Saturday 23 March 2024

पुस्तक परिचय - प्रतिबिंब ( Pratibinb )

समाजातील चित्रांची प्रतिमा म्हणजे प्रतिबिंब
आपण कसे दिसतो ? हे पाहण्यासाठी प्रत्येकजण आपली प्रतिमा आरशात पाहतात. तसं पाण्यात देखील आपली प्रतिमा दिसते. पण खरी जी प्रतिमा तयार होते ती आपल्या वागण्यावर, बोलण्यावर, चालण्यावर आणि आपल्या मनात येत असलेल्या भावनांवर. आपले प्रतिबिंब आपल्या विचारांवर अवलंबून आहे. अशीच एक अनेक विचारांची मालिका डोक्यात घेऊन प्रा. शि. ल. जोगदंड यांचे प्रतिबिंब नावाचे काव्यसंग्रह नागठाणा ता. उमरी येथील नंदादीप प्रकाशनने प्रकाशित केले आहे. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात कविता वाचनाच्या छंदातून पुढे कविता म्हणण्याचा, लोकगीत, भारुडे, ओव्या आणि अभंग पाठांतर करण्याच्या नादातून कवीमनाचा माणूस प्रा. शि. ल. जोगदंड घडत गेले. लहानपणापासून त्यांनी अनुभवलेले सर्व गोष्टीचे प्रतिबिंब या काव्यसंग्रहातील कवितेतून स्पष्ट होतात, म्हणूनच या पुस्तकाला त्यांनी दिलेलं शीर्षक योग्य व अचूक वाटते. प्रसिद्ध ग्रामीण कथाकार ग. पि. मनुरकर सर यांचा त्यांना मिळालेला आशीर्वाद बहुमोलचा आहे. माणूस असं काही घडवून करतो म्हणजे साहित्य घडत नाही. त्यासाठी योग्य वेळ आणि योग्य काळ याचे गणित जुळावे लागते. नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. भगवान अंजनीकर यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन जोगदंड सरांना ही काव्यनिर्मिती करण्याचे सुचत गेले. सुप्रसिद्ध कादंबरीकार देविदास फुलारी सरांची या पुस्तकाला खूप सुंदर अशी प्रस्तावना लाभली आहे. सदरील काव्यसंग्रह सन 2015 मध्ये प्रसिद्ध झाले असून त्यात असलेल्या एकूण 47 कविता आजच्या काळात देखील तंतोतंत लागू पडतात. 
कवी शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख त्यांच्या डोळ्यासमोरून जाता जात नाही. म्हणूनच आपल्या पहिल्याच व्यथा शेतकऱ्याची या कवितेत त्यांनी बँकेकडून मिळणारे कर्ज, सावकाराचा कर्ज काढून केलेली शेती आणि त्यातच अति पावसाने झालेलं नुकसान त्या स्थितीचे सत्य वर्णन मांडले आहे. 

शेतकऱ्यावर गळ्याला फास लावण्याची वेळ आली
पॅकेजसाठी राजकारणी भांडून घेऊ लागली

अंधश्रद्धेमध्ये बळी जाणारे सर्वात जास्त कोण आहेत ? तर स्त्रिया. फार लवकर ते कोणावरही विश्वास ठेवतात आणि फसतात. स्त्री आणि बुवाबाजी या कवितेत ते वाचकांनाच प्रश्न विचारतात की,

बारा राशीवर भविष्य चालतंय का ?
बुवा भविष्याचं अचूक गणित सांगतील का ? 

माणूस मुबलक पाणी असल्यावर त्याचा वापर कसे ही करतो. त्याचे काही नियोजन नसते, असेल तर दिवाळी नाही तर शिमगा. नदी, नाले, ओढे, तलाव या सर्वाचा वापर करताना माणूस काहीच विचार करत नाही हेच त्यांच्या गंगामाई बोलू लागली तर या कवितेतून वाचायला मिळते. ते सुचवतात की

अरे माणसा माणसा कर पाण्याचे नियोजन
त्यातून होईल सर्व सजीवांचे समाधान

देवाने सृष्टी निर्माण करताना सर्व बाबीचा विचार करून मानवी देह तयार केला. विचार करण्याची शक्ती फक्त मानवाला दिली. त्यांचा वापर चांगल्या कामांसाठी करण्याऐवजी तो पशु पेक्षाही खालच्या पातळीवर जाऊन विचार करतोय अशी खंत त्यांनी पाखराची किमया या कवितेत व्यक्त केली आहे. 

तुला दिली रे देवानं जीभ छान
तरी तुझं बोलणं घाण
ते घे सुधारून

घरातला आज खेळत असलेला मुलगा म्हणजे त्या घराचा भावी काळातील आधार असतो. पण पालकांनी त्याच्यावर अपेक्षेचे ओझे टाकून त्याला वाकून टाकू नये. पालकांनी मुलांना समजून वागले तर त्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळू शकते असा आशावाद प्रिय पालकांनो या कवितेतून व्यक्त करताना म्हणतात

मुलांच्या पाठीवर फिरवा मायेचा हात
त्यातूनच देईल तो आयुष्यभर तुम्हाला साथ

मुलगी जन्माला येऊ नये म्हणून सोनोग्राफी नावाचं एक राक्षस तयार करण्यात आलंय. पूर्वीच्या काळी असे काही तंत्रज्ञान नव्हते. म्हणून स्त्री-पुरुष यांचा लिंगदर समान होता. पण या विज्ञानांच्या क्रांतीने माणसाची नैतिकता हरवली आहे अशी मनातली खदखद विज्ञानाचे गुण-दोष या कवितेतील ओळीतून व्यक्त केले आहे. 

डॉक्टर दादा विज्ञानाचा वापर कर जपून
नाही तर ठरेल विज्ञान अमृत कुंभ विषासमान 

बोर्डाच्या परीक्षेच्या निकालावर एक दृष्टिक्षेप टाकले तर लक्षात येते की, मुलींची उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. मुली ह्या मुलांपेक्षा कष्टाळू, अभ्यासू आणि चिकाटी असतात. मुलगा-मुलगी भेद मानू नका, मुलगी जन्माला येऊ द्या, लेक वाचवा लेक शिकवा या कवितेत ते संदेश देतात

मुलगी म्हणून तुच्छ लेखू नका
मुलगा म्हणून उच्च मानू नका
मुलगा-मुलगी आहेत समान
मुलांपेक्षा मुलीची कीर्ती आहे महान

आजचा पुढारी या कवितेतून त्यांनी राजकारणातल्या पुढारी लोकांचा समाचार घ्यायला देखील विसरले नाहीत. त्यांना विविध प्राण्यांची उपमा दिलेली आहे. 

आजचा पुढारी म्हणजे
दुतोंडी मांडूळ होय
दोन्ही पक्षाकडे वावरणारा

प्रेम म्हणजे काय ? याचे उत्तर या कवितेतून त्यांनी दिला आहे. प्रेमाचा नुसता देखावा काही कामाचे नसून प्रेम हे निस्वार्थी, त्यागी आणि निखळ असेल तर आपले जीवन सार्थक होते असे त्यांनी म्हटले आहे. 

प्रेमात असावी रंगाची उधळण, मैत्रीची गुंफण
वडिलांचं धैर्य, आईच्या हृदयाची कोमलता
लक्ष्मणासारखा बंधुप्रेम सुदाम्याची मैत्री

श्रावण महिन्यात बेलाची पाने शंकराला वाहिली जातात. बेलाची झाडं बोलू लागली अशी कल्पना करून छान संदेश दिलेले आहे. 

शिव शिव म्हणता म्हणता
दुसऱ्याचा का जीव घेता

आजचे शिक्षण म्हणजे फक्त नोकरीसाठी आहे. सर्वाना नोकरी देखील मिळत नाही. ज्या लोकांची काही तरी लिंक असते अश्या गुणवंत नसलेल्या लोकांनाच आज नोकरी मिळते अशी खंत व्यथा शिक्षणाची कवितेतून मांडले आहे. 

पदव्या कितीही कमावल्या तरी लागतो तिथे वशिला
असेल वशिला तर नोकरी मिळते म्हशीला

संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे म्हटले आहे. वृक्ष माझा सखा सोबती या कवितेत कवी 
वृक्षासारखा नाही सोबती
वाटसरूना आश्रय देती असे म्हटले आहे. 

देणाऱ्यानं देत जावं या कवितेत कोणाकडून आपणास काय काय घेता येते याचे सुंदर असे वर्णन केले आहे. चंद्राकडून शीतलता घ्यावी, 
मातेकडून वात्सल्य घ्यावं, 
राघवाकडून बोलणं शिकावं 
असे अनेक उदाहरण त्यांनी या कवितेत दिले आहेत. 

एकंदरीत समाजात चालू असलेल्या अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा, शेतकऱ्यांचे होणारे हाल, शिक्षणाची अवस्था, स्त्री भृण हत्या असे एक नाही अनेक विषयावरील कवींच्या मनातील विचार काव्याच्या स्वरूपात ' प्रतिबिंब ' या पुस्तकातून व्यक्त झाले आहे. कवी शि. ल. जोगदंड सरांना पुढील काव्य लेखनास मनस्वी शुभेच्छा. 

पुस्तकाचे नाव :- प्रतिबिंब
कवीचे नाव :- प्रा. शि. ल. जोगदंड
नंदादीप प्रकाशन, नागठाणा

पुस्तक परिचय
- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...