Saturday 14 July 2018

माझे माहेर पंढरी

माझे माहेर पंढरी

सकाळी रेडियोवर पं.भीमसेन जोशी यांच्या आवाजातील माझे माहेर पंढरी ,आहे भीम रे त्या तिरी हे गाणे ऐकत ऐकतच उठायचो. लहान असल्यापासून या पंढरीच्या विट्ठलाचे आकर्षण असायाचे त्याला कारण ही तसेच होते. माझे काका वारकरी संप्रदायतील होते ,त्यामुळे ते आषाढी एकादशीला पंढरीची वारी करून परत यायचे आणि येताना आम्हां लहान मुलांसाठी काही आणित असत. त्याचे आम्हाला उत्सुकता असायची. वर्षामागून वर्ष सरले आणि आम्ही मोठे झालो तसे या वारीचे आकर्षण कमी झाले. पण वारी समजू लागलो आणि वारीमध्ये जायचे असेल तर भजन करावे लागते ही अट गावातील चर्चेमधुन ऐकण्यास मिळाले. यामुळे भजन करण्याकडे वळलो .टाळ कधी हातात घेता आले नाही, मात्र हाताने टाळ वाजवायचो आणि भजनी मंडळात सामिल व्हायचो, असे शालेय जीवनात घडले. हे सर्व त्या पंढरीच्या विठोबाच्या दर्शनासाठी करायचो. शालेय जीवन संपले आणि महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर या भजनापासून दूर झालो. मात्र पंढरीचे आकर्षण कमी झाली नाही यामागे काय कारण असेल .....?
आषाढी एकादशी ही पंढरीची वारी पावासळ्याच्या तोंडावर येते. वारकरी मंडळी सहसा शेतकरी असतो आणि शेतात आपली पेरणी पूर्ण करून वारीसाठी रवाना होत असतो. कधी कधी निसर्ग नियम मोडते आणि पेरणी करायला उशीर होतो. तरी शेतकरी आपली वारी चुकवत नाहीत. या वारीत बरेच काही शिकायला मिळते. मुंगी ज्याप्रमाणे वाटचाल करतात अगदी त्याच प्रकारे वारकरी आपल्या घरातून जथ्याच्या जथ्थी निघातात आणि वारीत सामिल होतात. शिस्त ही त्यांच्या अंगात असलेली एक अत्यंत महत्वाचे गुण येथे दिसून येते. कुठल्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसताना ही वारकरी लोकांची स्वयंशिस्त पाहण्याजोगे असते. स्वतः तयार केलेली शिस्त असल्यामुळे ते मोडण्याचा प्रश्नच येत नाही.
या लोकांमध्ये अजुन एक महत्वाचे गुण दिसून येते ते म्हणजे इतरांना सहकार्य करणे .वारीमध्ये पायी चालत असताना अनेक समस्या निर्माण होतात पण त्याचे काहीच वाटत नाही .कारण वारीमधे लोक एकमेकांना सहकार्य करीत वाटचाल करीत असतात. त्यामुळे कोणालाही समस्या निर्माण झाली तरी त्याचे काही वाटत नाही. प्रेम करीत जा आपणास नक्कीच प्रेम मिळेल द्वेषातुन द्वेषच निर्माण होते याची प्रचिती सुद्धा या निमित्ताने येते. सासरी गेलेल्या मुलीला आषाढीच्या निमित्ताने माहेरी जाण्याचा योग येतो वर्षातील सणांची सुरुवात या सणाने होते. जशी तिला माहेराची ओढ लागलेली असते. अगदी तसेच वारकरी लोकांना पंढरीच्या वारीची ओढ लागलेली असते म्हणूनच म्हणावेसे वाटते

पाऊले चालती पंढरीची वाट
हरी ओम विठ्ठला

- नासा येवतीकर धर्माबाद

Wednesday 11 July 2018

छडी लागे ( ना ) छम छम

छडी लागे ( ना ) छम छम

शाळेमध्ये दहशतीचे वातावरण असल्यास मुलांमध्ये शाळा, शिक्षक आणि शिक्षण याविषयी कमालीचा तिरस्कार निर्माण होतो. शिकणे ही आनंददायी प्रक्रिया होण्याऐवजी ती छडीमुळे एक तिरस्करणीय प्रक्रिया होते. छडीमुळे लहान मुलांच्या कोवळ्या मनावर विपरीत परिणाम होत असून शिक्षणापासून ती दुरावल्या जात आहेत. कोणतेही मूल हसत-खेळत जितके चांगले शिकते तितकेच छडीच्या दहशतीखाली शिकत नाही, असे बालमानसशास्त्रज्ञांचे मत आहे. काही मुले हूड असतात. अभ्यासात, शिकण्यात त्यांचे मन रमत नाही. पण त्यासाठी शिक्षा हा सर्वोत्तम उपाय नाही. त्यासाठी शासनाने शाळेतून छडी बाद करण्याचे विधेयक पारित केले आहे.  छडीच्या बाबतीत वरील सर्व विचार या क्षेत्राशी संबंधित आहेत, परंतु बाह्य बाजूची आहेत. प्रत्यक्षात याविषयी संबंधित व्यक्ती म्हणजे शिक्षक याचा विचार येथे कोणत्याच स्तरावर करण्यात आलेला नाही. शाळेतून छडीला बाद केल्यामुळे शाळेत काय घडत आहे याचा कोणी विचार करणार आहेत का ?
छडीमुळे वर्गातील मुलांमध्ये दहशत निर्माण होते, हे काही अंशी बरोबर असेलही, मात्र छडीच बाद झाल्यामुळे वर्गात मुलांचा जो गोंधळ किंवा धुडगूसवाढीस लागतो त्याचा कुठे तरी विचार व्ह्ययला हवे. शाळेच्या संपूर्ण वेळात म्हणजे सकाळपासून सायंकाळपर्यंत विद्यार्थी व शिक्षक यांच्यात प्रेमळ संबंध राहणे अशक्य आहे. घरात बालकाने गोंधळ किंवा धुडगूस घातल्यास पालक त्यांच्यावर रागवतात, याचा अर्थ असा नव्हे की, ते पालक रागीट आहेत. पालकांना वेळप्रसंगी रागावणे व अती झाल्यावर शिक्षासुद्धा करावी लागते. असाच प्रसंग शाळेतील शिक्षक मंडळीवर आल्यास तेथे शिक्षकांनी रागावू नये, शिक्षा करू नये, म्हणजे नेमके काय करायचे ? याचे उत्तर मिळते, प्रेमाने समजून सांगावे. त्याउपरही ऐकले नाही तर काय करावे ? परत समजून सांगावे. शेवटपर्यंत याला शिक्षकांचे प्रेम समजलेच नाहीत तर काय करावे ? यावर शेवटी उत्तर मिळते. त्याकडे दुर्लक्ष करावे पण शिक्षा करू नये. याचा अर्थ असा निघतो की विद्यार्थ्यावर योग्य संस्कार टाकण्याची जबाबदारी शिक्षकांची मुळीच नाही का ? या विधेयकामुळे आम्हाला काहीच करता येत नाही असे उत्तर शिक्षकांमधून आल्यास त्यास काय उत्तर देता येणार आहे ?
दहा एक वर्षांपूर्वी ज्यांनी शाळेतून अंक व अक्षर गिरवण्यास प्रारंभ केला, एखादी बाब वारंवार सांगूनही मुलात अपेक्षित वर्तन दिसले नाही, तर शिक्षक शेवटचा पर्याय म्हणून छडीचा वापर करत. शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी जन्माजन्माचे वैर नाही, दुश्मनी नाही, मग ते विनाकरण मुलांना शिक्षा का करतील ? शाळेची किंवा शिक्षकांचे काही नियम असतील, त्यांचे पालन विद्यार्थ्यांनी करावे अशी अपेक्षा असते. त्या नियमाचा विद्यार्थ्याकडून भंग झाल्यास, तोही वारंवार असेच होत असल्यास काय करावे ? त्यास जर नियमांची ओळख दिली नाही आणि नियमभंग केल्यास शिक्षा दिली नाही तर भावी जीवनात तो एक उत्तम नागरिक म्हणून कसा जगू शकेल ? कारण नागरिक म्हणून जगताना समाजाने किंवा शासनाने जे नियम तयार केले त्यानुसार त्यांना वागावे लागते. अन्यथा आपणास शिक्षा होऊ शकते याचा अनुभव शाळेतूनच दिल्या जातो. वेळेवर शाळेत येणे, ठरवलेल्या दिवशी गणवेश परिधान करणे, रांगेत उभे राहणे, शिक्षकांशी आदराने बोलणे, शाळेतल्या मित्रांशी मैत्रीपूर्वक संबंध ठेवणे, आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ न देणे, अध्यापनाकडे लक्ष देणे, दिलेला अभ्यास पूर्ण करणे, स्वाध्याय किंवा गृहपाठ पूर्ण करणे इत्यादी जी साधी नियमावली आहे. ही सर्वसाधारण सगळ्यात शाळातून आढळून येते. वरील नियमावलीत विद्यार्थ्यांनी एक दोन वेळेस चुका केल्यास शिक्षक प्रेमाने सांगेन, परंतु वारंवार त्याच चुका घडत असतील आणि शिक्षक ज्यांना काहीच शिक्षा करणार नसेल तर विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच संदेश जाऊ शकतो. मुलांच्या मनामध्ये शिक्षकाविषयी एक वेगळीच प्रतिमा तयार होते. अमुक सर आम्हाला काहीच करत नाहीत. ते सर आम्हाला फक्त बोलतात, समजावतात,  परंतु मारत नाहीत. अशामुळे विद्यार्थी शाळेत न घाबरता येईल असा जो शासनाचा कयास आहे तो शत-प्रतिशत खरे असेलही मात्र वर्तनातील अपेक्षित बदल जे व्हायला पाहिजे ते दिसून येत नसल्यास काय करावे ?
शहरात असंख्य माणसे असतात. आपण सर्वांच्या जवळून जातो आणि येतो. परंतु पोलिसाच्या गणवेशातील खाकी वर्दीचा एखादा व्यक्ती समोरुन येत असेल तर आपण त्याच्यापासून दूर राहूनच चालतो. आपण चोरी केली नाही किंवा कोणाला विनाकारण मारले देखील नाही, कोणताच गुन्हा केलेला नाही, मग आपण त्या व्यक्तीला का घाबरतो ? कारण समाजात पोलीस प्रशासनाविषयी जी आदरयुक्त भीती आहे ती या शिक्षेमुळे ! आज पोलिसांना सांगितले गेले की गुन्हेगारांना न पकडता त्यांना प्रेमाने समज द्या व सोडून द्या असे जर झाले तर देशात समाजात किती अराजकता माजेल ? पोलिस शहरातील सर्वांनाच शिक्षा करतात का ? मुळीच नाही. जर असे केलोत तर त्यांच्या नियमावलीत ढवळाढवळ करून त्यांचे महत्त्व कमी केल्यासारखी होत नाही का ? पोलीस प्रशासनासारखेच शाळेचे प्रशासन आहे, असा समज जर थोड्या वेळासाठी ठेवला तर कळून येईल की शाळेत सर्वांनाच छडी मिळत नाही. जे नियमांचे पालन करीत नाहीत त्यांनाच छडीचा प्रसाद मिळतो. आपणाला छडी मिळू नये म्हणून विद्यार्थी नियमानुसार वागतो व राहतो, परंतु तीच छडी बाद झाल्यामुळे विद्यार्थी हसत-खेळत शाळेत येतीलही मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे संस्कार टाकणे शिक्षकांना अवघड जाईल, यात शंका नाही. शाळेतील मुले सर्कशीच्या रिंगणातील जनावरे नाहीत मात्र लहानपणी लागलेली शिस्तीची सवय मोठेपणी खूप कामाला येऊ शकते.
लहान मुले संवेदनाक्षम असतात. या वयात त्यांना नीतिनियम अंगवळणी टाकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच्या काळातील पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी अत्यंत जागरूक आहेत. मुलांमधील अतिप्रेमामुळे त्याच्याकडे अति लक्ष देऊन त्यांचे लाड केल्या जात असल्यामुळे आजची मुले फारच नाजूक आणि हळवी झाली आहेत. पूर्वीच्या काळी पालक शिक्षकांना त्यांच्या पाल्यास शिक्षा करण्याची परवानगी देत असत. आज ही काही पालक तशी परवानगी देतात.  ज्यामुळे त्यांच्या हातावर ही छडी छम छम करी त्यांना विद्या सुद्धा घमघम येत असे या अनुभवावरूनच ही कविता लिहिल्या गेली असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. परंतु आजच्या पालकांना व शासनालाही छडी त्रासदायक वाटत आहे. याविषयी शासनाने सार्वमत घ्यावयाचे ठरविल्यास शंभरातून फार कमी म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे शिक्षक छडीच्या विरोधात मध्ये टाकतील. मानसशास्त्रज्ञाने मांडलेले विचार सत्य आहेत याबाबत वाद नाही, मात्र छडीचे महत्त्व काय आहे आणि त्यामुळे काय होऊ शकते किंवा काय होत नाही हे शिक्षकाव्यतिरिक्त तर कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे निदान एकदा शिक्षक बनून या विषयाकडे कटाक्ष टाकावे. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे म्हणीनुसार हे महत्त्व आपणास लक्षात येईल. कडक शिक्षा नाही तर सौम्य शिक्षेची परवानगी दिल्यास मुलांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होऊ शकते अन्यथा भावी पिढी लाढावून ठेवलेली पिढी निघेल. ज्यांच्या मनात कोणाविषयी देखील भीती राहणार नाही. ते निर्धास्त होतील. आजपर्यंतचा निरीक्षणातुन असे दिसून येते की, सुरुवातीचे काही दिवस सोडले तर मुलांना शाळेची कधी ही भीती वाटत नाही. त्यास छडीसोबत अन्य अनेक कारणे आहेत. मात्र छडीलाच कात्रीत धरण्यात येत आहे. मुलांना प्रेमाने शिक्षण द्यावे यात नक्कीच मुलांची प्रगती आहे. परंतु त्याचसोबत सौम्य शिक्षा देण्याचा अधिकार शिक्षकांना दिल्यास अजून चांगले परिणाम पाहायला मिळतील असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Monday 9 July 2018

जागतिक लोकसंख्या दिन

लोकसंख्येचा भस्मासुर आणि त्याची कारणे

भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाल्यानंतर देशात पहिली जनगणना सन 1951 या वर्षी घेण्यात आली. त्यावेळची लोकसंख्या 36 कोटी 10 लाख होती. 2018 या वर्षी झालेल्या जनगणनेनुसार लोकसंख्या 98 कोटी 19 लाखने वाढली असून आज भारताची लोकसंख्या 134 कोटी 29 लाख अशी आहे. दर दहा वर्षांनी करण्यात आलेल्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार सन 1951 ते 61 या दहा वर्षात लोकसंख्या सात कोटीने वाढली. सन 1961 ते 71 या वर्षात 9 कोटीने, सन  1971 ते 81 या वर्षात 14 कोटीने, सन 1981 ते 91 या वर्षात 16 कोटीने, सन 1991 ते 2001 या वर्षात 18 कोटीने तर सन2001 ते 2011 या वर्षात 19 कोटीने वाढून देशाची लोकसंख्या 121 कोटी झाली. दर दहा वर्षात लोकसंख्या वाढतच आहे हे वरील आकडेवारी वरुन लक्षात येते. पुढच्या दहा वर्षांनंतर जेव्हा सन 2021 यावर्षी जनगणना होईल तेव्हा भारताची लोकसंख्येत अंदाजित 21 कोटीने वाढ होऊन 142 कोटी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. लोकसंख्येच्या बाबतीत आज जरी भारताचा दुसरा क्रमांक असेल तरी याच पटीने संख्या वाढत गेल्यास भविष्यात पहिल्या क्रमांकावर येणार ही गोष्ट नक्कीच आपल्यासाठी अभिमानास्पद नाही. कारण लोकसंख्या वाढीचा अनेक बाबीवर परिणाम होतो. त्यामानाने चीनने लोकसंख्येवर आळा घालण्यात यश मिळवलेले आहे. सन 2000 यावर्षी चीनची लोकसंख्या 126 कोटी 58 लाख होती तर सन 2010 या वर्षी फक्त 7 कोटीने लोकसंख्या वाढून 133 कोटी 97 लाख अशी झाली. देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आणि आपला महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून लोकसंख्या 11 कोटी 23 लाख आहे. त्याखालोखाल बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश यांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी लोकसंख्या 6 लाख 7 हजार असे सिक्कीम या राज्याची आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईची आजमितीची लोकसंख्या 1 कोटी 24 लाखाच्यावर गेलेली आहे. मुंबई व कोलकाता ही आपल्या देशातील सर्वात जास्त लोकसंख्येची शहरे आहेत तर ठाणे जिल्हा हा देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. 11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्ज अपत्य जन्माला आले तेव्हापासून हा दिवस `जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर पाळला जात आहे.
वाढत असलेली लोकसंख्या ही जगासमोर तोंड वासून उभी असलेली सर्वात मोठी समस्या आहे. विशेष करून भारतासारख्या विकसनशील देशासाठी तर ती प्रमुख समस्या बनत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी शासनाने सर्वतोपरी उपाय करून बघितले परंतु सर्व व्यर्थ ठरले. एका दृष्टीने मनुष्यबळाची संख्या वाढू लागली परंतु ती तेवढीच चिंताजनक सुद्धा होऊ लागली. अखेर शासनाच्या असंख्य प्रयत्नाला यश न मिळण्यामागे काय कारणे असू शकतात ? याचा शोध घेऊन त्यावर कठोर उपाययोजना करणे काळाची गरज बनत चालली आहे.
*अज्ञान व अंधश्रद्धा - आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य होऊन पासष्ट वर्षाचा कालावधी उलटला असला तरी देशात अज्ञानी व अडाणी लोकांची संख्या काही कमी झाली नाही. भारत स्वातंत्र्य होतांना देशासमोर ही एक प्रमुख समस्या होती. शिक्षणाच्या अभावामुळे व्यक्तीची कशी दयनीय अवस्था होते हे महात्मा फुले यांनी आपल्या काव्यात म्हटले आहे, 

" विद्येविना मती गेली, 
मतिविना नीती गेली
नीतीविना गती गेली, 
गतीविना वित्त गेले, 
वित्तविना शुद्र ही खचले, 
एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. 

शिक्षणाने माणसाचा नुसता विकास होत नसून त्यांचे जीवन सुंदर आणि नंदनवन होते. नोकरी मिळविण्यासाठी शिक्षण घ्यायचे नसते तर जीवन कसे जगावे ? याचे ज्ञान शिक्षणातून मिळते याची जाणीव लोकांमध्ये अजूनही झाल्याचे दिसून येत नाही. ज्ञानासोबत लोकांमध्ये अंधश्रद्धेची ही जोड सोबत असल्यामुळे आपणाला किती अपत्ये असावीत ? याचे भान त्यांना राहत नाही. मुले म्हणजे देवाघरची फुले आहेत म्हणत एका एका घरात पाच ते सात फुलांची उगवण करण्यासही अज्ञानी जनता मागेपुढे पाहत नाहीत. जास्त अपत्यामुळे आपल्या कुटुंबाची काय वाताहत होते ? याची जरासी ही कल्पना करीत नाहीत. आपल्या एकट्याच्या अशा वागण्याने काय फरक पडेल ?अशी विचारधारा करणारी मंडळी आपल्या गावासह राज्याची व देशाची हानी करतात याची कल्पनासुद्धा करीत नाहीत.
*बालविवाह - मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी लग्न लावण्यात येऊ नये म्हणून शासनाने बालविवाह प्रतिबंध कायदा निर्माण केलेला आहे. तरी सुद्धा या कायद्याची पायमल्ली करीत ग्रामीण भागातून आजही सर्रासपणे बालविवाह केले जातात. बालविवाह आणि लोकसंख्या वाढ यांचा संबंध येत नाही असे प्रथमदर्शनी वाटते ते सत्य ही असेल, मात्र मुलींचे 18 वर्षांनंतर लग्न लावल्यास त्यानंतर एक-दोन वर्षांनी तिला मूल होईल परंतु बालविवाह केल्यामुळे मुलगी अठरा वर्षाच्या आत आई बनते. त्यामुळे तीन वर्षांपूर्वीच लोकसंख्या वाढू लागते. तेव्हा बालविवाह हे मुलीच्या शारीरिक दृष्टीने घातक आहेच शिवाय देशासाठी सुद्धा घातक आहे. याबाबत जनप्रबोधन करून बालविवाहास आळा घालणे आवश्यक आहे.
*वैद्यकीय सेवा - भारताने वैद्यकीय क्षेत्रात एवढी मोठी प्रगती साधली आहे की येथील वैद्यकीय तज्ञ मंडळी गंभीर आजार असलेल्या रुग्णांना मृत्यूच्या जबड्यातून सोडवून आणत आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच आहे. मात्र यामुळे मृत्यूचा दर कमी झाला आणि जन्मदर वाढीस लागला. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी ज्या वेळी वैद्यकीय सेवा एवढी विकसीत झाली नव्हती तेव्हा एखादा साथीचा रोग पसरला की त्यात शेकडो लोक मृत्यू पावत असत. त्यामुळे त्या वर्षातील लोकसंख्येची तेवढी वाढ दिसून येत नाही. वीस वर्षापासून वैद्यकीय सेवेत संशोधन खूप झाल्यामुळे स्वाईन फ्लूसारख्या साथीच्या आजाराला वैद्यकीय मंडळी अटकाव करण्यात यश मिळवत आहेत. त्याच कारणास्तव लोकसंख्येचा विस्फोट होत आहे त्यामुळे जन्म व मृत्यू यांचा जो प्रमाण असायला पाहिजे तो न राहता व्यस्त बनत चालले आहे. लोकसंख्या वाढीमागे वैद्यकीय सेवा हे एक प्रमुख कारण बनले आहे.
*मुलगाच हवा - वंशाचा दिवा म्हणजे मुलगा असा समज आजही समाजात घट्ट रुतून आहे. मुलगा मुलगी एकसमान असा कितीही नारा दिला तरी तशी वागणूक त्यांना मिळत नाही. परंपरागत चालत आलेली प्रथा जोवर देशात रुढ राहील तोपर्यंत मुलगाच हवा या हट्टापायी ते तीन ते चार अपत्यांना जन्म देतच राहतील. दोन मुलींवर कुटुंब नियोजन करणाऱ्या पालकांसाठी शासनाने ही योजना काढली असली तरी त्याला समाजातून उदंड प्रतिसाद मिळतोय असे दृश्य आज तरी बघायला मिळत नाही. मुलगी म्हणजे पराया धन ही संकल्पना जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत शासनाच्या कोणत्याच योजनेला प्रतिसाद मिळणार नाही. मुलांविषयी असलेल्या आकर्षणामुळे लोकसंख्या वाढत आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
*लैंगिक शिक्षणाचा अभाव - पाश्चिमात्य देशात पुरुष व स्त्री यांच्यात अजिबात आकर्षण दिसून येत नाही त्यामागे नेमके कारण म्हणजे तेथील लोकांना लैंगिक शिक्षण दिले जाते. त्यातून त्यांना लैंगिक विषयी बरीच गोष्टीची माहिती दिली जाते जे की नवदांपत्यांना किंवा वयात येणाऱ्या मुलामुलींना आवश्यक आहे. आपल्या देशात मात्र लैंगिक शिक्षणाला विरोध होतो कारण आपण लैंगिक शिक्षण म्हणजे फक्त सेक्स या शब्दापुरताच मर्यादित विचार करतो. त्यापलीकडील विचार करण्याची शक्ती आपल्यात नसते किंवा ते करत नाही. करण पुरुष आणि स्त्री फक्त एकाच कारणासाठी एकत्र येतात याच विचारात गुरफटून जातात. यांच्याच आकर्षणामुळे देशात अल्पवयीन मुलींचे अपहरण, महिलेचा विनयभंग, बलात्कार आणि खून असे प्रकार वारंवार घडताना दिसून येत आहेत. वास्तविक पाहता लैंगिक शिक्षणातुन विवाहपूर्वी आणि विवाहानंतर कसे वागले आणि राहिले पाहिजे याचे ज्ञान दिले जाते. पुरुष आणि स्त्री हे दोन भिन्नलिंगी जरी असले तरी दोघांच्या भावना, वेदना, सुख आणि दुःख एकसारखेच असते याची जाणीव या शिक्षणातून देण्यात आले तर या शिक्षणाला विरोध का ? आजपर्यंत आपण यास विरोध करीत आल्यामुळे देशातील तरुण मंडळी याविषयी अनभिज्ञ आहेत. त्याविषयी युवकात आकर्षण नैसर्गिकपणे असल्यामुळे चोरट्या मार्गाने माहिती गोळा करू पाहतात आणि नको त्या संकटात सापडतात. यातूनच खेळ सुरू होतो मग गर्भपाताचा आणि भ्रूणहत्येचा.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळे अनेक गोष्टीवर त्याचे प्रतिकूल परिणाम दिसून येत आहेत. देशात प्रामुख्याने अन्नधान्याचा तुटवडा जाणवत आहे. देशात खाणार्‍याची तोंडी वाढू लागली मात्र त्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन होत नसल्यामुळे देशातील एक तृतीयांश लोकांना एक वेळच्या जेवणावर दिवस काढावा लागत आहे. लोकांना राहण्यासाठी निवाऱ्याची गरज भासू लागली तसे घरे बांधण्यासाठी जंगलतोड होऊन जंगलाचे प्रमाण कमी होऊ लागले. त्याचा पर्यावरणावर परिणाम होऊन त्याचे संतुलन बिघडत चालले आहे. निसर्गातील तीन ऋतू पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा यांच्यात संतुलन बिघडल्यामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झाले आहे. पूर्वीपेक्षा आता उद्योगधंदे व कारखाने वाढले त्यामुळे रोजगाराचाही वाढ झाली मात्र लोकसंख्या भरमसाठ वाढल्यामुळे सगळ्यांच्या हाताला काम मिळेल याची खात्री नाही. त्यास्तव बेरोजगार लोकांची संख्या कोटीच्या घरात मोजावी लागत आहे. बेरोजगाराचे पाय वाईट कामाकडे वळत चालल्यामुळे तेही देशासाठी घातकच ठरणार. प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा चालू आहे. रस्त्यावरून चालणारा व्यतीसुद्धा जीव मुठीत घेऊन चालत आहे एवढी अफाट लोकसंख्या वाढलेली आहे. भविष्याचा विचार करता लोकसंख्येला आळा घालण्यासाठी आजच्या युवक वर्गाने सकारात्मक विचारधारा स्वीकारून आपल्या जीवनशैलीत सुधारणा करायला पाहिजे. 

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...