Sunday, 19 July 2026

दिनविशेष माहिती - 20 जुलै


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आज २० जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस (International Moon Day) म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण ह्या दिवसा विषयी माहिती समजून घेऊ या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग ऐकू या ......


विद्यार्थी मित्रांनो, रात्रीच्या आकाशात चमकणारा चंद्र आपला सर्वात जवळचा नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र आपल्याला प्रकाश देत नाही, तर तो सूर्यप्रकाश परावर्तित करतो. चंद्र पृथ्वीपासून सुमारे ३ लाख ८४ हजार ४०० किलोमीटर अंतरावर आहे.
२० जुलै १९६९ हा दिवस मानवजातीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला. याच दिवशी अमेरिकेच्या अपोलो-११ मोहिमेद्वारे मानवाने प्रथमच चंद्रावर पाऊल ठेवले. अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले. त्यांच्यासोबत बझ ऑल्ड्रिन यांनीही चंद्रावर भ्रमण केले, तर मायकेल कॉलिन्स हे अंतराळयानातच कक्षेत राहिले.
नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पाऊल ठेवताना म्हटलेले प्रसिद्ध वाक्य आजही जगभर प्रसिद्ध आहे – "हे एका माणसाचे छोटे पाऊल आहे; पण मानवजातीसाठी ही एक मोठी झेप आहे."
या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रसंघाने (United Nations) २०२१ पासून २० जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली.
भारतानेही चंद्र संशोधनात मोठी कामगिरी केली आहे. चांद्रयान-१ मोहिमेद्वारे चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचा महत्त्वाचा शोध लागला. त्यानंतर चांद्रयान-३ मोहिमेद्वारे २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी सॉफ्ट लँडिंग करून इतिहास घडवला. त्यामुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीपणे उतरलेला जगातील पहिला देश ठरला.
आंतरराष्ट्रीय चंद्र दिवसाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, अंतराळ संशोधन आणि खगोलशास्त्राबद्दल आवड निर्माण करणे, तसेच शांततापूर्ण अंतराळ संशोधनाला प्रोत्साहन देणे हा आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आजचे विज्ञान हे उद्याचे भविष्य आहे. कदाचित तुमच्यापैकीच एखादा विद्यार्थी भविष्यात अंतराळ वैज्ञानिक किंवा अंतराळवीर बनेल. म्हणूनच विज्ञानाची आवड जोपासा, जिज्ञासा वाढवा आणि मोठी स्वप्ने पाहा.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस (International Moon Day) केव्हा साजरा केला जातो ?
बरोबर उत्तर आहे, २० जुलै रोजी आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस (International Moon Day) म्हणून साजरा केला जातो

दुसरा प्रश्न -  आपल्या सर्वात जवळचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे ?
बरोबर उत्तर आहे, चंद्र आपला सर्वात जवळचा नैसर्गिक उपग्रह आहे.

तिसरा प्रश्न - चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव कोण ?
बरोबर उत्तर आहे, अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव होय.

चौथा प्रश्न - अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिले पाऊल केव्हा ठेवले ?
बरोबर उत्तर आहे, २० जुलै १९६९ रोजी अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले.

शेवटचा पाचवा प्रश्न - कोणत्या मोहिमेद्वारे चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचा भारताने महत्त्वाचा शोध लागला. ?
बरोबर उत्तर आहे - चांद्रयान-१ मोहिमेद्वारे चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचा भारताने महत्त्वाचा शोध लागला.

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

धन्यवाद! 🚀🌕

-----------------------------------------------
जागतिक बुद्धिबळ दिन – २० जुलै

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज २० जुलै हा दिवस जागतिक बुद्धिबळ दिन (World Chess Day) म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण  बुद्धिबळ या खेळाविषयी माहिती जाणून घेऊ या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग ऐकू या ......
विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिबळ हा जगातील सर्वात जुना आणि बुद्धीला चालना देणारा खेळ मानला जातो. या खेळाचा उगम भारतात झाला. प्राचीन काळात या खेळाला 'चतुरंग' असे म्हणत असत. नंतर हा खेळ पर्शिया, अरब देश आणि युरोपमार्गे संपूर्ण जगात पोहोचला.
२० जुलै १९२४ रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) ची स्थापना झाली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रसंघाने २०१९ मध्ये २० जुलै हा दिवस 'जागतिक बुद्धिबळ दिन' म्हणून घोषित केला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जगभर साजरा केला जातो.
बुद्धिबळामध्ये ६४ चौकटी आणि ३२ मोहरे असतात. प्रत्येक खेळाडूकडे १६ मोहरे असतात. राजा, राणी, हत्ती, उंट, घोडा आणि प्यादी या मोहऱ्यांचा योग्य वापर करून प्रतिस्पर्ध्याच्या राजाला शह आणि मात देणे हे या खेळाचे उद्दिष्ट असते. राजा हा बुद्धिबळातील सर्वात महत्त्वाचा मोहरा आहे.
बुद्धिबळ हा केवळ मनोरंजनाचा खेळ नाही, तर तो एकाग्रता, स्मरणशक्ती, संयम, नियोजन, निर्णयक्षमता आणि तर्कशक्ती वाढविणारा खेळ आहे. म्हणूनच जगभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बुद्धिबळ शिकण्यास प्रोत्साहन दिले जाते.
भारताला बुद्धिबळाच्या क्षेत्रात मोठा अभिमान आहे. विश्वनाथन आनंद हे भारताचे पहिले विश्वविजेते बुद्धिबळपटू आहेत. त्यांच्या यशामुळे भारतात बुद्धिबळाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. आज भारतातील अनेक युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. त्यामध्ये डी. गुकेश, आर. प्रज्ञानानंद, अर्जुन एरिगैसी आणि कोनेरू हम्पी यांसारखे खेळाडू विशेष उल्लेखनीय आहेत.
विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिबळ आपल्याला प्रत्येक चाल विचारपूर्वक खेळायला शिकवते. जीवनातही कोणताही निर्णय घाईत न घेता विचारपूर्वक घेतला तर यश निश्चित मिळते.
चला, या जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त आपण बुद्धिबळ खेळण्याची सवय लावूया, आपली विचारशक्ती वाढवूया आणि आपल्या बुद्धीचा विकास करूया.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न -  बुद्धिबळ खेळाचा उगम कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, बुद्धिबळ खेळाचा उगम भारतात झाला. 

दुसरा प्रश्न - प्राचीन काळात बुद्धिबळ या खेळाला काय म्हणत असत ?
बरोबर उत्तर आहे, प्राचीन काळात बुद्धिबळ या खेळाला 'चतुरंग' असे म्हणत असत.

तिसरा प्रश्न - आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) ची स्थापना कोठे झाली.  ?
बरोबर उत्तर आहे, फ्रान्स ची राजधानी पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) ची स्थापना झाली. 

चौथा प्रश्न - बुद्धिबळातील सर्वात महत्त्वाचा मोहरा कोणता ?
बरोबर उत्तर आहे, राजा हा बुद्धिबळातील सर्वात महत्त्वाचा मोहरा आहे.

शेवटचा पाचवा प्रश्न - भारताचे पहिले विश्वविजेते बुद्धिबळपटू कोण आहेत. ?
बरोबर उत्तर आहे - विश्वनाथन आनंद हे भारताचे पहिले विश्वविजेते बुद्धिबळपटू आहेत.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
धन्यवाद! ♟️🌍

Friday, 17 July 2026

दिनविशेष माहिती - 18 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज  १८ जुलै  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन
 निमित्ताने त्यांच्या साहित्य आणि कार्याविषयी माहिती जाणून घेऊ या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग ऐकू या ......
आज १८ जुलै मराठी साहित्यविश्वातील थोर साहित्यिक, समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे त्यांना औपचारिक शिक्षण घेता आले नाही. पण त्यांनी जीवनालाच आपले विद्यापीठ मानले. आपल्या निरीक्षणशक्ती, अनुभव आणि वाचनाच्या बळावर ते एक महान साहित्यिक बनले.
अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नव्हते, तर ते लोकशाहीर, समाजसुधारक आणि जनतेचे कवी होते. त्यांनी आपल्या साहित्यातून गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि वंचित समाजाचे दुःख, संघर्ष आणि स्वाभिमान यांचे जिवंत चित्रण केले.
त्यांनी ३५ हून अधिक कादंबऱ्या, अनेक कथा, पोवाडे, लावण्या, लोकनाट्ये आणि प्रवासवर्णने लिहिली. त्यांची 'फकिरा' ही कादंबरी विशेष गाजली असून तिला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. अण्णाभाऊ साठे हे लोकशाहीर असल्यामुळे त्यांनी स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि शौर्य यांवर अनेक पोवाडे लिहिले. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे गौरवगान करणारे पोवाडे विशेष प्रसिद्ध आहेत.
अण्णाभाऊ साठे हे सोव्हिएत रशियाला भेट देणारे पहिले मराठी साहित्यिक मानले जातात. त्यांच्या साहित्यकृतींचे रशियनसह अनेक परदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले. त्यामुळे मराठी साहित्याचा गौरव जगभर पोहोचविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
त्यांचा एक प्रसिद्ध विचार आहे—
"ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नव्हे, तर कष्टकरी कामगारांच्या तळहातावर पेलली आहे."
या विचारातून त्यांनी श्रमाचे महत्त्व आणि कष्टकरी माणसाचा सन्मान अधोरेखित केला.
१८ जुलै १९६९ रोजी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांचे विचार, साहित्य आणि समाजप्रबोधनाचे कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे.
विद्यार्थी मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातून आपण हे शिकले पाहिजे की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, कष्ट, आत्मविश्वास आणि शिक्षणाची ओढ असेल तर मोठे यश मिळवता येते. समाजातील प्रत्येक माणसाचा आदर करणे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.


मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? आम्हांला नक्की कळवा. 

चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

१) अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय होते ?
उत्तर: तुकाराम भाऊराव साठे.

२) अण्णाभाऊ साठे यांचा जन्म केव्हा व कुठे झाला ?
उत्तर: १ ऑगस्ट १९२० रोजी वाटेगाव, जि. सांगली येथे.

३) अण्णाभाऊ साठे यांची प्रसिद्ध कादंबरी कोणती आहे ?
उत्तर: फकिरा.

४) अण्णाभाऊ साठे हे कोणत्या देशाला भेट देणारे पहिले मराठी साहित्यिक मानले जातात ?
उत्तर: सोव्हिएत रशिया (USSR).

५) अण्णाभाऊ साठे यांचे निधन केव्हा झाले ?
उत्तर: अण्णाभाऊ साठे यांचे १८ जुलै १९६९ रोजी निधन झाले.


( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Wednesday, 15 July 2026

दिनविशेष माहिती - 16 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात? मजेत ना?

मी नासा येवतीकर. दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनःपूर्वक स्वागत करतो.

आज १६ जुलै. हा दिवस संपूर्ण जगभर "जागतिक सर्पदिन" (World Snake Day) म्हणून पाळला जातो. या दिवसानिमित्त आपण सापांविषयीचे गैरसमज दूर करून त्यांचे पर्यावरणातील महत्त्व जाणून घेणार आहोत.

लक्षपूर्वक ऐका हं ! कारण या माहितीच्या आधारे शेवटी तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.

चला तर मग, आजची माहिती ऐकूया...
दरवर्षी १६ जुलै रोजी जागतिक सर्पदिन साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे सापांबद्दल जनजागृती करणे, त्यांच्याविषयी असलेली भीती आणि अंधश्रद्धा दूर करणे तसेच त्यांचे संरक्षण करण्याचा संदेश देणे.
विद्यार्थी मित्रांनो, साप हा निसर्गातील अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे. तो उंदीर, घूस आणि पिकांचे नुकसान करणाऱ्या इतर प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा तो एक प्रकारे मित्रच आहे.
भारतात सापांच्या जवळपास 300 प्रजाती आढळतात. साप तीन प्रकारचे असतात एक विषारी साप, दुसरे निम विषारी साप आणि तिसरे बिन विषारी साप. त्यामुळे प्रत्येक साप विषारी असतो, हा समज चुकीचा आहे.
भारतात एकूण चार सर्वाधिक विषारी साप आहेत. त्यात नाग हा विषारी साप भारतात बहुतेक ठिकाणी आढळून येतो. 
आपल्याला एखादा साप दिसला तर त्याला मारण्याचा प्रयत्न करू नये. त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि तात्काळ वनविभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांना माहिती द्यावी. साप पकडण्याचा किंवा त्याच्याशी खेळ करण्याचा प्रयत्न कधीही करू नये.
पावसाळ्यात साप बऱ्याचदा बिळांमधून बाहेर येतात. त्यामुळे घराच्या आसपास स्वच्छता ठेवणे, कचरा किंवा लाकडांचे ढीग साचू न देणे, रात्री टॉर्चचा वापर करणे आणि पायात चप्पल किंवा बूट घालणे या साध्या सवयी अपघात टाळण्यास मदत करतात. सर्प दंश झाल्यावर वेळ न दवडता दवाखान्यात जावे. मांत्रिक किंवा इतर झाडपालाची औषधं खाऊन आपला वेळ वाया घालवू नये.
मित्रांनो, निसर्गातील प्रत्येक सजीवाचे स्वतःचे महत्त्व असते. सापांचे संरक्षण म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण होय. म्हणून आपण सापांबद्दल भीती नव्हे तर योग्य माहिती आणि जागरूकता बाळगली पाहिजे.
चला, जागतिक सर्पदिनानिमित्त आपण असा संकल्प करूया—
"सापांबद्दल अंधश्रद्धा पसरवणार नाही, त्यांचे संरक्षण करू आणि निसर्गातील प्रत्येक सजीवाचा आदर करू."

मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला नक्की कळवा.
आता या माहितीवर आधारित पाच प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहूया.

प्रश्न १ : जागतिक सर्पदिन केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : जागतिक सर्पदिन दरवर्षी १६ जुलै रोजी साजरा केला जातो.

प्रश्न २ : शेतकऱ्यांचा खरा मित्र कोण ?
उत्तर : साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. 

प्रश्न ३ : सापाचे एकूण किती प्रकार आहेत ?
उत्तर : सापाचे एकूण तीन प्रकार आहेत, विषारी साप, निम विषारी साप आणि बिन विषारी साप.

प्रश्न ४ : भारतातील सर्वाधिक विषारी साप कोणता ?
उत्तर : नाग हा भारतातील सर्वाधिक विषारी साप आहे.

प्रश्न ५ : साप दिसल्यास आपण काय करावे?
उत्तर : साप दिसल्यास त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि वनविभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांना माहिती द्यावी.

वरील माहिती सर्पमित्र क्रांती बुद्धेवार यांनी संकलित केले आहे. 

चला, पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात.

तोपर्यंत नमस्कार! 🙏

निवेदन :
नासा येवतीकर, धर्माबाद
📞 ९४२३६२५७६९

Tuesday, 14 July 2026

दिनविशेष माहिती - 15 जुलै

सशक्त तरुण : सशक्त भारत

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त प्रासंगिक लेख
दरवर्षी १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन (World Youth Skills Day) म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने २०१४ मध्ये या दिवसाची घोषणा केली आणि 2015 पासून साजरा करण्यासाठी सुरुवात झाली. या दिवसामागील उद्देश म्हणजे तरुणांना रोजगारक्षम, स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक बनविण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित करणे. कारण कोणत्याही राष्ट्राचे भविष्य त्याच्या तरुणांच्या हातात असते. तरुण सक्षम असतील, कौशल्यसंपन्न असतील, तरच राष्ट्र प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचू शकते.
भारत हा जगातील सर्वांत तरुण देशांपैकी एक आहे. आपल्या देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही युवा आहे. हीच भारताची खरी ताकद आहे. मात्र केवळ मोठी युवा लोकसंख्या असणे पुरेसे नाही; त्या तरुणांमध्ये ज्ञान, कौशल्य, चारित्र्य, नवोपक्रमाची वृत्ती आणि राष्ट्रभक्ती असणे आवश्यक आहे. म्हणूनच "सशक्त तरुण : सशक्त भारत" ही केवळ घोषणा नसून देशाच्या विकासाचा मूलमंत्र आहे.
आजचे जग झपाट्याने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, डेटा सायन्स, डिजिटल तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, जैवतंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, संघभावना, समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशील विचार आणि डिजिटल साक्षरता ही आजच्या तरुणांसाठी तितकीच महत्त्वाची आहेत.
स्वामी विवेकानंदांनी तरुणांना उद्देशून म्हटले होते, "उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका." हा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनीही युवकांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि त्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा संदेश दिला. महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा तरुणांनी कृतीत उतरविला, तर भारताचा विकास अधिक वेगाने होईल.
आज अनेक तरुण स्टार्टअप उभारत आहेत, नवीन संशोधन करत आहेत, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, सामाजिक उपक्रम राबवत आहेत आणि जगभरात भारताचा झेंडा उंचावत आहेत. ऑलिम्पिक, विज्ञान, अवकाश संशोधन, उद्योग, कला, साहित्य आणि माहिती-तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत भारतीय युवकांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. ही यशोगाथा इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मात्र दुसरीकडे काही गंभीर आव्हानेही आहेत. बेरोजगारी, अपुरी कौशल्ये, व्यसनाधीनता, सोशल मीडियाचा अतिरेकी वापर, मानसिक ताण, दिशाहीनता आणि पर्यावरणाविषयीची उदासीनता ही चिंतेची बाब आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी शासन, शैक्षणिक संस्था, पालक आणि समाज यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण, उद्योजकता, करिअर मार्गदर्शन आणि मूल्याधिष्ठित शिक्षण यावर अधिक भर दिला पाहिजे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्येही कौशल्याधारित शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेपुरते शिक्षण न घेता जीवनासाठी शिक्षण घ्यावे, स्वतःच्या आवडीची कौशल्ये विकसित करावीत आणि रोजगार निर्माण करणारे बनावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. "स्किल इंडिया", "स्टार्टअप इंडिया" आणि "डिजिटल इंडिया" यांसारखे उपक्रमही याच दिशेने महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
कौशल्य म्हणजे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नाही; तर आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वावलंबनाचा पाया आहे. कौशल्यामुळे व्यक्ती स्वतःचे जीवन घडवते आणि समाजाच्या विकासातही मोलाचे योगदान देते. कौशल्यसंपन्न युवक हे राष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीचे आधारस्तंभ असतात.
आजच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच संगणक, भाषा, संवाद, कला, क्रीडा, विज्ञान, पर्यावरण संरक्षण, आर्थिक साक्षरता आणि जीवनकौशल्ये यांचाही अभ्यास केला पाहिजे. वेळेचे नियोजन, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सतत शिकण्याची वृत्ती हीच त्यांची खरी ओळख ठरली पाहिजे.
जागतिक युवा कौशल्य दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम साजरा करण्याचा दिवस नाही. हा प्रत्येक तरुणाने स्वतःच्या क्षमतेचा शोध घेण्याचा, नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचा आणि देशाच्या प्रगतीत आपले योगदान देण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे.
भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करायचे असेल, तर प्रत्येक तरुण सक्षम, कुशल, सुसंस्कृत आणि जबाबदार असणे आवश्यक आहे. कारण राष्ट्राची खरी ताकद त्याच्या युवकांमध्ये असते. म्हणूनच आजच्या या जागतिक युवा कौशल्य दिनी आपण सर्वांनी एकच निर्धार करूया, 
"कौशल्यसंपन्न तरुण घडवू, आत्मनिर्भर भारत उभारू; सशक्त तरुण घडला तरच सशक्त भारत घडेल."

नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

Sunday, 12 July 2026

दिनविशेष माहिती - 13 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज १३ जुलै  वीर बाजीप्रभू देशपांडे बलिदान दिन
 त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण बाजीप्रभू देशपांडे यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग ऐकू या ......
स्वराज्याचे महान शिलेदार, अद्वितीय पराक्रम, स्वामिनिष्ठा आणि बलिदानाचे प्रतीक असलेले वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा आज स्मृतिदिन 

बाजीप्रभू देशपांडे यांचा जन्म इतिहासकारांच्या मतानुसार सतराव्या शतकाच्या प्रारंभी साधारणपणे इ.स. १६१५ च्या सुमारास झाला. लहानपणापासूनच त्यांना व्यायाम, कुस्ती, घोडेस्वारी आणि शस्त्रविद्येची विशेष आवड होती. त्यांची शरीरयष्टी धिप्पाड, मजबूत आणि बलवान होती. तलवारबाजी, दांडपट्टा आणि रणकौशल्य यांत ते अत्यंत प्रवीण होते. त्यांच्यात धैर्य, शिस्त, निष्ठा आणि नेतृत्वगुण यांचा सुंदर संगम होता.

सुरुवातीला ते बांदल देशमुखांच्या फौजेत कार्यरत होते. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य विस्ताराच्या मोहिमेत बांदल मावळ आपल्या बाजूने घेतला. त्या वेळी बाजीप्रभूंचे शौर्य, प्रामाणिकपणा आणि स्वराज्यावरील निष्ठा पाहून महाराजांनी त्यांना आपल्या विश्वासू सरदारांमध्ये स्थान दिले. त्यानंतर त्यांनी अनेक मोहिमांमध्ये पराक्रम गाजवत स्वराज्याच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले.

इ.स. १६६० मध्ये पन्हाळगडाला सिद्दी जौहरने वेढा दिला. त्या संकटातून छत्रपती शिवाजी महाराजांना सुरक्षितपणे विशाळगडावर पोहोचविण्याची जबाबदारी बाजीप्रभूंनी आपल्या खांद्यावर घेतली. महाराज पुढे निघाले आणि बाजीप्रभूंनी अवघ्या काहीशे मावळ्यांसह घोडखिंडीत हजारो शत्रूंना रोखून धरले.

"विशाळगडावर पोहोचल्याची तोफ ऐकू येईपर्यंत ही खिंड मी लढवीन!" अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. रणांगणात त्यांच्या शरीरावर असंख्य घाव झाले, तरीही त्यांनी तलवार हातातून सोडली नाही. अखेर विशाळगडावरून तोफेचा आवाज ऐकू आला. महाराज सुखरूप पोहोचल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर उमटले आणि स्वराज्यासाठी लढता लढता त्यांनी वीरमरण स्वीकारले.

बाजीप्रभूंच्या या अतुलनीय बलिदानामुळेच छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर सुरक्षित पोहोचले आणि स्वराज्याची ज्योत अधिक तेजाने प्रज्वलित झाली. त्यांच्या पवित्र बलिदानाच्या स्मरणार्थ घोडखिंडीला "पावनखिंड" हे नाव देण्यात आले. आजही ती भूमी प्रत्येक मराठी माणसाला शौर्य, त्याग आणि स्वामिनिष्ठेची प्रेरणा देते.

विद्यार्थी मित्रांनो, बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान हे स्वराज्यासाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागाचे प्रतीक आहे. त्यांचे शौर्य आणि राष्ट्रनिष्ठा आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत राहतात."

चला, त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून आपणही प्रामाणिकपणा, धैर्य, शिस्त आणि राष्ट्रप्रेम या गुणांचा स्वीकार करण्याचा संकल्प करूया.

जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय हिंद !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 

चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 


पहिला प्रश्न - लहानपणापासूनच बाजीप्रभू देशपांडे यांना कशाची आवड होती. ?

बरोबर उत्तर आहे, लहानपणापासूनच बाजीप्रभू देशपांडे यांना व्यायाम, कुस्ती, घोडेस्वारी आणि शस्त्रविद्येची विशेष आवड होती.


दुसरा प्रश्न - सुरुवातीला बाजीप्रभू देशपांडे कोणाच्या फौजेत कार्यरत होते. ?

बरोबर उत्तर आहे, सुरुवातीला बाजीप्रभू देशपांडे बांदल देशमुखांच्या फौजेत कार्यरत होते. 


तिसरा प्रश्न - १६६० मध्ये पन्हाळगडाला कोणी वेढा दिला होता ?

बरोबर उत्तर आहे, १६६० मध्ये पन्हाळगडाला सिद्दी जौहरने वेढा दिला. 


चौथा प्रश्न - कोणत्या गडावरून तोफेचा आवाज ऐकू आल्यावर बाजीप्रभू देशपांडे यांनी वीरमरण स्वीकारले ?

बरोबर उत्तर आहे, विशाळगडावरून तोफेचा आवाज ऐकू आल्यावर बाजीप्रभू देशपांडे यांनी वीरमरण स्वीकारले

शेवटचा पाचवा प्रश्न - बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ घोडखिंडीला कोणते नाव देण्यात आले. ?

बरोबर उत्तर आहे - बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ घोडखिंडीला "पावनखिंड" हे नाव देण्यात आले.


चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏


( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )


संकलन :- नासा येवतीकर, 9423625769


Friday, 10 July 2026

दिनविशेष माहिती - 11 जुलै

दिनविशेष माहिती कार्यक्रम

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 

कसे आहात ? मजेत ना !

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आज ११ जुलै अर्थात जागतिक लोकसंख्या दिन त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण लोकसंख्या याविषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग ऐकू या ......


११ जुलै हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्याविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. ११ जुलै १९८७ रोजी जागतिक लोकसंख्या ५ अब्जांपर्यंत पोहोचली होती, ज्याला 'फाइव्ह बिलियन डे' म्हटले गेले. सन १९९० पासून हा दिवस अधिकृतपणे जगभरात साजरा करण्यास सुरुवात झाली

विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या म्हणजे एखाद्या देशात किंवा प्रदेशात राहणाऱ्या लोकांची एकूण संख्या. लोकसंख्या ही देशाची ताकद असली, तरी तिची वाढ योग्य प्रमाणात आणि नियोजनबद्ध असणे आवश्यक आहे. लोकसंख्या झपाट्याने वाढल्यास अन्न, पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवास, वाहतूक आणि पर्यावरण यांवर मोठा ताण येतो. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवरही अतिरिक्त दबाव निर्माण होतो.

आपला भारत देश हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. आज भारताची लोकसंख्या सुमारे १४८ कोटी (१.४७७ अब्ज) इतकी आहे तर चीनची लोकसंख्या सुमारे १४१.२ कोटी (१.४१२ अब्ज) आहे. भारताने २०२३ मध्ये चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला. भारताने २०२३ मध्ये चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला.

कुटुंब नियोजन कार्यक्रमाची आखणी सुरुवातीच्या काळापासून करत आली आहे. १९८० च्या दशकात "हम दो, हमारे दो" हा घोषवाक्य देशभर अत्यंत लोकप्रिय झाला.

लोकसंख्या वाढ ही देशासाठी फायदेशीर पण आहे आणि नुकसानदायक देखील आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदार व जागरूक राहणे गरजेचे आहे. शिक्षणाचा प्रसार, स्त्री-पुरुष समानता, मुलींचे शिक्षण, चांगले आरोग्य, स्वच्छता आणि लहान कुटुंबाचा स्वीकार हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

विद्यार्थी म्हणून आपणही या विषयात योगदान देऊ शकतो. पाणी व अन्नाची नासाडी टाळणे, झाडे लावणे, स्वच्छता राखणे, ऊर्जेची बचत करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि लोकसंख्या व संसाधनांचा योग्य वापर याबाबत समाजात जनजागृती करणे ही आपली जबाबदारी आहे.

चला, आजच्या जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आपण सर्वजण "सुशिक्षित, सुदृढ, जागरूक आणि जबाबदार समाज घडवूया" असा संकल्प करूया.


मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 

चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 


पहिला प्रश्न - जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो ?

बरोबर उत्तर आहे, 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो


दुसरा प्रश्न - जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात केव्हा झाली ?

बरोबर उत्तर आहे, १९९० पासून ११ जुलै हा दिवस अधिकृतपणे जागतिक लोकसंख्या दिन म्हणून जगभरात साजरा करण्यास सुरुवात झाली.


तिसरा प्रश्न - आजच्या स्थितीत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता ?

बरोबर उत्तर आहे, भारत हा आजच्या स्थितीत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.


चौथा प्रश्न - भारताची आजची लोकसंख्या किती आहे ?

बरोबर उत्तर आहे, भारताची आजची लोकसंख्या 148 कोटी आहे


शेवटचा पाचवा प्रश्न - १९८० च्या दशकातील प्रसिद्ध घोषवाक्य कोणते ?

बरोबर उत्तर आहे - १९८० च्या दशकातील प्रसिद्ध घोषवाक्य म्हणजे "हम दो, हमारे दो".


ही सर्व माहिती Chat GPT च्या साहाय्याने तयार करण्यात आली आहे. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏


( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )


संकलन :- नासा येवतीकर, 9423625769


Thursday, 9 July 2026

दिनविशेष माहिती - 10 जुलै

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज १० जुलै जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण ऊर्जा स्वातंत्र्य याविषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 

चला तर मग ऐकू या ......

ऊर्जा म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाला गती देणारी शक्ती. वीज, पेट्रोल, डिझेल, गॅस, कोळसा आणि सूर्यप्रकाश यांसारख्या विविध स्रोतांमधून आपल्याला ऊर्जा मिळते. परंतु कोळसा, पेट्रोल आणि डिझेल यांसारखे पारंपरिक ऊर्जास्रोत मर्यादित आहेत, आज नाही तर उद्या ते संपणारे आहे. त्यांचा अतिवापर केल्याने पर्यावरणाचे नुकसान होते.
म्हणूनच ऊर्जा स्वातंत्र्य म्हणजे शक्य तितक्या प्रमाणात जी ऊर्जा कधी ही संपणार नाही असे उदाहरणार्थ सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलऊर्जा आणि जैवऊर्जा यांसारख्या स्वच्छ व नूतनीकरणक्षम ऊर्जास्रोतांचा वापर करून ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होणे. यामुळे इंधनावरील आपले अवलंबन कमी होते, पर्यावरणाचे संरक्षण होते आणि भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधने जपली जातात.
विद्यार्थी म्हणून आपणही ऊर्जा बचतीसाठी महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. वर्गातून किंवा घरातून बाहेर पडताना दिवे, पंखे आणि इतर विद्युत उपकरणे बंद करणे, गरज नसताना विद्युत उपकरणाचा वापर करू नये, दिवसा नैसर्गिक प्रकाशाचा वापर करणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि ऊर्जा बचतीचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.
लक्षात ठेवा, "ऊर्जा वाचवले तर पर्यावरण वाचेल, म्हणजेच आपले भविष्य सुरक्षित राहील." आजच्या या दिनानिमित्त आपण सर्वांनी ऊर्जा बचतीची सवय लावण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविण्याचा संकल्प करूया.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो ?
बरोबर उत्तर आहे, 10 जुलै रोजी जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. 

दुसरा प्रश्न - संपणाऱ्या पारंपरिक दोन ऊर्जास्रोताची नावे सांगा ?
बरोबर उत्तर आहे, कोळसा, पेट्रोल आणि डिझेल यासारखी पारंपरिक ऊर्जास्रोत आज नाही तर उद्या संपतात.

तिसरा प्रश्न -  न संपणाऱ्या दोन ऊर्जास्रोताची नावे सांगा ?
बरोबर उत्तर आहे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलऊर्जा आणि जैवऊर्जा ही न संपणारी ऊर्जास्रोत आहेत. 

चौथा प्रश्न - वर्गातून किंवा घरातून बाहेर पडताना काय करावे ?
बरोबर उत्तर आहे, वर्गातून किंवा घरातून बाहेर पडताना दिवे व पंखे बंद करावेत. 

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न जरा विचार करून द्या - पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी काय करावे ?
बरोबर उत्तर आहे - पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ऊर्जेची बचत करणे आवश्यक आहे. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 20 जुलै

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !   मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आज २० जुलै हा दिवस आंतर...