Friday, 23 January 2026

24 जानेवारी दिनविशेष माहिती ( 24 January )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण  भारताचे विज्ञानरत्न डॉ. होमी भाभा यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी 
            डॉ. होमी जहागीर भाभा येथे क्लिक करावे. 

डॉ. होमी जहागीर भाभा हे भारताच्या आधुनिक विज्ञान व अणुऊर्जेचे जनक मानले जातात. त्यांनी भारतात अणु संशोधनाची पायाभरणी करून देशाला वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम बनवले. त्यांचे योगदान केवळ विज्ञानापुरते मर्यादित न राहता संशोधन संस्था उभारणी, शिक्षण आणि राष्ट्रीय विकास यांमध्येही अतुलनीय आहे.
डॉ. होमी भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे वडील जहागीर भाभा हे प्रसिद्ध वकील होते. सुरुवातीचे शिक्षण मुंबईत झाल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी भौतिकशास्त्रात संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळवली. 
शिक्षण घेऊन भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतीय विज्ञान संस्थान, बंगळूर येथे प्रोफेसर म्हणून कार्य केले. पुढे १९४५ मध्ये त्यांनी मुंबईत टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) स्थापन केली. ही संस्था भारतातील उच्चस्तरीय वैज्ञानिक संशोधनाची प्रमुख केंद्र बनली. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणुभट्टीची स्थापना होऊ शकली. डॉ. भाभा यांच्या दूरदृष्टीमुळे भारतात वैज्ञानिक संशोधनाला योग्य दिशा मिळाली.
१९४८ मध्ये भारत सरकारने त्यांची नियुक्ती भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून केली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतात अणुऊर्जेच्या शांततामय वापरासाठी संशोधन सुरू झाले. दिनांक १८ मे १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला. अणुऊर्जेचा वापर वीज निर्मिती, औषधनिर्मिती, कृषी व औद्योगिक क्षेत्रात होण्यासाठी त्यांनी भक्कम पाया घातला. त्यामुळे त्यांना “भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार” असे संबोधले जाते.
डॉ. भाभा हे केवळ शास्त्रज्ञ नव्हते, तर उत्कृष्ट प्रशासक, कलाकार आणि संगीतप्रेमीही होते. त्यांनी विज्ञान आणि कला यांचा सुंदर संगम साधला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात शिस्त, दूरदृष्टी आणि राष्ट्रभक्ती यांचा सुंदर समन्वय दिसून येतो.
२४ जानेवारी १९६६ रोजी फ्रान्समधील माउंट ब्लाँक परिसरात झालेल्या विमान अपघातात त्यांचे अकाली निधन झाले. त्यांचा मृत्यू भारतीय विज्ञानासाठी मोठी हानी ठरली, तरी त्यांनी उभारलेली संशोधनाची परंपरा आजही देशाला मार्गदर्शन करत आहे.
डॉ. होमी जहागीर भाभा यांनी भारताला वैज्ञानिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्याचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरवले. त्यांचे कार्य आजही भारतीय वैज्ञानिकांना प्रेरणा देत आहे. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने भारताचे विज्ञानरत्न मानले जातात.
आज त्यांचा पुण्यस्मरण दिवस त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन 

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - डॉ. होमी भाभा यांचा जन्म केव्हा झाला ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. होमी भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी मुंबई येथे झाला.

दुसरा प्रश्न - भारत सरकारने भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून केव्हा नियुक्त केले ?
बरोबर उत्तर आहे, १९४८ मध्ये भारत सरकारने भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. 

तिसरा प्रश्न - भारताने कोठे पहिला अणुस्फोट घडवून आणला ? 
बरोबर उत्तर आहे, भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला. 

चौथा प्रश्न - भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार” असे कोणाला संबोधले जाते ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. होमी भाभा यांना भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार” असे संबोधले जाते.

शेवटचा पाचवा प्रश्न - डॉ. होमी भाभा यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे - २४ जानेवारी १९६६ रोजी डॉ. होमी भाभा यांचे निधन झाले.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Thursday, 22 January 2026

23 जानेवारी दिनविशेष माहिती ( 23 January )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 

मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी माहिती पाहणार आहोत. लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी 
         हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  येथे क्लिक करावे. 

बाळासाहेब ठाकरे - मराठी जनतेचे प्रभावी नेतृत्व

बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील एक अत्यंत प्रभावी नेते होते. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ केशव ठाकरे असे होते. त्यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे प्रसिद्ध समाजसुधारक, लेखक आणि विचारवंत होते. वडिलांच्या प्रखर विचारांचा बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव पडला.
बाळासाहेब ठाकरे यांनी आपले शिक्षण मुंबईत पूर्ण केले. ठाकरे यांनी मुंबईतील फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांची व्यंगचित्रे द टाईम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या आवृत्तीतही प्रकाशित झाली. त्यांनी राजकीय आणि सामाजिक विषयांवर प्रभावी व्यंगचित्रे काढली. नंतर त्यांनी मार्मिक हे साप्ताहिक सुरू केले. या माध्यमातून त्यांनी मराठी माणसांच्या समस्यांवर आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. बाळासाहेब ठाकरे हे मराठी भाषेतील वृत्तपत्र दैनिक सामनाचे संस्थापक देखील होते.
मराठी तरुणांना रोजगार मिळावा, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि मराठी अस्मिता जागृत व्हावी या उद्देशाने १९ जून १९६६ रोजी त्यांनी शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना केली. शिवसेना ही सुरुवातीला सामाजिक संघटना होती, परंतु पुढे ती एक महत्त्वाची राजकीय शक्ती बनली. मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेने मोठे स्थान मिळवले. बाळासाहेब ठाकरे हे उत्तम वक्ते होते. त्यांची भाषणे थेट, परखड आणि प्रभावी असत. ते कोणत्याही विषयावर निर्भीडपणे मत मांडत. त्यांच्या विचारांशी अनेकजण सहमत होते, तर अनेकजण असहमतही होते; मात्र त्यांच्या नेतृत्वक्षमतेबाबत दुमत नव्हते. त्यांनी शिस्त, स्वाभिमान आणि मराठी माणसाच्या हक्कांवर भर दिला. ते स्वतः निवडणुका लढवत नसले तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा मोठा प्रभाव होता.
मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेचे जतन करणे, तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे त्यांच्या कार्याचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लोकजागृती केली. त्यामुळे त्यांना हिंदूहृदयसम्राट असे ही म्हटले जाते. 
बाळासाहेब ठाकरे यांचा विवाह १३ जून १९४८ रोजी मीनाताई ठाकरे (सरला वैद्य) यांच्याशी झाला. त्यांना तीन मुले होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव. 
दिनांक १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक प्रभावी नेता गमावला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले होते, हे त्यांच्या लोकप्रियतेचे द्योतक होते. आजही त्यांच्या विचारांचा प्रभाव समाजावर आणि राजकारणावर दिसून येतो.
बाळासाहेब ठाकरे हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर ते हिंदू जनतेचे व मराठी अस्मितेचे प्रतीक होते. त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण मिळाले. त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 

चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - बाळासाहेब ठाकरे यांचे पूर्ण नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, बाळ केशव ठाकरे असे बाळासाहेब ठाकरे यांचे पूर्ण नाव होते.

दुसरा प्रश्न - बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या साप्ताहिकाचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या साप्ताहिकाचे नाव मार्मिक होते. 

तिसरा प्रश्न - बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव होते.

चौथा प्रश्न - बाळासाहेब ठाकरे यांचे निधन केव्हा झाले ?
बरोबर उत्तर आहे, दिनांक १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. 

शेवटचा पाचवा प्रश्न - बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात कोणत्या कामाने केली ?
बरोबर उत्तर आहे - व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन 🌹🙏

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

23 जानेवारी दिनविशेष माहिती ( 23 January )


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 
मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी माहिती पाहणार आहोत. लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
Video पाहण्यासाठी 
        नेताजी सुभाषचंद्र बोस येथे क्लिक करावे. 

नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर, धाडसी आणि क्रांतिकारक नेते होते. त्यांनी आपल्या तेजस्वी नेतृत्वाने आणि देशप्रेमाने भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्याची तीव्र जाणीव निर्माण केली. “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा” ही त्यांची घोषणा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा बनला.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओरिसा राज्यातील कटक येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस होते. ते एक नामवंत वकील होते. सुभाषचंद्र बोस हे लहानपणापासूनच बुद्धिमान, शिस्तप्रिय आणि देशभक्त होते. वयाच्या १५व्या वर्षी नेताजी बोस गुरूच्या शोधात हिमालयात गेले होते. पण त्यांना गुरूचा शोध लागला नाही. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, नेताजी बोस हे त्यांचे शिष्य बनले. त्यांनी १९२१ साली इंग्लंडमध्ये जाऊन आय.सी.एस. (Indian Civil Services) परीक्षा उत्तीर्ण केली ; परंतु देशसेवेच्या इच्छेने त्यांनी ही प्रतिष्ठित नोकरी सोडून मायदेशी परत आले.
नेताजी सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कार्यरत होते आणि त्यांनी अध्यक्षपदही भूषविले. मात्र, महात्मा गांधींच्या अहिंसक धोरणापेक्षा वेगळा मार्ग अवलंबण्याची त्यांची भूमिका होती. त्यामुळे महात्मा गांधीजी सोबत मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी काँग्रेसपासून वेगळे होऊन फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नेताजींनी जर्मनी व जपानच्या मदतीने आझाद हिंद सेना उभारली. “चलो दिल्ली” हा नारा देत त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा उभारला. आझाद हिंद सरकारची स्थापना करून त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. त्यावेळी त्यांनी “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा” ही घोषणा केली.
नेताजींचे देशप्रेम, त्याग, शिस्त आणि धैर्य आजही प्रेरणादायी आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाने 2021 पासून नेताजी बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. जपानमध्ये काम करताना तेथील लोकांनी त्यांना नेताजी ही उपाधी दिली. त्यांनी दिलेला जय हिंद हा नारा भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. 
नेताजी सुभाषचंद्र बोस हे खऱ्या अर्थाने राष्ट्रनायक होते आणि भारतीय इतिहासात त्यांचे स्थान खूप महान आहे.

मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कोठे झाला ? 
बरोबर उत्तर आहे, ओरिसा राज्यातील कटक येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला.

दुसरा प्रश्न - नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणती घोषणा केली ?
बरोबर उत्तर आहे,  “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा” अशी घोषणा केली.

तिसरा प्रश्न - कोणाचे साहित्य वाचून नेताजी बोस त्यांचे शिष्य बनले ?
बरोबर उत्तर आहे, स्वामी विवेकानंद यांचे साहित्य वाचून नेताजी बोस त्यांचे शिष्य बनले.

चौथा प्रश्न - आय. सी. एस. चे full form काय आहे ? 
बरोबर उत्तर आहे, Indian Civil Services हे आय. सी. एस. चे full form आहे.

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - कोणत्या वर्ष्यापासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला ? 
बरोबर उत्तर आहे - सन 2021 पासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

Wednesday, 21 January 2026

गुरु तेग बहादूर शहीद दिवस ( Guru Teg बहादूर )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना ! 
मी नासा येवतीकर, आपल्यासाठी घेऊन आलोय दिनविशेष माहिती. आजच्या कार्यक्रमात आपण शीख धर्माचे नववे गुरु - गुरु तेग बहादूर यांच्या विषयी माहिती पाहू या. लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका...... Video पाहण्यासाठी 
               हिंद दी चादर गुरु तेग बहादूर येथे क्लिक करावे.
गुरु तेग बहाद्दूर हे शीख धर्माचे नववे गुरु होते. त्यांचा जन्म १ एप्रिल १६२१ रोजी अमृतसर येथे झाला. ते सहावे शीख गुरु श्री गुरु हरगोबिंद यांचे कनिष्ठ पुत्र होते. बालपणापासूनच ते धार्मिक, शांत स्वभावाचे, चिंतनशील आणि पराक्रमी होते. त्यांनी शस्त्रविद्या तसेच आध्यात्मिक शिक्षण घेतले होते. “तेग बहाद्दूर” या नावातच त्यांचे शौर्य आणि धैर्य प्रतीत होते—‘तेग’ म्हणजे तलवार आणि ‘बहाद्दूर’ म्हणजे शूरवीर.
गुरु तेग बहाद्दूर यांना १६६४ साली गुरु पद प्राप्त झाले. त्या काळात भारतावर मुघल सम्राट औरंगजेबाचे राज्य होते. धार्मिक असहिष्णुता वाढत होती आणि विशेषतः काश्मीरमधील हिंदूंवर जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा दबाव टाकला जात होता. काश्मिरी पंडितांनी आपल्या धर्मरक्षणासाठी गुरु तेग बहाद्दूर यांच्याकडे मदतीची याचना केली.
गुरु तेग बहाद्दूर यांनी धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपले जीवन अर्पण करण्याचा महान निर्णय घेतला. त्यांनी औरंगजेबाच्या अन्यायकारक धोरणांना विरोध केला. दिल्ली येथे त्यांना अटक करण्यात आली आणि इस्लाम स्वीकारण्यास सांगितले गेले. मात्र, त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्य आणि धर्मासाठी बलिदान देण्याचा मार्ग स्वीकारला. ११ नोव्हेंबर १६७५ रोजी चांदणी चौक, दिल्ली येथे त्यांचे शिरच्छेदन करण्यात आले. यावर्षी त्यांची 350 वी शहिदी वर्ष निमित्ताने संपूर्ण भारतभर विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. 
गुरु तेग बहाद्दूर हे गुरु गोविंद सिंह यांचे वडील होते. तसेच त्यांचे संबंध गुरु–शिष्याचे होते. गुरु तेग बहाद्दूर हे शीख धर्माचे नववे गुरु होते, तर गुरु गोविंद सिंह हे त्यांचे पुत्र आणि शीख धर्माचे दहावे व अंतिम गुरु होते.
गुरु गोविंद सिंह यांच्या जन्माच्या वेळी गुरु तेग बहाद्दूर धार्मिक प्रचारासाठी विविध ठिकाणी प्रवास करत होते. त्यामुळे गुरु गोविंद सिंह यांचे बालपण मुख्यतः आई माता गुजरी यांच्या देखरेखीखाली गेले. तरीही गुरु तेग बहाद्दूर यांनी आपल्या पुत्राला धर्म, शौर्य, सत्यनिष्ठा आणि न्यायाची शिकवण दिली.
गुरु तेग बहाद्दूर यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा प्रभाव गुरु गोविंद सिंह यांच्या विचारसरणीवर दिसून येतो. धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेले गुरु तेग बहाद्दूर यांचे बलिदान गुरु गोविंद सिंह यांच्यासाठी प्रेरणास्थान ठरले. वडिलांच्या बलिदानानंतर अवघ्या नवव्या वर्षी गुरु गोविंद सिंह यांना गुरु पद प्राप्त झाले.
गुरु तेग बहाद्दूर यांच्या त्यागामुळे गुरु गोविंद सिंह यांच्यात अन्यायाविरुद्ध लढण्याची तीव्र भावना निर्माण झाली. पुढे त्यांनी खालसा पंथाची स्थापना करून शीख समाजाला संघटित, शिस्तबद्ध आणि धैर्यवान बनवले. हे कार्य त्यांच्या वडिलांच्या विचारांचेच प्रत्यक्ष रूप होते.
या प्रकारे गुरु तेग बहाद्दूर आणि गुरु गोविंद सिंह यांचे संबंध केवळ रक्ताचे नव्हते, तर विचारांचे, मूल्यांचे आणि धर्मरक्षणाच्या महान परंपरेचे होते. गुरु तेग बहाद्दूर यांचा त्याग आणि गुरु गोविंद सिंह यांचे कार्य यांमुळे शीख धर्माला एक सशक्त आणि तेजस्वी दिशा मिळाली.
गुरु तेग बहाद्दूर यांचे बलिदान हे केवळ शीख धर्मासाठी नव्हे, तर सर्व धर्मांच्या स्वातंत्र्यासाठी होते. म्हणूनच त्यांना “हिंद दी चादर” असे गौरवले जाते. त्यांच्या शिकवणुकीत वैराग्य, करुणा, सत्य, सहिष्णुता आणि ईश्वरभक्ती यांचा संदेश आहे. त्यांच्या अनेक बाणी गुरु ग्रंथसाहिबमध्ये समाविष्ट आहेत.
गुरु तेग बहाद्दूर यांचे जीवन आणि बलिदान मानवतेला धर्मस्वातंत्र्य, नैतिक धैर्य आणि सत्यासाठी उभे राहण्याची प्रेरणा देते. भारतीय इतिहासात त्यांचे स्थान अत्यंत गौरवशाली आणि प्रेरणादायी आहे.
मुलांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? नक्की कळवा हं 

चला या माहितीच्या आधारे काही प्रश्नांची उत्तरे पाहू या 

पहिला प्रश्न - शीख धर्माचे नववे गुरु कोण होते ? 
बरोबर उत्तर आहे, गुरु तेग बहादूर हे शीख धर्माचे नववे गुरु होते.

दुसरा प्रश्न - शीख धर्माचे दहावे व अंतिम गुरु कोण होते ? 
बरोबर उत्तर आहे, गुरु गोविंद सिंह हे शीख धर्माचे दहावे व अंतिम गुरु होते.

प्रश्न तिसरा - तेग म्हणजे काय ? 
बरोबर उत्तर आहे, तेग म्हणजे तलवार

चौथा प्रश्न - गुरु गोविंद सिंह यांनी कोणत्या पंथाची स्थापना केली ?
बरोबर उत्तर आहे, गुरु गोविंद सिंह यांनी खालसा पंथाची स्थापना केली. 

आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - गुरु तेग बहादूर यांना त्यांच्या बलिदानाबद्दल कोणत्या नावाने गौरविले जाते ?
बरोबर उत्तर आहे, हिंद दी चादर या नावाने गुरु तेग बहादूर यांना गौरविले जाते. 

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार 🙏

वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आली आहे. 

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

दिनविशेष माहिती - 31 जानेवारी ( 31 January )

🇮🇳  परमवीर चक्र विजेते वीर मेजर सोमनाथ शर्मा  🇮🇳 मेजर सोमनाथ शर्मा हे भारतीय सैन्याचे पहिले परमवीर चक्र सन्मानित अधिकारी असू...