Sunday, 28 June 2026

वटपौर्णिमा ( Vatpournima - 2026)

आधुनिक काळातील महिला आणि वटपौर्णिमा
भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे सण केवळ धार्मिक विधींशी संबंधित नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक मूल्यांचे जतन करणारे असतात. वटपौर्णिमा हा त्यापैकी एक महत्त्वाचा सण आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जाणारा हा सण विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी करतात. पौराणिक कथेनुसार, सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळविले, त्या प्रसंगाच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. परंतु, आधुनिक काळात शिक्षण, विज्ञान, स्त्री-सक्षमीकरण आणि बदलती सामाजिक परिस्थिती यामुळे वटपौर्णिमेकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत आहे.
पूर्वीच्या काळात स्त्रीचे संपूर्ण आयुष्य कुटुंब आणि पतीभोवती केंद्रित होते. तिच्या अस्तित्वाची ओळख बहुधा पत्नी आणि आई या भूमिकांपुरती मर्यादित होती. त्यामुळे वटपौर्णिमेचे व्रत हे तिच्या कर्तव्याचा एक भाग मानले जात असे. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आधुनिक स्त्री ही शिक्षित, स्वावलंबी, आत्मविश्वासपूर्ण आणि निर्णयक्षम झाली आहे. ती केवळ घरापुरती मर्यादित न राहता शिक्षण, उद्योग, प्रशासन, विज्ञान, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहे.
या बदलत्या सामाजिक वास्तवामुळे वटपौर्णिमेच्या स्वरूपात आणि त्यामागील भावनेतही परिवर्तन झाले आहे. आधुनिक स्त्रिया हा सण अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून न पाहता, त्यामागील नातेसंबंधातील प्रेम, विश्वास, निष्ठा आणि परस्पर आदर यांचे प्रतीक म्हणून पाहतात. आज अनेक स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत श्रद्धेने करतात, परंतु त्याचवेळी त्या पती-पत्नी या नात्यात समानतेलाही तितकेच महत्त्व देतात.
आधुनिक समाजात विवाह हा केवळ स्त्रीने पतीसाठी त्याग करण्याचा संबंध नसून, तो परस्पर सहकार्य, सन्मान आणि जबाबदारीवर आधारित असतो. त्यामुळे काही ठिकाणी पतीदेखील पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात किंवा उपवास पाळतात. ही बाब स्त्री-पुरुष समानतेच्या विचाराला बळ देणारी आहे. नात्यातील एकतर्फी त्यागाऐवजी परस्पर समर्पणाची भावना आधुनिक कुटुंबव्यवस्थेची गरज बनली आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात वटपौर्णिमा साजरी करण्याच्या पद्धतीतही बदल झाले आहेत. शहरांमध्ये वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे काही स्त्रिया सामूहिक पूजा, ऑनलाइन पूजा किंवा साध्या स्वरूपात हा सण साजरा करतात. सामाजिक माध्यमांवर शुभेच्छा देणे, पारंपरिक वेशभूषेतील छायाचित्रे शेअर करणे यामुळे या सणाला आधुनिकतेची जोड मिळाली आहे. तथापि, या सणाचे मूळ तत्त्व जपणेही तितकेच आवश्यक आहे.
आजच्या काळात काही जण वटपौर्णिमेसारख्या परंपरांवर टीका करतात. त्यांना हा सण स्त्रीवर अन्याय करणारा किंवा जुनाट वाटतो. परंतु, कोणत्याही परंपरेचे मूल्यमापन करताना तिच्या मूळ उद्देशाचा विचार करणे आवश्यक आहे. जर एखादी स्त्री स्वतःच्या इच्छेने, श्रद्धेने आणि आनंदाने हा सण साजरा करत असेल, तर त्या निवडीचा आदर केला पाहिजे. त्याचप्रमाणे, कोणालाही हा सण साजरा करण्यासाठी बळजबरी करणेही योग्य नाही. आधुनिकतेचा खरा अर्थ परंपरा नाकारणे नसून, विवेकाने त्यांचा स्वीकार करणे हा आहे.

वटपौर्णिमा हा सण आजच्या काळात स्त्रीच्या त्यागाचे नव्हे, तर कुटुंबातील प्रेम, विश्वास, समर्पण आणि सहजीवनाच्या मूल्यांचे प्रतीक म्हणून पाहिला जावा. आधुनिक स्त्री परंपरा आणि प्रगती यांचा समतोल साधत आहे. ती आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगत असतानाच समानता, स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान या मूल्यांनाही जपते. त्यामुळे आधुनिक काळातील वटपौर्णिमा ही केवळ एक धार्मिक परंपरा न राहता, बदलत्या समाजव्यवस्थेत नातेसंबंध अधिक दृढ करणारा आणि भारतीय संस्कृतीचे जतन करणारा एक अर्थपूर्ण सण ठरतो. सर्व महिला भगिनीना वटपौर्णिमा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा ......!

- नासा येवतीकर, स्तंभलेखक, 9423625769

Thursday, 25 June 2026

विजेचा शॉक की रॉक ? ( Light Bill )

विजेचा शॉक की रॉक ?
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि अर्थकारणात वीज हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. उद्योग, शेती, व्यापार आणि सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन हे विजेवर अवलंबून असल्याने वीजदरांमध्ये होणारे बदल थेट जनतेच्या खिशावर परिणाम करतात. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेले विधान विशेष लक्षवेधी ठरले आहे. पुढील दोन वर्षांत महाराष्ट्रातील वीज गुजरातपेक्षाही स्वस्त करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली. या घोषणेनंतर अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, हा विजेचा "शॉक" आहे की खरोखरच "रॉक" ठरणारा निर्णय ?
सध्या तामिळनाडू व तेलंगणा राज्यात विजेचा दर 9.30 ₹, मध्यप्रदेश 8.27 ₹ त्यानंतर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात विजेचा दर 8.19 ₹ प्रति युनिट असा आहे. तर गुजरातचा प्रति युनिट दर 7.87 ₹ असा आहे. गुजरात राज्य हे उद्योगधंद्यांसाठी पोषक वातावरण, पायाभूत सुविधा आणि तुलनेने कमी वीजदर यासाठी ओळखले जाते. अनेक उद्योगपती गुजरातकडे आकर्षित होण्यामागे स्वस्त आणि सातत्यपूर्ण वीजपुरवठा हे एक महत्त्वाचे कारण मानले जाते. त्यामुळे महाराष्ट्राची वीज गुजरातपेक्षा स्वस्त करण्याचे लक्ष्य निश्चितच महत्त्वाकांक्षी आहे. जर हे लक्ष्य साध्य झाले, तर राज्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळू शकते.
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्यांपैकी एक आहे. मात्र, वाढती वीज मागणी, उत्पादन खर्च, वितरणातील तांत्रिक तोटा आणि आर्थिक अडचणी यामुळे वीजदरांवर दबाव निर्माण होत असतो. अनेकदा उद्योग क्षेत्राने महाराष्ट्रातील तुलनेने जास्त वीजदरांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अशा वेळी सरकारची ही घोषणा उद्योगांसाठी आशेचा किरण ठरू शकते.
वीज स्वस्त झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा उद्योग क्षेत्राला होईल. उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे उद्योग अधिक स्पर्धात्मक बनतील. नवीन गुंतवणूक आकर्षित होईल आणि रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल. "मेक इन महाराष्ट्र" या संकल्पनेला बळकटी मिळू शकते. याशिवाय लघु व मध्यम उद्योगांनाही आर्थिक दिलासा मिळेल.
शेती क्षेत्रासाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. आजही अनेक शेतकरी सिंचनासाठी विजेवर अवलंबून आहेत. वीजदर कमी झाल्यास शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढण्यास मदत होईल. ग्रामीण भागातील आर्थिक चक्र अधिक गतिमान होऊ शकते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी हा एक सकारात्मक टप्पा ठरू शकतो.
सर्वसामान्य ग्राहकांसाठीदेखील स्वस्त वीज ही दिलासादायक बाब असेल. घरगुती वीजबिलांवरील भार कमी झाल्यास कुटुंबांच्या मासिक खर्चात बचत होऊ शकते. महागाईच्या काळात ही बचत नागरिकांसाठी महत्त्वाची ठरेल. त्यामुळे सरकारच्या या घोषणेकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
मात्र, कोणतीही घोषणा प्रत्यक्षात उतरवणे हे मोठे आव्हान असते. वीज स्वस्त करण्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे, नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढवणे, वितरणातील नुकसान कमी करणे आणि आर्थिक व्यवस्थापन सुधारणे आवश्यक आहे. केवळ घोषणा करून अपेक्षित परिणाम साध्य होणार नाहीत. त्यासाठी दीर्घकालीन नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे.
सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि इतर हरित ऊर्जास्रोतांचा वापर वाढविणे हा या दिशेने महत्त्वाचा उपाय ठरू शकतो. महाराष्ट्रात नवीकरणीय ऊर्जेच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील गुंतवणूक वाढल्यास वीज उत्पादनाचा खर्च कमी होऊ शकतो. तसेच पर्यावरणपूरक विकासालाही चालना मिळेल. शेतीला दिवसा वीज पुरवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या 'सौर कृषिपंप' कुसुम योजनेत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात तब्बल १० लाखांपेक्षा जास्त सौर कृषिपंप बसवण्यात आले असून, देशातील एकूण सौर कृषिपंपांपैकी ६४ टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. घरांवर सोलर पॅनेल बसवण्याच्या 'पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजने'तही महाराष्ट्र आघाडीवर असून, छतावरील प्रकल्प बसवण्याच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
स्थापित एकूण सौर ऊर्जा क्षमतेचा विचार करता महाराष्ट्र देशात ५ व्या क्रमांकावर आहे, ज्याची क्षमता आता ८,४०० मेगावॅटहून अधिक झाली आहे.
सरकारच्या या घोषणेकडे विरोधक आणि तज्ज्ञही बारकाईने पाहत आहेत. काहीजण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असले, तरी काहींनी याची व्यवहार्यता आणि आर्थिक परिणाम याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षांत सरकार कोणती ठोस पावले उचलते, यावर या योजनेचे यश अवलंबून असेल.
"विजेचा शॉक की रॉक?" या प्रश्नाचे उत्तर आजच देणे कठीण आहे. जर सरकारने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरवून महाराष्ट्रातील वीजदर गुजरातपेक्षाही कमी केले, तर हा निर्णय निश्चितच "रॉक" ठरेल. उद्योग, शेती आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी तो विकासाचा नवा अध्याय लिहू शकतो. मात्र, अपेक्षा आणि वास्तव यांच्यातील अंतर भरून काढण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, पारदर्शक धोरणे आणि प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे.
शेवटी, स्वस्त वीज ही केवळ आर्थिक बाब नसून ती विकासाची गुरुकिल्ली आहे. महाराष्ट्राला अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि प्रगत बनविण्यासाठी वीज क्षेत्रातील सुधारणा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही घोषणा आगामी काळात महाराष्ट्रासाठी "शॉक" नव्हे तर "रॉक" ठरते का, याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

( काही आकडे नेट वरून घेण्यात आली आहेत. )

- नासा येवतीकर, स्तंभलेखक
धर्माबाद जि. नांदेड 9423625769

Wednesday, 24 June 2026

बालविवाह : एक सामाजिक समस्या ( Stop Child Marriage )

बालविवाह : एक सामाजिक समस्या
भारतीय समाजात विवाह ही एक महत्त्वाची सामाजिक संस्था मानली जाते. विवाहामुळे दोन व्यक्तींबरोबरच दोन कुटुंबांचेही नाते दृढ होते. मात्र विवाहासाठी योग्य वय असणे अत्यंत आवश्यक आहे. अल्पवयीन मुलगा किंवा मुलीचा विवाह लावून देण्याच्या प्रथेला बालविवाह असे म्हणतात. भारतातील कायद्यानुसार मुलीचे विवाहाचे किमान वय १८ वर्षे आणि मुलाचे २१ वर्षे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात होणारा विवाह हा बालविवाह मानला जातो आणि तो कायद्याने गुन्हा आहे.
आज विज्ञान, शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या युगातही बालविवाहाची समस्या पूर्णपणे नष्ट झालेली नाही. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असल्याचे अलीकडील अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन ठेवला आहे. हा निर्णय बालविवाह रोखण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
समाजात बालविवाहामागे अनेक सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत. लोकांचा अशिक्षितपणा आणि अज्ञान - ग्रामीण तसेच शहराच्या काही भागांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्यामुळे पालकांना बालविवाहाचे दुष्परिणाम माहिती नसतात. त्यामुळे ते परंपरेच्या नावाखाली मुला-मुलींचे लवकर लग्न करतात.
दुसरे एक कारण म्हणजे गरीबी. गरीब कुटुंबांना मुलीचा सांभाळ हा आर्थिक भार वाटतो. त्यामुळे लहान वयातच तिचे लग्न करून जबाबदारी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. मुलींचे वय वाढत जाते तसे पालकांची चिंता वाढत जाते. 
तिसरे महत्वाचे कारण म्हणजे सामाजिक परंपरा आणि रूढी पद्धत. काही समाजांमध्ये बालविवाह ही जुनी परंपरा मानली जाते. समाजाच्या दबावामुळे अनेक कुटुंबे या प्रथेला अनुसरतात. प्रथा मोडली तर काही कोप होईल आणि आपल्या कुटुंबाला त्याचा त्रास सोसावा लागेल अंधश्रद्धेच्या पोटी अशी अनामिक भीती त्यांच्या मनात असते. त्यामुळे ते बालविवाहाला बळी पडतात.
सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मुलींच्या सुरक्षिततेची चिंता होय. मुलींच्या सुरक्षेबाबत असलेली भीती आणि सामाजिक असुरक्षितता यामुळे काही पालक लवकर विवाह करण्यास प्राधान्य देतात. आज समाजात मुलींच्या बाबतीत ज्या काही घटना घडत आहेत. त्यामुळे मुली स्वतःला असुरक्षित जाणवत आहेत. तर मुलींच्या वडीलाना काळजी आणि भीती वाटत आहे. मुलींचे लवकरात लवकर लग्न करून जबाबदारीमधून मुक्त होण्यासाठी धावपळ करताना दिसून येतात. मुलीच्या बापाचे काळीज काय असते ? हे त्याच्या जन्माला गेल्यावरच कळते हे ही सत्य आहे. 
जनतेला कायद्याविषयी अपुरी माहिती असणे हे ही एक महत्वाचे कारण दिसून येते. समाजात बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती नसल्याने अनेक ठिकाणी अजूनही बालविवाह घडताना दिसतात. बालविवाह केल्याने कायद्यानुसार कोणती शिक्षा होते याची माहिती लोकांना नाही कारण या कायद्याखाली अटक झालेल्याची व शिक्षा झालेल्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी कमी आहे. 
बालविवाहाचे परिणाम मुलांवर कमी पण मुलीवर मोठ्या प्रमाणात दिसून येतात. बालविवाहाचे दुष्परिणाम केवळ मुलीवरच नव्हे तर संपूर्ण समाजावर होतात. सर्वप्रथम मुलींच्या शिक्षणात खंड पडतो. बालविवाह झालेल्या मुलींना अनेकदा शिक्षण अर्धवट सोडावे लागते. काही मुली आपले माध्यमिक शिक्षण देखील पुर्ण करत नाहीत. त्यापूर्वीच त्यांचे लग्न केल्या जाते. त्यामुळे त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाचे मार्ग बंद होतात.
लहान वयात लग्न केल्यामुळे मुलींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. लहान वयात गर्भधारणा झाल्यास माता व बालक दोघांच्याही आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कुपोषण, रक्तक्षय आणि प्रसूतीतील गुंतागुंत यांचा धोका वाढतो. शिक्षण घेण्याच्या वयात मुलगी माता होते आणि विशीच्या घरात तिचे आयुष्य संपूष्टात येते. तिचे स्वप्नांना पंख फुटण्याच्या अगोदरच लग्न या विधीमुळे पंख कापले जातात. ती आयुष्यात गुलामगिरीत जीवन जगते. यामुळे ती नेहमी मानसिक ताणतणाव मध्ये जीवन जगत असते. बालपणातच वैवाहिक जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागल्यामुळे मुली मानसिकदृष्ट्या तणावग्रस्त होतात. त्यांचे बालपण हरवून जाते. प्रत्येकाचा विकास हा फक्त शिक्षणामुळे होतो. पण मुलींचे शिक्षण अर्धवट राहत असल्याने ते कधीच प्रगल्भ होत नाहीत. त्यामुळे घरात त्यांना दुय्यम स्थान दिल्या जाते. घरातील ती एक शोभेची वस्तू बनून जाते. शिक्षण नसल्याने तिच्या बुद्धीचा म्हणावा तेवढा विकास होत नाही. ती स्वतः काही निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून तिच्याकडे आर्थिक स्वावलंबनाचा अभाव असतो. शिक्षण पूर्ण न झाल्यामुळे रोजगाराच्या संधी कमी होतात. परिणामी त्या आर्थिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून राहतात. जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला असे समर्थ रामदास स्वामी म्हटले आहे, तशी त्यांची अवस्था होते. त्यामुळे गरिबीचे चक्र कायम त्यांच्या भोंवती फिरत असते. शिक्षणाचा अभाव, कमी उत्पन्न आणि मोठे कुटुंब यामुळे गरिबीचे चक्र पुढील पिढीतही कायम राहते. 
या नव्या कायद्यामुळे काय होईल ?
महाराष्ट्र शासन लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याचा विचार करत आहे. हा नियम लागू झाल्यास अनेक सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात.
विवाहापूर्वी वधू-वराचे वय सर्वाना सहज तपासता येईल. त्यामुळे कोणालाही बालविवाह लपविणे कठीण होईल. तसेच प्रशासनाला संशयास्पद विवाहांवर लक्ष ठेवणे सोपे जाईल. पालक आणि समाजामध्ये कायद्याबद्दल जागरूकता वाढण्यास मदत होईल. समाजातील बालविवाह होण्याचे प्रमाण काही अंशी तरी कमी होण्यास मदत होईल. मुलींना आपले उच्च माध्यमिक शिक्षण तरी पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ आणि संधी मिळेल.
मात्र हा नियम केवळ कायदेशीर नियंत्रणासाठी नसावा तर समाजामध्ये जबाबदारीची भावना निर्माण करणारा ठरला तर अधिक चांगले होईल. बालविवाह पूर्णपणे थांबविण्यासाठी केवळ कायदा पुरेसा नाही. त्यासाठी प्रभावी जनजागृती आणि सामाजिक सहभागाची आवश्यकता आहे.
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जागरूकता कार्यक्रम घेऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना बालविवाहाच्या दुष्परिणामांची माहिती देणे आवश्यक आहे. ग्रामसभांमधून प्रचार गावपातळीवर ग्रामसभा, महिला बचतगट आणि युवक मंडळांच्या माध्यमातून जनजागृती करावी. प्रसारमाध्यमांचा वापर जसे की दूरदर्शन, रेडिओ, वृत्तपत्रे आणि सामाजिक माध्यमांद्वारे व्यापक प्रचार करावा लागेल. बालविवाह घडवून आणणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करून इतरांसाठी प्रतिबंधात्मक संदेश देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन शिष्यवृत्ती, मोफत शिक्षण आणि विविध शासकीय योजनांद्वारे मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे. समाजात मुलीं सुरक्षितपणे वावरू शकतील असे संरक्षित वातावरण तयार करणे आवश्यक आहे. तसेच मुलीं स्वतः संरक्षण करू शकतील असे कराटेचे प्रशिक्षण प्रत्येक शाळेत बंधनकारक करण्यात यावे. ज्यामुळे मुलीं स्वतः स्वतःचे संरक्षण करू शकतील. त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल. 
बालविवाह ही केवळ एक सामाजिक समस्या नसून मुलांच्या मूलभूत हक्कांवर होणारा अन्याय आहे. मुलींना शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबनाच्या संधींपासून वंचित ठेवणारी ही प्रथा समाजाच्या प्रगतीस अडथळा निर्माण करते. महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापण्याचा नियम हा बालविवाह रोखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकतो. मात्र कायद्याबरोबरच समाजाची मानसिकता बदलणे, शिक्षणाचा प्रसार करणे आणि सातत्यपूर्ण जनजागृती करणे आवश्यक आहे. प्रत्येक बालकाला सुरक्षित, आनंदी आणि शिक्षणपूर्ण बालपण मिळावे, यासाठी बालविवाहमुक्त समाज निर्माण करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

- नासा येवतीकर, स्तंभलेखक, 
धर्माबाद जि. नांदेड 
9423625769

Tuesday, 23 June 2026

पुस्तक परिचय - माय माती अन ती ( Book Review )

मातीशी नाळ जुळलेला काळजाचा ठाव घेणारा कवी अनिकेत देशमुख यांचा कवितासंग्रह " माय माती अन् ती "
उच्चविद्याविभूषित असलेल्या व कवी निवेदक म्हणून सर्वदूर सुपरिचित असलेल्या कवी अनिकेत देशमुख यांचा नुकताच प्रकाशित झालेला दुसरा काव्यसंग्रह "माय माती अन् ती" वाचण्यात आला. याआधी त्यांचा "पाऊलखुणा" नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला असून वाचकांनी त्यास खूप चांगला प्रतिसाद दिला होता. अनिकेत देशमुख हे साहित्यिक जगतातलं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून अनेकांना सुपरिचित आहेत. अनिकेत देशमुख एक विद्यार्थीप्रिय नवोपक्रमशील आदर्श शिक्षक आहेत. ते एक युवा कवी, बहारदार निवेदक व उत्कृष्ट सुत्रसंचालनकर्ते आहेत. त्याचबरोबर ते एक नम्र, मितभाषी व प्रतिभावंत कवी साहित्यिक आहेत. त्यांची कविता त्यांच्यासारखीच साधी, सरळ, सोपी, नितळ, लयदार, कसदार, मातीशी नाळ जोडणारी आहे. हा काव्यसंग्रह काव्यरसिक वाचकांच्या काळजाचा ठाव घेणारा काव्यसंग्रह आहे. काव्यसंग्रहाच्या मलपृष्ठावर असलेली युवा कादंबरीकार पुष्पराजदादा गावंडे माजी सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई यांची पाठराखण या कवीला व या काव्यसंग्रहाला समर्पक अशी आहे.
 या काव्यसंग्रहाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत लोककवी प्रा.प्रशांतदादा मोरे यांनी चिंतनात्मक व अभ्यासपूर्ण स्वरूपात लिहिलेली  "सृजनाची गाथा- माय माती अन् ती" ही प्रस्तावना वाचनीय आहे त्याचबरोबर काव्यसंग्रहाची महती वाढविणारी आहे. त्याचबरोबर कविता कशी असावी हे अत्यंत साध्या व सोप्या शब्दात आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये प्रसिद्ध गझलकार नितीन देशमुख यांनी मांडले आहे. त्यांनी कवी अनिकेत देशमुख यांच्या कवितेची वाट प्रसिद्ध लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या कवितेच्या वाटेवर जाणारी कविता असा महत्त्वाचा उल्लेख केला आहे. जो महत्त्वाचा आहे.
माय, माती अन् ती म्हणजे लेखणी  या तिन्ही एकमेकांशी अतूट नात्याने जोडलेल्या आहेत. माय माणसाला जन्म देते, प्रेम, माया आणि संस्कार देते. माती माणसाला अन्न, आधार आणि ओळख देते. तर लेखणी या दोन्हींचे महत्त्व, त्याग, वेदना आणि गौरव शब्दरूपाने समाजासमोर मांडते. त्याचबरोबर जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी "ती " आपल्याला वेगवेगळ्या रूपात या काव्यसंग्रहात भेटत राहते वाचकांशी हितगुज करते. हे या काव्यसंग्रहाचे वेगळेपण आहे.
आईच्या मायेतून आणि मातीच्या सहवासातून माणसाचे व्यक्तिमत्त्व घडते. या अनुभवांमधूनच लेखक किंवा कवीला प्रेरणा मिळते आणि त्याची लेखणी सशक्त बनते. लेखणी माय आणि मातीचे ऋण व्यक्त करण्याचे कार्य करते. त्यामुळे माय, माती आणि लेखणी या तिन्ही मानवी जीवनाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. या कवितासंग्रहात एकूण ५७ कविता असून त्या वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर आधारित रचना आहेत. 
आपल्या पहिल्याच माय कवितेत कवी म्हणतात, 
धग इस्तवाची सोसे
 माय थापते भाकर
 मायासाठी 'कोहिनूर'
 तिच्या हाताची बिल्लोर
अर्थात आई आपल्या कुटुंबासाठी किती कष्ट घेते, याचे सुंदर वर्णन या ओळींमध्ये केले आहे. चुलीतील जळत्या आगीची धग सहन करून आई प्रेमाने भाकरी थापते. तिच्या कष्टांमागे केवळ कर्तव्य नसून अपार माया आणि त्याग दडलेला असतो. आईच्या हातची भाकरी ही अतिशय चविष्ट आणि अमूल्य असते. म्हणूनच कवीने आईच्या हातच्या बिल्लोर म्हणजेच बांगडीची तुलना जगातील सर्वात मौल्यवान 'कोहिनूर' हिऱ्याशी केली आहे. आईचे प्रेम, त्याग आणि तिच्या हातच्या अन्नाची गोडी ही अनमोल असल्याचा संदेश या ओळींतून व्यक्त होतो.
आनंदसरी कवितेत कवी एका ठिकाणी म्हणतो, 
घाम रक्ताचं बियाणं
बळी पेरतो मातीत 
खरा पाऊस कळतो 
शेतकऱ्याच्या जातीत 
अर्थात शेतकरी आपल्या शेतात पीक घेण्यासाठी खूप मेहनत करतो. तो जणू स्वतःच्या घामाचे आणि रक्ताचेच बियाणे मातीत पेरत असतो, म्हणजेच शेतीसाठी तो अथक परिश्रम करतो. पाऊस वेळेवर पडणे किंवा न पडणे याचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यावर होतो. त्यामुळे पावसाचे खरे महत्त्व, त्याची किंमत आणि त्याची प्रतीक्षा काय असते, हे शेतकऱ्यालाच सर्वाधिक जाणवते. या ओळींतून शेतकऱ्याचे कष्ट, त्याचे निसर्गावर असलेले अवलंबित्व आणि पावसाशी असलेले त्याचे अतूट नाते व्यक्त झाले आहे. 
दुःख वावराचे, साहेब आणि वांझ या कवितेतून कवीने शेतकऱ्याचे कष्ट आणि दुःख वाचकासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 
घाबरायचं नाही या लयबद्ध असलेल्या कवितेत कवी म्हणतो 
कृषीप्रधान देशातून दिसेनाशी होईल माती
सिमेंटच्या जंगलात अमली पदार्थांच्या राती
जुलमी कपटी धोरणास या गाडायाचं हाय
घेऊ राखेतून उभारी पुन्हा उडायाचं हाय
घाबरायचं नाय गड्या घाबरायचं नाय...
अर्थात भारत हा कृषीप्रधान देश असला तरी आज वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि चुकीच्या धोरणांमुळे सुपीक जमीन नष्ट होत चालली आहे. शेतीची जमीन कमी होऊन तिच्या जागी सिमेंटची जंगले उभी राहत आहेत. त्यामुळे समाजात अनेक सामाजिक समस्या, विशेषतः अमली पदार्थांचे वाढते प्रमाण, निर्माण होत आहे. या परिस्थितीस कारणीभूत असलेल्या अन्यायकारक व कपटी धोरणांविरुद्ध संघर्ष करणे आवश्यक आहे. हा बुलंद आवाज या काव्यसंग्रहातून मांडला आहे.
कवी वरील ओळींतून निराश न होता संकटांवर मात करण्याचा संदेश देतो. जरी परिस्थिती प्रतिकूल असली, तरी राखेतून पुन्हा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभे राहून नव्या जोमाने प्रगती करावी, असे तो सांगतो. कोणत्याही संकटाला घाबरून न जाता धैर्याने आणि जिद्दीने त्याचा सामना करण्याचे आवाहन या कवितेतून करण्यात आले आहे.
अनेक कवी संमेलन गाजविलेले कवी अनिकेत देशमुख यांची स्वतःची आवडती कविता म्हणजे 
नांगराचा फाळ असते कविता
भजनातील टाळ असते कविता
काळ्या आईला हसवणारं
काळंकुट्ट आभाळ असते कविता
ही कविता वाचकाच्या मनात रुंजी घालत राहते.
शहरात होणारी घुसमट कवी आपल्या कवितेत मांडताना लिहितो
चाल दोस्ता आतातरी जाऊ आपल्या गावा
माणसं यंत्र झालीत अन् जहरी झालीय हवा
या कवितेतून कवीला सांगायचे आहे की, आधुनिक जीवनात माणसे अत्यंत व्यस्त आणि यांत्रिक झाली आहेत. शहरातील धकाधकीच्या जीवनात माणसांमधील प्रेम, जिव्हाळा आणि माणुसकी कमी होत चालली आहे. तसेच प्रदूषणामुळे वातावरणही दूषित झाले आहे. त्यामुळे कवी आपल्या मित्राला म्हणतो की, आता तरी आपण आपल्या गावाकडे जाऊया. गावातील निसर्गरम्य वातावरण, स्वच्छ हवा आणि माणसांमधील जिव्हाळा यामुळे मनाला शांतता आणि समाधान मिळेल. या ओळींतून शहरी जीवनातील कृत्रिमता आणि ग्रामीण जीवनातील साधेपणा, माणुसकी व निसर्गप्रेम यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
बघा एवढं करता आलं तर , साहेब, ओल आणि मढं या कवितेतून सध्याच्या व्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत.
 कवी शोकांतिका या कवितेतून जो शोक व्यक्त करत आहे, तो सर्वांनाच असायला हवा, ते म्हणतात, 
कुपोषणानं दरवर्षी इथं 
हजारो जीव मरतात 
मंदिरांना कळस मात्र 
दररोज सोन्याचे चढतात !
अर्थात समाजातील विषमता आणि संवेदनाहीनता यांवर या ओळींतून भाष्य करण्यात आले आहे. आपल्या देशात आजही अनेक गरीब, उपेक्षित आणि लहान मुले कुपोषणामुळे दरवर्षी मृत्युमुखी पडतात. त्यांना अन्न, औषधे आणि मूलभूत सुविधा मिळत नाहीत. दुसरीकडे, मंदिरांवर मात्र मोठ्या प्रमाणात सोन्याचे कळस चढवले जातात आणि भरपूर पैसा खर्च केला जातो. कवी या विरोधाभासाकडे लक्ष वेधून समाजाला विचार करण्यास भाग पाडतो की, धार्मिक कार्यांवर खर्च करण्याबरोबरच गरजू, भुकेल्या आणि कुपोषित लोकांच्या मदतीसाठीही पुढे आले पाहिजे. मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे, हा संदेश या ओळींतून व्यक्त होतो.
चाटा कवितेतून कवी सध्याच्या राजकीय परिस्थितीचे वास्तव चित्रण केले आहे. कार्यकर्ते सतरंजी उचलण्यात अर्धे आयुष्य वाया घालवितातत आणि नेते मंडळी आपला वारसा म्हणून घरातील सदस्यांना पुढं आणतात. हे चित्र कुठं तरी बदलायला हवं. हा विचार कवी अनिकेत देशमुख यांची सशक्त कविता मांडते.
"बापू" या कवितेतून कवी बापूंनी दिलेली खेड्याकडे चला ही हाक आठवण करून देतात तसेच आज बापूजीच्या स्वप्नातील भारत हरवला असल्याची खंत देखील व्यक्त करतात. आपल्या कवितेत ते म्हणतात, 
आता हिम्मत नाही कुणातच बापू 
'चले जाव' म्हणायची 
इथं प्रत्येकालाच घाई 
चरख्याजवळ सेल्फी काढायची !!
या ओळींतून कवीने आजच्या समाजातील दिखाऊपणा आणि महात्मा गांधी यांच्या विचारांपासून दूर गेलेल्या समाजाचे वास्तव चित्रण मांडले आहे. स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींनी दिलेल्या 'चले जाव' (भारत छोडो) आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देऊन लोकांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला. परंतु आजच्या काळात अन्याय, भ्रष्टाचार आणि सामाजिक समस्यांविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य अनेकांमध्ये दिसत नाही.
लोक गांधीजींच्या विचारांचे आचरण करण्याऐवजी त्यांच्या स्मृतीचिन्हांजवळ, जसे की चरख्याजवळ, केवळ सेल्फी काढण्यात आणि दिखावा करण्यात अधिक रस घेतात. म्हणजेच, गांधीजींच्या तत्त्वांचा स्वीकार करण्याऐवजी त्यांचे केवळ बाह्य प्रदर्शन केले जाते. या ओळींतून कवीने समाजाला गांधीजींचे विचार प्रत्यक्ष जीवनात अंगीकारण्याचा आणि अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहण्याचा संदेश दिला आहे.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी पंतप्रधान राजीव गांधी, देशाचे वीर सैनिक जवान, बळीराजा यांची महती सांगणाऱ्या या काव्यसंग्रहातील कविता देखील वाचनीय आहेत. 
पुस्तकाचे शीर्षक असलेल्या कवितेत कवी म्हणतो, 
माय, माती नि मातृभाषा
असतात जन्मांच्या सोबती
 शब्दांमध्ये कशी वर्णावी
 तिन्हींची महती
अर्थात आई, मातृभूमी आणि मातृभाषा या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या गोष्टी आहेत. जन्मापासून ते आयुष्याच्या अखेरपर्यंत या तिन्ही गोष्टी माणसाच्या सोबत असतात. आई आपल्याला प्रेम, संस्कार आणि आधार देते; माती म्हणजे मातृभूमी आपल्याला ओळख, संस्कृती आणि अस्तित्व देते; तर मातृभाषा आपल्या भावना व्यक्त करण्याचे माध्यम बनते.
या तिन्हींचे महत्त्व इतके महान आणि अमूल्य आहे की, ते केवळ शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. कवी या ओळींतून आई, मातृभूमी आणि मातृभाषा यांच्याप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करतो. या कवितेतून कवी मराठी भाषेची होणारी गळचेपी वाचकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
एकंदरीत हा काव्यसंग्रह म्हणजे आपल्याला जन्म देणाऱ्या आई विषयी, आपल्या मायभूमी विषयी, देशाविषयी, सर्वांचं पालनपोषण करणारा तारणहार बळीराजा, देशाचा संरक्षक सीमेवरचा जवान या सर्वांविषयी प्रत्येकाच्या मनात अभिमान तयार करणारा आहे. कवी विदर्भातील असल्याने काही शब्द वैदर्भीय वाटतात. मात्र भाषा साधी, सरळ आणि सोपी आहे. त्यामुळे ही कविता वाचकाला आपली वाटते आणि त्याच्या मनाला साद घालते हे या काव्यसंग्रहाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत समर्पक असे आहे. अक्षरशिल्प प्रकाशन अमरावती कडून हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आलेला आहे. पुस्तकाची बांधणी, भाषा, अंतरंग, मुखपृष्ठ, मलपृष्ठ एकंदरीत सर्वच अत्यंत दर्जेदार झाले आहे. वाचनाची आवड असणाऱ्या प्रत्येक रसिक वाचकांनी हा काव्यसंग्रह विकत घेऊन वाचावा असा आहे.
आपल्या बहारदार निवेदनासाठी आणि वेगळ्या धाटणीच्या कवितेसाठी कवी अनिकेत देशमुख यांना त्यांच्या पुढील लेखनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा ......!
****
पुस्तकाचे नाव - माय माती अन् ती (मराठी कवितासंग्रह)
कवी अनिकेत जयंतराव देशमुख गोपालखेड जि. अकोला
स्वागत मूल्य - २४५ ₹
प्रकाशक - अक्षरशिल्प प्रकाशन अमरावती
****
पुस्तक परिचय 
-  नासा येवतीकर 
मुख्याध्यापक, प्रा. शाळा पिंपळगाव 
ता. धर्माबाद जि. नांदेड 
Pin - 431809
मो. - 9423625769

पुस्तक परिचय वाचल्याबद्दल मनस्वी आभार !

काव्यसंग्रह मागविण्यासाठी संपर्क 
कवी अनिकेत देशमुख - 9689634332 

Sunday, 21 June 2026

पुस्तक परिचय - ( Book Review )

हरवलेला माणूस शोधून देणारे पुस्तक " माणूस द्या.. मज माणूस "
माणूस कोणाला म्हणावे ? माणूस म्हणजे फक्त दोन हात, दोन पाय आणि बोलण्याची क्षमता असलेला जीव नव्हे.
ज्याच्या मनात प्रेम, दया, क्षमा, शांती, करुणा, संवेदना आणि इतरांविषयी आदर असतो, त्यालाच खरा माणूस म्हणावे.
स्वतःसाठी जगणे सहज शक्य असते; पण दुसऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, गरजूंना मदत करणे, सत्य आणि प्रामाणिकपणाने वागणे, चूक मान्य करून सुधारण्याचा प्रयत्न करणे, ही खरी माणुसकीची लक्षणे आहेत.
ज्याच्याकडे पैसा, पद किंवा सत्ता आहे तो मोठा असू शकतो; पण ज्याच्याकडे चांगले विचार, नम्रता आणि माणुसकी आहे तोच खरा “माणूस” असतो.
संत तुकाराम महाराज म्हणतात, 
“जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा
देव तेथेचि जाणावा.”
यातूनही हेच स्पष्ट होते की, दुसऱ्यांच्या दुःखात साथ देणारा आणि प्रेमाने वागणारा व्यक्तीच खरा माणूस असतो.
सध्याच्या धावपळीच्या युगात माणसातली माणुसकी लयाला गेली आहे, याचा प्रत्यय रोजच्या वर्तमानपत्रातील बातम्यावरून आणि आपणाला येत असलेल्या अनुभवावरून लक्षात येत आहे. आज समाजातून " माणूस " हरवला आहे आणि तो " माणूस " शोधण्यासाठी विनोद पंचभाई यांनी माणूस द्या... मज माणूस हे पुस्तक लिहिलं आहे. प्रसिद्ध साहित्यिक विंदा करंदीकर यांनी म्हटल्याप्रमाणे “ माणूस मोठा की पैसा मोठा
प्रश्न अजूनही उभाच आहे. ” आजही समाजात माणसापेक्षा पैश्याला जास्त महत्व दिले जाते. जिथे पैसा आहे तिथे माणुसकी औषधाला देखील शिल्लक राहत नाही, ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही. अमाप संपत्ती असूनही ज्याचे पाय जमिनीवर असतात अशी व्यक्ती फार कमी बघायला मिळतात. 
लेखकांनी आपल्या पुस्तकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीता या पुस्तकातील अनेक रचना अगदी समर्पक रित्या वापरून माणसाच्या स्वभावाचे चित्रण केले आहे. या भारतात बंधूभाव नित्य वसू दे, दे वरची असा दे ही तुकडोजी महाराजांची प्रार्थना प्रत्येक व्यक्तीने नुसते तोंडपाठ करून चालणार नाही तर त्याप्रमाणे कृती देखील आवश्यक आहे. तेव्हा कुठं माणुसकी जिवंत राहू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. संत कबीर यांचे दोहे देखील मानवाला चांगले जीवन जगण्याचा संदेश देतात. लेखकांनी योग्य प्रकारे संत कबीर यांच्या दोह्याचा वापर करून चांगले जीवन जगण्याचा अर्थ सांगितला आहे. संत कबीर म्हणतात, “बुरा जो देखन मैं चला,
बुरा न मिलिया कोय;
जो मन खोजा आपना,
मुझसे बुरा न कोय.” मराठीत एक म्हण आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. माणूस स्वतःचे दोष लपवितो आणि दुसऱ्याचे दोष दाखवत सुटतो. ज्यावेळी आपण कोणाकडे बोट दाखवतो पण आपण हे विसरतो की चार बोटं आपल्याकडे निर्देश करतात. म्हणून दुसऱ्या व्यक्तीच्या अंगातील चांगल्या गुणाकडे बघावं आणि त्याचा स्वीकार केल्यास आपली प्रगती होते असा संदेश ते या पुस्तकातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 
माणसाचे जीवन केवळ स्वतःपुरते मर्यादित नसावे. तो कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांच्याशी जोडलेला असावा. प्रेम, माया, सहकार्य, दया, करुणा, प्रामाणिकपणा आणि माणुसकी हे गुण माणसाला इतरांपेक्षा वेगळे बनवतात. एखाद्याकडे पैसा, सत्ता किंवा प्रसिद्धी असली तरी त्याच्यात माणुसकी नसेल तर त्याचे जीवन अपूर्ण वाटते. म्हणून जीवनात “माणूस” होणे हेच सर्वांत मोठे यश आहे, हे यापूर्वी संतांनी सांगून गेले आहेत. 
आज विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जग खूप पुढे गेले आहे. माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले, अनेक शोध लावले आणि जीवन अधिक सुखकर केले. पण या प्रगतीसोबत माणसामधील संवेदनशीलता कमी होत चालली आहे. स्वार्थ, मत्सर, अहंकार आणि द्वेष यामुळे अनेकदा माणूस माणसापासून दूर जात आहे. एकाच छताखाली असलेल्या चार माणसांमध्ये आज संवाद कमी झालेलं दिसून येत आहे. अशा वेळी प्रेम, आपुलकी आणि माणुसकीने एखाद्याला जवळ घेण्याची गरज अधिक जाणवत आहे.
लेखकांच्या मतानुसार चांगल्या विचारांनीच माणूस घडत असतो. सकारात्मक विचार करणाऱ्याची प्रगती लवकर होताना दिसून येते. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. लहान मुले ही निरागस असतात पण ते जसे जसे मोठे होत जातात तसे तसे त्यांच्यात ईर्षा, द्वेष, राग, लोभ आणि अहंकार इत्यादी दुर्गुण चिकटत जातात. त्यामुळे त्याच्यातील माणूसपण हरवत जाते. आज समाजात शिक्षणाचा एवढा प्रसार होऊन देखील बुवाबाजी, कर्मकांड आणि अंधश्रद्धा खूप वाढू लागली आहे. त्यामुळे संधीसाधू लोकांपासून सावध होण्याचा सल्ला देखील वाचकांना देतात. 
विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरातील लहान मुलांवर योग्य संस्कार होत नाहीत, याची खंत देखील लेखकांनी व्यक्त केली आहे, जे की योग्य वाटते. एक खोटं लपविण्यासाठी शंभरवेळा खोटं बोलावे लागते. म्हणून सजन रे झूठ मत बोलो या प्रकरणात सत्याचे महत्व स्पष्ट केले आहे. लेखक स्वतः डावखुरा असल्याने जगातील 12 टक्के डावखुरा असलेल्या व्यक्तिमत्वाविषयी छान माहिती दिली आहे. वेळ कोणासाठी थांबत नसते. त्यामुळे वेळेला महत्व द्यावे असा सल्ला देतात. देशभक्ती दाखवण्यासाठी सीमेवर जाऊन कार्य करावे लागते असे नाही तर छोट्या छोट्या गोष्टीतून देखील आपण आपले देशावर असलेले प्रेम दाखवू शकते यांचे सुंदर उदाहरणं दिले आहेत.
शिक्षण माणसाला ज्ञानी बनवते, पण संस्कार त्याला चांगला माणूस बनवतात. त्यामुळे लहानपणापासूनच चांगले विचार, शिस्त, आदर आणि सहकार्य यांचे महत्त्व मुलांना शिकवले पाहिजे. बालपणी केलेले संस्कार चिरकाल टिकतात, म्हणून त्या छोट्या वयात मुलांवर संस्कार टाकण्याची जबाबदारी पालकांची, शिक्षकांची आणि समाजाची आहे. कारण चांगल्या माणसांमुळेच चांगला समाज घडतो, देश घडतो. खरा माणूस तोच असतो जो दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होतो, गरजूंना मदत करतो आणि सर्वांना समानतेने वागवतो. जात, धर्म, भाषा किंवा श्रीमंती यापेक्षा “माणूस” हा धर्म मोठा आहे. समाजात शांतता आणि सौहार्द टिकवण्यासाठी प्रत्येकाने माणुसकी जपली पाहिजे, असा मौलिक संदेश अनेक प्रकरणात दिसून येतो.
या पुस्तकात माणसाने माणुसकी कशी जपावी याबाबत एकूण 37 प्रकरण आहेत. प्रत्येक प्रकरण वाचल्यानंतर चिंतन आणि मनन करण्याजोगे आहे. विशेष म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी स्लोगन दिलेलं आहे, ज्यामुळे त्या प्रकरणाचा सार लक्षात येतो. आबालापासून वृद्धापर्यंत सर्व प्रकारच्या वाचकासाठी हे पुस्तक एक समुपदेशनाचे काम करणारे आहे. सोपी वाक्यरचना, कमी शब्दात जास्त महत्व सांगणारे प्रकरण, प्रसंगानुरूप दाखले, उदाहरण, अनुभव आणि प्रसंगामुळे हे पुस्तक वाचनीय आणि संग्रही असावे असे आहे. उदास मनाला प्रफुल्लित करणारे, जीवन नकोसे वाटणाऱ्या व्यक्तीला पुस्तक वाचल्यावर जीवन हवेहवेसे वाटेल इतके मार्गदर्शन या पुस्तकात वाचायला मिळेल. संतोष घोंगडे यांचे मुखपृष्ठ लाजवाब आहे. पुस्तकाविषयी सर्व काही मीच सांगण्यापेक्षा प्राजक्त प्रकाशन द्वारे प्रकाशित झालेले हे पुस्तक 9923797725 या क्रमांकावर संपर्क करून नक्की मागवावे. लेखकांना पुढील लेखनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा...!

पुस्तकाचे नाव :- माणूस द्या.. मज माणूस..
लेखक - श्री विनोद श्रा. पंचभाई 
प्रकाशक - प्राजक्त प्रकाशन, पुणे 
पृष्ठ - 136  किंमत - 200 ₹


पुस्तक परिचय 
- नासा येवतीकर, मुख्याध्यापक, 
प्रा. शाळा पिंपळगाव ता. धर्माबाद जि. नांदेड 
9423625769

Wednesday, 29 April 2026

विद्यार्थी प्रिय शिक्षक : कृष्णा येरावार

विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षक कृष्णा येरावार
धर्माबाद तालुक्यातील बाळापूर केंद्रातील पी एम श्री जि. प. प्रा. शाळा बेल्लूर बु. येथील मुख्याध्यापक कृष्णा येरावार सर हे आज 30 एप्रिल रोजी नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण केल्याने शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत, त्यानिमित्त त्यांच्या कार्याची ओळख देणारा छोटासा प्रयत्न.

कृष्णा येरावार यांचा जन्म धर्माबाद शहरात 02 एप्रिल 1968 रोजी धर्मापुरी व सौ. कमल यांच्या पोटी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शिक्षण हुतात्मा पानसरे हायस्कुल मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर मुखेड तालुक्यातील उमरदरी येथील अध्यापक विद्यालय मधून डी. एड. चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिनांक 07 जुलै 1992 रोजी हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु. केंद्रातील जि. प. प्रा. शाळा खैरगाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा करण्यासाठी सुरुवात केली. तेथे दहा वर्षाच्या सेवेनंतर 2002 मध्ये त्यांची बदली धर्माबाद तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा बेल्लूर बु. येथे झाली. याठिकाणी देखील दहा वर्षाची सेवा केल्यानंतर 2012 मध्ये त्यांची बदली जि. प. प्रा. शाळा मंगनाळी येथे झाली. याठिकाणी त्यांनी 90 हजाराची लोकवर्गणी मिळवून शाळा डिजिटल केली, अतिक्रमित असलेली जागा शाळेला मिळवून दिली आणि मैदानात 100 झाडाचे वृक्षारोपण करून एक नवा आदर्श निर्माण केला होता. सहा वर्षाच्या सेवेनंतर समायोजन प्रक्रियेत पुन्हा 2018 मध्ये त्यांची बदली जि. प. प्रा. शाळा बेल्लूर बु. येथे झाली. याठिकाणी देखील त्यांनी शाळा खोली बांधकाम, स्वछतागृह, किचनशेड बांधकाम, वॉटर फिल्टर बसवले आणि 15 व्या वित्त आयोगातून शाळेचा विकास घडवून आणला. सन 2024 मध्ये या शाळेचा समावेश पी एम श्री शाळेत झाला. त्यामुळे शाळेतील भौतिक सुविधा, क्रीडा साहित्य यासह शाळा अजून सुंदर व आकर्षक बनवण्यात कृष्णा येरावार यांचा सिंहाचा वाटा आहे. 8 वर्षाच्या सेवेनंतर आज 30 एप्रिल 2026 रोजी नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण केल्यामुळे ते नांदेड जिल्हा परिषदेतून 34 वर्षाची प्रदीर्घ सेवा देऊन सेवानिवृत्त होत आहेत. 
सेवानिवृत्तीचा हा क्षण त्यांच्या कुटुंबासाठी, विद्यार्थ्यांसाठी, सहकाऱ्यांसाठी आणि संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाचा व भावनिक असा आहे. अनेक वर्षांच्या अखंड सेवेनंतर ते आज शासकीय कार्यातून निवृत्त होत असले, तरी समाजसेवा आणि ज्ञानदानाच्या कार्यातून ते कधीच निवृत्त होणार नाहीत.
कृष्णा येरावार हे एक चांगले शिक्षक म्हणून सर्वत्र ओळखले जातात. जि. प. प्रा. शाळा मंगनाळी व बेल्लूर बु. शाळेत त्यांनी उल्लेखनीय असे काम केले आहे. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण करणे, कठीण विषय सोप्या भाषेत समजावून सांगणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेमाने घडवणे, ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल केले.
ते एक कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक म्हणूनही ओळखले जातात. बेल्लूर बु. येथील शाळेची प्रगती, शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या नेतृत्वामुळे शाळेला नवी दिशा मिळाली. विद्यार्थी लाभाच्या योजना राबवून सर्वाना लाभ मिळवून दिला. 
कृष्णा येरावार हे एक उपक्रमशील शिक्षक म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा,  राष्ट्रीय मतदार यादी शुद्धीकरण करण्याचे काम BLO म्हणून यशस्वीरित्या काम केले आणि सामाजिक जाणीवा निर्माण करणारे कार्यक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण वाढले.
त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना 2007 मध्ये धर्माबाद तालुका गुरु गौरव पुरस्कार व 2018 मध्ये नांदेड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हे पुरस्कार त्यांच्या मेहनतीचे, समर्पणाचे आणि गुणवत्तेचे प्रतीक आहेत.
शिक्षकांच्या हक्कांसाठी व शैक्षणिक प्रश्नांसाठी ते शिक्षक संघटनेत सक्रिय कार्यरत राहिले. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी तयार राहायचे. सहकाऱ्यांना नेहमी मदत करणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि एकजूट ठेवणे, ही त्यांची मोठी ताकद होती.
शैक्षणिक वर्तुळात त्यांनी नेहमीच चांगले काम करून आपला ठसा उमटवला. त्यांच्या कार्यामुळे अनेक शिक्षकांना प्रेरणा मिळाली. ते खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ ठरले. 
कृष्णा येरावार सरांच्या यशामागे त्यांच्या पत्नी सौ. राधिका यांचा विशेष सहभाग आहे. संसाराची जबाबदारी समर्थपणे सांभाळत त्यांनी सरांना नेहमी प्रेरणा, साथ आणि बळ दिले. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे कुटुंबाचा मोठा वाटा असतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे येरावार यांचे कुटुंब होय.
त्यांचा मोठा मुलगा अभिषेक हा सॉफ्टवेअर इंजिनियर असून हैद्राबाद येथे खाजगी कंपनीत काम करतो तर दुसरा मुलगा अक्षय हा सध्या पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित असून त्यांनी आपल्या आई-वडिलांचे संस्कार, मेहनत आणि मूल्ये जपत स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवले आहे. हीच त्यांच्या आयुष्यभराच्या परिश्रमांची खरी कमाई आहे.
आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या शुभक्षणी त्यांना उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा. त्यांचे पुढील भावी आयुष्य आनंदमय, शांततामय आणि यशस्वी जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त चारोळी 

ज्ञानदीप ज्यांनी तेवत ठेवला,
विद्यार्थ्यांचा जीवनमार्ग उजळवला।
कर्तव्याचा ध्यास जपला सदैव,
शिक्षणातून घडवला नवा मेव।
आज निवृत्तीचा सोहळा सुंदर,
आशीर्वाद राहो तुमचा अखंड निरंतर।
आरोग्य, आनंद लाभो आयुष्यभर,
कृष्णा सरांना मानाचा मुजरा सादर।

- नासा येवतीकर, स्तंभलेखक, धर्माबाद 
9423625769

Sunday, 29 March 2026

दिनविशेष माहिती - 30 मार्च ( Rajasthan Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 30 मार्च हा राजस्थान स्थापना दिवस त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण राजस्थान या राज्याविषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

         राजस्थान स्थापना दिवस
भारताच्या पश्चिम भागात वसलेले राजस्थान हे क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात मोठे राज्य आहे. ३० मार्च १९४९ रोजी विविध संस्थानांचे एकत्रीकरण होऊन राजस्थान राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे दरवर्षी ३० मार्च हा दिवस राजस्थान स्थापना दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
स्वातंत्र्यपूर्व काळात राजस्थानमध्ये जयपूर, जोधपूर, बिकानेर, उदयपूर इत्यादी अनेक लहानमोठी संस्थाने होती. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने या संस्थानांचे एकत्रीकरण करून एकसंध राज्य निर्माण करण्याचा निर्णय घेतला. दिनांक ३० मार्च १९४९ रोजी राजस्थान राज्य अस्तित्वात आले.
राजस्थान हे आपल्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककलेसाठी प्रसिद्ध आहे. राजस्थानचे घुमर लोकनृत्य खूप प्रसिद्ध आहे. तसेच रंगीबेरंगी पोशाख, दागिने आणि वाळवंटी जीवनशैली हे सर्व जगभर आकर्षणाचे केंद्र आहे. राजस्थानी खाद्यसंस्कृतीत दाल-बाटी-चूरमा विशेष प्रसिद्ध आहे. हिंदी व राजस्थानी ही राजस्थानमधील प्रमुख बोलली जाणारी भाषा आहेत. राजस्थान मधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे भारतातील एक प्रमुख व्याघ्रप्रकल्प म्हणून गणले जाते. राजस्थानमध्ये उंट हा रोजच्या जीवनात वापरला जाणारा प्राणी आहे.
राजस्थान स्थापना दिवस हा केवळ राज्याच्या निर्मितीचा दिवस नसून एकतेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे. राज्यातील लोक आपली परंपरा जपण्यासाठी आणि पुढील पिढ्यांना तिची ओळख करून देण्यासाठी हा दिवस साजरा करतात.
राजस्थानमध्ये अनेक ऐतिहासिक किल्ले, राजवाडे आणि वाळवंटी प्रदेश आहेत. जयपूर, उदयपूर, जोधपूर आणि जैसलमेर ही शहरे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. राजस्थानची राजधानी जयपूरला गुलाबी शहर किंवा “पिंक सिटी” म्हणून ओळखले जाते तसेच जंतर मंतर व हवामहलसाठी देखील जयपूर प्रसिद्ध आहे. जैसलमेरची “गोल्डन सिटी” पर्यटकांना विशेष आकर्षित करतात. विविधतेत एकता आणि परंपरेचे जतन यांचे सुंदर उदाहरण म्हणजे राजस्थान होय. या दिवसाच्या निमित्ताने आपणही भारताच्या सांस्कृतिक वैभवाचा अभिमान बाळगूया.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - राजस्थान राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
बरोबर उत्तर आहे, 30 मार्च 1949 रोजी राजस्थान राज्याची निर्मिती झाली.

दुसरा प्रश्न - राजस्थानची राजधानी कोणती ?
बरोबर उत्तर आहे, जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे. 

तिसरा प्रश्न - राजस्थानचे कोणते लोकनृत्य खूप प्रसिद्ध आहे ?
बरोबर उत्तर आहे, राजस्थानचे घुमर लोकनृत्य खूप प्रसिद्ध आहे. 

चौथा प्रश्न - राजस्थानमध्ये रोजच्या जीवनात वापरला जाणारा प्राणी कोणता आहे. ?
बरोबर उत्तर आहे, राजस्थानमध्ये उंट हा रोजच्या जीवनात वापरला जाणारा प्राणी आहे.

शेवटचा पाचवा प्रश्न - क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
बरोबर उत्तर आहे - क्षेत्रफळानुसार राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

वटपौर्णिमा ( Vatpournima - 2026)

आधुनिक काळातील महिला आणि वटपौर्णिमा भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे सण केवळ धार्मिक विधींशी संबंधित नस...