Saturday 23 March 2024

पुस्तक परिचय - अलेक्सा ( Aleksa )


कथेतून मूल्यशिक्षण देणारे पुस्तक अलेक्सा 
अखिल भारतीय बालसाहित्य पुरस्कार प्राप्त, मुळत: महाराष्ट्रातील वरोरा येथील रहिवाशी पण सध्या हैद्राबाद येथे वास्तव्यास असलेली, माध्यमिक शाळेतून प्रिन्सिपल पदावरून निवृत्त झालेली, ज्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि तेलगू या चार भाषेत कथा, कविता, ललित लेख, पद्य पथ नाटिका, कादंबरी, बालकथा, बालकविताचे गेल्या 40 वर्षात विपुल लेखन केले आहे अशा आंतरराष्ट्रीय बहुभाषी कवयित्री लेखिका मीना खोंड यांची अलेक्सा ही कादंबरी ई साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केली आहे. या कादंबरीला महाराष्ट्रात मुलांच्या जगात प्रसिद्ध असलेल्या किशोर मासिकाचे संपादक श्री किरण केंद्रे यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. लेखिकेने यापूर्वी देखील बालसाहित्यात मोलाची अशी कामगिरी केलेली आहे. अलेक्सा कादंबरी म्हणजे अनेक लाडक्या बालमित्रांसाठी ही अनोखी भेट आहे. या ई बुकमध्ये एकूण 10 बालकथाचा समावेश करण्यात आले असून  या कथा वैज्ञानिक, स्वछता आणि निसर्ग संवर्धन करण्याविषयी मुलांना नक्की प्रेरित करतील. अलेक्सा या पहिल्याच कथेत अथर्व आणि आजी यांच्या संवादातून संगणकाची पूर्ण माहिती मिळते. मुलांना मोबाईल, टॅब, आयपॅड यांच्यासोबत अलेक्सा हे देखील आवडायला लागते कारण ती विचारलेली माहिती क्षणात समोर ठेवते. संवाद खूपच छान पद्धतीने मांडण्यात लेखिकेला यश मिळाले आहे. शाब्बास या कथेतून मुलांच्या हातून होणारी लहानशी चूक काय अनर्थ घडवू शकतो याची प्रचिती येते. मग संजू कसा सुधारतो हे वाचनीय आहे. माणसातली माणुसकी या कथेत राजुच्या मनातील संवेदना जागी करते. आज समाजात लोप पावत चाललेली माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी ही कथा खूपच उपयोगी पडेल असे वाटते. पूर्वीच्या काळी जो चिवचिव असा चिमण्यांचा आवाज यायचा ते गायब झाले आहे याची सल चिऊताई या कथेतून मिळते. नुसते बागेत जाऊन येणारे मुलं खूप आहेत मात्र चला बागेत जाऊ या कथेतील मुलं मात्र बागेकडून खूप काही शिकतात आणि वृक्ष संवर्धन करण्याची शपथ घेतात. काव्यात्मक पद्धतीने झाडाचे महत्व सुंदररित्या विषद करण्यात आले आहे. गणेशोत्सव सर्व मुलांचा आवडता सण. याच निमित्ताने मातीची गणपती करायची, त्यात काही बिया ठेवायचे, ती मूर्ती घरातल्या कुंडीत विसर्जित करायची, काही दिवसांनी त्यातून रोप उगवेल त्याला वाढवायचं किती भन्नाट कल्पना मांडली खरी पूजा या कथेत. रक्षाबंधनचा सण देखील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाने साजरा केला जातो. आश्रमातील भाषणाच्या स्वरूपात मांडलेली राखी कथा मनाला भावून जाते. सूर्य ऊर्जेचा वापर वाढला पाहिजे, मुले विचारप्रवण झाली पाहिजे, संशोधन केली पाहिजे हे सोलर मुन ही कथा वाचताना वाटते. मुलांना इन्स्टंट फूड खाण्याची खूप आवड असते. जर अन्न घटकांचे गोळ्या करून दिले तर देशातील सारे मुलं आरोग्याच्या व शरीराच्या दृष्टीने मजबूत होऊ शकतील असा आशावाद त्यांनी इन्स्टंट फूड या कथेतून व्यक्त केला आहे. मुलांच्या जेवणाच्या बाबतीत घरोघरी खूप मोठा प्रश्न आहे, त्यावर त्यांनी शोधलेला हा उपाय परिणामकारक वाटून जातो. सहल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर ठरलेलं चित्र येते. मात्र लेखिकेने वाचकांच्या सर्व अंदाज चुकवित एका वृद्धाश्रमात सहल घेऊन जाते आणि तेथील लोकांच्या अनेक समस्या आणि वेदना कळाल्यावर मुलांच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. पुस्तक एकदा हातात घेतलं तर ते पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवावे असे वाटत नाही. ई बुक च्या स्वरूपात असलेले हे पुस्तक लहान मुलांना नक्की आवडेल अशी मला पूर्ण खात्री आहे. लेखिकेला पुढील लेखनास मनःपूर्वक शुभेच्छा ..... आपणास हे ई बुक ई साहित्य प्रतिष्ठानच्या वेबसाईटवरून डाउनलोड करता येईल किंवा लेखिका मीना खोंड यांच्याशी संपर्क करून त्याची ऑनलाईन प्रत घेता येईल.  

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...