Sunday 21 June 2020

माझे बाबा ; माझे हिरो

माझे बाबा ; माझे हिरो
आज जागतिक फॉदर्स डे आहे म्हणून माझ्या बाबाविषयी ( सायन्ना गुरुजी येवतीकर ) थोडं लिहावं म्हणतो. कदाचित हे लिहिणे संयुक्तिक आहे किंवा नाही हे मला ठरविता येणार नाही. मात्र माझे बाबा माझ्यासाठी नक्कीच आदर्श व्यक्तिमत्व आहे.
ज्यांच्यामुळे आज मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा आहे यांच्यात त्यांचेच श्रेय आहे. ते जर माझ्या पाठीशी उभे राहिले नसते तर मी आज असा राहिलो नसतो. गरीब परिस्थिती मधून माझे बाबा घडले, अनेक संकटांना त्यांनी तोंड दिली. ते तीन बहिणी आणि तीन भावंडे अश्या मोठ्या परिवारातील. त्यापैकी आज दोन बहिणी आणि दोघे भाऊ हयात आहेत. माझे आजोबा दशरथ हे कपडे विणण्याचे काम करत आणि आजूबाजूच्या खेडेगावात जाऊन विक्री करत. ते देवधर्म करण्यात मग्न असत. त्यांना मंत्र वगैरे येत असे लोकं सांगतात. 
पारतंत्र्याच्या काळात प्राथमिक शिक्षण आणि स्वातंत्र्यानंतर माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले. हे शिक्षण पूर्ण करतांना त्यांना अनेक अडचणी आल्या पण त्यांनी आपल्या मित्रांच्या मदतीमुळे शिक्षण सोडले नाही. आंध्र आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर राहत असल्याने त्यांना तेलगू आणि मराठी दोन्ही भाषा चांगल्या प्रकारे जमत. अगदी सुरुवातीला महाराष्ट्राची निर्मिती होण्यापूर्वी त्यांनी तेलगू भाषेतील शाळेत नोकरीस प्रारंभ केला होता. मात्र महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर त्यांनी महाराष्ट्रात येणे पसंद केले आणि महाराष्ट्राचे नागरिक बनले. नोकरीचा काळ ही काही सुखाचा नव्हता कारण त्याकाळी रस्ते नव्हते दळणवळणाची सुविधा नव्हती त्यामुळे जेथे नोकरी त्याच गावी राहावे लागत असे. 20-25 वर्षे त्यांनी आपले घर सोडून नोकरीच्या गावी राहिले. घरची परिस्थिती खूपच बेताची होती त्यामुळे घरून काही मदत मिळेल याची काहीही आशा नसायची. काळी छत्री, सायकल आणि शबनम असा त्यांचा पेहराव पूर्वी होता असे सांगितले जात. गावाकडे बदली झाल्यानंतर त्यांनी सायकलवर शाळा केल्याचं मला आज ही आठवते. बाबांचे अक्षर खूप सुंदर आणि वळणदार आहे. त्यांच्यासारखे अक्षर लिहिता यावे असा माझा नेहमी प्रयत्न असायचा. त्यांना वाचण्याचा खूपच छंद. त्यांच्या हातात एखादे पुस्तक आले की ते पुस्तक संपल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. माझे वृत्तपत्रात लेख प्रकाशित होऊ लागले तसे गावाच्या पत्त्यावर अनेक वाचकांचे पत्र येत असत. ते सारे पत्र मी गावी येईपर्यंत ते सांभाळून ठेवत आणि मला देत. नंतर प्रकाशित झालेली साप्ताहिके आणि मासिके येऊ लागली आणि त्यांना ते वाचण्यासाठी मिळू लागली. सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांनी माझ्या वडील भावाकडे असलेले सर्वच पुस्तके वाचून काढली आहेत. माझे वडील बंधू म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शाखा व्यवस्थापक या पदावर काम करणारे डॉ. सुरेश येवतीकर, यांना ही वाचण्याचा विलक्षण छंद. हे जिथे जात तेथून दोन पुस्तकं हमखास आणत असत. पहिल्या पानावर आपली सही करून पुस्तक आणलेली तारीख त्याखाली लिहून ठेवण्याची त्यांची खूप जुनी सवय आज ही कायम आहे. 
मला थोडाफार वारसा या दोघांकडून मिळाला. शब्दकोडे सोडविण्याचा छंद देखील त्यांना गप्प बसू देत नाही. पुण्यनगरी आणि दैनिक चौफेर या दोन वृत्तपत्रातील सारीच कोडे सोडविल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. नेहमी पेपरमध्ये डोळे लावून बसलेले माझे बाबा मात्र माझ्या आईला नकोसे वाटते. उतरत्या वयात थोडा आराम करावा असे तिला वाटते पण त्यांना कोडे सोडविल्याशिवाय करमत नाही. बाबांना शेती करण्याचा फारच हौस. सध्या शरीर साथ देत नसल्याने ते शेताकडे जास्त लक्ष देत नाहीत मात्र शेतीची खूप माहिती त्यांना आहे. लहानपणापासून अनुभव असल्याने निसर्गाच्या सर्व गोष्टी त्यांना माहीत आहेत.
घरातील प्रत्येक व्यक्तीवर त्यांचे सारखेच प्रेम. कुणावर ही तसूभर प्रेम कमी केलं नाही. आज त्यांना दोन मुले, दोन मुली आणि त्यांची मुले असे जवळपास पंधरा - वीस लोकांचा गोतावळा आहे. त्यांच्या हातात लक्ष्मी आहे असे कधी कधी आई बोलते. ते खरोखरच आहे. त्यांच्या अर्थ साहाय्याने अनेक कुटुंबाचे भले झाले आहे हे मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे. आर्थिक देवाणघेवाणीत त्यांना अनेक लोकांनी दगा देखील दिला आहे तरी देखील ते गरजू व्यक्तीला आर्थिक मदत केल्यावाचून राहत नाही. माझे बाबा टक्केवारीने पैसे देतात असे लोकं म्हणत असतील कदाचित पण याच आर्थिक मदतीमुळे एखाद्याचे भले झालेले पाहून मनाला समाधान देखील होते. कोणाचे भले झाले आणि कोणी कोणी दगा दिला याचा उल्लेख मी करणार नाही. मात्र अनेक लोकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे म्हणून तर फेब्रुवारी 2013 मध्ये सर्पदंश झाल्यावर मृत्यूच्या छायेतून  आम्हांला वाचविता आले. या घटनेला आज साडे सात वर्षे होत आहेत. डॉक्टरांनी देखील वाचण्याचे पन्नास टक्के खात्री दिली होती. त्यामुळे आम्ही सर्व चिंतातुर झालो मात्र अनेक लोकांचे आशीर्वाद त्यांना लाभले आणि हा संकटाचा क्षण पार पडला. सर्वांच्या आशीर्वादामुळे ते आमच्या सोबत आहेत. माझ्या जीवनात त्यांचे अनमोल स्थान आहे. दहावीमध्ये आणि बारावीत चांगल्या मार्काने पास झालो आणि त्यानंतर डी एड साठी ते नेहमी माझ्या पाठीशी होते. मला डी एड करायचे नव्हते मात्र ते यावर ठाम होते. त्यांच्या निर्धारामुळे माझे डी एडचे शिक्षण पूर्ण झाले.  डी एड झाल्यावर शिक्षक म्हणून किनवट तालुक्यात लागलेली नोकरी सोडून देऊन घरी बसलो तेंव्हा मला त्यांनी समजावून सांगितले म्हणून ती नोकरी टिकली आणि मी पुढे गेलो. नाहीतर आज मला नंतर नोकरी लागली नसती असे चित्र दिसले होते. माझे बाबा सर्वांवर नकळत प्रेम करायचे. शहरातून किंवा बाहेरून कोठून येताना ते नेहमी काही ना काही आणत असत. त्यांनी जेवढं आम्हांला केलं तेवढं नातलगांना देखील केलं आहे. 

लोकांना तर चांगल्या माणसात देखील अवगुणच दिसतात, माझ्या बाबामध्ये लोकांच्या दृष्टीने असतील ही काही अवगुण पण माझ्या नजरेत माझे बाबा म्हणजे माझे हिरो आहेत.
धन्यवाद .....!
- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

6 comments:

  1. जेथे दिव्यत्वाची प्रचीती !
    तेथे कर माझी जुळती !!
    गावातील शाळेसाठी नेहमीच दातृत्व दाखविणारे श्री सायन्ना गुरुजी सर्वांसाठी दीपस्तंभ/ हिरो आहेत.

    ReplyDelete
  2. खरा हाडांचे शिक्षक

    ReplyDelete
  3. गुरुजी हा सन्मान मिळणं हीच मुळी एक पावती आहे.ज्ञानदानाचं पुण्य कशाची कमी पडू देत नाही हेच खरं!

    ReplyDelete
  4. खूप छान सर.आपल्या लेखनीमुळे मुळे बाबांचे दर्शन झाले.

    ReplyDelete
  5. दुसऱ्या उताऱ्यात ५-६ ओळीत आजोबा का बाबा?हा संभ्रम निर्माण होत आहे.
    उत्तम!लेखनात आणखी काही प्रसंग,आठवणी उद्धृत करुन लेख वाढविला असता तर छान झाले असते.

    ReplyDelete
  6. पहिले गुरु - आई- बाबा........

    आज आयुष्यात बरेच गुरु आहे, आणि आयुष्याच्या पुढील प्रवासात आणखिन हि गुरु भेटत राहतील. पण योग्य गुरु निवडण्यासाठी लागणारी विचारशक्ती, सद्सदविवेकबुद्धी ज्यांच्या कडून मिळाली ते आई- बाबा. ज्यांनी त्यांच्या संस्कारांनी आम्हाला घडवले, चागल्या वाईट गोष्टी समजण्याची, समाजात वावरण्याचे योग्य संस्कार आमच्यावर केले.
    आई -बाबा

    ReplyDelete

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...