Friday 10 November 2017

राष्ट्रीय शिक्षण दिन

आज स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती. संपूर्ण भारतात त्यांची जयंती " शिक्षणदिन " म्हणून साजरा केल्या जातो. त्यानिमित्त 

प्राथमिक शिक्षणाविषयी लेखप्रपंच.......
             प्राथमिक शिक्षणाचे महत्व
स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, विद्येविना मति गेली, मतिविना नीती गेली, नितिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, एवढे अनर्थ सारे एका अविद्येने केले. सुमारे दोनशे वर्षा पूर्वी महात्मा फुले यांना शिक्षणाचे महत्त्व पटले होते. शिक्षण हेच समाजाच्या परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे हे लक्षात आले होते म्हणून तर त्यांनी अस्पृश्यासाठी, मुलीसाठी पहिली शाळा काढली. नुसती शाळा काढून थांबले नाहीत तर समाजातील गोरगरीब आणि तळागाळातल्या मुलींना तेथे प्रवेश मिळवून दिला. शाळेत शिकविण्यासाठी कोणी पुढे येत नाहीत हे पाहून स्वतःची पत्नी सवित्राबाई फुले यांना साक्षर करून भारतातील पहिली महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होण्यास प्रोत्साहित केले. सावित्रीबाई फुले शिकल्या त्यामुळे बावनकशी लिहू शकल्या. त्यांनी अनाथाश्रम काढले, वृत्तपत्रे काढली. धर्म जन्माने न मिळता माणसाने स्व:त च्या बुद्धीने स्वीकारला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. शिक्षणामुळे मनुष्याच्या जीवनाचा विकास होतो म्हणून शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे ते म्हणत.
स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षणाकडे एक कटाक्ष टाकले तर लक्षात येईल की त्याकाळी शिक्षण घेणे किती अवघड बाब होती. भारतावर इंग्रजाचे राज्य होते आणि ते लोक फक्त त्यांच्या कामासाठी कारकुन तयार होतील असेच शिक्षण देत होते. सर्वसामान्य लोकासाठी त्यांचे शिक्षण काही कामाचे नव्हते. म्हणून महात्मा फुले यांनी हंटर कमीशन पुढे सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण द्यावे अशी साक्ष दिली. देशात उच्च वर्णीय लोकासाठी फक्त शिक्षण चालु होते. गरीब लोकांसाठी कसलीच व्यवस्था नव्हती. देशात अज्ञानी आणि पारंपारिक अंधश्रधेमध्ये असलेली जनता भरपूर प्रमाणात होती. त्यांच्या वर्तनात आणि वागणुकीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे सारेच समाजसुधारकानी ओळखले म्हणून तर सर्वानी शिक्षणावर जास्तीत जास्त भर दिला. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला तरी म्हणावे तेवढे लोकांनी शिक्षणाकडे वळले नाहीत. लोकांना शिक्षणाचे महत्त्व कळले नव्हते. अति मागास असलेल्या लोकांना विविध प्रकारच्या सोई सुविधा देऊन त्यांचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. सुमारे 60-70 दशकातील शिक्षणाचा विचार केला तर लक्षात येते की गावोगावी प्राथमिक शिक्षणाची देखील सोय नव्हती. उच्च शिक्षण घेणे तर दुरची गोष्ट. ज्याला शिक्षणाची गोडी लागली किंवा महत्त्व कळले असेल ते घरापासून कोसो दूर असलेल्या शाळेत घरदार सोडून शिक्षण घेतले त्यांचे जीवन खरोखरच सफल झाले. त्या काळातील शिक्षण पध्दतीचा विचार केल्यास आज ही अंगावर शहारे येतात. अगदी कडक शिस्तीचे गुरुजी असायचे. कुठल्याच प्रकारची तडजोड त्यांना चालायचे नाही. छडी लागे छम छम चा प्रत्यय त्या काळातील लोकांना आला. आज ही त्या शिक्षकांना पाहिल्यावार मनात आदरयुक्त भीती जाणवत राहते. माझ्या मुलाना का मारलात अशी तक्रार करायला कोणी पुढे येत नसत कारण शाळेत काय घडले हे कोणीही घरी काही सांगत नव्हते. शिक्षकांच्या या भीती पोटी बऱ्याच मुलांचे जीवन सुधारले तर तितक्याच मुलांचे जीवन बरबाद देखील झाले असतील यात शंका नाही. मात्र ज्यांच्या जीवनात या प्रणालीमुळे सुधारणा झाली ते ते यास दोष देणार नाहीत, विसरून चालणार नाही, हे ही खरे आहे. त्याकाळी पालकापेक्षा मुलांना आपल्या शिक्षणाची काळजी जास्त होती. तहान लागलेल्या प्राण्याला विहीर, नदी किंवा तलावापर्यंत नेता येते पण, पाणी पिणे अथवा न पिणे हे सर्वस्वी त्या प्राण्यावर अवलंबून असते. अगदी त्याच प्रकारचे शिक्षणाविषयी बोलता येईल. पालकापेक्षा मुलांना शिक्षणाची गोडी आणि काळजी लागली तरच विकास शक्य आहे अन्यथा सर्व सोयी सुविधा उपलब्ध असुन देखील आज मुलाची शैक्षणिक प्रगती म्हणावी तेवढी दिसत नाही असे का ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युनिसिपाल्टीच्या विद्युत प्रकाशात अभ्यास करून जीवनात एवढे महान कार्य करू शकले. भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री, परमपूज्य साने गुरुजी यासारखी अनेक व्यक्ती आहेत ज्याना शिक्षणामुळे जीवन विकास साधता आले. समाजात आज असे ही चित्र बघायला मिळते की ज्याला कसल्याच प्रकारची सुविधा नाही अशी मुले विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवित आहेत. कारण त्यांना गरीबीचे चटके लागलेले असतात. जेंव्हा जळते तेंव्हाच कळते या म्हणीनुसार अशी मुले रात्रीचा दिवस करून अभ्यास करतात. तर दूसरीकडे आपले पाल्य परीक्षेत यशस्वी व्हावे म्हणून त्याची सर्व प्रकारची सोय करून देखील त्याला कसलेही यश मिळत नाही. उलट यावेळी पेपर खुप अवघड होते. माझे नशिब खराब आहे असे नशिबावर खापर फोडून वर्षभर बाप कमाई वर फिरणारे मुले खरोखर यश मिळवतील काय याबाबत शंकाच आहे.
पूर्वी कुटुंबात एका दाम्पत्याला चार-पाच मुले असायची. त्यामुळे कोणाचे लाड किंवा कोडकौतुक व्ह्ययचे नाही. स्वतःच्या बळावर ही मुले शिकायाची. त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळलेले असायचे. वेळप्रसंगी कमवा आणि शिका या तत्वाचा देखील त्यांनी अवलंब करीत असत. त्यांचे स्वावलंबी जीवन त्यांना जीवनात खुप काही शिकविले आहे. एका घरात दहा-दहा माणसे राहायची. कमवायचे एक हात आणि खायाची दहा तोंडे त्यामुळे घरातील कर्ता पुरुषाना घरातील लेकरां-बाळाच्या शिक्षणाकडे बघण्यास अजिबात वेळ राहत नसे. म्हणून त्यांचे पालकत्व बरोबर नव्हते अशातली बाब नव्हती. पण त्यांचे आस्तित्वच घरातील सर्वाना प्रेरणा देणारी होती. परंतु आज वेगळी परिस्थिती बघायला मिळते. हम दो हमारे दो असे कौटुंबिक चित्र असलेल्या घरात आई-बाबा दोघे पण कमावते झाली आहेत. आजचे कुटुंब खुप सीमित झाले आहे. आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत हे पालक खुप जागरूक झाली आहेत. हवे नको असलेले सर्व काही क्षणात पुरवठा करू शकतात. तरी देखील मुलांची प्रगती म्हणावी तशी का होत नाही. त्याला कारण आहे जास्तीची घेतलेली काळजी. जेंव्हा मुलांना आपण अति संरक्षण किंवा खुप काळजी घेतो तेंव्हा ती मुले एक तर डरपोक होतात किंवा एकलकोंडी होतात. त्यांना स्वातंत्र्य मिळत नाही एखादी बाब करण्याची त्यामुळे ते यांत्रिक पध्दतीतने वागतात. पैश्याची काहीच कमतरता नसते आणि पैश्याच्या जोरावर सर्व काही विकत घेता येऊ शकते अशी धारणा असलेले पालकाना संस्कार नावाची वस्तू बाजारात कुठे मिळते ? याचा पत्ता मात्र मिळत नाही. आजची मुले फक्त आणि फक्त पुस्तकी कीडे बनत चालली आहेत. पालकाना सुध्दा आपली मुले तसेच व्हावीत असे वाटते. असे होताना मात्र ही मुले संस्कारहीन होत आहेत याकडे दुर्लक्ष चालू आहे. पूर्वीच्या एकत्र कुटुंब पध्दतीमध्ये जे नकळत संस्कार पडत होते त्याचा कुठे तरी शोध घेणे आजच्या पालकाना जड जात आहे. विभक्त कुटुंब पध्दत ही क्षणिक सुखाची आणि खुप आकर्षक वाटते मात्र आपल्या समोरील पिढी बरबाद करीत असते याची जाणीव ज्या पालकांत निर्माण होईल ते आपले पालकांची भूमिका निश्चितपणे निभावतील. आजची शिक्षणाची पध्दत पूर्ण बदलून गेली आहे. कारण आज पालक मुलांपेक्षा जास्त जागरूक झाले आहेत. अभ्यासाची गोडी आणि महत्त्व जेवढे पालकाना आहे तेवढे मुलांना नाही त्यामुळे शिक्षणात पालकांची खुप गोची होत आहे. पालक मंडळीनी आपल्या मुलांकड़ून खुप मोठ्या अपेक्षा ठेवल्या आहेत. त्यामुळे आजची मुले खुपच दबावाखाली वावरत असतात. काही दिवसापूर्वी एका मुलाने अभ्यासाचे ओझे सहन न झाल्याने आत्महत्या केल्याची बातमी वाचण्यात आली. हे कश्याचे द्योतक आहे. पूर्वीच्या पालकांत आणि आजच्या पालकांत एकच फरक आहे ते म्हणजे आजचे पालक आपल्या मुलांविषयी खुप स्वप्न बाळगुन आहेत. स्वप्न भंग होऊ नये या काळजी मध्ये मुले वावरत आहेत. जे पालक आपल्या मुलाना कसलाही दबाव ठेवत नाहीत त्यांचीच मुले जीवनात यशस्वी होतात. त्यामुळे पालकानी मुलाना त्यांच्या मनानुसार अभ्यास करू द्यावे आणि आपण फक्त मार्गदर्शकाची भूमिका करणे हेच खरे आपले पालकत्व आहे ,असे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर
( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत )
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

Sunday 5 November 2017

स्कुल चले हम

दिवाळी संपली, शाळा सुरु झाली

दिवाळीच्या सुट्या संपल्या आणि शैक्षणिक वर्षातील दुसऱ्या सत्रास आज प्रारंभ होत आहे. काही जिल्ह्यात महिन्याच्या एक तारखेपासून शाळा सुरु झाल्या आहेत. दिवाळीच्या सुट्यामुळे गेली 15-20 दिवस शाळा आणि त्याच्या परिसरात सुनसान होते. परंतु शाळा सुरु झाल्या आणि परत एकदा मुलांचा किलबिलाट सुरु झालेला आहे. दिवाळीच्या सुट्यात बच्चे कंपनी खुप मजा केली असेल, यात शंकाच नाही. सकाळी ना उठण्याचे टेंशन ना अभ्यास करण्याचे. त्यामुळे या सुट्या संपूच नये असे त्यांना वाटते. मात्र तसे होत नाही. एक ना एक दिवस शाळा सुरु होणारच. या धर्तीवर आज अखेर शाळा सुरु झाल्या. प्रथम सत्रातील भाग सोडून आता दुसऱ्या सत्रातील भाग अध्यापनास सुरुवात होईल. राज्य शासनाकडून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणारी सहामाही चाचणी दिनांक 08 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. त्यानुसार शाळा सुरु झाल्याबरोबर शिक्षक आणि विद्यार्थ्याना या संकलित मूल्यमापन चाचणीला तोंड द्यावे लागणार आहे, तसे तर वर्षभर शिक्षक आणि विद्यार्थी वेगवेगळ्या समस्याना तोंड देतच असतात.
एका वर्षात 365 दिवस असतात आणि वर्षभरात शाळेचे कामकाज 238 ते 241 दिवस चालतात. याचाच अर्थ 125 दिवस जवळपास सुट्या म्हणजे सर्वसाधारणपणे तीन महिन्याचा काळ सुट्यात जातो. अर्थात या सुट्या विद्यार्थ्यासोबत शिक्षकांना देखील असतात. साधारणपणे दररोज घड्याळी साडेचार ते पाच तास या सरासरी वेळाप्रमाणे शाळेत अध्ययन आणि अध्यापनांची प्रक्रिया चालते. मुलांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात काही गोष्टीचा अंतर्भाव करता येईल काय ? त्या अनुषंगाने विचार होणे आवश्यक आहे. राज्यातून ज्या विषयाच्या बाबतीत असंख्य तक्रारी मांडल्या जातात त्याविषयी गांभीर्याने विचार करून त्यात वेळीच सुधारणा केल्यास तक्रारीचा पाऊस कमी होईल. काही सुधारणा करणे अत्यावश्यक असल्यास त्या बाबतीत जनमत घेऊन नविन योजना तयार करणे गरजेचे वाटते.
कवी केशवसुत आपल्या तुतारी कवितेत असे म्हणतात की, " जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका " या ओळीचा अर्थ लक्षात घेऊन गेल्या कित्येक वर्षापासून जे नियम आणि पद्धतीने शाळा चालू आहेत त्यात थोडा बदल किंवा सुधारणा करणे अत्यावश्यक वाटते. शाळेचे कार्यदिन तेवढेच असतील आणि शाळेचा वेळ सुध्दा तेवढाच ठेवून भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण लक्षात घेऊन हा बदल शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी फायदेशीर होऊ शकतो का याचा विचार आवश्यक आहे. सध्याच्या प्रचलित पध्दतीनुसार दिवाळीपूर्वी 120 दिवस आणि दिवाळीनंतर 120 दिवस सरासरी अशी शाळा चालते. त्यात महिनावार कामकाजांचा आढावा घेतल्यास दिसून येईल की, शाळा किती कठीण परिस्थितीमध्ये चालविली जाते. शैक्षणिक वर्षाची सुरुवात जून महिन्याच्या मध्यातून म्हणजे 15 जूनपासून सुरु होते. यात विद्यार्थी प्रवेश आणि निर्गम करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर करावे लागते. त्यामुळे मुलांची मागील वर्षाची उजळणी केल्या जाते. जुलै महिन्यात अभ्याक्रमास सुरुवात केली जाते. नव्याचे नऊ दिवस या म्हणीप्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थी अध्यापन आणि अध्ययन प्रक्रियेत मोठ्या जोमात आणि उत्साहात सहभागी होतात. ऑगस्ट महिना स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाने गजबजलेला असतो. सप्टेंबर महिन्यात श्रीगणेशाची स्थापना होते व शाळेतील मुलांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवू लागते. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये नवरात्राची रेलचेल त्यामुळे देखील मुले शाळेत कमी आणि बाहेर जास्त दिसून येतात. जवळपास नोव्हेंबर महिना संपूर्ण दिवाळी सुट्यात संपतो. परत एकदा डिसेंबर महिना सुट्यानंतरचा काळ म्हणून चांगला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या तयारीमध्ये संपूर्ण जानेवारी उलटून जातो. फेब्रुवारी महिन्यात सुट्या जवळ येत असल्याची चाहुल लागते. उन्हाची तीव्रता वाढत जाते. त्यामुळे मुले वर्गात बसताना हाश-हुश करतात. त्यांचे अभ्यासाकडे लक्ष फार कमी असते. उन्हाच्या घामाघूमीत मार्च कधी संपतो असे वाटते. एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा असतात, ज्याची सर्व मुलांना प्रतीक्षा असते. या महिन्यात मुले शाळेत बसण्याच्या तयारीत देखील नसतात मुळी मात्र परीक्षा द्यावे लागते म्हणून वाट पाहतात. परीक्षा घेतली की मुलांना अघोषित सुट्टी असते. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 01 मे रोजी झाल्यामुळे महाराष्ट्र दिन साजरा झाल्यानंतर अधिकृत सुट्टीची घोषणा केली जाते. वास्तविक पाहता या महिन्यात अध्यापन-अध्ययन ही क्रियाच होत नाही ; परंतु 01 मे महाराष्ट्र दिनासाठी शाळेची कालमर्यादा वाढविण्यात येते. मात्र यात कोणी बदल करण्याचे साहस करीत नाहीत किंवा तसा बदल करता येऊ शकतो काय यावर विचार विनिमय देखील होत नाही. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सोइस्कर बदल स्वीकार्य असेलच.
सध्याच्या या प्रचलित पध्दती मध्ये थोडा फार बदल केल्यास सर्वांच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. जून महिन्यात पूर्वी जशी शाळा सुरु होतात त्यात काही बदल नसावा, ते योग्य आहे. मात्र दिवाळीचे जे तीन आठवडे सुट्टी दिली जाते, त्यात बदल करून फक्त दहा दिवस सुट्टी देण्यात यावी आणि उरलेले सुट्टी हे उन्हाळी सुट्या जे की महाराष्ट्र दिनापासून दिली जाते ते 20 एप्रिलपासून देण्यात यावी. यामुळे सुट्या कमी होण्याच्या प्रश्न येणार नाही. वास्तविक एप्रिल महिन्यात वातावरणात खुप उष्ण असते. त्याचा त्रास पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना होतो ; परंतु याच काळात सुट्या दिल्यास सर्वाचा त्रास कमी होईल. राहिला प्रश्न महाराष्ट्र दिनाचा, तर त्या दिवशी झेंडावंदन प्रचलित नियमानुसार करण्यात यावे. या पध्दतीचा खराखुरा अभ्यास करायचे असेल तर शेजारच्या तेलंगणा किंवा आंध्रप्रदेश राज्याचा करता येईल. त्या ठिकाणी याच पध्दतीने शाळा भरविले जातात. सुट्यामध्ये कसल्याच प्रकारचे बदल नाही त्यामुळे यास विरोध देखील कमी होईल असे वाटते.
पूर्णवेळ शाळा ज्या ठिकाणी भरविली जाते तेथे सकाळची वेळ मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न होते. मात्र दुपारची वेळ कंटाळवाणे वाटते, असे चित्र बहुतांश शाळातून बघायला मिळते. त्यानंतर दप्तराचे ओझे सुध्दा कमी करायचे मोठे संकट शाळेसमोर आहे. त्या अनुषंगाने जर उपाय योजना केल्यास विद्यार्थ्यामध्ये शाळेचे आकर्षण वाढेल. एक उपाय म्हणजे एका दिवशी एक विषय घ्यावे. सकाळच्या सत्रांत अध्यापन आणि दुपारच्या सत्रांत त्यावर आधारित स्वाध्याय, गृहकार्य पूर्ण करणे असे काम केल्यामुळे दप्तराचे वजन कमी होईल आणि दिवसभर त्या विषयाचा सखोल अभ्यास करता येईल. त्याचबरोबर शिकविलेल्या भागावर प्रश्न उत्तरे लेखन केल्यास त्याचे आकलन देखील होईल. ज्या पध्दतीने सरकार विद्यार्थ्याना क्रमिक पुस्तके देते, त्याच धर्तीवर संपूर्ण वर्षाचे विषयनिहाय नियोजन करून वार्षिक आराखडा दिल्यास संपूर्ण महाराष्ट्रात एकाच पध्दतीत अध्यापन करता येईल. शिवाय वार्षिक आराखडा पुस्तक रुपात योग्य मार्गदर्शनासह उपलब्ध झाल्यास शिक्षकांना शिकविणे सोपे आणि तेच पुस्तक पालकापर्यंत पोहोचले तर खुपच चांगले. ही प्रायोगिक तत्वावर मांडलेली कल्पना आहे. दिवाळीच्या सुट्यात शेजारच्या राज्यात असे चित्र बघायला मिळते आणि विद्यार्थ्याची प्रगती देखील म्हणून हा एवढा लेख प्रपंच. दुसऱ्या सत्राच्या पहिल्या दिवसाचे शिक्षक आणि विद्यार्थ्याना खूप-खूप शुभेच्छा ...!

- नागोराव सा. येवतीकर
( लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत )
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...