व्यक्त होतात. या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग गोशाळेतील गाईंच्या चा-यासाठी केला जाणार आहे, हे विशेष उल्लेखनीय बाब आहे. म्हणून वाचक प्रेमीं या पुस्तकाचे नक्कीच स्वागत करतील, अशी आशा ठेवू या. पुढील काव्यलेखनास कवींना मनस्वी शुभेच्छा.

पुस्तकाचे नाव :- गाठीभेटी
कवीचे नाव :- कवी प्रल्हाद विश्वनाथराव  घोरबांड
प्रकाशकाचे नाव :- संजय सुरनर, संगत प्रकाशन, नांदेड
एकूण पृष्ठे :- 96
किंमत :- 150 ₹ फक्त

पुस्तक परिचय :- नासा येवतीकर, स्तंभलेखक तथा विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद, ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...