Saturday, 21 February 2026

दिनविशेष माहिती - 22 फेब्रुवारी ( Lord Bedan powel )

 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

लॉर्ड बेडन पॉवेल

लॉर्ड बेडन पॉवेल हे स्काउट चळवळीचे संस्थापक आणि जगभरातील तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे पूर्ण नाव रॉबर्ट स्टिफेन्सन स्मिथ बेडन पॉवेल असे होते. त्यांचा जन्म २२ फेब्रुवारी १८५७ रोजी इंग्लंडमधील लंडन येथे झाला.
बेडन पॉवेल यांचे वडील ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक होते. लहानपणापासूनच त्यांना निसर्ग, साहस, जंगलभ्रमण आणि शिस्तबद्ध जीवन यांची आवड होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ब्रिटिश सैन्यात प्रवेश केला आणि भारत तसेच आफ्रिका येथे सेवा बजावली.
दक्षिण आफ्रिकेतील युद्धादरम्यान त्यांनी दाखविलेल्या शौर्यामुळे ते प्रसिद्ध झाले. सैन्यातील अनुभवातून त्यांना जाणवले की, तरुणांना शिस्त, स्वावलंबन, नेतृत्वगुण आणि देशप्रेम यांचे प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे.
१९०७ साली त्यांनी इंग्लंडमधील ब्राउनसेया आईसलंड येथे पहिले स्काउट शिबिर आयोजित केले. हा प्रयोग यशस्वी ठरला. त्यानंतर १९०८ मध्ये त्यांनी “स्काऊटिंग फॉर बॉइझ” हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे स्काउट चळवळ जगभर पसरली.
स्काउट चळवळीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे –
शारीरिक, मानसिक व नैतिक विकास
स्वावलंबन व नेतृत्वगुणांची जोपासना
समाजसेवा व देशभक्तीची भावना
बेडन पॉवेल यांच्या कार्यामुळे अनेक देशांमध्ये स्काउट संघटना स्थापन झाल्या. आज जगभर कोट्यवधी विद्यार्थी स्काउट-गाईड चळवळीत सहभागी होत आहेत. त्यांना १९२९ साली “लॉर्ड” हा किताब देण्यात आला.
लॉर्ड बेडन पॉवेल यांचे ०८ जानेवारी १९४१ रोजी केनिया देशातील नयेरी येथे निधन झाले.
लॉर्ड बेडन पॉवेल यांनी तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी उभी केलेली स्काउट चळवळ ही आजही प्रेरणादायी आहे. शिस्त, साहस, सेवा आणि नेतृत्व यांचा संगम त्यांच्या कार्यात दिसून येतो. म्हणूनच ते “स्काउट चळवळीचे जनक” म्हणून ओळखले जातात.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - लॉर्ड बेडन पॉवेल यांनी कोणती चळवळ उभी केली ?
बरोबर उत्तर आहे, लॉर्ड बेडन पॉवेल यांनी स्काउट-गाईड चळवळ उभी केली.

दुसरा प्रश्न - कोणत्या वर्षी बेडन पॉवेल यांना “लॉर्ड” हा किताब देण्यात आला ? 
बरोबर उत्तर आहे, सन १९२९ मध्ये बेडन पॉवेल यांना “लॉर्ड” हा किताब देण्यात आला.

तिसरा प्रश्न - कोणत्या पुस्तकामुळे स्काउट चळवळ जगभर पसरली ?
बरोबर उत्तर आहे, स्काऊटिंग फॉर बॉइझ या पुस्तकामुळे स्काउट चळवळ जगभर पसरली.

चौथा प्रश्न - लॉर्ड बेडन पॉवेल यांनी पहिले स्काउट शिबिर कोणत्या वर्षी आयोजित केले ?
बरोबर उत्तर आहे, सन १९०७ मध्ये लॉर्ड बेडन पॉवेल यांनी पहिले स्काउट शिबिर आयोजित केले

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न -  “स्काउट चळवळीचे जनक” म्हणून कोण ओळखले जातात ?
बरोबर उत्तर आहे - लॉर्ड बेडन पॉवेल हे “स्काउट चळवळीचे जनक” म्हणून कोण ओळखले जातात

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Sunday, 15 February 2026

दिनविशेष माहिती - 21 फेब्रुवारी ( International Mother Language Day )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन याविषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

 आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 
आज २१ फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपल्या भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे.
१९५२ साली बांगलादेशातील विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेसाठी आंदोलन केले आणि बलिदान दिले. त्यांच्या स्मरणार्थ १९९९ साली युनेस्कोने २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला.
मातृभाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आपल्या भावना, विचार आणि परंपरा व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे मातृभाषा. संशोधनानुसार, मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांची आकलनशक्ती अधिक वाढते. आपण इंग्रजी किंवा इतर भाषा शिकाव्यात; पण त्याचबरोबर आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणे आणि तिचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे.
भाषावैज्ञानिक संस्थेच्या आकडेवारीनुसार जगात सुमारे ७,००० भाषा बोलल्या जातात. जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे मँडरिन चिनी भाषा आहे तर इंग्रजी ही जगभरात सर्वाधिक देशांमध्ये वापरली जाणारी द्वितीय क्रमांकाची भाषा आहे. तर भारतात १,६०० पेक्षा अधिक भाषा आणि उपभाषा बोलल्या जातात. भारतीय राज्यघटनेने २२ अधिकृत भाषा मान्य केल्या आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बंगाली आणि तिसऱ्या क्रमांकावर आपली मराठी भाषा बोलली जाते. 
चला, आजच्या दिवशी आपण आपल्या मातृभाषेचा सन्मान राखण्याचा आणि तिचे संवर्धन करण्याचा संकल्प करूया.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - युनेस्कोने २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून कोणत्या वर्षी घोषित केला ?
बरोबर उत्तर आहे, १९९९ साली युनेस्कोने २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला.

दुसरा प्रश्न - जगात सुमारे किती भाषा बोलल्या जातात. 
बरोबर उत्तर आहे, जगात सुमारे ७,००० भाषा बोलल्या जातात. 

तिसरा प्रश्न - जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती आहे ?
बरोबर उत्तर आहे, जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे मँडरिन चिनी भाषा

चौथा प्रश्न - भारतीय राज्यघटनेने किती भाषा अधिकृत मान्य केल्या आहेत ?
बरोबर उत्तर आहे, भारतीय राज्यघटनेने २२ भाषा अधिकृत मान्य केल्या आहेत

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - २०११ च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे ?
बरोबर उत्तर आहे - २०११ च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी आहे. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 20 फेब्रुवारी ( Govind Pansare )

 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण कॉ. गोविंद पानसरे यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

     कॉ. गोविंद पानसरे
कॉ. गोविंद पानसरे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजवादी विचारवंत, लेखक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९३३ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हार या गावी गरीब कुटुंबात झाला. गरीब कष्टकऱ्यांच्या परिवारात ते वाढले. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते नगरपालिकेत शिपाई म्हणून आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात प्रोफेसर म्हणून ही काम केले. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि वकिली देखील केली. अनेक वर्षे कोल्हापुरातील वकीलांच्या संघटनेचे ते अध्यक्ष होते. 
कॉ. पानसरे शालेय जीवनापासूनच सामाजिक चळवळींकडे आकर्षित झाले होते. सुरुवातीला राष्ट्र सेवा दल व त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. दहा वर्षांसाठी ते भाकपचे महाराष्ट्र सेक्रेटरी होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ व गोवा मुक्ती चळवळीत ते सहभागी होते. तडजोड न करता समाजातील सर्वांत जास्त शोषित लोकांच्या हक्कांसाठी लढणारे ते कार्यकर्ता होते. ते कष्टकऱ्यांच्या शेकडो संघर्षांमध्ये सहभागी झाले व अनेकांचे नेतृत्वदेखील केले, विशेषतः असंघटित क्षेत्रांतील कामगार, शेतमजूर, घरकामगार, ऑटोरिक्षा युनियन, दूध उत्पादक, झोपडपट्टी रहिवासी, इत्यादी. कोल्हापुरमधील टोलविरोधी आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते या आंदोलनात अग्रभागी होते.
गोविंद पानसरे यांनी अंधश्रद्धा, जातीयवाद आणि सामाजिक विषमता यांविरोधात ठाम भूमिका घेतली. ते प्रभावी वक्ते होते. त्यांच्या भाषणांतून सामाजिक समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधानिक मूल्ये यांचा प्रचार केला जात असे. 
त्यांचे सर्वात गाजलेले प्रसिद्ध पुस्तक म्हणजे शिवाजी कोण होता ? या पुस्तकात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य लोककल्याणकारी आणि धर्मनिरपेक्ष दृष्टीकोनातून मांडले आहे. हे पुस्तक मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आणि अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले. हे पुस्तक आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे चे खरे दर्शन घडवते.
दिनांक १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी आपल्या पत्नीसमवेत मॉर्निंग वॉकसाठी गेले असता, काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर काही दिवस उपचार सुरू असताना दिनांक २० फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात मोठी शोककळा पसरली.
कॉ. गोविंद पानसरे हे प्रखर बुद्धीचे, तत्त्वनिष्ठ आणि समाजहितासाठी झटणारे नेते होते. त्यांच्या कार्यातून समाजात विचारस्वातंत्र्य, समता आणि न्याय यांची जाणीव निर्माण झाली. आजही त्यांचे कार्य आणि विचार समाजाला प्रेरणा देत आहेत. २००२ मध्ये कोल्हापूर महापालिकेने त्यांना कोल्हापूर भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले.

आज कॉ. गोविंद पानसरे यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला सादर प्रणाम !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - गोविंद पानसरे प्रोफेसर म्हणून कोठे काम केले ?
बरोबर उत्तर आहे, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात गोविंद पानसरे हे प्रोफेसर म्हणून काम केले

दुसरा प्रश्न - गोविंद पानसरे यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते ?
बरोबर उत्तर आहे, शिवाजी कोण होता ? हे गोविंद पानसरे यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. 

तिसरा प्रश्न - कोल्हापूर महापालिकेने त्यांना कोल्हापूर भूषण पुरस्कार कोणत्या वर्षी दिले ?
बरोबर उत्तर आहे, २००२ मध्ये कोल्हापूर महापालिकेने त्यांना कोल्हापूर भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले.

चौथा प्रश्न - गोविंद पानसरे हे कोणत्या पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते ?
बरोबर उत्तर आहे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे गोविंद पानसरे हे सक्रिय कार्यकर्ते होते. 

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - गोविंद पानसरे यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - गोविंद पानसरे यांचे दिनांक 20 फेब्रुवारी 2015 रोजी मुंबईत निधन झाले

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 19 फेब्रुवारी ( Chatrapti Shivaji Maharaj )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक : छत्रपती शिवाजी महाराज
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती तर आईचे नाव जिजाऊ होते. राजमाता जिजाऊंनी त्यांना रामायण-महाभारताच्या कथा सांगून स्वाभिमान, धैर्य आणि धर्मनिष्ठा यांचे संस्कार दिले. दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी युद्धकला आणि प्रशासनकौशल्य आत्मसात केले. शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचे कुलदैवत तुळजाभवानी होते.
त्या काळात भारतावर परकीय सत्तेचे वर्चस्व होते. सामान्य जनतेवर अन्याय होत होता. अशा वेळी शिवाजी महाराजांनी “हिंदवी स्वराज्य” स्थापण्याचा निर्धार केला. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी पहिला किल्ला जिंकला तो म्हणजे तोरणा. छत्रपती शिवाजी महाराज यांना तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, हंबीरराव मोहिते, नेताजी पालकर, येसाजी कंक, जीवा महाला, कान्होजी जेधे, शिवा काशीद असे अनेक जीवाला जीव देणारे मावळे मिळाले. त्यामुळे रायगड, प्रतापगड, पुरंदर, सिंहगड, असे अनेक किल्ले जिंकले. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजानी बलाढ्य अफजलखानाचा वध केला. गनिमी काव्याच्या तंत्राने बलाढ्य शत्रूंवर विजय मिळवला. शिवाजी महाराज हे केवळ एक शूर योद्धे नव्हते, तर ते आदर्श राज्यकर्ते आणि लोकनायक होते. 
महाराजांचे राज्य हे लोकाभिमुख होते. त्यांनी शिस्तबद्ध लष्कर, सक्षम आरमार आणि न्यायप्रिय प्रशासन उभे केले. स्त्रियांचा सन्मान राखणे आणि सर्व धर्मांचा आदर करणे हे त्यांच्या राज्यकारभाराचे वैशिष्ट्य होते. ६ जून १६७४ रोजी रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांना "जाणता राजा" म्हणून ओळखले जाते. स्वराज्याचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी ८ मंत्र्यांचे अष्टप्रधान मंडळ तयार केले. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यांचा जन्मदिवस सर्वत्र शिवजयंती म्हणून साजरी केली जाते.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे दिनांक ३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर निधन झाले. 
मुलांनो, शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला ध्येय, स्वाभिमान आणि संघटनशक्ती यांचे महत्त्व शिकवते. त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करून आपणही प्रामाणिक, धैर्यवान आणि राष्ट्रनिष्ठ नागरिक बनूया.

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्यावर झाला ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्यावर झाला ?

दुसरा प्रश्न - छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या पहिल्या किल्याचे नाव काय ? 
बरोबर उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या पहिल्या किल्याचे नाव तोरणा किल्ला.

तिसरा प्रश्न - छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी कोणाचा वध केला ? 
बरोबर उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी बलाढ्य अफजलखानाचा वध केला ? 

चौथा प्रश्न - "जाणता राजा" म्हणून कोणास ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांना "जाणता राजा" म्हणून ओळखले जाते.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजानी पारशी भाषेऐवजी कोणत्या भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले ?
बरोबर उत्तर आहे - स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजानी पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 18 फेब्रुवारी ( Gopal Hari Deshamukh )


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
गोपाळ हरी देशमुख हे महाराष्ट्रातील प्रख्यात समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते. त्यांना “लोकहितवादी” या टोपणनावाने ओळखले जाते. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, रूढी-परंपरा आणि अन्यायकारक प्रथा यांच्यावर कठोर टीका करून समाजजागृतीचे कार्य केले.
गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८२३ रोजी पुण्यात एका वतनदार घराण्यात जन्म झाला. त्यांचे मूळ आडनाव 'सिद्धये' होते, तर घराण्यातील वतनामुळे 'देशमुख' हे नाव प्रचलित झाले. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेतले. त्यांना मराठी, संस्कृत तसेच इंग्रजी भाषेचे ज्ञान होते. ते स्वभावाने प्रखर बुद्धिमान व चिकित्सक वृत्तीचे होते. समाजातील दोष दूर करून लोकांमध्ये प्रबोधन घडवून आणणे हेच त्यांचे ध्येय होते.
त्यांनी 'प्रभाकर' साप्ताहिकातून लिहिलेल्या 'शतपत्रां' द्वारे तत्कालीन भारतीय समाजातील जातिभेद, बालविवाह, बहुपत्नीत्व अशा अनिष्ट रूढींवर कठोर टीका केली. या पत्रांमुळे त्यांना 'लोकहितवादी' म्हणून ओळखले जाऊ लागले. त्या काळात समाजात प्रचलित असलेल्या अनेक चुकीच्या समजुतींवर त्यांनी तर्कशुद्ध विचार मांडले. त्यामुळे काही लोकांनी त्यांचा विरोधही केला; परंतु त्यांनी आपल्या विचारांपासून माघार घेतली नाही.
गोपाळ हरी देशमुख यांनी स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे, त्यांना समान हक्क मिळाले पाहिजेत, असे त्यांचे ठाम मत होते. तसेच त्यांनी विधवा पुनर्विवाहाला समर्थन दिले. त्यांच्या लेखनामुळे समाजात नवीन विचारांची जागृती झाली.
वयाच्या २१ व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले. पुढे त्यांनी न्यायाधीश म्हणूनही प्रामाणिकपणे काम केले. त्यांच्या कार्यामुळे त्यांना समाजात मानाचे स्थान मिळाले. 
त्यांनी पानिपतचा युद्ध, कलयुग, जातिभेद, लंकेचा इतिहास यांसारखी पुस्तके लिहिली. ते केवळ लेखक नव्हते, तर कृतीशील समाजसुधारक होते.
गोपाळ हरी देशमुख यांचे ९ ऑक्टोबर १८९२ रोजी निधन झाले. त्यांच्या विचारांचा प्रभाव पुढील समाजसुधारकांवरही पडला. त्यांनी महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाची बीजे रोवली.
अशा या लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचे जीवन आपल्याला सत्य, न्याय आणि समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा देते. त्यांच्या कार्यामुळे ते महाराष्ट्राच्या इतिहासात सदैव स्मरणात राहतील.

आज गोपाळ हरी देशमुख यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपणनावाने ओळखले जाते.

दुसरा प्रश्न - गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या भाषेचे ज्ञान होते ?
बरोबर उत्तर आहे, गोपाळ हरी देशमुख यांना मराठी, संस्कृत तसेच इंग्रजी भाषेचे ज्ञान होते

तिसरा प्रश्न - गोपाळ हरी देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, गोपाळ हरी देशमुख यांचे मूळ आडनाव 'सिद्धये' होते.

चौथा प्रश्न - गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लेखन केले ?
बरोबर उत्तर आहे, गोपाळ हरी देशमुख यांनी 'प्रभाकर' साप्ताहिकातून लेखन केले.

शेवटचा पाचवा प्रश्न - लंकेचा इतिहास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? 
बरोबर उत्तर आहे - लंकेचा इतिहास या पुस्तकाचे लेखक गोपाळ हरी देशमुख आहेत. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 17 फेब्रुवारी ( Vasudev Fadke )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या विषयी माहिती पाहू या. 

लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

वासुदेव बळवंत फडके
ब्रिटिश सरकार विरुद्ध सर्वात पहिल्यांदा आंदोलन करणारे आणि भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटविणारे आद्य क्रांतीकारक म्हणजे वासुदेव बळवंत फडके. 
त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८४५ रोजी रायगड जिल्ह्यातील शिरढोण या गावी झाला. लहानपणापासूनच कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवार बाजीचे प्रशिक्षण मिळाले. त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना प्रबळ होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला ते रेल्वे विभागात नोकरीस होते, नंतर ते इंग्रजाच्या लष्करी विभागात कारकून पदावर नियुक्त झाले. परंतु इंग्रज सरकारच्या अन्यायकारक कारभारामुळे त्यांना तीव्र वेदना होत होत्या. भाकरीसाठी चाकरी करणार नाही असे म्हणत त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि इंग्रज सरकारच्या विरोधात जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली. विशेषतः १८७० च्या दशकात भयंकर दुष्काळ पडला. त्यात हजारो लोक उपासमारीने मृत्यूमुखी पडले. शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती, तरीही इंग्रज सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ही परिस्थिती पाहून वासुदेव फडके यांच्या मनात स्वराज्य स्थापनेची ज्वाला प्रज्वलित झाली.
वासुदेव फडके यांनी ठरवले की, अन्याय सहन करण्यापेक्षा त्याविरुद्ध लढा देणे आवश्यक आहे. त्यांनी शेतकरी, धनगर, कोळी आणि इतर वंचित समाजघटकांना एकत्र करून सशस्त्र पथक तयार केले. त्यांनी इंग्रजांच्या सरकारी खजिन्यांवर धाड टाकून मिळालेला पैसा गरजू लोकांसाठी वापरला. त्यांचा उद्देश वैयक्तिक लाभ नव्हता, तर भारताला परकीय सत्तेतून मुक्त करणे हा होता. म्हणूनच त्यांना भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक म्हटले जाते. वासुदेव फडके हे दत्तात्रयाचे उपासक होते. त्यांनी दत्त महात्म्य नावाचा सात हजार ओव्याचा ग्रंथ लिहिला. 
ब्रिटिश सरकार त्यांच्या कार्यामुळे घाबरले आणि १८७९ साली त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला चालवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना अरेबिया येथील एडन येथील कारागृहात पाठविण्यात आले. तेथेही त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. कठोर कारावास आणि हालअपेष्टा सहन करत असतानाच १७ फेब्रुवारी १८८३ रोजी त्यांचे निधन झाले. १९८४ साली भारतीय टपाल खात्याने वासुदेव फडके यांचे चित्र असलेले ५० पैश्याचे तिकीट प्रकाशित केले. 
फडके यांचे जीवन आपल्याला शिकवते की, देशासाठी त्याग आणि धैर्य आवश्यक असते. त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी आयुष्य अर्पण केले. त्यांच्या बलिदानामुळेच पुढील क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली आणि स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र झाला.
आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे जगत आहोत, ते अशा महान क्रांतिकारकांच्या त्यागामुळेच. चला, त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपणही देशप्रेम, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांचा अंगीकार करूया.
आज वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम !

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - वासुदेव फडके यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, वासुदेव फडके रायगड जिल्ह्यातील शिरढोण या गावी वासुदेव फडके यांचा जन्म झाला.

दुसरा प्रश्न - वासुदेव फडके यांना काय म्हटले जाते ?
बरोबर उत्तर आहे, वासुदेव फडके यांना भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक म्हटले जाते.

तिसरा प्रश्न - वासुदेव फडके यांना ब्रिटिश सरकारने केव्हा अटक केली ?
बरोबर उत्तर आहे, १८७९ साली वासुदेव फडके यांना ब्रिटिश सरकारने अटक केली.

चौथा प्रश्न - अटक झाल्यानंतर वासुदेव फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवण्यात आले
बरोबर उत्तर आहे, अटक झाल्यानंतर वासुदेव फडके यांना एडन येथील कारागृहात ठेवण्यात आले

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - वासुदेव फडके यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - १७ फेब्रुवारी १८८३ रोजी वासुदेव फडके यांचे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Saturday, 14 February 2026

दिनविशेष माहिती - 16 फेब्रुवारी ( Thorale Madhavrao Peshave )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.

आजच्या कार्यक्रमात आपण मराठा साम्राज्याचे कर्तबगार आणि दूरदर्शी नेतृत्व असलेले श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांची माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

श्रीमंत थोरले माधवराव पेशवे 
 
श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचा जन्म १६ फेब्रुवारी १७४५ रोजी झाला. ते नानासाहेब पेशवे यांचे पुत्र होते. पेशवे माधवराव पेशवे हे त्यांच्या उदारतेसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते गरिबांना पैसे, अन्न, कपडे आणि जमीन दान करायचे. त्यांच्याकडून दान घेण्यासाठी दूरदूरून लोक येत असत. त्यांच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नसे. प्रत्येकाला जे हवे होते ते नक्कीच मिळायचे.
१४ जानेवारी १७६१ रोजी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठा साम्राज्याची स्थिती अत्यंत बिकट झाली होती. राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळली होती आणि जनतेमध्ये निराशा पसरली होती. अशा कठीण वेळी, केवळ १६ वर्षांच्या वयात माधवरावांनी पेशव्यांची जबाबदारी स्वीकारली.
माधवरावांनी सर्वप्रथम प्रशासनात शिस्त आणली. त्यांनी महसूल व्यवस्था सुधारली, लष्कराची पुनर्रचना केली आणि सरदारांमध्ये एकोपा निर्माण केला. त्यांच्या पराक्रमामुळे आणि कुशल नेतृत्वामुळे मराठा साम्राज्याने पुन्हा उत्तर भारतात आपला प्रभाव निर्माण केला. १७६१ ते १७७२ पर्यंत म्हणजे अकरा वर्षे त्यांनी पेशवाई सांभाळली. या अकरा वर्षाच्या काळात त्यांनी मराठेशाहीचा सुवर्णकाळ पुन्हा आणला.
माधवराव पेशवे यांनी 'राक्षसभुवन'च्या लढाईत निजामावर विजय मिळवून मराठ्यांची ताकद दाखवून दिली. म्हैसूरच्या हैदरअलीचा वारंवार पराभव करून आपला वचक निर्माण केला.
त्यांच्या कारकिर्दीत न्याय, शिस्त आणि पारदर्शकता यांना महत्त्व होते. त्यांनी वैयक्तिक स्वार्थापेक्षा राज्यहिताला प्राधान्य दिले. ते कठोर शिस्तप्रिय होते आणि त्यांनी मराठी साम्राज्याला पुन्हा एकदा 'सर्वोच्च शक्ती' म्हणून उभे केले
थोरले माधवराव हे मराठी इतिहासातील 'छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचे' सर्वात कर्तबगार प्रशासक आणि मुत्सद्दी नेते मानले जातात.
दुर्दैवाने, पुणे जिल्ह्यातील थेऊर येथे १८ नोव्हेंबर १७७२ रोजी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी क्षयरोगाने त्यांचे निधन झाले, परंतु अल्पायुष्यात त्यांनी केलेले कार्य अजरामर आहे.
माधवराव पेशवे यांचे जीवन आपल्याला सांगते की, संकट कितीही मोठे असले तरी योग्य नेतृत्व, आत्मविश्वास आणि चिकाटी यामुळे परिस्थिती बदलता येते. चला, त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपण कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि देशभक्त नागरिक बनण्याचा संकल्प करूया.


मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - माधवराव पेशवे हे कोणाचे पुत्र होते ?
बरोबर उत्तर आहे, माधवराव पेशवे हे नानासाहेब पेशवे यांचे पुत्र होते.

दुसरा प्रश्न - माधवराव पेशवे यांनी कोणत्या वयात पेशव्यांची जबाबदारी स्वीकारली ?
बरोबर उत्तर आहे, १६ वर्षांच्या वयात माधवराव पेशवे यांनी पेशव्यांची जबाबदारी स्वीकारली.

तिसरा प्रश्न - माधवराव पेशवे यांनी कोणत्या लढाईत निजामचा पराभव केला ?
बरोबर उत्तर आहे, राक्षसभुवनच्या लढाईत माधवराव पेशवे यांनी निजामचा पराभव केला

चौथा प्रश्न - माधवराव पेशवे यांनी किती वर्षे पेशवाई सांभाळली ?
बरोबर उत्तर आहे, अकरा वर्षे माधवराव पेशवे यांनी पेशवाई सांभाळली

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - माधवराव पेशवे यांचे कोणत्या आजाराने निधन झाले ?
बरोबर उत्तर आहे - क्षयरोगाने माधवराव पेशवे यांचे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 22 फेब्रुवारी ( Lord Bedan powel )

 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !   मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण...