Friday, 22 March 2024

पुस्तक परीक्षण - सुश्री द्रौपदी मुर्मु ( Susri Droupadi Murmu )

आदिवासींची नायिका : सुश्री द्रौपदी मुर्मु

भारताचे राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक व भारतीय सशस्त्र दलांचे सरसेनापती (कमांडर-इन-चीफ) असतात. भारतातील सर्वोच्च आणि अत्यंत महत्वाचे पद म्हणजे राष्ट्रपती. अश्या या पदावर आजपर्यंत डॉ. राजेंद्र प्रसाद ते रामनाथ कोविंद असे चौदा राष्ट्रपती या देशाने पाहिले आणि अनुभवले. पंधरावे राष्ट्रपती म्हणून सुश्री द्रौपदी मुर्मु यांनी जुलै 2023 मध्ये शपथ घेतल्या. ओरिसा राज्यातील मयुरभंज जिल्ह्यातील उपरबेडा या छोट्याश्या गावात आदिवासी जमातीत जन्मलेल्या सुश्री द्रौपदी मुर्मु ह्या भारताच्या सर्वोच्च अश्या राष्ट्रपती पदावर विराजमान होतांना प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटत होता. सोशल मीडियात चर्चेत नसलेले, प्रसिद्धी ज्योतात नसलेले, शांत व्यक्तिमत्त्व अचानक लोकांच्या समोर आणण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व भाजपा पक्षाने केले. तेव्हा सुश्री द्रौपदी मुर्मु कोण आहेत ? त्यांचा जन्म कोठे झाला ? त्यांचे शिक्षण कुठपर्यंत झाले ? त्यांचे जीवन कसे आहे ? असे प्रश्न सामान्य नागरिकांना पडणार यात शंकाच नाही. सामान्य नागरिकांच्या याच प्रश्नांना उत्तर मिळावे आणि भारताचे पहिले आदिवासी नायिका महिला राष्ट्रपती सुश्री द्रौपदी मुर्मु यांची माहिती सर्वांना व्हावी या निर्मळ हेतूने लेखक विनोद पंचभाई यांनी सामान्य शिक्षिका ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु हे चरित्र पुस्तक वाचकांसमक्ष ठेवले आहे.
 मराठी साहित्य क्षेत्रात विनोद पंचभाई यांचे नाव सर्वदूर पोहोचले आहे ते त्यांच्या लेखनशैलीमुळे. समाजातील सर्वच स्तरावरील वाचकांसाठी ते लिहितात. चरित्र लेखन आणि रहस्यमय कथा लिहिण्यात त्यांचा खूप मोठा हातखंडा आहे. हॉटेल हवेली ही त्यांची रहस्यमय कादंबरी खूप गाजलेली आहे. त्याचसोबत त्यांनी बालसाहित्य देखील लिहिले आहे. भारताचे आजपर्यंत झालेले राष्ट्रपती, पंतप्रधान आणि भारतीय शास्त्रज्ञ यांच्यावर देखील त्यांचे पुस्तकं प्रकाशित झाले आहेत. विनोद पंचभाई हे अभ्यासपूर्ण लेखन करतात, त्यासाठी त्यांना अनेक पुस्तकांचे वाचन, खूप भटकंती आणि टिप्पणी लिहून ठेवावे लागतात. त्यांच्या पुस्तकावरून त्यांनी केलेले अभ्यास, चिंतन आणि मनन हे सारं लक्षात येते.
भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती सुश्री द्रौपदी मुर्मु यांच्याविषयी सोशल मीडियात कुठेच काही माहिती उपलब्ध नव्हती. कारण त्या प्रसिद्धीपासून कोसो दूर राहत होत्या. त्यांचा स्वभाव म्हणजे नेकी कर दर्या में डाल. कधी त्यांना आपल्या कामाची प्रसिद्धी व्हावी असे वाटले नाही की त्यांनी आपल्या कामाचा गवगवा केला नाही. अगदी शांत चित्ताने, मन लावून आणि पक्षप्रमुखाने दिलेली जबाबदारी नेटाने पूर्ण करीत राहिल्या. सन 1999 मध्ये पहिल्यांदा ते राजकारणात उतरल्या आणि नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय सेवेला प्रारंभ केल्या आणि अवघ्या 23 वर्षाच्या कारकिर्दीत देशाच्या सर्वोच्च अश्या पदावर विराजमान झाल्या. अर्थातच हे सहजासहजी घडले असे नाही किंवा कोणती जादू देखील झाली नाही. तर यामागे सुश्री द्रौपदी मुर्मु यांची पक्षश्रेष्ठीशी असलेली निष्ठा, जनतेसोबत असलेले प्रेमपूर्वक संबंध आणि समाजातील तळागाळातील आपल्या जमातीच्या आदिवासी लोकांच्या समस्येची जाण ठेवून त्यांनी केलेले निस्वार्थ काम या साऱ्याचे एकत्रित फळ म्हणजे राष्ट्रपती पद होय. लेखकांनी याविषयी आपल्या पुस्तकात संदर्भासहित सुंदर अशी माहिती दिलेली आहे. ते वाचतांना सुश्री द्रौपदी मुर्मु ह्या अजून महान ठरतात.
भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाविषयी बोलतांना म्हणतात की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, त्याचे जो कोणी प्राशन करेल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाने माणसाला ज्ञान मिळते, ज्ञानामुळे माणूस विचार करू लागतो आणि त्याला जीवन जगण्याचे कौशल्य मिळते. भारतीय शिक्षणतज्ज्ञ महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगून थांबले नाही तर तळागाळातील गरीब लोकांच्या मुलां-मुलींसाठी शाळा सुरू केल्या. त्यांच्या मते घरातील एक पुरुष शिकला तर फक्त तोच शिकतो आणि घरातील एक स्त्री शिकली तर सर्व कुटुंबाला ती शिकविते. समाजातील मुलींना शिकविण्यासाठी महात्मा फुले यांनी स्वतःच्या पत्नीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अगोदर शिकविले आणि इतरांना शिकविण्यासाठी तयार केले. याचाच आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून सुश्री द्रौपदी मुर्मु यांनी आपले कार्य केले. त्यांच्या गावात फक्त सातव्या वर्गापर्यंत शिक्षण घेण्याची सुविधा होती. त्यापुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना गाव सोडणे गरजेचे होते. घरची परिस्थिती आणि सामाजिक स्थिती या दोन्ही संकटाशी दोन हात करून त्यांनी गाव सोडून आपले शिक्षण पूर्ण केले. त्या गावातून शिक्षण घेणारी सुश्री द्रौपदी मुर्मु ह्या पहिल्या होत्या. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटले होते, त्यामुळे त्यांनी संघर्ष केला पण शिक्षण सोडले नाही. आपण जसे शिकलो तसे समाजातील इतर मुली देखील शिकल्या पाहिजे यासाठी त्यांनी अगदी निस्वार्थपणे शिकविण्याचे कार्य केले. लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीला जे अनुभव येतात ते अनुभव त्यांना देखील आले पण त्यांनी समाजासाठी व देशासाठी उंबरठा ओलांडून शिकविण्याचे काम केले. हे त्यांचे पहिले धाडसी पाऊल होते जे की, राष्ट्रपती होण्यासाठी कारणीभूत ठरले म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
माणसाच्या जीवनात अनेक चढ-उतार येत असतात. जीवनात सुख आणि दुःखांचा पाठशिवणीचा खेळ चालूच असतो. सुख मिळाले म्हणून हरखून जाऊ नये आणि दुःख मिळाले म्हणून स्वतःला संपवून टाकू नये. प्रत्येक गोष्टीचा सामना करीत, त्या प्रसंगाशी दोन करीत जीवन जगण्यात खरा आनंद आहे, याची प्रचिती हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते. सुश्री द्रौपदी मुर्मु या आज राष्ट्रपती पदावर दिसत आहेत, ही खरोखरच आनंदाची व अभिमानाची बाब आहे. पण त्यांनी आपल्या जीवनात कोणत्या संकटाला तोंड दिले आणि कोणते दुःख पचविले ? त्यांना संकट काळात कोणी धीर दिला ? हे जर एकदा त्यांच्या अंतरंगात डोकावून पाहिलं तर ते किती महान आहेत ? याची प्रचिती येते. शालेय शिक्षण पूर्ण करण्यात त्यांना खूप कष्ट सोसावे लागले, लग्न झाल्यानंतर ही त्यांनी निस्वार्थपणे एक ही रुपया पगार न घेता शिकविण्याचे काम केले. ऐन उमेदीच्या काळात, घरात सुख आणि आनंद नुकतेच प्रविष्ठ झालेले असताना पाच वर्षात चार मोठे धक्के त्यांना बसले. पहिल्यांदा मोठ्या मुलांचा मृत्यू, नंतर लहान मुलांचा मृत्यू त्यानंतर पती देखील सोडून गेले. याच दुःखाच्या काळात लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. जवळजवळ सुश्री द्रौपदी मुर्मु ह्या ढासळल्या होत्या. पण त्यांच्या एकुलत्या एक मुलीने त्यांना सावरले, प्रजापिता ब्रह्मकुमारी यांनी आध्यात्मिकची जोड देऊन त्यांना ध्यानधारणा करण्यास प्रवृत्त केले. असे म्हणतात की, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही. या सर्व गोष्टीचा अनुभव सुश्री द्रौपदी मुर्मु यांना अनुभवावे लागले.
लेखक विनोद पंचभाई यांनी अति परिश्रम घेऊन, अनेक संदर्भ पुस्तक वाचून, सुश्री द्रौपदी मुर्मु यांच्या संपर्कात व सहवासात आलेल्या लोकांच्या भेटी घेऊन, प्रत्यक्षात सुश्री द्रौपदी मुर्मु यांच्या जन्मगावी उपरबेडा येथे भेट देऊन हे अप्रतिम असे पुस्तक लिहिले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक नागेश शेवाळकर यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. रमेश भारताल यांनी सुश्री द्रौपदी मुर्मु यांचे सुंदर चित्र पुस्तकावर रेखाटले आहे. पुणे येथील दुर्वा एजन्सीजने हे पुस्तक प्रकाशित केले असून त्याची किंमत फक्त 250 रु. आहे. भारतातील आजपर्यंतचे राष्ट्रपती कोण कोण होते आणि त्यांचा स्वभाव कसा होता ? सुश्री द्रौपदी मुर्मु यांची निवड कशी झाली ? इतर सर्व राष्ट्रपतीपेक्षा सुश्री द्रौपदी मुर्मु यांचे जीवन कसे वेगळे आहे ? याची माहिती जाणून घेण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने विशेष करून महिलांनी हे पुस्तक जरूर वाचावे असे वाटते. त्यासाठी आपण लेखक विनोद पंचभाई यांच्या 9923797725 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून पुस्तकाची प्रत मागवून घ्यावे. भविष्यात लेखकांच्या हातून असेच अप्रतिम पुस्तक वाचकांस वाचण्यास मिळत राहो ही सदिच्छा आणि पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा ......!

- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड, 9423625769.

पुस्तक परीक्षण - सीता-शक्ती ( Seeta-Shakti )

स्त्रीचं मन सांगणारी सीता-शक्ती कादंबरी
भारताच्या इतिहासाला हजारो वर्षांची परंपरा आहे. रामायण हे महर्षी वाल्मिकी रचित आदिमहाकाव्य असून त्याचा चरित्र नायक मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे भारतीयांचे श्रद्धेय दैवत आहेत. मर्यादा पुरूषोत्तम भगवान श्रीराम यांचे गुणगान समस्त लोक नेहमी करत असतात. मात्र त्यांची पत्नी सीता यांच्याविषयी फारसे बोलल्या जात नाही. काही काही जण तर सीतेमुळे रामायण घडलं असे बोलतात. कदाचित ते सत्य ही असेल ! मात्र संपूर्ण जीवनात सीतेला किती त्रास सहन करावा लागला असेल ? तिने त्रास का सहन केला असेल ? कोणासाठी सहन केला असेल ? कधी सीतेच्या भूमिकेत जाऊन आपण विचार केला आहे का ? नाही. पण हैद्राबादच्या मीना खोंड यांनी तसा विचार केला आणि सीतेच्या भूमिकेत जाऊन त्यांनी " सीता-शक्ती " नावाची कादंबरी लिहिली. त्यात त्यांनी प्रत्येक स्त्रीचं मन काय सांगत असते ? काय बोलत असते ? हे सीता बनून लिहिले आहे.
रामायणाची कथा आपणा सर्वांना तोंडपाठ आहे. रामायणात अनेक पात्र आहेत आणि प्रत्येक पात्राचे स्वतःचे एक वेगळे अस्तित्व आहे. त्याच्यातील मुख्य पात्र आणि त्यांच्या घटना आपणांस माहीत आहेत. पण लेखिकेने फक्त सीता ही मध्यवर्ती कल्पना डोळ्यासमोर ठेवून सुंदर असं सितायन लिहून काढलं आहे. कुणाच्या प्रारब्धात काय लिहून ठेवले आहे ? हे कसे कळणार ? नशिबात जे लिहिलं आहे ते घडणारच आहे, फक्त त्यासाठी कोणीतरी निमित्त होत असते !
कैकयीने राजा दशरथ यांना दोन वर मागितले नसते तर श्रीराम वनवासात जाण्यासाठी निघाले नसते. सुख असो वा दुःख पती-पत्नी नेहमी एकत्र असावेत ही भावनिक परंपरा पूर्वीपासुन चालत आलेली आहे. 'जेथे राघव तेथे सीता ‘ त्यानुसार सीता श्रीरामासोबत वनवासाला गेली . तिच्या नशिबात हा पहिला वनवास होता आणि तिने हा वनवास स्वेच्छेने  स्वीकारला होता .राज्य, ऐश्वर्य भोगण्याच्या मनस्थितीत असतांना परिस्थिती बदलली आणि वनवास भोगावा लागला. सीतेने वनवास खंबीरपणे संकटं संघर्ष सहन करत भोगला. सुख दुःखात पतीला साथ देण्याची सीता शक्ती अलौकिक आहे .
            या कथेतून अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखे आहे तो म्हणजे स्त्री हट्ट. कैकयीने राजा दशरथ जवळ हट्ट केला आणि सीतेने श्रीरामाला कांचनमृग आणून देण्याचा हट्ट धरला. स्त्री हट्टामुळे कधी कधी जीवनात अडचणीचे प्रसंग निर्माण होतात. म्हणून स्त्रियांनी आपला हट्ट पूर्ण करून घेतांना संसाराची देखील काळजी घ्यावी.
सीतेला पती रामाचा अतिशय अभिमान होता. ती म्हणते “ तुम्ही संघर्ष करून समुद्रपार करून त्या कपटी राक्षस रावणाचा वध केला आणि लंकेतून माझी मुक्तता केली. हा तुमचा पराक्रम माझ्याकरिता प्रेम, अभिमान, उपकार, अलौकीक दिव्य होते. अश्वमेध यज्ञाच्या वेळी आपली वामांगी सुवर्णप्रतिमा बघून प्रेमाची एकपत्नी व्रताची साक्ष पटली!”
" सीते तू माझी आंतरिक शक्ती होतीस. मी रावणवध करून हे युद्ध जिंकले आणि महत्वाचे म्हणजे तुझी सुटका झाली." राम सीतेचे असे अद्वैत होते.
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना महत्व दिले जात नाही. तसेच संशयाचे बळी स्त्रियाच ठरतात. कधी ही पुरुषावर असे संशय घेतल्या जात नाही किंवा घेतले तरी काही होत नाही. पण स्त्रीवर संशय घेतल्यावर अग्निपरीक्षा द्यावी लागते. सीता गरोदर असतांना देखील एका व्यक्तीच्या बोलण्यावरून श्रीराम सीतेला अरण्यात सोडून देतात. त्यावेळी सीता चलबिचल होते. पण गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी ती सर्व विचार बाजूला ठेवून सकारात्मक विचार करते. कारण मातेने नाराज, उदास होऊन नकारात्मक विचार केला तर त्याचा परिणाम गर्भातील बाळावर होऊ शकतो. सीतेचे उच्च विचार लेखिकेने या पुस्तकात मांडले आहे. गरोदर असणाऱ्या स्त्रियांनी कसे वागावे ? एकल मातेने संस्कार कसे करावे ? याचे उत्तम उदाहरण म्हणजे सीतामाता होय.
व्यक्तीगत जीवनापेक्षा राजाला राज्य महत्वाचे, व्यक्तीगत नात्यापेक्षा प्रजा महत्वाची हे तत्व राजारामाला पाळावे लागेल ! प्रजा प्रथम, नाती दुयम्म राहतील. राजाला नाती नसतात. राजा फक्त प्रजेचा असतो. श्रीराम हे प्रथम अयोध्येचे राजा आहेत आणि त्यानंतर आपले पती ! म्हणून श्रीराम अडचणीत किंवा संकटात येऊ नये म्हणून त्यांनी 14 वर्षाच्या वनवासानंतर दुसरा वनवास भोगला होता. मानसकन्या सीतेला वाल्मिकी ऋषी आपल्या आश्रमात घेऊन गेले .वाल्मिकी ऋषींनी रामचरित्र रामायणात लिहिल्यामुळे आजच्या लोकांना रामायण वाचायला मिळत आहे. त्यांच्या संस्कारामुळे लव-कुश यांच्या माध्यमातून श्रीरामाची भेट झाली. पण सीता मात्र आपल्या धरतीमातेच्या कुशीत गेली. पुस्तकातील लेखिकेची भाषा सहज, सोपी, हळवी आणि मनाला भावणारी आहे.
जीवनात संघर्ष, संकटं, परीक्षा, वनवास, एकटेपण, अपमान, कलंकितेचा चारित्र्यावर असलेला संशयाचा आघात सहन करणं हे सारं सीतेच्या आत्मिक शत्तीमुळे शक्य झालं. पतिव्रता आणि माता दोन्ही भूमिका तिने यशस्वीपणे पार पाडल्यात.
जन्म भू मातेच्या उदरी
मृत्यू भू मातेच्या अंतरी
सीता-राम मनामनात जनाजनात
जोवर चंद्र सूर्य आहेत भूवरी
सीता-शक्ती या पुस्तकाविषयी लेखिका म्हणते, ' मी सीतेवरील अन्यायाच्या दृष्टीकोनातून सीताशक्ती लिहायला घेतली. जसा जसा मी अभ्यास करायला लागले, तशी मी श्रीरामाच्या गुणसमुच्चय, चारित्र्य, आदर्श या सार्‍या मूल्यामुळे मर्यादा पुरुषोत्तमाकडे आकर्षित व्हायला लागले. माझे चिंतन वाढले आणि... रामाचे एकपत्नी व्रत, सीतेचा त्याग, सीतेचा आत्मघात या प्रश्नांची उत्तरे मला मिळत गेली.'
खरंच काही प्रश्नांची उत्तरे शोधत असतांना आपणाला त्या प्रश्नाचे उत्तर तर सापडतेच. शिवाय त्याच्याशी निगडित अन्य माहितीची देखील भर पडत असते. म्हणून प्रत्येकाने स्वतःला काही प्रश्न विचारून त्याचे उत्तरं शोधण्याचा नक्की प्रयत्न करावे.
लेखिकेने स्त्री भावना अतिशय संतुलितपणे मांडल्या आहेत हे विशेष. श्रीरामाला कुठलेही दुषण न देता सीतेच्या भावना व्यक्त करणं हे फार कठीण काम आहे, पण लेखिकेने ते फार छान प्रकारे लिलया केलंय हेच मला या पुस्तकाचे यश वाटते. हे सीताशक्ती निश्चित वाचनीय आणि संग्रह ठेवण्यासारखे आहे.

पुस्तकाचे नाव :- सीता-शक्ती
लेखिकेचे नाव :- मीना खोंड, हैद्राबाद
प्रकाशन - विजय प्रकाशन, नागपूर
पृष्ठे :- 84
मूल्य :- 125 ₹

पुस्तक परिचय -
नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक तथा विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769

पुस्तक परीक्षण - यौवन ते विवाह ( Youvan te Vivah )

तारुण्याचा दिशादर्शक प्लॅटफॉर्म सांगणारा लेख संग्रह - यौवन ते विवाह
तारुण्यावस्था म्हणजे मनास उमलविणारा व तनास फुलविणारा आयुष्यातील एक महत्वाचा संक्रमण काळ, याच काळावरून प्रत्येकांची पुढचे भविष्य ठरले जाते. या तारुण्याच्या वयात नकळतपणे चुका होतात आणि भविष्य उध्वस्त होऊन जाते. म्हणून या उमेदीच्या वयात थोडीशी काळजी आणि थोडीशी जागरूकता ठेवल्यास संपूर्ण आयुष्य निरोगी, निरामय आणि यशस्वीपणे कसे जगता येईल याचे उत्तम असे मार्गदर्शन प्रा. देवबा शिवाजी पाटील यांच्या यौवन ते विवाह या लेखसंग्रहात वाचण्यास मिळतात. प्रा. देवबा पाटील हे एक सेवानिवृत्त प्राध्यापक असून त्यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यांचे आजपर्यंत खूप साहित्य प्रकाशित झालेले आहे. आबालापासून वृद्धापर्यंत सर्वांसाठी त्यांनी लेखन केले आहे. पुणे येथील कृष्णायन प्रकाशन द्वारे प्रकाशित झालेले यौवन ते विवाह हा लेखसंग्रह फक्त वयात आलेल्या तरुण-तरुणी यांच्यासाठीच नाही तर किशोरवयीन मुलामुलींना, पालकांना, महिलांना या सर्वांसाठी उद्बोधक आणि मार्गदर्शक आहे. या पुस्तकात त्यांनी सदतीस विषयाच्या माध्यमातून तारुण्यातील अनेक घटनांचा मागोवा घेतलेला आहे. रस्ता चुकलेल्या वाटसरूला जर रस्त्यात कोणी वाटाड्या भेटला आणि त्याने खऱ्या रस्त्याच्या मार्ग सांगितला तर वाटसरू आपल्या इच्छित स्थळापर्यंत निश्चित पोहोचतो. प्रा. देवबा पाटील यांचे हे पुस्तक देखील तरुण मंडळींना वाटाड्या म्हणून काम करेल, यात शंकाच नाही. 
आपल्या पहिल्याच यौवनारंभ या प्रकरणात लेखकाने तारुण्यावस्था म्हणजे काय ? याचे योग्य वर्णन केले आहे. या वयात आई-वडिलांच्या भूमिका काय असायला पाहिजे हे सांगताना ते म्हणतात, केवळ आईवडिलांचे निर्मळ प्रेमच त्यांचा हा उत्साह नियंत्रित करू शकते. मुलांना सुधारण्यासाठी प्रेमाचा मार्ग हा गुरुत्वाकर्षणाच्या नियमाएवढा खरा व सार्वकालिक आहे. खरे प्रेम हे शहाणे असते व ते मुलांना नीट शिस्त लावते. घरात मुलांना प्रेमपूर्वक व मोकळे वातावरण मिळाले नाही तर ती मुले इतर मार्गावर वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
तरुण किंवा युवा कोणाला म्हणावे यांची खूप चांगली व्याख्या युवा सजगता या प्रकरणात वाचायला मिळते. सर्व प्रकारच्या संघर्षाला तोंड देण्याची ज्याच्यात हिंमत असते ते युवा असे ते म्हणतात. या युवा काळात अनेक गोष्टीचे आकर्षण असते परंतु त्यावेळी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपले ठेरवलेले ध्येय गाठण्यासाठी मनात जिद्द ठेवून अतोनात मेहनत करण्याचे गुण अंगी बाणले पाहिजे. तरुणपणात जो आळस करतो आयुष्यभर मग त्याला कष्ट सोसावे लागतात. या वयात मुला-मुलींना एकमेकांचे आकर्षण असते. म्हणून आपले पाऊल चुकीच्या दिशेने टाकू नये असा मोलाचा सल्ला ते देतात. 
आपले जीवन सुखी, समृद्ध आणि यशस्वी करायचे असेल तर शिक्षण घेतलं पाहिजे. सदानकदा काहीतरी नवीन शिकले पाहिजे. शिक्षणाची गरज या प्रकरणात लेखक शिक्षणाविषयी खूप मौलिक विचार व्यक्त केले आहेत. ते म्हणतात, स्वतःचे निरीक्षण करणे, स्वतःचे आत्मपरिक्षण करणे आणि स्वतःमधील दोष शोधून, ते दूर करून स्वतःमध्ये स्वतः सुधारणा करणे व जीवन घडविणे हीच खरी शिक्षणाची क्रिया आहे. शिक्षण घेणे म्हणजे नोकरी मिळविणे हे नसून त्या शिक्षणाने आपल्या जीवनात बदल करणे होय. तरुणांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी अखंडित शिक्षण घेत राहिले पाहिजे. ज्याचे शिक्षण थांबला तो तिथेच संपला. 
लेखकाला तरुणांशी हितगुज करायला खूप आवडते. आजचे तरुण हे देशाचे उद्याचे भावी आधारस्तंभ आहेत. ते जर पोकळ, निरुउद्योगी आळशी आणि व्यसनी असेल तर देशाचा विकास कसा होईल ? तरुणाईशी हितगुज या प्रकरणात लेखक तरुणांना टाईमपास न करता आपला फावला वेळ पुस्तके वाचनात, आपला छंद जोपासण्यात घालावा. ज्यामुळे आपले मन अजून परिपक्व होण्यास मदत मिळते. 
ईश्वराने फक्त मानवाला बुद्धी दिली आहे. त्यामुळे माणूस आपल्या बुद्धीच्या बळावर विचार करू शकतो. व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीनुसार प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो आणि त्याची विचार करणारी बुद्धी देखील वेगळी असते. लेखकाच्या मते ज्याला आपल्या बुद्धीचा उपयोग करून घेणे हे सुयोग्य तऱ्हेने जमते तोच पुढे जातो. बुद्धिमता देई सुबत्ता या प्रकरणात लेखकाने बुद्धीचा विकास करण्यासाठी वाचन, चिंतन आणि मनन करणे आवश्यक असल्याचे सांगताना आहार आणि व्यायाम हे देखील महत्वाचे आहे असे सांगितले आहे. जर शरीर साथ देत नसेल तर बुद्धी देखील साथ देत नाही म्हणूनच योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य पुस्तकांचे वाचन करून आपल्या बुद्धीचा सर्वांगीण विकास करता येऊ शकते. 
माध्यमिक शाळेचा निकाल लागला की प्रत्येक तरुणाला कॉलेजचे स्वप्न पडत असते. कॉलेजच्या जीवनाचे प्रत्येक तरुणाला विशेष आकर्षण असते. महाविद्यालयीन जीवन या प्रकरणात कॉलेजमध्ये युवकांचे जडणघडण कशी होते ? याचे यथार्थ वर्णन केले आहे. नो कॉलेज नो नॉलेज असे फार पूर्वीपासून म्हटले जायचे. पण आजकाल मुलं कॉलेजमध्ये कमी आणि कोचिंग क्लासेसमध्ये जास्त वेळ दिसून येतात. त्यामुळे कॉलेज मधील अनेक घटनांच्या अनुभवापासून मुकत आहेत, हे ही सत्य आहे. 
जीवनाचा खरा आनंद लुटायचा असेल तर सोबतीला एक तरी मित्र असावा. मित्राशिवाय जीवन म्हणजे मिठाशिवाय भाजी जशी सपक आणि बेचव लागते अगदी तसेच आहे. मित्र/मैत्रीण कसे असावेत ? या प्रकरणात लेखकाने मित्राचे खूप छान वर्णन केले आहे. चांगले मित्र मिळणे ही खरी संपत्ती आहे. मित्रांमुळे जीवन सुधारू शकते तर त्यांच्यामुळे बिघडू ही शकते. आपली ओळख ही आपल्या मित्र परिवारावरून केली जाते. 9म्हणून मित्राची निवड करतांना काळजी घेणे आवश्यक आहे. 
आजकालच्या मुलांमुलीत सैराट प्रेम वाढीस लागले आहे. म्हणून क्षणभंगुर प्रेमाच्या जाळ्यात न पडता या वयात अभ्यास करणे व यश मिळविणे आवश्यक आहे. त्याच कामावर फोकस करण्याचा मार्मिक सल्ला आभासी प्रेमाचे मृगजळ या प्रकरणात सविस्तरपणे मांडले आहे. 
एखादा व्यक्ती दिसायला खूप सुंदर दिसतो पण मनाने तो तितकाच सुंदर असेल असे ठामपणे सांगता येत नाही. ऊस डोंगा परी रस नाही डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ? या ओळीनुसार कुणाच्याही वरवर दिसण्यावर न जाता त्याचे चारित्र्य, गुण पाहायला हवे. उत्तम चारित्र्य हाच जीवनाचा पाया आहे. आपल्याकडे किती पैसा, किती बंगले, किती संपत्ती आहे ? यापेक्षा आपले चारित्र्य किती चांगले आहे ?हे अत्यंत महत्वाचे आहे. लेखकाने याविषयी चारित्र्य हेच खरे सौदर्य या प्रकरणात उत्तमरीत्या केले आहे.
व्यक्तिमत्व विकास या लेखात लेखक म्हणतो, 
माणसाचा चेहरा हा त्याच्या मनाचा आरसा, व्यक्तिमत्वाचा निदर्शक असतो. आपले चालणे, बोलणे, आपली कार्यपध्दती, आपल्या सवयी यातून आपल्या व्यक्तिमत्वाचे लोकांना दर्शन होते. मनात जसे विचार असले त्याप्रमाणे आपला चेहरा बनतो, दिसतो. दुःखद विचारांनी चेहरा कोमेजतो, वाईट विचारांनी चेहरा आक्रसतो, दृष्ट विचारांनी चेहरा उग्र बनतो तर चांगल्या विचारांनी चेहरा आपोआप प्रफुल्लित होते. 
विचार प्रबळ जीवन सबळ या लेखात लेखक आपले विचार व्यक्त करताना म्हणतो की, 
जीवनात यशस्वी होण्यासाठी विचारआचार उच्च असायला पाहिजेत. ज्याच्या सोबतीला सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो. विचार हे वाहत्या पाण्यासारखे असतात. पाण्यात जे मिसळले तसे पाणी बनते. सकारात्मक विचार जीवनाला उचित वळण देतात. सकारात्मक विचारांनीच आपण आपल्या जीवनाचा विकास करू शकतो. नकारात्मक विचार हे प्रत्येक कामातील अडथळा असतात आणि त्यांच्यामुळे अनेक कामे खोळंबतात.
प्रत्येक तरुण तरुणी आणि वैवाहिक जीवनात नुकतेच प्रवेश केलेल्या नावदाम्पत्यासाठी उपयुक्त असे मार्गदर्शक पुस्तक आहे. 

पुस्तक - परिचय 

नासा येवतीकर, कन्या शाळा धर्माबाद
9423625769

पुस्तक परीक्षण - आपली सूर्यमाला ( Apli Suryamala )

जिज्ञासा मुलांसाठी विज्ञानकथा आपली सूर्यमाला
सकाळी सकाळी पूर्व दिशेला उगवणारा सूर्य आपल्या दिवसाची सुरुवात करतो आणि पश्चिमेला मावळल्यावर आपला दिवस संपतो. अगदी लहानपणापासून आपल्या मनात या सुर्याविषयी मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. सूर्य कसा उगवतो आणि मावळतो ? सूर्य मावळल्यावर कोठे जातो. जिज्ञासा जागृत करणारे असे प्रश्न लहान मुले मोठ्यांना नेहमीच विचारत असतात. कधी कधी त्या बालबोध मनाला समाधानकारक उत्तर मिळते तर कधी मिळत नाही. सूर्य आणि त्याचा परिवार याची खूप छान अशी माहिती लेखक प्रा. देवबा शिवाजी पाटील यांनी 'आपली सूर्यमाला' ह्या छोट्याशा पुस्तकातून केली आहे. लेखक सेवानिवृत्त प्राध्यापक असून त्यांच्या नावे भरपूर साहित्य संपदा प्रकाशित आहेत. त्यात विज्ञान विषयी आभाळाचे गुपीत, नभ नवलाई, आकाशगंगा ही काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले असून त्या संग्रहास पुरस्कार देखील मिळाले आहेत. पाठ्यपुस्तक मंडळाने देखील त्यांच्या कवितेची दखल घेतली असून खार ही कविता अमराठी शाळेच्या दुसऱ्या वर्गाच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. जेष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड संपादित बालकुमार कथा व कविता कोश यामध्ये देखील त्यांच्या कथा व कविताचा समावेश झाला आहे. आकाशवाणी जळगाव रेडिओ केंद्रावरून त्यांचे कवितावाचन प्रसारित झाले आहेत. 
सूर्याची निर्मिती कशी झाली ? ग्रह-उपग्रह, लघुग्रह कसे निर्माण झाले ? ग्रहांचे प्रकार किती आहेत ? ते सूर्याभोवती आपापल्या कक्षेतच कसे फिरतात ? ते गोलाकारच का दिसतात ? प्रत्येक ग्रहाची वैशिष्ट्ये, ते सूर्याच्या प्रचंड उष्णतेने जळत का नाहीत ? ते आकाशात केव्हा व कसे दिसतात ? ते तसेच का दिसतात ? गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ? सूर्य कसा प्रकाशतो ? ग्रहांना स्वतःचा प्रकाश का नसतो ? तरीही शुक्र ग्रह चमकताना का दिसतो ? ग्रहांवर वातावरण का नाही ? आपल्या पृथ्वीवरच सजीव का निर्माण झाले ? ग्रहांवरही ग्रहणे होतात का ? तारा कसा तुटतो ? उल्का कशा बनतात ? धूमकेतू कसे तयार होतात ? शेवटी आपल्या सूर्यमालेचा शेवट कसा होणार ? अशा अनेक कुतूहलपूर्ण प्रश्नांविषयीची वैज्ञानिकांनी प्रसिद्ध केलेली माहिती आकलनसुलभ भाषेत वर्णिली आहे. लहान मुलांच्या वयानुसार व त्यांच्या आकलनक्षमता लक्षात घेऊन सूर्यमालेविषयी वैज्ञानिक माहिती सोप्या भाषेत लिहिली आहे. रंगीत आकर्षक चित्रांमुळे ही माहिती अजून वाचनीय ठरते. शालेय जीवनात मुलांना विज्ञान हा विषय नकोसा वाटतो. त्यामुळे विज्ञाना पासून अनेक मुले दूर पळतात. पण तेच विज्ञान विषय शिकविताना कथा व कवितेच्या माध्यमातून सांगितले गेले तर विद्यार्थ्यांना समजायला सोपे होईल आणि मुलांमध्ये अभिरुची निर्माण होईल असा लेखकाला विश्वास वाटतो. विज्ञानाच्या क्लीष्ट भाषेच्या गुंतवळ्यात न अडकता साध्या, सरळ, रंजक, आणि सोप्या भाषेत संपूर्ण माहिती तुमच्याप्रमाणेच, हुशार व जिज्ञासू मुलामुलींनी वर्गामध्ये त्यांच्या सरांना विचारलेल्या विविध प्रश्नांतून व सरांनी त्यांना दिलेल्या समर्पक उत्तरांमधून प्रवाही, रंजक व संवादी भाषेत मांडली आहे. भाषा साधी व सरळ असल्याने ही वैज्ञानिक माहिती समजण्यास एकदम सुलभ आहे. असे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे हे विज्ञानदायक छोटेसे पुस्तक जिज्ञासू मुलामुलींसाठी खूप खूप उपयोगी तर आहेच पण सुजाण व अभ्यासू शिक्षकांसाठी देखील ते अत्यंत उपयोगी आहे. प्रत्येकांनी संग्रही ठेवावे असे हे सुंदर व उपयुक्त असे पुस्तक आहे. पुढील लेखनासाठी हार्दीक शुभेच्छा ....! तसेच सर्व वाचकांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .......!

पुस्तकाचे नाव :- आपली सूर्यमाला
लेखकाचे नाव :- प्रा. देवबा शिवाजी पाटील, 9420795307
प्रकाशक :- दिलीपराज प्रकाशन, पुणे
एकूण पृष्ठ :- 56
किंमत :- 170 ₹

पुस्तक परिचय - नासा येवतीकर, मुख्याध्यापक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

पुस्तक परीक्षण - मोबाईल माझा गुरू ( Mobile majha Guru )

मनोरंजनातून मूल्यशिक्षण देणारा - मोबाईल माझा गुरू बाल कथासंग्रह
राज्यशासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त हिंगोली जिल्ह्यातील एक आदर्श शिक्षक व्यक्तिमत्त्व म्हणजे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागेश सु. शेवाळकर. शालेय जीवनासोबत आपले संपूर्ण जीवन त्यांनी साहित्य निर्मिती करण्यासाठी व्यतीत केले आहे म्हणूनच त्यांच्या हातून एकापेक्षा एक सरस अश्या पुस्तकांची निर्मिती झाली आहे. आजपर्यंत त्यांची 30 हुन अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून 10 च्यावर कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या श्यामच्या छान छान गोष्टी या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आणि प्रत्येक शाळेत पोहोचविले आहे. साठी बुद्धी नाठी असे म्हणतात परंतु लेखकांनी साठी पार केल्यानंतर ही त्यांची लिहिण्याची उर्मी आणि धमक अजूनही कायम आहे. आपल्या जीवनात आलेल्या अनेक सुखदुःखाचे प्रसंग, चढ-उतार या सर्व अनुभवाच्या बळावर ते आपले साहित्य लेखन करतात म्हणून तर वाचकांच्या गळी सहज उतरते. अवघड आणि क्लिष्ट वाटणारे शब्द शक्यतो टाळून सहज सोपी भाषा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच आबालापासून वृद्धांपर्यंत सर्वांना त्यांचे साहित्य मनापासून आवडतात. लहान व किशोरवयीन मुलांची वाचनाची भूक भागवावी या उद्देशाने आजरा येथील मासिक ऋग्वेद रिलीफ फंड चैतन्य सृजन सेवा संस्थाने नागेश शेवाळकर लिखित " मोबाईल माझा गुरू " नावाचे बालकथासंग्रह नुकतेच प्रकाशित केले आहे. 
यातील सर्वच कथा मुलांना त्यांच्या भावविश्वात नेऊन नकळत काही ना काही शिकवण देऊन जातात. पहिली कथा वाचायला घेतली की सर्व कथा वाचन करेपर्यंत वाचक पुस्तक सोडत नाही असे कथानक या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. वाचकांची अचूक नाडी ओळखण्यात लेखक वाकबगार आहेत म्हणून आई, बाबा, आजी, आजोबा, शाळा, घर, खेळ, आईस्क्रीम आणि विशेष करून मोबाईल या सर्व बाबी आणि जीवनात घडणाऱ्या अनेक बारीकसारीक गोष्टीचे निरीक्षण करून त्याच बाबीवर प्रकाश टाकणाऱ्या कथा या संग्रहात लिहिल्या आहेत. या बालकथासंग्रहात एकूण अकरा कथा आहेत.
एकविसाव्या शतकातील महान क्रांती म्हणजे मोबाईल होय. घरात जेवढे सदस्य आहेत तेवढे मोबाईल आजच्या घडीला घरात उपलब्ध आहेत. एक काळ असा होता की फक्त श्रीमंत लोकांच्या घरात टेलिफोन बघायला मिळायचं. दूरच्या व्यक्तीचे बोलणे कसे ऐकायला येते ? या गोष्टीची अनेकांना आश्चर्य वाटायचे. पण काळ बदलला, आजच्या संगणकाच्या युगात मोबाईल ही एक मूलभूत गरज बनली आहे. मोबाईल जेवढे गरजेचे आणि आवश्यक बनले तेवढेच त्रासदायक देखील बनले आहे. घरातील लहान बालकांसाठी पूर्वी खेळण्यासाठी विविध खेळणी देत असत त्याची जागा आता मोबाईलने घेतलं आहे. घरातील लहान बालके मोबाईल शिवाय जेवण करत नाहीत ही प्रत्त्येक घरातील आई-बाबांची मुख्य समस्या बनली आहे. अश्या घटना लेखकांच्या घरातच नाही तर सर्वत्र आढळून येते. हीच कथाबीज वापरून हट्टी रितेश ही कथा रंगतदार बनविली आहे. रितेशचे आजोबा जेवण करतांना त्याचा मोबाईल पाहण्याची सवय कशी घालवतात हे वाचण्यायोग्य आहे.
घरातील मुलं मोबाईलचा वापर फक्त खेळांसाठीच करतात असा आपला समज असतो. कारण जास्तीत जास्त मुलं मोबाईलवर गेमच खेळत असतात. पण आसावरी सारखी एखादी समजूतदार मुलगी असू शकते जी की आपल्या आईच्या मोबाईलचा वापर करून तिच्या आईचा आणि आत्या यांच्यात असलेला अबोला दूर करते ? त्या दोघांमध्ये असलेला अबोला संपविण्यासाठी आसावरी कोणती युक्ती वापरते हे नक्कीच वाचनीय आहे.
आपणाला जे कोणी ज्ञान देतात, माहिती देतात, प्रश्नांची उत्तरे देतात ते एकप्रकारे गुरूच असतात. संत, ऋषी आणि परमेश्वर यांना आपण गुरूच्या सर्वोच्च स्थानी ठेवतो व त्यांची पूजा अर्चा करत असतो. घरातील लहान मुलं आपल्या आईला आणि आजीला घरात पूजा करतांना पाहत असतात आणि त्यांच्या मनात नाना प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. मोठ्यांना परमेश्वर हेच गुरू वाटतात तर लहान मुलं मोबाईलला आपला गुरू मानतात. प्रेरणा ही अशीच हुशार व चुणचुणीत मुलगी मोबाईलला गुरू मानते आणि त्याची पूजा कशी करते ? ही एक भन्नाट कल्पना मोबाईल माझा गुरू या कथेतून वाचायला मिळेल.
आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे सर्वात जास्त नुकसान कोणाचे होत असेल तर ते आहे लहान मुलांचे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरातील मुलांना आई-बाबा यांच्यासह आजी-आजोबा यांचा प्रेम आणि सहवास लाभत होता. ज्यामुळे त्यांच्यावर मूल्य संस्कार होत होते. परंतु आजच्या पिढी या गोष्टीपासून दुरावल्या गेली आहेत. जास्वंदी नावाची मुलगी खूप नशीबवान आहे कारण तिला या काळात देखील आजी-आजोबांचे प्रेम मिळते, त्यांच्यासोबत तिला राहायला मिळते. पण तिचा मित्र केदारला मात्र तसा प्रेम मिळत नाही तेव्हा जास्वंदी कोणती युक्ती करते ? ज्यामुळे केदारला आजोबाचा सहवास लाभतो हे सर्वांनी वाचण्याजोगे आहे. लहान मुलांचे आणि आजी-आजोबांचे एक वेगळे नाते असते. ते आई-बाबांनी तोडून पाप पदरात घेऊ नये असा छानसा संदेश यातून मिळतो. या पुस्तकातील अत्यंत मोलाची आणि मार्मिक अशी कथा आहे, असे मला वाटते.
जेष्ठ साहित्यिक आदरणीय मंगेश पाडगावकर यांची सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ? ही कविता ऐकली नाही असा एक ही बालक शोधून सापडणार नाही. त्या कवितेवर एखादी कथा होऊ शकते म्हणजे किती भन्नाट असेल. जमाडी जम्मत ... गमाडी गम्मत ... भंबेरी भूम्म ही एक मजेशीर कथानक आहे.
घरात पाहुणे आले की, सर्वात जास्त आनंद कोणाला होतो माहीत आहे का ? तर लहान मुलांना. लहान मुलांच्या चेहऱ्यावर निरागस हास्य यावेळी आपणाला पाहायला मिळतो. लेखकांनी आरोही नावाची कथा लिहितांना खूप सूक्ष्म निरीक्षण करून रंजकता निर्माण केले आहे. मुलांच्या डोक्यात कधी कोणती कल्पना तयार होईल सांगता येत नाही. फक्त त्यांना व्यक्त करण्याची संधी द्यायला हवी. पण घरात नेमकं उलटे घडत असते, आपण लहान मुलांच्या बोलण्याकडे किंवा त्यांच्या कल्पनेकडे सर्रास दुर्लक्ष करून आपले ते खरे करतो. आरोहीची कथा वाचल्यावर आई-बाबांनी कसे वागायला पाहिजे याची दिशा नक्की मिळेल.
लहान मुलांचे आवडते खाद्य म्हणजे आईस्क्रीम. बागेत फिरायला जाऊ द्या किंवा बाहेर कुठे फिरायला त्यांची एकच मागणी असते ती आईस्क्रीमची, याच विषयावर लेखकांनी वेगळ्या धाटणीची कथा लिहिली आहे. 
शाळेत राबविले जाणारे उपक्रम किंवा प्रकल्प हे मुलांच्या अंगातील सुप्त गुणांना विकसित करत असतो. काही पालक शाळेच्या या उपक्रमाला नको ते नाव ठेवतात तर अक्षयचे आई-बाबा मात्र त्याच्या प्रकल्पात मदत करतात आणि अक्षय शाळेचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ठरतो. विद्यार्थ्यांच्या मनात पशु-पक्षी यांच्याविषयी संवेदना निर्माण करण्यासाठी शाळेने आयोजित केलेला प्रकल्प अक्षयच्या अंगी वेगवेगळ्या भावनांचे आविष्कार दाखवितो, हे या कथेतून पाहायला मिळते. 
बंद करा ! बंद करा ! ही कथा घरातील प्रत्येक आई-बाबा आणि वरीष्ठ लोकांसाठी उद्बोधक आहे. मुलांना मोबाईल वापरू नका म्हणणारे मोठे व्यक्ती त्याच्याच समोर मोबाईलचा अति वापर करू लागले तर मुलांच्या मनात काय राग निर्माण होतो हे या कथेतून सांगण्याचा प्रयत्न लेखकांनी केला आहे. घरातील लहान मुलं घरातील रोजच्या ओळखीच्या व्यक्तीजवळ सहजपणे जातात तर अनोळखी व्यक्तीजवळ लवकर जात नाहीत. याच बाबीवर अभीची आबी ही कथा रंजकपणे मांडली आहे. ही कथा वाचतांना आपण बालविश्वात रममाण होऊन जातो. 
कोणत्याही बालकांचे पहिले गुरू आई-बाबा होत. त्यानंतरचे गुरू म्हणजे शिक्षक. पण घरात असलेले एक सेवानिवृत्त शिक्षक जे की सिद्धीचे आजोबा होते. तेच तिच्यासाठी एक आदर्श शिक्षक होते. शाळेत तिने शिक्षक दिनाच्या दिवशी केलेलं भाषण आणि तिला मिळालेला पुरस्कार हे आजोबा दिन या शेवटच्या कथेत अत्यंत हृदयस्पर्शी असे लिहिले आहे. ही कथा वाचतांना वाचकांचे डोळे पाणवल्या शिवाय राहत नाही. 
आपल्या घरातील लहान व किशोरवयीन मुलांनी हे पुस्तक नक्की वाचायलाच पाहिजे अशी आहे. प्रत्येक गोष्ट मुलांच्या मनाला नक्की स्पर्श करतो, हे पुस्तक वाचल्याशिवाय कळणार नाही. या पुस्तकातून पालकांना देखील अनेक गोष्टी शिकायला मिळतात. म्हणून पहिल्यांदा प्रत्येक आई-बाबांनी हे पुस्तक वाचावे आणि आपल्या मुलांना वाचण्यासाठी द्यावे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी इतर कोणती महागडी भेटवस्तू देण्यापेक्षा असे संस्कारक्षम पुस्तक भेट देणे योग्य राहील, असे वाटते. मासिक ऋग्वेद चिलड्रन रिलीफ फंड, आजरा यांचे विशेष अभिनंदन करावेसे वाटते की अल्प दरात हे उत्तम पुस्तक उपलब्ध करून दिले आहे. हे पुस्तक पोस्टाने मागविण्यासाठी 9423277069 व 9423279163 या मोबाईल क्रमांकावर अवश्य संपर्क करावे. जेष्ठ साहित्यिक नागेश सु. शेवाळकर यांच्या हातून भविष्यात अजून उत्तमोत्तम साहित्य निर्माण होऊन आम्हा वाचकांना अजून साहित्य वाचण्यास मिळो हीच मनस्वी सदिच्छा ...!

पुस्तकाचे नाव :- मोबाईल माझा गुरू
लेखकाचे नाव :- नागेश सु. शेवाळकर
प्रकाशन :- मासिक ऋग्वेद चिलड्रन रिलीफ फंड, आजरा
एकूण पृष्ठ :- 72
किंमत :- 10 रु. 

पुस्तक परिचय
- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक तथा विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769

पुस्तक परीक्षण ( Reveiw of Books by Nasa Yeotikar )

स्तंभलेखक नासा येवतीकर यांनी केलेल्या पुस्तकांचे परीक्षण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावरील पुस्तकांच्या नावावर क्लीक करावे. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवावे. आपले पुस्तक परीक्षण करावयाचे असल्यास खालील पत्त्यावर पुस्तक पाठवावे. 

आपलाच
नासा येवतीकर, स्तंभलेखक

पत्ता - नासा येवतीकर, स्तंभलेखक
जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद
ता. धर्माबाद जि. नांदेड पिन - 431809
9423625769






















धन्यवाद ............!



पुस्तक परीक्षण ओंजळ ( Reveiw of Book Onjal )


मानवी मनाचा ठाव घेणारा ओंजळ काव्यसंग्रह

कवयित्री श्रीमती आरती डिंगोरे यांचा पुण्याच्या वैशाली प्रकाशन द्वारे प्रकाशित पहिलावहिला ओंजळ नावाचे काव्यपुष्प नुकतेच वाचण्यात आले. संग्रहाचे मुखपृष्ठ पाहताक्षणी पुस्तक वाचण्यास प्रेरित करते. कवयित्री आपल्या मनोगतात म्हणते, 'ओंजळी'त आपली सुखदुःख सामावतात. मनाच्या तळाशी दडलेले भावभावनांचे कल्लोळ 'ओंजळी'त सहज पेलता येतात. अहो! अवघे ब्रम्हांड ह्या 'ओंजळी'त सामावलेले असते; म्हणूनच तर आपण सकाळी उठल्यावर हातांचे दर्शन घेतो. दातृत्वाचे रूप म्हणजे 'ओंजळ'. आरतीनंतर परमेश्वराचा आशीर्वाद 'ओंजळी'तूनच घेता येतो. सकाळची सुरुवात दिनकराला 'ओंजळी'ने अर्घ्य देऊनच होते. माणसाच्या अनेक कृतींशी, भावनांशी 'ओंजळी'चं घट्ट नातं असतं. 'ओंजळ' म्हणजे समर्पणाच्या भावनांचं द्योतक. स्वीकारायला 'ओंजळ' लागते तसेच द्यायलाही 'ओंजळ'च लागते. अशी ही 'ओंजळ' कधीच रिती राहू नये, मुक्तहस्ते देण्याकरिता पुन्हा पुन्हा भरत रहावी अशी सदिच्छा व्यक्त करतात. त्यांच्या या भावनेतूनच वाचक एक एक कविता वाचण्यास सुरुवात करतो आणि मंत्रमुग्ध होऊन रचना वाचत राहतो. माझ्या वाचण्यात आलेला हा पहिला काव्यसंग्रह आहे,  ज्याची प्रस्तावना स्वतःच्या आईने लिहिले आहे. आपल्या लेकीला आशीर्वाद देताना सौ. भारती वाटारे यांनी कवयित्रीचे मन सांगून जातात. परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या विचारांच्या सानिध्यात वाढलेली कवयित्री खूप हळव्या मनाची आणि संघर्षाला न घाबरता समानता करणारी सबला महिला आहे. आपल्या कवितेतून त्या माणसाला माणसाची ओळख करून देण्याचा प्रयत्न करते. प्रसिद्ध साहित्यिका रेखाताई भंडारे यांनी या काव्यपुष्पाला ब्लर्ब देऊन कावयित्रीला नवी उभारी देण्याचे काम केले आहे. 
कावयित्रीला मूळात लहानपणापासून कवितेची आवड होती. अनेक सण, समारंभ किंवा उत्सवात त्यांचा आणि कवितेचा पावलोपावली संबंध आलेला आहे. त्यातूनच त्यांच्या कविता जन्माला आल्या आहेत असे वाटते. म्हणूनच ते कविता या रचनेत म्हणतात, 

जीवनातील प्रीत म्हणजे कविता
जगण्यातील गीत म्हणजे कविता

या काव्यपुष्पामध्ये पाऊस या विषयावर अनेक कविता वाचण्यास मिळतील. श्रावणातला पाऊस असो वा महापूर असलेला पाऊस त्यांना आलेल्या अनुभवावर आधारित रचना मन वेधून घेतात जसे श्रावणसरी मध्ये त्या म्हणतात

येता श्रावणाच्या सरी
सुवासिनी सजतात
राऊळांत जाऊनिया
महादेवा पूजतात

आणि तोच पाऊस जेव्हा महापूर होऊन येतो त्यावेळी काय होते ? गंगामाई या कवितेत महापूरामुळे लोकांची काय अवस्था झाली ? याचे वर्णन अस्वस्थ करणारे आहे. 

होत्याचं नव्हतं केलं
संसार सारा वाहून नेला
शब्दही झाले निःशब्द
डोळ्यात आसवे देऊन गेला. 

दिवस आणि रात्र हे निसर्गचक्र आहे. प्रत्येकांच्या जीवनात रोजची सकाळ एक नवचैतन्य आणत असतो. कालची घटना विसरून मनुष्य नव्या उमेदीने व नव्या ऊर्जेने कामाला लागतो. सकाळ या कवितेत कवयित्री अप्रतिम वर्णन करताना म्हणते,

लाभलेसे नवचैतन्य सृष्टीला
अवघी मरगळ लयास गेली
दशदिशांतूनी तरंग आनंदाचे
दृष्टी सर्जनाची ती लाभली ....

आज माणसांची लोंढे शहरात वाहत असले तरी प्रत्येकाला आपल्या बालपणीचे गाव आठवत राहते. गावाजवळ असलेले डोंगर, नदी, शेती या सर्व गोष्टी आठवणीत येत असतात. कवयित्री गाव माझे या कवितेतून ग्रामीण भागातील गावाचे यथार्थ असे वर्णन केले आहे, जी रचना वाचतांना प्रत्येकांना आपल्या गावाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. गावातील घराचे वर्णन करताना कवयित्री म्हणतात,

चार घराच्या दाटीत
घर माझे ते कौलारू
दारी तुळस हासरी
उभे स्वागतास तरु

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे आईच्या बाबतीत म्हटल्या जाते. फुलात फुल जाईचे अन् जगात प्रेम आईचे असे ही बोलल्या जाते. आई वर अनेक मंडळींनी कविता लिहून आईचे प्रेम व्यक्त केले आहे. आईचे आपल्या लेकरांवर खूप प्रेम असते याचे सुंदर वर्णन करताना कवयित्री आई कवितेत म्हणते,

आई नेहमीच वेडी असते,
हृदयी तिच्या ममतेची बेडी असते ...

प्रेम याविषयी कविता न करणारा व्यक्ती शोधून ही सापडत नाही. प्रेम या अडीच अक्षरांच्या शब्दामध्ये प्रचंड शक्ती आहे. प्रेम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक प्रियकर आणि प्रेयसी एवढंच चित्र उभे राहते. याशिवाय अन्य ठिकाणी देखील आपणांस प्रेम दिसून येते पण त्यासाठी कवितेची दृष्टी लाभली तर कशी रचना तयार होते हे प्रेम कविता वाचतांना लक्षात येईल. खरंच आहे की, प्रेमात पडल्यावर कविता सुचते त्या प्रेमाचे वेगवेगळे प्रसंग सांगताना सृष्टीतल्या प्रत्येक बाबीवर प्रेम करण्यास सांगताना त्या म्हणतात,

प्रेम विशाल आकाशावर, क्षमाशील या धरेवर
हिरव्यागार कुरणावर, विशुद्ध वाहणाऱ्या निर्झरावर .....

साहित्यिकांनी आपल्या लेखणीने असे साहित्य निर्माण करावे ज्यामुळे समाज सुधारणा होण्यास मदत मिळावी. कोणालाही न घाबरता सत्य परिस्थिती मांडण्याची ताकद फक्त लेखणीत आहे. म्हणूनच परखड या कवितेतून सर्व साहित्यिकांना कवयित्री आवाहन करतांना म्हणतात, 

करुनिया तलवार लेखणीस धार द्यावी
भय मनी न ठेवता परखड वापरावी

बेकार या कवितेतून अनेक बेकार बेरोजगार युवकांना प्रेरणा दिली आहे. देवबाप्पा आणि चांदोमामा ह्या बालकविता देखील वाचनीय आहेत. कळी उमलताना ही कविता वाचतांना कवयित्रीचे मन वाचायला मिळते. स्त्री आणि मासिक पाळी हा विषय एवढ्या सुरेख पद्धतीने मांडला आहे की, या काव्यपुष्पातील ही सर्वात सुंदर रचना आहे. कवितेतील शेवटच्या चार ओळीवरून कवितेचा गर्भित अर्थ स्पष्ट होते.

अचानक तिने मला भेटायचे नाकारले
जाताना मात्र सृजनतेचे गुपित सांगितले ....

या काव्यपुष्पामध्ये विविध विषयांवरील पंचाक्षरी, अष्टाक्षरी, अभंग, ओव्या, भारुड, हायकू असे विविध प्रकारचे काव्य लेखन केलेलं आहे. कवयित्री नाशिक जिल्ह्यातील असल्याने आपल्या नाशिक जिल्ह्याची महती सांगायला देखील त्या विसरल्या नाहीत. 
एकूणच ओंजळ काव्यपुष्पातील सर्वच रचना खूपच सुंदर, लयबद्ध आणि अनुभवातील प्रसंग मांडणाऱ्या आहेत. पुस्तकाचे शीर्षक असलेली कविता ओंजळ मध्ये कवयित्रीने जी इच्छा व्यक्त केली,

कधी न व्हावी रिती ओंजळ
द्यावा एकचि आशिष मज
तव चरणांवर नित समर्पित
जाणून घेण्यास्तव रे तुज ....

म्हणूनच म्हणावे वाटते कवयित्रीची ओंजळ सदा भरून राहावी आणि इतरांना त्या ओंजळीतून उत्तम रचना वाचण्यास मिळावे हीच सदिच्छा आणि पुढील काव्य लेखनास हार्दीक शुभेच्छा ....!

काव्यसंग्रह - ओंजळ
कवयित्री - आरती डिंगोरे, नाशिक
भ्रमणध्वनी - 9404687729
प्रकाशक - वैशाली प्रकाशन, पुणे
मूल्य - 150 ₹  पृष्ठ - 120

पुस्तक परिचय - नासा येवतीकर, स्तंभलेखक
धर्माबाद जि. नांदेड
9423625769

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...