नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण मल्हारराव होळकर यांच्या विषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर
मल्हारराव होळकर हे मराठा साम्राज्यातील एक पराक्रमी सरदार आणि होळकर घराण्याचे संस्थापक होते. त्यांच्या शौर्य, कर्तृत्व आणि दूरदृष्टीमुळे मराठा साम्राज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला.
मल्हारराव होळकर यांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील होळ या गावात धनगर समाजातील खंडोजी होळकर आणि सीताबाई होळकर यांच्या पोटी झाला. गावावरून त्यांचे नाव होळकर असे झाले. बालपणापासूनच मल्हारराव धाडसी, कष्टाळू आणि युद्धकौशल्यात पारंगत होते. मल्हारराव तीन वर्षाचे असताना वडिलांचे मृत्यू झाले. त्यामुळे ते आपल्या आईसोबत मामाच्या गावी खानदेशात तळोदे येथे गेले. त्यामुळे मामाकडेच मल्हाररावांना लष्करात नोकरी मिळाली. १७२० मधील पेशवे-निजाम संघर्षात मल्हाररावांची कामगिरी पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या लक्षात आली. बाजीरावांनी मल्हाररावांचे धाडस पाहून त्यांना स्वतःच्या घोड-दळात घेतले. त्यामुळे मल्हाररावांच्या जीवनास कलाटणी मिळाली. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना लवकरच मोठे पद मिळाले. मल्हाररावांनी उत्तर भारतात अनेक मोहिमा केल्या आणि मराठा साम्राज्याचा प्रभाव वाढविण्यात मोठी भूमिका बजावली. मल्हाररावांनी त्यांच्या आयुष्यात लहानमोठ्या एकंदर बावन्न लढाया मध्ये भाग घेतला.
मल्हारराव होळकर यांनी मध्य भारतातील इंदूर परिसरात आपले राज्य मजबूत केले. त्यामुळे होळकर घराण्याचा पाया भक्कम झाला. मल्हाररावांच्या पत्नी गौतमीबाई यांच्यापासून झालेले एकुलते एक पुत्र म्हणजे खंडेराव. दीगजवळच्या कुंभेरीच्या वेढ्यात तोफेचा गोळा लागून खंडेराव मरण पावले. त्यावेळी त्यांची सुन अहिल्याबाई होळकर यांना सती जाण्यापासून मल्हाररावांनी परावृत्त केले आणि राज्याची सर्व धुरा त्यांच्यावर टाकली. अहिल्याबाई होळकर यांनी अतिशय न्यायी आणि उत्तम प्रकारे कारभार चालवला.
मल्हाररावांनी १७६३ मधील राक्षसभुवनच्या लढाईत माधवरावांसोबत निजामाचा पराभव करून पानिपतच्या पराभवाने खचलेल्या मराठा मंडळास संजीवनी दिली. मल्हारराव होळकर हे फक्त शूर योद्धेच नव्हते तर कुशल प्रशासकही होते. त्यांनी प्रजेची काळजी घेतली, व्यापार आणि शेतीला प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांना लोकांचा मोठा आदर मिळाला.
२० मे १७६६ रोजी मल्हारराव होळकर यांचे निधन झाले. परंतु त्यांच्या शौर्यपूर्ण कार्यामुळे त्यांचे नाव मराठा इतिहासात कायम अजरामर झाले आहे.
आज मल्हारराव होळकर यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांना कोटी कोटी प्रणाम !
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - मल्हारराव होळकर यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, मल्हारराव होळकर यांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील होळ या गावात झाला.
दुसरा प्रश्न - मल्हारराव होळकर यांच्या एकुलता एक मुलाचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, मल्हारराव होळकर यांच्या एकुलता एक मुलाचे नाव खंडेराव असे होते.
तिसरा प्रश्न - मल्हारराव होळकर यांच्या सूनबाईचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, मल्हारराव होळकर यांच्या सूनबाईचे नाव अहिल्यादेवी होळकर असे होते
चौथा प्रश्न - मल्हाररावांनी किती लढाया मध्ये भाग घेतला ?
बरोबर उत्तर आहे, मल्हाररावांनी त्यांच्या आयुष्यात लहानमोठ्या एकंदर बावन्न लढाया मध्ये भाग घेतला.
शेवटचा पाचवा प्रश्न - मल्हारराव होळकर यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - मल्हारराव होळकर यांचे २० मे १७६६ रोजी निधन झाले.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769