Saturday, 23 March 2024

पुस्तक परिचय - अलेक्सा ( Aleksa )


कथेतून मूल्यशिक्षण देणारे पुस्तक अलेक्सा 
अखिल भारतीय बालसाहित्य पुरस्कार प्राप्त, मुळत: महाराष्ट्रातील वरोरा येथील रहिवाशी पण सध्या हैद्राबाद येथे वास्तव्यास असलेली, माध्यमिक शाळेतून प्रिन्सिपल पदावरून निवृत्त झालेली, ज्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि तेलगू या चार भाषेत कथा, कविता, ललित लेख, पद्य पथ नाटिका, कादंबरी, बालकथा, बालकविताचे गेल्या 40 वर्षात विपुल लेखन केले आहे अशा आंतरराष्ट्रीय बहुभाषी कवयित्री लेखिका मीना खोंड यांची अलेक्सा ही कादंबरी ई साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केली आहे. या कादंबरीला महाराष्ट्रात मुलांच्या जगात प्रसिद्ध असलेल्या किशोर मासिकाचे संपादक श्री किरण केंद्रे यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. लेखिकेने यापूर्वी देखील बालसाहित्यात मोलाची अशी कामगिरी केलेली आहे. अलेक्सा कादंबरी म्हणजे अनेक लाडक्या बालमित्रांसाठी ही अनोखी भेट आहे. या ई बुकमध्ये एकूण 10 बालकथाचा समावेश करण्यात आले असून  या कथा वैज्ञानिक, स्वछता आणि निसर्ग संवर्धन करण्याविषयी मुलांना नक्की प्रेरित करतील. अलेक्सा या पहिल्याच कथेत अथर्व आणि आजी यांच्या संवादातून संगणकाची पूर्ण माहिती मिळते. मुलांना मोबाईल, टॅब, आयपॅड यांच्यासोबत अलेक्सा हे देखील आवडायला लागते कारण ती विचारलेली माहिती क्षणात समोर ठेवते. संवाद खूपच छान पद्धतीने मांडण्यात लेखिकेला यश मिळाले आहे. शाब्बास या कथेतून मुलांच्या हातून होणारी लहानशी चूक काय अनर्थ घडवू शकतो याची प्रचिती येते. मग संजू कसा सुधारतो हे वाचनीय आहे. माणसातली माणुसकी या कथेत राजुच्या मनातील संवेदना जागी करते. आज समाजात लोप पावत चाललेली माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी ही कथा खूपच उपयोगी पडेल असे वाटते. पूर्वीच्या काळी जो चिवचिव असा चिमण्यांचा आवाज यायचा ते गायब झाले आहे याची सल चिऊताई या कथेतून मिळते. नुसते बागेत जाऊन येणारे मुलं खूप आहेत मात्र चला बागेत जाऊ या कथेतील मुलं मात्र बागेकडून खूप काही शिकतात आणि वृक्ष संवर्धन करण्याची शपथ घेतात. काव्यात्मक पद्धतीने झाडाचे महत्व सुंदररित्या विषद करण्यात आले आहे. गणेशोत्सव सर्व मुलांचा आवडता सण. याच निमित्ताने मातीची गणपती करायची, त्यात काही बिया ठेवायचे, ती मूर्ती घरातल्या कुंडीत विसर्जित करायची, काही दिवसांनी त्यातून रोप उगवेल त्याला वाढवायचं किती भन्नाट कल्पना मांडली खरी पूजा या कथेत. रक्षाबंधनचा सण देखील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाने साजरा केला जातो. आश्रमातील भाषणाच्या स्वरूपात मांडलेली राखी कथा मनाला भावून जाते. सूर्य ऊर्जेचा वापर वाढला पाहिजे, मुले विचारप्रवण झाली पाहिजे, संशोधन केली पाहिजे हे सोलर मुन ही कथा वाचताना वाटते. मुलांना इन्स्टंट फूड खाण्याची खूप आवड असते. जर अन्न घटकांचे गोळ्या करून दिले तर देशातील सारे मुलं आरोग्याच्या व शरीराच्या दृष्टीने मजबूत होऊ शकतील असा आशावाद त्यांनी इन्स्टंट फूड या कथेतून व्यक्त केला आहे. मुलांच्या जेवणाच्या बाबतीत घरोघरी खूप मोठा प्रश्न आहे, त्यावर त्यांनी शोधलेला हा उपाय परिणामकारक वाटून जातो. सहल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर ठरलेलं चित्र येते. मात्र लेखिकेने वाचकांच्या सर्व अंदाज चुकवित एका वृद्धाश्रमात सहल घेऊन जाते आणि तेथील लोकांच्या अनेक समस्या आणि वेदना कळाल्यावर मुलांच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. पुस्तक एकदा हातात घेतलं तर ते पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवावे असे वाटत नाही. ई बुक च्या स्वरूपात असलेले हे पुस्तक लहान मुलांना नक्की आवडेल अशी मला पूर्ण खात्री आहे. लेखिकेला पुढील लेखनास मनःपूर्वक शुभेच्छा ..... आपणास हे ई बुक ई साहित्य प्रतिष्ठानच्या वेबसाईटवरून डाउनलोड करता येईल किंवा लेखिका मीना खोंड यांच्याशी संपर्क करून त्याची ऑनलाईन प्रत घेता येईल.  

- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

पुस्तक परिचय - प्रतिबिंब ( Pratibinb )

समाजातील चित्रांची प्रतिमा म्हणजे प्रतिबिंब
आपण कसे दिसतो ? हे पाहण्यासाठी प्रत्येकजण आपली प्रतिमा आरशात पाहतात. तसं पाण्यात देखील आपली प्रतिमा दिसते. पण खरी जी प्रतिमा तयार होते ती आपल्या वागण्यावर, बोलण्यावर, चालण्यावर आणि आपल्या मनात येत असलेल्या भावनांवर. आपले प्रतिबिंब आपल्या विचारांवर अवलंबून आहे. अशीच एक अनेक विचारांची मालिका डोक्यात घेऊन प्रा. शि. ल. जोगदंड यांचे प्रतिबिंब नावाचे काव्यसंग्रह नागठाणा ता. उमरी येथील नंदादीप प्रकाशनने प्रकाशित केले आहे. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात कविता वाचनाच्या छंदातून पुढे कविता म्हणण्याचा, लोकगीत, भारुडे, ओव्या आणि अभंग पाठांतर करण्याच्या नादातून कवीमनाचा माणूस प्रा. शि. ल. जोगदंड घडत गेले. लहानपणापासून त्यांनी अनुभवलेले सर्व गोष्टीचे प्रतिबिंब या काव्यसंग्रहातील कवितेतून स्पष्ट होतात, म्हणूनच या पुस्तकाला त्यांनी दिलेलं शीर्षक योग्य व अचूक वाटते. प्रसिद्ध ग्रामीण कथाकार ग. पि. मनुरकर सर यांचा त्यांना मिळालेला आशीर्वाद बहुमोलचा आहे. माणूस असं काही घडवून करतो म्हणजे साहित्य घडत नाही. त्यासाठी योग्य वेळ आणि योग्य काळ याचे गणित जुळावे लागते. नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. भगवान अंजनीकर यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन जोगदंड सरांना ही काव्यनिर्मिती करण्याचे सुचत गेले. सुप्रसिद्ध कादंबरीकार देविदास फुलारी सरांची या पुस्तकाला खूप सुंदर अशी प्रस्तावना लाभली आहे. सदरील काव्यसंग्रह सन 2015 मध्ये प्रसिद्ध झाले असून त्यात असलेल्या एकूण 47 कविता आजच्या काळात देखील तंतोतंत लागू पडतात. 
कवी शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख त्यांच्या डोळ्यासमोरून जाता जात नाही. म्हणूनच आपल्या पहिल्याच व्यथा शेतकऱ्याची या कवितेत त्यांनी बँकेकडून मिळणारे कर्ज, सावकाराचा कर्ज काढून केलेली शेती आणि त्यातच अति पावसाने झालेलं नुकसान त्या स्थितीचे सत्य वर्णन मांडले आहे. 

शेतकऱ्यावर गळ्याला फास लावण्याची वेळ आली
पॅकेजसाठी राजकारणी भांडून घेऊ लागली

अंधश्रद्धेमध्ये बळी जाणारे सर्वात जास्त कोण आहेत ? तर स्त्रिया. फार लवकर ते कोणावरही विश्वास ठेवतात आणि फसतात. स्त्री आणि बुवाबाजी या कवितेत ते वाचकांनाच प्रश्न विचारतात की,

बारा राशीवर भविष्य चालतंय का ?
बुवा भविष्याचं अचूक गणित सांगतील का ? 

माणूस मुबलक पाणी असल्यावर त्याचा वापर कसे ही करतो. त्याचे काही नियोजन नसते, असेल तर दिवाळी नाही तर शिमगा. नदी, नाले, ओढे, तलाव या सर्वाचा वापर करताना माणूस काहीच विचार करत नाही हेच त्यांच्या गंगामाई बोलू लागली तर या कवितेतून वाचायला मिळते. ते सुचवतात की

अरे माणसा माणसा कर पाण्याचे नियोजन
त्यातून होईल सर्व सजीवांचे समाधान

देवाने सृष्टी निर्माण करताना सर्व बाबीचा विचार करून मानवी देह तयार केला. विचार करण्याची शक्ती फक्त मानवाला दिली. त्यांचा वापर चांगल्या कामांसाठी करण्याऐवजी तो पशु पेक्षाही खालच्या पातळीवर जाऊन विचार करतोय अशी खंत त्यांनी पाखराची किमया या कवितेत व्यक्त केली आहे. 

तुला दिली रे देवानं जीभ छान
तरी तुझं बोलणं घाण
ते घे सुधारून

घरातला आज खेळत असलेला मुलगा म्हणजे त्या घराचा भावी काळातील आधार असतो. पण पालकांनी त्याच्यावर अपेक्षेचे ओझे टाकून त्याला वाकून टाकू नये. पालकांनी मुलांना समजून वागले तर त्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळू शकते असा आशावाद प्रिय पालकांनो या कवितेतून व्यक्त करताना म्हणतात

मुलांच्या पाठीवर फिरवा मायेचा हात
त्यातूनच देईल तो आयुष्यभर तुम्हाला साथ

मुलगी जन्माला येऊ नये म्हणून सोनोग्राफी नावाचं एक राक्षस तयार करण्यात आलंय. पूर्वीच्या काळी असे काही तंत्रज्ञान नव्हते. म्हणून स्त्री-पुरुष यांचा लिंगदर समान होता. पण या विज्ञानांच्या क्रांतीने माणसाची नैतिकता हरवली आहे अशी मनातली खदखद विज्ञानाचे गुण-दोष या कवितेतील ओळीतून व्यक्त केले आहे. 

डॉक्टर दादा विज्ञानाचा वापर कर जपून
नाही तर ठरेल विज्ञान अमृत कुंभ विषासमान 

बोर्डाच्या परीक्षेच्या निकालावर एक दृष्टिक्षेप टाकले तर लक्षात येते की, मुलींची उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. मुली ह्या मुलांपेक्षा कष्टाळू, अभ्यासू आणि चिकाटी असतात. मुलगा-मुलगी भेद मानू नका, मुलगी जन्माला येऊ द्या, लेक वाचवा लेक शिकवा या कवितेत ते संदेश देतात

मुलगी म्हणून तुच्छ लेखू नका
मुलगा म्हणून उच्च मानू नका
मुलगा-मुलगी आहेत समान
मुलांपेक्षा मुलीची कीर्ती आहे महान

आजचा पुढारी या कवितेतून त्यांनी राजकारणातल्या पुढारी लोकांचा समाचार घ्यायला देखील विसरले नाहीत. त्यांना विविध प्राण्यांची उपमा दिलेली आहे. 

आजचा पुढारी म्हणजे
दुतोंडी मांडूळ होय
दोन्ही पक्षाकडे वावरणारा

प्रेम म्हणजे काय ? याचे उत्तर या कवितेतून त्यांनी दिला आहे. प्रेमाचा नुसता देखावा काही कामाचे नसून प्रेम हे निस्वार्थी, त्यागी आणि निखळ असेल तर आपले जीवन सार्थक होते असे त्यांनी म्हटले आहे. 

प्रेमात असावी रंगाची उधळण, मैत्रीची गुंफण
वडिलांचं धैर्य, आईच्या हृदयाची कोमलता
लक्ष्मणासारखा बंधुप्रेम सुदाम्याची मैत्री

श्रावण महिन्यात बेलाची पाने शंकराला वाहिली जातात. बेलाची झाडं बोलू लागली अशी कल्पना करून छान संदेश दिलेले आहे. 

शिव शिव म्हणता म्हणता
दुसऱ्याचा का जीव घेता

आजचे शिक्षण म्हणजे फक्त नोकरीसाठी आहे. सर्वाना नोकरी देखील मिळत नाही. ज्या लोकांची काही तरी लिंक असते अश्या गुणवंत नसलेल्या लोकांनाच आज नोकरी मिळते अशी खंत व्यथा शिक्षणाची कवितेतून मांडले आहे. 

पदव्या कितीही कमावल्या तरी लागतो तिथे वशिला
असेल वशिला तर नोकरी मिळते म्हशीला

संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे म्हटले आहे. वृक्ष माझा सखा सोबती या कवितेत कवी 
वृक्षासारखा नाही सोबती
वाटसरूना आश्रय देती असे म्हटले आहे. 

देणाऱ्यानं देत जावं या कवितेत कोणाकडून आपणास काय काय घेता येते याचे सुंदर असे वर्णन केले आहे. चंद्राकडून शीतलता घ्यावी, 
मातेकडून वात्सल्य घ्यावं, 
राघवाकडून बोलणं शिकावं 
असे अनेक उदाहरण त्यांनी या कवितेत दिले आहेत. 

एकंदरीत समाजात चालू असलेल्या अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा, शेतकऱ्यांचे होणारे हाल, शिक्षणाची अवस्था, स्त्री भृण हत्या असे एक नाही अनेक विषयावरील कवींच्या मनातील विचार काव्याच्या स्वरूपात ' प्रतिबिंब ' या पुस्तकातून व्यक्त झाले आहे. कवी शि. ल. जोगदंड सरांना पुढील काव्य लेखनास मनस्वी शुभेच्छा. 

पुस्तकाचे नाव :- प्रतिबिंब
कवीचे नाव :- प्रा. शि. ल. जोगदंड
नंदादीप प्रकाशन, नागठाणा

पुस्तक परिचय
- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

पुस्तक परिचय - कोल्हेवाडीचा बाजार ( Kolhewadicha Bazar )

बालमनाला आनंदी करणारा काव्यसंग्रह " कोल्हेवाडीचा बाजार "
लहान मुलांसाठी कथा आणि कविता लिहिणे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. इतरांची बालकविता वाचताना किती सोपी आहे, मी पण लिहू शकतो असे मनाला एकदा वाटून जाते पण लहान मुलांच्या भावविश्वात जाऊन त्यांना समजेल आणि उमजेल अश्या भाषेत कविता लिहिणे सर्वाना जमणार नाही. नांदेड आकाशवाणी केंद्रावरून अनेकवेळा काव्यवाचन देखील केले आहे. नांदेड जिल्ह्यातील  नायगाव बा. येथे जन्मलेले पण सध्या उदगीर येथे वास्तव्यास असलेले कवी शंकर बोईनवाड यांनी खूप छान कविता लिहिल्या आहेत, हे त्यांचे कोल्हेवाडीचा बाजार ही बालकविता संग्रह वाचल्यानंतर लक्षात येते. तसं पाहिलं तर हा त्यांचा दुसरा बालकविता संग्रह आहे. यापूर्वी म्हणजे तब्बल 23 वर्षांपूर्वी म्हणजे सन 1998 मध्ये त्यांचा पहिला वहिला ' चिव चिव चिमणी ' हा बालकविता संग्रह प्रकाशित झाले आहे. कै. भारतभूषण गायकवाड यांच्या सहवासात त्यांनी कथा व कविता लेखनास सुरुवात केली. तसेच कवी प्रा. इंद्रजित भालेराव, प्रा. डॉ. सुरेश सावंत, कवी देविदास फुलारी, प्रा. डॉ. के. हरिबाबू, प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शन, प्रेरणा आणि सहकार्याने या काव्यसंग्रहाची जडणघडण झाली आहे. या काव्यसंग्रहाला प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांचे आशीर्वाद लाभले आहे तर सदरील काव्यसंग्रह कवींनी आपले बालमित्र असलेले उपजिल्हाधिकारी श्री प्रवीणजी फुलारी यांना अर्पण केले आहे.  कॉलेज जीवनापासून शंकर बोईनवाड यांना वाचन आणि लेखनाची अत्यंत आवड आहे. सुरुवातीच्या काळात पत्रकारिता करणारे शंकर बोईनवाड हे सध्या साप्ताहिक शालेय संकल्पचे संपादक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी पत्रकारितेत अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. 
कोल्हेवाडीचा बाजार या बालकाव्यसंग्रहात एकूण 22 कवितांचा समावेश केलेला आहे. लहान मुलांना आवडणाऱ्या प्राणी, पक्षी, निसर्ग, आकाश, चंद्र, पाऊस, वारा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कवीने मुलांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना उपदेश करण्यापेक्षा त्यांच्या ओठावर हसू यावे आणि आनंदाने त्यांनी नाचावे असा प्रयत्न त्यांच्या प्रत्येक कवितेत दिसून येते. 
आपला वाढदिवस साजरा करणे प्रत्येक मुलाला आवडते. हीच बाब लक्षात घेऊन पुनमचा वाढदिवस या कवितेतून मुलांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. माकडाचा दवाखाना ही कविता वाचताना मुलांना नक्की आनंद मिळणार आहे. डॉक्टरांच्या सल्याशिवाय स्वतःवर किंवा इतरांवर कधीही काही ही उपचार करू नये असा मौलिक सल्ला ते मुलांना देतात. गाढवाची फजिती ही कविता वाचतांना मुले हसल्याशिवाय राहणार नाहीत.

डब्यातले खडे खड खड वाजू लागले
गाढव जीव मुठीत घेऊन पळू लागले 
कवितेतील या ओळीमुळे मुले आनंदी होतील. पुस्तकाचे शीर्षक असलेली कोल्हेवाडीचा बाजार कवितेत बाजाराचे यथार्थ वर्णन केले आहे. मुलांना यातून नकळत भाजीपाल्याची माहिती मिळणार आहे. बोबडे बोलणाऱ्या मुलांचे जेवढे कौतुक होते तेवढेच त्याच्या बोबड्या बोलीने अडचणी निर्माण होतात. कवी मराठवाड्यातील आणि विशेष करून नांदेड जिल्ह्यातील असल्याने अडकूल ( पोहा ), ढबू असे शब्दप्रयोग केले आहे. घरात व परिसरात वावरणारे मांजर, उंदीर, कुत्रा, गाढव तसेच रानातील माकड या प्राण्यावरील कविता देखील वाचनीय आहेत. शाळा एके शाळा करणाऱ्या मुलांना सुट्टीचे खूप अप्रूप वाटते. त्यातल्या त्यात सुट्ट्यात मामाच्या गावाला जायचे म्हटलं तर यांचा चेहरा बघण्यासारखा असतो. मामाच्या गावाला या कवितेतून माहिती होते. अचानक शाळेला सुट्टी मिळाली तर मुले आनंदाने उड्या मारतात. काही मुलांना शाळा असूच नये रोज सुट्या असावे असे वाटते या आशयाच्या कविता वाचताना मुलाचे मन अजून आनंदी होते. खादाड बंडू कविता वाचताना मुलांच्या तोंडावर हसू फुटल्याशिवाय राहणार नाही.  सिंहगड, जेजुरी आणि अजिंठा लेणीचा प्रवास सहल या कवितेतून केला आहे.

या काव्यसंग्रहात एकापेक्षा एक सरस, मजेदार आणि विनोदी कविता आहेत. कवितेला अनुसरून दोन ते तीन चित्रे प्रत्येक कवितेला दिले आहेत जे की वाचकांना आकर्षित करतात. श्री जी. बी. मुक्कनवार यांची अक्षरजुळवणी खूपच छान आहे तर श्री दत्तकुमार स्वामी यांनी काढलेले मुखपृष्ठावरील वाघ, सिंह, माकड, कोल्हा, पोपट आणि ससा याचे रंगीत चित्र आकर्षक आहेत. कवीमित्र शंकर बोईनवाड  पुढील लेखनास मनस्वी शुभेच्छा ....!

पुस्तकाचे नाव :- कोल्हेवाडीचा बाजार
कवीचे नाव :- शंकर बोईनवाड
प्रकाशक :- गुरूमाऊली प्रकाशन, उदगीर
पृष्ठे :- 28 किंमत :- 51 ₹

पुस्तक परिचय 
नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

पुस्तक परिचय - कोरोना निवास ( Korona Niwas )

कोरोना काळातील इतिहास सांगणाऱ्या कथांचा संग्रह कोरोना निवास
संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरस या विषाणूने प्रत्येक नागरिकाला हादरवून सोडले. चीन मधील वूहान शहरात डिसेंबर 2019 मध्ये या विषाणूचा शोध लागला म्हणून कोव्हीड - 19 असे त्याचे नामकरण करण्यात आले. प्राण्यांपासून पसरलेला हा रोग माणसाला देखील झपाट्याने संसर्गित करू लागला. माणसाचा माणसाशी साधा संपर्क झाला किंवा सहवासात देखील आल्यास या रोगाचा प्रसार होऊ लागला म्हणून या रोगाची प्रत्येकाला भीती वाटू लागली. ह्या रोगाची लागण आपणाला होऊ नये यासाठी प्रत्येकजण विशिष्ट काळजी घेऊ लागला. लोकांचा एकमेकांशी संपर्क होऊ नये म्हणून जगातील प्रत्येक देशाने संचारबंदी लागू करून कित्येक दिवस, महिने करत वर्षभर लॉकडाऊन केले आहे. यामुळे घराघरांत जे काही रामायण-महाभारत घडले आहे ते अनेकांनी आपल्या कविता, वैचारिक लेख, ललित आणि कथांच्या माध्यमातून साहित्याची निर्मिती केली. कोरोना काळातील घटना इतिहासात नोंद होईल असेच आहे. कोरोना विषयावर अनेकांनी विनोद निर्माण केले. ट्वेन्टी ट्वेंटी हा वर्ष काहीतरी विशेष कार्य करून लक्षात राहण्याजोगे कार्य करू असे अनेकांनी मनसुबे तयार केले होते मात्र कोरोनाने हा वर्ष आपल्या नावाने करून घेतला. वर्तमानपत्र आणि टीव्हीच्या माध्यमातून या काळात घडलेल्या अनेक गोष्टी लोकांना घर बसल्या कळले. याच काळात आबालापासून वृद्धांपर्यंत सर्वाना लॉकडाऊन, संचारबंदी, विलगीकरण, सॅनीटायझर, मास्क यासारख्या शब्दाची ओळख झाली. अनेकांचे रोजचे जीवन जगणे विस्कळीत झाले. मुलांचे शाळा विद्यालय बंद पडले. देवालय कुलूपबंद झाले. लोकांचे बाहेर फिरणे थांबले. या सर्व घटनांचा सूक्ष्म अभ्यास आणि आपल्या अफाट विनोदबुद्धी निरीक्षणातून नागेश सू. शेवाळकर यांनी कोरोना निवास हा विनोदी कथासंग्रह शॉपीजन डॉट इन या ऑनलाईन प्रकाशनाच्या माध्यमातून गेल्या मे महिन्यात वाचकांच्या समोर आणले आहे. लेखक नागेश सू. शेवाळकर हे एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांचे आतापर्यंत सात कादंबरी, दोन धार्मिक, विनोदी व सामाजिक असे वीस कथासंग्रह, शैक्षणिक व राजकीय विषयावर चार चारोळीसंग्रह, विविध क्षेत्रातील चार महनीय व्यक्तीचे चरित्रग्रंथ, दरवर्षी साठ पेक्षा जास्त दिवाळी अंकात लेखन प्रसिद्ध झाली आहेत. ऑनलाईन क्षेत्रात देखील लेखकांची पकड आहे. मातृभारती, स्टोरी मिरर आणि शॉपीजन सारख्या ऑनलाईन साहित्य मंचावर त्यांचे असंख्य वाचक आहेत. स्टोरी मिरर या ऑनलाईन ई संस्थेद्वारे आयोजित 52 आठवडे लेखन आव्हान स्पर्धेत पाच हजार स्पर्धकांमधून त्यांना विजयी घोषित करण्यात आले होते. त्यांची अनेक पुस्तके महाराष्ट्र शासनाने छापून शाळांमध्ये वितरित केले आहे. 
या विनोदी कथासंग्रहात एकूण सोळा कथा असून लहान मुलांसाठी देखील बालविभागामध्ये एकूण सात कथाचा समावेश करण्यात आला आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहताच वाचकांना पुस्तक वाचण्यास भाग पाडते. घड्याळाचे चित्र म्हणजे माणसावर आज कोरोनामुळे कशी वेळ आली आहे हे दर्शविते तर त्याच घड्याळावर एकजण सुई घेऊन पळत आहे याचा अर्थ कोरोनाला संपवायचे असेल तर लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे असा संदेश यातून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पुस्तकात लसीकरण या विषयाच्या भोवताली बहुतेक कथा गुंफलेल्या आहेत. कोरोना प्रतिबंध करण्यासाठी सरकार लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले मात्र त्याबद्दल समाजात ज्या काही अफवा पसरविण्यात आल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने हे सारे खोटे आहे, हे दर्शविण्यासाठी जेष्ठ नागरिक असलेले अप्पा लसीकरण करून घेतात. त्यानंतर जे काही धमाल होते " हरवला चष्मा सापडली सुषमा " या कथेत वाचण्यास मिळेल. कोरोना पॉजिटिव्ह झाल्यानंतर व्यक्तीला चौदा दिवस विलगिकरण राहणे आवश्यक आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने दवाखान्यात बेड, ऑक्सिजन याची कमतरता भासू लागली. म्हणून मध्यमवर्गीय व्यक्ती घरातल्या घरात ती सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न करू लागले. भविष्यात ही समस्या निर्माण झाली तर आपणाला कोणत्या दवाखान्यात जाण्याची गरज भासू नये म्हणून त्या प्रकारच्या घराचा शोध घेऊ लागला. अस्मिता आणि अभ्यंकर हे मध्यमवर्गीय जोडपे देखील तसा एक फ्लॅट पाहतात पण ते फ्लॅट त्यांना मिळते की नाही हे पुस्तकाचे शीर्षक असलेले " कोरोना निवास " ही कथा वाचल्यानंतर कळते. 
कोरोना काळात काही लोकांना खूप त्रास झाला तर काही लोकांनी याच काळात आपली चांदी करून घेतली. विशेष करून दवाखान्यात कशी लूट चालू होती. स्वतःला अनुभव आल्यावर माणूस कसा बदलतो ? हे फास कोरोनाचा या कथेतून लेखकांनी सुंदररित्या मांडले आहे. तर गोरगरिबांना डावलून श्रीमंतांना पहिली सुविधा देऊ नये असा एक संदेश कोरोना आजी या कथेतून मिळतो. सरकारने तयार केलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यात कोणी कसर केल्यास त्यांना शिक्षा देखील मिळाली. कोरोना नियमांचा सर्वात जास्त त्रास जर कोणाला झाला असेल तर ते लग्न कार्य करणाऱ्या लोकांना. वीस-पंचवीस लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्नाचे कार्य करणे खूप जिकरीचे होते. लग्नाला जास्त मंडळी उपस्थित आहेत म्हणून आयोजकांवर गुन्हे देखील दाखल झाले. असेच एक लग्न कार्य " कोरोना गेला " ही कथा वाचतांना वाचकांना तोंडावर हसू आणल्याशिवाय राहत नाही.
कोरोना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे महत्वाचे आहे त्यासाठी लोकप्रतिनिधी किंवा वॉर्ड नगरसेवक यांनी मोफत लसीकरणासाठी काय नियोजन केले आहे " आली का ? आली का ? " या कथेत पाहण्यास मिळेल. जनतेमध्ये लसीकरणाविषयी जे गैरसमज आहे त्याविषयी भन्नाट अशी कथा " धास्ती कोरोनाची " मध्ये वाचता येईल. लेखकांनी लोकांना आलेले अनुभव आणि सोशल मीडियात प्रसिद्ध झालेल्या अनेक घटनांचा वापर कथेत केलेला आहे. त्यामुळे कथा वाचतांना हे आपल्या आसपास घडत आहे असेच वाटते. सहज सोपी संवाद शैली आणि समर्पक शब्दरचना यामुळे कथा वाचतांना कोठेही निरसपणा वाटत नाही.
कोरोना या नावाचा शोध कसा लागला असेल याचा शोध लेखक स्वतः लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. " कोरोना की करीना " ही कथा म्हणजे लेखकांजवळ असलेली तर्कशक्ती दर्शविते. सामान्य माणूस आपले जीवन कसे जगतो ? काय बघितल्यावर किंवा वाचल्यावर आनंद वाटते याची कल्पना या कथेतून मिळते. या कथासंग्रहात एकापेक्षा एक सरस विनोदी कथा वाचण्यास मिळतात.
कोरोनामुळे शाळा व महाविद्यालय बंद झाली. शिक्षकांचे व मुलांचे शाळेत जाणे बंद झाले. मुले कोरोनाची शिकार होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. सर्वच मंडळी घरात कैद झाल्यावर घराघरांत काय घडले याचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न बालकथा विभागात केले आहे. शाळा महाविद्यालय बंद झाले तसे देवालय देखील कुलूपबंद झाली. विनोद आणि त्याची आजी यांच्यातील संवादातून लॉकडाऊनमध्ये घरात काय घडले आहे याची प्रचिती येते. " चिऊताई दार उघड ना ! " या कथेतून कोरोना काळात लोकांनी स्वछता विषयी कशी जागरूक झाली होती ? हे कावळेदादा आणि चिऊताईच्या माध्यमातून सांगितले आहे. कोरोनामुळे मनुष्य स्वछतेचे सारे नियम पाळत आहे हे या कथेतून कळते. अनेक शाळांच्या शिक्षकांनी व्हाट्सअप्पचा वापर करून मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. तो ही एक अनुभव चव्हाण सरांच्या अनुभवातून " माझी शाळा, कोरोना शाळा " यातून दिला आहे. आजोबांचा अष्टचंद्रदर्शन ऑनलाईन वाढदिवस कसा साजरा होतो हे वाचल्याशिवाय कळणार नाही. कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली. यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर एक प्रकारे अन्याय आहे या आशयाची कोरोना उत्तीर्ण या कथेत वाचण्यास मिळेल.  बहुतांश विद्यार्थ्यांना कसे का होईना परीक्षा हवी होती, असा संदेश कथेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे, जे की स्तुत्य वाटते. सर्व कथा ह्या वाचनीय आणि खळखळून हसविणारे आहेत. ऑनलाईन माध्यमातून पुस्तकाच्या रूपाने बाहेर पडलेल्या या पुस्तकाचे वाचक नक्की स्वागत करतील अशी मला खात्री आहे. शॉपीजन डॉट इनच्या मराठी विभाग प्रमुख ऋचा दीपक कर्पे यांच्या अथक परिश्रमातून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून यात एकूण 105 पाने आहेत. पुस्तकाची बांधणी उत्तम आहे. पुस्तकाची किंमत 153 ₹ आहे. शॉपीजनवर ई पुस्तकाचे प्रकाशन नि:शुल्क असून ई पुस्तकाच्या प्रकाशनासाठी लेखकांकडून कुठलेच शुल्क आकारले जात नाही. आता वाचकांसाठी पुस्तकांची हार्डकॉपी देखील उपलब्ध करून देत आहे. शॉपीजन फक्त एक नाव किंवा संस्था नसून लेखकांचे स्वप्न साकार करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. गुगल प्ले स्टोरवर हे अँप विनामूल्य उपलब्ध आहे. 

पुस्तक परिचय - 
नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

पुस्तक परिचय - हसरे तारे ( Hasre Tare )

मुलांना हसवणारा कवितासंग्रह ' हसरे तारे '
उपक्रमशील शिक्षिका व कवयित्री शुभांगी पवार यांची हसरे तारे हा कवितासंग्रह म्हणजे लहान मुलांसाठी एक छानशी मेजवानी आहे. कवयित्री शुभांगी पवार ह्या कंदी पेढा या टोपणनावाने ओळखल्या जातात. सातारा जिल्ह्यातील खंडोबाची बेघरवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ते शिक्षण सेवक म्हणून काम केले आहे. रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून त्यांचे भाषण प्रसारित झाले असून पुणेरी आवाज रेडिओ 107.8 FM केंद्रावरून कविता व चारोळ्या प्रसारित झाल्या आहेत. त्यांना ट्रॅकिंग करण्याचा देखील छंद असून मिशन कळसुबाई 2019 या ट्रॅकिंग मध्ये सहभाग घेऊन ते यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल औरंगाबादच्या ड्रीम अडव्हेंचर्स संस्थेने त्यांचा सन्मान ही केला आहे. बहर, शिवारातील कविता अश्या अनेक प्रातिनिधिक कविता संग्रहात त्यांच्या कविता प्रकाशित झाले असून दिवाळी अंक, मासिके, साप्ताहिके आणि दैनिकांत नियमित कविता प्रसिद्ध होत असतात.
हसरे तारे हा त्यांचा द्वितीय काव्यसंग्रह असून या कवितासंग्रहात एकूण 28 बालकवितांचा समावेश करण्यात आला असून सर्वच कविता बालकांच्या विश्वाशी निगडित असल्याने मुलांना वाचन करताना आनंद मिळणारे आहेत. या काव्यसंग्रहाला मुंबईच्या संजीवनी राजगुरू यांची प्रस्तावना लाभली आहे. कवयित्री स्वतः प्राथमिक शाळेत शिक्षिका असल्याने चिमुकल्या मुलांशी दररोज संबंध येतो, त्याच अनुभवाच्या बळावर त्यांनी सुंदर काव्यरचना केल्या आहेत. सोशल मीडियातील व्हाट्सअप्पमुळे अनेक नवोदित मंडळी कविता करत आहेत ही खरोखरच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. स्वतः कवयित्री ह्या श्री देवराव चव्हाण व सौ. रंजना लसणे यांच्या बालजगत व्हाट्सअप्प समूहात सक्रिय सहभागी होऊन ज्या बालकविता लिहिल्या त्याचेच एक कवितासंग्रह हसरे तारे प्रकाशित केले आहे. हे वाचून पहिल्यांदा आनंद झाला. सोशल मीडियाचा चांगला वापर केल्याबद्दल समूह संयोजक आणि कवयित्री यांचे अभिनंदन करावेसे वाटते.
कविता करणे तसे सोपे वाटते पण प्रत्यक्षात कविता करताना शब्दच सुचत नसेल तर मनासारखी कविता तयार होत नाही. त्यातल्या त्यात बालकविता करणे त्याहून ही कठीण गोष्ट आहे. मात्र शुभांगी पवार यांच्या कविता वाचतांना सोपी वाटायला लागते. प्रत्येक घरात एक खोडकर बाळ असतोच त्याचे वर्णन खोडकर खंडू या कवितेत वाचण्यास मिळते. शाळेला सुट्टी असल्यावर मुले कोणकोणती मज्जा करतात हे सुट्टीतील मौज या कवितेतून समर्पक शब्द वापरून व्यक्त केले आहे.

सुट्टीतील मौज करायला
तयार झाले छोटे
भातुकलीचा डाव मांडला
केले जेवण खोटे
या ओळी वाचून बालपण आठवल्याशिवाय राहत नाही. निसर्गात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर कवयित्रीने आपल्या मनातील बालभावना कवितेच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. प्रत्येकाने आईला घरकामात मदत करावे असा चांगला संदेश कामातला आनंद या कवितेतून दिला आहे. लहान मुलांना बाहुलीसंगे खेळायला खूप आवडते. बाहुली या कवितेतून सारे चित्र त्यांनी स्पष्ट केले आहे. बैलाचा सण पोळा विषयीची कविता खूप सुंदर वाटली.

सुंदर - चंदर भारी दोघे
पाहायला त्यांना गाव उभे
हिवाळा आला की कानटोपीची आठवण येते आणि आजी आपल्या नातवासाठी कानटोप तयार करते. याचा छानसा अनुभव कानटोपी कवितेतून मिळतो. पुस्तकाचे शीर्षक असलेली हसरे तारे या कवितेत कवयित्रीने मुलांची तुलना आकाशात चमकणाऱ्या ताऱ्याशी आणि देवासाठी राखून ठेवलेल्या सुंदर फुलांशी केले आहे. दीपावली निमित्ताने घराघरात अनेक पदार्थ तयार केले जातात. त्यात आवडीचा पदार्थ म्हणजे चकली, याविषयी कवयित्रीने खूप छान रचना केली आहे. ती वाचतांना तोंडात पाणी आल्याशिवाय राहत नाही. साऊ माझ्या कवितेत सावित्रीबाई फुले यांची आठवण काढतात. पाऊस आला ही कविता लयबद्ध आहे, त्यास तालीत वाचन केल्यास खूप मजा येईल. अननस दिसायला कसा असतो ? याची माहिती अननस रस या काव्यातून मिळते. लहान मुलांचा आवडता देव म्हणजे गणपती बाप्पा. बालगणेश या कवितेत बाप्पा गणेशला लवकर येण्याची विनंती करत आहे. लहान मुलांना दुकानातील कुरकुरे खूप आवडतात. नको मला कुरकुरे या कवितेत मुलांनी कुरकुरे व वेफर्स खाऊ नये असा छान संदेश दिलेला आहे. माझी आनंददायी शाळा ही कविता म्हणजे कवयित्रीची शाळाच जणू या कवितेतून स्पष्ट होते.
धीटूकला ससा, जादुई पेन, गमतीदार गणित असे सुंदर काव्य यात समाविष्ट आहेत. एकूणच सर्वच कविता लयबद्ध आणि वाचनीय आहेत. वाशीमच्या अजिंक्य प्रकाशनने ही पुस्तिका प्रकाशित केली असून यात एकूण 60 पृष्ठ आहेत आणि याची किमंत फक्त 75 ₹ आहे. अरविंद मनवर यांनी सुंदर मुखपृष्ठ तयार केले असून अक्षर जुळवणी देखील उत्तम आहे. काही काही ठिकाणी अनुस्वार द्यायचे राहून गेले आहेत त्यामुळे शब्दांचे वाचन वेगळे होते. पुढील प्रकाशनात ह्या चूका टाळण्याकडे लक्ष द्यावे. शुंभागी विलास पवार उर्फ कंदी पेढा यांना त्यांच्या पुढील साहित्य लेखनास मनस्वी शुभेच्छा ...!

पुस्तक परिचय
नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

पुस्तक परिचय - मातृवेद ( Matruved )

आईची महती सांगणारा मातृवेद कथासंग्रह
लेखिका सविता वाळींबे-शेट्टी लिखित मातृवेद हे दुसरे पुस्तक ई साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केले आहे. यापूर्वी 2017 मध्ये याच ई साहित्य प्रतिष्ठानने त्यांचा जननी हा कथासंग्रह प्रकाशित केला असून ऑनलाईन वर अनेक वाचकांनी यास पसंती दर्शविलेली आहे. लेखिका ह्या मूळच्या मुंबई येथील रहिवाशी असून त्यांना लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यांना पुल देशपांडे, व. पू. काळे, विजया वाड, विजया राजाध्यक्ष, जयवंत दळवी, विजय तेंडूलकर, इंद्रायणी सावकार यांच्या लेखणीत खास रुची आहे. मनातल्या मनात गोष्टी गुंफत राहणे ही लेखिकेची खासियत कथा लिहिण्यास नेहमी प्रेरित करत असते. गेल्या पंचवीस वर्षांपासून ते नियमित लेखन करत आहेत. त्यांच्या कथा विविध मासिकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. मातृत्व या विषयावर ते सभोवती सूक्ष्म नजरेतून पाहतात आणि तेथेच त्यांना कथेचे बीज सापडत राहते. आई या दोन अक्षरी शब्दांत काय ताकद आहे ? हे यांच्या कथा वाचतांना वारंवार लक्षात येत राहते. आपल्या गर्भात नऊ महिने नऊ दिवस बाळाचे संगोपन करणारी आई आणि तिचे मन या विषयी प्रत्येक कथेत एक ओलावा दिसून येतो. आई म्हणजे काय असते ? हे आई झाल्याशिवाय कळणार नाही ही गोष्ट देखील नकळतपणे जाणवते. हिंदू संस्कृतीत चार वेद सांगितले आहेत, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. पण लेखिकेने पाचवा अत्यंत महत्वाचा वेद सांगितला आहे, तो म्हणजे मातृवेद. खरोखरच संतांनी म्हटले आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. राजमाता जिजाऊ नसत्या तर महाराष्ट्राला राजे छत्रपती शिवाजी महाराजासारखा लढवय्या शूर वीर मिळाला नसता. यशोदा राहिली नसती तर हळव्या मनाचे श्याम म्हणजे साने गुरुजी आपणाला लाभले नसते, आशियाम्मा नसती तर भारताची जगात ज्यांनी क्षेपणास्त्रात विशेष ओळख करून दिली असे मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सारखे शास्त्रज्ञ मिळाले नसते. हे सारं त्या आईच्या प्रेमामुळे, संस्कारामुळे शक्य झाले हे विसरून चालणार नाही. 
लेखिका सविता वाळींबे-शेट्टी यांचे मातृवेद हा कथासंग्रह खूपच छान आहे. यात चार कथा लिहिल्या आहेत आणि चार ही कथेत आईच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपल्या पहिल्याच व्यर्थ या कथेत एका गुन्हेगार असलेल्या आपल्या मुलाच्या प्रति आईचे असलेले प्रेम सांगणारी कथा आहे. मुलगा चांगला असो वा वाईट, सुंदर असो कुरूप ते आपल्या आईसाठी चांगलेच वाटते. त्याच वेळी गुंड मुलाचा पाठलाग करताना पोलिसांच्या घरातील वातावरण वाचकांचे मन हेलावून टाकते. तुझ्यासाठी या दुसऱ्या कथेत दत्तक घेतलेली मुलगी आपल्या घराला कशी सावरते. त्याच वेळी दत्तक घेणारे आई-वडील खरेखुरे आई-बाबा बनणार असतात त्यावेळी त्यांच्या मनात विशेष करून आईच्या मनात काय चाललंय हे खूप छान मांडले आहे. शेवटी ती दत्तकपुत्र मुलगी आपल्या घरासाठी काय काय महत्वाचे काम करते ते कथा वाचल्यावरच कळेल.
 कशासाठी एवढा आटापिटा ? या तिसऱ्या कथेत लेखिकेने घटस्फोट झालेल्या कुटुंबात मुलाची आणि आईची घालमेल खूप सुंदररित्या गुंफले आहे. त्याचवेळी आजी असलेली मुलाची आई, शेवटी ती देखील एक आईच आहे, म्हणून ती लेकराची व आईची गाठभेट व्हावी म्हणून काय काय करते ? हे सर्व वाचनीय आहे. वंश परंपरागत ठेवा ह्या शेवटच्या कथेत लेखिकेने स्त्री मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. घरात स्त्रीवर होणारे अत्याचार ती कशी गुमान सोसते हे या कथेतून स्पष्ट केले आहे. स्वतः स्वातंत्र्य सैनिकांची शूर मुलगी असून देखील नवऱ्याच्या अत्याचाराला विरोध करत नाही हे तिच्या मुलीला आश्चर्य वाटते पण शेवटी तीच आई त्या मुलीला बंड करण्यासाठी ताकद ही देते. 
पुस्तक वाचतांना वाचतच राहावे असे वाटते. प्रत्येक आई आपल्या लेकरासाठी काय काय करते किंवा डोक्यावर कोणते संकट घेते प्रसंगी आपल्याच नवऱ्यावर गोळ्या झाडते, खरंच खूप छान पुस्तक आहे. लेखिका स्वतः एक आई असल्याने त्यांनी आईची भूमिका सक्षमपणे मांडले आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक ई साहित्य प्रतिष्ठानने फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण जगातील मराठी वाचकांसाठी ऑनलाईनवर अगदी मोफत उपलब्ध करून दिले आहे. तेव्हा कथा वाचकांनी या कथासंग्रह वाचनाचा जरूर आनंद घ्यावा. लेखिका सविता वाळींबे-शेट्टी यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा .....!

पुस्तक परिचय - 
- नासा येवतीकर, स्तंभलेखक तथा विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769

पुस्तक परिचय - लाल दिनांक ( Lal Dinank )

मुलांचा आवडता लाल दिनांक कथासंग्रह
राज्यशासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त हिंगोली जिल्ह्यातील एक आदर्श शिक्षक व्यक्तिमत्त्व म्हणजे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागेश सु. शेवाळकर. शालेय जीवनासोबत आपले संपूर्ण जीवन त्यांनी साहित्य निर्मिती करण्यासाठी व्यतीत केले आहे म्हणूनच त्यांच्या हातून एकापेक्षा एक सरस अश्या पुस्तकांची निर्मिती झाली आहे. आजपर्यंत त्यांची 30 हुन अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून बारा कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. गेल्या दोन तीन वर्षांपासून दरवर्षी पन्नासहुन अधिक दिवाळी अंकात त्यांचे साहित्य प्रकाशित होते. म्हणूनच डॉ. सुनील पाटील आयोजित आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक लेखक पुरस्कार या संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दहा सर्वोत्कृष्ट लेखकामध्ये नागेश सु. शेवाळकर यांना प्रथम क्रमांकाचे पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यांच्या श्यामच्या छान छान गोष्टी या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आणि प्रत्येक शाळेत पोहोचविले आहे. साठी बुद्धी नाठी असे म्हणतात परंतु लेखकांनी साठी पार केल्यानंतर ही त्यांची लिहिण्याची उर्मी आणि धमक अजूनही कायम आहे. आपल्या जीवनात आलेल्या अनेक सुखदुःखाचे प्रसंग, चढ-उतार या सर्व अनुभवाच्या बळावर ते आपले साहित्य लेखन करतात म्हणून तर वाचकांच्या गळी सहज उतरते. अवघड आणि क्लिष्ट वाटणारे शब्द शक्यतो टाळून सहज सोपी भाषा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच आबालापासून वृद्धांपर्यंत सर्वांना त्यांचे साहित्य मनापासून आवडतात. किशोरवयीन मुलांची वाचनाची भूक भागवावी या उद्देशाने पुण्यातील सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशनने ख्रिसमसच्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबर रोजी नागेश शेवाळकर लिखित " लाल दिनांक " नावाचे बालकथासंग्रह प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक असून घरोघरी भिंतीवर टांगलेले जे कॅलेंडर असते तेच कॅलेंडर घेण्यात आले आणि त्यातील लाला दिनांक म्हणजे सुट्टीचा वार रविवार तसेच इतर सुट्या देखील लाल रंगाने दर्शविले जातात. ते ठळकपणे लक्षात येते. शाळेत जाणाऱ्या मुलांना कॅलेंडरवरील लाल दिनांक खूप आवडतात कारण त्यादिवशी शाळेला सुट्टी असते. तसे तर लाल रंग म्हणजे धोक्याची खूण आहे मात्र कॅलेंडरवरील लाल रंग मुलांना खूप आनंद देतो. महिन्याचा कागद उलटला की, पहिले लक्ष या महिन्यात किती लाल दिनांक आहेत यावरच जाते. याच मुलांच्या भावनेला हेरून लेखकांनी लाल दिनांक पुस्तकाचे शीर्षक असणारी कथा खूप छान पद्धतीने लिहिली आहे. युवराज सारखे शाळेत जाणारे अनेक मुलं याच पद्धतीने वागतात. कॅलेंडर जरी आपण छापत असू तरी त्यातील सुट्याचे लाल दिनांक छापण्याचे अधिकार आपणांस नसतात याची जाणीव या कथेतून करण्यात लेखक यशस्वी ठरतात. या बालकथासंग्रहात एकूण पंधरा कथा आहेत. सर्वच कथा मुलांना त्यांच्या भावविश्वात नेऊन नकळत काही ना काही शिकवण देऊन जातात. पहिली कथा वाचायला घेतली की सर्व कथा वाचन करेपर्यंत वाचक पुस्तक सोडत नाही असे कथानक या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. वाचकांची अचूक नाडी ओळखण्यात लेखक वाकबगार आहेत म्हणून आई, बाबा, आजी, आजोबा, शाळा, घर, खेळ, वाढदिवस या सर्व बाबी आणि जीवनात घडणाऱ्या अनेक बारीकसारीक गोष्टीचे निरीक्षण करून त्याच बाबीवर प्रकाश टाकणाऱ्या कथा या संग्रहात लिहिल्या आहेत. 
अमराठी शाळेत मुलांना फक्त बौद्धिक ज्ञान दिल्या जाते पण शरीराने ते फार कमकुवत राहतात कारण त्या शाळेला एक तर मैदान उपलब्ध नसते किंवा त्यांच्याकडे असे देशी खेळांची माहिती नसते. ज्यामुळे या शाळेतील विद्यार्थी खेळाच्या बाबतीत कमनशिबी ठरतात हे प्रत्येक पालकांचे अनुभव आहेत. याच बाबी लक्षात घेऊन आमच्या मिस ..... आजी ही कथा समीर आणि त्याच्या आजीभोवती फिरत असते. जुन्या काळी खेळले जाणारे अनेक खेळ आता लुप्त होत आहेत, त्या सर्व खेळांना उजागर करण्याची आणि मुलांना ते खेळ खेळविण्याची खरी गरज आहे. शालेय जीवनात मुले मैदानावर उड्या नाही मारले तर काय नोकरी लागल्यावर कार्यालयात उड्या मारणार का ? खेळाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. जी मुले लहान असताना खूप खेळतात, उड्या मारतात त्यांना भावी आयुष्यात आरोग्याच्या बाबतीत कमी तक्रारी जाणवतात. शरीर चांगले असेल तर आपल्या सर्व बाबी चांगले घडतात. शरीर निरोगी तर मुलांचा अभ्यास उत्तम असू शकतो हीच शिकवण या कथेतून लेखकांनी अगदी भक्कमपणे मांडली आहे. 
आजीची माया वेगळीच असते. माधवला आजीला त्रास द्यायला आवडते. त्याच्या मनात नेहमी आजीला त्रास देण्याच्या कल्पना रेंगाळत असतात. त्याला त्यात आनंद मिळतो. आजीला त्रास देणे हे चूक आहे याची जाणीव माधवला करून देणे आवश्यक आहे. म्हणून आजीने लढविलेली शक्कल कामी येते आणि माधव आजीला त्रास न देण्याचा वचन देतो. काही गोष्टी मुलांना अनुभवातून शिकवावे लागते. तोंडी कितीवेळा सांगितले तरी नळी फुंकिले सोनारे, इकडून तिकडे वाहे वारे या म्हणीप्रमाणे ते वागत असतात. त्यांच्यात काही बदल किंवा परिवर्तन घडवायचे असेल तर तसा एखादं प्रसंग किंवा अनुभव त्याच्यासोबत घडवावे लागते. आई-बाबा यांच्या प्रेमासोबत मुलांना आजी-आजोबांचे प्रेम देखील मिळायला हवे, जे की आजकाल हम दो हमारे दो या प्लॅट संस्कृतीच्या विचारामध्ये मुलांना ते मिळत नाही, ते मिळाले तर काय होऊ शकते ? ही बाब त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये प्रकर्षाने दिसून येते. 
लहान मुलांना सर्वात मोठे आकर्षण असते ते म्हणजे त्यांच्या वाढदिवसाचा. वर्षातून एकदा येणारा त्यांचा वाढदिवस त्यांच्या जीवनात आनंद देऊन जातो. वाढदिवसाचा केक, त्यानिमित्ताने जमा होणारी मित्रमंडळी, मित्रांकडून मिळणारे गिप्ट आणि आई-बाबाकडून मिळणारे सरप्राईझ गिप्ट ह्या साऱ्या गोष्टीची उत्सुकता एका वाढदिवसाच्या निमित्ताने असते. पण तोच वाढदिवस एका वर्षाच्या ऐवजी चार वर्षांनी येत असेल तर तेव्हा त्या मुलाच्या मनाची घालमेल काय होते ? वाढदिवस सचिनचा या कथेतून लेखकांनी अनेक गोष्टी साध्य केले आहेत. एक तर मुलांना कथेतून लीप वर्ष म्हणजे काय याची ओळख होते. 29 फेब्रुवारी हा दिवस प्रत्येक वर्षी नसतो तर फक्त चार वर्षांनी एकदा येतो आणि त्यामुळे वर्षाच्या दिवसात एका दिवसाने वाढ होते. ही सारी माहिती मुलांना  नकळत कळून जाते. त्याचसोबत त्याच तारखेला वाढदिवस साजरा करावा असे काही नाही जर रविवारी आपला वाढदिवस असेल तर शाळेत तोच वाढदिवस आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो तसा 29 फेब्रुवारीला असलेला सचिनचा वाढदिवस 28 तारखेला साजरा करण्याविषयीची कल्पना खूप छान रंगविण्यात आली. हुशार आई-वडील, आजी-आजोबा आणि कल्पक शिक्षक असतील तर कोणताच मुलगा आणि विद्यार्थी उदास राहणार नाही याची जाणीव सचिनचा वाढदिवस आणि एक वाढदिवस असाही ... या दोन्ही कथेतून प्रकर्षाने जाणवते. 
साने गुरुजी लिखित श्यामची आई हे पुस्तक न वाचणारा वाचक तसा विरळच. श्यामची आई या पुस्तकाने अनेकांवर संस्कार केले तसे लेखकांवर देखील केले आहे. त्यांच्या लेखनात सानेगुरुजीची छटा दिसून येते. श्यामची आई श्यामला पत्रावळ शिवल्याशिवाय जेवायला देत नाही ही गोष्ट कथेतला श्याम त्याला मिळालेल्या बक्षीसरुपी पुस्तकातून वाचतो. तशीच पत्रावळ पाहिजे म्हणून हट्ट करतो मात्र त्याला पानांची पत्रावळ काही मिळत नाही. पण जेव्हा त्याला समजते की झाडाची सजीव पाने तोडून पत्रावळ करावी लागते त्यावेळी तो तशी पत्रावळ करण्याचा हट्ट सोडतो. यातून लेखकांनी पर्यावरणावरील मुलांचे प्रेम दर्शविले आहे. त्याचसोबत कामात सातत्यपणा ठेवल्यास त्याचे चांगलेच परिणाम पाहायला मिळते. समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटले आहे दिसमाजी काही तरी लिहावे तसे श्यामची आई  श्यामकडून रोज पंधरा ओळी लिहून घेत असत. ज्यामुळे त्याचे अक्षर सुंदर आणि वळणदार झाले होते. त्यामुळे या बक्षिसाचे सारे श्रेय तो आपल्या आईला देतो. प्रत्येक आईला मार्गदर्शन ठरणारी ही कथा आहे. 
लहान मुले अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवतात फक्त त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. सेवानिवृत्त जोशी काका आपल्या प्लॅट मधील मुलांना नेहमी प्रोत्साहित करतात ज्यामुळे पैकीच्या पैकी गुण न घेणारी मुले कठीण परीक्षेत पैकीच्या पैकी गुण घेतात आणि शाबासकी मिळवतात. मुले एकमेकांचे बघत बघत शिकत असतात. संस्कार ही कोणत्या दुकानात विकत घेण्यासारखी वस्तू नाही तर ती कुटुंबातून, परिवारातून आणि समाजातून नकळत प्राप्त होते. तसेच लहानपणी मिळालेले संस्कार चिरकाल टिकून राहतात. म्हणून लहान मुलांवर खास लक्ष देऊन संस्कार टाकावे असा संदेश ते प्रोत्साहन या कथेतून देतात. लेखकांची विनोदबुद्धी ' आठवण एका करामतीची ' या कथेत दिसून येते. दुकानातील गोळ्या आणि दवाखान्यातील औषधाच्या गोळ्या वेगळ्या असतात याची जाणीव मुलांना या कथेच्या माध्यमातून करून देतात. लहानपणी मुलांच्या मनावर ज्या गोष्टी बिंबतात ते मरेपर्यंत त्यांच्या सोबत राहतात. लहान मुलांना आवडणारी कथेतील परी, प्रत्यक्षात कधीच दिसत नाही. पण मुलांना कथेतील विश्व प्रत्यक्षात पाहण्याची इच्छा होते, वाड वडिलांच्या प्रत्येक शब्दांवर, बोलण्यावर त्याचा गाढ विश्वास असतो. म्हणून मुलांच्या कुतूहल निर्माण करणाऱ्या प्रश्नांना अचूक उत्तर देणे आवश्यक आहे. त्याच्या प्रश्नाला चुकीचे उत्तर देऊन त्यांना एकप्रकारे आपण कमकुवत करत असतो. म्हणून मुलांना प्रत्येक घटनेमागील खरे कारण सांगून त्यांना सजग करणे प्रत्येक पालकांचे कर्तव्य असल्याची जाणीव परीकथा मधून करून देतात. आपल्या मुलांवर आई-बाबा हेच चांगले संस्कार टाकू शकतात याची प्रचिती विश्वास जिंकला या कथेत प्रकर्षाने जाणवते. कुणाची परवानगी घेतल्याशिवाय दुसऱ्याच्या वस्तूला हात लावायचे नाही ही शिकवण आपल्या मुलांमध्ये आणण्यासाठी प्रत्येक पालकांनी जागरूकपणे वागले पाहिजे. वाचताना सुंदर वाटणारी ही कथा मुलांवर खूप चांगला परिणाम करून जाते. जीवनात आई-वडील यांच्याशिवाय दुसरा कोणी श्रेष्ठ नाही म्हणून त्यांची सेवा करणे हे प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे. मातृदेवो भव आणि पितृ देवो भव याची महती सांगणारी कथा म्हणजे श्रावणबाळ. पुरस्कार माणसाला प्रेरणा देतात आणि प्रेरणेमुळे अनेक गोष्टी घडतात. लहान मुलांना बक्षीस देतो म्हटलं की अनेक काम ते पटापट करतात. बक्षिसाची किमया या कथेत अमितला त्याची आवडती बॅट बक्षीस म्हणून भेटल्यानंतर शाळेत मारून मुटकून येणारा अमित नियमितपणामध्ये प्रथम क्रमांकाची उपस्थिती राखतो. हे सर्व शक्य झाले ते बक्षीसामुळे. म्हणून नेहमी मुलांना शिव्याशाप, मारझोड करण्यापेक्षा कधी कधी मुलांना बक्षीस देत जावे त्याचे अनुकूल परिणाम पाहायला मिळतात. शाळेच्या ओळखपत्राचा वापर आपण कसा करावा याची ओळख देणारी कथा म्हणजे ओळखपत्र. जसे मोठी माणसं आपापले कार्ड जवळ बाळगतात तसे शाळेत शिकणाऱ्या मुलांनी शाळेचे ओळखपत्र जवळ बाळगावे आणि त्याचा वापर देखील करावा. असा चांगला संदेश ओळखपत्र या कथेतून ते देतात. लहान मुलांचा सर्वात आवडता देव म्हणजे गणपती बाप्पा. याच बाप्पाने लहान मुलांना लिहिलेले पत्र म्हणजे मुलांना दाखविलेली एक योग्य दिशाच आहे. पत्राच्या माध्यमातून लेखकांनी मुलांची कान उघाडणी करून त्यांना पुढे कसे वागायचे आहे याची माहिती दिली आहे. शेवटची कथा म्हणजे नातू माझा  भला या कथेतून संकटकाळात मुलांनीगोंधळून न जाता प्रसंगावधान ठेवून काय केले पाहिजे याची माहिती मुलांना मिळते. पाच मिनिटे उशीर झाला असता तर काय झाले असते मी सांगू शकलो नसतो हे डॉक्टरांचे बोलणे ओंकार किती महत्वाचे काम केला याची प्रचिती देऊन जातो. 
आपल्या घरातील किशोरवयीन मुलांनी हे पुस्तक नक्की वाचायलाच पाहिजे अशी आहे. प्रत्येक गोष्ट मुलांच्या मनाला नक्की स्पर्श करतो, हे पुस्तक वाचल्याशिवाय कळणार नाही. या पुस्तकातून पालकांना देखील अनेक गोष्टी शिकायला मिळतात. म्हणून पहिल्यांदा प्रत्येक आई-बाबांनी हे पुस्तक वाचावे आणि आपल्या मुलांना वाचण्यासाठी द्यावे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी इतर कोणती भेटवस्तू देण्यापेक्षा असे संस्कारक्षम पुस्तक भेट देणे योग्य राहील, असे वाटते. जेष्ठ साहित्यिक नागेश सु. शेवाळकर यांच्या हातून भविष्यात अजून उत्तमोत्तम साहित्य निर्माण होऊन आम्हा वाचकांना अजून साहित्य वाचण्यास मिळो हीच मनस्वी सदिच्छा ...!

पुस्तकाचे नाव :- लाल दिनांक
लेखकाचे नाव :- नागेश सु. शेवाळकर
प्रकाशन :- सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन, पुणे
एकूण पृष्ठ :- 120
किंमत :- 150 रु. 

पुस्तक परिचय
- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक तथा विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...