Wednesday, 29 April 2026

विद्यार्थी प्रिय शिक्षक : कृष्णा येरावार

विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षक कृष्णा येरावार
धर्माबाद तालुक्यातील बाळापूर केंद्रातील पी एम श्री जि. प. प्रा. शाळा बेल्लूर बु. येथील मुख्याध्यापक कृष्णा येरावार सर हे आज 30 एप्रिल रोजी नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण केल्याने शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत, त्यानिमित्त त्यांच्या कार्याची ओळख देणारा छोटासा प्रयत्न.

कृष्णा येरावार यांचा जन्म धर्माबाद शहरात 02 एप्रिल 1968 रोजी धर्मापुरी व सौ. कमल यांच्या पोटी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शिक्षण हुतात्मा पानसरे हायस्कुल मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर मुखेड तालुक्यातील उमरदरी येथील अध्यापक विद्यालय मधून डी. एड. चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिनांक 07 जुलै 1992 रोजी हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु. केंद्रातील जि. प. प्रा. शाळा खैरगाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा करण्यासाठी सुरुवात केली. तेथे दहा वर्षाच्या सेवेनंतर 2002 मध्ये त्यांची बदली धर्माबाद तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा बेल्लूर बु. येथे झाली. याठिकाणी देखील दहा वर्षाची सेवा केल्यानंतर 2012 मध्ये त्यांची बदली जि. प. प्रा. शाळा मंगनाळी येथे झाली. याठिकाणी त्यांनी 90 हजाराची लोकवर्गणी मिळवून शाळा डिजिटल केली, अतिक्रमित असलेली जागा शाळेला मिळवून दिली आणि मैदानात 100 झाडाचे वृक्षारोपण करून एक नवा आदर्श निर्माण केला होता. सहा वर्षाच्या सेवेनंतर समायोजन प्रक्रियेत पुन्हा 2018 मध्ये त्यांची बदली जि. प. प्रा. शाळा बेल्लूर बु. येथे झाली. याठिकाणी देखील त्यांनी शाळा खोली बांधकाम, स्वछतागृह, किचनशेड बांधकाम, वॉटर फिल्टर बसवले आणि 15 व्या वित्त आयोगातून शाळेचा विकास घडवून आणला. सन 2024 मध्ये या शाळेचा समावेश पी एम श्री शाळेत झाला. त्यामुळे शाळेतील भौतिक सुविधा, क्रीडा साहित्य यासह शाळा अजून सुंदर व आकर्षक बनवण्यात कृष्णा येरावार यांचा सिंहाचा वाटा आहे. 8 वर्षाच्या सेवेनंतर आज 30 एप्रिल 2026 रोजी नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण केल्यामुळे ते नांदेड जिल्हा परिषदेतून 34 वर्षाची प्रदीर्घ सेवा देऊन सेवानिवृत्त होत आहेत. 
सेवानिवृत्तीचा हा क्षण त्यांच्या कुटुंबासाठी, विद्यार्थ्यांसाठी, सहकाऱ्यांसाठी आणि संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाचा व भावनिक असा आहे. अनेक वर्षांच्या अखंड सेवेनंतर ते आज शासकीय कार्यातून निवृत्त होत असले, तरी समाजसेवा आणि ज्ञानदानाच्या कार्यातून ते कधीच निवृत्त होणार नाहीत.
कृष्णा येरावार हे एक चांगले शिक्षक म्हणून सर्वत्र ओळखले जातात. जि. प. प्रा. शाळा मंगनाळी व बेल्लूर बु. शाळेत त्यांनी उल्लेखनीय असे काम केले आहे. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण करणे, कठीण विषय सोप्या भाषेत समजावून सांगणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेमाने घडवणे, ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल केले.
ते एक कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक म्हणूनही ओळखले जातात. बेल्लूर बु. येथील शाळेची प्रगती, शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या नेतृत्वामुळे शाळेला नवी दिशा मिळाली. विद्यार्थी लाभाच्या योजना राबवून सर्वाना लाभ मिळवून दिला. 
कृष्णा येरावार हे एक उपक्रमशील शिक्षक म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा,  राष्ट्रीय मतदार यादी शुद्धीकरण करण्याचे काम BLO म्हणून यशस्वीरित्या काम केले आणि सामाजिक जाणीवा निर्माण करणारे कार्यक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण वाढले.
त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना 2007 मध्ये धर्माबाद तालुका गुरु गौरव पुरस्कार व 2018 मध्ये नांदेड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हे पुरस्कार त्यांच्या मेहनतीचे, समर्पणाचे आणि गुणवत्तेचे प्रतीक आहेत.
शिक्षकांच्या हक्कांसाठी व शैक्षणिक प्रश्नांसाठी ते शिक्षक संघटनेत सक्रिय कार्यरत राहिले. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी तयार राहायचे. सहकाऱ्यांना नेहमी मदत करणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि एकजूट ठेवणे, ही त्यांची मोठी ताकद होती.
शैक्षणिक वर्तुळात त्यांनी नेहमीच चांगले काम करून आपला ठसा उमटवला. त्यांच्या कार्यामुळे अनेक शिक्षकांना प्रेरणा मिळाली. ते खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ ठरले. 
कृष्णा येरावार सरांच्या यशामागे त्यांच्या पत्नी सौ. राधिका यांचा विशेष सहभाग आहे. संसाराची जबाबदारी समर्थपणे सांभाळत त्यांनी सरांना नेहमी प्रेरणा, साथ आणि बळ दिले. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे कुटुंबाचा मोठा वाटा असतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे येरावार यांचे कुटुंब होय.
त्यांचा मोठा मुलगा अभिषेक हा सॉफ्टवेअर इंजिनियर असून हैद्राबाद येथे खाजगी कंपनीत काम करतो तर दुसरा मुलगा अक्षय हा सध्या पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित असून त्यांनी आपल्या आई-वडिलांचे संस्कार, मेहनत आणि मूल्ये जपत स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवले आहे. हीच त्यांच्या आयुष्यभराच्या परिश्रमांची खरी कमाई आहे.
आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या शुभक्षणी त्यांना उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा. त्यांचे पुढील भावी आयुष्य आनंदमय, शांततामय आणि यशस्वी जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त चारोळी 

ज्ञानदीप ज्यांनी तेवत ठेवला,
विद्यार्थ्यांचा जीवनमार्ग उजळवला।
कर्तव्याचा ध्यास जपला सदैव,
शिक्षणातून घडवला नवा मेव।
आज निवृत्तीचा सोहळा सुंदर,
आशीर्वाद राहो तुमचा अखंड निरंतर।
आरोग्य, आनंद लाभो आयुष्यभर,
कृष्णा सरांना मानाचा मुजरा सादर।

- नासा येवतीकर, स्तंभलेखक, धर्माबाद 
9423625769

Sunday, 29 March 2026

दिनविशेष माहिती - 30 मार्च ( Rajasthan Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 30 मार्च हा राजस्थान स्थापना दिवस त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण राजस्थान या राज्याविषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

         राजस्थान स्थापना दिवस
भारताच्या पश्चिम भागात वसलेले राजस्थान हे क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात मोठे राज्य आहे. ३० मार्च १९४९ रोजी विविध संस्थानांचे एकत्रीकरण होऊन राजस्थान राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे दरवर्षी ३० मार्च हा दिवस राजस्थान स्थापना दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
स्वातंत्र्यपूर्व काळात राजस्थानमध्ये जयपूर, जोधपूर, बिकानेर, उदयपूर इत्यादी अनेक लहानमोठी संस्थाने होती. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने या संस्थानांचे एकत्रीकरण करून एकसंध राज्य निर्माण करण्याचा निर्णय घेतला. दिनांक ३० मार्च १९४९ रोजी राजस्थान राज्य अस्तित्वात आले.
राजस्थान हे आपल्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककलेसाठी प्रसिद्ध आहे. राजस्थानचे घुमर लोकनृत्य खूप प्रसिद्ध आहे. तसेच रंगीबेरंगी पोशाख, दागिने आणि वाळवंटी जीवनशैली हे सर्व जगभर आकर्षणाचे केंद्र आहे. राजस्थानी खाद्यसंस्कृतीत दाल-बाटी-चूरमा विशेष प्रसिद्ध आहे. हिंदी व राजस्थानी ही राजस्थानमधील प्रमुख बोलली जाणारी भाषा आहेत. राजस्थान मधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे भारतातील एक प्रमुख व्याघ्रप्रकल्प म्हणून गणले जाते. राजस्थानमध्ये उंट हा रोजच्या जीवनात वापरला जाणारा प्राणी आहे.
राजस्थान स्थापना दिवस हा केवळ राज्याच्या निर्मितीचा दिवस नसून एकतेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे. राज्यातील लोक आपली परंपरा जपण्यासाठी आणि पुढील पिढ्यांना तिची ओळख करून देण्यासाठी हा दिवस साजरा करतात.
राजस्थानमध्ये अनेक ऐतिहासिक किल्ले, राजवाडे आणि वाळवंटी प्रदेश आहेत. जयपूर, उदयपूर, जोधपूर आणि जैसलमेर ही शहरे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. राजस्थानची राजधानी जयपूरला गुलाबी शहर किंवा “पिंक सिटी” म्हणून ओळखले जाते तसेच जंतर मंतर व हवामहलसाठी देखील जयपूर प्रसिद्ध आहे. जैसलमेरची “गोल्डन सिटी” पर्यटकांना विशेष आकर्षित करतात. विविधतेत एकता आणि परंपरेचे जतन यांचे सुंदर उदाहरण म्हणजे राजस्थान होय. या दिवसाच्या निमित्ताने आपणही भारताच्या सांस्कृतिक वैभवाचा अभिमान बाळगूया.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - राजस्थान राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
बरोबर उत्तर आहे, 30 मार्च 1949 रोजी राजस्थान राज्याची निर्मिती झाली.

दुसरा प्रश्न - राजस्थानची राजधानी कोणती ?
बरोबर उत्तर आहे, जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे. 

तिसरा प्रश्न - राजस्थानचे कोणते लोकनृत्य खूप प्रसिद्ध आहे ?
बरोबर उत्तर आहे, राजस्थानचे घुमर लोकनृत्य खूप प्रसिद्ध आहे. 

चौथा प्रश्न - राजस्थानमध्ये रोजच्या जीवनात वापरला जाणारा प्राणी कोणता आहे. ?
बरोबर उत्तर आहे, राजस्थानमध्ये उंट हा रोजच्या जीवनात वापरला जाणारा प्राणी आहे.

शेवटचा पाचवा प्रश्न - क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
बरोबर उत्तर आहे - क्षेत्रफळानुसार राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Friday, 27 March 2026

दिनविशेष माहिती - 28 मार्च ( Guru Angad dev )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 28 मार्च शीख धर्माचे दुसरे गुरु अंगद देव यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण गुरु अंगद देव यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

शीख धर्माचे दुसरे गुरु अंगद देव

शीख धर्मातील महान गुरुंपैकी गुरु अंगद देव यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. ते शीख धर्माचे दुसरे गुरु होते. त्यांचा जन्म 31 मार्च 1504 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांचे मूळ नाव ‘भाई लहणा’ असे होते. शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु म्हणजे गुरु नानक देव यांच्या शिकवणीने प्रेरित होऊन गुरु अंगद देव यांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले आणि पुढे तेच शीख पंथाचे दुसरे गुरु झाले.
गुरु अंगद देव यांनी आपल्या आयुष्यात समाजसेवा, शिक्षण आणि समानतेचा संदेश दिला. त्यांनी सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र आणून मानवतेचा विचार रुजवला. त्यांच्या कार्यातील सर्वात मोठे योगदान म्हणजे गुरुमुखी लिपीचा प्रसार होय. या लिपीमुळे सामान्य लोकांनाही ज्ञान मिळणे सोपे झाले आणि शीख धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब सर्वांपर्यंत पोहोचले.
त्यांनी शारीरिक व मानसिक विकासावरही भर दिला. मुलांमध्ये शिक्षणाबरोबरच व्यायामाची सवय लागावी म्हणून त्यांनी व्यायामशाळा सुरू केल्या. समाजातील अंधश्रद्धा, भेदभाव आणि अन्याय यांना त्यांनी विरोध केला. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सेवा या मूल्यांचा त्यांनी प्रचार केला.
दिनांक 28 मार्च 1552 रोजी त्यांचे निधन झाले. गुरु अंगद देव यांच्या कार्यामुळे शीख धर्म अधिक बळकट झाला. त्यांचे जीवन आपल्याला सेवा, समानता आणि शिक्षण यांचे महत्त्व शिकवते. त्यामुळे त्यांची पुण्यतिथी आपल्याला प्रेरणा देणारा आणि आदर्शांचा विचार करण्याचा दिवस ठरतो. 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - गुरु अंगद देव यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, गुरु अंगद देव यांचा जन्म 31 मार्च 1504 रोजी पंजाबमध्ये झाला.

दुसरा प्रश्न - शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु कोण होते ? 
बरोबर उत्तर आहे, गुरु नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु होते. 

तिसरा प्रश्न - गुरुमुखी लिपीचा प्रसार कोणी केला ?
बरोबर उत्तर आहे, गुरु अंगद देव यांनी गुरुमुखी लिपीचा प्रसार केला. 

चौथा प्रश्न - शीख धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता ?
बरोबर उत्तर आहे, गुरु ग्रंथ साहिब हा शीख धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - गुरु अंगद देव यांचे निधन केव्हा झाले ? 
बरोबर उत्तर आहे - दिनांक 28 मार्च 1552 रोजी गुरु अंगद देव यांचे निधन झाले. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Thursday, 26 March 2026

दिनविशेष माहिती - 27 मार्च ( Yuri गगरीन )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 27 मार्च पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले अंतराळवीर युरी गागरीन यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने 
 आजच्या कार्यक्रमात आपण युरी गागरीन यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर – युरी गागरीन 
मानवाच्या जिज्ञासू स्वभावामुळे त्यांनी नेहमीच आकाशाकडे पाहून अंतराळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना यश देणारे पहिले अंतराळवीर म्हणजे यूरी गागरिन होय. त्यांनी 12 एप्रिल 1961 रोजी अंतराळात जाऊन पृथ्वीची प्रदक्षिणा करून मानव इतिहासात एक नवा अध्याय लिहिला.
यूरी गागरिन यांचा जन्म 9 मार्च 1934 रोजी सोवियत युनियन मधील एका छोट्या गावात झाला. त्यांचे बालपण अत्यंत साध्या कुटुंबात गेले. लहानपणापासून त्यांना विमान उडवण्याची खूप आवड होती. त्यांनी शिक्षण पूर्ण करून वैमानिक प्रशिक्षण घेतले आणि पुढे अंतराळवीर म्हणून त्यांची निवड झाली.
12 एप्रिल 1961 हा दिवस मानवजातीसाठी ऐतिहासिक ठरला. या दिवशी गगारिन यांनी वोस्टॊक वन या अंतराळयानातून अवकाशात झेप घेतली. त्यांनी सुमारे 108 मिनिटांत पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण केली. अंतराळात गेलेले ते पहिले मानव ठरले. अंतराळातून त्यांनी “पृथ्वी खूप सुंदर दिसते” असे उद्गार काढले, जे आजही प्रसिद्ध आहेत.
गागरिन यांच्या या यशामुळे अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठी क्रांती घडली. त्यांच्या कामगिरीमुळे जगभरातील वैज्ञानिकांना प्रेरणा मिळाली आणि अंतराळ स्पर्धेला वेग आला. अनेक देशांनी अंतराळ मोहिमा सुरू केल्या आणि नवीन संशोधनाला चालना मिळाली.
दुर्दैवाने, 27 मार्च 1968 रोजी विमान अपघातात यूरी गगारिन यांचे निधन झाले. मात्र त्यांचे कार्य आणि योगदान आजही अमर आहे. त्यांच्या सन्मानार्थ 12 एप्रिल हा दिवस “आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस” म्हणून साजरा केला जातो.
यूरी गगारिन यांनी मानवाला अंतराळाच्या नव्या युगात प्रवेश करून दिला आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
आज त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने युरी गागरीन यांना विनम्र अभिवादन 🙏

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - यूरी गागरिन यांचा जन्म केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे, यूरी गागरिन यांचा जन्म 9 मार्च 1934 रोजी सोवियत युनियन मधील एका छोट्या गावात झाला. 

दुसरा प्रश्न - यूरी गागरिन यांना लहानपणापासून कशाची आवड होती ? 
बरोबर उत्तर आहे, यूरी गागरिन यांना लहानपणापासून विमान उडवण्याची खूप आवड होती. 

तिसरा प्रश्न - यूरी गागरिन यांनी किती मिनिटांत पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण केली ?
बरोबर उत्तर आहे, यूरी गागरिन यांनी त्यांनी सुमारे 108 मिनिटांत पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण केली. 

चौथा प्रश्न - यूरी गागरिन यांनी अंतराळातून कोणते उद्गार काढले ?
बरोबर उत्तर आहे, यूरी गागरिन यांनी अंतराळातून “पृथ्वी खूप सुंदर दिसते” असे उद्गार काढले.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - यूरी गगारिन यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - 27 मार्च 1968 रोजी विमान अपघातात यूरी गगारिन यांचे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Tuesday, 24 March 2026

दिनविशेष माहिती - 25 मार्च ( Vasant Govarikar )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
आज 25 मार्च अर्थात अवकाश संशोधन व हवामान क्षेत्रातील महान शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांची जयंती त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण डॉ. वसंत गोवारीकर यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर
भारत देशात अनेक महान शास्त्रज्ञ झाले, ज्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यापैकी एक प्रमुख नाव म्हणजे डॉ. वसंत गोवारीकर. ते एक प्रतिभावान शास्त्रज्ञ, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ होते.
डॉ. वसंत गोवारीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडील इंजिनियर होते. लहानपणापासूनच त्यांना विज्ञान आणि संशोधनाची आवड होती. त्यांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने उच्च शिक्षण पूर्ण केले. लंडनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी मास्टर्स आणि डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. विज्ञान क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
ते विशेषतः अवकाश संशोधन क्षेत्राशी संबंधित होते. त्यांनी थुंबा येथील भारताच्या अवकाश संशोधन संस्थेत म्हणजेच ISRO मध्ये महत्त्वाची भूमिकाjw बजावली. भारताच्या उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी रॉकेट तंत्रज्ञानाच्या विकासातही महत्त्वाचे कार्य केले. डॉ. वसंत गोवारीकर हे मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते.
वसंत गोवारीकर यांनी केवळ अवकाश क्षेत्रातच नव्हे तर हवामानशास्त्र आणि पावसाच्या अंदाजाबाबतही संशोधन केले. त्यांनी ‘मॉन्सून मॉडेल’ विकसित करून पावसाचा अंदाज अधिक अचूक करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कार्यामुळे शेती आणि अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला.
त्यांनी शिक्षण क्षेत्रातही मोठे योगदान दिले. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आणि विज्ञानाची आवड निर्माण केली. ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते.
त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल भारतीय खगोल मंडळाच्या वतीने आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आला होता. भारत सरकारच्या वतीने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे सन्मान देऊन गौरविण्यात आले होते. ते भारतातील नामांकित शास्त्रज्ञांपैकी एक मानले जातात. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दिनांक ०२ जानेवारी २०१५ रोजी मृत्यू झाला. 
वसंत गोवारीकर यांचे जीवन आपल्याला कष्ट, जिद्द आणि ज्ञानाची महती शिकवते. आज डॉ. वसंत गोवारीकर यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम ! 🙏

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - डॉ. वसंत गोवारीकर यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. वसंत गोवारीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला.

दुसरा प्रश्न - डॉ. वसंत गोवारीकर यांना लहानपणापासूनच कशाची आवड होती ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. वसंत गोवारीकर यांना लहानपणापासूनच विज्ञान आणि संशोधनाची आवड होती.

तिसरा प्रश्न - पावसाचा अंदाज अचूक व्यक्त करण्यासाठी डॉ. वसंत गोवारीकर यांनी कोणते मॉडेल तयार केले ?
बरोबर उत्तर आहे, पावसाचा अंदाज अचूक व्यक्त करण्यासाठी डॉ. वसंत गोवारीकर यांनी मान्सून मॉडेल तयार केले.

चौथा प्रश्न - भारतीय खगोल मंडळाच्या वतीने डॉ. वसंत गोवारीकर यांना कोणता पुरस्कार देण्यात आला होता ? 
बरोबर उत्तर आहे, भारतीय खगोल मंडळाच्या वतीने डॉ. वसंत गोवारीकर यांना आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आला होता. 

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - डॉ. वसंत गोवारीकर यांचा मृत्यू केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे - दिनांक ०२ जानेवारी २०१५ रोजी पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉ. वसंत गोवारीकर यांचा मृत्यू झाला. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Monday, 23 March 2026

दिनविशेष माहिती 24 मार्च ( TB )

    नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 24 मार्च अर्थात जागतिक क्षयरोग दिवस तेव्हा आजच्या कार्यक्रमात आपण क्षयरोग या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

     जागतिक क्षयरोग दिन – 24 मार्च
जागतिक स्तरावर आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध दिवस साजरे केले जातात. त्यापैकी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो. हा दिवस क्षयरोग ज्यास आपण (TB) या नावाने ओळखतो, याचा मुख्य उद्देश क्षयरोगाबद्दल (TB) जागरूकता निर्माण करणे आणि या आजाराचे निर्मूलन करणे हा आहे.
या दिवसाचा इतिहास डॉ. रॉबर्ट कोच यांच्याशी जोडलेला आहे. डॉ. रॉबर्ट कोच यांनी 24 मार्च 1882 रोजी क्षयरोगाचा जंतू (Mycobacterium tuberculosis) शोधून काढले. त्यांच्या या शोधामुळे क्षयरोगाच्या निदान आणि उपचाराला मोठी मदत झाली. त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो.

क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे. तो मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो, परंतु शरीरातील इतर अवयवांना देखील बाधित करू शकतो. हा आजार संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकताना हवेत पसरतो. सतत खोकला, वजन कमी होणे, ताप येणे, रात्री घाम येणे ही त्याची मुख्य लक्षणे आहेत.
World Health Organization (WHO) च्या मते, क्षयरोग हा अजूनही जगातील मोठ्या आरोग्य समस्यांपैकी एक आहे. विशेषतः विकसनशील देशांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो. योग्य वेळी उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो.
क्षयरोग टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करायला हवे जसे की, स्वच्छता राखणे, पौष्टिक आहार घेणे, खोकताना तोंड झाकणे, वेळेवर तपासणी व उपचार करणे, BCG लसीकरण घेणे.
दरवर्षी या दिवसासाठी वेगवेगळी संकल्पना (Theme) दिली जाते, ज्याद्वारे लोकांमध्ये जागरूकता वाढवली जाते. सरकार व विविध आरोग्य संस्था मोफत तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करून देतात.
शेवटी, क्षयरोग हा घातक असला तरी योग्य माहिती, वेळेवर निदान आणि उपचार यांच्या मदतीने त्यावर नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहून स्वतःचे व समाजाचे आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे.
“क्षयरोगमुक्त भारत” हे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - जागतिक क्षयरोग दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो ?
बरोबर उत्तर आहे,  24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो.

दुसरा प्रश्न - क्षयरोग ज्यास आपण कोणत्या नावाने ओळखतो ?
बरोबर उत्तर आहे, क्षयरोग ज्यास आपण (TB) या नावाने ओळखतो.

तिसरा प्रश्न - क्षयरोगाचा जंतूचा शोध कोणी लावला ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाचा जंतूचा शोध लावला.

चौथा प्रश्न - डॉ. रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाचा जंतूचा शोध केव्हा लावला ?
बरोबर उत्तर आहे,  रॉबर्ट कोच यांनी 24 मार्च 1882 रोजी क्षयरोगाचा जंतू शोधून काढला.
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - WHO चे full form सांगा.
बरोबर उत्तर आहे - World Health Organization (WHO)

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Sunday, 22 March 2026

दिनविशेष माहिती - 23 मार्च ( Shahid Diwas )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 23 मार्च अर्थात शहीद दिवस त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण भारतीय स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेल्या क्रांतीवीरांची माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

         23 मार्च - शहीद दिवस 
भारताचा स्वातंत्र्यलढा हा त्याग, बलिदान आणि देशप्रेमाची प्रेरणादायी गाथा आहे. या लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा शूर वीरांच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून वीरांना वंदन केले जाते. 
23 मार्च 1931 हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांना ब्रिटिश सत्तेने फाशी दिली. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत बलिदान दिले आणि संपूर्ण देशाला प्रेरणा दिली.
या घटनेमागे एक महत्त्वाचा इतिहास आहे. पंजाब केसरी म्हणून ओळखले जाणारे लाला लाजपत राय हे एक महान राष्ट्रभक्त नेते होते. 1928 मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन करत असताना ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. रामाप्रसाद बिस्मिल यांच्या “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है।” ह्या गीताने अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली. लाला लाजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी ब्रिटिश अधिकारी सॉन्डर्सवर हल्ला केला. ही घटना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली.
भगतसिंग हे अत्यंत धाडसी आणि विचारशील क्रांतिकारक होते. त्यांनी “इन्कलाब जिंदाबाद” ही घोषणा देऊन तरुणांना जागृत केले. राजगुरू आणि सुखदेव यांनीही त्यांच्या सोबत निडरपणे स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.
शहीद दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत केली जाते.
हा दिवस आपल्याला शिकवतो की स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही, तर अनेक वीरांच्या बलिदानातून मिळाले आहे. त्यामुळे आपण आपल्या देशाबद्दल निष्ठा आणि कर्तव्यभावना ठेवली पाहिजे.
शहीद दिवस हा प्रेरणादायी दिवस आहे. लाला लाजपत राय यांच्या त्यागापासून ते भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानापर्यंतचा हा इतिहास आपल्याला देशप्रेम, धैर्य आणि त्याग यांचे मूल्य शिकवतो. त्यांच्या आदर्शांवर चालणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांना ब्रिटिश सत्तेने कोणत्या तारखेला फाशी दिली ?
बरोबर उत्तर आहे, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांना ब्रिटिश सत्तेने 23 मार्च 1931 रोजी फाशी दिली.

दुसरा प्रश्न - सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले ?
बरोबर उत्तर आहे, सन 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आले

तिसरा प्रश्न - पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, लाला लाजपत राय यांना पंजाब केसरी म्हणून ओळखले जाते.

चौथा प्रश्न - सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन करत असताना कोणाचा मृत्यू झाला ?
बरोबर उत्तर आहे, सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन करत असताना लाला लाजपत राय यांचा मृत्यू झाला.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - भगतसिंग यांनी कोणती घोषणा देऊन तरुणांना जागृत केले ?
बरोबर उत्तर आहे - भगतसिंग यांनी “इन्कलाब जिंदाबाद” ही घोषणा देऊन तरुणांना जागृत केले. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

विद्यार्थी प्रिय शिक्षक : कृष्णा येरावार

विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षक कृष्णा येरावार धर्माबाद तालुक्यातील बाळापूर केंद्रातील पी एम श्री जि. प. प्रा. शाळा बे...