Monday 26 April 2021

26/04/2021 rajesh jethewad

साहित्याचे निस्वार्थ सेवक नासा येवतीकर
गेल्या 25 ते 26 वर्षापासून वृत्तपत्र क्षेत्रात सातत्याने नियमितपणे सामाजिक, कौटुंबिक, आणि शैक्षणिक क्षेत्रावर आधारित स्तंभलेखन करणारे, लेखन कार्यात इतरांना प्रेरणा देणारे, सोशल मीडिया मध्ये नासा या टोपणनावाने सुप्रसिद्ध असलेले प्राथमिक शिक्षक नागोराव सा. येवतीकर यांचा आज 45 वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा लेखाजोखा. 
नासा येवतीकर यांचा जन्म 26 एप्रिल 1976 रोजी आंध्र आणि महाराष्ट्र राज्यांच्या सीमारेषेवरील " येवती " या छोट्याशा गावांत झाला. त्यांचे वडील जिल्हा परिषदच्या शाळेत प्राथमिक शिक्षक होते तर आई घर कामाकडे लक्ष देत असे. तसे पाहिले तर त्यांचा छोटा परिवार दोन भाऊ आणि दोन बहिणी. परिवारात ते शेवटचे, त्यामूळे आई वडील बहीण भाऊ या सर्वांचेच लाडके म्हणण्यास हरकत नाही. घरात कोणत्याच वस्तुची चणचण भासत नव्हती. सर्व काही आनंदात होते. त्यांची मातृभाषा तेलगु असून ही त्यांनी मराठी भाषेकडे विशेष लक्ष देऊन त्यांनी मराठी भाषेवर खूप प्रेम केले आणि विशेष प्रभुत्व मिळविले आहे. त्याचमुळे ते आज या क्षेत्रात काही तरी नवीन करून दाखवू शकतात. वास्तविक पाहता त्यांच्या घरात किंवा गावात कोणी साहित्यिक वा लेखक झाले नाहीत. पण शालेय जीवनातील विविध अनुभवाच्या आधारावर त्यांनी साहित्य क्षेत्रात पाऊल टाकले आहे ते निश्चितच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय असे आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण येवती येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झाले तर माध्यमिक शिक्षण धर्माबादच्या हुतात्मा पानसरे हायस्कूल मध्ये झाले. पानसरे शाळेत शिकत असताना येथील काही चांगल्या शिक्षकाच्या मार्गदर्शनामुळे त्यांना लिहिण्याची प्रेरणा मिळत गेली. लेखनाची सु्रुवात फक्त 10 ओळी लिहिण्याने झाली. इयत्ता दहावी वर्गात शिकत असताना त्यांच्या नावावर पहिला लेख प्रकाशित झाला त्यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याठिकाणी जी प्रेरणा मिळाली ती आजतागायत चालूच आहे. आज ते विविध विषयावर अभ्यासपूर्ण आणि वैचारिक लेख लिहून समाज प्रबोधनाचे कार्य करीत असतात. नांदेडच्या यशवंत महाविद्यालय मध्ये त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षक पूर्ण केले. येथील प्रा. जगदीश कदम यांच्या मराठी विषयांच्या शिकवणीमुळे त्यांच्या लेखनकलेला एक नवी दिशा मिळाली.  गेल्या 25 - 26 वर्षांमध्ये त्यांनी भरपूर लेखन केलेले असल्यामुळे वृतपत्राच्या क्षेत्रात त्यांचे नाव आदरपूर्वक घेतल्या जाते. एवढे असूनही ते आपल्या व्यवसायाशी कधीही प्रतारणा केली नाही. जिल्हा परिषदमध्ये सन 1998 मध्ये प्राथमिक शिक्षक या पदावर माहूर तालुक्यात पाच वर्षे सेवा करून सन 2003 मध्ये धर्माबाद तालुक्यांत आपल्या स्वतःच्या तालुक्यांत परतले. विद्यार्थ्याच्या गळ्यातील ताईत बनण्यासारखे त्यांचे काम शाळेवर असते असे त्यांचे सहकारी तर सांगतातच याशिवाय गावातील लोकं सुध्दा त्यांच्याविषयी असेच उद्गार काढतात यावरून त्यांची शैक्षणिक क्षेत्रांतील कामगिरी समजून येते. प्रत्येक विषयांचा अभ्यास असल्यामूळे प्रशासकीय बाजू सुध्दा अगदी व्यवस्थितरित्या सांभाळतात त्यामूळे अधिकारी वर्गाशी ही त्यांचा संबंध खूपच चांगले आणि विश्वासपात्र असे आहे. सर्वांशी प्रेमाने वागणे आणि बोलणे या त्यांच्या वैशिष्ट्यमुळे त्यांनी आजपर्यंत एक ही मित्र तोडले नाही तर जोडतच गेले. आज त्यांचा मित्र परिवार आणि संपर्क पाहिले तर ते लक्षात येते. गरजू लोकांना मदत करण्याची त्यांची वृत्ती असल्यामुळेच आजपर्यंत त्यांनी आपल्या सभोवती अनेक मित्रांचा गोतावळा तयार करण्यात यशस्वी झाले आहेत. 
त्यांना आजपर्यंत विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी जे काही कार्य करीत राहिले ते पुरस्कार मिळावे या उद्देशाने अजिबात केले नाही. परंतु त्यांचे कार्यच असे होते की पुरस्कार त्यांच्याकडे धावत आले.
1996 मध्ये ज्यावेळी ते बाराव्या वर्गात शिकत होते त्यावेळी त्यांनी मुंबई नागरिक नशाबंदी सप्ताह समिती कडून पोस्ट कार्ड स्पर्धेत सहभाग घेतले आणि त्यांना महात्मा गांधीजी च्या जयंती निमित्ताने गुणगौरवार्थ प्रमाणपत्र देण्यात आले. 
सन 2000 मध्ये महाराष्ट्र राज्य प्रौढ शिक्षण संस्था राज्य साधन केंद्र औरंगाबाद साहित्य निर्मिती विभागाकडुन अंबाजोगाई येथील राज्यस्तरीय लेखक शिबिरात आणि उदगीर येथील नवसाक्षर साहित्य निर्मिती शिबिरात त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांची लेखनकला विकसित होण्यास सु्रुवात झाली. सन 2007 मध्ये अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ मुंबई यांचेकडून उत्कृष्ट लेखनाबद्दल प्रसिद्ध लेखिका श्रीमती विजया वाड यांच्या हस्ते राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांच्या जीवनात पुन्हा एक टर्निंग पॉइंट आला ते म्हणजे सन 2008 मध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून आयोजित जीवन शिक्षण लेखन कार्यशाळेत नांदेड जिल्ह्यातून त्यांना सहभागी होण्याची नामी संधी मिळाली. त्या शिबिरात त्यांना लेखनाचे अनेक प्रकारचे मार्गदर्शन नामवंत लेखक मंडळीकडून मिळाले, जसे कवी विठ्ठल वाघ, माधव राजगुरु, रा. ग. जाधव इत्यादी ज्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या लेखनाला वेगळी दिशा मिळाली. याच शिबिराचा पहिला परिणामकारक फायदा सन 2009 मध्ये दिसून आला. यावर्षीच्या 08 मे जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त 
नांदेडच्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित रक्तदान सर्वश्रेष्ठ दान या विषयावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आणि तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांच्या हस्ते सन्मानपत्रासह प्रदान करण्यात आले. पुण्याच्या जीवन शिक्षण प्रणाली तर्फे आयोजीत राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत त्यानी सहभाग घेतला.  
प्रशासनाने यांच्या कार्याची दखल घेऊन डिसेंबर 2014 मध्ये पंचायत समिती धर्माबाद कार्यालयाने गुरु गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला. त्यांचे हे कार्य अविरतपणे चालूच आहे. जानेवारी 2015 मध्ये घुमान येथील 88 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत पहिल्या शंभरात स्थान मिळाल्यामुळे त्यांना 2000 रू. ची ग्रंथ भेट मंडळाकडुन देण्यात आली. ऑक्टोबर 2015 मध्ये डॉ. A P J अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत त्यांना  उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. शाळेत विद्यार्थ्यासाठी सुध्दा त्यांची नेहमीच धडपड चालूच असते. याच धडपडीतून त्यांनी शाळेत विद्यार्थ्याना सोपे वाटावे म्हणून " प्रश्न आमचे अन् उत्तर ही आमचे ह्या राबविलेल्या उपक्रमाला जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक तर  मिळालेच शिवाय त्या उपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. कन्या शाळा धर्माबाद येथे रोज एक कविता नावाचा उपक्रम त्यांनी सत्तर दिवस सलगपणे चालविले. या उपक्रमाला देखील जिल्हास्तरावर पारितोषिक प्राप्त झाले आहे.
सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते यवतमाळ येथे त्यांची विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी उपयुक्त असे " पाऊलवाट " नावाचे पुस्तक जानेवारी 2016 मध्ये प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर ई साहित्य प्रतिष्ठान कडून दहा ई बुक प्रकाशित झाले आहेत. त्यात संवेदना, जागृती, मी एक शिक्षक, शाळा आणि शिक्षण, रोज सोनियाचा दिनु, हिंदू सण असे सहा वैचारिक ई बुक, हरवलेले डोळे, कुलदीपक आणि जादूची पिशवी असे तीन ई कथासंग्रह तर सारीपाट नावाचा ई कवितासंग्रह प्रकाशित झाले आहे. मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक नवाकाळमध्ये कविता प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांचा कविता करण्याकडे कल वाढला. आजपर्यंत त्यांनी 500 ते 550 कविता लिहीले असून जीवनगाणे नावाचा कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. लघुकथा लेखनाचा ही त्यांना छंद असून सुमारे 100 च्या आसपास लघुकथा लिहिले आहेत. शैक्षणिक विषयावर लिहिलेली लक्ष्मी ही कादंबरी, एका स्त्रीची धाडसाची ' साहस ' कादंबरी आणि गोट्या असे तीन कादंबरी मातृभारती अँपने ऑनलाईन प्रकाशित केले आहे. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग वाचन आणि लेखन करण्यासाठी घालविल्यामुळे विपुल साहित्य निर्मिती करू शकलो, असे ते नेहमी म्हणतात.
लहान मुलांसाठी विविध प्रकारची कोडे तयार करतात आणि मुलाकडुन ते सोडवून घेतात त्यामुळे मुलांची शब्दसंपत्ती वाढण्यास मदत होते. 
सोशल मीडियात सुध्दा यांचा वावर लक्ष वेधून घेणारी असते. फेसबुक, whatsapp, ट्विटर आणि शेअर चाट यासारखी सोशल मीडिया मध्ये जनतेला उपयुक्त असेल अशीच माहिती ते पोस्ट करतात. तसेच त्यांना गाणे गाण्याचा देखील छंद असून लहाणपणापासून ते रेडिओ ऐकत आले आहेत. स्टार मेकर अँपवर त्यांनी स्वतः गायिलेले 50-60 गाणे उपलब्ध आहेत. याशिवाय लोकाना वाचण्याची गोडी लागावी म्हणून विविध ग्रुप च्या माध्यमातून वैचारिक लेख, कविता, चारोळी इत्यादी स्पर्धेचे आयोजन करून त्यांची माहिती सर्व लोकाना कळावी यांसाठी ते www.nasayeotikar.blogspot.com या वेबसाईटवर प्रकाशित करीत असतात. संपूर्ण आयुष्य साहित्याची सेवा करण्यात त्यांनी खर्ची घातली आहे म्हणून साहित्याचे खरे उपासक म्हणणे चुकीचे ठरणार नाही असे वाटते. 
अश्या या अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या नासा येवतीकर यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या हातून अजून नवनवीन साहित्य निर्मिती होवो, उज्वल भविष्य घडविणारी विद्यार्थी तयार होवो आणि त्यांचे नवे पुस्तक लवकरच वाचकास वाचण्यासाठी मिळो हीच यानिमित्ताने प्रेमपूर्वक सदिच्छा...!
राजेश जेठेवाड, बरबडेकर 
मोबाईल ९४२०८१४०९९

No comments:

Post a Comment

पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...