अक्षय तृतीया : शुभ मुहूर्त
हिंदू संस्कृतीत मुहूर्ताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य करायचे म्हणजे त्यासाठी चांगला मुहूर्त असावा लागतो. चांगल्या मुहूर्तावर सुरू केलेल्या कार्यात हमखास यश मिळणारच असा विश्वास असतो. वैशाख महिन्यातील शुध्द तृतीयेला येणाऱ्या अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून समजल्या जाते. संपूर्ण दिवसभर हा दिवस चांगल्या समजल्या जातो. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला व्यापारीवर्गात व समाजात अनेक विशेष करून शेतकरी वर्गात महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गुंजभर तरी सोने खरेदी करण्याची फार पूर्वीपासूनची परंपरा आजतागायत चालू आहे. या दिवशी खरेदी केलेल्या सोन्याने घरात लक्ष्मीचा वास होतो आणि वर्षभर संपत्तीत वृद्धी होते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे राज्यात या दिवशी अनेक लोकाकडून सोने खरेदी केल्या जाते. व्यापाराच्या दृष्टीने हा दिवस शुभ मानला जातो.
कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हणले जाते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.
या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. नर-नारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते. परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते. वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक आणि समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांचा जन्म याच अक्षय तृतीयेला सन 1105 मध्ये झाला होता. वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे.
कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हणले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते'.
या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे.
भारतीय पंचांगानुसार दिवाळी व दसरा या सणानंतर अक्षय तृतीया तिथीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. शेतकरी वर्गासाठी तर हा दिवस आपल्या नवीन कामाचा शुभारंभ करण्याचा दिवस असतो. या दिवशी शेतकरी आपल्या घरातील सर्व सदस्यांसह शेतात जातात. त्याठिकाणी शेती कामासाठी उपयोगी पडणारे नांगर, फाळ, वखर इत्यादी अवजारांची यथायोग्य पूजा करून शेतातील कामाची सुरुवात करतात. जमिनीची भाजणी, ढेकळे फोडून वाफे तयार करणे, शेतातील तण वेचणे व कचरा जाळून नष्ट करणे इत्यादी कामे केल्या जातात. पूजाअर्चा विधी संपल्यानंतर शेताला शिजवलेला भात, हरबर्याची भाजी, दही व आंबील याचा नैवेद्य दाखविला जातो. शेतात बसून शेतकरी व त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य वनभोजन करतात. बायका-पोरं शेतातील झाडाला दोरी बांधून संपूर्ण दिवसभर झोका खेळण्याचा आनंद घेतात. याच दिवसापासून शेतकरी आपल्या शेतीसाठी सालगडीचा करार करतात.
या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे. त्यास्तव हा दिवस प्रत्येकाने व्यापाराने शेतकऱ्यांनी आणि आपण सर्वजण मोठ्या आनंदाने साजरा करावे तसेच नवीन वर्षात काहीतरी चांगले काम करण्याचा संकल्प या दिवशी केल्यास त्यात आपणास नक्कीच यश मिळेल.
- नासा येवतीकर, धर्माबाद,
9423625769