Tuesday, 29 April 2025

अक्षय्य तृतीया ( Akshayya Trutiya )

      अक्षय तृतीया : शुभ मुहूर्त

हिंदू संस्कृतीत मुहूर्ताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य करायचे म्हणजे त्यासाठी चांगला मुहूर्त असावा लागतो. चांगल्या मुहूर्तावर सुरू केलेल्या कार्यात हमखास यश मिळणारच असा विश्वास असतो. वैशाख महिन्यातील शुध्द तृतीयेला येणाऱ्या अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून समजल्या जाते. संपूर्ण दिवसभर हा दिवस चांगल्या समजल्या जातो. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला व्यापारीवर्गात व समाजात अनेक विशेष करून शेतकरी वर्गात महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गुंजभर तरी सोने खरेदी करण्याची फार पूर्वीपासूनची परंपरा आजतागायत चालू आहे. या दिवशी खरेदी केलेल्या सोन्याने घरात लक्ष्मीचा वास होतो आणि वर्षभर संपत्तीत वृद्धी होते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे राज्यात या दिवशी अनेक लोकाकडून सोने खरेदी केल्या जाते. व्यापाराच्या दृष्टीने हा दिवस शुभ मानला जातो. 
कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हणले जाते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.
या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. नर-नारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते. परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते. वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक आणि समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांचा जन्म याच अक्षय तृतीयेला सन 1105 मध्ये झाला होता. वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे.
कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हणले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते'.
या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे.
भारतीय पंचांगानुसार दिवाळी व दसरा या सणानंतर अक्षय तृतीया तिथीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. शेतकरी वर्गासाठी तर हा दिवस आपल्या नवीन कामाचा शुभारंभ करण्याचा दिवस असतो. या दिवशी शेतकरी आपल्या घरातील सर्व सदस्यांसह शेतात जातात. त्याठिकाणी शेती कामासाठी उपयोगी पडणारे नांगर, फाळ, वखर इत्यादी अवजारांची यथायोग्य पूजा करून शेतातील कामाची सुरुवात करतात. जमिनीची भाजणी, ढेकळे फोडून वाफे तयार करणे, शेतातील तण वेचणे व कचरा जाळून नष्ट करणे इत्यादी कामे केल्या जातात. पूजाअर्चा विधी संपल्यानंतर शेताला शिजवलेला भात, हरबर्‍याची भाजी, दही व आंबील याचा नैवेद्य दाखविला जातो. शेतात बसून शेतकरी व त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य वनभोजन करतात. बायका-पोरं शेतातील झाडाला दोरी बांधून संपूर्ण दिवसभर झोका खेळण्याचा आनंद घेतात. याच दिवसापासून शेतकरी आपल्या शेतीसाठी सालगडीचा करार करतात. 
या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्‍त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे. त्यास्तव हा दिवस प्रत्येकाने व्यापाराने शेतकऱ्यांनी आणि आपण सर्वजण मोठ्या आनंदाने साजरा करावे तसेच नवीन वर्षात काहीतरी चांगले काम करण्याचा संकल्प या दिवशी केल्यास त्यात आपणास नक्कीच यश मिळेल.

- नासा येवतीकर, धर्माबाद,
9423625769
 

Sunday, 27 April 2025

आधार ( Aadhar )

आधार जीवनाचा सौंदर्य
संस्कृत भाषेत एक श्लोक आहे 
आधारो हि जीवनस्य,
संकटे दीपकः स्मृतः।
साहाय्यं कुरु सर्वेषां,
भव जीवनसंगतः॥
आधार हा जीवनाचा दीप आहे; संकटात तो प्रकाश देतो. सर्वांना मदत करा, कारण त्यानेच जीवन सुंदर होते असा त्याचा अर्थ आहे.
"आधार" हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. आधार म्हणजे सहाय्य, मदत, पाठिंबा व स्थैर्य देणारी गोष्ट किंवा व्यक्ती. आधाराशिवाय कोणीही राहू शकत नाही. एकमेकांचा आधार हाच सुखी जीवनाचा मंत्र आहे. लहानपणापासूनच आपण आधाराच्या गरजेत असतो. लहानपणी आई-वडिलांचा आधार, शिक्षण घेताना शिक्षकांचा आधार, समाजात वावरताना मित्रांचा आधार आणि हेच आधार आपल्याला उभं राहायला शिकवतात. नवरा-बायको यांना एकमेकांचा भक्कम आधार असेल तरच ते जीवनातील कोणत्याही संकटाचा सामना यशस्वीपणे करू शकतात. ज्याप्रकारे रथाचे दोन चाक एका लयीत चालतात. एकाला ही मागेपुढे होऊन चालणार नाही. तसेच काही आपल्या जीवनाचे देखील आहे. आपण एकटे काहीच करू शकत नाही. काही लोकांना वाटते की, मला कुणाच्या आधाराची गरज नाही. मी एकटा काहीही करू शकतो. हा त्याचा एक भ्रम असतो किंवा गर्व असतो. पण कालांतराने जेव्हा त्याला जाणीव झालेली असते की, खरंच माझ्या एकट्याने काही होऊ शकत नाही. त्यासाठी मला कुणाची ना कुणाची मदत घ्यावी लागते. जसे क्रिकेट, कबड्डी, हॉकी आणि फुटबॉल हे सांघिक खेळ आहेत. या खेळात सर्व खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावून खेळले तरच त्यांचा संघ जिंकतो. नाही तर एक दोघांच्या चुका मुळे संघाला हार मिळू शकतो. आपले ही जीवन असेच आहे. आपले जीवन देखील सांघिक खेळाप्रमाणे आहे. वरील खेळात खेळाडूची संख्या नक्की केलेली असते पण आपल्या जीवनातील खेळामध्ये जे साथीदार असतात त्यांची संख्या नक्की केलेली नसते. म्हणून आपण आहे त्या संख्येत आपला संघ मजबूत आणि यशस्वी बनविण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. सर्वांनी मिळून सकारात्मक विचार केल्यास आपल्या कुटुंबाची प्रगती होते. आधारामुळे माणसाला धीर येतो. सुखदुःखात एकमेकांना मदत करणे हीच खरी जीवनशैली आहे. सुखात तर कोणीही आपणाला आधार देतो. पण दुःखाच्या काळात जो आपणाला आधार देतो किंवा मदत करतो तोच आपला खरा सखा व सोबती असतो. खऱ्या माणसाची ओळख होण्यासाठी कधी दुःखाचा प्रसंग देखील जीवनात यायला हवं. संकटाच्या वेळेला जर कुणी थोडा आधार दिला, तर तो माणूस परत उभा राहू शकतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती अपयशामुळे खचते, तेव्हा जर एखाद्याने तिची थोडी हिम्मत वाढवली, तर ती परत प्रयत्न करून यश मिळवू शकते. म्हणूनच म्हणतात, "बुडत्याला काठीचा आधार" त्याचा अर्थ जेव्हा एखादी व्यक्ती संकटात किंवा अडचणीत असते, तेव्हा अगदी लहानशी मदत सुद्धा तिला फार मोठी वाटते आणि उपयोगी ठरते. माझ्या लहानपणी सांगितलेली एक गोष्ट मला आठवते, एकदा काही व्यापारी समुद्रातून प्रवास करत होते. अचानक वादळ उठलं. त्यांची नौका भरकटली आणि बुडायला लागली. व्यापाऱ्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. तेवढ्यात समोरून त्यांना एक छोटी नौका येताना दिसली. ती नौका फार मोठी नव्हती, पण तिने व्यापाऱ्यांना एक एक करून वाचवलं. सर्व व्यापारी सुखरूप किनाऱ्यावर पोचले. त्या दिवशी सर्वांनी मनापासून कबूल केलं की, संकटात एखादी छोटी नौका देखील "बुडत्याला काठीचा आधार" ठरते. म्हणजे माझ्या छोट्या मदतीने काय होणार ? हा विचार मनात आणायचं नाही. आपली छोटी मदत देखील इतरांना संकटातून वाचवू शकते. 
केवळ आर्थिक किंवा शारीरिक आधारच नाही, तर मानसिक आधारही तितकाच महत्त्वाचा आहे. सध्या आत्महत्या करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अश्या लोकांना खरी गरज असते मानसिक आधाराची. चांगल्या शब्दांनी, प्रेमाने आणि विश्वासाने एखाद्याला दिलेला आधार जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकतो. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे मन या मानसिक आधाराने वळविता येऊ शकते. 
यः समर्थो हि दुःखेषु,
स्नेहपूर्वं करोति सहायम्।
स एव जीवनमार्गे,
सत्यं धारयति तेजः॥
अर्थात जो दु:खातही प्रेमाने आधार देतो, तोच जीवनमार्गावर खरे तेज धारण करतो. 
समाजात अनेक सामाजिक संस्था आणि व्यक्ती आहेत जे की गरजू लोकांना अन्न, शिक्षण, आरोग्यसेवा यांच्या माध्यमातून आधार देतात. त्यामुळे आधार देणं ही एक मोठी सामाजिक जबाबदारी आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्यालाही इतरांसाठी आधार बनता आलं पाहिजे. कारण आधार देणं म्हणजेच माणुसकी जपणं होय. आधार ही माणसाच्या जीवनातील एक अमूल्य गोष्ट आहे. आधाराशिवाय जीवन अपूर्ण वाटते. त्यामुळे आपण स्वतः आधार घ्यावा आणि गरजूंना आधार द्यावा हेच खरे जीवनाचे सौंदर्य आहे. 
नाश्यति पीडाः सर्वाः,
यत्र स्नेहाधारः स्थितः।
सुखं तत्र सदा वसति,
भवतु ते जीवनं शुभम्॥
अर्थात जिथे प्रेमाचा आधार असतो, तिथे सगळ्या वेदना नाहीशा होतात आणि कायम आनंद नांदतो.
संतांनी सांगून ठेवलेले आहे " एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ " त्यामुळे चला आपण सर्वजण एकमेकांना चांगला आधार देऊ या, निस्वार्थ भावनेने मदत करू या आणि सुखी जीवन जगू या. 

नासा येवतीकर, स्तंभलेखक, 9423625769


अक्षय्य तृतीया ( Akshayya Trutiya )

      अक्षय तृतीया : शुभ मुहूर्त हिंदू संस्कृतीत मुहूर्ताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य करायचे म्हणजे त्यासाठ...