Wednesday 14 September 2022

गौरव गाथा ( gourav Gatha kavita )

            *।। गौरव - गाथा ।।*


मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील कथा
स्वातंत्र्य सेनानीची ऐकू या गौरव गाथा

लढ्याचे नेतृत्व केले स्वामी रामानंद तीर्थ
मुक्तीसंग्राममुळे मिळाला जीवनाला अर्थ

लढ्यातील पहिले हुतात्मे खरे
असे हुतात्मा गोविंदराव पानसरे

मूर्ती लहान पण कीर्ती महान
साहेबराव बारडकरांचे काम छान

शेळके घराण्यातील दगडाबाई
राणी लक्ष्मीबाई सम केली लढाई

लोकांच्या मनात ज्यांनी केला जागर
वैजापूरचे भाऊराव पाटील मतसागर

भूमिगत बनून सर्वत्र फिरत राहिले पाय
डॉ. ताराबाई बनल्या सर्व अनाथांची माय

लोकांवर अत्याचार केला रझाकाराने
प्रत्येकजण पेटून उठला जनजागृतीने

निजामाविरोधी गावोगावी लढा झाला
अखेर मराठवाडा मुक्त झाला

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Tuesday 13 September 2022

महात्मा गांधी ( Mahatma Gandhi )

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता - महात्मा गांधी


महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामतील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते. त्यांनी देशहितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. स्वातंत्र्य चळवळीतील ते असे नेते होते ज्यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबून ब्रिटीश राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडले होते. 
महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणूनही संबोधले जाते. मार्टिन ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेला यांच्यावरही त्यांच्या सत्य आणि अहिंसेच्या विचारसरणीचा खूप प्रभाव होता. 
महात्मा गांधींनी आफ्रिकेत सलग २१ वर्षे अन्याय आणि वर्णद्वेषाविरुद्ध अहिंसक लढा दिला, ज्याची किंमत केवळ आफ्रिकेतच नव्हे तर भारतातही ब्रिटिशांना भोगावी लागली. रवींद्रनाथ टागोर यांनी बापूना सर्वप्रथम “महात्मा” ही उपाधी दिली होती. तर सन १९४४ साली सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना “राष्ट्रपिता” म्हणून पहिल्यांदा संबोधले होते.

महात्मा गांधी यांचे बालपण आणि प्रारंभिक जीवन 
मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी पश्चिम भारतातील सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरामध्ये झाला. त्यांचे वडील करमचंद गांधी हे सनातन धर्मातील पानसारी जातीचे होते. ब्रिटिश राजवटीत ते काठियावाडच्या एका छोट्या संस्थानाचे (पोरबंदर) दिवाण होते. आई पुतळीबाई या धार्मिक स्त्री होत्या.  त्या सतत उपवास करीत असत. त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर बालवयात केलेल्या धार्मिक संस्कारांचा प्रभाव त्यांच्या पुढील जीवनात दिसून येतो. मोहनदास यांच्या मनावर त्यांच्या बालपणीच अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, व प्राणिमात्रांवर दया करणे या सारखे अनेक संस्कार त्याच्या आईकडून गिरवण्यात आले होते.

गांधीजी यांच्या लहानपणी त्यांच्या आई पुतळाबाई त्यांना जैन संकल्प आणि त्यांच्या प्रथांबद्दल माहिती सांगत असत. यामुळे लहानपणापासून त्यांना उपवास करण्याची ओढ लागली होती. जैन धर्मातील संकल्प आणि प्रथांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव पडला.

महात्मा गांधी स्वत: कबूल करतात की, पौराणिक कथा श्रावणबाळ आणि राजा हरीश्चंद्र या दोन कथांचा त्यांच्या जीवनावर खूप प्रभाव पडला. महात्मा गांधी यांचा विवाह मे १८८३ मध्ये वयाच्या १३व्या वर्षी कस्तुरबा माखनजी यांच्याशी झाला. महात्मा गांधीजी त्याांना बा असे म्हणत. त्यांना एकूण चार मुले होती.


महात्मा गांधी यांनी शिक्षणा करिता केलेला प्रवास –
महात्मा गांधी यांची लहानपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती, परंतु त्यांच्या वडिलांची त्यांना सरकारी नोकरीत दाखल करण्याची इच्छा होती. ई.स. १९८८ साली आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते उच्च शिक्षणाकरिता इंग्लंडला गेले. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी इनर टेंपल या गावी राहून भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला.
लंडन विद्यापीठामधून आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.  इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांना तेथील रीतीरिवाज समजून घेण्यात त्यांचा काही वेळ गेला. इंग्लंडमध्ये सर्व मांसाहारी पदार्थ मिळत असल्याने, त्यांना शाकाहारी पदार्थ मिळेपर्यंत उपाशी राहावं लागतं असे. आईला दिलेल्या वचनाशी कटीबद्ध असल्याने त्यांनी त्या ठिकाणी मांसाहार,मद्यपान करणे वर्ज्य केले. त्याठिकाणी त्यांनी शाकाहारी माणसे शोधली आणि त्यांची एक संघटना स्थापन केली आणि स्वत: ते त्या संघटनेचे अध्यक्ष बनले.
गांधीजी लंडन मध्ये ज्या शाकाहारी लोकांना भेटले होते, त्यातील काही लोक ही ‘थीयोसोफिकल सोसायटी’ चे सदस्य देखील होते. गांधीजीनी त्याठिकाणी राहून तेथील चालीरीती शिकण्याचा प्रयत्न केला. इंग्लंड मध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बॅरिस्टर बनून सन १८९१ साली ते भारतात आले व येथे आल्यानंतर ते वकिली करू लागले. ज्यावेळी त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली होती, त्यावेळी त्यांना न्यायादिशा समोर एखादा मुद्दा मांडणे देखील अजिबात जमत नव्हतं. आपल्या लाजाळू वृत्तीच्या स्वभावामुळे ते कोर्टात फार बोलत नसत.


महात्मा गांधी यांचा दक्षिण आफ्रिकेतील प्रवास (१८९३-१९१४) –

सन १८९३ साली वयाच्या २४ व्या वर्षी महात्मा गांधी हे भारतीय व्यावसायिकांचे न्यायालयीन सल्लागार म्हणून दक्षिण आफ्रिकेला गेले होते. दक्षिण आफ्रिका ही एक इंग्रजांची वसाहत होती. त्याठिकाणी त्यांनी आपल्या आयुष्याची २१ वर्षे घालविली. त्याठिकाणी गांधीनी आपले राजकीय दृष्टीकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ययाचे बारकाईने धडे गिरविले.
महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये राहत असतांना समाजात अस्तित्वात असलेल्या विकलांगपणाची जाणीव झाली. भारतीय संस्कृती आणि धर्म यामध्ये असणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्येपासून आपण भरपूर दूर आहोत याची जाणीव त्यांना झाल्यानंतर त्यांनी तेथे राहून भारतीय लोकांचे प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेत उद्योग, व्यवसाय आणि इतर कामधंद्यासाठी त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या भारतीय लोकांचे प्रश्न समजून घेवून त्यांचे निराकरण करण्याचा गांधीनी प्रयत्न केला. त्यांची अशी धारणा होती की, असं केल्याने आपण भारत देशाला समजून  घेऊ.
दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना गंभीरपणे वांशिक वर्ण भेदाचा सामना करावा लागला. त्याठिकाणी भारतीय लोकांना देण्यात येणारी अपमान जनक वागणूक त्यांनी अनुभवली.
एके दिवशी महात्मा गांधी रेल्वेचा प्रवास करीत असतांना त्यांच्याजवळ पहिल्या वर्गाचे तिकीट असतांना सुद्धा त्यांना ‘पीटर मारित्झबर्ग’ येथील रेल्वे स्थानकावर एका रेल्वे अधिकाऱ्याने खाली उतरवून तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले.
गांधीजीनी त्यांना नकार देताच त्या अधिकाऱ्याने गांधीजींना गाडी बाहेर ढकलून दिले गांधीजी खाली पडले. त्या दिवशी त्यांनी संपूर्ण रात्र फलाटावर काढली होती.
बापूंच्या मनात आलं असत तर ते त्या इंग्रज अधिकाऱ्याला धडा शिकवू शकले असते परंतु, सुडाच्या भावनेतून कोणाला शिक्षा करणे असा त्यांचा कधीच हेतू नव्हता. गांधी अहिंसावादी असल्याने केवळ अन्यायकारक व्यवस्था बदलणे हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधीना अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. शिवाय त्यांना त्याठिकाणी समाजात असणाऱ्या समस्याचा देखील अनुभव आला. उदाहरणार्थ, प्रवाशांना वाट काढून न दिल्यामुळे महात्मा गांधी यांना मार देण्यात आला होता.
हॉटेल मध्ये वास्तव्यास असतांना त्यांना बाहेर काढून देण्यात आलं होत. याशिवाय, महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतील ‘डर्बन’ या शहरात वकिली करीत असतांना त्यांना न्यायाधीशांनी डोक्यावरील टोपी काढून ठेवण्याचा आदेश दिला होता. परंतु, त्यांनी न्यायाधीशाचा आदेश अमान्य केला. अश्या प्रकारचे अनेक अनुभव घेतल्यानंतर गांधीजीनी एक सामाजिक नागरिक म्हणून ब्रिटीश राज्यातील आपल्या लोकांच्या समस्या विषयी प्रश्न मांडण्यास सुरुवात केली.
भारतीय लोकांवर होणारे अत्याचार आणि आपलं सामाजिक स्थान निर्माण करण्याचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. सन १९०६ साली ब्रिटीश सरकारने दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू केला होता. त्यावेळी गांधीजीनी आफ्रिकेतील भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी आपलं तेथील मुक्काम वाढवलं, आणि भारतीय नागरिकांना राजकीय व सामाजिक हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली.
तसेच, दक्षिण आफ्रिकेच्या ब्रिटीश सरकारकडे भारतीय लोकांच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळेस त्यांनी आपल्या अहिंसेच्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग केला होता. सन १८९४ साली त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील वेगवेगळ्या समाजात विखरलेल्या भारतीय नागरिकांना एकत्रित करून ‘नाताळ भारतीय कॉन्ग्रेस ‘ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला.

गांधीजी भारतात परतले 
इ.स. १९१५ मध्ये गांधीजी कायम स्वरूपी भारतात परत आले. एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी, थिओरिस्ट आणि संघटक अशी त्यांची आंतरराष्ट्रीय ख्याती होती. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक संमेलनांतून बोलले. खऱ्या अर्थी भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला.
गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. गोखले त्यांच्या संयम, संतुलन आणि व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करण्याच्या आग्रहाबद्दल ओळखले जात. ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात.
गांधीनी गोखल्यांचा ब्रिटिशांच्या व्हीगीश परंपरांवर आधारित उदार दृष्टिकोन अनुसरला, आणि तो पूर्णपणे भारतीय दिसण्यासाठी बदलला. १९२० मध्ये काँग्रेस नेते बाळ गंगाधर टिळक यांच्या निधनानंतर गांधीजी काँग्रेसचे प्रमुख नेते बनले.

महात्मा गांधींचे कार्य
गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले आणि नंतर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी पावले उचलली. गांधीजींचे संपूर्ण जीवन एका चळवळीसारखे होते. गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक चळवळी सुरू केल्या.
गांधीनी काही चळवळी संपूर्ण देशात चालवल्या आणि त्या खूप यशस्वी झाल्य. या मुळे संपूर्ण देशात लोक त्यांना ओळखू लागले. गांधीजींनी चालवलेल्या चळवळी थोडक्यात जाणून घेऊयात.


चंपारण्य सत्याग्रह (१९१७)
बिहारमधील चंपारण्य येथील युरोपीय निळीच्या मळेवाल्यांकडून तीन काथिया पद्धतीमार्फत गरीब शेतकऱ्यांवर अत्याचार होत असे. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे. यामुळे ते सतत गरिबीत राहत. शेतकऱ्यांची गावे अत्यंत घाणेरडी आणि आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठेवली जात. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ, पण इंग्रजानी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते.
यावर गांधीजींनी अहिंसक चळवळ सुरू केली. हा सत्याग्रह ब्रिटिश जमीनदाराच्या विरोधात सुरू करण्यात आला होता. गांधीजी यशस्वी झाले आणि इंग्रजांना त्यांचे पालन करावे लागले. अहिंसा व असहकार चळवळीतला गांधीजींच्या जीवनातील हा पहिला विजय होता.

खेडा सत्याग्रह
सन १९१८ साली गुजरात मधील खेडा या गावी सतत पडलेल्या पावसामुळे दुष्काळग्रस्त झालं  होत. तेथील पिकांची अवस्था खूपच वाईट होती. अशी परिस्थिती असतांना सुद्धा इंग्रज सरकार  शेतकऱ्यांकडून सक्तीने शेतसारा वासूल करीत असतं. परिणामी तेथिल शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट बनली. महात्मा गांधी यांनी त्याठिकाणी एका आश्रम उभारला आणि आपल्या लहान मोठ्या सर्व अनुयायांना एकत्रित केलं.

गावातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना आपल्या विश्वासात घेतले. शेतकऱ्यांना गांधीजीनी शेतसारा न भरण्याचा आदेश दिला, तेव्हा  सन १९१८ साली शेतकऱ्यांनी शेतसारा बंदीची चळवळ सुरु केली आणि महात्मा गांधी यांना त्या चळवळीचे अध्यक्ष बनवले. गांधीजींच्या नेतृत्वाखाली सरदार पटेल यांनी शेतकऱ्यांच्या समस्येसंबंधी इंग्रज सरकारसोबत चर्चा केली. ब्रिटीश सरकारने त्यांची मागणी मान्य करून सर्व कैद्यांची सुटका केली. अश्या प्रकारे महात्मा गांधी यांची प्रसिद्धी संपूर्ण जगभर पसरली.
अहमदाबाद येथील कामगार लढा –
सन १९१४ साली झालेल्या पहिल्या युद्धानंतर देशात खूप महागाई वाढली होती. अहमदाबाद येथील कामगारांनी वेतनवाढी करीता गिरणी मालकांकडे विनंती केली. परंतु, त्याची मागणी मान्य करण्यात आली नाही.
गांधीजीनी त्या ठिकाणी स्वत: जावून संप पुकारला व उपोषणाला बसले. कामगार देखील गांधीजींसोबत उपोषणाला बसले. गांधीजींच्या अहिंसावादी आंदोलना समोर गिरणी मालकांनी हार पत्करली व कामगारांना वेतनवाढ दिली.


रौलट अक्ट (१९१९)
भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाला नवीन कायद्याची आवश्यकता भासत होती. या कायद्याचा अहवाल तयार करण्याकरिता शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली.
या समितीने तयार केलेला अहवाल एप्रिल १९१८ मध्ये अनारकिकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राइम अॅक्ट पास केला. या कायद्यातील तरतुदींनुसार कोणत्याही व्यक्तीला विनाचौकशी अटक करण्याचा अधिकार शासनास मिळणार होता. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची तीन न्यायधीशांच्या चौकशी मंडळापुढे चौकशी करून शिक्षा करण्याचा अधिकार शासनास मिळाला होता.
गांधीजींनी १९१९ मध्ये रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा घेतली. ६ एप्रिल १९१९ हा संपूर्ण भारतभर सत्याग्रहाचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी हरताळ, उपवास, निषेध मिरवणुकी आणि निषेध सभा असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
६ एप्रिल १९१९ रोजी हा सत्याग्रहाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. हा काँग्रेस मार्फत पाळण्यात आलेला अखिल भारतीय बंद होता.


 जालियनवाला बाग हत्याकांड (१९१९)
सरकारने स्थानिक नेते डॉ. सफुद्दीन किचलू व सत्यपाल या दोन नेत्यांना अटक केल्यामुळे पंजाबमधील अमृतसर शहरात एक निषेध सभा बोलावण्यात आली. लोकांमधील असंतोष लक्षात घेऊन सरकारने जमावबंदी व सभाबंदी आदेश लागू केला, परंतु सरकारी आदेशाला न जुमानता स्थानिक लोकांनी १३ एप्रिल १९१९ रोजी जालियनवाला बागेत निषेध सभा बोलाविली.
या सभेला मोठय़ा संख्येने लोक जमले. सरकारच्या आदेशाविरूद्ध इतक्या मोठय़ा संख्येने लोक एकत्र आल्याचे पाहिल्यावर तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेला जनरल डायर हा इंग्रज अधिकारी संतप्त झाला. त्याने नि:शस्त्र लोकांना चहूबाजूंनी घेरले आणि जमावाला कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार करण्याचा आदेश आपल्या सैनिकांना दिला.
या घटनेच्या निषेधार्थ गांधीजींनी कैसर-ए-हिंद या पदवीचा त्याग केला.  


खिलाफत चळवळ (१९२०)
जगभराचे मुस्लिम लोक तुर्कस्थानच्या खलिफाला आपला धर्मगुरु मानत असत. भारतीय मुस्लिम जनतेची निष्ठा तुर्कस्थानच्या खलिफासोबत निगडित होती. तुर्कस्थानच्या खलिफाने पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मनीच्या बाजूने युद्धात प्रवेश केला.
युद्धाच्या समाप्ती नंतर तुर्कस्थानच्या खलिफाच्या सत्तेला कोणताही धोका पोहोचणार नाही, असे आश्वासन ब्रिटिश शासनाने भारतातील मुस्लिम नेत्यांना दिले होते. या आश्वासनास प्रमाण मानून भारतीय मुस्लिमांनी ब्रिटिशांनी युद्धात मदत केली होती. युद्ध समाप्ती नंतर ब्रिटिश शासन तुर्कस्थानची सत्ता नष्ट करून खलिफाची गादी नष्ट करणार अशी बातमी सर्वत्र पसरली होती.
तेव्हा भारतीय मुस्लिम नेत्यांनी तुर्कस्थानच्या खलिफाची सत्ता टिकविण्याकरिता व धर्मक्षेत्राचे रक्षण करण्याकरिता ब्रिटिश शासनाविरूद्ध चळवळ करण्याचा निर्णय घेतला. ही चळवळ खिलाफत चळवळ म्हणून ओळखली जाते.
हिंदू- मुस्लीम यांच्या ऐक्यावर आधारीत  राष्ट्रीय चळवळ सुरु केली तर, इंग्रज सरकार नक्कीच वठणीवर येईल अशी गांधीजीना वाटू लागले. त्यामुळे खिलाफतचा प्रश्न सोडविण्याकरिता राष्ट्रीय काँग्रेसमधील महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, डॉ. राजेंद्र प्रसाद आदी नेत्यांनी या चळवळीस पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या चळवळीची विशेषता म्हणजे या चळवळीत  हिंदू-मुस्लीम यांचे ऐक्य दिसून आलं होत.


असहकार चळवळ (१९२०)
महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी असल्याने इंग्रजांविरुद्ध त्यांनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध हे तीन शास्त्र वापरले. सन १९१९ साली पंजाबमधील जालियानवाला बाग हत्याकांड प्रकरणामुळे देशातील लोकांच्या मनात इंग्रज सरकार बद्दल क्रोधाचा भडका उडाला. देशात जागोजागी मोर्चे निघू लगले, ते मोर्चे दडपून काढण्यासाठी इंग्रज सरकारला खूप दमछाक करावी लागली.
महात्मा गांधी यांनी जालियानवाला बाग हत्याकांडा प्रकरणी इंग्रज सरकारचा निषेध केला. सहकार चळवळ सुरु करण्यामागे महात्मा गांधी यांचा असा हेतू होता की, भारतातील ब्रिटीशांचे राज्य हे केवळ भारतातील लोकांच्या सहकार्यावर अबलंबून आहे. जर भारतीयांनी त्यांना विरोध केला तर त्यांचे शासन पूर्णपणे ढासळून जाईल. या हेतूने त्यांनी जनतेला आपल्या असहकार आंदोलनात सहभागी होण्यास सांगितले.
सन १९२० साली लोकमान्य टिळकांच्या मृत्यू नंतर राष्ट्रीय सभेचे सभेचे संपूर्ण नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे आले. सन १९२० साली नागपुर येथे झालेल्या राष्ट्रीय सभेत चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकार चळवळीच्या ठरवला मान्यता सभेच्या अध्यक्ष पदी विराजमान असणारे चक्रवर्ती विजयराघवाचार्य यांनी दिली. चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे देण्यात आलं होत.
असहकार चळवळी नुसार, देशातील नागरिकांनी शासकीय कार्यालये, न्यायालये, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालये यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.असे केल्याने इंग्रज सरकार आपल्याला स्वातंत्र्य देण्याबाबत काही पाऊले उचलतील असे राष्ट्रीय सभेच्या सदस्यांना वाटत होत. परंतु, गांधीजींचे हे आंदोलन फार काळ टिकू शकले नाही.


चौरीचौरा दुर्घटना (उत्तर प्रदेश, १९२२)
डिसेंबर १९२१ मध्ये अहमदाबाद येथे राष्ट्रसभेचे अधिवेशन झाले. हजारो कार्यकर्ते तुरूंगात असतानाही असहकार चळवळ जोमाने चालू ठेवण्याचा निर्णय या अधिवेशनात घेण्यात आला.५ फेब्रुवारी १९२२ साली उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपुर जिल्हाच्या चौरीचौरा भागात एका शांततापूर्ण चाललेल्या मिरवणुकीवर पोलीसांनी गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे असहकार चळवळीत सहभागी नागरिक खूप चिडले, त्यांनी प्रतिउत्तर म्हणून तेथील एक पोलीस चौकी जाळून टाकली. या जाळपोळीत एक पोलीस अधिकारी व २२ पोलीस ठार झाले.
या घटनेची माहिती गांधीजीना समजली तेव्हा त्यांना खुप वाईट वाटलं, ते एकदम अस्वस्थ झाले. त्यांना वाटलं लोकांनी असे करायला नाही पाहिजे होत. अहिंसेच्या मार्गावर चालतांना असे प्रसंग उद्भवतातच.
गांधीना वाटू लागलं की, आपण असहकार आंदोलन सुरु करून लोकांना अहिंसेच्या मार्गावर चालायला लावलं परंतु, अहिंसेच्या मार्गावर चालणे इतक सोप नाही.
तसे करणे सर्वांनाच शक्य होणार नाही, म्हणून महात्मा गांधी यांनी आपली असहकार चळवळ मागे घेतली. चौरीचौरा घटना प्रकरणी महात्मा गांधी यांना मार्च १९२२ साली कैद करण्यात आलं.
तसेच, गांधीजीनी सुरु केलेल्या “यंग इंडिया” नावाच्या साप्ताहिक पत्रिकेत त्यांनी स्वत: तीन राष्ट्रद्रोही लेख लिहिली आहेत अश्या प्रकारचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला.
त्यामुळे त्यांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. गांधीजी कैदेत असतांना त्यांची तब्येत खराब झाली, त्या कारणास्तव त्यांची सन १९२४ सली तुरुंगातून सुटका करण्यात आली.


तुरुंगातून सुटका झाल्यानंतर गांधींचे कार्य
सन १९२४ साली आजारामुळे महात्मा गांधी यांची सुटका झाल्यानंतर गांधीजी सन १९२८ सालापर्यंत राजकारणापासून दूर राहिले. या काळादरम्यान त्यांनी स्वराज्य पक्षातील सदस्य आणि भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मधील सदस्य यांच्यातील मतभेद दूर करण्यावर भर दिला. तसचं, समाजातील अस्पृश्यता, दारू समस्या आणि देशातील गरिबी कमी करण्यासाठी त्यांनी  आपले प्रयत्न सुरु ठेवले. सन १९२८ साली महात्मा गांधी राजकरणात पुन्हा सक्रीय झाले.
महात्मा गांधी राजकारणापासून दूर असतांना सन १९२७ साली ब्रिटीश सरकारने संविधानात सुधारणा करण्यासठी ‘सर जॉन सायमन’ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती भारतात पाठवली होती. ब्रिटीश शासनाच्या या समितीत एकही भारतीय नागरिक नसल्याने भारतीय पक्षांनी त्या कमिशनवर बहिष्कार टाकला.
सन १९२८ साली कलकत्ता मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस च्या सभेत एक ठराव पास करण्यात आला. या ठरावानुसार, ब्रिटीश सरकारने भारताला सार्वभौम देशाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच, सरकारने राष्ट्रीय सभेची ही मागणी मान्य न केल्यास, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही पुन्हा असहकार चळवळ सुरु करू असा संदेश सरकारला देण्यात आला

मिठाचा सत्याग्रह (१९३०) | दांडी यात्रा

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान, झालेला मिठाचा सत्याग्रह हा, भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात इ.स. १९३० साली घडलेला सत्याग्रह होता. यालाच दांडी सत्याग्रह असेही म्हणतात.

१४ फेब्रुवारी १९३० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जनतेला गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग करण्याचा आदेश दिला. मिठाचा सत्याग्रह याच चळवळीचा भाग होता.

मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. ही दांडी यात्रा (मोर्चा) साबरमती आश्रमापासून १२ मार्च १९३० रोजी सुरू झाली. गांधीजींच्या बरोबर त्यांचे ७८ निवडक अनुयायी होते. त्यात सरोजिनी नायडू, इला भट यांचा समावेश होता. यात्रा पुढे निघाली, तसतशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली. ही यात्रा २४ दिवस चालली आणि तिच्यातील लोक ३८५ कि.मी. पर्यंत पायी चालले. यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी ६ एप्रिल १९३०ला पोहोचली. त्या दिवशी जेव्हा सकाळी साडे सहा वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला, तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवातच ठरली. दांडीनंतर गांधीजी मीठ बनवत आणि सभांमध्ये भाषणे करत ते समुद्र किनाऱ्याने दक्षिणेकडे जात राहिले. दांडीच्या दक्षिणेला २५ मैलांवर असलेल्या धारासणा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्याचे काँग्रेस पक्षाने ठरवले. पण त्यापूर्वीच ४-५ मे १९३० दरम्यानच्या रात्री गांधीजींना अटक करण्यात आली.दांडी यात्रा आणि धारासणा येथील सत्याग्रह यामुळे सर्व जगाचे लक्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्याकडे वेधले गेले. मिठाचा सत्याग्रह म्हणजे असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. गांधींना त्या मिषाने लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती. मिठावरील कराच्या विरोधातील हे आंदोलन पुढे वर्षभर सुरू राहिले. गांधीजींची तुरुंगातून सुटका आणि लॉर्ड आयर्विन यांच्याशी दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चा झाल्यावर हे आंदोलन थांबले. मिठाच्या सत्याग्रहाच्या आंदोलनाच्या दरम्यान ६०,०००हून अधिक भारतीय तुरुंगात गेले.

दांडी यात्रेच्या सत्याग्रहाबद्दल ग.दि. माडगुळकरांनी एक अजरामर कविता लिहिली आहे, तिची सुरुवात अशी आहे :

" उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया "


हरिजन चळवळ (१९३३)
गांधींनी अस्पृश्यांचे जीवन सुधारण्यासाठी मोहीम राबवली. गांधीजींनी या अस्पृश्यांना हरिजन असे नाव दिले ज्यांना ते देवाची मुले मानत.
८ मे १९३३ रोजी गांधीजींनी हरिजन चळवळीला मदत करण्यासाठी २१ दिवसांचे आत्मशुद्धीचे उपोषण केले.


दुसरे महायुद्ध आणि भारत छोडो आंदोलन (१९३९)
१९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा नाझी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. सुरुवातीला गांधीजींनी ब्रिटीशांच्या प्रयत्नांना अहिंसक नैतिक पाठबळ दिले.
इतर काँग्रेस नेत्यांनी लोकप्रतिनिधींचा सल्ला न घेता युद्धात एकतर्फी सहभाग घेण्यास विरोध केला. काँग्रेसच्या सर्व निवडक सदस्यांनी एकत्रितपणे आपल्या पदांचा राजीनामा दिला.
दीर्घ चर्चेनंतर, गांधींनी घोषित केले की भारताला स्वातंत्र्य नाकारले असताना भारत कोणत्याही युद्धाचा भाग होणार नाही. जसजसे युद्ध वाढत गेले, तसतसे गांधींनी ब्रिटिशांना भारत छोडो आंदोलन नावाचे विधेयक देऊन स्वातंत्र्याची मागणी तीव्र केली.
अशाप्रकारे, गांधीजींनी त्यांच्या हयातीत सुरू केलेल्या सर्व चळवळींनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिला.


महात्मा गांधी यांचे वय आणि मृत्यू
३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेनी महात्मा गांधींची हत्या केली होती. त्यांना 3 गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्याच्या तोंडातून शेवटचे शब्द बाहेर पडले ते म्हणजे ‘हे राम’. 
गांधींच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी दिल्लीतील राजघाट येथे बांधण्यात आली. वयाच्या ७९व्या वर्षी महात्मा गांधींनी तमाम देशवासीयांचा निरोप घेतला.


महात्मा गांधी पुस्तके
महात्मा गांधी एक उत्तम लेखक सुद्धा होते. त्यांनी आपल्या जीवनावर आणि इतर महत्वपूर्ण विषयांवर पुस्तके लिहिली.
सत्याचे प्रयोग – आत्मकथा
माझ्या स्वप्नातील भारत
हिंद स्वराज
आरोग्याची गुरुकिल्ली
भगवद्गीता गांधींच्या मते

गौरव - गाथा ( Gourav - Gatha )

मा. सौ. वर्षा ठाकूर घुगे मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या संकल्पनेतील, माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. श्री प्रशांत दिग्रसकर आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. सौ. सविता बिरगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेला अभिनव उपक्रम

गौरव गाथा - मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची

नमस्कार, 
गौरव-गाथा उपक्रमात आपले हार्दिक स्वागत आहे. 

गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील थोर स्वातंत्र्य सैनिकांची

भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. परंतू त्यानंतरही मराठवाडा हैद्राबाद येथील निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होते. देशात त्यावेळी अस्तित्वात असलेली संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली होती. मात्र हैद्राबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. स्वातंत्र्यापूर्वीपासून मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला.
हैद्राबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान याचे राज्य होते. निझामाच्या राजवटीची पाठराखण करणाऱ्या रझाकार संघटनेने ही चळवळ दडपून टाकण्यासाठी हिंसक मार्ग अवलंबला होता तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी सशस्त्र लढा उभारण्यात आला. निजामांच्या या अत्याचारातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. तेव्हा मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लढा उभारण्यात आला होता.
हैद्राबाद संस्थानामध्ये मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग सामील होता. हैद्राबाद संस्थानातून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी मुक्तीसंग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनेक अत्याचार सुरु केले. या अत्याचारास प्रत्युत्तर देण्यासाठी दुसऱ्या बाजूला मुक्ती संग्राम लढा अधिक गती घेत होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिंगबरराव बिंदू, रवीनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी या लढ्यात महत्वाचे कार्य केले.
आपल्या जीवाची पर्वा न करता मराठवाड्याच्या गावागावातून हा संग्राम लढण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिक पुढे आले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जरुळ गावातील भाऊराव भिमाजी मतसागर यांनी हैद्राबाद मुक्तिसंग्रामात त्यांचे तसेच सर्व कुटुंबाचे योगदान व उचललेले कष्ट विशेष उल्लेखनिय होय. बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथील दगडाबाई शेळके, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्रजी जाधव, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथराव कातनेश्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर, मराठवाड्यात निजामाच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी, तर हिंगोली जिल्ह्यातील चंद्रकांत पाटील गोरेगावकर, दीपाजी पाटील दातीकर, बर्हिजी शिंदे वापटीकर, बापुराव शिंदे वापटीकर, भीमराव उर्फ बाबासाहेब शेषराव नायक सवनेकर, वासुदेवराव बसोले, बाबुलाल माणिकचंद राठौर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला. 

वरील माहिती इंटरनेटवरून घेण्यात आले. 
धन्यवाद .......! 
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •

नमस्कार, 
गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यात आज आपण श्री गोविंदभाई श्रॉफ यांची माहिती पाहू या. 
गोविंदभाई श्रॉफ  हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते एक प्रमुख समर्थक म्हणून गणले जात. भारतीय स्वातंत्र्यलढ्या बरोबरच त्यांनी मराठवाड्यातील व आंध्रातील शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचा जन्म विजापूर (कर्नाटक राज्य ) येथे 24 जुलै 1911 रोजी झाला. औरंगाबाद येथे शासकीय प्रशालेत शिकत असताना गणेशोत्सवात पुढाकार घेतल्यामुळे हेडमास्तरांनी केलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ ते औरंगाबाद सोडून पुढील शिक्षणासाठी हैदराबादच्या चादरघाट हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. मॅट्रिकच्या परीक्षेत संस्थानात सर्वप्रथम. मद्रास विदयापीठाची इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर स्वातंत्र्य-चळवळीत भाग घेण्यासाठी शिक्षण स्थगित केले; परंतु चळवळ थांबल्यामुळे पुन्हा शिक्षण सुरू केले. हैदराबाद राज्याचे त्रिभाजन करून भाषिक राज्ये निर्माण करावीत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मराठवाडयाच्या विकासप्रश्नांसाठी त्यांनी विविध आंदोलने केली. शिक्षण आणि खादी या दोन क्षेत्रांत त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. श्री सरस्वती शिक्षण संस्था, औरंगाबाद; स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापिलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि योगेश्वरी शिक्षण संस्था, आंबेजोगाई इ. शिक्षणसंस्थांचे ते एक मार्गदर्शक व पदाधिकारी होते. मराठवाडा खादी ग्रामोदयोग समितीचे संस्थापक तसेच संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते एक महत्त्वाचे नेते होते. मराठवाडयासाठी राज्यघटनेतील तरतुदीनुसार वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याचा आग्रह त्यांनी धरला व त्यात यश संपादन केले. मराठवाडा विदयापीठाच्या स्थापनेसाठी, औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे एक न्यायपीठ स्थापन करण्यासाठी आणि औरंगाबाद रेल्वे विभाग ब्रॉडगेजवर आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोविंदभाई श्रॉफ यांचे वृद्धापकाळाने औरंगाबाद येथे निधन झाले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील या थोर स्वातंत्र्य सैनिकांस विनम्र अभिवादन ........!

ही माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. 
धन्यवाद .......!

• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
नमस्कार
गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यात आज आपण कर्मयोगी साहेबराव देशमुख बारडकर यांची माहिती पाहू या.
श्री साहेबराव देशमुख बारडकर यांचा जन्म 08 एप्रिल 1925 रोजी मौजे बारड जिल्हा नांदेड येथे झाला. सधन व प्रतिष्ठित देशमुख परिवारात जन्मल्यामुळे कोणत्याही बाबीची कमी नव्हती. त्यांचे प्राथमिक शिक्षण बारड येथे झाले. पुढे नांदेड शहरात निवासाची सोय, शहरी आकर्षण व  आर्थिक सुबत्ता यामुळे हायस्कूलच्या शिक्षणासाठी नांदेडला राहिले व हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले. या काळात मराठी सोबतच उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे त्यांना ज्ञान झाले. वयाच्या 16 -17 व्या वर्षी त्यांना शाळेसोबत बाहेरच्या वातावरणाची माहिती झाली. धाडसी व खिलाडू वृत्तीमुळे समवयस्क मुलांचा गराडा त्यांच्याभोवती असायचा. ते सर्व मुलांमध्ये केंद्रस्थानी असायचे. अर्थात नेतृत्व गुण अंगी असल्यामुळे नेहमी समाज व समूहात राहत गेले. याच काळात सर्व देशभर स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते.
भारतीय काँग्रेसने स्वातंत्र्याचा लढा पुकारला होता. जनता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या " जयहिंद " नाऱ्यामुळे प्रभावित झाली होती. महात्मा गांधीजींनी अहिंसा व असहकारातून ताकद निर्माण केली होती. याचा सर्व अभ्यास बाल साहेबराव करत होते आणि त्यामुळे त्यांच्यात स्वातंत्र्यासाठी वीरश्री निर्माण झाली व त्यांचे बालपण तेथेच संपले.
विशेषतः सन 1946 ते 1948 मध्ये प्रखर चळवळी झाल्या, त्यामध्ये सर्वाधिक चळवळी व कारस्थाने बारड भागात झाल्या. त्या काळात श्री राजारामजी देशमुख, श्री विठ्ठलराव बारडकर, श्री आबासाहेब लहानकर इत्यादी मंडळी चळवळीमध्ये अग्रेसर होते. याच वयात साहेबराव बारडकर यांनी नांदेड, किनवट, उमरखेड या भागात जनजागृती केली व स्वातंत्र्यसैनिकांचे नेतृत्व केले. केवळ पाच फूट उंची लाभलेली व्यक्ती पण कर्तव्यामुळे, धाडसामुळे आणि पहाडी आवाजामुळे समोरची व्यक्ती प्रभावित होत असे. वक्तृत्वात अशी धार व प्रेरणा होती की आपणही काहीतरी करायलाच पाहिजे असे वाटायचे. त्यांच्या जनसंपर्कामुळे खेड्यापाड्यातील सर्व समाज एकवटला. हा दोन वर्षाचा काळ म्हणजे हैदराबाद संस्थानच्या इतिहासातील  निर्णायक काळ होता. नांदेड जिल्ह्यात सत्याग्रहापासून सशस्त्र चळवळी झाल्या. पारनुर व टेळकी येथील जंगल सत्याग्रह ऐतिहासिक ठरले. या सर्व लढ्यात साहेबरावजींचा सहभाग विशेष होता .
सन 1947 मध्ये स्टेट काँग्रेसच्या आदेशाप्रमाणे तिरंगा राष्ट्रीय ध्वज मराठवाडाभर फडकले आणि नांदेडचा कॅम्प उमरखेडला कायम झाला. या सर्व घडामोडीत साहेबरावजींचा मोलाचा वाटा होता.
गावातील लोक साहेबरावजींना मालक या नावाने संबोधित. साहेबरावजींचे घर म्हणजे कार्यकर्त्यांची जणू राजधानीच झाली होती. साहेबरावजींचा मळादेखील केंद्रच होते, ज्याला बारड रापू म्हणत. यामध्ये चाबरा चोरंबा व रावणगाव या गावापासून लहान नागेली चितगिरी ते थेट भोकरपर्यंत जवळपास 60 गावे होते. त्यानंतर हदगाव ते किनवटच्या हद्दीपर्यंत समाविष्ट झाली. साहेबरावजींच्या पुढाकाराने सरकारी दप्तर ताब्यात घेणे शेतसारा वसूल करणे सरकारचा अंमल झिडकारून देणे असे कार्यक्रम सुरू झाले. या सर्व सत्याग्रह व चळवळीसह रजाकारांशी सशस्त्र सामना यांच्या अनुभवातून साहेबरावजी अतिशय प्रवीण झाले व निर्भीड झाले. त्यांनी आपल्या अल्पवयात देशभक्तीचा जगाला परिचय करून दिला.
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील या थोर कर्मयोगी स्वातंत्र्यसेनानी यांना विनम्र अभिवादन .........!
ह्या माहितीचे संकलन एकनाथ शिंदे यांनी 

• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
नमस्कार,
गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यात आज आपण श्री भाऊराव पाटील मतसागर यांची माहिती पाहू या. 

सन 1923 मध्ये औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील जरूळ या गावी श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे शालेय शिक्षणापासून त्यांना वंचित रहावे लागले. तथापि प्रचंड जिज्ञासा व इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी मोडी लिपी आणि मराठी भाषेसह तेलुगू, गुजराती, ऊर्दू, इंग्रजी या इतर भाषादेखील स्वपरिश्रमाने आत्मसात केल्या. त्याचबरोबर त्यांनी पौराणिक ग्रंथांचे विश्लेषण करून इतिहास संशोधन केले.
मराठवाडा मुक्तिसंग्रामात भाऊराव भिमाजी पाटलांचे तसेच त्यांच्या कुटुबीयांचे योगदान व त्यांनी उचललेले कष्ट विशेष उल्लेखनीय आहेत. आपल्या जरूळ येथील स्वतःच्या घरावर त्यांनी भारताचा तिरंगा फडकावल्यामुळे निजामी राजवटीत रझाकारांनी त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा अनन्वित छळ केला. त्यानंतरही लाठीहल्ल्यात जखमी होऊन बेशुद्ध होईपर्यंत त्यांनी भारतीय ध्वज उतरविला नाही.
औरंगाबाद येथे केलेल्या सत्याग्रहामुळे श्री. माणिकचंद पहाडे यांच्यावर रझाकार फारूकी यांनी अत्याचार केला होता. त्यामुळे तेथे पुन्हा कुणीही सत्याग्रह करण्यास धजावत नव्हते. भाऊराव मतसागर यांनी हे आव्हान स्वीकारून तेथील सिटीचौकात सत्याग्रह केला. त्याबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला, तसेच फटक्यांची (टिकटिकीची) सजाही सुनावण्यात आली. परंतु तुरुंगातील सर्व राजकीय कैद्यांनी या सजेविरूद्ध पुकारलेल्या आंदोलनामुळे ही सजा मागे घेण्यात आली.
मराठवाडा मुक्तिसंग्राम संघर्षानंतर त्यांनी औरंगाबादेतील सामाजिक व राजकीय कार्यात भाग घेतला. श्री. विनायकराव पाटील यांच्या सोबत त्यांनी शिक्षण प्रसार आणि सामाजिक सुधारणांच्या कामी स्वतःला वाहून घेतले. याची दखल घेऊन थोर समाज सुधारक श्री. धोंडो केशव कर्वे यांनी त्यांना पारितोषिकही प्रदान केले होते. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती श्री. वि. वि. गिरी यांनी त्यांची राष्ट्रपती भवनात भेट घेऊन सामाजिक आणि शेतकऱ्य़ांच्या समस्यांवर त्यांच्यासोबत चर्चा केली, तसेच तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना या मुक्तिसंग्रामातील भरीव योगदानाबद्दल त्यांना ताम्रपत्र बहाल केले.
कृषिक्षेत्रातही भाऊराव मतसागर यांनी आपल्या कार्यकुशलतेची चुणूक दाखवून ओसाड शेतजमिनीवर भरघोस उत्पादन घेऊन दाखविले. ह्या कामगिरीबद्दल त्यांना तत्कालीन राज्यपाल अली यावर जंग यांनी १९७० साली शेतीनिष्ठ शेतकरी या सन्मानाने पुरस्कृत केले. ह्या कार्यक्रमानंतरच श्रीलंकेच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती सिरीमावो भंडारनायके यांनी राजभवनात त्यांची भेट घेऊन कृषिक्षेत्रातील त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
त्यांच्या इतर शैक्षणिक आणि सामाजिक कार्यांबद्दल माजी पंतप्रधान राजीव गांधी, तसेच पी. व्ही. नरसिंहराव यांनी त्यांना सोनेरी पदके देऊन गौरविले होते. या थोर व्यक्तीचे सन १९९५ साली वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील या थोर स्वातंत्र्य सैनिकांस विनम्र अभिवादन ........!

ही माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. 
धन्यवाद
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
नमस्कार,
गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यात आज आपण मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई दगडाबाई शेळके यांची माहिती पाहू या. 

मराठवाडा मुक्तिसंग्रामात मैलाचा दगड रचला तो जालन्यातील मर्दानी दगडाबाई शेळके यांनी. झाशीच्या राणीप्रमाणे अपंग मुलाला पाठीला बांधून एका हातात बंदूक तर, दुसऱ्या हातात घोड्याचा लगाम धरून त्यांनी सहकारी स्वातंत्र्यसैनिकांना रसद पुरविण्याचे काम मोठ्या नेटाने केली. 
धोपटेश्वर (ता. बदनापूर जि. जालना) येथील दगडाबाई शेळके यांनी निजामी राजवट उलथवण्यासाठी मुक्तिसंग्रामात उडी घेतली. त्यांच्या मर्दानी पराक्रमांची इतिहासाने त्यांच्या जिवंतपणीच नोंद घेतली. दगडाबाईंनी बंदूक आणि हातगोळे चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. एकदा निजाम सरकारच्या सैनिकांनी त्यांना शस्त्रासह रंगेहाथ पकडले होते. ज्यामुळे त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. पॅन्ट, शर्ट घालून, मुलाला पाठीशी घेऊन बंदूकीसह घोड्यावर प्रवास करीत असल्याने कुटुंबीय व समाजाने आक्षेप घेतला. पती देवराव शेळके यांच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागले होते, परंतु त्या खचल्या नाहीत. स्वतःच्या जीवाची श्वाश्वती नसल्याने त्यांनी देवराव यांचा मैनाबाईंशी स्वतःहून दुसरा विवाह लावून दिला होता.
दगडाबाईची माहेरची लढाई - 
दगडाबाईंनी निजामाशी अनेकदा दोन हात केले. त्यांची सर्वांत गाजलेली लढाई म्हणजे माहेरची लढाई. भोकरदन तालुक्यातील माहेर कोलते टाकळी शिवारातील लढ्यात त्यांनी हातगोळे टाकून निजामाचा अख्खा कॅम्प उद्धवस्त केला होता.
अश्या धाडसी होत्या दगडाबाई ! त्यांचं आयुष्य म्हणजे एक जीवंत दंतकथाच होती.
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील या थोर स्वातंत्र्य सेनानी यांना विनम्र अभिवादन ........!

ही माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. 
धन्यवाद

• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
नमस्कार,
गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यात आज आपण अनाथांची आई डॉ. ताराबाई परांजपे यांची माहिती पाहू या. 
डॉ. ताराबाई परांजपे हे मराठवाडा मुक्तिसंग्रामातील एक ठळक नाव. समाजसेवेसाठी त्यांनी प्रसंगी नातेवाईकांचादेखील रोष पत्करला; पण आपल्या विचारांना कधीही तिलांजली दिली नाही. मुक्तिसंग्रामाबरोबरच, प्रौढ शिक्षण, स्त्री शिक्षण, समता परिषद, नशाबंदी, जाती निर्मूलन अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. शालेय जीवनातच त्यांना मुक्तिसंग्रामातील ज्येष्ठ नेते स्वामी रामानंद तीर्थ यांचा सहवास लाभला. 
ताराबाईंचा जन्म ५ ऑक्टोबर १९३० रोजी हैदराबाद येथे झाला होता.२६ जानेवारी १९४७ रोजी त्यांचा विवाह स्वातंत्र्य सेनानी नागनाथ यांच्याशी झाला. पूर्वाश्रमीच्या ताराबाई आपटे, या परांजपे झाल्या. मुक्तिसंग्रामामध्ये भूमिगत राहून ताराबाईंनी कधी तेलुगू मोलकरणीच्या वेषात, तर कधी कॉलेजकन्या म्हणून शिताफीने पोलिसांना गुंगारा दिला होता. बुलेटिन छपाई यंत्र किंवा रेल्वे पूल उडविण्यासाठी लागणारा दारूगोळा पळविण्याची धाडसाची कामेही त्यांनी केली होती. शालेय मुलींना एकत्र आणून जागृती केली. अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घातला. मराठवाडा महिला समता परिषदेतर्फे नांदेडला त्यांनी ‘बालसदन’ सुरू केले. या माध्यमातून त्यांनी अनाथांना मायेचा ओलावा दिला. शिक्षण क्षेत्रासहीत सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असलेल्या ताराबाईंना अवघा मराठवाडा ‘अनाथांची आई’ म्हणून ओळखत असे.
वयाच्या चौदाव्या वर्षीच हैदराबाद येथील सुलतान बाजाराजवळील असलेल्या भंगी कॉलनीत त्यांनी प्रौढ शिक्षणाचे वर्ग घेतले होते. त्यावरून ‘भंगीणमैत्रीण’ म्हणून त्यांना दूषणे मिळाली; पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. नांदेडच्या समाज कल्याण खात्याच्या सहकार्याने त्यांनी सतत तीन वर्षे महिला सहभोजनाचे कार्यकम घेतले.  तब्बल १४ वर्षे प्रौढ शिक्षण समितीचे कार्य त्यांनी केले. प्रौढ महिलांना त्या, दररोज एक तास मराठी आणि इतिहास शिकवीत होत्या. 
ताराबाईंची साहित्य संपदाही मोठी होती. ‘लोकनेते जयप्रकाश’, ‘संन्यस्त स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ’, ‘सीमा प्रदेशातील लोककथा’, ‘आदिम प्रतिमा आणि स्त्रीजीवन’ आदींचा त्यात समावेश आहे. ‘अनुबंध’साठी ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा पुरस्कार त्यांना मिळाला, बालसदनातील मुलांवर त्यांनी लिहिलेले ‘निवडुंगाची फुले’ हे पुस्तक अमेरिकेपर्यंत गेले. त्यांना सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. महिला-बालकल्याण क्षेत्रासाठी ‘जानकीबाई आपटे पुरस्कार’,  ‘गोविंदभाई श्रॉफ पुरस्कार , महाराष्ट्र सरकारचा दलितमित्र पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार यांच्यासह अनेक पुरस्कारांनी ताराबाईंना सन्मानित करण्यात आले होते. ‘लोकसाहित्य’ आणि ‘लोकसंस्कृती’ हे त्यांचे अभ्यासविषय होते. तेलुगू भाषेचा मराठीवरील परिणाम हा त्यांचा ‘पीएच.डी.’चा विषय होता. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. 
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील या थोर स्वातंत्र्य सेनानी अनाथांची आई यांना विनम्र अभिवादन ........!

ही माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. 
धन्यवाद
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •

नमस्कार,
गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यात आज आपण या मुक्तीसंग्रामातील पहिले हुतात्मा ठरलेले गोविंदराव पानसरे यांची माहिती पाहू या. 
गोविंदराव यांचा जन्म 15 मे 1913 ला जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे त्यांच्या मामाच्या घरी झाला. गोविंदराव यांच्या आईचे नाव यमुनाबाई तर वडीलांचे नाव विनायकराव होते. वडील हे मूळचे पुण्याचे रहिवासी होते पण पुढे ते शालीबंडी हैदराबाद येथे राहावयास आले. तेथे वैद्यकीय व्यवसाय करीत होते. गोविंदरावांचे मामा शंकरराव हे बदनापूर येथे स्टेशन मास्तर होते.  गोविंदराव अवघे सहा महिन्याचे असताना त्यांचे आई-वडील वारले. केवळ सहा महिन्याचे बाळ पोरके झाले. अशा अनाथ गोविंदरावांचे पालनपोषण आणि शिक्षण त्यांचे मामा शंकरराव यांनी केले. त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण हैदराबादच्या विवेक वर्धिनी येथे झाले. नंतर पुढील शिक्षणासाठी ते निजाम कॉलेजमध्ये दाखल झाले. पण त्यांनी पुढे शिक्षण सोडून दिले. त्यांचे मामा शंकरराव यांची धर्माबाद येथे स्टेशन मास्तर म्हणून बदली झाली व ते तिथेच स्थायिक झाले होते. गोविंदराव त्यांच्याकडे येऊन राहिले व सार्वजनिक काम करू लागले.
हरिपूर काँग्रेस अधिवेशनात स्वयंसेवक म्हणून उपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या जीवनाला नवे वळण मिळाले. हुतात्मा गोविंदराव पानसरे हे अत्यंत बुद्धिमान विचारी आणि चिकित्सक होते. ते स्वाभिमानी, स्वावलंबी आणि प्रखर राष्ट्राभिमानी होते. त्यांच्याकडे उत्तम वक्तृत्व व संघटन कौशल्य होते. जीवनभर विवाह व नोकरी न करण्याचे ठरवून त्यांनी जनसेवेचे व्रत घेतले. त्यांचा स्वभाव मोकळा, प्रेमळ पण करारी व निर्भीड होता. ते गांधीवादाचे पक्के अनुयायी होते. धर्मवत वाचनालय खादी भांडार व पुढे चालून महाराष्ट्र परिषद व स्टेट काँग्रेसच्या माध्यमातून व्यापक स्वरूपाचे कार्य केले. धर्माबादच्या भोवती चार तालुक्यांच्या बहुतेक सर्व खेडोपाडी पायी दौरे करून काँग्रेसचे व खादीचे प्रचार कार्य त्यांनी केले. त्यामुळे सहा हजार प्राथमिक सभासद व 300 खादीधारी त्यांचे अनुयायी बनले होते. गोविंदराव पानसरे हे स्टेट काँग्रेसचे पूर्णवेळ कार्यकर्ते व मुधोळ तालुक्याचे संघटक होते. या भागात गोविंदराव करत असलेले कार्य रजाकरांना आवडणे शक्यच नव्हते. गोविंदरावांनी कोंडलवाडी येथे केलेले भाषण सरकारला आक्षेपार्ह वाटले त्यामुळे त्यांना अटक झाली व जामीन मिळाला नाही. शेवटी 21 ऑक्टोबरला त्यांना जामीन दिला गेला. सायंकाळी ते पुंडलिकराव पाटील व इतर कार्यकर्त्यासोबत बैलगाडीतून बिलोलीला जात असताना रजाकारांनी अर्जापूर जवळ गाठून त्यांचा खून केला. गोविंदराव पानसरे हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्टेट काँग्रेसचे पहिले हुतात्मा होत. गांधीवादी गोविंदरावांच्या बलिदानाने या भागातील जनता फार मोठ्या प्रमाणात मुक्तीसंग्राम लढ्यात सामील झाली. नांदेड जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते निर्भीडपणे निजामी राजवटीला आव्हान देऊ लागले. हा निर्भयतेचा वसा येथील जनतेला गोविंदराव पानसरे यांनी दिला होता हे मात्र निश्चित
ह्या माहितीचे संकलन भाऊसाहेब उमाटे, सहशिक्षक ज्ञानेश्वर विद्यालय लातूर यांनी केले आहे 

मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी यांना विनम्र अभिवादन .......!
धन्यवाद ......! 
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
नमस्कार,
गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची यात आज आपण या मुक्तीसंग्रामाचे प्रमुख नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ यांची माहिती पाहू या. 
स्वामी रामानंद तीर्थ (ऊर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे एक संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळकर्ते होते. त्यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणी 03 ऑक्टोबर 1903 रोजी झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील सरकारी शाळेत झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते. इ.स. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी त्यांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाचे नूतनीकरण केले.
‘हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’ अशी हाक रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली. याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले. मुक्तिसंग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ’व्हिजन’ हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत. माणिकराव पहाडे, शंकरभाई पटेल, बाबासाहेब परांजपे. गोविंदभाई श्रॉफ हे तरुण स्वातंत्र्यसैनिक त्यांच्यासोबत होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख समर्थक होते. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सशस्त्र पोलीस कारवाई करून निजामाला शरण आणले. हैदराबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतात विलीन झाले. यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांचे विशेष योगदान होते. 
मुक्तीसंग्राम लढ्यातील सर्व स्वातंत्र्य सेनानीना विनम्र अभिवादन  ........!
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
संकलन :- नासा येवतीकर, स्तंभलेखक तथा विषय शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद 9423625769
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...