Saturday 7 December 2019

एकच ओळखपत्र

एक व्यक्ती एक मतदान 



राष्ट्रीय मतदार पडताळणी मोहिमेतून मतदार याद्याचे शुद्धीकरण करण्यात येणार असून बोगस मतदान टाळण्यासाठी देशभर एक व्यक्ती एक मतदान करण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असल्याची बातमी नुकतेच वाचण्यात आले. खरोखरच त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करायलाच हवे. आजची मतदार यादी जर नजरेखालून घातली तर असे लक्षात येते की त्या यादीतले पाच ते दहा टक्के मतदार हे मयत, दुबार किंवा स्थलांतरित असतात. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाची टक्केवारीवर देखील याचा परिणाम दिसून येतो. त्याचसोबत काही मतदारांचे नाव दोन ठिकाणी आढळून येते. खास करून सीमावर्ती भागात काही मतदारांचे नावं दोन राज्यात असतात आणि ते दोन्ही राज्यात मतदान करून दोन्ही राज्यांतील योजनांचा लाभ घेत असतात. काही जणांचे एका राज्यात असून देखील दोन ठिकाणच्या मतदार यादीत नाव असते. अश्या बाबीवर नियंत्रण आणण्यासाठी निवडणूक आयोगाने जे पाऊल उचलले आहे ते अभिनंदनीय आणि स्वागतार्ह आहे. यासाठी निवडणूक आयोग काय योजना तयार केली आहे याची माहिती मतदारांना होणे आवश्यक आहे. याबाबतीत पहिल्यांदा मतदार जागरूक होणे गरजेचे आहे. ही पडताळणी करताना मतदारांस आपला मोबाईल क्रमांक आणि त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मदाखल्यासह आवश्यक कागदपत्रे अपलोड करावयाचे आहे. त्यामुळे एक व्यक्ती देशभरात कुठे ही एकाच ठिकाणी आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकणार आहे. त्याला एकदाच मतदान करता येणार आहे. ग्रामपंचयात, नगरपालिका, मनपा, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी बोगस नोंदणी केली जाते असे दिसून आले आहे. त्यामुळे याबाबीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आयोगाने हे पाऊल उचलले आहे. संबंधित मतदारांच्या मोबाईल वर एक मेसेज येईल ज्याद्वारे मतदाराला स्वतः ला एक लॉगिन आय डी आणि पासवर्ड तयार करावे लागणार आहे. त्याच क्रमांकावर वन टाइम पासवर्ड म्हणजे ओटीपी येणार आहे. त्याद्वारे मतदार लॉगिन करणार आहे. त्यामुळे एकापेक्षा जास्त नावाना हा क्रमांक वापरता येणार नाही. यासाठी आयोगाचे बिलओ मतदारांना सर्वतोपरी मदत करणार आहेत. आयोगाने सुरू केलेल्या या कार्यक्रमात सर्वच मतदारांनी स्वतः हुन पुढे येत पडताळणी करून घेण्याचे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. देशातील बोगस मतदार शोधून ते कमी करण्याचे काम या कार्यक्रमातून होणार आहे. भारत हा जगातील लोकशाहीच्या माध्यमातून उभारलेला एक बलशाली राष्ट्र आहे. जेथे वयाची 18 वर्षे पूर्ण केलेला प्रत्येक भारतीय मतदान करू शकतो. त्याच्या एका मताला अमूल्य असे किंमत आहे. सध्या प्रत्येक घरात मोबाईल पोहोचले आहे पण एक समस्या असू शकते एखाद्या व्यक्तीजवळ मोबाईल नसेल तर काय करायचे ? त्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत ? याबाबत अजून काही माहिती कळाली नाही.  प्रत्यक्ष निवडणूक घेतांना मतदान ओळखपत्र सोबत अन्य पुरावे देखील ग्राह्य समजले जात असल्यामुळे मतदान ओळ्खपत्राचे महत्व खूप कमी झाले आहे. त्यामुळे मतदानासाठी मतदान ओळखपत्र सक्तीचे करण्यात यावे. ज्याच्याजवळ मतदान ओळखपत्र नसेल त्यांना तहसील कार्यालयातून ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा निर्माण करावी. प्रत्येक नागरिकांकडे आज आधारकार्ड आहे. कारण त्याचा उपयोग अनेक ठिकाणी केला जात आहे. यदाकदाचित ते कार्ड हरवले असेल तरी ऑनलाइन उपलब्ध होते. तशीच काही क्रिया मतदान ओळ्खपत्रासाठी करता येईल काय ? यावर विचार मंथन होणे आवश्यक आहे. मतदान प्रक्रियेत सहभागी न होणाऱ्या मतदारांना पुढे चालून काही दंड भरण्याची तरतूद देखील करण्याचा विचार आयोगाने करायला हवे. मतदान करण्याविषयी लोकांमध्ये किती ही जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी शिकले सवरलेले मतदार मतदान प्रक्रियेपासून दूर राहतात. मतदानासाठी सुट्टी देऊन देखील कर्मचारी मतदान करण्या ऐवजी त्या सुट्टीचा उपयोग सहलीसाठी करताना दिसून येतात. त्यामुळे या विषयी काही विशेष यंत्रणा तयार करून मतदान न करणाऱ्या मतदारांचा शोध घेऊन त्यावर अभ्यास करणे आवश्यक आहे. ह्या मतदारांनी मतदान का करू शकले नाहीत याचा शोध लावून अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. यापुढील निवडणुकीत ऑनलाइन तंत्रज्ञानाचा उपयोग करून निवडणूक आयोग आपल्या निवडणूक प्रक्रियेत काही आमूलाग्र बदल करेल अशी आशा बाळगायला काही हरकत नाही. निवडणूक आयोगाच्या कोणत्याही योजनेत मतदारांचे सहयोग आणि सहकार्य असल्याशिवाय ती योजना सफल होत नाही. म्हणून मतदारांनी सजग होऊन आयोगाला सर्वतोपरी मदत करायलाच हवे, असे वाटते. 
- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक

Friday 6 December 2019

स्मार्ट बॉय : काळाची गरज

*स्मार्ट बॉय : काळाची गरज*

हैदराबादच्या हायटेक सिटी मध्ये डॉ. प्रियांका रेड्डी हिच्यावर चार नराधमांनी आमनुषपणे अत्याचार करून पुरावा नष्ट करण्याचा हेतूने तिला जिवंत जाळले. 


भारतात हे पहिलेच प्रकरण आहे असे ही नाही. यापूर्वी देखील अश्या अनेक घटना घडल्या आहेत मग त्यात निर्भया प्रकरण असेल किंवा असिफा प्रकरण. यात माणुसकीला काळिमा फासणारी कृत्य घडलेले आहे. अश्या लोकांना एकदम कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे पण त्यापूर्वी हे असे का घडत आहे, यावर ही चिंतन होणे अपेक्षित आहे. नवतरुण युवक असे मार्ग का अंगिकारत आहे ? यावर ही संशोधन व्हायलाच हवे. अश्या घटनांचा विरोध करण्यासाठी मुलीने स्वतः ला तयार केले पाहिजे. कराटे शिकले पाहिजे, मुलांना प्रतिकार करता येईल असे काही केले पाहिजे, अर्थात स्मार्ट गर्ल व्हायला पाहिजे असा एक सुर सध्या सर्वत्र ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. त्याऐवजी आपल्या घरातील मुलांना स्मार्ट बॉय करायला पाहिजे यावर कुठे ही चर्चा होतांना दिसत नाही. मुलांना नैतिकतेचे धडे शिकविले तर ही नामुष्की नक्कीच येणार नाही. त्यासाठी प्रशासन देखील तेवढेच कठोर कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
घरातून नैतिकतेचे शिक्षण -
आपल्या घरात असलेल्या मुलांना सर्वप्रथम नैतिकता शिकवायला हवी. कोणासोबत कसे वागावे, बोलावे ? याचे शिक्षण देणे गरजेचे आहे. पालकांनी वाढत्या वयाच्या मुलांसोबत मित्रासारखे संबंध ठेवून त्यांच्याशी संवाद करत राहणे आवश्यक आहे. दहाव्या उत्तीर्ण झाले की आज मुलांना मोबाईल आणि गाडी याची आवश्यकता भासत आहे. या दोन वस्तू दिल्याशिवाय तो पुढील शिक्षण घेणार नाही असे स्पष्टपणे बोलतांना दिसत आहेत. या दोन गोष्टी मुळेच आजची मुले अनैतिक मार्गाकडे वळत आहेत. गाडी आणि मोबाईल म्हटलं की पॉकेटमनी देखील आलेच. आजकाल पालकांकडे पैसा ही मुबलक प्रमाणात असल्याने ते ही मुलांना पॉकेटमनी देत राहतात. याचे विपरीत परिणाम पाहायला मिळते. सध्या मोबाईलवर अनेक प्रकारचे वेबसाइट उपलब्ध आहेत जे की, या युवकांना वाईट मार्गावर घेऊन जातात. मित्रपरिवारामध्ये हळूहळू ही बाब गंभीर वळण घेत जाते. काही खराब मित्रांच्या संगतीमुळे मुलगा वाईट बाबीकडे वळायला लागतो. उरलेल्या पैश्यातून मग त्याला दारू पिणे, सिगारेट ओढणे, तंबाखू खाणे, मुलींच्या मागे लागणे यासारखे घाणेरडे व्यसन लागतात. या वयातील मुले मग एका संधीची वाट पाहत असतात. ज्याप्रकारे जंगलात शिकारी आपल्या शिकारच्या शोधात असतो अगदी तसेच. म्हणूनच आपल्या घरातील मुले या वेगळ्या वळणावर जाणार नाहीत याची काळजी प्रत्येक पालकांनी घेणे आवश्यक आहे. घरातली मुलगी सात च्या आत घरात राहावे असे वाटते तर मुलगा रात्री किती वाजता ही आलेले आपणांस चालते, यात पहिल्यांदा बदल करणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी राक्षसांचा संचार असतो आणि या कचाट्यात मुलगी येऊ नये याची काळजी जसे आपण घेतो तशीच काळजी पालकांनी मुलांच्या बाबतीत देखील घ्यायला हवी. मुलांचा मोबाईल दर आठ दिवसांनी किंवा अधूनमधून कधी ही न सांगता तपासून घ्यायलाच हवे. याची मुलांच्या मनात भीती असेल तर तो मागेपुढे विचार करू शकतो. मुलांना देत असलेल्या प्रत्येक पैश्यांचा हिशेब देखील घ्यायलाच हवं आणि सोबत त्यांच्या मित्रांची देखील एकदा ओळख करून घ्यावी. या सगळ्या गोष्टी पालक म्हणून आपण कटाक्षाने करत असू तरच आपली मुलं स्मार्ट बॉय होऊ शकतात.
प्रशासनाने कडक व्हावे - असे अनैतिक प्रकार थांबविण्यासाठी प्रशासन अगदी कडक भूमिका घेणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी गाडीवर फिरणारे युवक दिसले तर त्यांची कसून चौकशी व्हायलाच पाहिजे. एक दोन वेळा अशी चौकशी झाली तर रात्रीच्या वेळी फिरायला हे युवक कचरतील. मोठ्या शहरात रात्रीच्या वेळी काही युवक मंडळी शाळेच्या मैदानात किंवा उघड्यावर जेथे रात्रीला कोणीच येत नाही अश्या निर्मनुष्य ठिकाणी चार पाच मित्र मिळून कॉकटेल पार्टी करतात. ह्या बाबीवर पोलीस प्रशासन नियंत्रण आणू शकते. रात्री सात ते दहा या वेळांत एकदा पेट्रोलिंग केलं की अश्या गोष्टीवर आळा बसू शकतो. ह्या वयातील मुले नशेच्या धुंदीत असे दुष्कृत्य करतात. त्यावेळी त्यांचे डोके सैतानाचे बनलेले असते. त्याचसोबत ह्या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षाच दिली पाहिजे तसा वटहुकूम देखील काढण्यात आला आहे. पण त्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. कायद्याची भीती मनात बसल्याशिवाय ही मंडळी घाबरणार नाहीत. चांगल्या घरातील आणि सुसंस्कारी घरातील मुले असे दुष्कृत्य सहसा करत नाहीत. ज्या मुलांकडे लक्ष देण्यास कोणी वालीच नसतो, अश्या मुलांकडून असे कृत्य होते. म्हणून समाजातील अश्या मुलांचा शोध घेणे आवश्यक आहे. ज्यांच्या हाताला काही कामधंदा नसते अशी मुले गैर मार्गाला लागतात. म्हणून प्रत्येक गावात आणि शहरातील वॉर्डात रिकामटेकडे मुलांचा शोध घेऊन त्यांच्यावर पाळत ठेवणे ही गरजेचे आहे. कमी वयोगटातील मुले काही ठिकाणी गैरवर्तन करत असतील तर त्यांना वेळीच अटकाव करणे गरजेचे आहे हे हैद्राबादच्या घटनेतुन शिकायला मिळते. भारत देश महिलांसाठी असुरक्षित देश आहे ही काळिमा प्रशासनाच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. अशी घटना यापुढे घडणार नाही याची काळजी देशातील प्रत्येकाने देखील घेणे गरजेचे आहे, असे वाटते. ( लेख लिहीत असतांनाच हैद्राबादच्या त्या चार नराधमाचे एंकौंटर झाले अशी बातमी कानावर धडकली. )

- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
www.nasayeotikar.blogspot.com

  

रानमेवा - बोरं

रानमेवा - बोरं

खास करून हिवाळा ऋतूमध्ये अनेक फळे खाण्यासाठी उपलब्ध होतात जसे जांभ आणि बोरं. ही दोन्ही फळं खाल्याने सर्दी आणि खोकला होण्याचा धोका असतो म्हणून पालक वर्ग मुलांना हे फळं खान्यापासून मज्जाव करतात. तरी देखील मुलं चोरी चोरी चुपके चुपके खातातच. सायंकाळच्या वेळेला जेंव्हा शिंक येते त्यावेळी आई बरोबर ओळखते आणि बोरं किंवा जांभ खाल्लं का ? म्हणून जोरात बोलते. लहान मुलांना खास करून आवडणारे फळ म्हणजे बोरं. जंगलातील हा रानमेवा. झिझिफस मॉरीटिएना नावाच्या जातकुळातील हे फळ असून ते भारतात बोर नावाने प्रचलित आहे. याशिवाय ते ‘जुजुबी’, ‘चायनीज डेट्स’ किंवा ‘चायनीज अ‍ॅपल’ या नावांनीही ओळखलं जातं. तसं पाहिलं तर गावालगत बोराचे अनेक झाडं असतात. ज्या झाडांची बोरं आंबट असतात त्या झाडाकडे सहसा कोणी फिरकत नाही. मात्र ज्या झाडांची बोरं गोड असतात त्या झाडाजवळ अनेक मुलं गोळा होत असतात. काही जणांच्या मालकीची देखील ही झाडं असतात त्यामुळे ते या झाडांची रखवाली करतात. ग्रामीण भागात वृद्ध मंडळी सहसा या झाडांची रखवाली करताना दिसून येतात. काही मंडळी टोपल्यात ती बोरं जमा करतात आणि गावात विक्री करतात. शाळेतील लहान मुले ही त्यांची खास गिऱ्हाईक होत. अनेक वेळा शाळेत मुले बोरं खातात आणि बोराच्या वर्गात टाकतात त्यामुळे शिक्षक मुलांवर खूप रागावतात. ते कितीही रागावले तरी मुलांचा बोरं खाण्याचा सिलसिला काही बंद होत नाही. बोरं विशिष्ट उग्र वासामुळे पटकन लक्षात येते. याचा उपयोग लोणचं टाकण्यासाठी सुद्धा केला जातो. ज्या ऋतूत जी फळं येतात ती फळं खाल्याने त्याचा वर्षभर फायदा होतो असे आयुर्वेद सांगते. म्हणून ही फळं खायलाच हवी. गोड बोरं, आंबट बोरं आणि खारका बोरं असे काही बोराचे प्रकार आहेत. काही बोरं म्हातारी बोरं म्हणून देखील ओळखले जातात. कच्चे बोरं हिरव्या रंगाचे तर पिकलेले बोरं तपकिरी रंगात दिसून येतात. सहसा हिरव्या रंगाच्या बोरात किडे असत नाहीत मात्र पिकलेल्या बोरात किडे असण्याची शक्यता असते म्हणून ती बोरं बघून खावं लागते. बोरं हे खास करून मुलांपेक्षा मुलींना खूप आवडते. बोरीवरून काही गावांचे नाव देखील वाचायला मिळते. तर काही म्हणी आणि वाक्प्रचार देखील आहेत. ज्या गावच्या बाभळी, त्याच गावच्या बोरी. सध्या संकरित बोरं जे की जांभासारखे मोठे आहेत. त्यात गावरान बोराची चव नक्कीच मिळत नाही. हिवाळ्यात येणारी ही बोरं काही कुटुंबाची रोजगार ठरत असते. म्हणून कोणाच्या डोक्यावर बोराची टोपली दिसत असेल तर नक्की त्या बोराची चव चाखून बघायलाच हवी. जी मजा गावरान बोरं खाऊन मिळते ती मजा त्या संकरित बोरात नक्कीच मिळणार नाही. आज ही बोरं बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटणार हे मात्र नक्की.  

बोरं खाण्याचे अनेक फायदे आहेत. 

कर्करोगासारख्या आजारापासून शरीराचं संरक्षण करण्याचं काम करतं. कर्करोगाला प्रतिकार करणा-या पेशी वाढवण्याचं काम करतं.
यात भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असल्यामुळे ते अँटिऑक्सिडंट म्हणूनही काम करतं.
ताण हलका करण्याची क्षमतादेखील या फळात आहे.
सर्दी किंवा शीतज्वरापासून बचाव होण्यास मदत होते. एक चमचा बोराचा रस आणि काळी मिरी यांचं सेवन केल्यास सर्दीपासून संरक्षण होतं.
अतिसार, थकवा तसंच भूक न लागणे आदी विकारांवरही हे अतिशय गुणकारी आहे.
बोर खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते.
त्वचा कोरडी होणे, काळवंडणे याचबरोबर सुरकुत्या येणे यासारखे विकार कमी करण्यास मदत करतं. त्वचेचं तारुण्य टिकवण्याची क्षमता यात आहे.
अस्थमा आणि मधुमेहाचा त्रास असल्यांनी बोरं आवर्जून खावी. रक्तातील साखर नियंत्रित राखण्याचं काम बोर करतं.
वजन कमी करण्यासही हे मदत करते.
‘अ’ जीवनसत्त्व असल्यामुळे नियमित बोर खाल्ल्यास पचनशक्ती सुधारते.
कॅल्शिअम आणि फॉफ्सरसचं प्रमाण अधिक असल्यामुळे हाडं आणि दातांच्या मजबुतीसाठी हे उत्तम आहे.

- नासा येवतीकर

Thursday 5 December 2019

शेती दिवस


आमची माती आमची माणसं

काळी माती म्हणजे मानवाचे पालनपोषण करणारे महत्वाचे साधन आहे. या काळ्या मातीत शेतकरी दिवसरात्र मेहनत करून अन्नधान्य पिकवतो म्हणून तर माणसाला खायला दोन वेळचे जेवण मिळते. अन्यथा काय मिळालं असतं ? मातीमध्ये ही अनेक प्रकार आढळून येतात. मातीच्या प्रकारावरून शेतकरी धान्य पिकवीत असतो. त्या मातीचा अभ्यास शेतकऱ्यांना नसेल तर शेतात टाकलेलं बी चांगले उत्पन्न देईल याची खात्री नसते. म्हणून आपल्या शेतात कोणती पिके येतात याची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी मातीचा पोत कमी होत नव्हतं कारण त्या काळात शेतकरी आपल्या शेतात घरातील केरकचरा शेण आणि त्याचे मलमूत्र वर्षभर जमा करून शेतात टाकण्याचे काम करत. पण आजकाल असे कुठे ही दिसत नाही. आज सर्वत्र रासायनिक खतांचा वापर वाढल्याने मातीचा पोत खालावत चाललं आहे त्यामुळे उत्पन्न देखील वाढण्याच्या जागी कमी होत आहे. याच रासायनिक खताचा परिणाम मानवी जीवनावर देखील होत आहे. त्याचसोबत आज शेतीचे क्षेत्र हळूहळू कमी होत चालले असून त्याठिकाणी सिमेंटच्या घरांची जंगले उभारली जात आहेत. पुढील काही काळात ही काळी माती देखील पहायला मिळेल की नाही शंकाच निर्माण होत आहे. कवी विठ्ठल वाघ आपल्या तिफन कवितेत म्हणतात की, काया मातीत मातीत तिफन चालते. जेवढी ह्या काळ्या माईंची सेवा केली तेवढं जास्त फायदा मानवी जीवनाला होणार आहे. फार दिवसापासून डी डी सह्याद्रीच्या चॅनेलवर आपली माती आपली माणसं नावाची मालिका प्रसारित होते. या मालिकेची धून ऐकली की मनाला जरासे हायसे वाटते. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी मातीचे अनेक प्रयोग केले आहेत. आज ही वर्धा येथे महात्मा गांधीजी यांच्या सेवाश्रम मध्ये मातीचा वापर करून घरे बांधली जातात जे की हिवाळ्यात गरम आणि उन्हाळ्यात थंडगार हवा देतात. मातीचे अनेक उपयोग आहेत त्यांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद
ता. धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

Wednesday 4 December 2019

एक राष्ट्र, एक रेशनकार्ड


एक राष्ट्र एक रेशनकार्ड

गरीब लोकांसाठी रेशनकार्ड एक महत्वाचे साधन आहे. यामुळे गरिबातल्या गरीब लोकांना पोटभर खाण्यास मिळते. परंतु काही स्थलांतर करणाऱ्या लोकांना रेशन मिळविण्यासाठी आपल्याच गावात येऊन ठराविक वेळेत रेशन घ्यावे लागते. बहुतांश वेळा ते गावात येईपर्यंत कधी कधी रेशन संपण्याच्या घटना घडतात त्यामुळे रिकाम्या हाताने परत जावे लागते. मात्र नुकतेच अन्नधान्य पुरवठा मंत्री मा. रामविलास पासवान यांनी एक देश एक रेशनकार्ड योजना संपूर्ण देशात एक जून पासून राबविण्याचे सुतोवाच केले. सध्या 14 राज्यामध्ये पॉश मशीन द्वारे ही सुविधा सुरू झाली असून लवकरच 20 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात ही सुविधा सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी लोकसभेत सांगितले. त्यामुळे याचा फायदा सर्व लोकांना होणार आहे. विशेष करून स्थलांतरित लोकांना याचा जास्त फायदा होणार. आधारकार्ड आणि रेशनकार्ड यांचा समन्वय करून सदरील योजना अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे या रेशनिंग मध्ये होणारा गडबड गोंधळ देखील काही अंशी कमी होण्यास मदत मिळेल. त्याच बरोबर रेशन दुकानात वर्षभर धान्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहे त्यामुळे जनतेला जेव्हा गरज असेल तेंव्हा धान्य घेता येऊ शकेल. हे करत असताना परत एकदा सर्व्हे करून खऱ्या गरीब लोकांचा शोध घेणे आवश्यक आहे असे वाटते. दारिद्र्य रेषेखालील लोकांची यादी जी की खूप जुनी आहे त्यात देखील सर्व्हे करून खऱ्या लाभार्थ्यांचा त्यात समावेश केल्यास ही योजना सफल होऊ शकते. दारिद्र्य रेषेखालील यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी काही मध्यम वर्गीय आणि श्रीमंत लोकं प्रयत्न करतात त्यांच्यावर आळा घालणे आवश्यक आहे. लोकांना कमी दरात धान्य मिळत असल्यामुळे लोकं आळशी होत आहेत अशी ओरड देखील अधूनमधून ऐकायला मिळते. ग्रामीण भागात तर काम करायला देखील माणूस मिळत नाहीत असे ही बघायला मिळते. त्यामुळे खरे लाभार्थी शोधून त्यांनाच या योजने अंतर्गत लाभ मिळेल याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. रेशन दुकानातील धान्य काळ्या बाजारात विक्रीला जातात असे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. यापुढे असे होणार नाही याकडे ही लक्ष देण्याची खरी गरज आहे. समाजात असे ही काही गरीब लोकं दिसून येतात ज्यांच्याकडे धान्य खरेदी करण्यासाठी पैसे नसतात. असे लोकं कोणाकडून तरी पैसे उधार घेतात. रेशन दुकानात माल विकत घेतात आणि अन्यत्र विक्री देखील करतात. या सर्व बाबीचा विचार करून ही योजना कार्यान्वित करणे आवश्यक आहे, असे वाटते. 

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक तथा स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Monday 2 December 2019

करू नका


      .          ।। करू नका ।।

प्रेमाने बोलत रहा असे करू नका वाद
जीवनात चांगल्या गोष्टीना करू नका बाद

पती-पत्नीनी नेहमी रहावे एकोप्याने 
वाद वाढतील असे करू नका संवाद

संसारात सदा चढ-उतार येतच राहतात
जीवनातल्या कटु प्रसंगाना करू नका याद

मानवी जन्म आहे श्रेष्ठ मिळणार नाही पुन्हा 
जीवन आहे अनमोल असे करू नका बरबाद

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769


कविता - पाऊस


।। पाऊस ।।

आभाळ दाटले बघ नभी
होईल भरपूर बरसात
पाऊसधारा अंगावर झेलू
मनसोक्त नाचू या पाण्यात

वादळवारे लगेच सुटतील
ढगे पळतील वेगात
छत्रीविना पाऊस पाहू
भिजुन जाऊया पाण्यात

पडला जोराचा पाऊस
साचले पाणी खड्यात
कागदाची होडी करू या 
वाहून जाऊ द्या पाण्यात

थांबला एकदाचे पाऊस
खेळूया झिम्मड पाण्यात
एकमेकावर पाणी उडवू
खेळ आलाय पहा रंगात

- नासा येवतीकर, धर्माबाद


पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...