Saturday 30 June 2018

सर्वांना मोफत शालेय गणवेष द्यावे

सरसकट मोफत गणवेश द्यावे

गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील शासनाने शाळा व्यवस्थापन समितीला गणवेश खरेदीसंबधी घेतलेला निर्णयाचे शैक्षणिक वर्तुळात स्वागत करण्यात येत असले तरी पालक वर्गात याविषयी उलटसुलट चर्चा ऐकायाला मिळत आहे. शालेय शिक्षण विभाग दरवर्षी या ना त्या कारणाने नित्य नवे प्रयोग करीत असते आणि त्यामुळे नेहमी चर्चेत असते. गेल्या वीस वर्षांपासून मुलांना शालेय गणवेश योजना शाळेच्या मुख्याध्यापकांच्या नियंत्रणाखाली खरेदी केल्या जात असे. मध्यंतरी ग्राम शिक्षण समिती द्वारे आणि त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती द्वारे गणवेश खरेदी केल्या जात होती. पण दोन वर्षीपूर्वी डी. बी. टी. यंत्रणेद्वारे मुलांच्या खात्यावर ह्या गणवेशाची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांना या ऑनलाइन यंत्रणेमुळे वेळेवर पैसे मिळाले नाही त्यामुळे अनेक विद्यार्थी नवीन गणवेश खरेदी न करता जुन्याच गणवेशावर वर्ष काढले. शाळेत विद्यार्थ्यांचा एकसारखा गणवेश कोणत्याच दिवशी दिसला नाही. काही विद्यार्थ्यांचे बँकेत खाते काढण्यास बँकेचे अधिकारी टाळाटाळ करायचे. काही ठिकाणी आधार कार्ड व बँकखाते लिंक होत नव्हते. म्हणून विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात अडचणी जात होत्या.
काही पालकांनी खाते क्रमांक न दिल्यामुळे शासनाला ते पैसे परत करावे लागले. अनेक ठिकाणी मुख्याध्यापक, पालक, बँक अधिकारी यांच्यात वाद झाले होते. काही जणांच्या खात्यात चारशे रुपये जमा झाल्यावर बँकांनी वेगवेगळे चार्जेस लावून तीनशेच्या आत रक्कम देऊ केली. दोनशे रुपयांत एक गणवेश फक्त शाळा स्तरावर होऊ शकते पण पालकांना तेवढ्या रुपयांमध्ये एक गणवेश घेणे अशक्य आहे असे काही पालकांनी बोलून दाखविले. असे असले तरी थेट हस्तांतरण प्रक्रियेमुळें गणवेश वाटपात होणारा लाखोंचा भ्रष्टाचार वाचला असे ही काही पालकांनी आपापसात बोलतांना दिसून आले. काही शाळेत मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी दोघांनी मिळून अफरातफर केल्याच्या बातम्या वाचण्यात आल्या होत्या. त्यामुळेच त्यावर्षी डी.बी.टी. यंत्रणा उपयोगात आणली होती. मात्र पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे पुनश्च एकदा मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीला गणवेश खरेदीचा अधिकार देण्याचा महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने घेतलेला निर्णय कोणा-कोणाला दिलासा देऊन जाईल हे येणारा काळ ठरवेल. मात्र गेल्या वर्षापासून गणवेशाची रक्कम चारशे रुपयावरून सहाशे रुपये केले हे महागाईच्या काळात योग्य निर्णय समजले जात आहे. सदरील मोफत गणवेश योजना ही इयत्ता पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जाती-जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील मुलांना लागू आहे. या योजनेतून फक्त भटक्या जाती-विमुक्त जाती, इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण गटातील मुले शिल्लक राहतात. या मुलांना वगळून इतर मुलांना दोन गणवेश देण्याच्या ऐवजी सरसकट सर्व विद्यार्थ्यांना एक गणवेश दिल्यास विषमतेची दरी कमी होऊन समता प्रस्थापित होण्यास मदत मिळेल आणि शाळेत दिसणारा भेदभाव कमी होण्यास मदत मिळेल. समानतेचे धडे देण्याची जबाबदारी असलेल्या शाळेतच या शासन अध्यादेशाने समानतेचे धडे गिरवले जात आहेत. ग्रामीण भागातील सरकारी शाळेत शिक्षण घेणारं सर्वच जातीचे विद्यार्थी गरीब असतात. फक्त उच्चवर्गीय प्रवर्गात मोडत असल्यामुळे त्यांना कोणतीच सवलत मिळत नाही. त्यामुळे ही मुले शाळेत वर्षभर गणवेशात येत नाहीत. ज्याप्रकारे सरसकट विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा एक संच दिला जातो. त्याच धर्तीवर सर्व विद्यार्थ्यांना एक मोफत गणवेश द्यावे.  शासनाने या विषयी गांभीर्याने विचार करावा आणि या विषयी चांगला निर्णय घ्यावा, एवढेच सुचवावेसे वाटते.

नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक व प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Friday 29 June 2018

पालकांचे मुख्याध्यापकांस पत्र

पालकांचे मुख्याध्यापकास पत्र

प्रिय मुख्याध्यापक,
सर्व प्रकारच्या शाळा.

बऱ्याच दिवसापासून आपल्याशी बोलावे म्हणून मनाशी ठरवलं होतं पण बोलायला वेळ मिळाला नाही किंवा बोलणे टाळलो. पण आज राहवलं नाही कारण माझे पाल्य शाळेतून येताना खूप।अस्वस्थ झाल्यासारखे वाटत होते. भरपूर काम करून एखादा व्यक्ती जेंव्हा थकून भागून घराकडे येतो, तेंव्हा त्यांची स्थिती जशी असते अगदी त्याच अवस्थेत दिसलं. त्याला पाहून माझे मलाच कसं तरी वाटलं ? घरात प्रवेश केल्याबरोबर खांद्यावर असलेलं प्रचंड जड दप्तर बाजूला सारत हाश हुश्श केलं आणि पलंगावर आडवं झालं. आज खरोखर मला माझ्या पाल्याची काळजी वाटायला लागली की, एखाद्या हमाला सारखे दप्तर वाहण्याचे काम माझे पाल्य करीत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. यावर काही करता येईल काय ? याचा विचार डोक्यात आला आणि पत्र लिहायला बसलो. 
खरंच मुलांच्या दप्तरांचे ओझे कमी करता येईल काय ? कसे करता येईल ? शासनाने देखील मुलांच्या वजनाच्या 10 टक्के दप्तरांचे वजन असावे असे निर्देश दिले पण त्याची कोठे ही रीतसर अंमलबजावणी होत नाही. मुख्याध्यापकांने जर या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले तर ही समस्या सुटू शकते. मात्र त्यासाठी मुख्याध्यापक मंडळी दक्ष असणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या नियोजनामुळे सर्व काही शक्य होते. म्हणून मुख्याध्यापक मंडळींना काही उपाय सुचवावेसे वाटतात. ज्यामुळे मुलांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी होण्यास मदत मिळेल. 

पुस्तकांचे वजन कमी करणे - 
उच्च प्राथमिक वर्गात विषयांची संख्या जवळपास सहा ते सात असते, रोज सर्वच विषयाच्या तासिका असतात त्यामुळे मुलांना ते सर्व पुस्तक घेऊन शाळेत जावे लागते. हीच फार मोठी समस्या दप्तराच्या वजनाच्या बाबतीत दिसून येते. यासाठी उपाय म्हणून शाळेत प्रत्येक मुलांसाठी एक संपूर्ण पुस्तकांचा सेट ठेवणे अत्यंत उपयोगी पडू शकते. असा उपक्रम जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात आल्याचे वाचण्यात आले होते. कारण त्यांच्याकडे विद्यार्थी संख्या कमी असते आणि मोफत पुस्तक योजने अंतर्गत दरवर्षी नवीन पुस्तक प्राप्त होतात. म्हणून अश्या शाळेत सहज शक्य आहे. असे वाटते. मात्र ज्या शाळेत विद्यार्थी संख्या चाळीसच्या वर असते त्याठिकाणी अन्य उपाययोजना करावी लागते. 

दोन मुलांमध्ये एक पुस्तक - शाळेत शिकतांना अनेक मुले एकमेकांचे मित्र बनतात. मैत्रीच्या नात्यातून ते अनेक गोष्टी शेअर देखील करतात. याच गोष्टीचा फायदा घेऊन दोन मित्रांना अर्धे अर्धे पुस्तक घेऊन येण्यास सांगितले आणि दोघांना एकत्र एकाच बेंच वर बसण्याची सुविधा निर्माण केल्यास दप्तरांचे ओझे नक्कीच कमी होण्यास मदत मिळेल. असा प्रयत्न नांदेड जिल्ह्यात गत वर्षात झाल्याचे वाचण्यात आले होते. शासनाने कायदा केला म्हणून आपण हे पाऊल उचलावे अशातला भाग नाही. मात्र आपल्या लेकरांना एवढ्या लहान वयात त्यांच्या खांद्यावर एवढं ओझं म्हणजे त्याचं विकास आहे की भकास हेच कळत नाही. कॉलेजात जाणारी पोरं एकच वही फिरवीत जातात आणि इथे पहिल्या वर्गात जाणारा विदयार्थी 5 किलो वजनाचे दप्तर घेऊन जातो. किती विसंगती दिसून येते. शाळेत येणारी मुले हसत यावीत आणि हसत जावीत असे वाटत असेल तर काही बदल करणे आणि नवोपक्रम राबविणे आवश्यक आहे असे वाटते. 

गृहपाठ - गृहपाठच्या कामात तर मुले कारकून व्हायचे तेवढे बाकी राहते की काय असे वाटते. एवढं स्वाध्याय किंवा गृहपाठ एकदाच दिल्या जातो. बहुतांश वेळा सर्वच शिक्षकांचे गृहापाठच्या वह्या एकाच दिवशी बोलाविले जाते. त्यामुळे मुलांच्या दप्तरांचे वजन पुस्तक आणि वह्या यामुळे आणखी वाढते. त्यामुळे गृहपाठच्या बाबतीत एखादे उपक्रम राबविले तर मुलांचा त्रास कमी होऊ शकतो. वारनिहाय विषय ठरवून त्या त्या विषयाच्या गृहपाठच्या वह्या त्याचदिवशी सोबत नेल्यास दप्तरांमध्ये अन्य वह्या दिसणार नाहीत. त्या दिवशी एकच शिक्षक त्या वर्गावर वही तपासण्याचे काम करतील. सुटसुटीतपणा आणि व्यवस्थितपणे हे कार्य चालल्यास त्याचा आनंद मुलांना तर होईलच शिवाय शिक्षकांना देखील या बाबीचा आनंद मिळणार ते वेगळं. 
म्हणून प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकानी याविषयी गांभीर्याने, विद्यार्थी हित लक्षात घेऊन एक चांगला निर्णय घ्यावे आणि त्याची अंमलबजावणी देखील पूर्ण करावे. 

दप्तरमुक्त शाळा - दप्तर शिवाय शाळेत जाणे ही कल्पनाच मुलांना लई भारी वाटते. यात मुख्याध्यापकांचे नियोजन आणि शिक्षकांचे सहकार्य मिळाल्यास दप्तरमुक्त शाळा मुलांचे एक आकर्षण बनू शकते. त्यासाठी सहसा शनिवारचा दिवस निवडावा कारण या दिवशी सहसा प्रत्येक शाळेला दुपारची सुट्टी असते. म्हणून या दिवशी सुमारे तीन साडेतीन तास मुलांना शाळेत खिळवून ठेवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम तयार असावे लागतात. दप्तर सोबत नाही म्हणजे पुस्तक नाही. मग या दिवशी काय करावे ? असा प्रश्न पडतो. मुलांना खेळ फार आवडतात. म्हणून या दिवशी विविध मैदानी खेळांची माहिती मुलांना देता येईल. तसे तर रोज खेळाचा तास असतो मात्र खरंच प्रत्येकजण या तासिकेत मुलांसोबत असतात काय ? तर त्याचे उत्तर नाही असे येते. मुलांना चित्रपट पाहायला आवडते. एखाद्या शनिवारी बाल चित्रपट पाहण्याचे नियोजन केल्यास याबाबीची देखील अनुभूती मिळेल. मुलांमध्ये वाचनाची गोडी लावण्यासाठी गोष्टीच्या पुस्तकांचे वाचन करून घेणे देखील जमू शकते. निसर्गाची ओळख व्हावी आणि मुलांच्या मनात निसर्गाविषयी प्रेम निर्माण होण्यासाठी एक शनिवार निसर्ग सहलीचे आयोजन. या पध्दतीने महिन्यातील प्रत्येक शनिवार दप्तरमुक्त शाळा घेऊन त्याचे नियोजन आणि आयोजन शिक्षकांसह पालकांना काळविल्यास या शनिवारची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतील. मुलांना पुस्तकी ज्ञानासोबत इतर ज्ञान देखील मिळत राहिले तर मुले आनंदाने शाळेत टिकून राहतील. मुलांना शाळा हे तुरुंग आहे असे वाटायला नको याची काळजी शाळाप्रमुख या नात्याने मुख्याध्यापकांनी घेणे आवश्यक आहे. 
शेतात सरकी लावल्याबरोबर कापूस वेचायला मिळत नाही. त्यासाठी खूप कष्ट आणि परिश्रम करावा लागतो. अशीच काही तंत्र या शिक्षणाच्या बाबतीत घडते. म्हणून मुख्याध्यापक या नात्याने शाळेतील प्रत्येक मुलांच्या दप्तरांचे वजन कमी करण्याचा प्रयत्न विविध उपक्रमच्या नियोजनाच्या द्वारे करावा, अशी एक पालक म्हणून आग्रहाची नम्र विनंती. 

आपला विश्वासू

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक तथा प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली
ता. बिलोली. नांदेड
9423625769

Monday 25 June 2018

प्लॉस्टिकबंदीचा निर्णय चांगला पण ....

प्लॉस्टिकबंदीचा निर्णय चांगला पण ....

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 23 जूनपासून राज्यभरात प्लास्टिक बंदी लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या निर्णयाचे स्वागत करत प्लास्टिक बंदी लागू करत असल्याची घोषणा केली. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाने जसे जनता आश्चर्यचकित झाली होती अगदी तसेच या निर्णयाने झाली म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्लास्टिकचे शहरातून आणि गावातून समूळ उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुढीपाडव्याला घोषणा करून २३ मार्च रोजी अधिसूचना काढली. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनंतर २३ जूनपासून प्लॉस्टिकबंदी प्रत्यक्षात लागू झाली आणि त्याची अंमलबजावणी देखील करण्यास प्रारंभ झाले. यापूर्वी शासनाने दारूबंदी, गुटखाबंदी आणि इतर महत्वपूर्ण निर्णय घेतले पण त्यात काही मंडळींनी पळवाट शोधून काढले आणि त्या बंदीचा म्हणावा तसा फायदा झाला नाही. परंतु प्लॉस्टिकवर टाकण्यात आलेली बंदीचा सर्वसामान्य जनतेवर खूप मोठा परिणाम होत असल्याचा गेल्या दोन-तीन दिवसांत बघायला मिळाले. प्लॉस्टिकच्या वस्तुशिवाय माणूस जीवन जगूच शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. प्लॉस्टिक वस्तूच्या एवढ्या आहारी गेले होते की, घरातून बाहेर पडताना हात हलवत जायचे आणि येताना प्लॉस्टिकच्या पिशव्या भरून माल आणायचे सवय लागली होती. आज यावर बंदी आणल्यामुळे जी माणसे पिशवी बाळगत नव्हते त्यांची खरी पंचायत झाली. महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण अधिनियम २००६ नुसार नियमभंग केल्यास पहिल्या वेळी पाच हजार रुपये आणि दुसऱ्या वेळी दहा हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तिसऱ्या वेळी पकडले गेल्यास २५ हजार रुपये व तीन महिन्यांच्या कैदेची तरतूद त्यात करण्यात आली. बंदी लागू केल्या नंतर पुणे, मुंबई, नांदेड सारख्या शहरात नोंद घेण्यासारखी कारवाई झाली. लगेच त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असे जे बोलले जायचे ते दिवस पुन्हा एकदा समोर दिसत आहेत. सर्वात जास्त वापरण्यात येणारे थर्माकोल व प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या व एकदाच वापरून फेकल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे ताट, वाटय़ा, ग्लास, चमचे इत्यादींवर आणलेली बंदी पर्यावरणासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण लग्न असो वा समारंभ यात या प्लॉस्टिकच्या वस्तू मोठ्या प्रमाणावर वापर करून उघड्यावर फेकले जाते. त्याचा त्रास जनावरांना तर होतोच शिवाय आजूबाजूच्या परिसरात पडून नाल्या बरोबर वाहत नाहीत, तुंबून जातात, वातावरण देखील खराब करतात. पूर्वी लग्न किंवा इतर कार्यक्रमात पळसाच्या पानांची पत्रावळी व द्रोण वापरले जात असत. कमळाच्या पानांची आणि केळीच्या पानांची देखील वापर केला जात असे. एवढेच नाही तर महाप्रसादसाठी सागाच्या पानांचा ही वापर होत होता. मात्र कालांतराने या सर्व बाबी मागे पडल्या आणि त्याची जागा प्लॉस्टिकने घेतली. पूर्वी दूध आणण्यासाठी ग्लास किंवा तांब्याचा वापर होत असे. चिकन किंवा मटण आणण्यासाठी स्टीलच्या डब्याचा वापर केला जात होता. डबा हातात घेऊन कोणी दिसला की लोकं समजून जायचे की, आज त्यांच्या घरी काय शिजणार ? पण लोकांच्या बेफिकीर वृत्तीमुळे गेल्या 15-20।वर्षांपासून याचा वापर जरा जास्तच वाढले होते. अति तेथे माती या म्हणीप्रमाणे या प्लॉस्टिकची माती करण्याची वेळ आली होती. शासनाने घेतलेला हा एक महत्वपूर्ण आणि चांगला निर्णय आहे पण ......लोकांनी यास सहकार्य करणे आवश्यक आहे तसे आवाहन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पहिल्याच दिवशी दिली. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडताना कापडी पिशव्या सोबत ठेवावे आणि त्याचा वापर करावा. घरातून निघताना सोबत पिशवी घेऊनच निघण्याची सवय केल्यास भविष्यात आपल्या सोबत दुकानदारांना देखील त्रास होणार नाही. बहुतेक जणांनी शासनाला विरोध दर्शविताना प्लॉस्टिक निर्मितीच्या कारखान्यावर बंदी आणण्याऐवजी सामान्य लोकांवर कारवाई करून अन्याय करीत आहे. लोकांचे हे बोलणे सत्य आणि रास्त आहे मात्र आपण स्वतः एक जागरूक नागरिक या नात्याने प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर टाळले आणि शासनाच्या निर्णयाला साथ दिली तर आपलेच पर्यावरण संतुलित राहील आणि आपले आरोग्य देखील. म्हणून सद्सद्विवेकबुद्धी जागे ठेवून प्लॉस्टिकला आपल्या जीवनातून हद्दपार करू या.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...