Thursday 24 December 2020

Atmanirbhar ( आत्मनिर्भर )


कथा - आत्मनिर्भर
आपल्या कादंबरीची नायिका आहे सुधा, जिच्या जीवनात अनेक चढ उतार आले तरी ती त्या सर्व संकटांना धैर्याने तोंड देऊन सामना केला. तिने स्वतः च्या पायावर उभे राहून आत्मनिर्भरपणे जीवन जगण्याचा जो साहस दाखविला तसा साहस प्रत्येक महिलेने दाखविला पाहिजे. महिलांनी आता आत्मनिर्भर होऊन जगणे आवश्यक आहे. पन्नास टक्के राखीव जागा मिळून ही महिलांना म्हणावी तशी प्रतिष्ठा व मानसन्मान मिळतच नाही. कारण महिलांनी अजूनही स्वतःच्या प्रतिभेला ओळखले नाही. म्हणून प्रत्येक महिलांनी स्वतःच्या प्रतिभा ओळखून जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवे आणि आत्मनिर्भर होऊन जगायला हवं, असा छोटा संदेश या कादंबरीतून देण्याचा प्रयत्न केला आहे. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग पहिला
सुधाचे बालपण
डोंगराच्या पायथ्याशी वसलेले हरिपूर नावाच्या गावात माधव आणि सविता मोलमजुरी करून सुखी जीवन जगत होते. त्यांना सुधा नावाची चुणचुणीत मुलगी होती. सुधा दिसायला सुंदर, बोलायला चतुर आणि अभ्यासात हुशार मुलगी होती. माधव हा विठ्ठलाचा परमभक्त होता. सकाळ - सायंकाळ नित्यनेमाने हरिपाठ करायचा. त्याची पत्नी सविता ही देखील सोज्वळ आणि भाविक होती. तो पंढरपूरची वारी कधीच चुकली नाही. कार्तिकी आणि आषाढी एकादशीला तो पंढरपूरला जात असे. घरात असे भक्तिमय वातावरण होते आणि या मंगलमय वातावरणात सुधा चंद्रकलेप्रमाणे वाढत होती. मुलगी जशी मोठी होत जाते तशी आई-बाबांची काळजी वाढत राहते. सुधाचे वय वाढू लागले तशी ती अजून सुंदर दिसू लागली. तिची सुंदरता वाढू लागली आणि इकडे माधवची काळजी वाढू लागली. मुलीची खूप काळजी घेऊ लागले. तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होत आले होते. गावातील शाळा संपली आणि तिला शिकण्यासाठी शेजारच्या गावातील शाळेत जाणे आवश्यक होते. ती सातवीतून आठव्या वर्गात गेली होती. 
" बाबा, मला पुढं शिकायचं आहे. "
" सुधा, तू सातवी पास झालीस, हेच खूप झालं. आता पुढे शाळा बिळा काही नाही."
" नाही बाबा, मला शिकायचं, माझ्यासोबतचे शकू आणि रमा दोघेही शिकणार आहेत. त्यांच्यासोबत जाते ना, मी पण ..."
" हे बघ बाळा, त्यांची गोष्ट वेगळी आहे. ते श्रीमंत आहेत, आपल्याकडे तेवढा पैसा नाही, आपण नाही शिकू शकत."
" आई, बाबाला सांग ना, मला जाऊ दे ना शाळेला "
" बेटा, बाबा म्हणतात ते बरोबर आहे, तुझं शाळा शिकण खूप झालं, आता जरा घराच्या कामाकडे ही लक्ष दे." 
माधव आणि सविता आपल्या मुलीला खूप समजावून सांगत होते मात्र ती ऐकायला तयार होत नव्हती. शाळा शिकण्याच्या एकाच गोष्टीवर ती ठाम होती. त्या रात्री सर्वचजण चिंताग्रस्त होऊन झोपी गेले. सुधा एकुलती एक लाडाची लेक होती. तिचा हट्ट पूर्ण करणे आवश्यक होते. सर्व सोंग करता येतात मात्र पैश्याचे सोंग करता येत नाही. रोजच्या जेवणाचे वांदे आहेत,तर तिच्या शिक्षणासाठी पैसा कुठून आणावं हा प्रश्न माधवच्या समोर पडला होता. तेरा चौदा वर्षाची सुधा शिकण्यासाठी बाहेरगावी जाणार याची काळजी त्यांना लागून होती. पोटाला चिमटा देऊन एकवेळ तिचं शिक्षण पूर्ण करू पण तिची येण्या-जाण्याची काळजी माधवला सतावत होती. वर्तमानपत्र आणि टीव्हीवरील अत्याचार व बलात्काराच्या बातम्या वाचून ऐकून त्याची काळजी अजून वाढत होती. ही सारी चिंता सुधाला कसं सांगावं ? ती तर अडून बसली होती. शेवटी सुधाला शाळेला जाण्याची परवानगी मिळाली. तिच्या मनाविरुद्ध काही करावं तर ती अजून काही उलटसुलट करून घेईल म्हणून माधवने शेजारच्या शाळेत तिला शिकण्यासाठी पाठवून दिला. ती आता आपल्या मैत्रिणीसह शाळेला पायी ये-जा करू लागली. आजपर्यंत ती कधी ही आई-बाबा शिवाय घराबाहेर पडली नव्हती पण शाळेच्या निमित्ताने ती बाहेर पडली. तिला बाहेरच्या जगाचा अनुभव यायला वेळ लागला नाही. तिला आता लोकांच्या नजरा, लोकांचे बोलणे आणि इतरांचा स्पर्श या सर्व बाबीची जाणीव होऊ लागली. आई-बाबा शाळा शिकण्यासाठी का नकार देत होते याची देखील तिला जाणीव झाली होती. सुधा तशी खूप समजदार आणि तल्लख बुद्धीची होती. त्यामुळे तिने बाहेरील वातावरणाशी फार लवकर जुळून घेतली. बघता बघता एक वर्ष संपले. ती आता धीट बनली होती आणि तिच्या आई-बाबांना देखील जरासा विश्वास वाढला होता. तरी सुधा ची आई अधूनमधून तिच्या लग्नाची गोष्ट काढत होती. 
" अहो, सुधाचे दोनाचे चार हात करायला हवं, लवकर स्थळ शोधायला हवं." 
" हो, मला ही तेच वाटतं, पण सुधा ऐकेल काय ?" 
" तिला मी समजावून सांगते, तुम्ही स्थळ शोधा आता."
" होय, माझ्या नजरेत एक चांगलं स्थळ आहे, शेजारच्या गावातच आहे. एकुलता एक मुलगा आहे आणि चांगली जमीन आहे." 
" मग बघा की, उद्याच्या उद्या जाऊन त्यांना आमंत्रण देऊन या"
" बरं, सकाळी पाहतो, झोप आता." 
झोपेचं सोंग घेतलेली सुधा हे सारे ऐकत होती. आई-बाबा माझं शिक्षण बंद करून लग्न लावून देतात. काय करावं ? शाळा शिकावं की लग्नाला होकार द्यावं ? याच विचारात ती झोपी जाते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग 2 रा
सुधाची सोयरीक
उन्हाळी सुट्याला सुरुवात झाली होती आणि सुधा आपल्या मामाच्या गावी गेली. तिचं मामाचे गाव म्हणजे सीतापूर जे की हरिपूरला लागून होतं. तिचा मामा त्या गावातील ग्रामपंचायत मध्ये सेवक म्हणून काम करत होता त्यामुळे संपूर्ण गाव त्याला किशनमामा या नावाने ओळखत होते. त्याला एक मुलगा आणि मुलगी होती. ज्यांच्यासोबत सुधा हसत खेळत सुट्टीचा आनंद घेऊ लागली. रोज शेतात जायचं, आंब्याच्या वनात जाऊन पाडाचे आंबे खायचे, खेळ खेळायचे खूप मजा करायचे. त्याच गावात सखाराम नावाचे एक सावकार राहत होते. ज्यांना एक मुलगा होता दीपक जो की लाडाने खूपच बिघडून गेला होता. त्याचं लग्न लावून दिलं तर त्याच्यात सुधारणा होईल असा विचार सावकारच्या मनात चालत होता. त्याचवेळी सुधाच्या बाबत त्याला कळाले आणि मुलगी गावात त्यांच्या मामाकडे आली आहे हे ही कळाले. त्यांनी दुरूनच सुधाला बघितले, पाहताक्षणी सावकारला सुधा खूप आवडली. काही ही करून आपल्या दिपकचे लग्न सुधासोबत लावण्याचा तो विचार करू लागला. तसा संदेश किशनमामाच्या कानावर गेलं. किशनमामाने तसा संदेश सुधाच्या आई-बाबांना कळविले. त्याबरोबर ते दोघे धावत पळत सीतापूरला आले. 
घरात सुधाच्या लग्नाची तयारी चालू झाली. तिच्या कानावर ही गोष्ट गेली. तशी ती लग्नाला विरोध करू लागली. 
मला आताच लग्न करायचे नाही, दहावी पास झाल्यावर बघू. 
चांगलं स्थळ आहे, अशी संधी वारंवार मिळत नाही 
आईने तिला समजावत बोलत होती. मात्र सुधा आपल्या बोलण्यावर ठाम होती. काय करावं ? हे काही सुचत नव्हतं. सावकार एकसारखे किशनमामाच्या मागे हात धुवून लागला होता. हो नाही करता करता सुधा लग्नाला तयार झाली. सीतापूर गावात सखाराम सावकार एक प्रसिद्ध व्यक्ती होते. त्यांच्या घरात सर्व सुख सोयी होत्या. त्यांच्याकडे गायी, म्हशी, अशी जनावरे देखील होती. सुधा ला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही एवढं ऐश्वर्य होतं. मुलाच्या घरूनच मागणी आल्यामुळे मुलीला नापसंद करण्याचा प्रश्नच नव्हता. ठरल्याप्रमाणे किशनमामाने सुधाच्या लग्नाची बोलचाली करण्यासाठी गेला. 
" सुधा लग्नाला तयार झाली, तिचे आई-वडील खूप गरीब आहेत, लग्नात वधू पित्याकडून काही ही मिळणार नाही, कन्यादान करून मुलगी तेवढं आपल्या पदरात देतील, हे मान्य असेल तर बोला"
" किशनमामा, आम्हांला सर्व काही मान्य आहे. मुलगी तेवढं पदरात द्या. बाकी सर्व आम्ही करू". सर्वाना मुलगी पसंद होती आणि मुलाच्या बाबतीत काय सांगायचं ? साऱ्या गावाला माहीत होतं दीपक कसा आहे ते ? दीपक हा एक लाडात वाढलेला सावकाराचा एकुलता एक मुलगा. गावात कोणासंगे ही भांडण करायचं, दादागिरी दाखवायची ही त्याची सवय होती. काही दिवसापासून त्याला वाईट सवयी देखील लागल्या होत्या. किशनमामाला हे सारं ठाऊक होतं. त्यामुळे तो सुधाला अगोदरच सर्व काही सांगून ठेवलं होतं. सुधा सुरुवातीला याच गोष्टीमुळे नकार देऊ लागली होती. पण लग्न झाल्यावर दीपक मध्ये सुधारणा होईल म्हणून सर्व विचाराअंती तिने होकार दिला. सुधाची सोयरीक झाली ही गोष्ट तिच्या मैत्रिणीला आणि शाळेत देखील कळाले. एवढ्या लहान वयात लग्न करू नये असा सल्ला शिक्षक मंडळींनी तिच्या वडिलांना सांगितला. पण माधव मुलीच्या काळजीत काहीएक ऐकायला तयार नव्हता. त्याला कायद्याची बाब देखील सांगून बघितलं पण तो काही ऐकत नव्हता. बिचारी सुधा ती काहीच बोलत नव्हती. तिला एवढ्या लहान वयात लग्न करायचं नव्हतं, तिला खूप शिकायची इच्छा होती मात्र वडिलांच्या परिस्थिती चा देखील तिला विचार करणे आवश्यक होते. वडिलांना सुधाची जशी काळजी वाटत होती तशी सुधाला देखील वडिलांची काळजी वाटत होती. आई-वडिलांचा विचार करून तिने या लग्नाला होकार दिला. उद्यापासून तिच्या जीवनाची दुसरी पहाट सुरू होणार होते. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग 3
सुधाची पहिली रात्र
दीपक हा श्रीमंत सावकाराचा एकुलता एक मुलगा होता. म्हणून त्याचे लग्न मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचा त्यांनी ठरवलं होतं. त्यानुसार लग्नाची वरात काढण्यात आली. घोड्यावर दीपक बसलेला, त्याच्या समोर खूप मोठा बँड वाजत होता. त्याचे सर्व मित्रमंडळी खूप जोमात आणि बेहोश होऊन ( कारण ते सर्वच दारू प्यालेली होती ) नाचत होती. गावात यापूर्वी अशी कोणाची वरात निघाली नव्हती. लग्नाची वेळ संपून गेली तरी मित्रांचे नाचगणे काही थांबत नव्हते. सारीच मित्रमंडळी बेहोश झाली होती त्यामुळे त्यांना कशाचेही भान राहिले नव्हते. असे तसे करता करता चार पाच उशिराने दीपक आणि सुधाचा लग्नसोहळा संपन्न झाला. लग्नाचे जेवण म्हणून सावकारांनी लाडू, जिलेबी, शिरापुरी, गुलाबजामून अश्या गोड पदार्थासह वरणभात आणि मसालेदार भाजी देखील केली होती. न भूतो न भविष्यति असा विवाहसोहळा पार पडला. सुधाचे आई-वडील आणि त्याचे नातलग हा सोहळा पाहून धन्य झाले. किती श्रीमंतीचे घर मिळाले म्हणून प्रत्येकजण तिची प्रशंसा करीत होते. सुधा देखील खूप आनंदी होती. लग्नानंतरच्या सर्व पूजा, अर्चा, विधी संपन्न झाले. 
लग्नानंतर सुधाची पहिली रात्र होती. आज तिच्या मनात वेगवेगळे विचार घुटमळत होते. मनातल्या मनात ती आनंदी होत होती. आजची पहिली रात्र कशी असेल ? याचा विचार करत ती आपल्या खोलीत बसली होती. दीपक सकाळी जेवण करून बाहेर पडला होता. सायंकाळ होत आली तरी त्याचा पत्ता नव्हता. रात्रीचे आठ वाजून गेले होते. सर्वांनी आपापले जेवण उरकून घेतले तरी दीपकचा पत्ता नव्हता. सुधा दाराकडे डोळे लावून बसली होती. दीपक आल्यानंतर जेवण करता येईल या विचारात ती तशीच बसून राहिली. वाट पाहत पाहत तिला डोळा कधी लागला हेच कळाले नाही. मध्यरात्री बारा वाजून गेल्यावर दारावर आवाज ऐकू आला म्हणून ती दचकून जागी झाली. दारात दीपक होता. लुडकत लुडकत चालत होता. त्याचा स्वतःचा तोल त्याला सांभाळता येत नव्हता. सुधा लगेच जागेवरून उठली आणि दीपकला आधार देत आपल्या खोलीत आणली. दीपक खूप प्याला होता. त्याला त्यावेळी कशाचेही भान नव्हते. जेवण करणार का ? सुधाने दीपकला विचारले पण तो काहीच बोलत नव्हता. नुसते काहीतरी इशारे करत होता. त्याला मुळी भानच नव्हते. आज पहिली रात्र आहे हे मात्र त्याला नक्की लक्षात होते म्हणून तो सुधाला आपल्याजवळ ओढू लागला. सुधा त्याच्या या क्रियेला विरोध करीत होती. मात्र नशेत धुंद असलेला दीपक तिच्यावर हावी झाला. आपली भूक शांत करून तो झोपी गेला. पहिल्या रात्रीविषयी सुधाने काय काय स्वप्न पाहिले होते ? काय काय विचार केले होते ? कोणते मनसुबे तिने रचले होते ? सारे काही मातीत मिसळले. एका मिनिटांत तिची पहिली रात्र संपली होती. ती तशीच जळून राहिलेल्या लाकडाचा जसा धूर निघतो तश्या अवस्थेत ती झोपी गेली. 
कोंबडा आरवला. सकाळ झाली. घरातल्या लोकांना हे काही कळू नये या अविर्भावात सुधा सकाळी लवकर उठली. बाहेरची सर्व कामे करून डोक्यावरून अंघोळ केली. देवपूजा करतांना तेंव्हा दीपकला जाग आली ते ही आरतीच्या घंटीच्या आवाजाने. रात्री दारू जरा जास्त झाली होती. लग्नाची पार्टी दिली होती मित्रांना. लग्नात मित्रमंडळी खूप नाचले होते म्हणून आभार प्रदर्शनासाठी पार्टीचे आयोजन केले होते. रात्री एक एक मित्र जोडल्या जात होते त्यामुळे सर्व मित्रांची विनंती पूर्ण करता करता त्याला जरा जास्तच झाले होते. पार्टी संपायला रात्रीचे बारा वाजले. दीपकची पहिली रात्र होती म्हणून बाराच्या अगोदर तो तिथून सुटला अन्यथा ही मंडळी रात्रभर पीत बसले तरी कोणी यांची वाट पाहत नाहीत. अशी मित्रमंडळी जमा झाली होती. सुधाला पहिल्या रात्री जो अनुभव आला ते प्रत्येक रात्री येऊ लागला.   तिची प्रत्येक रात्र पहिली रात्र ठरू लागली. दीपक बेहोश बेधुंद अवस्थेत घरी यायचा. तिच्यावर जोर जबरदस्ती करायचा. तिने कधी नकार दिला तर एक-दोनदा मार देखील दिला होता. दीपकचे वागणे तिला सहन होत नव्हते. घरात खुप श्रीमंती आहे पण मनाला समाधान नसेल तर ही श्रीमंती काय कामाची ? सासू-सासरे यांना दीपक विषयी काही बोलले तर ते काहीच ऐकून घेत नव्हते. लाडात वाढलेलं लेकरू आहे, तूच त्याच्यात काही सुधारणा करशील म्हणून तुझ्यासोबत लग्न लावून दिलंय असे ते अधूनमधून बोलत. मी बळीचा बकरा बनले की काय असे कधी कधी सुधाला वाटायचे. लग्न होऊन सहा महिन्यांचा काळ उलटला असेल सुधाला दिवस गेल्याची बातमी सासरच्या आणि माहेरच्या लोकांना कळाले. सर्वाना खूप आनंद झाला. सासूने तर फर्मान सोडले सुनबाई, मुलगाच जन्मायला हवा. सासरे देखील तसेच बोलू लागले. सुधा मात्र विचार करू लागली मुलगा होणे किंवा मुलगी होणे हे आपल्या हातात थोडेच आहे ? ते तर ईश्वराच्या हातात आहे. ती याच विचारात गाढ झोपी गेली. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग - चौथा
वांझोटी सुधा
पाचव्या महिन्यात सुधाची ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी देखील सावकाराने गावजेवणाची खूप मोठी मेजवानी दिली. सर्वांनी सुधाला भरभरून आशीर्वाद दिले. दीपक आता बापबनणार होता. तरी त्यांच्यामध्ये तीळभर देखील सुधारणा झाली नाही. त्याला दारू पिल्याशिवाय रात्री झोप येत नसे आणि सकाळी दारू पिल्याशिवाय चालता येत नसे एवढी वाईट स्थिती झाली होती. दीपकमध्ये सुधारणा कशी करावी ? याविषयी ती नेहमी विचार करीत असे. मात्र तिला काही उपाय सापडत नव्हता. तिला दिवस गेले होते. तरी ही दीपक रोज रात्री पिऊन यायचा आणि तिच्यावर जबरदस्ती करायाचा. सुधाने अनेकदा समजवून सांगितले असे केल्याने आपल्या येणाऱ्या बाळाला धोका होऊ शकतो मात्र तो होशमध्ये असेल तर समजेल ना ! त्याला ते कधीच कळत नव्हते. एके दिवशी रात्री सुधाच्या पोटात दुखाण्यास सुरुवात झाली. बेहोश दीपक बाजूला मेल्यागत पडून होता. किती ही हलवले तरी तो जागा होत नव्हता. सुधाचे रडणे ऐकून सासू-सासरे बाहेर आले. त्यांनी तिला एका गाडीत टाकून त्याच रात्री दवाखान्यात घेऊन गेले. सावकाराचे वजन शहरात देखील होते म्हणून लगेच एक महिला डॉक्टर मिळाली. सुधाला दवाखान्यात भरती करण्यात आले. डॉक्टर मॅडमने सर्व तापसणी केल्या व ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेली. काही तासानंतर ती डॉक्टर मॅडम बाहेर आली आणि म्हणाली, ' माफ करा, मी बाळाला वाचवू शकले नाही, गर्भातच ते मृत्युमुखी पडले होते, पण एक बरे झाले, तुम्ही लवकर घेऊन आलात त्यामुळे बाळाची आईला वाचवू शकले.' एवढे बोलून डॉक्टर निघून गेले. ते दोघे सुधाला पाहण्यासाठी मध्ये गेले. सुधाला अजून होश आला नव्हता आणि तिचे बाळ, बाजूला मृत्युमुखी पडलेले होते. सासू-सासऱ्यांच्या इच्छेनुसार तो बाळ मुलगाच होता, दिसायला सुंदर, गोंडस आणि गुटगुटीत होता मात्र मेलेला होता. तेथील नर्सने त्या बाळाला उचलले आणि त्यांच्या स्वाधीन केले. बाळाच्या आईला होश येण्याच्या अगोदर या बाळाला घेऊन जा आणि त्याचे अंतिम संस्कार करून टाका. ज्याचे प्रथम संस्कारच झाले नाही त्याचे काय अंतिम संस्कार करणार ? पण लगेच त्यांनी त्या बाळाला आपल्या हातावर घेतले आणि पुढील क्रियाकर्म पूर्ण केले. काही तासानंतर सुधाला जाग आली. ती आता मोकळी झाली होती. त्यामुळे तिचे डोळे आपल्या बाळाला शोधत होती. मात्र बाळाच्या रडण्याचा आवाज कुठेही ऐकू येत नव्हता. प्रत्येक स्त्री तेंव्हाच पूर्ण होते जेंव्हा ती माता बनते. ती माता बनणार होती पण काळाने तिच्यावर असा झडप घातला की, शेवटच्या क्षणी हिरावून नेलं. तुला मेलेलं लेकरू जन्माला आले हे मोठ्या जड अंतकरणाने तिला सांगण्यात आलं. हे कळतच ती धाय मोकलून रडू लागली. ते लेकरू का मेलं हे तिला माहीत होतं, त्याचं कारण तिचा नवरा होता हे जाणून होती पण सांगावं कुणाला ? हा तिच्या समोर फार मोठा प्रश्न होता. तिच्या बोलण्यावर कोण आणि कसा विश्वास ठेवणार ? हा ही एक प्रश्न होता. इकडे दीपकला याचे काही सोयरसुतक नव्हते. तो रोजच आपल्या मित्रांसंगे दारू पिण्यात मश्गुल होता. सुधाला दवाखान्यातून सुट्टी मिळाली. तशी ती सासरी जाण्याच्या ऐवजी माहेरी जाणे पसंत केले. दवाखान्यातून आल्यापासून सुधा उदास राहत होती. पोटचा लेकरू स्वतःच्या चुकीमुळे घालविल्याने तिला खूप पश्चाताप होत होता. एकवेळ जर दीपकचा विरोध केला असता तर बाळ सुखरूप या जगात आला असता. मी का विरोध केला नाही म्हणून ती स्वतः वर संताप करत होती. सुधाची आई तिला समजावून सांगत होती, मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. महिना दीड महिन्याचा काळ उलटला. आईने सुधाला सासरी जाण्याविषयी विचारू लागली. तेंव्हा सुधा सासरी जाण्यास नकार देऊ लागली. त्या नरकात मी जाणार नाही. बाहेरून खूप ऐश्वर्यसंपन्न दिसते मात्र मधून सारं पोखरलेलं आहे. तिथं सुख नावाची वस्तूच नाही. तो नवरा नाही, तो हैवान आहे, राक्षस आहे. त्याला फक्त शरीराची भूक मिटविण्यासाठी बाई पाहिजे असते, बायको नाही. मी जाणार नाही. सर्वांनी खूप समजूत काढल्यावर सुधा सासरी जाण्यास तयार झाली. ती यावेळी मात्र मन कठोर आणि खंबीर बनून आली होती. रोजच्याप्रमाणे दीपक रात्री उशिरा दारू पिऊन आला होता. आल्या आल्या त्याने जबरदस्ती करू पाहत होता. पण तिने थोडा विरोध केला तसा त्याला खूप राग आला. पण तिने जरा समजूत काढली आणि त्याला तसेच झोपू घातले. तिला हे तंत्र आता बऱ्यापैकी जमू लागले होते. म्हणून पूर्वीप्रमाणे तिला त्याचा त्रास वाटत नव्हता. असेच एक दोन वर्षे निघून गेली. सासू रोजच तिला बाळाच्या बाबतीत काही गोड बातमी आहे का म्हणून विचारत असे. पण काही गोड बातमी मिळत नव्हती. म्हणून एके दिवशी सासूने सुधाला दवाखान्यात चेकअप करण्यासाठी नेले. डॉक्टर मॅडमने संपूर्ण तपासणी केली आणि सांगितलं की, सुधा कधीच आई होऊ शकत नाही. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग पाचवा
नवऱ्याचे दुसरे लग्न
पहिल्या प्रसूतीच्या वेळी सुधाच्या गर्भपिशवीला धक्का बसला होता त्यामुळे ती यापुढे कधीच माता बनू शकत नाही असे डॉक्टर मॅडमनी सांगितल्यापासून सुधा अजून चिंताग्रस्त झाली. तिचे कशातही मन लागत नव्हते. सासूचे तर आता तिच्यावरून मन देखील उठले होते. आपल्या वंशाला आता दिवा मिळणार नाही याच काळजीत ती रात्रंदिवस विचार करू लागली. दीपकला तर याचे काही देणे घेणे नव्हते. सुधा आपल्या खोलीतून बाहेर पडत नव्हती. कोणासोबत बोलत देखील नव्हती. उन्हाळ्यात जीर्ण झालेल्या झाडासारखी ती वाळून चालली होती. त्या झाडाला पावसाळ्यात पुन्हा हिरवीगार पाने फुटून ते झाड बहरू शकते मात्र सुधा आता कधीच माता होऊ शकणार नाही याच विचाराने अजून कोमेजून चालली होती. दिवसामागून दिवस सरत होते. दीपक मध्ये काही फरक पडत नव्हता. सासूबाई तिला टाकून बोलत होती. शेजारापाजाऱ्याकडे ती सुधा विषयी काहीबाही बोलू लागली. सुधा आता कधीच आई बनू शकणार नाही हे जवळपास सर्वाना कळाले होते. त्यामुळे प्रत्येकजण तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले. घरात आता दिपकच्या दुसऱ्या लग्नाविषयी चर्चा सुरू झाली होती. सावकार देखील याविषयी विचार करू लागले. दिपकच्या कानावर देखील ही गोष्ट गेली. त्याला तर ही आयती संधीच मिळाली होती. आजकाल सुधा त्याला जवळ देखील येऊ देत नव्हती त्यामुळे त्याने आपले लक्ष घरापेक्षा बाहेर जास्त ठेऊ लागला होता. दीपकचे लक्ष्मी नावाच्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. ती एक चतुर आणि धूर्त बाई होती. दीपक जेव्हा जेव्हा तिच्याजवळ जात असे तेव्हा तेव्हा ती त्याला गोड बोलून त्याच्याकडून पैसे तर उकळत होतीच शिवाय त्याच्याकडे लग्न करण्याचा देखील हट्ट धरत होती. ती एक विवाहित महिला होती. मात्र तिचा नवरा तिच्या वागण्यामुळे तिच्यापासून दूर झाला होता. ती एकटीच राहत होती. तिला देखील एका पुरुषाची आणि पैश्याची गरज होती जे की दीपककडून पूर्ण होत होते. अचानक एके दिवशी दीपक लक्ष्मीला घेऊन घरी आला. ' आजपासून लक्ष्मी आपल्याच घरी राहील, मी तिच्यासोबत लग्न केलं असून ती आता माझी बायको आहे.' असे सांगून दीपक मोकळा झाला. सुधा समोरच उभे राहून हे सारे पाहत होती. पण काहीच करू शकत नव्हती. सासू-सासऱ्याची त्याला मूक संमती होती, त्यामुळे ती मूग गिळून गप्प होती. लक्ष्मी घरात आल्यापासून त्या दोघीचे धुसफूस चालू झाले. ती महाराणी सारखी बसून खात होती तर सुधा मोलकरीणसारखी काम करून दिवस काढत होती. ती वारंवार आपल्या संसाराविषयी आणि भविष्याविषयी विचार करत होती. काय करावं ? या प्रश्नाचे उत्तर तिला काही केल्या सापडत नव्हते. लक्ष्मी तरी आपल्या वंशासाठी कुळदीपक देईल म्हणून तिचे घरात खूप लाड केल्या जाऊ लागले. दीपक आता रात्री बेरात्री घरात येण्याच्या ऐवजी घरातच राहू लागला. सोबतीला लक्ष्मी होतीच. ती त्याला दारू पिण्याला विरोध करत नव्हती तर उलट त्याला खूप दारू पाजत होती. तिच्या मनात काही वेगळेच विचार चालत होते, जे की कुणालाही कळू देत नव्हती. दारू पिऊन दारू पिऊन दीपक खंगुण चालला होता. आता या घरात आपले काही स्थान नाही. आपण हे घर सोडलेले बरे याचा विचार करत सुधा आपल्या खोलीत झोपी गेली. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग सहावा
सुधाच्या स्वप्नात आली सुधा

लक्ष्मीचे पाऊल घरात पडल्यापासून सुधाचे महत्व कमी झाले. तिच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते. ती आपल्याच विचारात गुंग राहू लागली. याच विचारात ती झोपी गेली. त्या रात्री तिच्या स्वप्नात एक तिच्यासारखीच दिसणारी महिला आली. ती म्हणाली, ' सुधा, हे तू काय करतेस ? तू एक हुशार आणि धाडसी मुलगी होतीस. आपलं आयुष्य असं का वाया घालवत आहेस. उठ, स्वतःच्या पायावर उभे राहा. परावलंबी जीवन जगण्यापेक्षा आत्मनिर्भर हो, तुला काय शक्य नाही. तुझ्याकडे बुद्धिमत्ता आहे, त्याचा तू वापर कर. तुझं उर्वरित शिक्षण पूर्ण कर आणि काही तरी करून दाखव. तुझी ही खरी परीक्षेची वेळ आहे.' एवढं बोलून ती स्वप्नातली महिला अदृश्य झाली. ती खडबडून जागी झाली. सकाळी उठल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसत होते. तिने पुढील शिक्षण घेण्याचा निर्धार केला. तिचे असे काही वय उलटून गेले नव्हते. ती जेमतेम वीस-पंचवीस वर्षाची होती. तिने आपला निर्णय घरात सांगितला. तेंव्हा सासूने या गोष्टीला विरोध दर्शविला. कुठे ही जायचं नाही आणि काही शिकायचं नाही. घरात बसून राहायचं.' पण सुधा काही एक ऐकायला तयार नव्हती. पुढील शिक्षण घेण्यासाठी पक्का निश्चय केला होता. त्यासाठी तिने आपल्या शाळेतील काही मैत्रिणीचा आधार घेतला आणि आपले शिक्षण तिने चालू केली. घराचा उंबरठा ओलांडून ती बाहेरच्या जगात प्रवेश केला होता. ती मुळात हुशार होती. फारच लवकर तिने आपल्या कौशल्यावर लक्ष द्यायला सुरुवात केली. सुधाचे घराबाहेर जाणे सासूला तर पटलेच नव्हते आणि लक्ष्मीला देखील ते पसंत नव्हते. कारण सुधा घराबाहेर पडू लागली तसे तिच्यावर काम करण्याची वेळ येऊ लागली होती. त्यामुळे तिने देखील सुधाच्या बाहेर पडण्यावर विरोध करू लागली. त्या दोघींचा विरोध एवढ्या टोकाला गेलं की तिच्यावर घर सोडण्याची पाळी आली होती. तरी तिने आपल्या निर्णयावर ठाम होती, तिने दीपकचे घर सोडण्याचा निर्धार केला. तिची एक मैत्रीण तिला आधार देण्यासाठी पुढे आली. ती टेलरिंगचे काम करत होती आपले पोट भरत होती. सुधा तिच्या घरी येऊन राहू लागली. तिच्या टेलरिंगच्या कामात सुधा देखील मदत करू लागली. पाहता पाहता ती देखील टेलरिंगचे काम शिकून घेतली. दोघांचे पोट भरेल एवढा पैसा त्यांच्या हातात येत होता. दीपकच्या ऐश्वर्यसंपन्न घरात ती जेवढी सुखी नव्हती तेवढी सुखी या घरात होती, याचे तिला समाधान वाटत होते. स्वतः चार पैसे कमावून ती स्वतःच्या पायावर उभी होती, ती आत्मनिर्भर झाली होती, याचे ही तिला अभिमान वाटत होते. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग - सातवा
प्रगती बचतगट
तिचा टेलरिंगचा व्यवसाय चांगला जोमात चालू झाला होता. तिच्या हाताखाली आता चार पाच मुली टेलरिंगचे काम शिकून तिथेच काम करू लागली.  
प्रगती शिवणक्लास या नावाने तिने एक छोटीशी शाळा देखील सुरू केली. अनेक मुली आणि स्त्रिया तिच्याकडे टेलरिंगचा व्यवसाय शिकण्यासाठी येऊ लागली. तिचे नाव सर्वदूर पोहोचले होते. एक उत्तम उद्योजिका म्हणून तिला एका स्वयंसेवी संस्थेने पुरस्कार दिला. वृतपत्रात तिचे नाव झळकले. सर्व महिला स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर व्हायला हवे असा संदेश तिने आपल्या बोलण्यातून देत होती. शासनाच्या मदतीने तिने प्रगती नावाची बचतगट तयार केली. त्यात वीस होतकरू आणि गरजू महिलांना सहभागी करून घेतली. प्रगती बचतगटाचा आलेख देखील वरवर चढत होता. पाहता पाहता गावातील शे-दोनशे महिला तिच्या बचतगटामध्ये समाविष्ट झाले. प्रगती फाउंडेशन नावाची एक स्वयंसेवी संस्था ही निर्माण केली. ज्या कोणा महिलांवर अत्याचार, जुलूम किंवा त्रास होत असत अश्या असहाय महिलांना या संस्थेने आधार देण्याचे काम करू लागली. याच फाउंडेशनने प्रगती महिलाश्रमाची निर्मिती केली. ज्यात अनेक गरीब आणि ज्यांना या समाजात कोणी ही वाली नाही अश्या महिलांची राहण्याची, खाण्याची आणि झोपण्याची व्यवस्था केली. नुसती त्यांची सोयच केली नाही तर त्यांच्या हाताला काम देऊन त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहन दिले. टेलरिंगच्या व्यवसायासोबत अनेक छोटे छोटे काम त्यांना देऊ केली. त्यामुळे प्रगती महिलाश्रमातील बेसहारा असलेल्या महिला देखील उद्योगी बनल्या. त्यांच्या हातात देखील चार पैसे पडू लागले. आज त्यांना आपण असहाय किंवा गरीब आहोत ही कल्पना देखील करवत नव्हती. आम्ही काही तरी करू शकतो याचा आत्मविश्वास निर्माण झाला होता. दररोज सायंकाळी सुधा त्या महिलाश्रमाला भेट देऊन सर्वांच्या खुशाली विचारीत होती. त्या सर्व महिलांसाठी सुधा एक कल्पतरू बनून आली होती. इकडे गावातील सावकारच्या प्रगतीला अधोगती लागली होती. दीपक आता अंथरुणावर खिळून पडला होता. त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती तर लक्ष्मीला त्याची काही काळजी वाटत नव्हती. मुलाच्या काळजीपोटी सावकार एके दिवशी जगाचा निरोप घेतला. दीपकच्या आईचे देखील हाल बेहाल होऊ लागले. सुधा जेवढी काळजी घेत होती तेवढी काळजी लक्ष्मी घेत नव्हती. राहून राहून तिला सुधाची आठवण येत होती. दीपक आता काही दिवसाचा साथीदार होता. सुधाला हे सारे कळाले तेंव्हा ती त्याला भेटायला जाऊ की नको या विचारात होती. सकाळी उठून दीपकला भेटायला जावं असा विचार करून ती सकाळी तयार होऊ लागली. तोच बातमी कानावर येऊन धडकली की, दीपक जग सोडून गेला. किती झाला तरी तो तिचा नवरा होता म्हणून ती या बातमीने खूप दुःखी झाली. दीपकच्या जाण्याने त्याच्या आईला अपार दुःख झाले तर लक्ष्मीला असीम आनंद झाला. आता साऱ्या संपत्तीची एक एकटी मालकीण होणार या विचाराने तिच्या मनात आनंदाचे फटाके फुटत होते. दीपकच्या आईला मात्र काळजी लागली होती. काही करून लक्ष्मीच्या हातात एक फुटी कवडी पडू द्यायचे नाही असा ती मनोमन विचार करू लागली. यासाठी तिला शेवटी सुधा हीच एकमेव आधार होती. 
••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाग - आठवा 
सुधा जिंकली

एक दिवस मन घट्ट करून दीपकच्या आईने सुधाचे घर गाठले. त्यावेळी सुधा आपल्या कामात गर्क होती. ती आपल्या शिवणक्लास मधील मुलींना शिवणकामाचे धडे शिकवीत होती. तिचा तो हुरूप आणि उत्साह पाहून दीपकच्या आईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सुधा आई होणार नाही म्हणून तिचा खूप अपमान केली, तिला खूप त्रास दिला याचे तिला मनोमन दुःख वाटत होते. सुधा मुलांना सुद्धा लाजवेल आशा रीतीने काम करत होती. स्वतः च्या पायावर तिने प्रगती केली होती, स्वतःचे साम्राज्य उभे केले होते. तिला आता स्वतः चे एक घर होते, ज्या घरात अनेक मुली आणि महिला आत्मनिर्भरतेचे धडे गिरवत होते. आयुष्यभर दुसऱ्याच्या पैशावर जगणाऱ्या दीपकच्या आईला स्वतःची लाज वाटत होती. बाहेर कुणी तरी बाई आली आहे म्हणून एका मुलीने सुधाला कळविले. त्याबरोबर सुधा बाहेर येऊन पाहिली असता दीपकची आई म्हणजे सासूबाई बाहेर उभ्या होत्या. तिने लगेच बाहेर येऊन तिला दंडवत घातली आणि घरात घेऊन आली. चहापाणी झाल्यावर तिने येण्याचे कारण विचारली. तेव्हा सासूबाईनी घडलेली सर्व कहाणी कथन केली. लक्ष्मी आता सर्व संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा तू काही तरी मदत कर, तिच्या हातात फुटी कवडी पडू देऊ नको अशी विनवणी करू लागली. सुधाने यावर खूप विचार केली आणि सासूबाईला मदत करण्याचे वचन दिले. 
सुधाच्या बोलण्याने सासूबाईला हायसे वाटले. ती आनंदात घरी गेली. लक्ष्मीला ही गोष्ट कळाली तसे ती आपल्या सासूबाईवर खेकसली. रागात तिने काहीबाही शिव्याशाप देऊ लागली. पण सासूबाई काही बोलली नाही. सुधाने एका वकिलाची भेट घेतली. तिच्यासोबत घडलेली सर्व घटना सांगितली आणि लक्ष्मी ही दीपकची लग्नाची बायको नसून कायदेशीर पत्नी मीच आहे हे पुराव्यासह दाखवून दिली. लक्ष्मीच्या विरोधात तिने कोर्टात केस दाखल केली. सर्व पुरावे पाहून कोर्टाने लक्ष्मीला त्या घरातून नुसते हाकलून लावले नाही तर दीपकच्या संपत्तीवर तिचा काही एक हक्क नाही असा निर्वाळा देखील दिला. कोर्टात सुधा जिंकली आणि लक्ष्मी घराबाहेर झाली. निकाल ऐकून सासूबाईला अत्यानंद झाला. सुधा देखील या निर्णयाने आनंदी झाल्या. सासूबाईने सुधाला आपल्या घरी परतण्याची येण्याची विनंती केली. पण सुधाने स्पष्ट नकार दिला, आहे त्याठिकाणी मी खूप सुखी आणि आनंदी आहे असे म्हणून तिने आपल्याच घरी राहण्याचा निर्णय घेतला. सासूबाईला आपल्या केलेल्या कृत्यविषयी पश्चाताप होत होता आणि ती या पापातून मुक्त होण्यासाठी काही तरी सत्कार्य करावे असे तिला वाटत होते. म्हणून तिने आपली सर्व संपत्ती, घर आणि पैसा अडका सुधाच्या प्रगती फाउंडेशनच्या नावे करून टाकली. तेव्हा कुठे सासूबाईला समाधान वाटले. प्रगती फाउंडेशनने अनेक गरजू आणि गरीब महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. अजून एक सुधा निर्माण होऊ नये याची काळजी घेऊ लागले. सुधाच्या प्रगती फाउंडेशनचा डंका संपूर्ण देशात पसरला. कठीण परिस्थितीत सुधाने ज्या पद्धतीने आपले शिक्षण पूर्ण केले, टेलरिंगचे काम शिकून स्वतः आत्मनिर्भर झाली आणि आपल्यासोबत इतर महिलांना देखील आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना मदत केली या कामासाठी देशाचे पंतप्रधानानी प्रजासत्ताक दिनी सुधाचे जाहीर सत्कार केले आणि सर्व महिलांनी आत्मनिर्भर होण्याचा मोलाचा सल्ला दिला. 

------ संपूर्ण ------
लेखक - नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769

Wednesday 26 August 2020

covid-19

नियमाचे पालन करून कोरोनाला हरवू या. 

या वर्षाच्या प्रारंभी भारत देशात प्रवेशित झालेला कोव्हीड - 19 हा विषाणू पाहता पाहता संपूर्ण देश काबीज केला आहे. मोठमोठ्या शहरापासून छोट्या छोट्या गावात कोरोना विषाणू पसरला आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या देशात रोज सरासरी 60 हजार नवे रुग्ण सापडत आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 33 लाख झालेली आहे. याचसोबत मृतांची संख्या 58 हजार पर्यंत झाली आहे. सुरुवातीपासून जनता कर्फ्यु, संचारबंदी आणि लॉकडाऊन जाहीर करून देखील भारतात कोरोनाचा प्रसार का होत आहे, याबाबत ICMR ने दिलेल्या कारणावर प्रत्येक नागरिकांनी चिंतन करणे आवश्यक आहे, असे वाटते. 
" भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास काळजी न घेणारे आणि मास्क न घालणारे लोकच जबाबदार आहेत असा इशारा ICMRचे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिला आहे. विदेशात कोरोना रोगाचा प्रसार कसा झाला होता ? याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आणि माहिती सोशल मीडियात यापूर्वी व्हायरल झाले आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. आपण कोणाच्या संपर्कात आलो नाही आणि तोंडावरील मास्क काढलं नाही तर या रोगापासून दूर राहू शकतो. मात्र जनता ही गोष्ट लक्षात न घेता, बेजबाबदारपणे वागत असल्याने हा विषाणू फैलावत आहे. शासनाने लॉकडाऊन का जाहीर केले ? याबाबीविषयी आजही जनता अनभिज्ञ आहे. लॉकडाऊन काळातील टाळ्या वाजविणे यांना लक्षात आहे, दिवे लावणे हे विसरू शकले नाहीत मात्र घरी राहा, सुरक्षित राहा या वाक्याचा खरा अर्थ अजूनही काही लोकांना कळालेले नाही. देशातील सारी जनता जागी व्हावी म्हणून मोबाईलवर जनजागृतीची रिंगटोन लावण्यात आली, लोकांनी त्यातून देखील काहीच बोध घेतले नाही. कोरोना रोगापासून स्वतः दूर राहणे आणि आपल्या कुटुंबाला संरक्षित करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी फक्त तीन गोष्टी पाळलेच पाहिजे. 
घरातून बाहेर पडतांना नाक व तोंड झाकून राहील असे मास्क वापरले पाहिजे. मास्क नसेल तर निदान रुमाल तरी तोंडावर बांधायला हवे. गर्दीच्या ठिकाणी प्रत्येकांनी तोंडावर मास्क वापरल्याने कोरोनाचा प्रसार थांबविता येऊ शकते. म्हणून सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क लावण्याची प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. त्यासाठी कोणी आपल्यावर कायदा करण्याची वेळ येऊ नये. बाहेर गेल्यावर इतर लोकांशी संपर्क करू नये मग ते किती ही जवळची व्यक्ती असेल. हस्तांदोलन करण्यापेक्षा दुरून नमस्कार हीच पद्धत वापरली गेली पाहिजे. शेवटचे म्हणजे बाहेरून घरात प्रवेश करताना आपले हातपाय पाण्याने स्वच्छ धुवून घरात प्रवेश करणे. या छोट्या वाटणाऱ्या पण आपणाला कोरोनापासून संरक्षित करणाऱ्या सवयी निदान वर्षभर तरी विसरून चालणार नाही. 
माझ्याकडे ताकत खूप आहे, शरीरात प्रतिकारशक्ती भरपूर आहे, मला कोरोना होणारच नाही अशा कोणत्याही भ्रामक गैरसमजुतीमध्ये राहणाऱ्यांनी वेळीच सावध व्हावे. भारतात मृत्युदर कमी असला आणि रिकव्हरी रेट चांगला असेल तरी कोरोना रोगाला समूळ नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने जागरूकतेने वागले पाहिजे. अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे काम पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडावे अन्यथा घरातच राहण्याची सवय लावून घ्यावे लागेल. लोकांची गर्दी टाळावे म्हणून सरकारने अजून ही रेल्वे सुरू केली नाही, मंदिराचे दार उघडले नाही, शाळा-विद्यालय चालू केले नाही. जोपर्यंत आपण सर्वजण समजदार नागरिक होऊन वागणार नाही तोपर्यंत हे असेच चालू राहील, कदाचित 2020 हे वर्ष संपूनही जाईल. तेंव्हा आपली थोडीशी चूक आपल्या परिवारातील सदस्यांना संकटात नेऊ शकते, हे लक्षात असू द्यावे. काळजी करण्यापेक्षा काळजी घेतलेली केंव्हाही बरे. म्हणून सरकारकडून तयार करण्यात आलेल्या प्रत्येक नियमाचे आपण पालन करू या आणि कोरोना महामारीला हरवू या. जय हिंद

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769

Tuesday 25 August 2020

stop online Education

शिक्षण हवे पण ऑनलाईनला आवरा

सन 2019 च्या शेवटच्या महिन्यात कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घालून 2020 या वर्षाच्या सुरुवातीस भारतात प्रवेश मिळविला आणि येथे देखील त्याने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने त्याची साखळी तोडली जावी आणि मनुष्य एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भारत सरकारने जनता कर्फ्यु, संचारबंदीचा आदेश लागू करून लॉकडाऊन जाहीर केले. कोव्हीड 19 या कोरोना आजाराची सर्वानाच धास्ती होती त्यामुळे या पहिल्या लॉकडाऊनच्या काळात लोकांनी घरातच सुरक्षित राहून घराबाहेर पडणे टाळले. त्याचा परिणाम असा झाला की, अनेक कारखाने, उद्योगधंदे, दुकाने, हे सारे बंद ठेवावी लागली. त्यासोबत शाळा, महाविद्यालय देखील बंद ठेवण्यात आली. बारावीची परीक्षा संपली होती मात्र दहावीच्या परिक्षेतील भूगोल हा एकच विषय शिल्लक होता, शेवटी त्या विषयाची परीक्षा न घेता निकाल जाहीर करण्यात आले. बारावी आणि दहावीच्या परीक्षेनंतरच शालेय आणि विद्यापीठच्या परीक्षेला सुरुवात होते. त्यामुळे ह्या सर्व परीक्षा हो नाही करत रद्द करावे लागले आणि परीक्षा न घेता मुलांना पुढील वर्गात प्रवेशित करण्यात आले. 

कोरोना संकटामुळे शैक्षणिक क्षेत्रात ही नोंद घेण्यासारखी विशेष बाब घडली. पाहता पाहता जून महिना उजाडला तरी कोरोनाचे संकट टळले नाही. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याविषयी अनेक खलबते झाली. पण कोणतेही पालक आपल्या मुलांना संकटाच्या खाईत कसे सोडेल ? शाळा सुरू करण्यास पालकांचा तीव्र विरोध लक्षात घेता फक्त शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले मात्र शाळा सुरू झाली नाही. हे वर्ष असेच वाया जाते की काय ? अशी साशंका पालकांच्या मनात निर्माण झाले होते. त्याच काळात मुलांना ऑनलाईन शिक्षण देता येईल का ? याची चाचपणी सरकारने सुरू केली. त्यापूर्वीच काही हौशी मंडळींनी ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. ऑनलाईन शिक्षण ह्या गोंडस नावाखाली खाजगी शाळेतून व काही शिकवणी वर्गातून पालकांची अक्षरशः लूट सुरू झाली. शासन काही निर्णय घेण्याचा अगोदर काही खाजगी शाळांनी सोशल मीडियाचा आधार घेऊन मुलांना शिकवणी देण्यास प्रारंभ केली. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून शैक्षणिक फीसची मागणी करू लागले. शाळेची फीस भरावी, मुलांना मोबाईल ही द्यावे आणि इंटरनेट मिळविण्यासाठी महिना दोनशे ते तीनशे रुपयाचं रिचार्ज करावे या बाबीमुळे मध्यमवर्गीय पालक देखील हैराण झाले होते. ऑनलाईनच्या शिक्षणात काही मुले शिकण्याच्या ऐवजी मोबाईलवर गेम खेळतात, मोबाईल नाही दिले तर घर डोक्यावर घेतात असे काही पालकांकडून तक्रारीचा सूर ऐकायला मिळाला होता. त्याचसोबत मोबाईलवर जास्त वेळ अभ्यास केल्याने मुलांच्या डोळ्यावर व डोक्यावर देखील परिणाम झाल्याचे काही पालकांनी आपले मत व्यक्त केले आहे. काही घरात मोबाईल वरून वाद देखील झाले आहेत. तर काही पालकांना नवीन मोबाईल विकत घ्यावे लागले. एक बातमी अशी ही ऐकण्यास मिळाली, मोबाईल दिलं नाही म्हणून एका शाळकरी मुलाने आत्महत्या केली. खाजगी शाळेत शिकणारे विद्यार्थी हे चांगल्या घरातले असतात त्यामुळे त्यांचे पालक त्यांच्या ऑनलाईन शिक्षणाच्या सर्व गरजा पूर्ण करू शकतील. मात्र सरकारी शाळेत शिकणारे जे गरीब विद्यार्थी आहेत, ज्यांचे हाताच्या कमाईवर पोट अवलंबून आहे, एक वेळच्या खाण्याचे वांदे आहेत, ज्यांच्याकडे मोबाईल आहे मात्र मंथली रिचार्ज करण्याऐवढं पैसा नाही, असे पालक आपल्या मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाच्या गरजा खरंच पूर्ण करू शकतील का ? अर्थात याचे उत्तर नाही असे मिळते. ऑनलाईन शिक्षणाने समाजात शैक्षणिक विषमतेची दरी निर्माण केली आहे, हे सत्य स्वीकारावेच लागेल. कारण पैसेवाल्याच्या मुलांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळत आहेत त्यामुळे त्यांचा नियमित अभ्यास चालू आहे तर ज्यांच्याकडे पैसा नाही, मोबाईल नाही अशा पालकांची मुले ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. म्हणजे एकप्रकारे ते शाळाबाह्य होत आहेत. शिक्षण अधिकार अधिनियमानुसार देशातील प्रत्येक सहा ते चौदा वयोगटातील बालकांना समान शिक्षण मिळण्याचा हक्क आहे. मग या ऑनलाईन शिक्षणामुळे जी मुले वंचित राहत आहेत, त्यांचे काय ? वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त मागासवर्गीयांची संख्या जास्त आहे. म्हणजे गरीब मागासवर्गीय लोकांवर हा अन्याय नाही का ? एकाच गल्लीत आणि एकाच शाळेत शिकणारी दोन मुले एकाचा अभ्यास ऑनलाईन चालू आहे तर दुसऱ्याचा अभ्यास बंद आहे. सर्वच शिक्षकांना ऑनलाईन शिकवायला जमतेच असे ही नाही. ज्यांना जमते ते शिकवितात आणि ज्यांना जमत नाही त्यांचे विद्यार्थी देखील या शिक्षणापासून वंचित राहत आहेत. सह्याद्री वाहिनीने टिलिमिली नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे मात्र त्याला देखील म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. पूर्वी अर्धा तास असलेला हा कार्यक्रम नंतर एक तास करण्यात आला मात्र तेवढं अभ्यास मुलांना अपुरे वाटते. शाळेत सहा तास गुंग असणारी मुलांची ज्ञानाची भूक अर्धा एका तासाने पूर्ण होईल का ? शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण देण्याची शिक्षण विभागाच्या सूचना आहेत तर कोव्हीड - 19 अंतर्गत दुसऱ्या विभागाने सर्व्हे आणि समुपदेशन करण्याचे काम ही दिले आहे, त्यामुळे शिक्षकांची मात्र नाहक कोंडी होत आहे. मुकी बिचारी कुणीही हाका अशी त्यांची अवस्था झाली आहे. या सर्व बाबीचा विचार करून लवकरात लवकर या ऑनलाईन शिक्षणावर बंदी आणायलाच हवी. सरसकट सर्व मुलांना समान शिक्षण कसे देता येईल यावर विचारविनिमय होणे आवश्यक आहे. कोरोना प्रदूर्भावामुळे यापूर्वी 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आले आहे. तरी अजून शाळा सुरू झाली नाही आणि शैक्षणिक वर्ष अर्धे संपायला येत आहे त्यामुळे अर्धा अभ्यासक्रम कमी करणे हा एक उपाय त्यावर होऊ शकतो किंवा पूर्ण अभ्यासक्रम मुलांना शिकविण्यासाठी शैक्षणिक वर्ष बदलणे आवश्यक आहे. पूर्वीचे शैक्षणिक वर्ष जून ते एप्रिल असा होता त्याऐवजी डिसेंबर ते नोव्हेंबर असा नवीन शैक्षणिक वर्ष करण्यावर विचार करायला हवे. 01 डिसेंबरला शाळा सुरू करण्यात येऊन 30 एप्रिल पर्यंत पहिले सत्र, 01 मे ते 14 जून उन्हाळी सुट्या आणि 15 जून ते दिवाळी पर्यंत दुसरे सत्र व परीक्षा संपल्यावर 30 नोव्हेंबर पर्यंत दिवाळी सुट्या यापद्धतीने शाळांचे नवीन वेळापत्रक तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यावर विचार करणे आवश्यक आहे असे वाटते. विद्यार्थ्यांची कसलीही परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेशित करणे देशाच्या विकासासाठी घातक आहे. शिक्षक आणि विद्यार्थी समोरासमोर असल्यावर जी आंतरक्रिया होते आणि अध्यापन प्रभावी ठरते ती प्रक्रिया ऑनलाईन शिक्षणात दिसून येत नाही.  म्हणून ऑनलाईन शिक्षणाच्या बागुलबुवाला आवर घालून सर्व विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शैक्षणिक वर्षाला सुरुवात करावे, असे सुचवावे वाटते. 

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769

Sunday 16 August 2020

M S Dhoni

विश्वचषक जिंकून देणारा कूल कॅप्टन माही
भारताचा यशस्वी कर्णधार व यष्टीरक्षक कॅप्टन कुल या नावाने ओळखला जाणारा माही अर्थात महेंद्रसिंग धोनी यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. प्रत्येक क्रिकेट रसिकांसाठी हा एक धक्कादायक निर्णय म्हणता येईल. पण योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेला माहीचा हा निर्णय देखील आपल्या योग्य वेळी घेतला आहे, असेच म्हणता येईल. आपल्या एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 क्रिकेटच्या एकूण कारकिर्दीत 538 सामन्यात 17266 धावा काढल्या असून त्यात 16 शतक आणि 108 अर्धशतकांचा समावेश आहे. विकेटच्या मागे विद्युतल्लतेच्या चपळाईने 195 स्टम्पिंग करण्याचा एक अनोखा विक्रमही त्याच्या नावे आहे. बांगलादेश विरुद्ध 2004 मध्ये माहीने आपल्या क्रिकेट जीवनाला सुरुवात केली होती आणि पहिल्याच सामन्यात शून्य धावावर तो रनआउट झाला होता. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध खेळताना धोनीने आपली सर्वोत्तम खेळी खेळताना 183 धावा काढल्या आणि सर्व विक्रम मोडीत काढले. याच सामन्यात माहीने जगाला हेलिकॉप्टर शॉटची ओळख दिली. या सामन्यानंतर धोनी मागे वळून पाहिला नाही. आपली यशस्वी घोडदौड पुढे चालूच ठेवली. सन 1983 मध्ये कपिलदेव यांनी भारताला विश्वचषक मिळवून दिले होते. त्यानंतर तब्बल 28 वर्षांनी म्हणजे 2011 मध्ये माहीने भारताला विश्वचषक जिंकून दिले होते. तत्पूर्वी 2007 मध्ये आयसीसी वर्ल्ड टी-20 जिंकून दिली तसेच 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉपी देखील त्याच्या नेतृत्वात भारताला मिळाली. नव्वदच्या दशकात सचिन तेंडुलकर हा क्रिकेट विश्वातला देव होता. सचिनची जागा कोणी घेईल की नाही असे वाटत होते. भारतीय संघात सचिनची कमतरता भासू न देण्याचे काम माहीने केले. त्याची जगावेगळी खेळण्याची पद्धत विरोधकांच्या छातीत धडकी भरत होती. 
पूर्वी सचिन मैदानावर आहे म्हणजे सारे खेळाडू आणि प्रेक्षक निश्चित राहत होते अगदी तेच माहीच्या बाबतीत नंतर अनुभवायला मिळाले. धोनी मैदानावर आहे तोपर्यंत सामना भारताच्या बाजूने आहे असे विरोधकांना देखील वाटत होते. शेवटच्या षटकात फटके मारून त्याने अनेक सामने जिंकून दिले म्हणून सारेच धोनीला मॅचफिनिशर असे म्हणत असत. खरं तर ज्यावेळी माही भारतीय संघात पदार्पण केले त्यावेळी संघात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरभ गांगुली, युवराज सिंग असे अनेक महान खेळाडू होते. त्या सर्वांच्या खेळात माहीने आपली स्वतःची अशी वेगळी छाप निर्माण केली. सर्वांचे मन जिंकणारा तो मनकवडा होता. आपल्या संघातील खेळाडूचेच नाही तर विरोधी संघातील खेळाडूचे मन देखील तो वाचत होता. प्रत्येक खेळाडूची लकब आणि कच्चा दुवा याचा त्याला खूप अभ्यास होता. बॉलिंग करणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा तो एकप्रकारे कोच होता. विकेटच्या मागे उभे राहून प्रत्यक्ष मैदानावर तो बॉलरला काही ना काही टिप्स देत होता. म्हणूनच त्याच्या काळात अनेक हरणारे सामने जिंकता आले. निर्णायक क्षणी धोनीने घेतलेले अनेक निर्णय भारतासाठी फायदेशीर ठरत आले होते. बॅटिंग करताना माहीसोबत असला की पुढचा फलंदाज दिलखुलास खेळत असे. महेंद्रसिंग धोनी यांच्यासोबत रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन आश्विन, हरभजनसिंग ही नावे नेहमी लक्षात राहतात. सचिन आणि राहुल यांच्या प्रयत्नामुळेच माहीला 2007 मध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद मिळाले. कर्णधार पद मिळाल्यावर त्याच्या खेळण्यावर काही परिणाम होईल असे अनेकांना वाटत होते मात्र तसे काही घडले नाही. खेळाडू देखील एक व्यक्ती असतो, त्यालाही काही मर्यादा असतात. त्याचे शरीर देखील त्याला किती साथ देणार. शेवटच्या काही सामन्यात तो संथ खेळत होता अशी टीका त्याच्यावर झाली. सन 2019 च्या विश्वचषकात पाकिस्तानकडून जो पराभव झाला त्यात धोनीची संथ खेळी जबाबदार धरण्यात येऊ लागली मात्र धोनी परिस्थिती पाहून खेळत होता हे ही सत्य आहे. स्व. सुशांतसिंग राजपूत अभिनित एम एस धोनी अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून महेंद्रसिंग धोनी कसा घडला ? याची संपूर्ण माहिती सर्वांपर्यंत पोहोचली. त्यामुळे झारखंड राज्यातल्या एका छोट्या गावाचे नाव धोनीने जगभर पोहोचविले. त्याचे जीवनपट पाहून अनेक युवा खेळाडूंना नक्कीच प्रेरणा मिळेल. ज्याप्रकारे सचिन तेंडुलकर याने आपली दहा क्रमांकाची जर्सी सोडली नाही तसे माहीने देखील आपली सात क्रमांकाची जर्सी शेवटपर्यंत सोडली नाही. धोनीची जन्मतारीख सात होती म्हणून त्याने हा क्रमांक आजीवन सोबत ठेवत असे. सन 2007 मध्ये धोनीला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. त्याचसोबत 2009 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. तर आयसीसी ने 2008 व 2009 साठी प्लेअर ऑफ दि इअर म्हणून पुरस्कृत केले होते. सन 2018 मध्ये धोनीला भारत सरकारने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भविष्यात क्रिकेटचे सामने कसे आयोजित होतील आणि केंव्हा आयोजित होतील याबाबत शाश्वती नाही, अशा विषम काळात धोनीने जाहीर केलेली निवृत्तीची वेळ योग्य आहे, असे वाटते. प्रेक्षकांना महेंद्रसिंग धोनी निळ्या जर्सीत आता दिसणार नाही याची हुरहूर लागलेली असली तरी आयपीएलमध्ये पिवळ्या जर्सीत त्याला नक्की पाहता येणार आहे. यासोबत भारतीय क्रिकेट संघातील डावखुरा फलंदाज सुरेश रैना याने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता धोनी व रैना आपल्या स्वतःच्या जीवनाची दुसरी इनिंग सुरू करणार आहेत, त्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा .....!

- नासा येवतीकर, येवती
ता. धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

Friday 14 August 2020

भारतीय स्वातंत्र्य दिन 2020

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त 
स्वलिखित लेख, कविता आणि लघुकथा

Independent Day

        भारत देश महान

विविध पंथ धर्म नि जातीचे लोकं
येथे नांदतात गुण्यागोविंदाने छान
नाना लहान सहान प्रांताने बनला देश
गर्वाने म्हणू माझा भारत देश महान

भारताला लाभली गौरवशाली परंपरा
पाहिले अनेक क्रांतीवीर नि शूरवीरा
त्यांचे नाव घेता वाटे आम्हा अभिमान
गर्वाने म्हणू माझा भारत देश महान

आमच्या अज्ञानाचा फायदा घेउनी
दीडशे वर्षे राज्य केले इंग्रजांनी
चलेजाव लढ्याने जागा झाला स्वाभिमान
गर्वाने म्हणू माझा भारत देश महान

गुलामगिरी समूळ नष्ट करण्यासाठी
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी
अनेकांनी दिले आपल्या प्राणांचे बलिदान
गर्वाने म्हणू माझा भारत देश महान

अनेकांचे कष्ट अखेर आले फळाला
स्वातंत्र्य मिळाले पंधरा ऑगस्टला
एकमुखाने गाऊ भारतमातेचे गुणगान
गर्वाने म्हणू माझा भारत देश महान

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Wednesday 12 August 2020

22 years

*सेवेची बावीस वर्षे*
मी 12 ऑगस्ट 1998 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजनी केंद्र अनंतवाडी ता. माहूर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झालो. याठिकाणी आलेला अनुभव स्वतंत्र लिहिलेला आहे. येथील मुख्याध्यापक डी. बी. शेख यांचे मनोमनी खूप आभार मानतो. त्यांनीच मला खरा आधार दिला होता. येथे पाच वर्षे एक महिना नोकरी केल्यानंतर 13 सप्टेंबर 2003 रोजी धर्माबाद तालुक्यात माझी बदली झाली. त्यामुळे धर्माबाद पंचायत समितीमध्ये हजर झालो. माझा वर्गमित्र सुधाकर चिलकेवार प्राथमिक शाळा पांगरी येथे प्राथमिक शिक्षक पदावर होता. मी धर्माबाद तालुक्याचा रहिवासी असून देखील हे गाव मला माहित नव्हते. पण मित्र असल्यामुळे त्या गावाची मागणी केली आणि पांगरी या शाळेवर रुजू झालो.  येथील अनुभव देखील किनवट पेक्षा कमी नव्हता. जुन्नी, पांगरी, राजापूर आणि बाचेगाव ही गावे म्हणजे मिनी किनवट होती. ना बससेवा ना टेलिफोन .. बाप रे आज ही ते दिवस आठवले की अंगावर काटा उभा राहतो. त्यावेळी साईनाथ बोदलोड सर हे मुख्याध्यापक होते तर शेख खलील सर, सुधाकर चिलकेवार आणि माझा डी. एड. चा मित्र बाबू बनसोडे असे चौघेजण तिथे कार्यरत होते. मी त्याठिकाणी पाचवा व्यक्ती गेलो. सात वर्ग पाच शिक्षक असे जास्त काळ राहिलं नाही, थोड्याच दिवसात खलील सरची बदली झाली आणि आम्ही चारजण झालोत. याच शाळेवर कोलोड सर, वडजे सर, पंचलिंग सर, पठाण सर, सूर्यवंशी सर यांचा ही काही काळासाठी संबंध आला होता. याच शाळेवर असतांना मुख्याध्यापक पद देखील सांभाळण्याचा योग आला होता. येथील गावकरी, पालक आणि विद्यार्थी खूप सहकार्य केले. त्यामुळे हे दिवस खूप आनंदात गेले. पांगरी येथे आठ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ऑगस्ट 2011 यावर्षी तालुका अंतर्गत बदलीने जिल्हा परिषद हायस्कुल करखेली येथे रुजू झालो. येथे मिळालेला अनुभव मला पुढील जीवनात कामी आले. या शाळेत नोकरी करतांना मुख्याध्यापक निरडी सर, राचमाळे सर, हामंद सर, ठक्कुरवार सर, कांडले सर, गंगासागरे सर, अनीसुर रहमान, सौ. पाठक मॅडम, असे अनेक चांगले शिक्षकमित्र मिळाले. ज्यांच्यामुळे अनेक शैक्षणिक उपक्रम राबविणे सोपे गेले. ऑनलाइन बदली पोर्टलच्या अगोदर समुपदेशन पद्धतीने माझी म्युच्युअल बदली बिलोली तालुक्यातील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली येथे जून 2016 मध्ये झाली. माझा माहूर येथे रूममेट असलेला मित्र जगन्नाथ दिंडे त्या ठिकाणी कार्यरत आहे म्हणून मी त्या शाळेची निवड केली. पण दुर्दैवाने एका वर्षात दिंडे सर त्या शाळेवर अतिरिक्त ठरले आणि त्यांची बदली झाली. मला तिथे एकाकीपणा वाटत होता. मात्र येथील मुख्याध्यापक बी. एच. भोजराज सर आणि आय. एच. झंपलकर सर यांची अनमोल साथ मला मिळाली. भोजराज सरांची बदली झाल्यानंतर आलेल्या सौ. नीता दमकोंडवार मॅडम यांचे सहकार्य ही विसारण्यासारखे नाही. चिरली येथील विद्यार्थी, पालक, गावकरी आणि परिसर यातून मला नेहमीच आनंद मिळत होता. माझ्या मनातील  अनेक उपक्रम मला येथे करता आले व उपक्रमशील शिक्षक म्हणून सर्वत्र ओळख ही झाली. विषय शिक्षकांच्या समुपदेशन प्रक्रियेत मी सप्टेंबर 2019 मध्ये धर्माबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत भाषा विषय शिक्षक म्हणून रुजू झालो. येथील मुख्याध्यापक एम. एन. कागेरू सर, सहकारी शिक्षक हिमगिरे सर, सय्यद सर, सौ. जोशी मॅडम, श्रीमती बेहरे मॅडम, सौ. चंदा मॅडम यांच्या सहकार्याने दिवस आनंदात सरत आहेत. 
या बावीस वर्षाच्या काळात अनेक चढ उतार आले. दरवर्षी एक वेगळा अनुभव मिळत गेला. सन 1998 ते 2020 या बावीस वर्षांत अनेक जिवाभावाचे शिक्षक मित्र मिळाले. काही मार्गदर्शक अधिकारी लाभले. साहित्याच्या क्षेत्रात अनेक साहित्यकांची ओळख झाली. शाळा करत करत साहित्याचा मळा देखील सांभाळता आले. मध्यंतराच्या काळात एक-दोन वर्षे ऑफिसला देखील काम करण्याचा अनुभव मिळाला. त्याचा फायदा एवढा झाला की, प्रशासकीय बाबी कळू लागल्या. सकारात्मक मन निर्माण होण्यास मदत मिळाली. चांगले अधिकारी लाभले. येथूनच अनेक मित्रांचा फौजफाटा तयार करू शकलो. मुलांना अध्यापन करण्यासोबत माझ्या आवडत्या छंदाकडे कधीही दुर्लक्ष केलो नाही. त्याचमुळे वैचारिक लेखांचे सात, एक कवितासंग्रह, आणि एक कथासंग्रह असे एकूण नऊ ई साहित्य पुस्तकाची निर्मिती करू शकलो. आपल्या सर्वांचे प्रेम, सहकार्य, प्रोत्साहन आणि मार्गदर्शनामुळे मला हे जमले आहे. यापुढे ही माझ्या हातून विद्यार्थी हिताचे आणि देशाच्या हिताचे काम होवो अशी प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो. यानिमित्ताने आपण दिलेल्या शुभेच्छा स्वीकार करतो. धन्यवाद ...!

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

Friday 31 July 2020

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

सांगली जिल्ह्यातील वाटेगावात
तुकाराम जन्मले साठे घराण्यात

त्यांच्या वडिलांचे नाव होते भाऊराव
वाळूबाई असे त्यांच्या आईचे नाव

महाराष्ट्रात दूरवर त्यांचे नाव पसरले
अण्णाभाऊ नावाने ते ओळखू लागले

फक्त दीड दिवसच शाळेचे तोंड पाहिले
मात्र अनुभवानेच त्यांना जास्त शिकवले

सोबतीला होती अमरशेखची कामना
लालबावटा पथकाची केली स्थापना

लिहिली कादंबरी पोवाडे नि कथा
फकिरा कादंबरीत दिसली व्यथा

कामगार लोकांचे केले त्यांनी नेतृत्व
भाषणातून मिळविले लोकांचे पितृत्व

लेखणी पोहोचविली विदेशी रशियाला
अभिमान आहे प्रत्येक भारतीयाला

सर्वत्र झाले प्रसिद्ध बनले लोकशाहीर
साहित्यसम्राट म्हणून झाले जगजाहीर

- नासा येवतीकर, धर्माबाद, जि. नांदेड 943625769

My First Book

मी लिहिलेलं पहिलं पुस्तक
पाऊलवाट हे मी लिहिलेलं पहिलं पुस्तक. शालेय विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून या पुस्तकाची निर्मिती केली. ज्याप्रकारे एखाद्या स्त्रीला पहिलं बाळंतपणाचे डोहाळे असतात अगदी तसेच मलाही माझ्या या पहिल्या पुस्तकांविषयी झाले होते. शाळेतील विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टी सांगायचो त्या त्या गोष्टी घरी आल्यावर टिपून ठेवायचो. विद्यार्थ्यांना ठरवून असे काही बोलायचे नाही मात्र जीवनातल्या अनेक गोष्टी त्यांना गप्पा मारण्याच्या ओघात सांगत गेलो. त्यातून एक कल्पना सुचली की हे सारे इतर मुलांनाही कळायला हवे. शालेय विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालक आणि शिक्षक हे देखील अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणून त्यांच्या विषयीदेखील या पुस्तकात लिहायचा प्रयत्न केलोय. पुस्तक प्रकाशन झाल्यावर शाळेतील विद्यार्थ्यांनी ते पुस्तक रोज एका प्रकरणाचे अभिवाचन केले. तेवढा एक आनंद या पुस्तकाच्या निमित्ताने मिळालं.
   ( माझ्या पुस्तकाचे पहिले वाचक म्हणजे माझे विद्यार्थी )

पुस्तक वाचणे खूप सोपे आहे मात्र एखादे पुस्तक लिहून काढणे आणि प्रकाशित करणे खूपच कठीण बाब आहे. प्रकाशकांचा शोध घेणे ही एक दिव्यपरीक्षा आहे, असे मला वाटते. नवोगत साहित्यिकांना लवकर प्रकाशक भेटत नाहीत, एखादे वेळी भेटले तरी पुस्तक प्रकाशनासाठी लागणारा खर्च बघून कोणी पुस्तक प्रकाशित करण्याचा आपला विचार मागे घेतात. पुस्तक लिहिणे, त्यांची छपाई करणे आणि प्रकाशन करणे खरोखरच खूप कठीण असते याची जाणीव एखादे पुस्तक काढल्याशिवाय लक्षात येत नाही. पुस्तक निघाल्यावर त्याची विक्री होईल की नाही याची देखील खात्री नसते. प्रकाशक ही लेखकांना खूप कमी पुस्तक देतात. अर्ध्याहून जास्त पुस्तकं मित्रांना किंवा नातलगांना भेट म्हणून देण्यात संपतात. ते या पुस्तकाचे वाचन करतात की नाही याचे कधी कधी मनात शंकाच येते. 
( सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. )

उत्तम साहित्याला प्रसिद्धी नक्कीच मिळते. पण एखादा गरीब साहित्यिक असेल, त्याच्याकडे पैसा नसेल तर त्याचे साहित्य कोण प्रकाशित करणार ? त्याचे साहित्य त्याच्याच जवळ पडून राहील. आज सगळेच प्रकाशक व्यावसायिक झाले आहेत. ( हाताच्या बोटावर मोजता येतील असे प्रकाशक सोडून ) मराठी भाषा समृद्ध करायची असेल तर दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. त्यातून अशा एक दोन गरीब साहित्यिकांचे साहित्य त्या व्यासपीठावरून प्रकाशित केल्यास संमेलनाचे सार्थक होईल असे वाटते. यदाकदाचित ही पद्धत सुरू झाली आणि पुन्हा तिथे वशिलेबाजी सुरू झाली तर पुन्हा या लेखकांच्या नशिबी वाईट दिवस येतील. एका पुस्तकाचा अनुभव पाठीशी घेऊन त्यानंतर दुसरे पुस्तक प्रकाशन करण्याची कधी हिंमत केली नाही. मात्र याच काळात ई साहित्य प्रकाशनाशी माझा संबंध आला आणि दरवर्षी एक दोन पुस्तकं ई साहित्याच्या माध्यमातून प्रकाशित केलोय. आज माझ्या नावावर पाऊलवाट या पुस्तकासह सात वैचारिक लेखसंग्रह असलेले सात, एक कवितासंग्रह व कथासंग्रह असे एकूण 10 पुस्तकं प्रकाशित केलो आहे. 

एक कादंबरी व दोन कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत, लवकरच प्रसिद्ध होतील. पुस्तकाची छपाई करून वीस पंचवीस हजार रुपये खर्च करून माझ्या पुस्तकाला जी प्रसिद्धी मिळाली नाही ती प्रसिद्धी ई बुकने मिळवून दिली. आपल्या राज्यातीलच वाचक नाही तर देश-विदेशात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे माझे ई पुस्तक वाचले गेले आणि वाचले जात आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आणि पर्यावरण वाचविण्यासाठी ई साहित्य एक चांगले मध्यम असून अगदी अल्प खर्चात आपले पुस्तक प्रकाशन होऊ शकते. वाचकांची संख्या देखील आपण विचार करू शकत नाही यापेक्षा मोठी आहे. पुस्तकं विकत घेऊन वाचणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे मात्र मोफत पुस्तकं मिळवून वाचणाऱ्याची संख्या जास्त आहे. या वाचकांसाठी खास करून ई साहित्य मोलाची भूमिका बजावत आहे. इंटरनेटवर ई साहित्य लिहून शोधल्यास आपणांस अनेक प्रकारचे आपल्या मनासारखे साहित्य वाचण्यास मिळू शकेल. लॉकडाऊनच्या काळात घरी बसल्या बसल्या आपण कंटाळले असाल तर नक्की वाचत राहा. 

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड
9423625769

( टीप :- माझे ई साहित्य वाचण्यासाठी esahity.in या वेबसाईटवर भेट द्यावे.)

Wednesday 22 July 2020

लोकमान्य टिळक जयंती निमित्ताने काव्य सुमनांजली

लोकमान्य टिळक 
रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव
तेथे जन्मले केशव पण बाळ हे टोपणनाव

शिक्षक वडीलांचे नाव होते गंगाधर पंत
त्यांच्या जीवनात नव्हते कशाचेही खंत

शालेय जीवनात आवडीचा विषय गणित
चुकीचे आदेश ते कोणाचेही नाही मानीत

पुण्यात भेटले त्यांना गोपाळ आगरकर
मराठा केसरी वृत्तपत्रातून केला लोकजागर

इंग्रजा विरोधी लोकांत करण्या जनजागृती
सुरू केली त्यांनी गणेशोत्सव शिवजयंती

त्यांचे क्रांतीकारी विचार होते खूप जहाल
म्हणूनच ते वागले नाही कधीच मवाळ

मंडालेत त्यांना कारावास भोगावा लागला
गीतारहस्य ग्रंथ तिथेच लिहिण्यात आला

सूर्याचे पिल्लू पदवी दिली त्यांच्या गुरूंनी
लोकमान्य ही उपाधी दिली भारतीयांनी

सिंहगर्जना केली आणि दिला त्यांनी मंत्र
स्वराज्य मिळविण्या सांगितला अनोखे तंत्र

प्रखर विरोध केला जुलमी गोऱ्या इंग्रजाना
असंतोषाचे जनक पदवी मिळाली त्यांना

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे तेच खरे रत्न
स्वातंत्र्यासाठी त्यांनी केले अनेक प्रयत्न

तेवीस जुलै रोजी त्यांची असते जयंती
वंदितो त्यांच्या कार्याला लावूनी पणती

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Sunday 12 July 2020

Lockdown once again


सावधान ! पुन्हा लॉकडाऊन
संपूर्ण भारतात 75 दिवसाचे लॉकडाऊन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनलॉक ची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र रविवारपासून काही जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे जनतेत चिंतेचे आणि काळजीचे वातावरण पसरले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव विचारात घेतल्यास एक गोष्ट लक्षात येते की, भारतात 12 हजार 340 कोरोना बाधित होण्यासाठी तीस दिवसाचा कालावधी लागला होता आणि आज मात्र चोवीस तासात चोवीस हजार रुग्ण आढळून येत आहेत. खरोखरच खूपच चिंतनीय बाब आहे. शासनाने घेतलेले निर्णय काही चुकीचे आहेत असे जनमानसांत आज चर्चिले जात आहेत. ज्यावेळेस कोरोना रुग्णाची संख्या कमी होती त्यावेळी जनता कर्फ्यु, संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आलं होतं. पण ज्यावेळी रुग्णांची संख्या वाढू लागली होती त्यावेळी मात्र रोजगाराचे स्थलांतर करून एकप्रकारे कोरोनाला एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाण्याची परवानगी दिल्यासारखे झाले. सुरुवातीच्या पाच टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये भारतात सव्वा लाख लोकं बाधित झाली होती आज तोच आकडा किती वाढला आहे, हे आपण पाहू शकतो. हे असेच चालू राहिले तर भारतात एका दिवसात एक लाख रुग्ण आढळून येण्याची शक्यता एका तज्ञाने व्यक्त केली, ते चुकीचे वाटत नाही. कोरोना आजारातून बरे होण्याची संख्या खूप आहे. पण रुग्णांची संख्या वाढू लागली तर सर्वांना वैद्यकीय सेवा मिळणार नाही, तसे आज ही काही ठिकाणी वैद्यकीय सेवा मिळत नाही अशी ओरड होत आहे. त्याला शासन किंवा प्रशासन जबाबदार नाही. लाडक्या लेकरांचे सर्व हट्ट पुरविल्या जातात आणि दहा लेकरं असल्यावर कोणाचीही मागणी पुर्ण होत नाही, हे वास्तविक आहे. त्यामुळे लोकांनी या दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळात समजदार नागरिक होऊन सर्व नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्यावर लॉकडाऊन करण्याची नामुष्की आली हे खरोखरच चिंतनीय बाब आहे. त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात पोलीस यंत्रणेवर ताण येणार नाही याची आपण सर्वजण काळजी घेऊ या. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. एक-दोन सामान खरेदीसाठी बाजारात जाणे टाळावे. आवश्यक सामानाची यादी करावी ज्या दिवशी यादी खूप लांबली असे वाटते त्या दिवशी सवलतीच्या वेळात जाऊन खरेदी करावी. घराबाहेर पडतांना नेहमी तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टन्स हा नियम लक्षात ठेवूनच काम करावे. भाजीपाला आठवड्यातून एकदाच आणून घ्यावं. रोजच्या रोज ताजा भाजीपाला विकत घेण्याचा आपला नाद यापुढे सोडून द्यावे. घरातील लहान मुलांना शक्यतो कुठे ही बाहेर पाठवू नका. काही पालक आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान वाचावं म्हणून घरच्या घरी किंवा मित्रांच्या घरात चार-पाच जणांना एकत्र करीत शिकवणी चालविण्याचा प्रयत्न करत आहेत. ती चांगली गोष्ट आहे, मात्र त्यात कोणी बाधित रुग्णांशी संपर्क झालेला असू नये म्हणजे झाले. अन्यथा लहान मुलांना 14 दिवस आई-वडिलांपासून दूर कोविड सेंटर किंवा क्वारनटाईन करून ठेवणे खूपच अवघड बाब आहे. पालकांनी एकवेळ यावर विचार करणे आवश्यक आहे.  सॅनिटायझर आपल्या सोबत असू द्यावे, दर काही मिनिटांनी हात सॅनिटायझरने स्वच्छ करत राहावे. जेवढे आपण स्वतः सुरक्षित राहू तेवढे आपला परिवार, आपले शेजारी आणि आपले मित्रमंडळी सुरक्षित राहू शकतात याचा वेळोवेळी विचार करावा. खबरदरी हीच आपली जबाबदारी आहे, म्हणून प्रत्येक पाऊल ठेवत असतांना अगदी जागरूकपणे ठेवणे अत्यावश्यक आहे. कोरोनाची मजबूत साखळी कमकुवत करण्यासाठी आपण सर्वांनी जागरूकतेने वागणे आवश्यक आहे. एकाची चूक देखील इतरांना त्रासदायक ठरू शकते. म्हणून चला स्वयंशिस्तीने वागू या. 

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद
9423625769

Tuesday 30 June 2020

सोशल मीडियातील संकलित जोक्स


सोशल मिडियातील व्हायरल जोक्स

यावर्षीच्या प्रारंभीच जगात कोरोना व्हायरसने सर्वाना चक्रावून सोडले आहे. कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, मास्क, सॅनिटायझर या शब्दांची जनमाणसात चर्चा खूप होऊ लागले. तसं तर या महारोगाने सारेच चिंताग्रस्त झाले आहेत. तरी देखील आपली मानसिक स्थिती चांगली राहावे आणि नेहमी हसत राहावे म्हणून या काळात कोरोना आणि त्याच्याशी संबंधित जे विनोद जोक्स सोशल मीडियात व्हायरल झाली आहेत. ते पुन्हा एकदा मराठी आणि हिंदी भाषेत वाचून मनसोक्त हसू या आणि आपल्या डोक्यावरील थोडीशी चिंता व काळजी दूर करू या.  

🥴😜😂😅😁😂🤔
कहरच झाला जेंव्हा आमची कामवाली मावशी म्हणाली तुमचा सगळ्याचा  कोरोना रिपोर्ट दाखवा ; मग येते कामाला

🥴😜😂😅😁😂🤔
पप्या :- गण्या, शाळेला कवा रे ?
गण्या : - अजून कूटं लगेच ..?
महापूर आहे की अजून...

🥴😜😂😅😁😂🤔
मेलेली सासू सुनेच्या स्वप्नात आली आणि सुनेला मास्क लावलेला बघून बघून खूप हसून म्हणाली " तुझं तोंड मी बंद करू शकले नाही पण या कोरोनाने करून दाखवलं" 

🥴😜😂😅😁😂🤔
एका लग्नाच्या कार्यालयात एका माणसाला मुलीकडचे विचारतात, 
"तुम्ही वर पिता का?" 

उत्तर : तसं काही नाही. खाली व्यवस्था केली असेल तर खाली येऊन पितो, मला काही प्रॉब्लेम नाही

🥴😜😂😅😁😂🤔
एक माणूस कोरोना मधून नीट झालता.. 
तर त्याने त्याच्या गाडीच्या मागे लिहिले होत... 
माजी कोरोना पॉझीटीव्ह.....  
ड्राइवरने विचारलं तर तो म्हणाला कि ह्याच्या मुळे पोलीस गाडी आडवत नाहीत.... कागद मागत नाहीत.... लायसन पण मागत नाहीत.

🥴😜😂😅😁😂🤔
ह्या वर्षी पहिल्यांदाच अस झालय की कोरोनामुळे माझी युरोप टुर रद्द झाली ........
नाही तर दरवर्षी ....... पैशांमुळे रद्द करावी लागायची...... 

🥴😜😂😅😁😂🤔
SBI बेंक मेंं नया अकाउंट खुलवाने गया..

तो ऑफीसर ने कहा..
"KYC के लिये 2 फोटो जमा करवानी पड़ेगी"
मास्क के साथ
औऱ.. 
मास्क के बगैर!

🥴😜😂😅😁😂🤔
सर्व पुरुषांसाठी 
घरात करायचे अत्यंत महत्वाचे आसन 

'हो' कारासन 

🥴😜😂😅😁😂🤔
आयुष्य म्हणजे इंग्लिश 
मुव्ही सारखं झालाय.... 
चालू तर आहे पण काय
चाललंय ते कळतच नाही...

🥴😜😂😅😁😂🤔
आज हाथ पर बैठी मक्खी को फूंक मारकर उड़ाने की बहुत कोशिश की, पर वो नहीं उड़ी...
फिर एक भाई साहब ने बताया मास्क हटा लीजिए पहले 

🥴😜😂😅😁😂🤔
द्वापार युगात श्री कृष्णाने
द्रौपदीला दिले अक्षय पात्र... त्यातील अन्न कधीच संपत नव्हते.

कलियुगात कोरोना ने 
महिलांना दिले बेसिन पात्र.. ज्यातील भांडी कधीच संपत नाहीत..!!

🥴😜😂😅😁😂🤔
स्थळ : अर्थात पुणे

पुणेरी टेलरची नवीन डोके दुखी...

गिऱ्हाईक म्हणतंय... "उरलेल्या कपड्यात मास्क शिवून द्या"

🥴😜😂😅😁😂🤔
लॉकडाऊन उठल्यावर नवरा बायको मुलाच्या शाळेत पेरेंट्स  मिटिंगसाठी जातात.
बायको टिचरशी बोलते व नवऱ्याची ओळख करून देते.
'मी ओळखते ह्यांना', टीचर हसत सांगतात
बायको, संशयाने, विचारते,
'कसे ओळखता? आज पहिल्यांदाच आलेत शाळेत.'
टीचर. ....'हो, पण ऑनलाइन क्लासेस घेताना रोज घर झाडताना, पुसताना दिसायचे!' 

🥴😜😂😅😁😂🤔
बायकोला तर कळायचंच बंद झालंय,
वास सॅनिटायझरचा येतोय की दारूचा..

🥴😜😂😅😁😂🤔
WHO चा मोठा खुलासा...
भारतात 75% लोक कोरोनामुळे नव्हे तर  उधारी मुळे "मास्क" लावुन फिरत आहेत....!!!!

🥴😜😂😅😁😂🤔
आज शेजारीणने  आपला मुलगा गुल्लू ची दृष्ट काढण्यासाठी मिर्चीचा उपयोग केला 
आणि ...
जसं हि मिर्च्या चुलीत घातल्या पुऱ्या गल्लीतले लोक खोकायला लागले 
मग काय 
स्वास्थ विभागवाले आले 
आणि आज पुरी गल्ली 
" क्वारंटाईन " आहे 

🥴😜😂😅😁😂🤔
शेजारच्या वहिनी बायकोला म्हणाल्या, " भाऊजी हुशार आहेत. माझ्या चेहऱ्यावर मास्क असूनही मला ओळखलं व हसले सुद्धा ! "

आता घरातलं लॉकडाऊन आणखी कडक झालंय ...

🥴😜😂😅😁😂🤔
यावर्षीचा उन्हाळ्या फार कठीण गेला....

 ही माहेरी गेली नाही
आणि
ती माहेरी आली नाही

🥴😜😂😅😁😂🤔
कोरोना वाली कॉलर ट्यून सगळ्यांनी ऐकली असेलच ना, चला तर यात शाब्दिक बदल करूया 
 
फक्त कोरोनाच्या जागी बीवी (बायको) असे बोला 

बीवी के साथ आज पूरा देश लड़ रहा है लेकिन याद रखे हमे बीवी से लड़ना है ससुरालियों से नही, उसके साथ भेदभाव ना करे बल्कि उसकी देखभाल करे, बीवियों से बचने के लिए जो हमारी ढाल है जैसे साला-साली,साडूभाई, दोस्त इनका सम्मान करें, इन्हे पूरा सहयोग दे इन योद्धाओ की करो देख भाल तो देश जीतेगा बीवी से हर हाल.
अगदी त्याच स्वरात वाचले तरच मजा येईल. 

🥴😜😂😅😁😂🤔
पत्नी : सुबह सुबह छत पर क्यों जा रहे हो ????
पति : विटामिन डी के लिए
पत्नी : नहीं मिलेगी, उसका ऑफिस चालू हो गया है

🥴😜😂😅😁😂🤔
आज साखर सोडून एक महीना पूर्ण झाला...
रोज नाश्त्यापूर्वी पाच किलोमीटर वेगात चालणं  आणि मग कमीत कमी वीस मिनिटं योगासनं  करणं हे रूटीन झालं आहे.. 
ना चहा, ना कॉफी.... केवळ फळं आणि हिरव्या ताज्या भाज्या त्या पण ऑर्गेनिक.... 
दुपारी दोन पोळ्या आणि भाजी..... संध्याकाळी थोड़े ड्राय फ्रूट आणि  सीझनल फळं....
अल्कोहोल तर पूर्ण  बंद केलंय. 
सगळ्या वाईट सवयी सोडल्यात....
आता फक्त.... खोटं बोलण्याची सवय गेली की झालं.

🥴😜😂😅😁😂🤔
यूपी, बिहारी लोक त्यांच्या राज्यात जाऊन परत मुंबईत पण आले . . . . . 
महाराष्ट्रीयन  माणसे अजून फोन करूनच विचारतात  की .. . . . 
रस्त्यात पोलीस अडवतात का ? 
🥴😜😂😅😁😂🤔
लग्नाच्या पंगतीत जेवायला बसलो होतो.. तोंडावरचा माझा N-95 मास्क बाजूला काढून ठेवला...
एक जण आला आणि
द्रोण समजून त्याच्यात बटाटयाची भाजी टाकून गेला..

🥴😜😂😅😁😂🤔
स्वतःचे सॅनिटायजर असेल तर एकदाच पिचीक..
दुस-याचे असेल तर
पिचिक..... पिचीक...... पिचीक ......

🥴😜😂😅😁😂🤔
सलूनमध्ये दाढी करायला परवानगी नाही. पण गालावरची कटिंग करायची आहे असे सांगू शकतो का ?
🥴😜😂😅😁😂🤔
एक शंका
संतूरच्या हेंड वॉश ने कोरोनाचे विषाणू तरुण तर होत नसतील ना 
🥴😜😂😅😁😂🤔
लग्नसोहळ्यात नियमापेक्षा जास्त वऱ्हाडी जमल्याने नवरदेवावर गुन्हा दाखल 
पोलिसांनी दम भरल्यावर "पुढील वेळेस असं करणार नाही" अशी नवरदेवाची कबुली 
🥴😜😂😅😁😂🤔
70 साल में पहली बार शराब खुलेआम..
और
चाय छुप-छुप कर बेचीं जा रही है,
वाकई में देश बदल रहा है

🥴😜😂😅😁😂🤔
शाळा सुरू झाल्यावर गुरुजींची नविन डोकेदुखी.
सर...याने मास्क काढला!
सर...हा माझ्या मास्कला हात लावतोय!
सर...हा माझ्या समोर शिंकला!
सर...मी मास्क धुवुन आणु?
सर...याने माझे सॅनिटायजर सांडवले!
सर...मला खोकला येतोय घरी जावु!

😁😁😁😁😁
आप लोगों ने कभी नोटिस किया है...??
जब से covid-19 आया है, तब से....
Close up का ad. आना बंद हो गया है।
पास आओ, पास आओ, पास आओ ना......!!

🥴😜😂😅😁😂🤔
गरजेपेक्षा जास्त वेळ थांबलात तर लोक तुमची इज्जत करत नाहीत! 

कोरोनालाच बघा, मार्चमध्ये जी इज्जत होती ती आता आहे का?

🥴😜😂😅😁😂🤔
इस 😷👈इमोजी को पता था कि कोरोना आने वाला है 
पर  😆 इसने बताया नहीं

आणि शेवटचा विनोद म्हणजे या सर्व विनोदाचा कळस होय. 

🥴😜😂😅😁😂🤔
मैं आप लोगों का हंसा हंसा कर जो रोज खून बढ़ता हूं
दुनियावालों आप इसे भी एक तरह का  "ऑनलाइन रक्तदान" समझना 😋😀😀

सर्व विनोदबुद्धीने वाचावेत, मनावर काही न घेता. सारे जोक्स मन लावून वाचल्याबद्दल धन्यवाद. 

संकलन :- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

Monday 29 June 2020

ये तो बस ट्रेलर है

ये तो बस ट्रेलर है ....।

नुकतेच एमपीएससीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले. त्यात अनेक गरीब कुटुंबातील मुलांमुलींनी यश मिळवीत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यासारख्या उच्च पदावर शिक्कामोर्तब केले. याच परीक्षेत काही विद्यार्थ्यांना अपयश मिळाले म्हणून आत्महत्या केल्याच्या घटना देखील वाचण्यास मिळाले. स्पर्धा परीक्षेत यश मिळाले नाही म्हणून आत्महत्या करण्याचा पर्याय निवड करणे हे कधी ही योग्य मार्ग नाही. आजकाल स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी अनेक युवक पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाले की याच्या तयारीसाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद सारख्या शहराकडे धाव घेतात. नावाजलेल्या आणि प्रसिद्ध अश्या अकॅडमी मध्ये प्रवेश मिळविला म्हणजे आपण स्पर्धा परीक्षेत नक्की यश मिळवितो असे त्यांना खात्री वाटते. पण आपल्या यशात कोणतेही अकॅडमी हे निमित्त मात्र असते त्यात खरी मेहनत ही आपलीच असते. त्यासाठी जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत मेहनत करण्याची युवकांनी तयारी ठेवायला हवी. असे म्हणतात की सर्व सुख सोयी उपलब्ध असलेल्या मुलांना अभ्यासाची सोयरसुतक नसते आणि ज्यांना एक वेळचे खायला मिळत नाही असे विद्यार्थी मात्र दिवसरात्र एक करून अभ्यास करतात आणि जिद्द व चिकाटीने यश पदरात घेतात. गरिबीचे चटके खाल्लेले व दारिद्र्य जवळून पाहिलेल्या युवकांना परिस्थिती बदलण्याचा ध्यास लागतो मग त्यांना कामाचा अजिबात त्रास होत नाही. यावेळी एमपीएससीच्या परीक्षेत पास झालेले अनेक परीक्षार्थी खूप गरीब घरातले आहेत. त्यांना मिळालेले यश हेच अधोरेखित करते. ते गरीब होते, त्यांना परिस्थिती बदलायची होती आणि त्यासाठी अभ्यास केल्याशिवाय त्यांच्यासमोर पर्यायच नव्हता. अशी परिस्थितीच माणसाला काही तरी करून दाखविण्याची संधी देते. म्हणून मी गरीब आहे, माझ्याने काही होत नाही ही भाषा कोणत्याच युवकांना शोभून दिसत नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांची कमवा आणि शिका ही योजना अंगीकारून जो पुढील शिक्षण घेत राहतो तो जीवनात नक्की यश मिळवू शकतो. आपल्या अंगात कोणती कौशल्ये आहेत ? आपण कोणत्या क्षेत्रात यश मिळवू शकतो ? आपल्या शिक्षणाचा कल कोणता ? या सर्व बाबी ज्याना कळते तोच योग्य मार्गाने जाऊ शकतो. म्हणून सर्वप्रथम स्वतःला ओळखायला शिका. कल लक्षात न घेता आज असे अनेक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना दिसतात, मग त्यांच्यात नाउमेद व निरुत्साह निर्माण होतो. लोकं काय म्हणतील ? आई-वडील काय म्हणतील ? सारे मित्र मला हसतील असे वेगवेगळे विचार मनात आणून आत्महत्येसारखा मार्ग ते स्वीकार करतात. पण त्यापूर्वी एक वेळ विचार करत नाहीत की ही स्पर्धा परीक्षा पास झालो नाही म्हणजे सर्व संपले असे मुळीच नाही. कदाचित तुम्हाला एखादे उद्योग बोलावत असेल. एखादे काम तुम्हांला खुणावत असेल याबाबीचा विचार करणे आवश्यक आहे. एका उच्चशिक्षित युवकाला कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली नाही. तो खूप हताश झाला आणि त्याने कोंबड्या पाळण्याचा उद्योग सुरू केला. सुरुवातीला अनेकांनी त्याच्या या उद्योगाला हसले. पण त्याने तिकडे कानाडोळा केला. हळूहळू त्याचा व्यवसाय वाढू लागला. काही महिन्यात त्याच्या व्यवसायाला भरभराटी आली आणि हजारो रुपयांत खेळणारा तो लाखो रुपयांचा मालक झाला. नंतर करोडपती ही झाला. बरे झाले मी प्राध्यापक झालो नाही. नसता दुसऱ्याची चाकरी करत राहिलो असतो असे तो मनाशी म्हणाला. कोणत्याही घटनेमागे काही ना काही कारण लपलेले असते म्हणून यश मिळाले नाही म्हणून लगेच नाउमेद होऊन गैरमार्ग स्वीकारणे कधीही कोणाच्याही हिताचे नाही. म्हणून नोकरीच्या शोधात असलेल्या माझ्या तमाम बेरोजगार युवक-युवतींना कळकळीची विनंती की कठोर मेहनत करत चला, आज ना उद्या यश तुमच्या पायाशी लोळण घातल्याशिवाय राहणार नाही. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि प्रतीक्षा या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवून वाटचाल सुरू ठेवा. जीवन खूप सुंदर आहे आणि तुमची तर जस्ट सुरुवात आहे. ये तो सिर्फ ट्रेलर है, फिक्चर अभि बाकी है मेरे दोस्त.....!

- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

Sunday 28 June 2020

लॉकडाऊन नंतरचे जीवन

लॉकडाऊन नंतरचे जीवन

कोरोना व्हायरसमुळे देशात मार्चच्या शेवटच्या सप्ताहापासून देशात संचारबंदी करण्यात आली आणि त्यानंतर लॉकडाऊन घोषित करण्यात आले. शाळा, महाविद्यालय, कार्यालये, उद्योगधंदे आणि कारखाने बंद करून सर्वचजण घरात कैद झाले. सुमारे सत्तर दिवस सारेचजण लॉकडाऊन झाले होते. यामुळे अनेकांचे हालबेहाल झाले. हातावर काम करून जगणाऱ्या लोकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला म्हणून जून महिन्यात अनलॉक जाहीर करण्यात आले. हळूहळू आर्थिक परिस्थिती पूर्व पदावर येतांना दिसू लागली मात्र कोरोना बाधितांची संख्या गुणाकाराच्या पटीत वाढणे काही थांबले नाही. हजारोच्या संख्येने रुग्ण वाढू लागली ही चिंतेची बाब आहे. म्हणून लॉकडाऊन उठवल्यानंतर प्रत्येकाचे जगणे समजदारपूर्वक असणे गरजेचे आहे. जे की सध्या दिसत नाही. आजमितीला भारतात साडे पाच लाख नागरिक कोरोना रोगाने बाधित झाले आहेत तर महाराष्ट्रात जवळपास दीड लाखच्यावर रुग्णसंख्या झालेली आहे. दरदिवशी जवळपास पाच हजाराच्या संख्येत रुग्ण वाढत आहेत.  म्हणून प्रत्येक नागरिकांनी कोरोना होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, यावर विचार करणे आवश्यक आहे.
अत्यंत महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे. आपल्या कामाचे महत्व आपणच जाणून घ्यावे लागेल. बिनकामाचे बाहेर फिरणे शक्यतो टाळलेच पाहिजे. बाहेर जाणे गरजेचे असेल तर तोंडावर मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नये याची काळजी स्वतः घेणे आवश्यक आहे. त्याचसोबत ज्याठिकाणी आपण जात आहोत त्याठिकाणी शारीरिक अंतर ठेवून आपले काम पूर्ण करावे. कोणालाही हस्तांदोलन करणे टाळावे. दुरूनच नमस्कार करावा. सॅनिटायझरचा वापर करावा ज्यामुळे हातावर कोणतेही किटाणू राहणार नाहीत. घरी आल्यावर हातपाय स्वच्छ धुवून घरात प्रवेश करावे. त्याचसोबत होईल तेवढे गर्दीच्या ठिकाणी जाऊच नये. लग्न किंवा इतर कौटुंबिक प्रसंगात जाणे टाळावे. आजपर्यंत जे काही संसर्ग वाढले यात या सोहळ्याचा मोठा वाटा दिसून येत आहे. या सर्व बाबीची काळजी स्वतः घेऊन वागलो तर आपल्या सोबत इतरांचा जीव देखील आपण वाचवू शकतो. त्याचसोबत सर्वात महत्वाचे म्हणजे आपले मन नेहमी सकारात्मक दिशेने विचार करण्यात गुंतवून ठेवावे. रोज सकाळी हलकासा व्यायाम आणि मेडिटेशन केल्याने मन प्रसन्न असते. पालकांनी मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते की काय अशी भीती मनात न बाळगता शाळा व महाविद्यालये सुरू करण्याचा अट्टाहास करू नये. कोरोना आटोक्यात येण्यापूर्वी शाळा व महाविद्यालये सुरू झाली तर खूप मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या परिस्थितीत विचार केल्यास जोपर्यंत लस किंवा औषध मिळणार नाही तोपर्यंत आपली मुले शाळा व महाविद्यालयात पाठविणे म्हणजे मुलांना संकटाच्या खाईत ओढल्यासारखे होईल. एखाद्या वर्षाने विद्यार्थ्यांचे काही जास्त प्रमाणात नुकसान होणार नाही, त्यामुळे मनात कसलाही किंतु परंतु भावना आणू नये. आज ना उद्या हे संकट टळेल असा विश्वास मनात निर्माण करून आपले रोजचे जीवन जगत राहिले पाहिजे. लॉकडाऊन नंतर आपण जरासे दुर्लक्ष करून वागलो तर त्याची शिक्षा आपल्यासह अनेकांना भोगावे लागेल एवढं मात्र खरे आहे.

- नागोराव सा. येवतीकर, मु. येवती ता. धर्माबाद, 9423625769

Thursday 25 June 2020

शाळेचा पहिला दिवस

शाळेचा पहिला दिवस

प्रदीर्घ उन्हाळी सुट्यानंतर 
उजाडला हा खास दिवस
ज्याची आतुरता होती तो
शाळेचा पहिला दिवस

नवे वर्ग नवीन शिक्षक
नवीन पुस्तक नवे मित्र
खूप मजा येईल पाहून
पुस्तकातील नवे नवे चित्र

शाळेची ओढ लागली मला
गेल्या काही दिवसांपासून
कधी सुरू होईल शाळा याची
आस लागली मनापासून

भल्या पहाटे उठलो तरी
शीण आला नाही कामाने
पाठीवर दप्तर टाकली अन
पळालो शाळेच्या दिशेने

घंटा वाजली, मुले जमली
राष्ट्रगीताचे गायन झाले
जुन्या नव्या मित्रांना भेटून
मनोमनी खूप आनंद वाटले

- नासा येवतीकर, धर्माबाद

महाराजांचे महाराज

आयुष्य

आयुष्य

विधिलिखित लिहिलेलं
असते प्रत्येकाचे आयुष्य
किती जगेल केंव्हा मरेल
कोण करील यावर भाष्य

हसत खेळत जगत राहावे
मिळाले आहे जेवढे आयुष्य
कशाचीच चिंता केली नाही
तरच होईल जीवन दीर्घायुष्य

आज आहे तर उद्या नाही
अशी परिभाषा आयुष्याची
जिवंतपणी सत्कर्म केलो तर
काळजी नसते भविष्याची

कोरोना रोगाने दिली सर्वाना
ओळख करून आयुष्याची
महामारीच्या साथ आजाराने
खात्री वाटत नाही जीवनाची

मृत्यूनंतर सर्व चांगले म्हणावे
हीच कमाई आहे आयुष्यात
सोबतीला नसतात कोणीही
सारेच रिकाम्या हाताने जातात

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

राजर्षी शाहू महाराज कविता

महाराजांचे महाराज

महाराष्ट्राच्या करवीर नगरी राज्यात
कागलच्या घाटगे घराण्यात
आप्पासाहेब राधाबाईच्या पदरात
जन्मास आले यशवंत कोल्हापुरात

शिवरायांचा वारसा ठेवले चालू
प्रेम मिळविले जनसामन्यात
राधानगरी धरण उभारून
समृद्धी आणली शेतकऱ्यांत

सक्तीचे व मोफत केले शिक्षण
मागासलेल्याना दिले आरक्षण
जातीभेद दूर करण्यासाठी
आंतरजातीय लाविले लग्न

संकटात मदत केली अनेकांना
राजाश्रय मिळवून दिले कलाकारांना
स्त्री शिक्षणाचा प्रसार करुनी
बंधनातून मुक्त केले महिलांना

अडल्या नडलेल्याना देऊन साथ
मानवतावादी राजाची चर्चा सर्वत्र
डॉ. आंबेडकरांना देऊनी मदत
चालू करविले मूकनायक वर्तमानपत्र

लोकांना दिली समानतेची वागणूक
त्यांचा होतो सर्वत्र जय जयकारा
सामाजिक न्याय दिवस म्हणुनी
त्यांचा जन्म दिन होतो साजरा

महाराजांचे महाराज राजर्षी शाहूनी
लोकोपयोगी कामे केली राज्यात
अनेकांची स्वपने झाली साकार
कोल्हापूर प्रसिद्ध झाले जगात

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769

Wednesday 24 June 2020

समजदार नागरिक

समजदार नागरिक होऊ या

#nasayeotikar

माणूस एकटा किती काळ जिवंत राहू शकतो ? याचे उत्तर फार काळ जिवंत राहू शकत नाही, समुहात राहिला तर जास्त काळ जिवंत राहू शकतो. म्हणूनच फार पूर्वीपासून मनुष्य वस्ती करून समुहात राहत होता, असे दिसून येते. समुहात राहायचे असेल तर समूहाचे काही नियम ठरवले जातात आणि त्याचे पालन करावे लागते. नियमाचे पालन केले नाही की वाळीत टाकले जाते, त्या व्यक्तींना कोणी काही मदत करत नसे असे चित्र पूर्वीच्या काळात होते. आज असे चित्र कुठे ही दिसत नाही म्हणजे समूहाचे काही नियम नाहीत, असे नाही. तर आज व्यक्तीला स्वनियम तयार करून समुहात आपली नाचक्की होणार नाही असे वर्तन करत असतो. जी व्यक्ती बेजबाबदारपणे वागते त्याला समूहाकडून वेळीच ताकीद दिली जाते किंवा शिक्षा केली जाते. आपला कुटुंब आणि परिवार याची समाजात प्रतिष्ठा राहावी, मानसन्मान राहावा आणि पत राहावी म्हणून माणूस जागरूकपणे वागत असतो. देशाला अश्याच समजदार नागरिकांची खरी गरज असते. जपान देशातील लोकं खूप कष्टाळू आहेत अशी त्यांची ख्याती तेथील समजदार नागरिकांच्या वर्तनावरून सांगितली जाते. भारत देशातील लोकं जबाबदारीने वागत नाहीत अशी आपल्या लोकांची प्रतिमा बाहेरच्या देशात का निर्माण झाली असेल तर ते ही आपल्या वागण्यावरून. एकशे तीस कोटी लोकसंख्येच्या देशात लोकशाहीने काही हक्क आणि कर्तव्य दिले आहेत. आपण आपल्या हक्कावर नेहमीच दावा सांगतो त्याचवेळी आपले कर्तव्य मात्र साफ विसरतो. देशाची प्रतिमा मालिन होईल असे कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. सरकारने तयार केलेल्या अनेक नियमांची आपल्या हातून पायमल्ली होते. कधी कधी आपण सरकारने तयार केलेले कायदे कलम लक्षात न घेता वर्तन करत असतो त्यामुळे समजदार नागरिक ठरू शकत नाही. घरात शांती आणि समृद्धी राहावी म्हणून कुटुंबप्रमुखांच्या नियमाचे पालन आपण करतो म्हणून तर घरात वातावरण सुरक्षित आणि आनंदी असते. त्याच पद्धतीने देशाचे काही नियम असतात आणि त्याचे पालन केल्यास देशात देखील आनंदी व समृद्धीचे वातावरण दिसू शकते. शालेय जीवनात सर्वाना नागरिकशास्त्र विषयातून बरीच बारीकसारीक माहिती दिली जाते. ती सर्व माहिती परीक्षेतील मार्कापुरते मर्यादित ठेवल्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण होत आहे. आपण किती नियमाचे पालन करतो हे कोरोना संकटाने दाखवून दिले आहे. मी माझ्या मनाचा राजा आहे, माझे जीवन मी कसे ही जगतो अशी विचारधारा देशाला तर कधीच पुढे नेणार नाही. ते तर सोडा, या वृत्तीमुळे व्यक्तीचा देखील विकास होत नाही. आपण टाकलेले एक जबाबदारीचे पाऊल दुसऱ्यासाठी जीवनदायी ठरू शकते. या सकारात्मक विचाराने देशातील प्रत्येक नागरिक वागला पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, आपणाला यापुढे कोरोना सोबत जगावे लागणार आहे. त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजून घ्यायचे असेल तर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जे काही नियमावली तयार केली आहे त्याचे तंतोतंत पालन करावे लागेल. तेंव्हाच खरे आपण समजदार नागरिक बनून आपल्या सोबत इतरांना जिवंत ठेवू शकू. म्हणून आता तरी जागे होऊ या आणि समजदार नागरिक बनू या.

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद
9423625769

पावसाळा आणि शेतकरी

पावसाळा आणि शेतकरी
- नागोराव येवतीकर
भारतात मुख्य तीन ऋतू आहेत. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्याचा आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पावसाळा, ऑक्टोबर जानेवारी हिवाळा आणि फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात उन्हाळा असतो. मानवी जीवनात तिन्ही ऋतू अत्यंत महत्वाचे आहेत. प्रत्येक ऋतू आपापले काम व्यवस्थितपणे केले तरच हे ऋतुचक्र व्यवस्थित राहते. अन्यथा असंतुलन होऊन मानवाचे जीवनचक्र बिघडून जाते. त्यातल्या त्यात पावसाळा हे सृष्टीमध्ये नविनता निर्माण करणारा ऋतू आहे. पाऊस पडला तरच शेतकरी आपल्या शेतात नवीन पीक घेऊ शकतो. झाडांना नवी पाने, फुले आणि फळे येऊ शकतात. नद्या, नाले, विहिरी आणि तलाव पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले तरच वर्षभर पुरते अन्यथा काही दिवसांनी दुष्काळ जाणवण्यास सुरुवात होते. पाऊस पडलाच नाही तर अनेक समस्या निर्माण होतात म्हणून दरवर्षी प्रत्येकजण पावसाची अगदी चातक पक्ष्यांप्रमाणे वाट पाहत असतात. मृग नक्षत्रांपासून पावसाचा काळ सुरू होतो. भारतात यास मान्सूनचा पाऊस म्हटले जाते. केरळमध्ये शक्यतो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून येऊन धडकतो आणि त्याला संपूर्ण भारतात पोहोचायला साधारणपणे दहा दिवसांचा कालावधी लागतो. तो जर वेळेवर आला तर पुढील सर्व कामे वेळेवर होतात आणि तो जर येण्यास उशीर केला तर पुढील सर्व कामे उशिरा होत राहतात. खरीप पिकांचे नुकसान होऊ शकते. पाऊस येण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती होणे ही गरजेचे आहे. पावसाला सुरुवात झाली की सर्वात जास्त आनंदी कोण होतो तर तो म्हणजे शेतकरी. डोक्यावर किती ही कर्ज असले तरी कसलीही चिंता न करता बळीराजा पुन्हा नव्या उमेदीने आपल्या शेताच्या कामाला सुरुवात करतो.पाऊस न येण्याने इतरांवर काही परिणाम होवो की नाही मात्र शेतकऱ्यांच्या जीवनावर खूप मोठा परिणाम दिसून येतो.म्हणूनच या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतो. 

- नागोराव सा. येवतीकर

नपा हद्दीतील सरकारी शाळांची अवस्था

नगरपालिका हद्दीतील सरकारी शाळा

सरकारी शाळा म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा होय. ग्रामीण भागातल्या शाळांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायतची थोडीफार मदत मिळू शकते त्यामुळे त्या शाळेचा भौतिक विकास होऊ शकतो. मर्यादित लोकसंख्या आणि मर्यादित क्षेत्र यामुळे ग्रामीण भागातील सरकारी शाळांना सध्या अच्छे दिन दिसत आहेत. बघायला गेलं तर येथे ही अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यानंतर मनपाच्या शाळा म्हणजे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा यांना सुद्धा मनपाचे सहकार्य मिळते. स्वतंत्र शिक्षण विभाग असतो आणि प्रत्येक कार्य स्वतंत्रपणे चालत असल्याने सर्वत्र लक्ष देणे शक्य आहे. मात्र नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या सरकारी शाळा यांची स्थिती कोणी ही लक्षात घेत नाही त्यामुळे येथील शाळांची अवस्था धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी झालेली पाहायला मिळते. नगरपालिका हद्दीतील सरकारी जिल्हा परिषद शाळांना फक्त शासनाची म्हणजे सर्व शिक्षा अभियानाचेच अनुदान मिळते. ज्याप्रकारे ग्रामीण भागात 14 वा किंवा 15 वा वित्त आयोगातून शिक्षणावर 20 टक्के रक्कम खर्च करणे बंधनकारक करण्यात आले आहे तसे नगरपालिकामध्ये शाळांसाठी कोणतीच तरतूद का करण्यात आली नसेल ? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. नगरपालिका ह्या शाळेला आर्थिक मदत तर सोडाच त्यांचे इमारत भाडे भरले नाही म्हणून त्यांचे अधिकारी येऊन सिल ठोकतात. यावर चिंतन होणे आवश्यक आहे.
नगरपालिकेच्या हद्दीतील शाळा म्हणजे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. ह्या शाळा नगरपलिका हद्दीत असल्याने जिल्हा परिषदेचा कोणताच निधी मिळत नाही. ग्रामीण भागात जसे खासदार निधी, आमदार निधीमधून शाळेला सहकार्य मिळते तसे सहकार्य येथील शाळांना दिल्या जात नाही त्यामुळे ह्या शाळा कित्येक वर्षांपासून उपेक्षित आहेत. नगरपालिका क्षेत्र म्हटल्यावर सरकारी शाळेसोबत इतर ही अनेक अनुदानित, विना अनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यच्या शाळा येथे अस्तित्वात असतात. त्यांच्या मानाने सरकारी शाळा कोणत्याच पालकांना आकर्षित करू शकत नाही, त्यामुळे अर्थातच तेथील पटसंख्या रोडावली जाते. पूर्वीच्या काळी सरकारी शाळेशिवाय पर्याय नव्हता तेंव्हा याच सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना बसायला जागा मिळत नव्हती आणि आज यांना विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. कारण खाजगी आणि इंग्रजी शाळेचे प्रमाण एवढं वाढलं आहे की, सरकारी शाळेकडे आता मजुरीवर काम करणारे पालक देखील ढुंकून पाहत नाहीत. येथील सरकारी शाळेत कोणता विद्यार्थी प्रवेश घेतो तर जो पालक आपल्या पाल्याना साधी वही पेन घेऊन देऊ शकत नाहीत असे दारिद्र्याच्या खाईत असलेली गरीब मुलेच प्रवेश घेतात. त्यांची शाळा शिकण्याची मानसिकता नसल्यात जमा असते. आई-वडील मजुरीला निघून गेले की आपला पाल्य शाळेत गेला किंवा नाही याची साधी चौकशी देखील करत नाही. शिकला तर शिकला नाही तर नाही या मानसिक अवस्थेत असणारी पालकांसाठी ह्या शाळा एक आधार केंद्र असते.  मुलांच्या दुपारच्या जेवण्याची सोय आणि दिवसभर सांभाळ करणारे केंद्र. हाताच्या बोटावर मोजता येतील असे पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देतात. त्याच सोबत शासनाच्या काही धोरणाचा फटका देखील या शाळांना बसतो. प्रत्येक शिक्षकांना शहरात नोकरी करावी वाटते विशेष करून महिलांना. तीन वर्षांपूर्वी झालेल्या ऑनलाईन बदलीने या शहरातील शाळेचा पूर्ण वाटोळं करून टाकलं आहे. पालकांचे असे मत झाले आहे की, आता या शाळेत सेवानिवृत्तीला जवळ आलेले, बिमार असलेले, अश्या शिक्षकांना संधी देऊन शहरातल्या शाळेत भरती केल्यावर ते स्वतःला पाहतील की आमच्या मुलांना. तरुण वयोगटातील शिक्षक ज्या उत्साहाने शिकवितात त्या उत्साहात हे शिकवतील का ? असा प्रश्न अनेक पालकांनी व्यक्त केला तेंव्हा हे ही योग्य आहे असे वाटते. अजून एक निर्णय चुकीचा वाटतो. सरकारी शाळा वाचवायचे असतील तर सरकारी योजना ह्या सरकारी शाळा सोडून अन्य कोणत्याच शाळांना देण्यात येऊ नये. मोफत पाठ्यपुस्तक योजना किंवा शालेय पोषण आहार योजना फक्त सरकारी शाळेतुनच दिल्या गेलं तर येथील शिक्षकांना म्हणता येईल की, आपल्या मुलांना फुकट पुस्तकं देऊ, दुपारचं जेवण देऊ, मोफत गणवेश देऊ आणि प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकेल. पण मोफत गणवेश वगळता पाठ्यपुस्तक आणि दुपारचे जेवण अनुदानित शाळेत देखील दिल्या जाते म्हणून काही पालक जे की या कारणांसाठी सरकारी शाळेत कदाचित येण्याची शक्यता राहिली असती ते ही धूसर झाली. शहरातल्या खाजगी शाळेत सर्व सोयी सुविधा पूर्ण असतात आणि त्याच शहरातल्या सरकारी शाळेत वर्गखोल्या झाडायला साधा चपराशी नसतो. याची देखभाल करण्यासाठी चौकीदार नसतो त्यामुळे या सार्वजनिक मालमत्तेचे रोजच्या रोज अतोनात नुकसान होत राहते. शासनाच्या सर्वच योजना राबविणे अत्यंत कष्टप्रद होऊन बसते. शालेय व्यवस्थापन समिती ही प्रत्येक शाळेला असते त्यात एक नगरपालिकेचा प्रतिनिधी देखील असतो पण नावापुरताच. त्यांच्या स्थायी समितीत शिक्षण नावाचा विषयच राहत नाही तर ते काय तरतूद करतील. पण खरोखरच नगरपलिका हद्दीतील सरकारी शाळांचा विकास व्हावा असे वाटत असेल तर येथील नगराध्यक्ष, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन शाळेकडे लक्ष दिल्यास आपल्या आजूबाजूच्या शाळेचा नक्की विकास होऊ शकतो. त्यासाठी गरज आहे फक्त नि फक्त आपल्या सर्वांच्या ईच्छाशक्तीची. आज ग्रामीण भागातील सरकारी शाळा जसे कात टाकून आपल्यात बदल करत आहेत तोच बदल नगरपालिका हद्दीतील सरकारी शाळेत होऊ शकतो, चला तर मग या शाळांना हातभार लावू या आणि गरिबांच्या लेकरांच्या शिक्षणाची सोय करू या.

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...