मुलांनो, चला लिहू या...!
"वाचाल तर वाचाल... लिहाल तर घडाल!"
आपण रोज बोलतो, हसतो, खेळतो, शिकतो. आपल्या मनात अनेक विचार येतात. कधी आनंदाचे क्षण असतात, तर कधी दुःखाचे. कधी निसर्ग आपल्याला मोहून टाकतो, तर कधी एखादी घटना मनाला स्पर्श करून जाते. पण हे सारे विचार आपण शब्दांत मांडतो का ? जे शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतात ते लेखक आणि कवी बनतात. मग आपण ही लेखक आणि कवी बनू शकतो का ? यावर कधी विचार केला आहे काय ? नाही ना ? चला, आजपासून आपण लिहायला सुरुवात करू या !
लेखन म्हणजे फक्त परीक्षेतील उत्तरपत्रिका भरणे नाही. परीक्षेतील प्रश्नाच्या उत्तराचे लेखन करणे म्हणजे लेखन नव्हे. लेखन म्हणजे आपल्या मनातील भावना, कल्पना, अनुभव आणि स्वप्ने शब्दांत व्यक्त करण्याची सुंदर कला आहे. जो विद्यार्थी लिहितो, तो अधिक विचार करतो. जो विचार करतो, तो अधिक समजून घेतो. आणि जो समजून घेतो, तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो.
आपल्या हातात पेन किंवा पेन्सिल असते; पण त्या छोट्याशा लेखणीत आपल्या भविष्याचा प्रकाश दडलेला असतो. एक सुंदर शब्द, एक प्रभावी वाक्य, एक छोटी कविता किंवा एखादा अनुभव यातूनच मोठे लेखक, विचारवंत आणि समाजाला दिशा देणारी माणसे घडतात.
आपण रोज खूप काही पाहतो, ऐकतो आणि आणि अनुभवतो. पावसाचे थेंब, पक्ष्यांचा किलबिलाट, शाळेतील गमती-जमती, आईची माया, मित्रांची साथ, शिक्षकांचे मार्गदर्शन, आपल्या गावातील माणसे, निसर्गाचे सौंदर्य हे सारे आपल्या मनात साठत असते. पण या अनुभवांना शब्द मिळाले, तर तेच साहित्य बनते. म्हणूनच लेखन म्हणजे मनातील विचारांना शब्दांचे सुंदर पंख देण्याची कला होय.
आपल्या मनात कायम एक प्रश्न पडतो चांगले लिहायचे कसे ? तर याचे उत्तर आहे वाचन !
जसा मजबूत पाया असेल तशी इमारत भक्कम उभी राहते, तसाच भरपूर वाचनाचा पाया असेल तर लेखन अधिक सुंदर, समृद्ध आणि प्रभावी होते. वाचनामुळे नवीन शब्द मिळतात, भाषेची समज वाढते, कल्पनाशक्ती विकसित होते, विचारांना दिशा मिळते आणि अभिव्यक्ती अधिक परिणामकारक बनते. म्हणूनच वाचन आणि लेखन ही एका रथाची दोन चाके आहेत. एकाशिवाय दुसरे अपूर्ण आहे. कोणताही महान व्यक्ती एका कवितेतून किंवा एका लेखातून घडला नाही. त्यासाठी सातत्यपणे वाचन आणि लेखन दोन्ही महत्वाचे आहेत.
आपल्या मराठीतील अनेक थोर साहित्यिक याच मार्गाने घडले. साने गुरुजी यांनी प्रेम, करुणा आणि संस्कार शब्दबद्ध केले. कुसुमाग्रज यांच्या कवितांनी समाजाला नवी चेतना दिली. पु. ल. देशपांडे यांनी विनोदातून माणुसकीचा संदेश दिला. वि. स. खांडेकर, ग. दि. माडगूळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी तर फक्त दीड दिवस शाळेत गेले तरीही ते महान लेखक व लोकशाहीर झाले. कारण त्यांनी आपले अनुभव शब्दात मांडले. कष्टकरी लोकांच्या समस्या त्यांनी जसे पाहिले, जसे अनुभवले तसे ते शब्दात मांडले. म्हणूनच त्यांचे नाव साहित्य विश्वात जगभर पोहोचले. सर्व साहित्यिकांनी सातत्याने वाचन केले, जीवन अनुभवले आणि अखंड लेखन केले. म्हणूनच त्यांचे साहित्य आजही आपल्याला प्रेरणा देते.
जगातील महान लेखकही असेच घडले. त्यांनी भरपूर वाचन केले, जगाकडे जिज्ञासेने पाहिले आणि नियमित लिहित राहिले. लेखक जन्माला येत नाही; तो सातत्यपूर्ण वाचन, चिंतन आणि लेखनातून घडत असतो.
मुलांनो, लेखन केल्याने फक्त वही भरत नाही, तर मन समृद्ध होते. लिहिणारा विद्यार्थी निरीक्षक बनतो. तो प्रश्न विचारतो, विचार करतो, स्वतःचे मत मांडतो आणि आपल्या भावनांना योग्य शब्द देऊ लागतो. लेखन आत्मविश्वास वाढवते, भाषेवर प्रभुत्व मिळवून देते आणि व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनवते.
सुरुवातीला मोठे निबंध किंवा कविता लिहिण्याची गरज नाही. दररोज फक्त काही ओळी लिहा. आज शाळेत काय घडले ? पाऊस कसा वाटला ? आईबद्दल, मित्राबद्दल, झाडाबद्दल, शिक्षकांबद्दल किंवा आपल्या गावाबद्दल लिहा. एखादी छोटी कविता करा, गोष्ट लिहा किंवा एखादा सुंदर विचार वहीत नोंदवा. प्रत्येक दिवसाचे लेखन तुमच्या प्रगतीची साक्ष देईल. रोज काही ना काही नवीन लिहिण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला रोज काही तरी नवीन सुचत जाते. चुका झाल्या तरी घाबरू नका. चुका म्हणजे शिकण्याची पहिली पायरी असते. प्रत्येक नवीन लेखन तुम्हाला कालपेक्षा अधिक सक्षम बनवत असते.
आज मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात अनेक जण फक्त पाहतात आणि वाचतात; पण स्वतः काही लिहित नाहीत. तुम्ही मात्र वेगळे बना. फक्त माहितीचे ग्राहक बनू नका, तर विचारांचे निर्माते बना. तुमच्या लेखणीत समाज बदलण्याची ताकद आहे.
चला, आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती लेखन प्रेरणा दिवस म्हणून साजरा होत आहे, त्यानिमित्ताने एक छोटा संकल्प करूया, "मी दररोज काहीतरी वाचेन, दररोज काहीतरी लिहीन, नवीन शब्द शिकेन, सुंदर विचार मांडेन, लेखणीला माझा मित्र बनवेन, आणि उत्तम लेखक होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीन."
तेव्हा मुलांनो, चला लिहू या...! कारण आज वहीत लिहिलेला प्रत्येक शब्द, उद्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया ठरणार आहे.
आजची छोटी लेखणी, उद्याचा मोठा लेखक घडवू शकते. वाचू या... विचार करू या... आणि मनापासून लिहू या ! कारण शब्द बदलतात मन, आणि मन बदलते जग.
- नासा येवतीकर, धर्माबाद