Sunday 31 December 2017

नवीन वर्ष सुखाचे जावो

नवीन वर्ष सुखाचे जावो

मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालो आहोत. ख्रिसमस म्हणजे नाताळाचा सण संपला की, संपूर्ण जगाला नवीन वर्षाची चाहूल लागते. संपूर्ण जगात या नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भारतात इंग्रज लोकांनी दीडशे वर्षे राज्य केले आणि जाता जाता त्यांच्या संस्कृतीमधील काही गोष्टी भारतात सोडून गेले. एक जानेवारीचा नवीन वर्षाचा कार्यक्रम हा पाश्चिमात्य पद्धतीचा असल्यामुळे बहुतांश जण यास विरोध दर्शवितात, ते खरेही आहे. कारण भारतातील हिंदू संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष चैत्र प्रतिपदेला प्रारंभ होतो. त्यास आपण गुढीपाडवा असे म्हणतो. हा दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. कारण याच दिवसापासून ते आपल्या शेतातील जमा-खर्चाचा हिशोब मांडतात. व्यापारी मंडळी आश्विन महिन्यातील अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करून त्यानंतर येणाऱ्या बलिप्रतिपदेला आपल्या नवीन व्यवहाराला सुरुवात करतात. दिवाळीच्या पाडव्याला व्यापारी नववर्ष मानतात. शासन किंवा सरकारी कार्यालयात आर्थिक लेखाजोखा व्यवस्थित राहण्यासाठी एक एप्रिल हा दिवस त्यांच्यासाठी नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात असते. बालगोपाळांची शाळा जून महिन्यात प्रारंभ होतो. या महिन्यात नव्या वर्गात, नव्या मित्रांसोबत आणि नव्या करकरीत पुस्तकांच्या भेटीसाठी उत्सुक असतो. त्यास्तव आपल्यासाठी जून महिना हा नववर्षाचा भासतो. असो, आपण सुद्धा या सर्वांसोबत नवीन वर्ष साजरा करीत असतो. नवीन वर्ष साजरा करताना केशव नाईक यांचे सुवचन नेहमी लक्षात ठेवावे. ते म्हणजे, जीवन हा एक घडविला जात असलेला सोन्याचा दागिना आहे. तो जितका काळजीपूर्वक घडविला जाईल तितका अधिक शोभेल. तेव्हा आपणा सर्वांचे जीवन सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे सुंदर घडत जावो, परमेश्वर चांगली विचार करणारी बुद्धी आणि उत्तम पाहण्याची दृष्टी प्रदान करो हिच या नववर्षानिमित्त शुभेच्छा.

- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Monday 25 December 2017

आत्मकथा

मी एक शेतकरी बोलतोय.......

नमस्कार ....!

मी एक शेतकरी आपल्याशी संवाद करीत आहे. या भारतातील जवळपास ७५ टक्के जनता खेड्यांत राहते आणि येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती म्हणूनच भारत देश कृषिप्रधान आहे असे म्हटले जाते. भारतातील संपूर्ण व्यवहार हा शेतीवरच अवलंबून आहे. शेतातून निघणा-या उत्पादनावरच भारताचा विकास अवलंबून आहे. इतरांना जगवणारा, उत्पादक असा मी शेतकरी मात्र फारच बिकट अवस्थेत दिसून येतो. कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ओळीनुसार मी उभ्या जगाचा पोशिंदा आहे. मात्र माझ्याच पदरात धोंडा का पडतो? हे एक न सुटणारे कोडे आहे. जगाचे पालनपोषण करणारा मी मात्र महागाईच्या आगीत होरपळून निघत आहे. कर्जाच्या डोंगराखाली दबला जात आहे. त्याचबरोबर याच शेतातील उत्पादनावर व्यापार करणारी मंडळी महालातील पंख्याखाली बसून भरपूर पैसा कमवित आहेत आणि शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करणारा मी मात्र हलाखीचे जीवन जगत आहे.
मला ना निसर्गाची साथ आहे ना सरकारची, त्यामुळे माझ्या पदरात दरवर्षी निराशाच येते. पावसाळा आला की, नव्या दमाने, नव्या उत्साहाने मी कामाला लागतो. मात्र माझ्या उत्साहावर निसर्ग कायम पाणी टाकतो. वेळेवर पावसाचे पाणी पडत नाही मात्र केलेल्या कामावर पाणी टाकायला विसरत नाही. शेतातून निघणा-या उत्पादनांवर भरवसा ठेवून मी आपले कौटुंबिक व्यवहार पूर्ण करतो आणि ऐनवेळी निसर्गाकडून मला फटका बसतो. त्यामुळे माझ्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत जाते वाढत जाते व एके दिवशी अशी परिस्थिती येते की, मला आत्महत्या करण्याशिवाय पर्यायच दिसत नाही. एका वर्षात कोणत्या भागात किती शेतक-यांनी आत्महत्या केल्या ? याची आकडेवारी लावली जाते. पण मी म्हणतो माझा बंधू शेतकरी आत्महत्या का करतो ? याचा कोणी विचार करीत नाही.
माझ्यासाठी पहिला मुद्दा म्हणजे निसर्गाची साथ. भारतात प्रामुख्याने दोन प्रकारची शेती केली जाते. एक म्हणजे जिरायती अर्थात कोरडवाहू आणि दुसरी बागायती. देशात दुस-या प्रकारापेक्षा पहिल्या प्रकाराची शेती करणा-यांची संख्या जास्त आहे. निसर्गावर आधारित शेती करावी लागते, त्यामुळे त्याचे जीवन बेभरवशाचे असते. मी पै-पै गोळा करून बी-बियाणे, खते व औषधी खरेदी करतो आणि शेतात टाकतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे एक तर मला आकाशाकडे डोळे लावून बसावे लागते किंवा अति पावसामुळे पाऊस थांबण्याची वाट पाहावी लागते. काही का असेना फटका मात्र मलाच बसतो. सध्या तरी कोरडवाहू शेती करणे म्हणजे एक जुगारच आहे. लागली लॉटरी तर लागूनच जाते अन्यथा बरबादच. नशिबाने साथ दिली तरच शेतात टाकलेले बी-बियाणे, खते, औषधे आणि श्रम यांना फळ मिळते. नाही तर खर्च झालेली मुद्दल रक्कमसुद्धा मला परत मिळत नाही. माझ्यांसोबत दरवर्षी असेच घडते. त्यामुळे माझ्या पदरात नेहमीच निराशा पडते. माझे जीवनमान, माझा जीवन जगण्याचा स्तर उंचवायचा असेल तर सर्वप्रथम माझी शेती निसर्गावर अवलंबून राहू नये अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल. मित्रानो, निसर्गाचा लहरीपणा निर्माण केला आपणच आणि त्यास अटकाव करण्याची जबाबदारी आपणावरच आहे. पाऊस पडणे वा न पडणे हे सरकारच्या हाती नाही. पाण्याचे योग्य नियोजन करणे, वृक्षलागवड करून वृक्षसंवर्धन करणे इत्यादी साधे उपाय करणे आवश्यक आहे. वृक्षांमुळे पाऊस पडतो हे आता सर्वज्ञात झाले आहे. उघड्या जागेवर, माळरानावर, टेकड्यांवर जास्तीत जास्त वृक्ष कसे जगविता येतील याचा प्रत्येकाने विचार करणे आवश्यक आहे. निसर्गाची शोभा व पर्यावरण संतुलन कसे राखता येईल यावर ही विचार झाला पाहिजे.
माझ्यासाठी दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे माझ्या उत्पादनाला हमी भाव देणे. माझ्याकडून जीवनावश्यक अशा अनेक अन्नघटकांचे उत्पादन केले जाते. संसार चालविण्यासाठी पैशाची आवश्यकता भासते त्यामुळे मी आपला उत्पादित माल बाजारपेठेत विक्रीसाठी नेतो. मात्र बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याच्या गणितात मला नेहमीच फटका बसतो. जेव्हा माझ्याजवळ माल असतो त्यावेळी बाजारात भाव कमी असतो आणि व्यापारी मात्र साठवणूक करून चढ्या भावाने विक्री करतात. दरवाढीचा खरा फायदा मला होण्याऐवजी तो दलालांना व व्यापा-यांनाच जास्त होतो. त्यामुळे अन्नधान्य उत्पादन करणारा पोशिंदा मी , कंगाल बनत चाललो आहे तर माझ्या उत्पादनावर जगणारी बांडगुळे श्रीमंत होत आहेत. तेव्हा शासनाने या प्रश्नाविषयी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. बाजारपेठेत व्यापारी वा दलाल लोकांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी प्रत्येक शेतक-याला आपला उत्पादित माल साठविता येईल अशा शीतगृह कोठारांची गावोगावी निर्मिती करून देणे आवश्यक आहे. मध्यस्थाच्या मदतीने चालणारा व्यवहार बंद करून शेतक-यांच्या प्रत्येक उत्पादित मालाचे शासनाने हमी भाव अगोदरच जाहीर केल्यास माझ्यासारख्या शेतक-यांची लूट होणार नाही. उत्पादित मालाची नोंदणी शेतक-यांच्या नावे करण्यात यावी ज्यामुळे शेतकरी विक्री करताना तूरडाळीची किंमत ३५ रु. प्रति किलो आणि व्यापारी विक्री करताना ८० रु. तर या वाढीव रकमेतून निदान ५० टक्के रक्कम शेतक-यांना मिळावी असा कायदा तयार केल्यास शेतक-यांचा नक्कीच फायदा होईल. शेतक-याच्या हातून एकदा माल गेला की त्यावर त्याचे कसल्याच प्रकारचे नियंत्रण नसते. बाजारात सध्या असलेली ही विषमता दूर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बाजारपेठेतील शेतक-यांच्या उत्पादित मालाचे सर्व व्यवहार कृषि उत्पन्न बाजार समितीमार्फतच व्हावेत. बाजारपेठेत शेतक-यांच्या मालाची बोली लावण्याची पद्धत सर्वप्रथम बंद करावी. उत्पादित मालाला वेगवेगळ्या प्रकारची नावे ठेवून दलाल मंडळी एकाच प्रकारच्या उत्पादनाला दर तासाला किंवा दिवसागणिक वेगळेच भाव लावतात. अशा या लिलाव प्रक्रियेमुळे शेतकरी हवालदिल होतो. त्याऐवजी स्थिर भावात खरेदी-विक्री झाल्यास शेतक-यांना आपल्या उत्पादित मालाविषयी विश्वास वाटतो. व्यापारी किंवा दलाल मंडळींना फाटा देऊन ज्याप्रकारे पणन महासंघ कापूस खरेदी करते त्याच धर्तीवर सर्व उत्पादित माल जसे की, तूर, मूग, उडीद, सोयाबीन इत्यादी सर्व वस्तू शासनाने खरेदी कराव्या व एकच हमीभाव जाहीर करावा म्हणजे शेतकरी विश्वासपूर्वक जगू शकेल.
माझा तिसरा मुद्दा म्हणजे मला जोडधंदा करण्यासाठी अनुदान द्यावे. शेतीला पूरक असा जोडधंदा असेल तर शेतातून झालेले नुकसान या व्यवसायातून मला भरपाई करता येऊ शकते. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश किंवा कोकण विभागातील शेतकरी शेती या मुख्य व्यवसायासोबत पशुपालन, शेळीपालन किंवा इतर जोड व्यवसाय करतो. ज्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासत नाही किंवा ऐनवेळी कोणाकडे जावे लागत नाही. याच जोडधंद्याची उणीव मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागात मला दिसून येते. येथील शेतक-यांची नुकसानभरपाई कोणत्याच मार्गाने होत नाही.
२०-२५ वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या घरी एक तरी दुभते जनावर असायचे ज्यामुळे दूध तर मिळतच होते शिवाय दुग्धजन्य पदार्थही घरीच मिळत होते. त्याचसोबत जनावरेही वाढत होती. मात्र ५-१० वर्षांपासून जनावरांची संख्या कमी झाली. जेथे दुधाची गंगा वाहत होती तेथील लोकांना चहासाठी जेवढे दूध लागते तेवढ्या दुधासाठी मोताद होण्याची वेळ आली आहे. एवढी विपरीत स्थिती का निर्माण झाली? शासनाने वेळीच यावर उपाययोजना आखली नाही. माझ्यासारख्या शेतक-यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी केली पण मी म्हणतो याने आत्महत्या थांबल्या का? नाही. उलट वाढतच गेल्या. याव्यतिरिक्त शासनाने प्रत्येक शेतक-याला पशुपालन, शेळीपालन वा इतर जोड व्यवसाय उभारणीसाठी सबसिडीच्या स्वरूपात किंवा कर्जाच्या स्वरूपात रक्कम दिली असती तर लाखो शेतक-यांच्या हाताला काम मिळाले असते, गावात समृद्धता वाढली असती. शेतक-यांची नुकसान भरपाई झाली असती, त्याचसोबत धवलक्रांतीही घडली असती. काही लघुउद्योगांसाठी जरी कर्जपुरवठा झाला असता तर माझ्या मानसिकतेत बदल झाला असता. परंतु कर्जमाफी करून सरकारने मला आळशी बनविले. फुकट मिळालेल्या पैशातून दारू, जुगार या बाबींवर माझा सारा पैसा खर्च झाला. एक प्रकारे शासनाने लोकांना फुकट जगविण्याचा जणू विडा उचलला आहे असे दिसते. नुकतेच पारित करण्यात आलेले अन्न सुरक्षा विधेयक २०१३ मधून एक चित्र ठळकपणे दिसत आहे. भविष्यात माझ्या शेतात काम करण्यासाठी जे काही मजूर लागतील ते अव्वाच्या सव्वा दरात मला मिळवावे लागतील आणि कदाचित मजूर मिळणार ही नाहीत. कारण या विधेयकानुसार देशातील अर्ध्या जनतेला कमी दरात अन्नधान्य मिळत असेल तर ते काम का करतील ? आज अंत्योदय योजनेतून जे सूक्ष्म चित्र दिसत आहे या योजनेतून अगदी ठळक दिसेल. यापेक्षा शासनाने आमच्या उत्पादित मालाला संरक्षण व हमी भाव दिले असते तर फार बरे झाले असते. जाता जाता मला एकच म्हणायचे आहे की, माझ्या उत्पन्नाला योग्य न्याय द्या. मी सन्मानाने जगलो तर आपणही सन्मानाने जगाल असे वाटते. जय किसान.

- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

Saturday 23 December 2017

साने गुरुजी जयंती

मानवतेची शिकवण देणारे साने गुरुजी

पांडुरंग सदाशिव साने ज्यांना आपण सर्वजण साने गुरुजी या नावाने ओळखतो. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. सदाशिवराव व यशोदाबाई यांच्या पोटी जन्मलेला दुसरा मुलगा असून तिसरे अपत्य म्हणजे साने गुरुजी. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झाले. त्यांचे वडील सारा गोळा करण्याचे काम करीत होते. साने गुरुजी यांची आई त्यांना श्याम या नावाने प्रेमाने हाका मारीत असे. त्यांच्या लहानपणीच्या छोटया मोठया प्रसंगातून आईने त्यांच्यावर संस्कार करण्याचे काम केले आहे. याच विचारातून त्यांच्या हातून श्यामची आई नावाचे प्रसिद्ध साहित्य निर्मिले गेले. ज्यातून श्याम म्हणजे साने गुरुजी कसे घडले ? याची प्रचिती येते. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला त्यांच्या काकांकडे राहू लागले, परंतु तेथील वातावरण व परिसर त्यास रुचले नाही आणि ते परत आपल्या गावी आले. गावापासून जवळपास 6 मैल अंतरावर असलेल्या मिशनरी शाळेत प्रवेश घेतला. रोज पायी चालत ते शाळेला जात असे. मराठी व संस्कृत विषयात आपण प्रज्ञावान आहोत याची सर्वप्रथम जाणीव याच शाळेत झाली आणि तेथेच त्यांना कविता करण्याचेही सुचू लागले. साने गुरुजींच्या घरची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली होती. गुरुजींच्या शिक्षणाविषयी घरात चर्चा होऊ लागली. वडील भाऊ सुद्धा साने गुरुजींच्या शिक्षणाविषयी चिंतेत होते. ही बाब साने गुरुजींच्या लक्षात आल्यावर त्यांनी औंध इंस्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला. कारण येथे गरीब मुलांसाठी मोफत शिक्षणासोबत मोफत जेवण सुद्धा दिल्या जात असे. कठीण परिश्रम करीत ते आपल्या शिक्षणाचा प्रवास करीत होते. तेथून ते पुण्यातील नूतन मराठी विद्यालयामध्ये प्रवेश घेतला . सन 1918 मध्ये गुरुजी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याच्या एका वर्षापूर्वी त्यांची लाडकी आई यशोदाबाई यांचे निधन झाले, तेव्हा त्यांना डोक्यावर आभाळ कोसळल्यागत वाटले. कारण त्यांच्यासाठी आई ही सर्वस्व होती. ती प्रेमस्वरूप होती, वात्सल्यसिंधु होती. महाविद्यालय शिक्षण त्यांनी न्यू पुणे कॉलेज ( परशुराम भाऊ कॉलेज जुने नाव) येथून बी.ए. व एम.ए. चे शिक्षण पूर्ण केले. मराठी व संस्कृत विषयातून पदवी आणि पदव्युत्तर चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अंमळनेर मधील प्रताप हायस्कुल मध्ये शिक्षकांची नोकरी पत्करली. गुरुजींना लहान मुलांचा लळा होता आणि ग्रामीण भागात काम करण्यात विशेष रस होता. शिक्षकांना मिळणाऱ्या पगारी पेक्षा मुलांना मानवतेचे धडे शिकवण्याची त्यांच्या आवडीमुळे ते विद्यार्थीप्रिय बनले होते. मुलांचे ते गुरुजींच नाही तर आई, वडील पालकही होते. कारण वार्डनर म्हणूनही त्यांनी काम केले. शाळेत असतांना त्यांनी विद्यार्थी नावाचे मासिक प्रकाशित करायला सुरुवात केली, जे की खूपच प्रसिद्ध झाले होते. साने गुरुजींचे जेवढे मुलांवर प्रेम होते तेवढेच प्रेम मुलांचे साने गुरुजीवर होते. येथे केलेल्या मेहनती मुळेच ते साने गुरुजी या नावाने मुलांमध्ये ओळखले जाऊ लागले. जो पर्यंत त्यांनी या शाळेत कार्य केले तो त्यांच्या जीवनाचा पहिला भाग होता.
महात्मा गांधीजींनी सन 1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह करीत दांडी यात्रेचे आयोजन केले. त्या सत्याग्रहात साने गुरुजी यांनी सहभाग घेतला आणि त्यांच्या जीवनातील दुसऱ्या भागास प्रारंभ झाला. वडील लोकमान्य टिळकांच्या विचारांशी सहमत होते. घरात तसे वातावरण नव्हते परंतु अधूनमधून विचारधारा चालत असे. भारतीय स्वातंत्रलढ्यात सहभाग घेतल्यामुळे त्यांना धुळे येथील तुरुंगात जेरबंद करण्यात आले ते 15 महिन्यांसाठी. याच तुरुंगात त्याच कालावधीत विनोबा भावे दररोज गीतेवर प्रवचन देत असत, त्यांचा प्रभाव गुरुजींवर झाला. पुढे त्यांना तिरुचैन्नपल्ली येथे तुरुंगवास भोगावा लागला. येथे त्यांनी तामिळ व बंगाली भाषा शिकली. यातूनच मग आंतरभारती चळवळ उदयास आली. सन 1942 च्या चले जावं आंदोलनाच्या माध्यमातून साने गुरुजीचा संपर्क मधू लिमये, कॉ. एस. एम. डांगे, एन. जी. गोरे, एस.एम.जोशी यांच्याशी आला. पंढरपूरचे विठ्ठल मंदिराचे दार सर्वांसाठी खुले करावे म्हणून 01 मे ते 11 मे 1947 मध्ये आंदोलन करून ते यशस्वी केले. 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना साप्ताहिकाची सुरुवात केली. जे की आजतागायत चालू आहे. यशोदाबाईच्या श्यामचा मृत्यू 11 जून 1950 रोजी झाला. प्रत्येक गुरुजीनी जर साने गुरूजी होण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात संस्कारमय विद्यार्थी नक्कीच तयार होतील. आज त्यांची जयंती त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. 

- नागोराव सा. येवतीकर,
प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद  जि. नांदेड
9423625769

Wednesday 13 December 2017

झेल्या

संकलित - *व्यंकटेश माडगुळकर यांची कथा*

*झेल्या*

आता माझ्या आयुष्याला अगदी वेगळे वळण लागले आहे. इतके की कधी काळी माणदेशातील खेड्यात शिक्षक होतो हे मी विरून जावे. तरीदेखील ते दिवस माण्या आठवणीत आहेत. याचे कारण झेल्या. माझा एक विद्यार्थी.
मी त्या खेड्यात तीन महिन्यांकरताच होतो. पहिल्याच दिवशी सांधे खिळखिळे झालेल्या लाकडी खुर्चीवर मी बेतानं बसलो. एकवार साऱ्या वर्गावरून नजर फिरवली. चिल्ली-पिल्ली डोळे विस्फारून बसली होती. नवे मास्तर मारकुटे आहेत की चांगले आहेत, ते सारखे हिशेब आणि गणिते सांगतात, की अधूनमधून गोष्टीसुद्धा सांगातात, सारखे वाचन घेतात की गाणीसुद्धा म्हणायला लावतात, असे विचार त्या चिमण्या डोक्यांतून उड्या मारीत असावेत.
मी एकवार हळूच हसलो. टेबलावर रुळाखाली ठेवलेली हजेरी उघडली. चिनीमातीच्या दौतीत टाक बुडवला आणि म्हणालो, ‘‘हं, हजेरी सांगा रे –’’
‘‘सदाशिव नारायण.’’
आढ्याशी भिरभिरणाऱ्या चिमणीकडे पाहणारे पहिल्या नंबरचे एक पोरगे दचकले. टोपी सावरून अर्धवट उभे राहत ओरडले, ‘‘हजर.’’
‘‘अब्दुल फत्तूभाई.’’ लाल टोपीचा गोंडा हालला आणि चिरका आवाज उठला, ‘‘हजर.’’
होता होता शेवटचे नाव मी वाचले, ‘‘जालंदर एकनाथ.’’
आणि पोरे ओरडली, ‘‘जालंदर न्हाय. झेल्या म्हना. त्यो साळंतच येत न्हाई!’’
‘‘का येत नाही रे ?’’ मी विचारले.
‘‘कुनाला ठावं मास्तर, आनू का बोलावून ?’’ एकजणाने विचारले.
‘‘घरी न्हाई त्यो, वड्यात चिंचा पाडतोय,’’…. दुसऱ्या एकाने अचूक माहिती सांगितली. पोरांचा एकच गिल्ला चालू झाला, तसा मी रूळ टेबलावर आपटला. गोंगाट बंद झाला. मग तीन चांगली दणकट पोरे जालंदरल बोलावून आणण्यासाठी पाठवून दिली. ती मोठ्या वीरश्रीने गेली. पंधरा-वीस मिनिटे झाली असतील नसतील, ती जालंदरला घेऊनच आली. तो हिसकाहिसकी करत होता आणि पोरांनी त्याचे दंड घट्ट पकडले होते.
‘‘सोडा त्याला. कुठं होतास रे?’’
‘‘वड्यात चिंचा पाडत हुता. आमी साळंत चल म्हनल्यावर शिव्या दिल्या मास्तर!’’ पोरांनी माहिती दिली.
बटणे नसलेल्या कुडत्याला एका हाताने गळ्याशी धरून झेल्या बिथरल्या खोंडासारखा उभा होता. अंगाने किरकोळच. वयानेही फारसा नसावा. डोक्याला मळकट अशी पांढरी टोपी, अंगात कसले कसले डाग पडलेले, बाहीवर ठिगळ लावलेले कुडते, तांबड्या रंगाचे चौकडे असलेली गादीपाटाची चड्डी, तिचे दोन्ही अंगचे खिरे फुगलेले. त्यांत बहुधा चिंचा भरलेल्या असाव्यात.
सौम्य आवाजात मी विचारले, ‘‘काय रे, शाळेत का येत नाहीस?’’
‘‘काम असतं घरी, ‘‘गुर्मीत बोलाल. त्याचे दात काळे आणि किडलेले होते.
‘‘कसलं?’’
‘‘म्हस हिंडवावी लागती. भाता वडावा लागतो. दादा म्हणतो, साळंत जाऊ नगस !’’
झेल्याची ही सबब खोटी होती. कारण पहिल्या नंबरला असलेला सदा एकदम बोलला, ‘‘लबाड बोलतोस ! काय सुदीक करीत न्हाई ह्यो घरी – बापाला सांगतो साळंत मास्तर मारत्याती म्हणून, अन् गावात उनाडक्या करत हिंडतो ! काय ऐकत न्हाई बापाचं !’’
त्यावर झेल्याने रागारागाने सदाकडे बघितले आणि तो तोंडतल्या तोंडात पुटपुटला, ‘‘चल की साळंबाहेर, जीवच घितो तुजा !’’
झेल्या उनाड आणि धाडसी असल्याची माझी खात्री पटली, तरीसुद्धा मवाळपणानं मी म्हणालो, ‘‘अरे, काम असलं तर विचारून जावं तेवढ्यापुरतं, मी काही नाही म्हणणार नाही तुला.’’
झेल्याचा हिशेब चुकल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. फोका आणि कानफडात घेण्याच्या तयारीने तो आला होता, पण मी प्रथमपासूनच पड घेतली होती.
‘‘खिशात काय आहे तुझ्या ?’’
इतका वेळ बटणांच्या अभावी धरलेली मूठ एकदम सुटली आणि दोन्ही हात झेल्याने खिशात कोंबले, ‘‘काय न्हाई.’’
‘‘चिंचा हायत्या मास्तर !’’ असे ओरडून एक पोरगे जागेवरून उठून पुढे आले आणि झेल्याचे खिशात कोंबलेले हात हिसकू लागले, तसा तो केवढ्या तरी मोठ्यांदा ओरडला, ‘‘अग आय आय ग, बोट मुरगाळलं माजं !’’
मला माहीत होते की हा त्याचा कांगावा आहे.
‘‘तू बाजूला हो रे. जागेवर बैस बघू,’’ मी त्या पोराला दटावले आणि झेल्याला पुन्हा म्हणालो,
‘‘झेल्या, काढ बघू काय आहे ते खिशात. चिंचा आहेत का ? आण त्या. ठेव टेबलावर. मला हव्यात घरी न्यायला.’’
काही वेळ तो तसाच उभा राहिला आणि मग बोलला,
‘‘समद्या ?’’
‘‘हो, आधी सगळ्या काढून टेबलावर तरी ठेव. मग मी लागेल तेवढ्या घेतो आणि तुला देतो राहिलेल्या !’’
हिरव्यागार चिंचांचे मोठे मोठे आकडे भराभरं खिशांतून काढून झेल्याने टेबलावर ठेवले.
‘‘शाबास जालंदर ! मास्तरांचं ऐकणारा शहाणा मुलगा आहेस तू. बैस आता जाग्यावर. शाळा सुटल्यावर तुला देईन मी यांतल्या चिंचा.’’
झेल्या खुशीने हसला. त्याने एकवार चड्डी दोन्ही हातांनी वर ओढली आणि कुडत्याचा मोकळा गळा मुठीत पकडून तो जागेवर जाऊन बसला.
दुसरे दिवशी झेल्या पुन्हा गैरहजर राहिला. पहिल्या दिवसाची पुन्हा उजळणी करून त्याला बोलावून आणला. पण मी त्याच्यावर कधीच रागावलो नाही. एक आठवडा असा लोटला आणि मग मात्र झेल्या  नियमित शाळेत येऊ लागला.
मुळात झेल्या एक चुणचुणीत पोरगा आहे, त्याच्या व्रात्यपणात बुद्धीची चमक आहे, कल्पकता आहे. तो कधी सुभाषबाबूंविषयी तर कधी नाना पाटलांविषयी प्रश्न विचारी. त्याला धाडसी माणसे फार प्रिय होती. त्यांच्याविषयी त्या बालमनात अपार आदर होता. आता तो अभ्यासाकडेही लक्ष पुरवू लागला.
हां हां म्हणता तीन महिने संपून गेले. मी झेल्यापाशी माझ्या जाण्याचे बोललो. तो क्षणभर खिन्न झाला, गप्प बसला आणि एकाएकी म्हणाला, ‘‘मी येतो मास्तर तुमच्यासंगं !’’
कुठे येणार होता तो माझ्याबरोबर ? मी कुठे जाणार होतो हे माझे मलाच माहिती नव्हते, तर त्याला मी कुठे घेऊन जाणार होतो ? मी हसलो आणि म्हणालो, ‘‘अरे, वेडा काय तू ? मी कुठं जाणार नाही. तालुक्याच्या गावी मोठ्या शाळेत मास्तर होणार आहे. तू इथं चार इयत्ता शीक आणि तिकडे ये. माझ्या वर्गात ये, सातवी पास हो, इंग्रजी शीक !’’
झेल्याच्या बाळबुद्धीचे समाधान झाले. एक तांबड्या दांडीचा टाक आणि पेन्सिल माझी आठवण म्हणून मी झेल्याला दिली.
नंतर सर्वांना भेटलो. मुलांचा निरोप घेतला आणि पायीपायी निघालो. काही मुले वेशीपर्यंत आली आणि परतली. झेल्या मात्र परतला नाही. एक पिशवी घेऊन तो माझ्याबरोबर चालतच होता.
गावचा ओढा ओलांडला, हद्द संपली.
‘‘झेल्या, जा ते आता.’’
मी त्याच्या हातातून पिशवी घेतली आणि पाठीवरून हात फिरवला.
झेल्याने एकाएकी ओंजळीत तोंड झाकले आणि तो रडू लागला, ‘‘मास्तर, मी न्हाई जायचा आता त्या साळंत !’’
त्याची समजूत काढून मी त्याला परत पाठवला.
अंगरख्याच्या बाहीने तो वरचेवर डोळे पुशीत होता आणि मागे वळून पाहत होता.
पाऊलवाटेची वळणे घेऊन अखेर झाडाझुडपाआड तो दिसेनासा झाला. तोंड वळवून मीही चालू लागलो.
त्यावर अद्याप झेल्या मला कधी भेटला नाही. तो आता कुठे असेल ?

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...