Saturday 28 October 2017

माझ्या नोकरीची पहिली शाळा

माझ्या नोकरीची पहिली शाळा

पावसाळ्याचे दिवस होते. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. सकाळी सातची वेळ आणि मी साखर झोपेत होतो. तशी घरातील फोनची घंटी वाजली ट्रिन ट्रिन, बाबानी फोन उचलले. तिकडून माझे मोठे बंधू बोलत होते त्यांनी म्हटले की, मला शिक्षकांची नोकरी लागली. हे ऐकून मला खुप आनंद झाला पण थोड्या वेळात कळले की, किनवट तालुका मिळाला. हे ऐकल्याबरोबर मी खिन्न झालो. किनवटला मी नोकरी करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती. कारण किनवट म्हणजे पूर्ण जंगली परिसर, त्यातल्या त्यात नक्षलवादी विजयकुमार यांच्या सर्व कारवाया मी वाचून होतो. घरापासून 200 किमी दूर या सर्व बाबीचा विचार करताना अंगावर काटा उभा राहायचा. त्यामुळे किनवट तालुक्यात नोकरी करणार नाही यावर मी ठाम राहिलो. पाच-सहा दिवस उलटले. घरातल्या सर्वानी माझी समजूत काढली. जाऊन फक्त रुजू होऊन ये त्यानंतर आपण एका महिन्यात बदली करू असा विश्वास दाखविला त्यामुळे मी जाण्यास तयार झालो. अखेर 10 ऑगस्ट रोजी किनवटला जाण्यास सकाळी निघालोत दुपारी बारा-एक वाजेपर्यंत किनवटला पोहोचलोत आणि पंचायत समिती मध्ये पत्र दिलोत. सोबत बाबा होतेच. त्यादिवशी ऑफिस मध्ये गटशिक्षणाधिकारी साहेब नसल्यामुळे लॉजवर रात्र काढावे लागले. त्या ठिकाणी माझा वर्गमित्र चंद्रकांत नोमुलवारची भेट झाली तेंव्हा थोडे बरे वाटले. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ऑफिस गाठले. त्या दिवशी दुपारी अनंतवाडी संकुलातील प्राथमिक शाळा अजनी या शाळेचे आदेश मिळाले. त्याच ऑफिसमध्ये एक दोघांना या शाळेविषयी आणि केंद्राविषयी विचारणा केली असता ते गाव कोणालाही माहित नव्हते. माझं काळीज धस्स केलं. इथल्या लोकांना हे गाव माहित नाही, कोणत्या जंगलात आहे की, असा विचार मनात डोकावला. तेंव्हा स्वतः गटशिक्षणाधिकारी साहेब श्री शिवाजीराव खुडे यांनी त्या गावाची माहिती दिली, अंनतवाडीला कुपटी असे म्हणतात हे त्यांनी सांगितले आणि बस स्टैंडला जा तेथे तुम्हाला गाडी मिळेल त्या गाडीने तुमच्या शाळेच्या फाट्यावर उतरा. मी आणि बाबा निघालो. बस स्टैंडवर बरोबर अडीच वाजता दत्तमांजरी बस लागली. त्या बसमध्ये बसलो आणि बस शाळेच्या रस्त्याने झाडे मागे टाकित, धुरळा उडवित जाऊ लागली. मी प्रत्येक गाव आणि परिसर पाहू लागलो तसे मला धडकी भरु लागली. लोकांचे राहणीमान, त्यांचे बोलणे, वागणे सर्व वेगळे वाटत होते. कारण मी यापूर्वी कधी ही हा भाग बघितला नव्हता. अखेर माझ्या शाळेचे गाव आले. आम्ही खाली उतरणार तोच त्या शाळेचे मुख्याध्यापक बसमध्ये चढले. त्यांनी परत त्याच बसमध्ये बसायला सांगितले. त्यापुढच्या वझरा शे.फ. गावात आम्ही उतरलो. आमची सर्व कहाणी सांगितली. ते खरंच आम्हांला देवमाणूस वाटला कारण त्यांनी त्या दिवशी त्यांच्या घरीच राहायला आणि झोपायला जागा दिली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 ऑगस्टला मुख्याध्यापक, बाबा आणि मी सकाळी सकाळी शाळेवर जाण्यास निघालो. तोच हा सुवर्ण दिवस, ज्या दिवशी माझ्या नोकरीला सुरुवात झाली. सर्व परिसर पाहून माझ्या मनात विलक्षण भीती भरली होती. मुख्य रस्त्यापासून दोन किमीमध्ये शेताशेतातून त्या शाळेला रस्ता होता. आजुबाजुला जंगल, खुप भीती वाटत होती. मनात पक्का निर्धार केलो की, काही झाले तरी येथे नोकरी करायचे नाही. आत्ता नाही तर पुढील वेळी आपणांस नक्की नोकरी मिळेल. अर्धा तासाच्या पायपीटनंतर शाळेत पोहोचलो. जेमतेम 50 कुटुंब असलेले ते गाव. सर्व घरे सागवानच्या लाकडापासून बांधलेले, मातीचा लेप, एक किंवा दोन घरे पक्की होती. शाळा नशिबाने एकच खोली होती पण पक्की होती. सर्व चिमुकली मुले मुख्याध्यापकांची वाट पाहत उभी होती. ती मुले मला वेगळीच दिसू लागली. आपल्याकडची गोरी गोमटी आणि टापटीप स्थिती मधील मुले माझ्या डोळ्यासमोर होती. बाबांना आणि मला ती मुले निरखुन पाहू लागली. तो दिवस असा तसा संपला. सायंकाळी बाबा गावाकडे निघुन गेले. मी मुख्याध्यापकाच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहिलो. दोन दिवसांनी स्वातंत्र्य दिवस होता. तो दिवस झेंडावंदन करून घरी जाण्याचा नियोजन बाबांनी सांगून गेले होते म्हणून मी झेंडावंदन झाले की दुपारच्या बसने माझ्या गावी घरी आलो. घरी यायला रात्र झाली. घरी आल्यावर रात्रभर रडत बसलो आणि निर्णय दिला की मी त्या शाळेवर नोकरी करणार नाही. दोन दिवस घरी राहण्याची सुटी घेतलो होतो. पण पाच दिवस संपले मी शाळेला गेलोच नाही. पाचव्या दिवशी रात्री परत घरातील सर्वानी मला समजावून सांगितले. नोकरीचे मला काही वाटत नव्हते. माझ्या अभ्यासावर आणि मेहनतीवर मला विश्वास होता. मी कसे ही करून नोकरी मिळवू शकतो याची खात्री होती. ( पण आज वाटत आहे की, मी खरंच खूप मोठी चूक करणार होतो. ) पण बाबांना ही मिळालेली नोकरी सुटु नये असे वाटत होते. सात दिवसानंतर परत एकदा बाबामाझ्या सोबत आले. त्यांनी मला एक खोली घेऊन दिली, सर्व साहित्य घेऊन दिले, त्यांनी दोन दिवस माझ्यासोबत राहिले. मी एकदा तिथे रूळलो की बाबा परत गावी निघून गेले. हळूहळू मला त्या शाळेचा आणि परिसराचा लळा लागला आणि मी त्या दुर्गम शाळेत पाच वर्ष सेवा दिली. त्या शाळेने मला जीवनातील अनेक कडू-गोड अनुभव दिले. त्या गावातील मंडळी मला आज ही आठवतात, आमचे अध्यक्ष रमेश, जायभाये परिवार, अंगणवाडीचे भंडारे ताई, माझे मुख्याध्यापक डी. बी. शेख, बालाजी रेनगुंटवार, जगन्नाथ दिंडे, माधव बाभळे, मोरेश्वर गायधने, अहमद मुल्ला, तेंव्हाचे केंद्राचे मुख्याध्यापक व्ही. बी. सोरते, अशोक गायकवाड, संजय कांबळे, संजय कळसकर, मारोती चोंडीकर, केरबा उमाटे,मंगेश हानवते, दिगंबर शेंगेपलू, स्व. सुभाष कराड, असे अनेक चांगले जिवाभावाचे मित्र दिले. माहूर शहरात ज्यांच्या घरी किरायाने राहत होतो ते सुभाष जाधव आणि परिवार यांचा स्नेहही स्मरणात आहेच. कुपटी गावात ज्यांनी मला त्यांच्या कुटुंबात एका परिवारातील सदस्यांसारखे प्रेम दिले ते संपूर्ण टेकाळे परिवार, ज्यांच्या घरी किरायाने होतो ते डॉ. सातव परिवार आणि कदम परिवार यांनी खरा आधार दिला. रिकामा वेळ गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळण्यात घालवत असे. त्या सर्व मित्रांची आज ही आठवण कायम स्मरणात आहे. यापैकी कोणाला ही विसरणे अशक्य आहे. आज मला राहून राहून वाटते की, कदाचित तेंव्हा मी त्या शाळेला धुडकावलो असतो तर आज मी जसा आपणास दिसतो आहे तसा राहिलो नसतो, नक्की वेगळाच भेटलो असतो. माझ्या पहिल्या शाळेची ही आठवण मी जीवनभर विसरु शकत नाही. आज 12 ऑगस्ट रोजी माझ्या नोकरीला 21 वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने केलेली एक आठवण

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड

परावलंबी जीवन

परावलंबी जीवन

समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटले आहे की, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. परावलंबी जीवनात कसल्याही प्रकारची प्रगती होत नाही. व्यक्ती आळशी बनतो, त्याला काही करावे असे मुळीच वाटत नाही. म्हणून स्वावलंबी जीवन जगण्याचा नेहमी प्रयत्न करावा. त्यामुळे मानसिक समाधान तर मिळतेच शिवाय उत्तरोत्तर प्रगती देखील होत राहते. मला हे जमत नाही म्हणून मदतीसाठी कुणाकडे हात पसरणे एक किंवा दोन वेळा ठीक आहे मात्र वारंवार जर आपण त्या बाबतीत मदत घेऊ लागलो तर त्याविषयी आपले काम नेहमीच अडखळून राहते. काही गोष्टी कधी ना कधी शिकावेच लागते तर त्यास मला जमत नाही असे म्हणून मागे सारण्यात अर्थ नाही. उलट ते काम शिकण्याची तयारी ठेवल्यास एक दिवस नक्की त्या कामात यश मिळू शकते. शालेय जीवनात अनेक मुले वर्गातील हुशार मुलांवर अवलंबून असतात. गृहपाठ किंवा स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी वर्गातील हुशार मुलांच्या वह्या वापरले जातात. परीक्षा जवळ येऊ लागले की त्यांचेच नोटस मागितले जातात. त्यामुळे ही मुले स्वयंपूर्ण होऊच शकत नाहीत. अर्थात याच कारणामुळे हुशार मुले सदैव पुढेच असतात तर स्व अभ्यास न करणारी मुले मागेच राहतात. त्यासाठी शालेय जीवनापासून आपण स्वावलंबी राहण्याचा प्रयत्न केल्यास आपण चांगली झेप घेऊ शकतो. काही गोष्टी समजून घेण्यासाठी इतरांची मदत आवश्यक असते मात्र ती मदत घेताना त्याच्या अधीन होऊ नये याची काळजी घ्यावी. कुटुंबात मुले जेंव्हा लहान असतात तेंव्हा ती परावलंबी जीवन जगतात. त्यांना कुटुंबातील प्रत्येकजण मदत करीत असतो. कमावते वय झाल्यावर देखील तुम्ही कुटुंबात परावलंबी जीवन जगत असाल तर कोणी तुम्हाला जवळ येऊ देणार नाही. ठराविक काळापुरते सर्वजण मदत करतात. मात्र त्यानंतर ऐतखाऊ आहे म्हणून दुर्लक्षित करतात. आपल्या स्वतःचे एक कुटुंब तयार झाल्यावर तर दुसऱ्यांवर विसंबुन राहणे कसे जमेल ? जमणार नाही. कुठे ना कुठे काही ना काही काम करून पैसे कमवावे लागते तेंव्हाच कुठे घर चालते. म्हणून कोणतीही व्यक्ती परावलंबी जीवन दीर्घकाळ जगू शकत नाही. ज्याचे हात, पाय आणि मेंदू नेहमी सक्रीय कार्यरत असते त्याचे जीवन स्वावलंबी तर असेच शिवाय प्रगतीशील राहते. इतरांकडे नोकरी करणे म्हणजे एकप्रकारे परावलंबी जीवन होय कारण याठिकाणी आपल्या मनानुसार जीवन जगता येत नाही. आपणास जेंव्हा सुट्टी हवी असते त्यावेळी सुट्टी मिळत नसेल तर आपल्या या परावलंबी जीवनाचा खुप राग येतो. त्यासाठी स्वतःचे काही उद्योग किंवा रोजगार निर्माण करणारे मंडळी आपले जीवन आनंदात जगू शकतात. प्रसिध्द उद्योजक नेहमी म्हणतात की, कुणाकडे रोजगारासाठी हात पसरण्यापेक्षा दुसऱ्यांच्या हाताला काम देता येईल असे काही तरी काम करावे. हे सर्वाना जमणार नाही पण ज्याना जमते त्यांनी असे प्रयत्न चालू ठेवणे आवश्यक आहे. इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतातील सर्व खेडी स्वयंपूर्ण होती म्हणजे स्वदेशी वस्तू वापरुन स्वावलंबी होते. मात्र इंग्रजानी त्यांच्या वस्तू भारतात आणल्या आणि येथील लोक परावलंबी होऊ लागले. पूर्वी कामाच्या मोबदल्यात धान्य दिले जात असे त्यामुळे पैश्याची कुठे गरज पडत नव्हती. मात्र कालांतराने कामाच्या मोबदल्यात पैसा आला तेंव्हापासून प्रत्येक वस्तू विकत मिळू लागली. याच वेळी लोकांच्या परावलंबी जीवनाला सुरुवात झाली. पूर्वी दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती तेंव्हा लोक कोसो मैल पायी जात असत. कोणावर अवलंबून राहत नसत. आज त्या उलट आहे दळणवळणाची अनेक साधने उपलब्ध असल्यामुळे स्वतःचे हात-पाय कशाला हलवायचे असे विचार आपण करतो. पूर्वी गावात अनेक विहीरी आणि हातपंप असायचे पाण्यासाठी. आज विहीरी बुजल्या आणि हातपंप बंद पडले. एक बटन मारले की बोअरवेलद्वारे पाणी वर येते. हे आपले तंत्रज्ञानामधील विकास आहे मात्र एक-दोन दिवस काही कारणाने गावात लाईट नसेल तर चूळ भरण्यास ही पाणी मिळत नाही, ही वाईट अवस्था खेड्यात बघायला मिळते. यास कोणते जीवन म्हणाल ? स्वावलंबी की परावलंबी..! आपण एक पाऊल देखील पायी चलण्यासाठी तयार नाही. जवळच्या अंतरावर देखील गाडीचा वापर करतो. प्रत्येक काम करताना आपण दुसऱ्यां कश्यावर तरी अवलंबून असतो म्हणून आपले सर्व काम बिघडत जातात. तेंव्हा आत्ताच सर्वानी आत्मपरीक्षण करून ठरवा की आपले स्वतःचे जीवन स्वावलंबी आहे की परावलंबी.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
  9423625769

Friday 27 October 2017

भारताचे शिल्पकार पंडीत नेहरू

भारताचे शिल्पकार आणि जगाचे शांतीदूत

भारतात लोकशाही समाजवादाचा पाया घालणारे थोर शिल्पकार आणि जगाला शांततेचे महत्व सांगणारे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची आज आज जयंती. सुखी, समृद्ध आणि ऐश्वर्यसंपन्न अश्या नेहरू घराण्यात दिनांक 14 नोव्हेंबर 1889 रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू वकिलीचा व्यवसाय करीत होते. जवाहरलाल यांना बाहेरील विषम वातावरणाचा संबंध येवू नये यासाठी त्यांचे प्राथमिक शिक्षण इंग्रज गवर्नेसच्या देखरेखीखाली घरीच पूर्ण करण्यात आले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना विदेशात पाठविण्यात आले. बैरिस्टरची पदवी मिळवून ते भारतात परतले. विदेशात शिक्षण घेताना जॉन स्टुअर्ट मिल, ग्लैडस्टन, जॉन मोर्ले इत्यादी विचारवंत लेखकांच्या पुस्तक वाचनातून त्यांना राजकीय व सामाजिक जीवनाची माहिती मिळाली. रसेलच्या वाचनातून त्यांनी मानवतावाद आत्मसात केले तर बर्नाड शॉ यांच्यामुळे ते समाजवादी बनले. सन 1916 मध्ये त्यांचा विवाह कमला कौर यांच्याशी झाला. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी ह्या त्यांच्या एकुलती एक कन्या होत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात असताना इंदिराजींना लिहिलेली पत्रे आजही प्रसिध्द आहेत. त्यांच्या पत्रव्यवहारातूनच इंदिराजीचे व्यक्तिमत्व घडले असे म्हणणे अतिशयोक्तिचे ठरणार नाही.
पं. नेहरुनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीतून केली. महात्मा गांधीजींच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्या राजकीय कार्याला व्यापक बैठक व निश्चित अशी दिशा मिळाली. सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी आणि पंडीत नेहरू या त्रिकुटामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले. पंडीत नेहरू हे गांधीजीचे आवडते शिष्य होते. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण ? या प्रश्नांची उकल गांधीजीनी पंडीत नेहरू यांची निवड करून चुटकीसरशी सोडविली. ही निवड सार्थ ठरविताना पंडीत नेहरू यांनी सलग बारा वर्षे पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली. भारत स्वतंत्र होत असताना निर्वासितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, काश्मीरचा प्रश्न, हैद्राबादवरील निजाम आणि गोव्यातील पोर्तुगीज यांच्या विरुद्ध कारवाईचा प्रश्न यासारख्या समस्या त्यांनी सोडविल्या. देशात लोकशाही समाजवादाचा पाया घालताना पंचवार्षिक योजनेची सुरुवात केली आणि शेती व उद्योगधंद्यास चालना देवून देशाला प्रगती पथावर नेण्याचे काम त्यांनी आपल्या करकिर्दीत केले.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांना अनेकवेळा तुरुंगवास भोगावा लागला. बेचाळीसच्या लढ्यात त्यांना अहमदनगरच्या तुरुंगात तीन वर्षे काढावे लागले. याच काळात त्यांनी जगप्रसिध्द अशी ऐतिहासिक कादंबरी डिस्कवरी ऑफ इंडिया ( भारत एक खोज ) आणि ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे ग्रंथ लिहून काढले. कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण भारतभ्रमण केले. या प्रवासात त्यांना भारतातील गरिबी आणि दारिद्रय फार जवळून पाहायला मिळाले. या जनतेचे दारिद्रय दूर केले नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे त्यांनी त्यावेळीच ठरविले. समाजातील प्रत्येक व्यक्तीला महत्त्व आहे आणि तिला पूर्ण विकासाची संधी द्यायला हवी असा त्यांचा आग्रह होता. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेने सोडविण्याच्या दृष्टीने त्यांनी जगासमोर पंचशील तत्वे मांडली. त्यांच्या या विचाराचा गौरव करून त्यांना शांतीदूत ( एंजेल ऑफ पीस ) पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामुळे जगात भारत देशाची एक वेगळीच छाप पाडण्यात ते यशस्वी झाले.
पंडीत नेहरू यांना जीवनात फक्त दोनच गोष्टीचे विशेष असे आकर्षण होते, एक म्हणजे गुलाबाचे फुल आणि दुसरे म्हणजे लहान मूल. गुलाबाच्या फुलाच्या सुगंधाप्रमाणे त्यांचे कार्य सर्वत्र दरवळत राहिले. मुलांवर त्यांचे खुप प्रेम होते म्हणून लहान मुलांचे ते चाचा नेहरू बनले. त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो. पंडीत नेहरू किती हळव्या मनाचे होते हे एका अनुभवावरुन सिध्द होते, सन 1962 च्या भारत-चीन युध्दाच्या वेळी भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गायिलेल्या कवी प्रदीप यांच्या ए मेरे वतन के लोगो हे गीत ऐकून नेहरूजींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते, असा अनुभव वाचण्यास मिळतो. याच युध्दाच्या धकाधकीतून ते सावरले नाहीत आणि अखेर 27 मे 1964 रोजी हा तेजस्वी तारा निखळला. त्यांनी आपली शेवटची ईच्छा लिहिली होती की, माझ्या देहाची मूठभर रक्षा गंगेत टाकावी, तेथून ती उंच आकाशात न्यावी, जिथे शेतकरी काम करतो त्या शेतात पडावी. माझ्या देहाचा कणनकण मातृभूमीच्या मातीशी एकरूप व्हावी, हीच माझी अखेरची ईच्छा आहे. पं. नेहरूच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन..!

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Wednesday 25 October 2017

बदल्या - कही खुशी कही गम

*शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या : कही खुशी कही गम*

बदल हा संसाराचा नियम असतो. पावसाळ्यानंतर हिवाळा आणि हिवाळ्यानंतर उन्हाळा मग पुन्हा पावसाळा हा निसर्ग नियम जर मोडीत निघाले तर पर्यावरण चक्र सुध्दा बिघडते. अर्थातच मानवी जीवनासह पशू पक्षी वेली, वृक्ष यांचे ही जीवन संकटात पडते. त्यामूळे ज्या क्रिया जेव्हा घडायाला पाहिजे त्याच वेळेला घडत राहिले तर सर्व काही योग्य होत राहते. हे बदल आठवण येण्याचे कारण म्हणजे सध्या चर्चेत असलेले प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या. तसे तर एप्रिल आणि मे महिना उजाडला की सर्वत्र कर्मचाऱ्याचा बदलीचा प्रश्न सर्वांच्या मनात चर्चिले जाते. बदल्या होणार की नाही, झाल्या तर किती टक्के होणार, प्रशासकीय होतील काय, कोणत्या नियमानुसार होतील या सारख्या विविध प्रश्नांची चर्चा केली जाते. जिल्हा परिषद मध्ये अनेक प्रकारचे कर्मचारी कार्यरत असतात मात्र सर्वांचे लक्ष शिक्षकांच्या बदल्याकडे सर्वात जास्त लागून असते. दरवर्षी एप्रिल महीना उजाडला की शिक्षकाच्या बदल्याच्या चर्चेला प्रारंभ होते आणि मे महीना संपेपर्यंत हे चर्चेचे गु-हाळ चालूच राहते. पण यावर्षी ऑक्टोबर महिना उजाडला तरी शिक्षकांच्या बदल्याचा प्रश्न अजुन संपला नाही. बदल्याबाबत रोज नवीन काही तरी ऐकून शिक्षक सध्या परेशान होत आहेत. बदली होईल किंवा नाही याबाबत संभ्रम अवस्था आहे.
सन 2013 या वर्षापासून विविध कारणांमुळे शिक्षकांच्या बदल्या प्रलंबित ठेवण्यात येत आहेत. त्यामूळे शिक्षक वर्गात नाराजीचे सुर पसरले असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता कर्मचाऱ्याची बदली करणे हा काही जणांना क्लेशदायक वाटत असते तर काही जनांना आनंद देणारी वाटते. जे मूळ गावापासून खूप दूर अंतरावर काम करीत आहेत त्यांना आपल्या गावाकडे परत येण्याचे वेध लागलेले असतात. जे शिक्षक शहरापासून 20 - 25 किमी दूर अंतरावर खेड्यात, वाडी, वस्त्या, पाडी तांड्यावर काम करीत आहेत त्यांना शहरांजवळ किंवा सोईस्कर शाळा मिळावी असे वाटते त्यात त्याचे काही चूक नाही. गेल्या कित्येक वर्षापासून आदिवासी भागात काम करणारे किती वर्ष अजून तेथेच खितपत पडावे ? त्यांना सुध्दा या सोप्या भागात काम करण्याची ओढ लागलेली असते. ही मंडळी दरवर्षी बदली प्रक्रियेची चातक पक्ष्यांसारखे वाट पाहत असतात. 
बदली प्रत्येकाना हवीहवीशी वाटत नाही. जे आज सुखात आहेत त्यांना बदली कधीच होऊ नये असे वाटते. कारण त्यांचे सर्व काही सुखात, मजेत आणि आनंदात चाललेले असते. मात्र जे दुःखात, कष्टात काम करीत आहेत त्यांना बदल्या हे एक सुखाचा आशेचा किरण वाटतो. बदल्या न करता नेमके त्यांच्या आनंदावर विरजन टाकल्या जाते. आदिवासी तालुक्यांत काम करणारा आमचा शिक्षक मित्र गेल्या पाच वर्षापासून मूळ तालुक्यांत बदली मिळविण्यासाठी खूप धडपड केली. पण दरवर्षी वेगवेगळ्या कारणाने त्याची बदली काही झाली नाही. आपल्या कुटुंबापासून दूर राहून नौकरी केली आणि अचानक एके दिवशी आमच्या सर्वामधुन निघून गेला, त्याची मूळ तालुक्यात येऊन नौकरी करण्याचे स्वप्नं हे स्वप्नच राहिले. घरापासून दूर नौकरी करीत असलेली मंडळी कौटुंबिक सूखापासून वंचित राहतात. त्यांचे मानसिक समाधान नसते. अशी मंडळी शारीरिक बाजूने सुध्दा खचलेली असतात. मग शाळेत परिणामकारक अध्यापन करू शकतील काय ? या शैक्षणिक वर्षातील जून महिन्यापासून ज्याची बदली होते असे समजले त्या सर्व शिक्षक मंडळीचे शाळेवर अजिबात लक्ष नाही. मे महिन्याच्या पूर्ण सुट्टीचा कालावधी याच बदल्याच्या प्रक्रियेत संपला. आत्ता दिवाळीच्या सुट्टीचा कालावधी ही या बदल्यात संपतो की काय अशी शंका शिक्षकांच्या मनात आहे. एकूणच या बदल्याच्या किचकट प्रक्रियामूळे शिक्षक वर्गात नाराजीचे सुर पसरत आहे. एक तर ऑनलाइन प्रक्रिया ही खर्चिक आहे आणि सामान्य शिक्षकांना न उलगडणारी आहे. यामूळे महाराष्ट्र प्रगत करण्याचे स्वप्न खरोखरच पूर्णत्वास जाईल काय ? अशी शंका सुध्दा राहून राहून मनात येत राहते. 
वेगवेगळ्या कारणाने बदल्या रद्द होत आहेत. कधी समायोजन झाले नाही म्हणून बदल्या रद्द होतात तर कधी पदोन्नती झाली नाही म्हणून बदल्या रद्द केल्या जातात. बदली हा प्रत्येक कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. मात्र दरवर्षी या हक्कांवर या ना त्या कारणांमुळे गदा आणली जाते आणि बदल्याची प्रक्रिया रेंगाळते. यावर्षी शिक्षकांच्या बदल्या व्ह्ययल्याच पाहिजे. आज कित्येक शिक्षक मंडळी या बदल्याच्या प्रक्रियेवर आपली पुढील आशा स्वप्नं रंगवून ठेवलेले आहेत. कर्मचाऱ्याना त्यांच्या सोइच्या जागी बदली होणे, त्यांच्या कार्याची गती वाढविण्यासाठी आवश्यक आहे. मनात आलेली मरगळ दूर करण्यासाठी, शिक्षकामध्ये उत्साह व नवचैतन्य निर्माण होण्यासाठी शिक्षकांच्या बदल्या आवश्यक आहेत. या बदल्याचा कर्मचाऱ्यात कही खुशी कही गम असे दिसून येईल यांत शंका नाही. मात्र बदल्या झाल्याच पाहिजे, बदल्या झाल्या तरच महाराष्ट्र पूर्णपणे प्रगत होण्यास मदतच होईल असे वाटते. 

- नागोराव सा. येवतीकर 
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...