Monday, 29 June 2026

शेख सलीम सर सेवानिवृत्ती ( Retirement of Shaikh Salim Sir )

विद्यार्थी हेच दैवत मानणारे शेख सलीम सर
सेवानिवृत्तीचा हा क्षण आनंदाचा आहे की भावनांनी ओथंबून गेलेला आहे, हे सांगणे जरा कठीण आहे. कारण आज 30 जून रोजी आपण अशा व्यक्तिमत्त्वाला सन्मानपूर्वक निरोप देणार आहोत, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणक्षेत्रासाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी समर्पित केले. ते व्यक्तिमत्त्व म्हणजे आपल्या सर्वांचे आदरणीय शेख सलीम सर.
शिक्षक हा केवळ पाठ्यपुस्तक शिकवणारा नसतो, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा शिल्पकार असतो. या वाक्याचा प्रत्यय सलीम सरांच्या संपूर्ण सेवाकाळात वारंवार आला. मुलांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देणारे, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दडलेली क्षमता ओळखून ती विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे ते खऱ्या अर्थाने हाडाचे शिक्षक होते. प्रत्येक विद्यार्थी यशस्वी व्हावा, आत्मविश्वासाने पुढे जावा आणि उत्तम नागरिक घडावा, नेहमी हीच त्यांची धडपड होती.
शिस्त हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. शाळेची वेळ सुरू होण्यापूर्वी शाळेत उपस्थित राहणे आणि दिवसाचे सर्व काम पूर्ण झाल्यानंतरच सर्वांत शेवटी शाळेतून बाहेर पडणे, ही त्यांची कार्यशैली होती. वेळेचे नियोजन, कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि कामातील सातत्य यामुळे ते सर्व शिक्षकांसाठी प्रेरणास्थान ठरले.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांचा प्रेमळ स्वभाव. विद्यार्थी असो, शिक्षक असो, कर्मचारी असो किंवा पालक प्रत्येकाशी त्यांनी आपुलकीने संवाद साधला. प्रत्येकाची आस्थेवाईकपणे विचारपूस करणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि शक्य ते सहकार्य करणे, ही त्यांची सहज वृत्ती होती. त्यामुळे त्यांनी केवळ सहकारीच नव्हे, तर असंख्य जिवलग मित्र कमावले. आयुष्यात शत्रूपेक्षा मित्र अधिक कमावणारे व्यक्तिमत्त्व हीच त्यांची खरी ओळख आहे.
मुख्याध्यापक म्हणून त्यांनी अत्यंत प्रभावी नेतृत्व केले. प्रशासनात शिस्त, निर्णयांमध्ये पारदर्शकता आणि सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत उल्लेखनीय होती. शाळेच्या प्रगतीसाठी त्यांनी प्रत्येक शिक्षकाला संधी दिली, जबाबदाऱ्या वाटून दिल्या आणि सामूहिक नेतृत्वावर भर दिला. त्यामुळे शाळेचा सर्वांगीण विकास साधता आला. ते ज्या ज्या ठिकाणी सेवा केली आहे तेथे नंदनवन फुलवले आहे. 
पालकांशी त्यांचा असलेला सुसंवादही तितकाच प्रेरणादायी होता. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालक आणि शाळा यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे, हे त्यांनी नेहमीच कृतीतून दाखवून दिले. पालकांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांनी विश्वासाचे नाते निर्माण केले आणि शिक्षण ही सामूहिक जबाबदारी असल्याची भावना दृढ केली. एखादा विद्यार्थी शाळेत अनुपस्थित असेल तर त्यांची समस्या जाणून घेऊन सोडवणूक करण्याची त्यांची खास पद्धत होती. 
शासकीय अधिकारी असोत किंवा विविध विभागातील मान्यवर, प्रत्येकाशी त्यांनी आदरयुक्त आणि समतोल संवाद साधला. कोणत्याही सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत शाळेचे काम वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न कायम राहिला. त्यामुळे शाळेची एक वेगळी ओळख निर्माण झाली.
शिक्षण हे केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित नसते, याची जाणीव त्यांना होती. म्हणूनच विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, विविध उपक्रम आणि सामाजिक कार्यक्रम यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागासाठी नेहमी प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, हा त्यामागील त्यांचा प्रामाणिक हेतू होता. या विविध उपक्रमात ते स्वतः अग्रेसर राहायचे. त्यांचा उत्साह पाहून इतर शिक्षक देखील त्या उपक्रमात हिरीरीने सहभागी होत असत. त्यामुळे त्यांची शाळा नावारूपाला येत असत.
शिक्षक संघटना आणि पतसंस्थेच्या माध्यमातूनही त्यांनी शिक्षकांच्या हितासाठी सातत्याने काम केले. गरज पडेल तेव्हा मदतीचा हात पुढे करणे, सहकाऱ्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, ही त्यांची जपलेली मूल्ये होती. म्हणूनच ते केवळ प्रशासक नव्हते, तर सर्वांचे विश्वासू सहकारी होते.
मराठी भाषेवर त्यांची असलेली उत्कृष्ट पकड हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक उल्लेखनीय पैलू आहे. प्रसंगानुरूप बोलण्याची शैली, विचारांची प्रभावी मांडणी आणि भाषेचा नेमका वापर यामुळे त्यांचे प्रत्येक भाषण व मार्गदर्शन प्रेरणादायी ठरत असे. शब्दांची श्रीमंती आणि विचारांची खोली यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येत होता.
आज ते शासकीय सेवेतून निवृत्त होत असले, तरी त्यांची मूल्ये, कार्यपद्धती, नेतृत्व, माणुसकी आणि शिक्षणाप्रती असलेली निष्ठा आमच्या मनात सदैव जिवंत राहील. त्यांनी घालून दिलेला आदर्श पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, याची आम्हाला खात्री आहे.
जाता जाता शेख सलीम सरांसाठी एक रचना 

 "सर, तुमच्या वाटेवर....."

शाळेच्या त्या प्रत्येक वाटेवर,
आजही तुमची पावले उमटतील.
तुम्ही नसाल उद्या सेवेमध्ये,
तरी आठवणी मात्र सोबत चालतील.

वेळेआधी शाळेत येणारे,
शेवटी कुलूप लावून जाणारे.
कर्तव्याला पूजा मानणारे,
विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे.

मुलांच्या गुणवत्तेचा ध्यास घेत,
ज्ञानदीप सतत प्रज्वलित ठेवला.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशामध्ये,
स्वतःचा आनंद शोधत राहिला.

मुख्याध्यापक नव्हे, खरे मार्गदर्शक,
नेतृत्वाला दिला नवा अर्थ.
प्रेम, विश्वास, माणुसकी आणि शिस्त 
यांनीच सजविला जीवनपथ.

शिक्षक, विद्यार्थी, पालक सारे,
आपलेपणाने जोडत राहिलात.
प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन,
हृदयामध्ये घर करून राहिलात.

विज्ञान असो की सांस्कृतिक मंच,
प्रत्येक ठिकाणी उत्साह भरलात.
संघटना, पतसंस्था, सहकाऱ्यांसाठी,
नेहमी मदतीचा हात पुढे केलात.

मराठी शब्दांना दिली ताकद,
विचारांना दिली सुंदर दिशा.
हसतमुख चेहरा, निर्मळ मन,
हीच तुमच्या जीवनाची भाषा.

मित्रांची श्रीमंती कमावत गेलात,
मनांवर प्रेमाची सही करत गेलात.
सेवा संपली म्हणतात सारे,
पण प्रेरणेचा प्रवास सुरूच ठेवत गेलात.

आज निरोप देताना एवढेच म्हणू,
तुम्ही पदावरून निवृत्त झालात;
पण आमच्या हृदयातून कधीच नाही.
तुमच्या कर्तृत्वाचा सुवास,
आमच्या प्रत्येक पावलात कायम राही.

तुम्ही कालही आमचे प्रेरणास्थान होतात,
तुम्ही आजही आमच्या अभिमानात आहात.
उद्या काळ पुढे सरकेल तरी,
तुम्ही सदैव आमच्या हृदयातच आहात. 🌹

आदरणीय शेख सलीम सर, आपण सेवेतून निवृत्त होत आहात; परंतु आमच्या मनातून कधीही निवृत्त होणार नाही. आपल्या पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, आनंद, समाधान, दीर्घायुष्य आणि कौटुंबिक सुख लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपल्या कर्तृत्वाला मनःपूर्वक सलाम!
आपल्या सेवेला विनम्र अभिवादन!
आणि आपल्या उज्ज्वल, निरामय सेवानिवृत्त जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा!

- नासा येवतीकर, मुख्याध्यापक, 
प्रा. शाळा पिंपळगाव 
ता. धर्माबाद जि. नांदेड 
9423625769

दिनविशेष माहिती - 01 जुलै ( Vasantrao Naik )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 उन्हाळी सुट्टीनंतर आपण सर्वजण नवीन वर्ग आणि नवीन शाळेत आला आहात. होय ना ! 
मी नासा येवतीकर, या वर्षातील पहिल्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आज 01 जुलै अर्थात कृषिदिन त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण हरित क्रांतीचे जनक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

वसंतराव नाईक हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दूरदृष्टीचे नेते होते. त्यांना "महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक" म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या कार्यकाळात शेती, सिंचन आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देऊन महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणले.
वसंतराव नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली या गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव वसंतराव फुलसिंग नाईक असे होते. त्यांचे बालपण ग्रामीण शेतकरी कुटुंबात गेले. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या जवळून पाहता आल्या. त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण करून वकिली व्यवसाय सुरू केला; परंतु समाजसेवेची आवड असल्याने ते राजकारणात आले.
वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासावर विशेष भर दिला.
त्यांच्या कार्यकाळात शेतीच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यांनी आधुनिक शेती पद्धती, सुधारित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आणि सिंचन सुविधा यांचा प्रसार केला. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे कृषी उत्पादनात मोठी वाढ झाली. या योगदानामुळे त्यांना "महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक" असे म्हटले जाते. हरित क्रांती म्हणजे कृषी उत्पादनात झालेली मोठी वाढ.
वसंतराव नाईक यांनी दुष्काळग्रस्त भागांसाठी विशेष उपाययोजना केल्या. त्यांनी जलसंधारण, विहिरी, तलाव आणि सिंचन प्रकल्पांना चालना दिली. शेतकऱ्यांना कर्जसुविधा आणि कृषी शिक्षण उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या धोरणांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळाले. त्यांनी रोजगार हमी योजनेची मुहुर्तमेढ केली. 
शिक्षण क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक शैक्षणिक संस्था सुरू करण्यात आल्या. समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठीही त्यांनी विविध योजना राबवल्या. वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात राज्यात चार कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
वसंतराव नाईक यांचे संपूर्ण जीवन कष्ट, प्रामाणिकपणा आणि जनसेवा यांचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेसाठी आयुष्यभर कार्य केले. आजही त्यांचे कार्य सर्वासाठी प्रेरणादायी आहे.
त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचा सन्मान म्हणून १ जुलै ही त्यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्याचे निर्णय सन १९८९ मध्ये घेण्यात आला.
वसंतराव नाईक यांचे १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे निधन झाले.
वसंतराव नाईक यांच्या जीवनातून परिश्रम, दूरदृष्टी, समाजसेवा आणि नेतृत्वगुण यांचा आदर्श घ्यावा. देशाच्या विकासासाठी शिक्षणाबरोबरच समाजाप्रती जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे, हा संदेश त्यांचे जीवन आपल्याला देते.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न -  वसंतराव नाईक यांचा जन्म केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे, वसंतराव नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली या गावात झाला. 

दुसरा प्रश्न - वसंतराव नाईक हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री होते ?
बरोबर उत्तर आहे, वसंतराव नाईक हे महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री होते. 

तिसरा प्रश्न - हरित क्रांतीचे जनक असे कोणास म्हटले जाते ?
बरोबर उत्तर आहे, वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे जनक असे म्हटले जाते.

चौथा प्रश्न - वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात राज्यात किती कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. ?
बरोबर उत्तर आहे, वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात राज्यात चार कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.

आता शेवटचा पाचवा प्रश्न - वसंतराव नाईक यांची जयंती कोणता दिन म्हणून साजरा केला जातो. ?
बरोबर उत्तर आहे - वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Sunday, 28 June 2026

वटपौर्णिमा ( Vatpournima - 2026)

आधुनिक काळातील महिला आणि वटपौर्णिमा
भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे सण केवळ धार्मिक विधींशी संबंधित नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक मूल्यांचे जतन करणारे असतात. वटपौर्णिमा हा त्यापैकी एक महत्त्वाचा सण आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जाणारा हा सण विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी करतात. पौराणिक कथेनुसार, सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळविले, त्या प्रसंगाच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. परंतु, आधुनिक काळात शिक्षण, विज्ञान, स्त्री-सक्षमीकरण आणि बदलती सामाजिक परिस्थिती यामुळे वटपौर्णिमेकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत आहे.
पूर्वीच्या काळात स्त्रीचे संपूर्ण आयुष्य कुटुंब आणि पतीभोवती केंद्रित होते. तिच्या अस्तित्वाची ओळख बहुधा पत्नी आणि आई या भूमिकांपुरती मर्यादित होती. त्यामुळे वटपौर्णिमेचे व्रत हे तिच्या कर्तव्याचा एक भाग मानले जात असे. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आधुनिक स्त्री ही शिक्षित, स्वावलंबी, आत्मविश्वासपूर्ण आणि निर्णयक्षम झाली आहे. ती केवळ घरापुरती मर्यादित न राहता शिक्षण, उद्योग, प्रशासन, विज्ञान, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहे.
या बदलत्या सामाजिक वास्तवामुळे वटपौर्णिमेच्या स्वरूपात आणि त्यामागील भावनेतही परिवर्तन झाले आहे. आधुनिक स्त्रिया हा सण अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून न पाहता, त्यामागील नातेसंबंधातील प्रेम, विश्वास, निष्ठा आणि परस्पर आदर यांचे प्रतीक म्हणून पाहतात. आज अनेक स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत श्रद्धेने करतात, परंतु त्याचवेळी त्या पती-पत्नी या नात्यात समानतेलाही तितकेच महत्त्व देतात.
आधुनिक समाजात विवाह हा केवळ स्त्रीने पतीसाठी त्याग करण्याचा संबंध नसून, तो परस्पर सहकार्य, सन्मान आणि जबाबदारीवर आधारित असतो. त्यामुळे काही ठिकाणी पतीदेखील पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात किंवा उपवास पाळतात. ही बाब स्त्री-पुरुष समानतेच्या विचाराला बळ देणारी आहे. नात्यातील एकतर्फी त्यागाऐवजी परस्पर समर्पणाची भावना आधुनिक कुटुंबव्यवस्थेची गरज बनली आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात वटपौर्णिमा साजरी करण्याच्या पद्धतीतही बदल झाले आहेत. शहरांमध्ये वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे काही स्त्रिया सामूहिक पूजा, ऑनलाइन पूजा किंवा साध्या स्वरूपात हा सण साजरा करतात. सामाजिक माध्यमांवर शुभेच्छा देणे, पारंपरिक वेशभूषेतील छायाचित्रे शेअर करणे यामुळे या सणाला आधुनिकतेची जोड मिळाली आहे. तथापि, या सणाचे मूळ तत्त्व जपणेही तितकेच आवश्यक आहे.
आजच्या काळात काही जण वटपौर्णिमेसारख्या परंपरांवर टीका करतात. त्यांना हा सण स्त्रीवर अन्याय करणारा किंवा जुनाट वाटतो. परंतु, कोणत्याही परंपरेचे मूल्यमापन करताना तिच्या मूळ उद्देशाचा विचार करणे आवश्यक आहे. जर एखादी स्त्री स्वतःच्या इच्छेने, श्रद्धेने आणि आनंदाने हा सण साजरा करत असेल, तर त्या निवडीचा आदर केला पाहिजे. त्याचप्रमाणे, कोणालाही हा सण साजरा करण्यासाठी बळजबरी करणेही योग्य नाही. आधुनिकतेचा खरा अर्थ परंपरा नाकारणे नसून, विवेकाने त्यांचा स्वीकार करणे हा आहे.
वटपौर्णिमा हा सण आजच्या काळात स्त्रीच्या त्यागाचे नव्हे, तर कुटुंबातील प्रेम, विश्वास, समर्पण आणि सहजीवनाच्या मूल्यांचे प्रतीक म्हणून पाहिला जावा. आधुनिक स्त्री परंपरा आणि प्रगती यांचा समतोल साधत आहे. ती आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगत असतानाच समानता, स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान या मूल्यांनाही जपते. त्यामुळे आधुनिक काळातील वटपौर्णिमा ही केवळ एक धार्मिक परंपरा न राहता, बदलत्या समाजव्यवस्थेत नातेसंबंध अधिक दृढ करणारा आणि भारतीय संस्कृतीचे जतन करणारा एक अर्थपूर्ण सण ठरतो. 

वटपौर्णिमा

वटवृक्षापरी नाते असावे,
प्रेमाने सदैव फुलत राहावे.
विश्वासाच्या मजबूत मुळांनी,
संसार सुखाचा बहरत राहावे.

सावित्रीच्या निष्ठेचा आदर्श,
जीवनाला देतो नवा हर्ष.
त्याग, माया, प्रेम नि समर्पण,
कुंटुंबासाठी जीवन अर्पण.

वटवृक्ष देई शीतल छाया,
जशी कुटुंबाची प्रेमळ माया.
सुख-समृद्धी, आरोग्य लाभो,
प्रत्येक घरात आनंद नांदो.

वटपौर्णिमेच्या या पावन दिनी,
बंध अधिक दृढ होवोत मनी.
सौख्य, समाधान, मंगल क्षणांनी,
जीवन फुलो प्रेमाच्या फुलांनी.

- नासा येवतीकर, 9423625769


सर्व महिला भगिनीना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿🙏

- नासा येवतीकर, स्तंभलेखक, 9423625769

लेखन प्रेरणा दिवस

मुलांनो, चला लिहू या...! "वाचाल तर वाचाल... लिहाल तर घडाल!" आपण रोज बोलतो, हसतो, खेळतो, शिकतो. आपल्या मनात अनेक विचार ...