Sunday, 8 March 2026

दिनविशेष माहिती - 10 मार्च ( Mangesh Padgaonkar )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
मुलांनो हे गीत ऐकू यां.... सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ? 
हे गीत कुणी लिहिलं आहे ? माहित आहे का तुम्हांला........
तर हे गीत कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलं आहे तर आजच्या कार्यक्रमात आपण कवी मंगेश पाडगावकर यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

कवी मंगेश पाडगावकर

मंगेश पाडगांवकर हे मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय आणि मान्यवर कवी होते. त्यांच्या कवितांमध्ये प्रेम, निसर्ग, जीवनातील साध्या-सुंदर भावना आणि सामाजिक जाणीवा यांचे अत्यंत सुंदर चित्रण दिसते. साधी, गेय, नादमय आणि हृदयस्पर्शी शैली ही त्यांच्या कवितेची विशेषता होती. त्यामुळे त्यांच्या कविता सर्वसामान्य लोकांमध्येही खूप लोकप्रिय झाल्या.
मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव केशव तर आईचे नाव रखमाबाई असे होते. लहानपणापासूनच त्यांना साहित्य आणि कवितेची आवड होती. त्यांनी आपले उच्च शिक्षण मुंबई येथे घेतले. पुढे त्यांनी काही काळ महाविद्यालयात अध्यापनही केले.
मंगेश पाडगावकर यांनी मराठी साहित्यात मोठे योगदान दिले. त्यांनी प्रेमकविता, बालकविता, गीत, अनुवाद आणि ललित लेखन अशा विविध प्रकारचे साहित्य निर्माण केले. त्यांच्या कवितांमध्ये साधेपणा, गोडवा आणि भावनांची खोली दिसून येते. त्यांच्या अनेक कवितांवर आधारित गीते मराठी संगीत विश्वात अत्यंत लोकप्रिय झाली. त्यांनी लिहिलेलं ' या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' हे गीत प्रत्येकजण गुणगुणल्याशिवाय राहत नाहीत. 
त्यामुळे ते केवळ कवीच नव्हे तर उत्कृष्ट गीतकार म्हणूनही ओळखले जातात. सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याशिवाय मंगेश पाडगावकर यांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांनी अनेक बालकविता आणि अनुवादित साहित्य देखील लिहिले आहे. 
मंगेश पाडगावकर यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. भारत सरकारकने त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला तर महाराष्ट्राने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. हे सन्मान त्यांच्या साहित्यिक योगदानाची पावती देतात.
टप टप करति आंगावरति प्राजक्ताची फुले
अश्या सुंदर नादमय रचना लिहिणाऱ्या कवी मंगेश पाडगावकर यांचे ३० डिसेंबर २०१५ रोजी मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वात कधी ही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली.
मंगेश पाडगावकर आज आपल्यात नसले तरी त्यांचे साहित्य, कविता, गीते आपण नेहमी ऐकत असतो. मराठी साहित्य विश्वात त्यांचे कार्य अविस्मरणीय असे आहे. 
आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्य रचनेला त्रिवार सलाम 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - मंगेश पाडगावकर यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे झाला.

दुसरा प्रश्न - कोणत्या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले ?
बरोबर उत्तर आहे, सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

तिसरा प्रश्न - कवी मंगेश पाडगावकर यांना भारत सरकाररने कोणता पुरस्कार देऊन सन्मान केला ?
बरोबर उत्तर आहे, कवी मंगेश पाडगावकर यांना भारत सरकारकने पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानकेला.

चौथा प्रश्न - सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ? हे गीत कुणी लिहिले ?
बरोबर उत्तर आहे, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ? हे गीत कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिले.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - कवी मंगेश पाडगावकर यांचे निधन कोठे झाले ?
बरोबर उत्तर आहे - कवी मंगेश पाडगावकर यांचे ३० डिसेंबर २०१५ रोजी मुंबई येथे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Saturday, 7 March 2026

दिनविशेष माहिती - 09 मार्च ( Kavi Yashwant )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण कवी यशवंत यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढारकर)

कवी यशवंत हे मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी होते. त्यांनी “यशवंत” या टोपणनावाने कविता लिहिल्या आणि मराठी कवितेला नवे सौंदर्य व भावस्पर्शी शैली दिली. त्यांच्या कवितांमध्ये प्रेम, देशभक्ती, सामाजिक जाणीव आणि मानवी भावना यांचे सुंदर चित्रण आढळते. त्यामुळे ते मराठी साहित्यातील महत्त्वाचे कवी मानले जातात.
कवी यशवंत यांचे पूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढारकर असे होते. त्यांचा जन्म ९ मार्च १८९९ रोजी सातारा जिल्ह्यातील तारळे (किंवा चाफळ परिसर) येथे झाला. सांगलीतील सिटी हायस्कूलमधून डिपार्टमेंट स्कूल फायनलच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. पुढे ते पुणे येथे नोकरीसाठी गेले. नोकरी करत असताना त्यांनी मराठी साहित्याचा अभ्यास केला. कवी माधव ज्यूलियन यांच्या सहवासात त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. पुण्यात राहात असताना ते ‘रविकिरण मंडळ’ या कवींच्या गटाशी जोडले गेले. या मंडळातील कवींनी महाराष्ट्रात काव्यवाचन कार्यक्रमांद्वारे मराठी कवितेचा प्रसार केला. यशवंत यांचा आवाज मधुर असल्यामुळे त्यांच्या काव्यवाचनाला मोठी लोकप्रियता मिळाली. कवी यशवंत यांना महाराष्ट्र कवी म्हणून गौरवाने उल्लेखले जाते. ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते. काव्य ही एक उपासना आहे, ते एक व्रत आहे, अशी त्यांच्या मनाची धारणा होती. 
त्यांच्या कवितांमध्ये भावनांची तीव्रता, ओजस्वीपणा आणि साधी-सोप्या भाषेचा वापर दिसतो. त्यामुळे सामान्य लोकांनाही त्यांची कविता सहज समजते.
कवी यशवंत यांनी अनेक काव्यसंग्रह लिहिले. याशिवाय त्यांनी मुलांसाठीही काही कविता लिहिल्या. त्यांची घायाळ ही अनुवादीत कादंबरी खूप प्रसिद्ध झाली. सन १९२२ मध्ये लिहिलेल्या "आई' या कवितेतील गोडवा आजही कायम आहे. ते म्हणतात, 
आई म्हणोनि कोणी
आईस हाक मारी,
ती हाक येई कानी
मज होय शोककारी.
स्वामी तिन्ही जगांचा 
आईविना भिकारी
या ओळींमध्ये कवी यशवंत यांनी आईचे प्रेम, माया आणि तिचे महत्त्व अतिशय भावपूर्ण पद्धतीने व्यक्त केले आहे.
कवी यशवंत यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक सन्मान मिळाले. त्यांना ‘राजकवी’ हा किताब देण्यात आला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा सन्मान दिला. सन १९५० मध्ये मुंबईत भरलेल्या ३३ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 
कवी यशवंत यांचे २६ नोव्हेंबर १९८५ रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांनी आपल्या कवितांद्वारे मराठी साहित्य समृद्ध केले.
कवी यशवंत हे मराठी काव्यविश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी कवी होते. त्यांच्या कवितेत मानवी भावना, राष्ट्रप्रेम आणि समाजजीवनाचे वास्तव दिसते. साधी, गेय आणि भावस्पर्शी शैली ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे मराठी साहित्यात त्यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - कवी यशवंत यांचे पूर्ण नाव सांगा.
बरोबर उत्तर आहे, कवी यशवंत यांचे पूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढारकर असे होते.

दुसरा प्रश्न - कवी यशवंत कोणत्या संस्थानाचे राजकवी होते ?
बरोबर उत्तर आहे, कवी यशवंत बडोदा संस्थानाचे राजकवी होते.

तिसरा प्रश्न - खूप प्रसिद्ध झालेली कवी यशवंत यांनी अनुवादीत केलेल्या कादंबरीचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, घायाळ ही कवी यशवंत यांनी अनुवादीत केलेली कादंबरी खूप प्रसिद्ध झाली.

चौथा प्रश्न - सन १९५० मध्ये ३३ वे मराठी साहित्य संमेलन कोठे भरले होते ? 
बरोबर उत्तर आहे, सन १९५० मध्ये ३३ वे मराठी साहित्य संमेलन मुंबई येथे भरले होते. 

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - कवी यशवंत यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे - कवी यशवंत यांचा जन्म ९ मार्च १८९९ रोजी सातारा जिल्ह्यातील तारळे (किंवा चाफळ परिसर) येथे झाला.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

जागतिक महिला दिन - 08 मार्च ( World Womens Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण जागतिक महिला दिन याविषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

🌸 International Women's Day - जागतिक महिला दिन (८ मार्च)

दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन जगभरात साजरा केला जातो. हा दिवस स्त्रियांच्या अधिकारांचे, कर्तृत्वाचे आणि समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे स्मरण करून देणारा आहे. स्त्री-पुरुष समानता, महिलांचे हक्क आणि त्यांचे सशक्तीकरण याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
जागतिक महिला दिनाची सुरुवात १९०८ साली अमेरिकेत झाली. त्या वेळी महिलांनी कामाचे तास कमी करावेत, चांगला पगार मिळावा आणि मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी आंदोलन केले. त्यानंतर १९१० साली डेन्मार्कमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत दरवर्षी महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. पुढे १९७५ साली संयुक्त राष्ट्रसंघाने अधिकृतपणे ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून मान्यता दिली.
समाजाच्या प्रगतीत महिलांचा मोठा वाटा आहे. शिक्षण, विज्ञान, राजकारण, क्रीडा, कला, उद्योग इत्यादी अनेक क्षेत्रांत महिलांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. तरीही अनेक ठिकाणी महिलांना भेदभाव, अन्याय आणि असमानतेला सामोरे जावे लागते. त्यामुळे महिला दिन हा स्त्रियांच्या अधिकारांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा आणि समानतेचा संदेश देण्याचा दिवस आहे.
भारतातील अनेक महिलांनी समाजासाठी प्रेरणादायी व महान कार्य केले आहे.
छोटे बाळ पाठीशी बांधून इंग्रजाच्या विरुद्ध लढा देणारी झांशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री व प्रेरणादायी व्यक्तिमत्व राजमाता जिजाऊ, ज्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून मुलींच्या शिक्षणाची चळवळ उभी केली अशी 
भारतातील पहिली महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, हिंदू मंदिरांची बांधणी आणि जीर्णोद्धार करणारी न्यायप्रिय राज्यकर्ती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, अंतराळात जाणारी पहिली भारतीय वंशाची महिला अंतराळवीर, ज्यांनी अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल करणारी कल्पना चावला, जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदके जिंकून भारताचा गौरव वाढविणारी भारतीय महिला बॉक्सर मेरी कोम, भारतातील पहिली महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून भारताला अनेक पदके मिळवून देणारी भारताची प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा, ज्यांनी हजारो गाणी गाऊन भारतीय संगीताला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली अशी भारताची गानकोकिळा लता मंगेशकर, ज्यांनी शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा क्षेत्रात मोठे कार्य केले असे प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला बछेंद्री पाल आणि भारतातील पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू 
यांसारख्या अनेक महिलांनी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करून मोठे यश मिळवले आणि देशाचा गौरव वाढवला आहे. यासोबतच घरोघरी दिवसरात्र राबणाऱ्या गृहिणीचे योगदान विसरता येणार नाही. त्यांच्या महान कार्यामुळे आजच्या पिढीला नक्कीच प्रेरणा मिळते.
जागतिक महिला दिन हा केवळ साजरा करण्याचा दिवस नसून महिलांना समान हक्क, सन्मान आणि संधी देण्याची आठवण करून देणारा दिवस आहे. समाजाच्या विकासासाठी स्त्री-पुरुष समानता आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने महिलांचा आदर करावा, त्यांना शिक्षण व संधी द्याव्यात आणि त्यांचे सशक्तीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
✅ “जिथे स्त्रीचा सन्मान होतो, तिथेच समाजाची खरी प्रगती होते.”
 “स्त्रीशक्ती हीच राष्ट्रशक्ती” हे या दिवसाचे खरे सार आहे. समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचा सन्मान आणि सहभाग आवश्यक आहे. 🌷
जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनीना खूप खूप शुभेच्छा .......!

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - जागतिक महिला दिनाची सुरुवात कोठे झाली ?
बरोबर उत्तर आहे, जागतिक महिला दिनाची सुरुवात अमेरिकेत झाली.

दुसरा प्रश्न - भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून कोणास ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, आनंदीबाई जोशी यांना भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ओळखले जाते ,

तिसरा प्रश्न - अंतराळात जाणारी पहिली भारतीय वंशाची महिला अंतराळवीर कोण ?
बरोबर उत्तर आहे, कल्पना चावला अंतराळात जाणारी पहिली भारतीय वंशाची महिला अंतराळवीर होय. 

चौथा प्रश्न - भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या ?
बरोबर उत्तर आहे, सरोजिनी नायडू  हे भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होत्या.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - मेरी कोम ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
बरोबर उत्तर आहे - मेरी कोम ही खेळाडू बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Friday, 6 March 2026

सच्चिदानंद हिराचंद वात्सायन जयंती - 7 मार्च ( Adney )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण ज्ञानपीठ पुरस्कार विजेते हिंदी साहित्यिक सच्चिदानंद हिरानंद वात्सायन यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

सच्चिदानंद हिरानंद वात्सायन (अज्ञेय)
सच्चिदानंद हिरानंद वात्सायन हे ‘अज्ञेय’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले हिंदी साहित्यातील नामवंत कवी, कादंबरीकार, पत्रकार, संपादक आणि विचारवंत होते. आधुनिक हिंदी साहित्यात ‘नवकाव्य’ चळवळीचे ते एक प्रमुख प्रवर्तक मानले जातात.
त्यांचा जन्म ७ मार्च १९११ रोजी उत्तर प्रदेशातील कुशीनगर (त्या काळी देवरिया जिल्हा) येथे झाला. त्यांचे वडील पुरातत्त्वज्ञ असल्यामुळे लहानपणी त्यांना विविध ठिकाणी राहण्याची संधी मिळाली. त्यांनी विज्ञान शाखेत शिक्षण घेतले; परंतु पुढे त्यांची ओढ साहित्याकडे वळली.
तरुणपणी त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. क्रांतिकारक कार्यात सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. तुरुंगातील काळात त्यांनी लेखनास सुरुवात केली.
अज्ञेय यांनी कविता, कादंबरी, कथा, निबंध आणि संपादन या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले. त्यांची एक रचना 
यह दीप अकेला जलता है,
अँधियारा दूर भगाता है।
जो खुद जलकर रोशनी दे,
वही जग को राह दिखाता है।
अश्या अनेक सुंदर रचना प्रसिद्ध आहेत. 
त्यांची ‘शेखर : एक जीवनी’ ही प्रसिद्ध कादंबरी हिंदी साहित्यातील मैलाचा दगड मानली जाते.
‘हरी घास पर क्षणभर’, ‘आँगन के पार द्वार’ यांसारख्या काव्यसंग्रहांनी आधुनिक काव्याला नवे रूप दिले.
त्यांच्या लेखनात व्यक्तिस्वातंत्र्य, अंतर्मनातील संघर्ष, निसर्गप्रेम आणि तत्त्वचिंतन यांचा प्रभाव दिसून येतो.
अज्ञेय यांनी ‘तार सप्तक’ या काव्यसंग्रहाचे संपादन करून नवोदित कवींना व्यासपीठ दिले. आधुनिकतेचा विचार, प्रयोगशीलता आणि भाषेतील नवता हे त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य आहे.
त्यांना सन १९७९ साली ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांचे ४ एप्रिल १९८७ रोजी निधन झाले.
सच्चिदानंद हिरानंद वात्सायन (अज्ञेय) हे आधुनिक हिंदी साहित्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या साहित्याने हिंदी काव्य आणि कादंबरीला नवे दिशा-दर्शन दिले. प्रयोगशीलता आणि विचारांची खोली यामुळे ते आजही वाचकांना प्रेरणा देतात.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - सच्चिदानंद हिरानंद वात्सायन हे कोणत्या टोपणनावाने प्रसिद्ध होते ? 
बरोबर उत्तर आहे, सच्चिदानंद हिरानंद वात्सायन हे ‘अज्ञेय’ या टोपणनावाने प्रसिद्ध होते. 

दुसरा प्रश्न - सच्चिदानंद हिरानंद वात्सायन यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, सच्चिदानंद हिरानंद वात्सायन यांचा जन्म ७ मार्च १९११ रोजी उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे झाला.

तिसरा प्रश्न - सच्चिदानंद हिरानंद वात्सायन यांची हिंदी साहित्यातील मैलाचा दगड ठरलेली प्रसिद्ध कादंबरी कोणती ?
बरोबर उत्तर आहे, ‘शेखर : एक जीवनी’ ही सच्चिदानंद हिरानंद वात्सायन यांची हिंदी साहित्यातील मैलाचा दगड ठरलेली प्रसिद्ध कादंबरी आहे.

चौथा प्रश्न - सच्चिदानंद हिरानंद वात्सायन यांनी कोणत्या काव्यसंग्रहाचे संपादन करून नवोदित कवींना व्यासपीठ दिले ?
बरोबर उत्तर आहे, सच्चिदानंद हिरानंद वात्सायन यांनी ‘तार सप्तक’ या काव्यसंग्रहाचे संपादन करून नवोदित कवींना व्यासपीठ दिले. 

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - सच्चिदानंद हिरानंद वात्सायन यांना कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
बरोबर उत्तर आहे - सन १९७९ मध्ये सच्चिदानंद हिरानंद वात्सायन यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Wednesday, 4 March 2026

राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस - 6 मार्च ( National Dentist Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस याविषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

🦷 National Dentist Day - राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस
दरवर्षी 6 मार्च रोजी राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस साजरा केला जातो. हा दिवस दंतचिकित्सकांच्या मेहनतीला आणि योगदानाला सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो. दंतचिकित्सक केवळ दातांची देखभालच करत नाहीत, तर तोंडाच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेतात. तोंडाचे आरोग्य हे संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
दात हे केवळ अन्न चावण्यासाठी नसून, बोलताना उच्चार स्पष्ट होण्यासाठी, चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी, पचन क्रिया सुलभ करण्यासाठी आणि एकूण आरोग्यासाठीही दातांची महत्त्वाची भूमिका असते. लहान मुलांमध्ये साधारणपणे 20 दात असतात, ज्याला दुधाचे दात म्हटले जाते. तर प्रौढ माणसाला 32 दात असतात. 
दातांची योग्य काळजी न घेतल्यास दातांना किड लागणे, हिरड्यांचे आजार, दुर्गंधी आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. 
दंतचिकित्सक (Dentist) म्हणजे दाताचे डॉक्टर हे दात आणि तोंडाच्या आजारांचे निदान, उपचार आणि प्रतिबंध करतात.
दातांची तपासणी व स्वच्छता करतात. 
किडलेले दात भरणे, दात उपटणे किंवा रूट कॅनल उपचार, दात सरळ करण्यासाठी ब्रेसेस लावणे, तोंडाच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करणे, दाताच्या डॉक्टरांचे कार्य आरोग्यसेवेतील अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. 
मुलांनो, आपण आपल्या दातांची काळजी कशी घ्यावी ?
दिवसातून किमान दोन वेळा दात स्वच्छ केले पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी. गोड पदार्थ खाल्याने आपले दात किडके होऊ शकतात. म्हणून गोड पदार्थ कमी प्रमाणात खावेत. दर सहा महिन्यांनी दाताच्या डॉक्टरांकडे तपासणी करावी. स्वच्छतेची सवय लहानपणापासून लावावी. दात निरोगी असतील तर शरीरही निरोगी राहते. त्यामुळे दातांची योग्य काळजी घेणे आणि दंत चिकित्सकांच्या सल्ल्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
राष्ट्रीय दंत चिकित्सक दिनानिमित्त दंतचिकित्सकांच्या सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त केली जाते तसेच तोंडाच्या स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाते. “स्वच्छ दात, निरोगी जीवन” हा संदेश या दिवसातून दिला जातो. हा दिवस लोकांना दातांचे आरोग्य जपण्यासाठी प्रेरणा देतो. दंतचिकित्सक हे केवळ वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ नसतात, तर लोकांच्या आत्मविश्वासाचे आणि सुंदर हास्याचे शिल्पकार असतात.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 
पहिला प्रश्न - दरवर्षी 6 मार्च रोजी कोणता दिवस साजरा केला जातो ?
बरोबर उत्तर आहे, दरवर्षी 6 मार्च रोजी राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस साजरा केला जातो.

दुसरा प्रश्न - लहान मुलांच्या दाताला काय म्हणतात ?
बरोबर उत्तर आहे, लहान मुलांच्या दाताला दुधाचे दात म्हणतात.

तिसरा प्रश्न - प्रौढ माणसाला किती दात असतात ?
बरोबर उत्तर आहे, प्रौढ माणसाला 32 दात असतात. 

चौथा प्रश्न - दिवसातून किमान किती वेळा दात स्वच्छ केले पाहिजे ?
बरोबर उत्तर आहे, दिवसातून किमान दोन वेळा दात स्वच्छ केले पाहिजे.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - गोड पदार्थ कमी प्रमाणात का खावे त्याचे कारण सांगा. 
बरोबर उत्तर आहे - गोड पदार्थ खाल्याने आपले दात किडके होऊ शकतात. म्हणून गोड पदार्थ कमी प्रमाणात खावेत.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

देविदास वाडेकर - 5 मार्च ( Devidas Wadekar )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. 

आजच्या कार्यक्रमात आपण प्रा. देविदास वाडेकर यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

प्रा. देविदास दत्तात्रय वाडेकर 
प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर हे मराठी साहित्यविश्वातील अभ्यासू प्राध्यापक, संशोधक आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात. आपल्या सखोल अध्ययन, प्रभावी अध्यापनशैली आणि साहित्यिक लेखनामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या नि वाचकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहेत.
प्रा. देविदास वाडेकर यांचा जन्म २५ मे १९०२ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला. लहानपणापासूनच वाचनाची आवड आणि साहित्याची ओढ असल्यामुळे त्यांनी उच्च शिक्षण मराठी विषयात घेतले. पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयासह इतर महाविद्यालयात त्यांनी तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे अध्यापन केले. त्यांची शिकवण्याची पद्धत साधी, समजण्यास सोपी आणि उदाहरणांनी परिपूर्ण अशी होती. विद्यार्थ्यांना विषयाची गोडी लावणे हे त्यांच्या अध्यापनाचे वैशिष्ट्य होते.
साहित्य, संस्कृती, समाजप्रबोधन आणि विचारपर लेखन यांद्वारे त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. विविध वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि व्याख्यानमालेतून त्यांनी आपले विचार मांडले.
त्यांच्या लेखनात सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये आणि संस्कारक्षम विचार यांचा प्रभाव दिसून येतो. ते केवळ शिक्षक नव्हते, तर मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. प्रा. वाडेकर यांनी इंग्रजी विषयांचे ज्ञान मराठीत आणण्यासाठी मराठी परिभाषेवर प्रचंड काम केले. मराठी तत्त्वज्ञान महाकोश हा त्रिखंडात्मक प्रकल्प १९७४ मध्ये संपादित केला, जो तत्त्वज्ञान क्षेत्रातील मैलाचा दगड मानला जातो. त्यांनी लिहिलेल्या आत्मकथेचे नाव माझी वाटचाल असे आहे. 
मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रात पुढे गेले.
प्रा. देविदास वाडेकर यांचे ५ मार्च १९८५ रोजी निधन झाले. 
प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर हे ज्ञान, संस्कार आणि साहित्यप्रेम यांचे प्रतीक होते. त्यांच्या अध्यापन आणि लेखनातून समाजाला दिशादर्शन मिळाले. त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरते.
आज प्रा. देविदास वाडेकर यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - प्रा. देविदास वाडेकर यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, प्रा. देविदास वाडेकर यांचा जन्म २५ मे १९०२ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला. 

दुसरा प्रश्न - प्रा. देविदास वाडेकर हे कोणत्या विषयाचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे अध्यापन केले.
बरोबर उत्तर आहे, प्रा. देविदास वाडेकर हे तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे अध्यापन केले.

तिसरा प्रश्न - प्रा. देविदास वाडेकर यांना लहानपणापासून कश्याची आवड होती ?
बरोबर उत्तर आहे, प्रा. देविदास वाडेकर यांना लहानपणापासून वाचनाची आवड होती.

चौथा प्रश्न - प्रा. देविदास वाडेकर यांनी लिहिलेल्या आत्मकथेचे नाव काय आहे ?
बरोबर उत्तर आहे, प्रा. देविदास वाडेकर यांनी लिहिलेल्या आत्मकथेचे नाव माझी वाटचाल असे आहे. 

शेवटचा पाचवा प्रश्न - प्रा. देविदास वाडेकर यांनी मराठी तत्त्वज्ञान महाकोश हा त्रिखंडात्मक प्रकल्प कोणत्या वर्षी संपादित केला ?
बरोबर उत्तर आहे - १९७४ मध्ये प्रा. देविदास वाडेकर यांनी मराठी तत्त्वज्ञान महाकोश हा त्रिखंडात्मक प्रकल्प संपादित केला.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Tuesday, 3 March 2026

राष्ट्रीय सुरक्षा दिन - 4 मार्च ( National Safety Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 

कसे आहात ? मजेत ना !

 

मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. 

आजच्या कार्यक्रमात आपण राष्ट्रीय सुरक्षा दिन या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

🇮🇳 National Safety Day - राष्ट्रीय सुरक्षा दिन


दरवर्षी ४ मार्च रोजी भारतात ‘राष्ट्रीय सुरक्षा दिन’ साजरा केला जातो. कामाच्या ठिकाणी, रस्त्यावर, उद्योगधंद्यात तसेच दैनंदिन जीवनात सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

१९७२ साली National Safety Council (NSC) या संस्थेची स्थापना झाली. त्यानिमित्ताने ४ मार्च हा दिवस ‘राष्ट्रीय सुरक्षा दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.

या दिनाचे मुख्य उद्देश म्हणजे कामगार आणि नागरिकांमध्ये सुरक्षा नियमांबाबत जागरूकता निर्माण करणे, औद्योगिक अपघात कमी करणे, रस्ते सुरक्षा आणि वैयक्तिक सुरक्षिततेवर भर देणे, आपत्कालीन परिस्थितीत योग्य उपाययोजना करण्याचे प्रशिक्षण देणे.

सुरक्षेचे काही प्रकार, जसे की, औद्योगिक सुरक्षा, रस्ते सुरक्षा, अग्निसुरक्षा, घरगुती सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा

मग यात शाळा व विद्यार्थ्यांची भूमिका काय असावी ? शाळांमध्ये सुरक्षा शपथ घेणे, जनजागृतीसाठी रॅली काढणे, पोस्टर स्पर्धा आयोजित करणे आणि प्रात्यक्षिके आयोजित करणे. विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळावे, रस्त्यावरून चालताना उजव्या बाजूने चालावे आणि रस्त्यावर अपघात झाल्यास 108 या टोल फ्री क्रमांकावर फोन लावावे, हे तुम्हांला चांगलेच माहित आहे. अग्निसुरक्षा नियम समजून घ्यावे, कुठे आग लागली असेल तर 101 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा. तसेच काही आपत्कालीन क्रमांकांची माहिती ठेवणे देखील आवश्यक आहे. जसे की, पोलीसांना फोन लावण्यासाठी 100 डायल करावे, राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक आहे 112 तर चाईल्ड हेल्पलाईन नंबर आहे 1098.

“सुरक्षा प्रथम” हा संदेश या दिवसातून दिला जातो. अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन आणि जागरूकता आवश्यक आहे. सुरक्षित समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सुरक्षा दिन आपल्याला चांगली सवय लावण्याची प्रेरणा देतो. नियम पाळल्यास आणि सजग राहिल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात. त्यामुळे सुरक्षितता हीच यशस्वी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे मुलांनो तुम्ही सर्व नियम लक्षात ठेवून वागाल ना ! व्वा ! खूप छान ! मला माहित आहे, तुम्ही एक जागरूक आणि सजग नागरिक बनून सर्व नियम लक्षात ठेवून वागणार आहात. 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती छान वाटली ना ! नक्की कळवा. 

चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 


पहिला प्रश्न - रस्त्यावर अपघात झाल्यास कोणत्या टोल फ्री क्रमांकावर फोन लावावे ?

बरोबर उत्तर आहे, रस्त्यावर अपघात झाल्यास 108 या टोल फ्री क्रमांकावर फोन लावावे.


दुसरा प्रश्न - रस्त्यावरून चालताना कोणत्या बाजूने चालावे ?

बरोबर उत्तर आहे, रस्त्यावरून चालताना उजव्या बाजूने चालावे.


तिसरा प्रश्न - १९७२ साली कोणत्या संस्थेची स्थापना झाली ?

बरोबर उत्तर आहे, १९७२ साली National Safety Council (NSC) या संस्थेची स्थापना झाली.


चौथा प्रश्न - कुठे आग लागली असेल तर कोणत्या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा ?

बरोबर उत्तर आहे, कुठे आग लागली असेल तर 101 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा


आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - चाईल्ड हेल्प लाईन नंबर सांगा पाहू.

बरोबर उत्तर आहे - 1098 हा चाईल्ड हेल्प लाईन नंबर आहे.


चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची पण.... नमस्कार. 🙏


( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )


संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 10 मार्च ( Mangesh Padgaonkar )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !   मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. मुलांनो हे गीत ऐकू यां....