नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो..
मुलांनो तुम्हांला हे गीत आठवते का ? ( Audio) हे गीत कुणी लिहिलं आहे ? हे तुम्हांला माहित आहे काय ?
तर हे गीत मराठीतील प्रसिद्ध कवयित्री संजीवनी मराठे यांनी लिहिलं आहे, तर आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ या. तयार आहात ना तुम्ही........!
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
मराठी साहित्यातील बहुआयामी कवयित्री : संजीवनी मराठे
मराठी साहित्यात अनेक प्रतिभावान कवयित्रींनी आपल्या लेखणीतून समाजमनाला स्पर्श केला आहे. त्या प्रतिभावान कवयित्रींपैकी एक म्हणजे संजीवनी मराठे. त्यांच्या काव्यातून स्त्रीमनातील कोमल भावना, निसर्गप्रेम, तसेच सामाजिक जाणीवा प्रभावीपणे व्यक्त झालेल्या दिसतात. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९१६ रोजी पुण्यात झाला. लहानपणापासूनच प्रतिभावान
संजीवनी रामचंद्र मराठे यांचे शिक्षण पुण्यात झाले. शाळकरी वयातच त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली आणि मॅट्रिकनंतर वडिलांनी त्यांच्या कवितांचा 'काव्यसंजीवनी' संग्रह प्रकाशित केला. त्यांना बा. भ. बोरकर, पद्मा गोळे आणि गजानन वाटवे यांसारख्या साहित्यिकांचा सहवास लाभला, ज्यामुळे त्यांची प्रतिभा बहरली. त्यांच्या आयुष्यातील अनुभव, निरीक्षणे आणि समाजातील बदल यांचा प्रभाव त्यांच्या कवितांवर स्पष्टपणे दिसून येतो.
संजीवनी मराठे या मुख्यतः कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या कवितांमध्ये स्त्रीभावविश्व, प्रेम, करुणा, निसर्ग, तसेच सामाजिक वास्तव यांचे सुंदर चित्रण आढळते. त्यांच्या रचनांमध्ये साधी, सुबोध आणि प्रभावी भाषा वापरलेली दिसते. त्यामुळे त्यांच्या कविता सर्वसामान्य वाचकांनाही सहज समजतात. त्यांच्या काही कवितांमध्ये स्त्रीच्या आत्मसन्मानाचा आणि स्वातंत्र्याचा प्रभावी स्वर उमटतो. त्यांनी स्त्रीच्या मनातील भावना अत्यंत संवेदनशीलतेने मांडल्या आहेत.
संजीवनी मराठे यांनी कविता, गीते, बालसाहित्य, अनुवाद आणि संपादन केले. 'बरं का गं आई' आणि 'हसू बाई हसू' या कवितासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
बालकवितांमध्ये निसर्ग, उत्सव, नातेसंबंध आणि देशभक्ती यांचे वैविध्य आहे; उदा. 'टाळी वाजली कड कड कड' सारख्या ओळी लहानांना भुरळ घालतात.
स्वतः गायिका असल्याने कविसंमेलनांत त्या आपल्या कविता सुरेल आवाजात गायच्या. गायनासोबत त्यांना चित्रकलादेखील आवडीचा विषय होता.
त्यांच्या कवितांमध्ये उत्साह, सकारात्मकता आणि जीवनाचा आस्वाद सदैव असतो.
शालेय अभ्यासक्रमात अमर
'माय मराठी', 'मी पंथती' सारख्या कविता आहेत आणि आजही गायल्या जातात. संजीवनी मराठे यांचे १ एप्रिल २००० रोजी निधन झाले.
संजीवनी मराठे यांनी आपल्या काव्यलेखनातून मराठी साहित्यात मोलाची भर घातली. त्यांच्या कवितांमुळे वाचकांच्या मनात संवेदनशीलता आणि सकारात्मक विचारांची जागृती होते. मराठी कवयित्रींमध्ये त्यांचे स्थान आदराचे आहे.
आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या लेखणीला सादर प्रणाम 🙏
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - कवयित्री संजीवनी मराठे यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, विद्येचे माहेरघर पुण्यात कवयित्री संजीवनी मराठे यांचा जन्म झाला.
दुसरा प्रश्न - वडिलांनी प्रकाशित केलेल्या कविता संग्रहाचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, 'काव्यसंजीवनी' हा कवितासंग्रह त्यांच्या वडिलांनी प्रकाशित केला.
तिसरा प्रश्न - 'हसू बाई हसू' या कवितासंग्रहांला कोणता पुरस्कार मिळाला ?
बरोबर उत्तर आहे, 'हसू बाई हसू' या कवितासंग्रहांला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
चौथा प्रश्न - माय मराठी ही कविता कुणी लिहिली ?
बरोबर उत्तर आहे, कवयित्री संजीवनी मराठे यांनी माय मराठी ही कविता लिहिली.
शेवटचा पाचवा प्रश्न - गायनासोबत त्यांना अन्य कोणता विषय आवडीचा होता ?
बरोबर उत्तर आहे - गायनासोबत त्यांना चित्रकलादेखील आवडीचा विषय होता.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769