नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण भारताची कोकिळा : सरोजिनी नायडू यांच्या विषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
भारताची कोकिळा - सरोजिनी नायडू
सरोजिनी नायडू या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य नेत्या, उत्कृष्ट कवयित्री आणि प्रभावी वक्त्या होत्या. त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ रोजी हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील अघोरनाथ चट्टोपाध्याय हे शिक्षणतज्ज्ञ होते आणि आई वरदसुंदरी देवी या बंगाली कवयित्री होत्या. बालपणापासूनच सरोजिनींमध्ये साहित्य, कला आणि समाजसेवेची ओढ दिसून येत होती. वयाच्या १२ व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या.
त्यांनी मद्रास, लंडन व केंब्रिज येथे शिक्षण घेतले. इंग्रजी भाषेतील त्यांच्या कवितांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. The Golden Threshold, The Bird of Time आणि The Broken Wing ही त्यांची प्रसिद्ध काव्यसंग्रह आहेत. मधुर भाषा, भारतीय जीवनचित्रण आणि देशभक्तीची भावना ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये होती. त्यामुळे त्यांना “भारताची कोकिळा” (Nightingale of India) असे म्हटले जाते.
सरोजिनी नायडू यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. सत्याग्रह, असहकार चळवळ आणि 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या महिलांच्या हक्कांसाठीही सातत्याने लढल्या आणि समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.
१९२५ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या, ही भारताच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाची घटना होती. स्वातंत्र्यानंतर त्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या (१९४७). सार्वजनिक जीवनात त्यांनी प्रामाणिकपणा, करुणा आणि देशप्रेम यांचा आदर्श ठेवला.
२ मार्च १९४९ रोजी त्यांचे निधन झाले. सरोजिनी नायडू यांचे कार्य केवळ राजकीयच नव्हे तर साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातही प्रेरणादायी ठरले. भारतीय स्त्रीशक्तीचे प्रतीक म्हणून त्यांचे नाव इतिहासात अजरामर राहील.
आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने कोटी कोटी प्रणाम
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - सरोजिनी नायडू यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, हैद्राबाद येथे सरोजिनी नायडू यांचा जन्म झाला.
दुसरा प्रश्न - सरोजिनी नायडू यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, भारताची कोकिळा किंवा नाईटिंगल ऑफ इंडिया या नावाने सरोजिनी नायडू यांना ओळखले जाते.
तिसरा प्रश्न - कोणाच्या नेतृत्वाखाली सरोजिनी नायडू यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला ?
बरोबर उत्तर आहे, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सरोजिनी नायडू यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.
चौथा प्रश्न - सरोजिनी नायडू कोणत्या राज्याचे पहिल्या महिला राज्यपाल बनल्या ?
बरोबर उत्तर आहे, सरोजिनी नायडू ह्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या.
आणि शेवटचा पाचवा प्रश्न - सरोजिनी नायडू यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - २ मार्च १९४९ रोजी सरोजिनी नायडू यांचे निधन झाले.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769