नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो..
आजच्या कार्यक्रमात आपण सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या qविषयी माहिती पाहू या. लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐका......
तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत निष्ठावान आणि पराक्रमी सरदार होते. स्वराज्याच्या उभारणीत त्यांनी दिलेले बलिदान इतिहासात अजरामर झाले आहे. त्यांचे जीवन शौर्य, निष्ठा आणि मातृभूमीप्रेमाचे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते.
तानाजी मालुसरे यांचा जन्म सुमारे १६०० च्या आसपास सिंहगड परिसरातील माळसरे गावात झाला असे मानले जाते.
लहानपणापासूनच त्यांना डोंगरदऱ्यांची माहिती होती. वडिलांच्या मृत्यूनंतर ते शेलारमामा यांच्या गावी म्हणजे उंबरठ येथे गेले.
ते मराठा समाजातील होते आणि बालपणापासूनच पराक्रम, धैर्य व युद्धकलेत पारंगत होते. शिवाजी महाराजांच्या बालमित्रांपैकी ते एक होते. महाराजांवर त्यांची अपार श्रद्धा होती आणि स्वराज्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असायची.
१६७० साली कोंढाणा किल्ला मुघलाच्या ताब्यात होता. हा किल्ला जिंकणे स्वराज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. त्या वेळी तानाजी आपला मुलगा रायबाच्या लग्नाच्या तयारीत होता; तरीही महाराजांचा आदेश मिळताच त्यांनी सर्व काही बाजूला ठेवून किल्ला जिंकण्याची जबाबदारी स्वीकारली. आधी लगीन कोंढ्यान्याचे म्हणून ते लढाईसाठी बाहेर पडले. अत्यंत कठीण अशा कड्यावरून त्यांनी आपल्या मावळ्यांसह गुप्त मार्गाने किल्ल्यावर चढाई केली. यासाठी ‘यशवंत’ नावाच्या घोरपडीचा उपयोग केल्याची कथा प्रसिद्ध आहे.
किल्ल्यावर झालेल्या भीषण युद्धात तानाजी मालुसरे यांनी अपूर्व शौर्य दाखवले. मात्र, उदयभान राठोड यांच्याशी झालेल्या झुंजीत ते वीरमरण पावले. तरीही त्यांच्या मावळ्यांनी युद्ध चालू ठेवून अखेर किल्ला जिंकला. सिंहासारखा शूर योद्धा या गडावर मृत्यू पावला म्हणून कोंढाणा किल्याचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आले. ही बातमी ऐकताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडून उद्गार निघाले —
“गड आला, पण सिंह गेला!”
हे शब्द आजही मराठी मनात भावनिक आदर जागवतात.
तानाजी मालुसरे यांचे बलिदान स्वराज्यासाठी समर्पण, निष्ठा आणि धैर्याचे प्रतीक आहे. त्यांच्या पराक्रमामुळे सिंहगड इतिहासात अमर झाला. आजही त्यांच्या जीवनातून देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची प्रेरणा मिळते. म्हणूनच तानाजी मालुसरे हे मराठा इतिहासातील अजरामर वीर म्हणून ओळखले जातात. आज त्यांची पुण्यतिथी, त्यानिमित्ताने त्यांच्या शौर्याला कोटी कोटी प्रणाम 🌺
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - वडिलांच्या मृत्यूनंतर ते कोणाच्या गावी राहू लागले ?
बरोबर उत्तर आहे, वडिलांच्या मृत्यूनंतर ते शेलारमामा यांच्या गावी म्हणजे उंबरठ येथे राहू लागले.
दुसरा प्रश्न - तानाजीच्या मुलाचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे रायबा हे तानाजीच्या मुलाचे नाव होते.
तिसरा प्रश्न - सिंहगडाचे पूर्वीचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, कोंढाणा किल्ला असे सिंहगडचे पूर्वीचे नाव होते.
चौथा प्रश्न - तानाजीच्या घोरपडीचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, यशवंती असे तानाजीच्या घोरपडीचे नाव होते.
शेवटचा पाचवा प्रश्न - तानाजीच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तोंडून कोणते उदगार निघाले.?
बरोबर उत्तर आहे - गड आला पण सिंह गेला, असे उदगार तानाजीच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तोंडून निघाले.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
No comments:
Post a Comment