Thursday 25 June 2020

शाळेचा पहिला दिवस

शाळेचा पहिला दिवस

प्रदीर्घ उन्हाळी सुट्यानंतर 
उजाडला हा खास दिवस
ज्याची आतुरता होती तो
शाळेचा पहिला दिवस

नवे वर्ग नवीन शिक्षक
नवीन पुस्तक नवे मित्र
खूप मजा येईल पाहून
पुस्तकातील नवे नवे चित्र

शाळेची ओढ लागली मला
गेल्या काही दिवसांपासून
कधी सुरू होईल शाळा याची
आस लागली मनापासून

भल्या पहाटे उठलो तरी
शीण आला नाही कामाने
पाठीवर दप्तर टाकली अन
पळालो शाळेच्या दिशेने

घंटा वाजली, मुले जमली
राष्ट्रगीताचे गायन झाले
जुन्या नव्या मित्रांना भेटून
मनोमनी खूप आनंद वाटले

- नासा येवतीकर, धर्माबाद

महाराजांचे महाराज

आयुष्य

आयुष्य

विधिलिखित लिहिलेलं
असते प्रत्येकाचे आयुष्य
किती जगेल केंव्हा मरेल
कोण करील यावर भाष्य

हसत खेळत जगत राहावे
मिळाले आहे जेवढे आयुष्य
कशाचीच चिंता केली नाही
तरच होईल जीवन दीर्घायुष्य

आज आहे तर उद्या नाही
अशी परिभाषा आयुष्याची
जिवंतपणी सत्कर्म केलो तर
काळजी नसते भविष्याची

कोरोना रोगाने दिली सर्वाना
ओळख करून आयुष्याची
महामारीच्या साथ आजाराने
खात्री वाटत नाही जीवनाची

मृत्यूनंतर सर्व चांगले म्हणावे
हीच कमाई आहे आयुष्यात
सोबतीला नसतात कोणीही
सारेच रिकाम्या हाताने जातात

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

राजर्षी शाहू महाराज कविता

महाराजांचे महाराज

महाराष्ट्राच्या करवीर नगरी राज्यात
कागलच्या घाटगे घराण्यात
आप्पासाहेब राधाबाईच्या पदरात
जन्मास आले यशवंत कोल्हापुरात

शिवरायांचा वारसा ठेवले चालू
प्रेम मिळविले जनसामन्यात
राधानगरी धरण उभारून
समृद्धी आणली शेतकऱ्यांत

सक्तीचे व मोफत केले शिक्षण
मागासलेल्याना दिले आरक्षण
जातीभेद दूर करण्यासाठी
आंतरजातीय लाविले लग्न

संकटात मदत केली अनेकांना
राजाश्रय मिळवून दिले कलाकारांना
स्त्री शिक्षणाचा प्रसार करुनी
बंधनातून मुक्त केले महिलांना

अडल्या नडलेल्याना देऊन साथ
मानवतावादी राजाची चर्चा सर्वत्र
डॉ. आंबेडकरांना देऊनी मदत
चालू करविले मूकनायक वर्तमानपत्र

लोकांना दिली समानतेची वागणूक
त्यांचा होतो सर्वत्र जय जयकारा
सामाजिक न्याय दिवस म्हणुनी
त्यांचा जन्म दिन होतो साजरा

महाराजांचे महाराज राजर्षी शाहूनी
लोकोपयोगी कामे केली राज्यात
अनेकांची स्वपने झाली साकार
कोल्हापूर प्रसिद्ध झाले जगात

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769

Wednesday 24 June 2020

समजदार नागरिक

समजदार नागरिक होऊ या

#nasayeotikar

माणूस एकटा किती काळ जिवंत राहू शकतो ? याचे उत्तर फार काळ जिवंत राहू शकत नाही, समुहात राहिला तर जास्त काळ जिवंत राहू शकतो. म्हणूनच फार पूर्वीपासून मनुष्य वस्ती करून समुहात राहत होता, असे दिसून येते. समुहात राहायचे असेल तर समूहाचे काही नियम ठरवले जातात आणि त्याचे पालन करावे लागते. नियमाचे पालन केले नाही की वाळीत टाकले जाते, त्या व्यक्तींना कोणी काही मदत करत नसे असे चित्र पूर्वीच्या काळात होते. आज असे चित्र कुठे ही दिसत नाही म्हणजे समूहाचे काही नियम नाहीत, असे नाही. तर आज व्यक्तीला स्वनियम तयार करून समुहात आपली नाचक्की होणार नाही असे वर्तन करत असतो. जी व्यक्ती बेजबाबदारपणे वागते त्याला समूहाकडून वेळीच ताकीद दिली जाते किंवा शिक्षा केली जाते. आपला कुटुंब आणि परिवार याची समाजात प्रतिष्ठा राहावी, मानसन्मान राहावा आणि पत राहावी म्हणून माणूस जागरूकपणे वागत असतो. देशाला अश्याच समजदार नागरिकांची खरी गरज असते. जपान देशातील लोकं खूप कष्टाळू आहेत अशी त्यांची ख्याती तेथील समजदार नागरिकांच्या वर्तनावरून सांगितली जाते. भारत देशातील लोकं जबाबदारीने वागत नाहीत अशी आपल्या लोकांची प्रतिमा बाहेरच्या देशात का निर्माण झाली असेल तर ते ही आपल्या वागण्यावरून. एकशे तीस कोटी लोकसंख्येच्या देशात लोकशाहीने काही हक्क आणि कर्तव्य दिले आहेत. आपण आपल्या हक्कावर नेहमीच दावा सांगतो त्याचवेळी आपले कर्तव्य मात्र साफ विसरतो. देशाची प्रतिमा मालिन होईल असे कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. सरकारने तयार केलेल्या अनेक नियमांची आपल्या हातून पायमल्ली होते. कधी कधी आपण सरकारने तयार केलेले कायदे कलम लक्षात न घेता वर्तन करत असतो त्यामुळे समजदार नागरिक ठरू शकत नाही. घरात शांती आणि समृद्धी राहावी म्हणून कुटुंबप्रमुखांच्या नियमाचे पालन आपण करतो म्हणून तर घरात वातावरण सुरक्षित आणि आनंदी असते. त्याच पद्धतीने देशाचे काही नियम असतात आणि त्याचे पालन केल्यास देशात देखील आनंदी व समृद्धीचे वातावरण दिसू शकते. शालेय जीवनात सर्वाना नागरिकशास्त्र विषयातून बरीच बारीकसारीक माहिती दिली जाते. ती सर्व माहिती परीक्षेतील मार्कापुरते मर्यादित ठेवल्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण होत आहे. आपण किती नियमाचे पालन करतो हे कोरोना संकटाने दाखवून दिले आहे. मी माझ्या मनाचा राजा आहे, माझे जीवन मी कसे ही जगतो अशी विचारधारा देशाला तर कधीच पुढे नेणार नाही. ते तर सोडा, या वृत्तीमुळे व्यक्तीचा देखील विकास होत नाही. आपण टाकलेले एक जबाबदारीचे पाऊल दुसऱ्यासाठी जीवनदायी ठरू शकते. या सकारात्मक विचाराने देशातील प्रत्येक नागरिक वागला पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, आपणाला यापुढे कोरोना सोबत जगावे लागणार आहे. त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजून घ्यायचे असेल तर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जे काही नियमावली तयार केली आहे त्याचे तंतोतंत पालन करावे लागेल. तेंव्हाच खरे आपण समजदार नागरिक बनून आपल्या सोबत इतरांना जिवंत ठेवू शकू. म्हणून आता तरी जागे होऊ या आणि समजदार नागरिक बनू या.

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद
9423625769

पावसाळा आणि शेतकरी

पावसाळा आणि शेतकरी
- नागोराव येवतीकर
भारतात मुख्य तीन ऋतू आहेत. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्याचा आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पावसाळा, ऑक्टोबर जानेवारी हिवाळा आणि फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात उन्हाळा असतो. मानवी जीवनात तिन्ही ऋतू अत्यंत महत्वाचे आहेत. प्रत्येक ऋतू आपापले काम व्यवस्थितपणे केले तरच हे ऋतुचक्र व्यवस्थित राहते. अन्यथा असंतुलन होऊन मानवाचे जीवनचक्र बिघडून जाते. त्यातल्या त्यात पावसाळा हे सृष्टीमध्ये नविनता निर्माण करणारा ऋतू आहे. पाऊस पडला तरच शेतकरी आपल्या शेतात नवीन पीक घेऊ शकतो. झाडांना नवी पाने, फुले आणि फळे येऊ शकतात. नद्या, नाले, विहिरी आणि तलाव पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले तरच वर्षभर पुरते अन्यथा काही दिवसांनी दुष्काळ जाणवण्यास सुरुवात होते. पाऊस पडलाच नाही तर अनेक समस्या निर्माण होतात म्हणून दरवर्षी प्रत्येकजण पावसाची अगदी चातक पक्ष्यांप्रमाणे वाट पाहत असतात. मृग नक्षत्रांपासून पावसाचा काळ सुरू होतो. भारतात यास मान्सूनचा पाऊस म्हटले जाते. केरळमध्ये शक्यतो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून येऊन धडकतो आणि त्याला संपूर्ण भारतात पोहोचायला साधारणपणे दहा दिवसांचा कालावधी लागतो. तो जर वेळेवर आला तर पुढील सर्व कामे वेळेवर होतात आणि तो जर येण्यास उशीर केला तर पुढील सर्व कामे उशिरा होत राहतात. खरीप पिकांचे नुकसान होऊ शकते. पाऊस येण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती होणे ही गरजेचे आहे. पावसाला सुरुवात झाली की सर्वात जास्त आनंदी कोण होतो तर तो म्हणजे शेतकरी. डोक्यावर किती ही कर्ज असले तरी कसलीही चिंता न करता बळीराजा पुन्हा नव्या उमेदीने आपल्या शेताच्या कामाला सुरुवात करतो.पाऊस न येण्याने इतरांवर काही परिणाम होवो की नाही मात्र शेतकऱ्यांच्या जीवनावर खूप मोठा परिणाम दिसून येतो.म्हणूनच या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतो. 

- नागोराव सा. येवतीकर

नपा हद्दीतील सरकारी शाळांची अवस्था

नगरपालिका हद्दीतील सरकारी शाळा

सरकारी शाळा म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा होय. ग्रामीण भागातल्या शाळांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायतची थोडीफार मदत मिळू शकते त्यामुळे त्या शाळेचा भौतिक विकास होऊ शकतो. मर्यादित लोकसंख्या आणि मर्यादित क्षेत्र यामुळे ग्रामीण भागातील सरकारी शाळांना सध्या अच्छे दिन दिसत आहेत. बघायला गेलं तर येथे ही अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यानंतर मनपाच्या शाळा म्हणजे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा यांना सुद्धा मनपाचे सहकार्य मिळते. स्वतंत्र शिक्षण विभाग असतो आणि प्रत्येक कार्य स्वतंत्रपणे चालत असल्याने सर्वत्र लक्ष देणे शक्य आहे. मात्र नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या सरकारी शाळा यांची स्थिती कोणी ही लक्षात घेत नाही त्यामुळे येथील शाळांची अवस्था धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी झालेली पाहायला मिळते. नगरपालिका हद्दीतील सरकारी जिल्हा परिषद शाळांना फक्त शासनाची म्हणजे सर्व शिक्षा अभियानाचेच अनुदान मिळते. ज्याप्रकारे ग्रामीण भागात 14 वा किंवा 15 वा वित्त आयोगातून शिक्षणावर 20 टक्के रक्कम खर्च करणे बंधनकारक करण्यात आले आहे तसे नगरपालिकामध्ये शाळांसाठी कोणतीच तरतूद का करण्यात आली नसेल ? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. नगरपालिका ह्या शाळेला आर्थिक मदत तर सोडाच त्यांचे इमारत भाडे भरले नाही म्हणून त्यांचे अधिकारी येऊन सिल ठोकतात. यावर चिंतन होणे आवश्यक आहे.
नगरपालिकेच्या हद्दीतील शाळा म्हणजे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. ह्या शाळा नगरपलिका हद्दीत असल्याने जिल्हा परिषदेचा कोणताच निधी मिळत नाही. ग्रामीण भागात जसे खासदार निधी, आमदार निधीमधून शाळेला सहकार्य मिळते तसे सहकार्य येथील शाळांना दिल्या जात नाही त्यामुळे ह्या शाळा कित्येक वर्षांपासून उपेक्षित आहेत. नगरपालिका क्षेत्र म्हटल्यावर सरकारी शाळेसोबत इतर ही अनेक अनुदानित, विना अनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यच्या शाळा येथे अस्तित्वात असतात. त्यांच्या मानाने सरकारी शाळा कोणत्याच पालकांना आकर्षित करू शकत नाही, त्यामुळे अर्थातच तेथील पटसंख्या रोडावली जाते. पूर्वीच्या काळी सरकारी शाळेशिवाय पर्याय नव्हता तेंव्हा याच सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना बसायला जागा मिळत नव्हती आणि आज यांना विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. कारण खाजगी आणि इंग्रजी शाळेचे प्रमाण एवढं वाढलं आहे की, सरकारी शाळेकडे आता मजुरीवर काम करणारे पालक देखील ढुंकून पाहत नाहीत. येथील सरकारी शाळेत कोणता विद्यार्थी प्रवेश घेतो तर जो पालक आपल्या पाल्याना साधी वही पेन घेऊन देऊ शकत नाहीत असे दारिद्र्याच्या खाईत असलेली गरीब मुलेच प्रवेश घेतात. त्यांची शाळा शिकण्याची मानसिकता नसल्यात जमा असते. आई-वडील मजुरीला निघून गेले की आपला पाल्य शाळेत गेला किंवा नाही याची साधी चौकशी देखील करत नाही. शिकला तर शिकला नाही तर नाही या मानसिक अवस्थेत असणारी पालकांसाठी ह्या शाळा एक आधार केंद्र असते.  मुलांच्या दुपारच्या जेवण्याची सोय आणि दिवसभर सांभाळ करणारे केंद्र. हाताच्या बोटावर मोजता येतील असे पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देतात. त्याच सोबत शासनाच्या काही धोरणाचा फटका देखील या शाळांना बसतो. प्रत्येक शिक्षकांना शहरात नोकरी करावी वाटते विशेष करून महिलांना. तीन वर्षांपूर्वी झालेल्या ऑनलाईन बदलीने या शहरातील शाळेचा पूर्ण वाटोळं करून टाकलं आहे. पालकांचे असे मत झाले आहे की, आता या शाळेत सेवानिवृत्तीला जवळ आलेले, बिमार असलेले, अश्या शिक्षकांना संधी देऊन शहरातल्या शाळेत भरती केल्यावर ते स्वतःला पाहतील की आमच्या मुलांना. तरुण वयोगटातील शिक्षक ज्या उत्साहाने शिकवितात त्या उत्साहात हे शिकवतील का ? असा प्रश्न अनेक पालकांनी व्यक्त केला तेंव्हा हे ही योग्य आहे असे वाटते. अजून एक निर्णय चुकीचा वाटतो. सरकारी शाळा वाचवायचे असतील तर सरकारी योजना ह्या सरकारी शाळा सोडून अन्य कोणत्याच शाळांना देण्यात येऊ नये. मोफत पाठ्यपुस्तक योजना किंवा शालेय पोषण आहार योजना फक्त सरकारी शाळेतुनच दिल्या गेलं तर येथील शिक्षकांना म्हणता येईल की, आपल्या मुलांना फुकट पुस्तकं देऊ, दुपारचं जेवण देऊ, मोफत गणवेश देऊ आणि प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकेल. पण मोफत गणवेश वगळता पाठ्यपुस्तक आणि दुपारचे जेवण अनुदानित शाळेत देखील दिल्या जाते म्हणून काही पालक जे की या कारणांसाठी सरकारी शाळेत कदाचित येण्याची शक्यता राहिली असती ते ही धूसर झाली. शहरातल्या खाजगी शाळेत सर्व सोयी सुविधा पूर्ण असतात आणि त्याच शहरातल्या सरकारी शाळेत वर्गखोल्या झाडायला साधा चपराशी नसतो. याची देखभाल करण्यासाठी चौकीदार नसतो त्यामुळे या सार्वजनिक मालमत्तेचे रोजच्या रोज अतोनात नुकसान होत राहते. शासनाच्या सर्वच योजना राबविणे अत्यंत कष्टप्रद होऊन बसते. शालेय व्यवस्थापन समिती ही प्रत्येक शाळेला असते त्यात एक नगरपालिकेचा प्रतिनिधी देखील असतो पण नावापुरताच. त्यांच्या स्थायी समितीत शिक्षण नावाचा विषयच राहत नाही तर ते काय तरतूद करतील. पण खरोखरच नगरपलिका हद्दीतील सरकारी शाळांचा विकास व्हावा असे वाटत असेल तर येथील नगराध्यक्ष, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन शाळेकडे लक्ष दिल्यास आपल्या आजूबाजूच्या शाळेचा नक्की विकास होऊ शकतो. त्यासाठी गरज आहे फक्त नि फक्त आपल्या सर्वांच्या ईच्छाशक्तीची. आज ग्रामीण भागातील सरकारी शाळा जसे कात टाकून आपल्यात बदल करत आहेत तोच बदल नगरपालिका हद्दीतील सरकारी शाळेत होऊ शकतो, चला तर मग या शाळांना हातभार लावू या आणि गरिबांच्या लेकरांच्या शिक्षणाची सोय करू या.

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद
9423625769

स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक

लॉकडाऊनच्या काळात वाचलेले एक अप्रतिम पुस्तक 

लक्ष्मीबाई टिळक यांचे स्मृतिचित्रे हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्य विश्वातील एक अजरामर साहित्यकृती होय. साहित्यिक नारायण वामन टिळक यांची पत्नी म्हणजे लक्ष्मीबाई. नाशिक जवळच्या जलालपुर हे त्यांचे जन्मगाव तर लक्ष्मीबाई यांचे बालपणीचे नाव मनकर्णिका असे होते आणि सर्वचजण लाडाने त्यांना मनू असे म्हणत. स्मृतिचित्रे या पुस्तकात लक्ष्मीबाई यांनी आपले माहेर, सासर आणि टिळकांसोबत घालवलेल्या अनेक आठवणी यात सांगितलेल्या आहेत. यात एकूण चार भाग असून पहिल्या भागात त्यांच्या संसारात अनेक अडचणी कसे आ वासून उभे होते याची माहिती मिळते. दुसऱ्या भागात नारायण टिळक हे ख्रिस्ती धर्म स्विकारतात त्यास लक्ष्मीबाई च्या मनात कशी घालमेल होते आणि शेवटी ते ही ख्रिस्ती धर्म स्विकारतात याचा अनुभव सांगितलं आहे. तिसऱ्या भागात नारायण टिळक यांचा मृत्यू कसा होतो ? हे अनुभव वाचायला मिळते तर शेवटच्या भागात टिळकांच्या नंतर लक्ष्मीबाई आणि त्यांचा पुत्र दत्तू यांचे जीवन अनुभव वाचण्यास मिळतात. पुस्तकात एकूण 512 पाने असून कोल्हापूरच्या रिया पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकातून जीवनात येणाऱ्या अनेक संकटांना तोंड कसे देत जावे ? दानधर्माचे महत्व, त्यांच्या पोटचा एकच लेकरू होता मात्र घर नेहमीच गोकुळ सारखे भरून राहत. दिल्याने काही गोष्टी संपतात असे वाटते मात्र उलट मानवता जोडत जाते आणि साखळी वाढत जाते हे सर्व या पुस्तकाचे वाचन केल्यावर कळते. महाराष्ट्राला बालकवी त्र्यंबक बापूजी ठोबरे मिळाले ते या लक्ष्मीनारायण जोडीमुळे. बालकवी लहानपणी यांच्याच घरी होते ज्यावेळी ते खूप आजारी होते असा उल्लेख या पुस्तकात वाचण्यास मिळतो. जलालपूर, नाशिक, नागपूर, सातारा, पुणे, वणी, महाबळेश्वर, माथेरान येथील अनुभव वाचण्यासारखे आहेत. शेवटी ते मुंबईला गेले आणि मुंबईहून कराचीला असा जीवनप्रवास पाहायला मिळतो. जीवनात अनेक खस्ते खात खात त्यांनी आपला संसार नेटाने चालविला. प्रत्येक स्त्रियांनी जरूर हे पुस्तक वाचावं कारण ज्या प्रकारे लक्ष्मीबाई यांनी संकटात आपली नौका चालविली ते खरोखरच प्रेरणादायी आहे. अक्षरशत्रू असलेली लक्ष्मीबाई आपल्या पतीच्या प्रेरणेने आणि मुलाच्या सहकार्याने एवढं सुंदर साहित्याची भेट आपल्या सर्व वाचकांना दिली आहे. त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. 

- नागोराव सा. येवतीकर

पाऊस व मित्र

पाऊस व मित्र

आई म्हणते मला
नको जाऊ पावसात
अंग भिजून जाईल
थंडी भरेल अंगात

आला किती पाऊस
नक्की मी भिजणार
जवळ नाही छत्री
आता काय होणार

एवढ्यात आला मिंटू
घेऊन रंगीबेरंगी छत्री
खूप छान वाटलं जेंव्हा
त्याने जपली ही मैत्री

पाऊस झाला कमी
आम्ही पाण्यात खेळलो
पावसात वाचलो पण
पाण्यात खेळून भिजलो

आईने दिल्या शिव्या
मी चुपचाप सहन केला
मित्राच्या आठवणीने
पाऊस स्मरणात राहिला

- नासा येवतीकर, धर्माबाद ( कृष्णसुत )
9423625769

माझे बाबा

।। माझे बाबा ।।

माझे बाबा मला आजही आठवतात
पडद्यावर न येता पडद्यामागे राहतात

आई घरातल्या कामात असते मग्न
बाबा कोणतेही येऊ देत नाही विघ्न

आई करते घरातल्या सर्वांवर संस्कार
बाबा सांभाळतात घराबाहेरचे विकार

बाबांचे प्रेम आईसारखे दिसून येत नाही
संकटकाळात बाबाशिवाय पर्याय नाही

सर्वांचेच बाबा असतात अगदी प्रेमळ
बाहेरून कडक तरी आतून मात्र नितळ

- नासा येवतीकर, 9423625769

Tuesday 23 June 2020

शाळा कधी सुरू होणार ?

शाळा कधी सुरू होणार ? 

शाळा कधी सुरू होणार ? पालक, विद्यार्थी आणि अनेक नागरिकांचा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर मात्र कोणाजवळ नाही. जे सध्या सरकार चालवत आहेत, त्यांच्याकडे देखील या प्रश्नाचे उत्तर उपलब्ध नाही. त्यामुळे ते रोज नवीन घोषणा करतांना दिसून येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक दृष्टीने विचार करतात. शाळा कश्या सुरू करता येतील ? याचे नियोजन शालेय शिक्षण मंत्री सरकार कडे सादर करतात आणि त्या अनुषंगाने शाळा सुरू करायला हरकत नाही असे ते म्हणतात. तर राज्याचे उपमुख्यमंत्री कोरोना आटोक्यात आल्याशिवाय कोणतीही शाळा सुरू करता येणार नाही असे म्हणतात. सामान्य जनता यातून काय निर्णय घ्यावा याच संभ्रमात आहेत. जुलै महिन्यात नववी व दहावी,ऑगस्ट महिन्यात सहावी ते आठवी, सप्टेंबर महिन्यात तिसरी ते पाचवी आणि दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर अकरावीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने आपल्या अध्यदेशाद्वारे जाहीर केले. त्यानुसार प्रत्येक शाळेने शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन तसा निर्णय घेण्याचे ही सुचविले आहे. त्यानुसार राज्यात सर्वत्र शाळांचे नियोजन ही चालू आहे मात्र तरी ही शाळा कधी सुरू होणार ? याविषयी लोकांमध्ये संभ्रम अवस्था आज ही कायम आहे. यावर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू सक्रिय झाला आहे आणि आज तो प्रत्येक जिल्ह्यात आणि शहरात स्थिरावला आहे. सहजासहजी हा विषाणू आटोक्यात येईल याची खात्री नाही. लॉकडाऊनचे पाच टप्पे पूर्ण केल्यानंतर अनलॉकमध्ये या जून महिन्यात त्याचा प्रादुर्भाव आणखीन वाढू लागला. शाळा सुरू करण्यासाठी परिवहन क्रिया देखील चालू करावी लागते. बस आणि रेल्वे चालू झाल्यावर अनेक नागरिकांची वर्दळ वाढेल आणि त्याच प्रमाणात कोरोना देखील पसरेल यात शंका नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ न देता शाळा कसे सुरू करता येईल ? यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. ऑनलाईन शिक्षण देण्यात अनेक समस्या येत आहेत याचे गेल्या तीन महिन्यात खूप अनुभव मिळालं आहे.  त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सर्वांसाठी लागू पडत नाही. घरात बसून बसून विद्यार्थी कंटाळलेले आहेत तर पालक देखील मुलांच्या शिक्षणाबाबतीत चिंतातुर झाले आहेत. शाळा बंद असले तरी सरकारी शाळेतील आणि खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांचे वेतन चालू आहेत मात्र विना अनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्य शाळेतील शिक्षकांचे वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थी शाळेत नाहीत तर फीसचे संकलन होऊ शकत नाही तेंव्हा येथील कर्मचाऱ्यांचे वेतन संस्थाचालक कुठून देणार ? वेतन नाही तर घर कसे चालवावे ? हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मनात देखील हाच प्रश्न सतावत आहे, शाळा कधी सुरू होणार ? अनेकांना पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे, असे वाटते. काही मंडळी राज्यातील मंदिरे आणि देवालय दर्शनासाठी खुले करावीत अशी मागणी करत आहेत मात्र कोणता शिक्षक शाळा सुरू करावे म्हणून मागणी किंवा निवेदन देताना दिसून येत नाही, असे शिक्षकांना टोमणे मारत आहेत. खरंच जर शिक्षकांच्या हातात शाळा सुरू करता आली असती तर 15 जूनला ग्रामीण भागात अनेक शाळा सुरू झाल्या असत्या. मात्र लातूर जिल्ह्यातील एक घटना जशी घडली की विना परवानगी एकाने दहावीच्या वर्गास सुरुवात केली अन त्याला कारवाईला सामोरे जावे लागले. लोकांना काय काही ही बोलणे खूप सोपे वाटते मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी करतांना काय त्रास होतो ते त्यांच्या वंशात जन्म घेतल्याशिवाय कळणार नाही. टप्याटप्याने शाळा सुरू करण्याच्या नियोजनात ज्यांची शाळा सुरू करायची आहे त्या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची कोविड चाचणी पूर्ण करून सुरक्षितपणे शाळा सुरू करणे शक्य होईल का ? या सारख्या उपायांचा विचार करण्यात यावे. 

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769 

Monday 22 June 2020

लघुकथा - पाथरवट


लघुकथा - पाथरवट

निळे सर पाचव्या वर्गात हजेरी घेत होते. राजू मोघे हे नाव घेतल्यावर क्षणभर थांबले. शाळा सुरू झाल्यापासून हा विद्यार्थी शाळेत आला नाही हे त्यांच्या लक्षात आले. गेल्यावर्षी तो नियमित शाळेत येत होता पण यावर्षी तो एकही दिवस शाळेत का आला नाही यावर सर विचार करू लागले. निळे सर बालरक्षक म्हणून काम पाहत होते. राजू शाळाबाह्य होऊ नये याची चिंता त्यांना सतावत होती म्हणून सर मुलांना विचारू लागले, " अरे हा राजू गावात आहे की नाही. ? " मुलांनी एकच कल्लोळ करीत म्हणाले " आहे सर, तो रोज निसर्ग हॉटेलात काम करतो, तेथेच खातो आणि रात्री उशिरा आपल्या घरी येतो. " पोरांना राजू बाबत हे सारं माहीत होतं. त्याच्या घरी जाऊन काही फायदा नाही म्हणून निळे सर मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन निसर्ग हॉटेलात चहा पिण्यासाठी गेले. सरांना पाहताच राजू काही बाहेर येईना. मालक राजूच्या नावाने ओरडत होता, " हे राजू, बघ गिऱ्हाईकला काय पाहिजे विचारून घे " पण राजू काही बाहेर येईना, मालक रागात जोराने बोलल्यावर तो बाहेर आला आणि निळे सरांच्या टेबलावर जाऊन भीत भीत विचारलं, " काय पाहिजे सर ? " सरांनी लगेच त्याचा हात धरला आणि विचारलं, " सांग शाळेत का येत नाहीस ? काय प्रॉब्लेम आहे ? " तो आणखीनच रडवेला झाला.  " सर तुम्हांला उद्या शाळेत येऊन सांगतो. उद्या आमचं हॉटेल बंद राहते. पण आत्ता सोडा मला " राजू म्हणाला. हॉटेल मालकांसमोर काही बोलता येत नाही म्हणून राजू तसा बोलला असेल असे सरांना वाटले. दुसऱ्या दिवशी खरोखरच राजू शाळेत आला. निळे सरांनी त्याला वेगळ्या खोलीत घेऊन गेले आणि त्याचे म्हणणे ऐकू लागले. राजू आपली कर्म कहाणी सांगू लागला, " सर, मी खूप गरीब आहे. माझ्या घरी माझ्यापेक्षा लहान तीन भावंडं आहेत, आई दुसऱ्याच्या घरची धुणी भांडी करते, मी हॉटेलात काम करतो आणि त्याच पैश्यावर आमचं घर चालते. " हे ऐकून निळे सर म्हणाले, " बाबा काय काम करतात ? " यावर राजू रडत रडत म्हणाला, " बाबा, जमेल तेवढं हमालीचं काम करतात आणि येतांना त्या मिळालेल्या पैशाचे दारू पितात. त्यामुळं मला काम करणं आवश्यक आहे नसता आमचं घर कसं चालेल ? " निळे सर राजुचे बोलणे ऐकून स्तब्ध झाले. राजू तसा लिहण्या-वाचण्यात चांगला मुलगा होता आणि शाळेतील प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये त्याचा सहभाग असायचा. त्यामुळे त्याला कसे ही करून शिकवायचं असा निळे सरांनी मनातल्या मनात निर्धार  केला. राजूला हॉटेलात महिन्याचा किती पगार मिळतो हे विचारलं तेंव्हा त्याने उत्तर दिलं की, " महिन्याला हजार रु. पगार आणि दोन वेळाचे जेवण मिळते " सरांनी ठीक आहे एवढंच म्हटलं आणि राजूला घरी जाण्यास सांगितलं. निळे सरांनी डोक्यात एक कल्पना तयार केली आणि ती कल्पना आपल्या इतर मित्रांना सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी निळे सर आणि त्यांचे मित्र निसर्ग हॉटेलात चहा पिण्यासाठी गेले. तसा मालकाने राजूला नेहमीप्रमाणे आवाज दिला. निळे सरांना पाहून राजू आज घाबरला नाही तो थेट टेबलाजवळ गेला आणि त्यांची ऑर्डर घेतली. तो चहा घेऊन येतांना निळे सरांच्या मित्रांपैकी एका मित्राने राजूला उभं राहायला सांगितलं. तसा राजू जागेवरच थांबला. तो मित्र एक पत्रकार होता, त्याने हॉटेल मालकाला विचारलं की, " हा मुलगा आपल्या हॉटेलात किती दिवसापासून काम करतो ? " मालकाची जराशी बोबडी वळाली, तो म्हणाला, " साहेब आजच आलाय, काही तरी काम द्या म्हणाला म्हणून त्याला ठेवलं" " पण हा तर बालकामगार दिसतोय, बालकामगार कामावर ठेवणे हा तर गुन्हा आहे. तुम्ही कसे काय यास कामावर ठेवलं ? " मालकाची आता पूर्ण बोबडी वळाली होती. साहेब माफ करा यापुढे असं होणार नाही, फोटो काढू नका म्हणून तो विनंती करत होता. मित्राने ठरवलेल्या नियोजनानुसार मालकांना म्हणाला की, " तू बालकामगार ठेवण्याचा एक गुन्हा केला आहेस म्हणून तुला एकच शिक्षा की तू याचा महिन्याचा पगार जे काही आहे ते त्याला नियमित देत जा. त्याच्या मदतीने त्याचे शिक्षण पूर्ण होईल आणि तुला आशीर्वाद मिळेल. त्यात खंड पडू देता कामा नये. " बदनामीपेक्षा त्याला ही शिक्षा बरी वाटली. तो राजुच्या खात्यात दरमहा हजार रु. टाकण्याचे कबुल केले आणि तसे जबाबदारीपूर्वक पूर्ण करत होता. निळे सरांचे एक मित्र पोलीस होते. त्या पोलिस मित्राच्या मदतीने राजुच्या बापाला ही दारूची सवय सोडायला लावली. बापाने फुकटचा पैसा नको म्हणत निसर्ग हॉटेलात मुलांच्या जागेवर काम करायला सुरुवात केली. राजुला जे शिक्षण मिळायला पाहिजे ते शिक्षण मिळत नव्हते हा त्याच्यावर होणाऱ्या अन्यायावर निळे सरांनी छान कल्पना शोधून काढली आणि राजुला खरा न्याय मिळाला. त्यावर्षी निळे सरांच्या अथक प्रयत्नामुळे शाळाबाह्य होत असलेल्या राजूला नवोदय विद्यालय परीक्षेत यश मिळवून दिले व त्याला नवोदय विद्यालयात सहाव्या वर्गात प्रवेश मिळाला. त्याच्या पुुुढील शिक्षणाची काळजी ही मिटली. पाथरवटच्या हातात एखादा दगड आला की, त्यावर छन्नीचे घाव घालून एक सुंदर मूर्ती तयार करतो अगदी त्याचप्रकारे शिक्षकांचे काम असते. निळे सरांनी पाथरवटासारखे काम करून राजूला घडविले.  

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Sunday 21 June 2020

माझे बाबा ; माझे हिरो

माझे बाबा ; माझे हिरो
आज जागतिक फॉदर्स डे आहे म्हणून माझ्या बाबाविषयी ( सायन्ना गुरुजी येवतीकर ) थोडं लिहावं म्हणतो. कदाचित हे लिहिणे संयुक्तिक आहे किंवा नाही हे मला ठरविता येणार नाही. मात्र माझे बाबा माझ्यासाठी नक्कीच आदर्श व्यक्तिमत्व आहे.
ज्यांच्यामुळे आज मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा आहे यांच्यात त्यांचेच श्रेय आहे. ते जर माझ्या पाठीशी उभे राहिले नसते तर मी आज असा राहिलो नसतो. गरीब परिस्थिती मधून माझे बाबा घडले, अनेक संकटांना त्यांनी तोंड दिली. ते तीन बहिणी आणि तीन भावंडे अश्या मोठ्या परिवारातील. त्यापैकी आज दोन बहिणी आणि दोघे भाऊ हयात आहेत. माझे आजोबा दशरथ हे कपडे विणण्याचे काम करत आणि आजूबाजूच्या खेडेगावात जाऊन विक्री करत. ते देवधर्म करण्यात मग्न असत. त्यांना मंत्र वगैरे येत असे लोकं सांगतात. 
पारतंत्र्याच्या काळात प्राथमिक शिक्षण आणि स्वातंत्र्यानंतर माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले. हे शिक्षण पूर्ण करतांना त्यांना अनेक अडचणी आल्या पण त्यांनी आपल्या मित्रांच्या मदतीमुळे शिक्षण सोडले नाही. आंध्र आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर राहत असल्याने त्यांना तेलगू आणि मराठी दोन्ही भाषा चांगल्या प्रकारे जमत. अगदी सुरुवातीला महाराष्ट्राची निर्मिती होण्यापूर्वी त्यांनी तेलगू भाषेतील शाळेत नोकरीस प्रारंभ केला होता. मात्र महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर त्यांनी महाराष्ट्रात येणे पसंद केले आणि महाराष्ट्राचे नागरिक बनले. नोकरीचा काळ ही काही सुखाचा नव्हता कारण त्याकाळी रस्ते नव्हते दळणवळणाची सुविधा नव्हती त्यामुळे जेथे नोकरी त्याच गावी राहावे लागत असे. 20-25 वर्षे त्यांनी आपले घर सोडून नोकरीच्या गावी राहिले. घरची परिस्थिती खूपच बेताची होती त्यामुळे घरून काही मदत मिळेल याची काहीही आशा नसायची. काळी छत्री, सायकल आणि शबनम असा त्यांचा पेहराव पूर्वी होता असे सांगितले जात. गावाकडे बदली झाल्यानंतर त्यांनी सायकलवर शाळा केल्याचं मला आज ही आठवते. बाबांचे अक्षर खूप सुंदर आणि वळणदार आहे. त्यांच्यासारखे अक्षर लिहिता यावे असा माझा नेहमी प्रयत्न असायचा. त्यांना वाचण्याचा खूपच छंद. त्यांच्या हातात एखादे पुस्तक आले की ते पुस्तक संपल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. माझे वृत्तपत्रात लेख प्रकाशित होऊ लागले तसे गावाच्या पत्त्यावर अनेक वाचकांचे पत्र येत असत. ते सारे पत्र मी गावी येईपर्यंत ते सांभाळून ठेवत आणि मला देत. नंतर प्रकाशित झालेली साप्ताहिके आणि मासिके येऊ लागली आणि त्यांना ते वाचण्यासाठी मिळू लागली. सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांनी माझ्या वडील भावाकडे असलेले सर्वच पुस्तके वाचून काढली आहेत. माझे वडील बंधू म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शाखा व्यवस्थापक या पदावर काम करणारे डॉ. सुरेश येवतीकर, यांना ही वाचण्याचा विलक्षण छंद. हे जिथे जात तेथून दोन पुस्तकं हमखास आणत असत. पहिल्या पानावर आपली सही करून पुस्तक आणलेली तारीख त्याखाली लिहून ठेवण्याची त्यांची खूप जुनी सवय आज ही कायम आहे. 
मला थोडाफार वारसा या दोघांकडून मिळाला. शब्दकोडे सोडविण्याचा छंद देखील त्यांना गप्प बसू देत नाही. पुण्यनगरी आणि दैनिक चौफेर या दोन वृत्तपत्रातील सारीच कोडे सोडविल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. नेहमी पेपरमध्ये डोळे लावून बसलेले माझे बाबा मात्र माझ्या आईला नकोसे वाटते. उतरत्या वयात थोडा आराम करावा असे तिला वाटते पण त्यांना कोडे सोडविल्याशिवाय करमत नाही. बाबांना शेती करण्याचा फारच हौस. सध्या शरीर साथ देत नसल्याने ते शेताकडे जास्त लक्ष देत नाहीत मात्र शेतीची खूप माहिती त्यांना आहे. लहानपणापासून अनुभव असल्याने निसर्गाच्या सर्व गोष्टी त्यांना माहीत आहेत.
घरातील प्रत्येक व्यक्तीवर त्यांचे सारखेच प्रेम. कुणावर ही तसूभर प्रेम कमी केलं नाही. आज त्यांना दोन मुले, दोन मुली आणि त्यांची मुले असे जवळपास पंधरा - वीस लोकांचा गोतावळा आहे. त्यांच्या हातात लक्ष्मी आहे असे कधी कधी आई बोलते. ते खरोखरच आहे. त्यांच्या अर्थ साहाय्याने अनेक कुटुंबाचे भले झाले आहे हे मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे. आर्थिक देवाणघेवाणीत त्यांना अनेक लोकांनी दगा देखील दिला आहे तरी देखील ते गरजू व्यक्तीला आर्थिक मदत केल्यावाचून राहत नाही. माझे बाबा टक्केवारीने पैसे देतात असे लोकं म्हणत असतील कदाचित पण याच आर्थिक मदतीमुळे एखाद्याचे भले झालेले पाहून मनाला समाधान देखील होते. कोणाचे भले झाले आणि कोणी कोणी दगा दिला याचा उल्लेख मी करणार नाही. मात्र अनेक लोकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे म्हणून तर फेब्रुवारी 2013 मध्ये सर्पदंश झाल्यावर मृत्यूच्या छायेतून  आम्हांला वाचविता आले. या घटनेला आज साडे सात वर्षे होत आहेत. डॉक्टरांनी देखील वाचण्याचे पन्नास टक्के खात्री दिली होती. त्यामुळे आम्ही सर्व चिंतातुर झालो मात्र अनेक लोकांचे आशीर्वाद त्यांना लाभले आणि हा संकटाचा क्षण पार पडला. सर्वांच्या आशीर्वादामुळे ते आमच्या सोबत आहेत. माझ्या जीवनात त्यांचे अनमोल स्थान आहे. दहावीमध्ये आणि बारावीत चांगल्या मार्काने पास झालो आणि त्यानंतर डी एड साठी ते नेहमी माझ्या पाठीशी होते. मला डी एड करायचे नव्हते मात्र ते यावर ठाम होते. त्यांच्या निर्धारामुळे माझे डी एडचे शिक्षण पूर्ण झाले.  डी एड झाल्यावर शिक्षक म्हणून किनवट तालुक्यात लागलेली नोकरी सोडून देऊन घरी बसलो तेंव्हा मला त्यांनी समजावून सांगितले म्हणून ती नोकरी टिकली आणि मी पुढे गेलो. नाहीतर आज मला नंतर नोकरी लागली नसती असे चित्र दिसले होते. माझे बाबा सर्वांवर नकळत प्रेम करायचे. शहरातून किंवा बाहेरून कोठून येताना ते नेहमी काही ना काही आणत असत. त्यांनी जेवढं आम्हांला केलं तेवढं नातलगांना देखील केलं आहे. 

लोकांना तर चांगल्या माणसात देखील अवगुणच दिसतात, माझ्या बाबामध्ये लोकांच्या दृष्टीने असतील ही काही अवगुण पण माझ्या नजरेत माझे बाबा म्हणजे माझे हिरो आहेत.
धन्यवाद .....!
- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...