Saturday, 7 February 2026

दिनविशेष माहिती - 14 जानेवारी

भूगोल दिन 
भूगोल हा पृथ्वीचा तसेच पृथ्वीवरील नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारा महत्त्वाचा विषय आहे. पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा, हवामान, वनस्पती, प्राणी तसेच मानव व त्याच्या क्रियाकलापांचा परस्पर संबंध भूगोलामध्ये अभ्यासला जातो. या विषयाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि भौगोलिक जाणीव वाढवण्यासाठी भूगोल दिन साजरा केला जातो.
14 जानेवारीपासून दिवस तिळा तिळाने मोठा होतो याच दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. हा दिवस आपण  मकरसंक्रात म्हणून उत्साहाने साजरा करत असतो. तसेच संपूर्ण भारतात 14 जानेवारी हा दिवस महर्षि डॉ. सी. डी. देशपांडे यांचा जन्मदिवस राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो.
 डॉ. सी. डी. देशपांडे यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात १४ जानेवारी १९१२ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर धुंडिराज देशपांडे. डॉ. देशपांडे हे शिक्षक, शिक्षणतज्ञ, लेखक, भूगोलतज्ञ, भूगालाचे गाढे अभ्यासक म्हणून  प्रसिद्ध होते. भूगोल विषयाच्या विकासात त्यांचे महत्वाचे योगदान आहे. या विषयास शास्त्राचा दर्जा प्राप्तीमध्ये अनेक प्रकारे उद्बोधन करण्याचे कार्य त्यांनी केले. शाळा व कॉलेज मध्ये भूगोल विकासासाठी प्रयत्न केले. मुंबई विद्यापीठात स्वतंत्र भूगोल विभागाच्या स्थापनेत त्यांचा महत्वाचा वाटा आहे. National Association of Geographers, India ची स्थापना केली. डॉ. सी. डी. देशपांडे हे भूगोल विषयातील अत्यंत जाणकार व्यक्ती मानले जातात. त्यांचे भूगोलाचे ज्ञान अफलातून होते, त्यामुळे त्यांना भूगोल महर्षी असे म्हटले जाते. 
भूगोल महर्षी डॉ. सी. डी. देशपांडे यांनी भूगोल विषयात केलेले अतुलनीय कार्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि भूगोलाची सर्वांना ओळख व्हावी या हेतूने भूगोल तज्ञ डॉ. सुरेश गरसोळी यांनी १४ जानेवारी १९९० रोजी महाराष्ट्रात सर्वप्रथम भूगोल दिन साजरा करण्यास सुरुवात केली. तर भारत सरकारने 1996 पासून 14 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
भूगोल दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक नागरिकांत पृथ्वीविषयी जागरूकता निर्माण करणे. आजच्या काळात वाढते प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल, जागतिक तापमानवाढ यांसारख्या समस्या गंभीर बनत चालल्या आहेत. या समस्यांचे कारण व परिणाम समजून घेण्यासाठी भूगोलाचे ज्ञान अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे भूगोल दिनाचे महत्त्व अधिक वाढले आहे.
भूगोल विषयामुळे आपल्याला नैसर्गिक साधनसंपत्तीची माहिती मिळते. पाणी, माती, खनिजे, वनसंपत्ती यांचा योग्य व शाश्वत वापर कसा करावा हे भूगोल शिकवतो. तसेच पूर, दुष्काळ, भूकंप, ज्वालामुखी, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास करून त्यांच्या परिणामांपासून संरक्षण कसे करावे याचीही माहिती मिळते.
भूगोल हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो जीवनाशी निगडित आहे. मानवाचे जीवनमान, शेती, उद्योग, वाहतूक, लोकसंख्या वितरण आणि आर्थिक विकास या सर्वांवर भौगोलिक घटकांचा मोठा प्रभाव असतो. म्हणूनच भूगोलाचे ज्ञान प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आहे.
एकूणच, भूगोल दिन आपल्याला पृथ्वीचे महत्त्व ओळखून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची प्रेरणा देतो. पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरण निर्माण करण्यासाठी भूगोलाचे ज्ञान उपयोगी पडते. म्हणूनच भूगोल दिन साजरा करणे हे काळाची गरज आहे.
*संकलन*

No comments:

Post a Comment

दिनविशेष माहिती - 11 फेब्रुवारी ( Swami Dayanand Sarswati )

         नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !  मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्र...