Sunday, 22 March 2026

दिनविशेष माहिती - 23 मार्च ( Shahid Diwas )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आज 23 मार्च अर्थात शहीद दिवस त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण भारतीय स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेल्या क्रांतीवीरांची माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

         23 मार्च - शहीद दिवस 
भारताचा स्वातंत्र्यलढा हा त्याग, बलिदान आणि देशप्रेमाची प्रेरणादायी गाथा आहे. या लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा शूर वीरांच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून वीरांना वंदन केले जाते. 
23 मार्च 1931 हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांना ब्रिटिश सत्तेने फाशी दिली. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत बलिदान दिले आणि संपूर्ण देशाला प्रेरणा दिली.
या घटनेमागे एक महत्त्वाचा इतिहास आहे. पंजाब केसरी म्हणून ओळखले जाणारे लाला लाजपत राय हे एक महान राष्ट्रभक्त नेते होते. 1928 मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन करत असताना ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. रामाप्रसाद बिस्मिल यांच्या “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है।” ह्या गीताने अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली. लाला लाजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी ब्रिटिश अधिकारी सॉन्डर्सवर हल्ला केला. ही घटना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली.
भगतसिंग हे अत्यंत धाडसी आणि विचारशील क्रांतिकारक होते. त्यांनी “इन्कलाब जिंदाबाद” ही घोषणा देऊन तरुणांना जागृत केले. राजगुरू आणि सुखदेव यांनीही त्यांच्या सोबत निडरपणे स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.
शहीद दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत केली जाते.
हा दिवस आपल्याला शिकवतो की स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही, तर अनेक वीरांच्या बलिदानातून मिळाले आहे. त्यामुळे आपण आपल्या देशाबद्दल निष्ठा आणि कर्तव्यभावना ठेवली पाहिजे.
शहीद दिवस हा प्रेरणादायी दिवस आहे. लाला लाजपत राय यांच्या त्यागापासून ते भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानापर्यंतचा हा इतिहास आपल्याला देशप्रेम, धैर्य आणि त्याग यांचे मूल्य शिकवतो. त्यांच्या आदर्शांवर चालणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांना ब्रिटिश सत्तेने कोणत्या तारखेला फाशी दिली ?
बरोबर उत्तर आहे, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांना ब्रिटिश सत्तेने 23 मार्च 1931 रोजी फाशी दिली.

दुसरा प्रश्न - सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले ?
बरोबर उत्तर आहे, सन 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आले

तिसरा प्रश्न - पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते ?
बरोबर उत्तर आहे, लाला लाजपत राय यांना पंजाब केसरी म्हणून ओळखले जाते.

चौथा प्रश्न - सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन करत असताना कोणाचा मृत्यू झाला ?
बरोबर उत्तर आहे, सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन करत असताना लाला लाजपत राय यांचा मृत्यू झाला.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - भगतसिंग यांनी कोणती घोषणा देऊन तरुणांना जागृत केले ?
बरोबर उत्तर आहे - भगतसिंग यांनी “इन्कलाब जिंदाबाद” ही घोषणा देऊन तरुणांना जागृत केले. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

No comments:

Post a Comment

दिनविशेष माहिती - 23 मार्च ( Shahid Diwas )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !   मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आज 23 मार्च अर्थात शहीद...