Saturday 23 March 2024

पुस्तक परिचय - कोरोना निवास ( Korona Niwas )

कोरोना काळातील इतिहास सांगणाऱ्या कथांचा संग्रह कोरोना निवास
संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरस या विषाणूने प्रत्येक नागरिकाला हादरवून सोडले. चीन मधील वूहान शहरात डिसेंबर 2019 मध्ये या विषाणूचा शोध लागला म्हणून कोव्हीड - 19 असे त्याचे नामकरण करण्यात आले. प्राण्यांपासून पसरलेला हा रोग माणसाला देखील झपाट्याने संसर्गित करू लागला. माणसाचा माणसाशी साधा संपर्क झाला किंवा सहवासात देखील आल्यास या रोगाचा प्रसार होऊ लागला म्हणून या रोगाची प्रत्येकाला भीती वाटू लागली. ह्या रोगाची लागण आपणाला होऊ नये यासाठी प्रत्येकजण विशिष्ट काळजी घेऊ लागला. लोकांचा एकमेकांशी संपर्क होऊ नये म्हणून जगातील प्रत्येक देशाने संचारबंदी लागू करून कित्येक दिवस, महिने करत वर्षभर लॉकडाऊन केले आहे. यामुळे घराघरांत जे काही रामायण-महाभारत घडले आहे ते अनेकांनी आपल्या कविता, वैचारिक लेख, ललित आणि कथांच्या माध्यमातून साहित्याची निर्मिती केली. कोरोना काळातील घटना इतिहासात नोंद होईल असेच आहे. कोरोना विषयावर अनेकांनी विनोद निर्माण केले. ट्वेन्टी ट्वेंटी हा वर्ष काहीतरी विशेष कार्य करून लक्षात राहण्याजोगे कार्य करू असे अनेकांनी मनसुबे तयार केले होते मात्र कोरोनाने हा वर्ष आपल्या नावाने करून घेतला. वर्तमानपत्र आणि टीव्हीच्या माध्यमातून या काळात घडलेल्या अनेक गोष्टी लोकांना घर बसल्या कळले. याच काळात आबालापासून वृद्धांपर्यंत सर्वाना लॉकडाऊन, संचारबंदी, विलगीकरण, सॅनीटायझर, मास्क यासारख्या शब्दाची ओळख झाली. अनेकांचे रोजचे जीवन जगणे विस्कळीत झाले. मुलांचे शाळा विद्यालय बंद पडले. देवालय कुलूपबंद झाले. लोकांचे बाहेर फिरणे थांबले. या सर्व घटनांचा सूक्ष्म अभ्यास आणि आपल्या अफाट विनोदबुद्धी निरीक्षणातून नागेश सू. शेवाळकर यांनी कोरोना निवास हा विनोदी कथासंग्रह शॉपीजन डॉट इन या ऑनलाईन प्रकाशनाच्या माध्यमातून गेल्या मे महिन्यात वाचकांच्या समोर आणले आहे. लेखक नागेश सू. शेवाळकर हे एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांचे आतापर्यंत सात कादंबरी, दोन धार्मिक, विनोदी व सामाजिक असे वीस कथासंग्रह, शैक्षणिक व राजकीय विषयावर चार चारोळीसंग्रह, विविध क्षेत्रातील चार महनीय व्यक्तीचे चरित्रग्रंथ, दरवर्षी साठ पेक्षा जास्त दिवाळी अंकात लेखन प्रसिद्ध झाली आहेत. ऑनलाईन क्षेत्रात देखील लेखकांची पकड आहे. मातृभारती, स्टोरी मिरर आणि शॉपीजन सारख्या ऑनलाईन साहित्य मंचावर त्यांचे असंख्य वाचक आहेत. स्टोरी मिरर या ऑनलाईन ई संस्थेद्वारे आयोजित 52 आठवडे लेखन आव्हान स्पर्धेत पाच हजार स्पर्धकांमधून त्यांना विजयी घोषित करण्यात आले होते. त्यांची अनेक पुस्तके महाराष्ट्र शासनाने छापून शाळांमध्ये वितरित केले आहे. 
या विनोदी कथासंग्रहात एकूण सोळा कथा असून लहान मुलांसाठी देखील बालविभागामध्ये एकूण सात कथाचा समावेश करण्यात आला आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहताच वाचकांना पुस्तक वाचण्यास भाग पाडते. घड्याळाचे चित्र म्हणजे माणसावर आज कोरोनामुळे कशी वेळ आली आहे हे दर्शविते तर त्याच घड्याळावर एकजण सुई घेऊन पळत आहे याचा अर्थ कोरोनाला संपवायचे असेल तर लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे असा संदेश यातून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पुस्तकात लसीकरण या विषयाच्या भोवताली बहुतेक कथा गुंफलेल्या आहेत. कोरोना प्रतिबंध करण्यासाठी सरकार लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले मात्र त्याबद्दल समाजात ज्या काही अफवा पसरविण्यात आल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने हे सारे खोटे आहे, हे दर्शविण्यासाठी जेष्ठ नागरिक असलेले अप्पा लसीकरण करून घेतात. त्यानंतर जे काही धमाल होते " हरवला चष्मा सापडली सुषमा " या कथेत वाचण्यास मिळेल. कोरोना पॉजिटिव्ह झाल्यानंतर व्यक्तीला चौदा दिवस विलगिकरण राहणे आवश्यक आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने दवाखान्यात बेड, ऑक्सिजन याची कमतरता भासू लागली. म्हणून मध्यमवर्गीय व्यक्ती घरातल्या घरात ती सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न करू लागले. भविष्यात ही समस्या निर्माण झाली तर आपणाला कोणत्या दवाखान्यात जाण्याची गरज भासू नये म्हणून त्या प्रकारच्या घराचा शोध घेऊ लागला. अस्मिता आणि अभ्यंकर हे मध्यमवर्गीय जोडपे देखील तसा एक फ्लॅट पाहतात पण ते फ्लॅट त्यांना मिळते की नाही हे पुस्तकाचे शीर्षक असलेले " कोरोना निवास " ही कथा वाचल्यानंतर कळते. 
कोरोना काळात काही लोकांना खूप त्रास झाला तर काही लोकांनी याच काळात आपली चांदी करून घेतली. विशेष करून दवाखान्यात कशी लूट चालू होती. स्वतःला अनुभव आल्यावर माणूस कसा बदलतो ? हे फास कोरोनाचा या कथेतून लेखकांनी सुंदररित्या मांडले आहे. तर गोरगरिबांना डावलून श्रीमंतांना पहिली सुविधा देऊ नये असा एक संदेश कोरोना आजी या कथेतून मिळतो. सरकारने तयार केलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यात कोणी कसर केल्यास त्यांना शिक्षा देखील मिळाली. कोरोना नियमांचा सर्वात जास्त त्रास जर कोणाला झाला असेल तर ते लग्न कार्य करणाऱ्या लोकांना. वीस-पंचवीस लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्नाचे कार्य करणे खूप जिकरीचे होते. लग्नाला जास्त मंडळी उपस्थित आहेत म्हणून आयोजकांवर गुन्हे देखील दाखल झाले. असेच एक लग्न कार्य " कोरोना गेला " ही कथा वाचतांना वाचकांना तोंडावर हसू आणल्याशिवाय राहत नाही.
कोरोना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे महत्वाचे आहे त्यासाठी लोकप्रतिनिधी किंवा वॉर्ड नगरसेवक यांनी मोफत लसीकरणासाठी काय नियोजन केले आहे " आली का ? आली का ? " या कथेत पाहण्यास मिळेल. जनतेमध्ये लसीकरणाविषयी जे गैरसमज आहे त्याविषयी भन्नाट अशी कथा " धास्ती कोरोनाची " मध्ये वाचता येईल. लेखकांनी लोकांना आलेले अनुभव आणि सोशल मीडियात प्रसिद्ध झालेल्या अनेक घटनांचा वापर कथेत केलेला आहे. त्यामुळे कथा वाचतांना हे आपल्या आसपास घडत आहे असेच वाटते. सहज सोपी संवाद शैली आणि समर्पक शब्दरचना यामुळे कथा वाचतांना कोठेही निरसपणा वाटत नाही.
कोरोना या नावाचा शोध कसा लागला असेल याचा शोध लेखक स्वतः लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. " कोरोना की करीना " ही कथा म्हणजे लेखकांजवळ असलेली तर्कशक्ती दर्शविते. सामान्य माणूस आपले जीवन कसे जगतो ? काय बघितल्यावर किंवा वाचल्यावर आनंद वाटते याची कल्पना या कथेतून मिळते. या कथासंग्रहात एकापेक्षा एक सरस विनोदी कथा वाचण्यास मिळतात.
कोरोनामुळे शाळा व महाविद्यालय बंद झाली. शिक्षकांचे व मुलांचे शाळेत जाणे बंद झाले. मुले कोरोनाची शिकार होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. सर्वच मंडळी घरात कैद झाल्यावर घराघरांत काय घडले याचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न बालकथा विभागात केले आहे. शाळा महाविद्यालय बंद झाले तसे देवालय देखील कुलूपबंद झाली. विनोद आणि त्याची आजी यांच्यातील संवादातून लॉकडाऊनमध्ये घरात काय घडले आहे याची प्रचिती येते. " चिऊताई दार उघड ना ! " या कथेतून कोरोना काळात लोकांनी स्वछता विषयी कशी जागरूक झाली होती ? हे कावळेदादा आणि चिऊताईच्या माध्यमातून सांगितले आहे. कोरोनामुळे मनुष्य स्वछतेचे सारे नियम पाळत आहे हे या कथेतून कळते. अनेक शाळांच्या शिक्षकांनी व्हाट्सअप्पचा वापर करून मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. तो ही एक अनुभव चव्हाण सरांच्या अनुभवातून " माझी शाळा, कोरोना शाळा " यातून दिला आहे. आजोबांचा अष्टचंद्रदर्शन ऑनलाईन वाढदिवस कसा साजरा होतो हे वाचल्याशिवाय कळणार नाही. कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली. यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर एक प्रकारे अन्याय आहे या आशयाची कोरोना उत्तीर्ण या कथेत वाचण्यास मिळेल.  बहुतांश विद्यार्थ्यांना कसे का होईना परीक्षा हवी होती, असा संदेश कथेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे, जे की स्तुत्य वाटते. सर्व कथा ह्या वाचनीय आणि खळखळून हसविणारे आहेत. ऑनलाईन माध्यमातून पुस्तकाच्या रूपाने बाहेर पडलेल्या या पुस्तकाचे वाचक नक्की स्वागत करतील अशी मला खात्री आहे. शॉपीजन डॉट इनच्या मराठी विभाग प्रमुख ऋचा दीपक कर्पे यांच्या अथक परिश्रमातून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून यात एकूण 105 पाने आहेत. पुस्तकाची बांधणी उत्तम आहे. पुस्तकाची किंमत 153 ₹ आहे. शॉपीजनवर ई पुस्तकाचे प्रकाशन नि:शुल्क असून ई पुस्तकाच्या प्रकाशनासाठी लेखकांकडून कुठलेच शुल्क आकारले जात नाही. आता वाचकांसाठी पुस्तकांची हार्डकॉपी देखील उपलब्ध करून देत आहे. शॉपीजन फक्त एक नाव किंवा संस्था नसून लेखकांचे स्वप्न साकार करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. गुगल प्ले स्टोरवर हे अँप विनामूल्य उपलब्ध आहे. 

पुस्तक परिचय - 
नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...