Saturday, 19 June 2021

muncipal school

नगरपालिका हद्दीतील सरकारी शाळा

सरकारी शाळा म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा होय. ग्रामीण भागातल्या शाळांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायतची थोडीफार मदत मिळू शकते त्यामुळे त्या शाळेचा भौतिक विकास होऊ शकतो. मर्यादित लोकसंख्या आणि मर्यादित क्षेत्र यामुळे ग्रामीण भागातील सरकारी शाळांना सध्या अच्छे दिन दिसत आहेत. बघायला गेलं तर येथे ही अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यानंतर मनपाच्या शाळा म्हणजे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा यांना सुद्धा मनपाचे सहकार्य मिळते. स्वतंत्र शिक्षण विभाग असतो आणि प्रत्येक कार्य स्वतंत्रपणे चालत असल्याने सर्वत्र लक्ष देणे शक्य आहे. मात्र नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या सरकारी शाळा यांची स्थिती कोणी ही लक्षात घेत नाही त्यामुळे येथील शाळांची अवस्था धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी झालेली पाहायला मिळते. नगरपालिका हद्दीतील सरकारी जिल्हा परिषद शाळांना फक्त शासनाची म्हणजे सर्व शिक्षा अभियानाचेच अनुदान मिळते. ज्याप्रकारे ग्रामीण भागात 14 वा किंवा 15 वा वित्त आयोगातून शिक्षणावर 20 टक्के रक्कम खर्च करणे बंधनकारक करण्यात आले आहे तसे नगरपालिकामध्ये शाळांसाठी कोणतीच तरतूद का करण्यात आली नसेल ? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. नगरपालिका ह्या शाळेला आर्थिक मदत तर सोडाच त्यांचे इमारत भाडे भरले नाही म्हणून त्यांचे अधिकारी येऊन सिल ठोकतात. यावर चिंतन होणे आवश्यक आहे. 
नगरपालिकेच्या हद्दीतील शाळा म्हणजे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. ह्या शाळा नगरपलिका हद्दीत असल्याने जिल्हा परिषदेचा कोणताच निधी मिळत नाही. ग्रामीण भागात जसे खासदार निधी, आमदार निधीमधून शाळेला सहकार्य मिळते तसे सहकार्य येथील शाळांना दिल्या जात नाही त्यामुळे ह्या शाळा कित्येक वर्षांपासून उपेक्षित आहेत. नगरपालिका क्षेत्र म्हटल्यावर सरकारी शाळेसोबत इतर ही अनेक अनुदानित, विना अनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यच्या शाळा येथे अस्तित्वात असतात. त्यांच्या मानाने सरकारी शाळा कोणत्याच पालकांना आकर्षित करू शकत नाही, त्यामुळे अर्थातच तेथील पटसंख्या रोडावली जाते. पूर्वीच्या काळी सरकारी शाळेशिवाय पर्याय नव्हता तेंव्हा याच सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना बसायला जागा मिळत नव्हती आणि आज यांना विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. कारण खाजगी आणि इंग्रजी शाळेचे प्रमाण एवढं वाढलं आहे की, सरकारी शाळेकडे आता मजुरीवर काम करणारे पालक देखील ढुंकून पाहत नाहीत. येथील सरकारी शाळेत कोणता विद्यार्थी प्रवेश घेतो तर जो पालक आपल्या पाल्याना साधी वही पेन घेऊन देऊ शकत नाहीत असे दारिद्र्याच्या खाईत असलेली गरीब मुलेच प्रवेश घेतात. त्यांची शाळा शिकण्याची मानसिकता नसल्यात जमा असते. आई-वडील मजुरीला निघून गेले की आपला पाल्य शाळेत गेला किंवा नाही याची साधी चौकशी देखील करत नाही. शिकला तर शिकला नाही तर नाही या मानसिक अवस्थेत असणारी पालकांसाठी ह्या शाळा एक आधार केंद्र असते.  मुलांच्या दुपारच्या जेवण्याची सोय आणि दिवसभर सांभाळ करणारे केंद्र. हाताच्या बोटावर मोजता येतील असे पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देतात. त्याच सोबत शासनाच्या काही धोरणाचा फटका देखील या शाळांना बसतो. प्रत्येक शिक्षकांना शहरात नोकरी करावी वाटते विशेष करून महिलांना. तीन वर्षांपूर्वी झालेल्या ऑनलाईन बदलीने या शहरातील शाळेचा पूर्ण वाटोळं करून टाकलं आहे. पालकांचे असे मत झाले आहे की, आता या शाळेत सेवानिवृत्तीला जवळ आलेले, बिमार असलेले, अश्या शिक्षकांना संधी देऊन शहरातल्या शाळेत भरती केल्यावर ते स्वतःला पाहतील की आमच्या मुलांना. तरुण वयोगटातील शिक्षक ज्या उत्साहाने शिकवितात त्या उत्साहात हे शिकवतील का ? असा प्रश्न अनेक पालकांनी व्यक्त केला तेंव्हा हे ही योग्य आहे असे वाटते. अजून एक निर्णय चुकीचा वाटतो. सरकारी शाळा वाचवायचे असतील तर सरकारी योजना ह्या सरकारी शाळा सोडून अन्य कोणत्याच शाळांना देण्यात येऊ नये. मोफत पाठ्यपुस्तक योजना किंवा शालेय पोषण आहार योजना फक्त सरकारी शाळेतुनच दिल्या गेलं तर येथील शिक्षकांना म्हणता येईल की, आपल्या मुलांना फुकट पुस्तकं देऊ, दुपारचं जेवण देऊ, मोफत गणवेश देऊ आणि प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकेल. पण मोफत गणवेश वगळता पाठ्यपुस्तक आणि दुपारचे जेवण अनुदानित शाळेत देखील दिल्या जाते म्हणून काही पालक जे की या कारणांसाठी सरकारी शाळेत कदाचित येण्याची शक्यता राहिली असती ते ही धूसर झाली. शहरातल्या खाजगी शाळेत सर्व सोयी सुविधा पूर्ण असतात आणि त्याच शहरातल्या सरकारी शाळेत वर्गखोल्या झाडायला साधा चपराशी नसतो. याची देखभाल करण्यासाठी चौकीदार नसतो त्यामुळे या सार्वजनिक मालमत्तेचे रोजच्या रोज अतोनात नुकसान होत राहते. शासनाच्या सर्वच योजना राबविणे अत्यंत कष्टप्रद होऊन बसते. शालेय व्यवस्थापन समिती ही प्रत्येक शाळेला असते त्यात एक नगरपालिकेचा प्रतिनिधी देखील असतो पण नावापुरताच. त्यांच्या स्थायी समितीत शिक्षण नावाचा विषयच राहत नाही तर ते काय तरतूद करतील. पण खरोखरच नगरपलिका हद्दीतील सरकारी शाळांचा विकास व्हावा असे वाटत असेल तर येथील नगराध्यक्ष, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन शाळेकडे लक्ष दिल्यास आपल्या आजूबाजूच्या शाळेचा नक्की विकास होऊ शकतो. त्यासाठी गरज आहे फक्त नि फक्त आपल्या सर्वांच्या ईच्छाशक्तीची. आज ग्रामीण भागातील सरकारी शाळा जसे कात टाकून आपल्यात बदल करत आहेत तोच बदल नगरपालिका हद्दीतील सरकारी शाळेत होऊ शकतो, चला तर मग या शाळांना हातभार लावू या आणि गरिबांच्या लेकरांच्या शिक्षणाची सोय करू या. 

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद
9423625769

yoga Day

सहशालेय उपक्रम आणि योग

मुलांच्या जडणघडण मध्ये शाळा महत्वाची भूमिका बजावत असते. मुलं घरातून कौटुंबिक ज्ञान घेऊन जेंव्हा शाळेत प्रवेशित होतात तेंव्हा त्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी अर्थातच शाळेवर येऊन पडते. शाळेतील पहिली चार वर्षे म्हणजे इयता पहिली ते चौथी वर्गापर्यंतच्या शिक्षणावरच मुलांचे पुढील भविष्य अवलंबून असते. म्हणून या प्राथमिक शाळेत मुलांवर संस्कार करणारी शाळा नेहमी प्रगतीपथावर राहते. बहुतांश पालक आपला मुलगा हुशार व्हावं असे बोलतात तर काही पालक माझा मुलगा हुशार झाला नाही तरी चालेल पण त्याला सर्व काही आलं पाहिजे, तो सर्वगुणसंपन्न असला पाहिजे असे बोलतात. मात्र अश्या प्रकारे बोलणाऱ्या पालकांची संख्या खूपच कमी आढळून येते. शाळेत विविध उपक्रम आणि प्रयोगाच्या माध्यमातून शिक्षक मुलांना सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करतात. मुलांच्या बौद्धिक विकासासोबत त्याच्या शारीरिक विकासाकडे शाळेतून लक्ष दिले जाते. घरात आणि समाजात वावरत असतांना मुलांनी कसे वागावे ? याचे शिक्षण याच प्राथमिक वर्गात दिले जाते. या लहान वर्गातील मुले घरातल्या आई बाबा किंवा दादा बहीण यांचे अजिबात ऐकत नाहीत मात्र सरांनी किंवा बाईंनी सांगितलेलं काम नेटाने पूर्ण करतात. मुलांचा त्याच्यावर असलेला हा विश्वास असतो. त्याचमुळे शिक्षकांनी देखील मुलांना याच वयात चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करावा. शाळेत वेगवेगळे खेळ खेळले जातात. काही उनाडकी मुलेच यात सहभागी होतात. पण सारेच मुले खेळात सहभागी करून घेतल्यास त्या मुलांचा फायदा होतो. शाळेत शेवटचा तास म्हणजे खेळाचा हे ठरलेले वेळापत्रक आहे. मुलांना बाहेर खेळायला सोडून दिले की शिक्षक मोकळे असे चित्र बऱ्याच शाळेत पाहायला मिळतं. त्याला कारणे अनेक असू शकतात. मात्र शिक्षकांनी नियोजन करून एखादे खेळ त्यांच्या नियंत्रण आणि मार्गदशनखाली खेळवल्यास मुलांना फायदा होऊ शकतो. खेळाचे शिक्षक याविषयी जेवढा न्याय देऊ शकतात तेवढा साधा प्राथमिक शिक्षक देऊ शकत नाही. लहान मुले कधीच थकत नाहीत. त्यांच्यामध्ये भरपूर ऊर्जा साठविलेले असते. त्याचा वापर आपणांस करता आले पाहिजे. जी मुले लहानपणी खूप खेळतात ते मोठेपणी कमी आजारी पडतात किंवा त्यांच्याकडे प्रतिकारशक्ती असल्यामुळे ते आजाराला पळवून लावू शकतात. तर घरात बसून टीव्ही पाहणारे किंवा मोबाईलवर गेम खेळणारे साधे फडसे जरी आले तरी दवाखान्यात हजार रुपये खर्च करतात. म्हणून शालेय जीवनात मुलांच्या आवडत्या खेळाला प्रोत्साहित केले तर त्याचा फायदा भविष्यात होऊ शकतो. या खेळाबरोबर मुलांच्या आहाराकडे देखील लक्ष देता येते.प्रत्येक शाळेत शालेय पोषण आहार योजने अंतर्गत मध्यान्ह भोजन दिले जाते. यावेळी मुलांना जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे, ताटात आलेले अन्न कुरकुर न करता खाणे, जेवण करतांना पूर्ण लक्ष आपल्या ताटात ठेवणे अश्या गोष्टी मुलांना नकळत कळत जाते. त्याचा फायदा निरोगी शरीर राहण्यास होतो. ज्यांचे शरीर तंदुरुस्त त्याचे मन देखील तंदुरुस्त. मग त्याचे आरोग्य देखील तंदुरुस्त राहू शकते.

21 जून रोजी जागतिक योग दिवस आहे. या दिवसापासून आपण सर्वांनी आपले शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी योग करायचे आहे. मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी प्रत्येक शाळेत परिपाठच्या माध्यमातून दोन मिनिटांचे मौन घेतले जाते. शाळा सुटताना देखील असे मौन काही शाळेत घेतले जाते. ज्याद्वारे आज दिवसभार काय केले ? याची एकदा उजळणी होते. म्हणूनच मुलांनी योग करायचे म्हणजे शाळेतल्या विविध उपक्रमात हिरीरीने सहभाग घ्यावे. शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. यातूनच आपणांस सुखी जीवन मिळू शकते. चला तर मग आपले शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी शाळेतल्या उपक्रमात सहभागी होऊन आरोग्य वाढवू या.


- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक व विषय शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769  

Sunday, 30 May 2021

chandrashekhar aasvar

कुंचल्यातून भावना प्रकट करणारा शिक्षक चंद्रशेखर आस्वार
आपल्याकडे आलेला पाहुणा परत जायला निघतो तेव्हा आपण त्याला निरोप देणे आणि त्याने आपला निरोप घेणे हा केवळ शिष्टाचार नसतो. तो आमच्या संस्कृतीचा सहज, आवश्यक आविष्कार असतो. शासकीय सेवेत असलेल्या व्यक्तीला 58 वर्षे पूर्ण झाले की निवृत्त व्हावेच लागते. असाच एक योग धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळेतील कला शिक्षक, प्रयोगशील शिक्षक चंद्रशेखर बाबुराव आस्वार हे आज नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण केल्यामुळे शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. एकूण 33 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनमोल असे कार्य केले, सेवानिवृत्ती निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा. 
परभणी जिल्ह्यातील पेडगाव येथील बाबुराव आणि सखुबाई यांच्या पोटी दिनांक 11 मे 1963 रोजी चंद्रशेखर यांचा जन्म झाला.   त्यांना दोन मोठे भाऊ आणि एक बहीण आहे. मोठा भाऊ रामा दादा यांच्या प्रेरणेने ते घडले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण परभणी येथील महात्मा फुले विद्यालयात झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सेलू येथील नूतन महाविद्यालयात पूर्ण झाले. पदवीचे शिक्षण शिवाजी महाविद्यालयात पूर्ण केल्यानंतर चित्रकलेचे शिक्षण अभिनव चित्रकला महाविद्यालय नांदेड येथे पूर्ण केले.
सन 1988 मधील जून महिन्यात धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे प्राथमिक विद्यालयात शिक्षक म्हणून लागण्यापूर्वी ते परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात एक वर्ष तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणून काम पाहिले होते.
आईने जन्म दिला पण हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळेने मला घडविले म्हणून हेच माझ्या कर्माची आई आहे असे ते म्हणतात. या शाळेतून त्यांचे कार्य देशभर पोहोचले. ते एक उत्कृष्ट चित्रकार होते. कोणत्याही चित्रांची हुबेहूब चित्र काढण्याची त्यांची शैली वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी काढलेल्या हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या तैलचित्राला केंद्र सरकारने पोस्ट तिकीट म्हणून 2003 मध्ये प्रसिद्ध केले होते. त्यांना आजपर्यंत कलाश्री, कलारत्न आणि कलाभूषण असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
साक्षरता अभियान या कार्यक्रमात त्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग होता. मनोज बुंदेले, देवीसिंग ठाकूर आणि आस्वार चंद्रशेखर यांच्या चमूने कला जथ्थेच्या माध्यमातून अंगठे बहाद्दर पथनाट्यचे सादरीकरण करून अनेक निरक्षर लोकांना साक्षरतेचे महत्व पटवून दिले होते. ते एक उत्तम कलाकार होते याची प्रचिती या माध्यमातून त्यांच्या मित्र परिवाराला आणि जनतेला झाली.
धर्माबाद येथे 1993 मध्ये संत शिरोमणी गुरु रविदास यांची जयंती सुरू करण्यात सरांचा सिंहाचा वाटा आहे. तेव्हापासून आजतागायत ही जयंती तेवढ्याच उत्साहात आणि इतर समाजात देखील साजरी केली जात आहे. धर्माबाद येथील रमाई नगर परिसरात संत रविदास यांचे स्मृती मंदीर उभारण्यात आले आहे. चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांनी सत्कार करून त्यांना प्रेरणा दिली. चर्मकार समाज बांधवांना स्टॉल मिळवून देण्यास सहकार्य केले. समाज मंदिरासाठी शासनाकडे मागणी केली. या सामाजिक कार्यासोबत शैक्षणिक क्षेत्रात देखील भरीव अशी कामगिरी केली.  हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळेतील सर्व भिंती आपल्या कुंचल्यातून बोलक्या केली. कुठे ही जागा शिल्लक राहणार नाही एवढी रंगरंगोटी त्यांनी स्वतः केली. यासाठी संस्थेकडून त्यांनी एक छद्दाम देखील घेतले नाही. शालेय सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असतो. ते स्वतः एक कलाकार असल्यामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखण्यात ते पारंगत होते. स्काऊट गाईड आणि कब बुलबुलच्या माध्यमातून त्यांनी शाळेचे नाव देशभर गाजविले तर दोन वेळा त्यांना राज्यस्तरावर नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यांचा स्वभाव बोलका आणि इतरांना हसू घालण्याचे साम्यर्थ असल्याने त्यांचा सहवास सर्वाना हवाहवासा वाटणे, यात काही नवल नाही. गणेशोत्सवाच्या काळात त्यांनी निरीक्षक म्हणून काम केले. तसेच कोरोना काळात लोकांची जनजागृती व्हावी म्हणून दोन पोस्टर देखील तयार केले. 
यशस्वी पुरुषांच्या मागे एका स्त्रीचा हात असतो त्याप्रमाणे या सर्व कामकाजात अर्धांगिनी सौ. निर्मला हिचे मोलाचे असे सहकार्य लाभले. त्याशिवाय हे यश मिळविणे अशक्य आहे. त्यांना तीन अपत्य असून सुमेद्य, सौरभ ही दोन मुले आणि सुरभी ही मुलगी असून ते सर्वजण आपापल्या ठिकाणी सुव्यवस्थित जीवन जगत आहेत. 
आज नियत वयोमानानुसार वयाची 58 वर्षे पूर्ण केल्यामुळे ते प्राथमिक शिक्षक या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या पुढील भावी सुखी समृद्धी आणि यशस्वी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा

शब्दांकन :- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Saturday, 29 May 2021

Andelwad S. D.

शिक्षक ते केंद्रप्रमुख पर्यंतचा यशस्वी प्रवास करणारे संतुकराव देवराव आंदेलवाड

धर्माबाद :- तालुक्यातील बाळापूर केंद्राचे प्रयोगशील केंद्रप्रमुख श्री संतुकाराव देवराव आंदेलवाड हे आज दिनांक 31 मे 2021 रोजी नियत वयोमानानुसार वयाची 58 वर्ष पूर्ण केल्यामुळे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा.  
संतुकाराव देवराव आंदेलवाड यांचे मूळ गाव भोपाळा ता. नायगाव (खै. ) असून त्यांचा जन्म 21 मे 1963 रोजी एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. घरात खूप गरिबी होती तरी त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्याच गावी म्हणजे भोपाळा ता. नायगाव ( खै. ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्ण झाले. त्यापुढील उच्च शिक्षण बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कुलमध्ये आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तदनंतर त्यांनी अध्यापकाची पदविका म्हणजे डी. एड. चे शिक्षण नांदेड येथील शासकीय अध्यापक विद्यालयातून प्राप्त केली. त्याकाळी डी. एड. पूर्ण झाल्याबरोबर शिक्षकांची नोकरी लागत होती. त्यामुळे त्यांना जास्त काळ प्रतीक्षा करावे लागले नाही. दिनांक 19 जून 1986 रोजी त्यांनी आपल्या शिक्षकी पेशेला भोकर तालुक्यातील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव येथून सुरुवात केली. त्यानंतर 04 जुलै 1990 रोजी त्यांची बदली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोमनाळा ता. भोकर येथे झाली. त्यानंतर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पोटा ता. हिमायतनगर येथे 22 ऑक्टोबर 2002 प्राथमिक पदवीधर म्हणून सेवा सुरू केली. त्यानंतर 20 जून 2005 रोजी त्यांची बदली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नूतन भोकर येथे झाली. येथील प्रदीर्घ सेवेनंतर 01 जून 2013 रोजी त्यांची पदोन्नतीने बदली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा भोकर येथे पदोन्नत मुख्याध्यापक पदी झाली. त्यानंतर त्यांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती मिळाली आणि धर्माबाद येथील बाळापूर केंद्रात पर्यवेक्षीय अधिकारी केंद्रप्रमुख म्हणून 07 ऑगस्ट 2015 रोजी रुजू झाले.तेव्हापासून त्यांनी धर्माबाद तालुक्यातील बाळापूर केंद्रीय शाळेचे केंद्रप्रमुख पदाचे कार्य सेवा अत्यंत यशस्वीपणे व प्रभावीपणे पूर्ण केले. 
तत्कालिन गटशिक्षणाधिकारी डॉ. डी. एस. मठपती व सध्याचे गटशिक्षणाधिकारी एल. एन. गोडबोले यांच्या प्रेरणेने  व मार्गदर्शनाखाली त्यांनी केंद्रप्रमुख पदावर रुजू झाल्यापासून आजतागायत त्यांच्या कार्यकाळात केंद्रातील सर्वच्या सर्व शाळा डिजिटल केल्या आहेत, माझी शाळा, स्वच्छ शाळा, सुंदर शाळा हा उपक्रम प्रत्येक शाळेतून यशस्वीपणे राबविण्याचा प्रयत्न केला. 
संतुकराव देवराव आंदेलवाड हे हसतमुख स्वभावाचे, सर्वाना मार्गदर्शन करणारे, विद्यार्थीप्रिय आणि नेहमी कार्यात मग्न असणारे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे अल्पावधीत त्यांनी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांची मने जिंकली होती. प्रत्त्येक शाळेला भेट देणे, त्यांना सूचना करणे, मार्गदर्शन करणे, शिक्षकांच्या अडचणी सोडविणे, त्यांच्याशी संपर्कात राहणे, शासकीय कामे वेळेत पूर्ण करणे, शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांशी गप्पा मारणे या त्यांच्या स्वभावामुळे शिक्षकांना ते नेहमी अधिकारी कमी नि मित्र जास्त वाटत होते. सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून तळागाळातील प्रत्येक मूल शिकले पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असे. तसेच गावातील माझी विद्यार्थी मेळावा, माता पालक मेळावा घेऊन त्यांनी 30 लाख रुपयांची लोकवर्गणी जमा करून त्याचा विनियोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी,  अध्ययनपूरक वातावरण निर्मितीसाठी केला. तसेच लोकसहभागातून देखील त्यांनी केंद्रातील अनेक शाळेचा परिसर सुंदर करण्यासाठी प्रयत्न केले आहे. 
संतुकराव देवराव आंदेलवाड यांनी एकूण 35 वर्षे सेवा केली आहे. या काळात त्यांनी शिक्षक, प्राथमिक पदवीधर, पदोन्नत मुख्याध्यापक पदाचा यशस्वीपणे कार्यभार सांभाळले. तसेच धर्माबाद येथील गटसाधन केंद्राचे प्रभारी गटसमन्वयक म्हणून दोन वर्षे काम पाहिले आहे.
आज दिनांक 31 मे 2021 रोजी सोमवारी नियत वयोमानानुसार वयाची 58 वर्ष पूर्ण होत असल्याने श्री संतुकराव देवराव आंदेलवाड केंद्रप्रमुख पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. त्याच्या यशस्वी सेवापूर्तीसाठी अनेक शिक्षकांनी, गावकऱ्यांनी, माजी विद्यार्थ्यांनी सेवापूर्तीच्या अनंत शुभेच्छा दिलेल्या आहेत. कोरोना महामारीमुळे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेता येऊ शकले नसले तरी अनेकांनी भ्रमणध्वनीद्वारे तसेच सोशल मीडियावरून त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रप्रमुख श्री संतुकराव देवराव आंदेलवाड यांना पुढील आयुष्य सुखा समाधानाचे जावे अश्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. 
....................................
प्रतिक्रिया - 
उत्तम प्रशासक व पर्यवेक्षीय अधिकारी

धर्माबाद बीटमधील केंद्रीय प्राथमिक शाळा बाळापूरचे पर्यवेक्षीय अधिकारी केंद्रप्रमुख श्री आंदेलवाड एस. डी. हे एक उत्तम प्रशासक व पर्यवेक्षीय अधिकारी होते. गेल्या आठ वर्षाच्या काळात त्यांनी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रोत्साहित करून लोकसहभागातून शाळा डिजिटल केल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ दिसून आली. कोरोना महामारीच्या काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली रामपूर ( ध.) या द्वि शिक्षकी शाळेने घरातूनच शाळा व सुपर संडे हा अभिनव उपक्रम वर्षभर राबविण्यात यश आले. केंद्रातील आलुर शाळेस सुशोभित करण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांना प्रोत्साहित केले. आज ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत, त्यांना भावी सुखी, समृद्ध आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ......!

श्री गोडबोले एल. एन. 
गटशिक्षणाधिकारी, धर्माबाद
....................................

उत्तम सहकारी व मार्गदर्शक

माझे जुने मित्र व सहकारी बाळापुर केंद्राचे आदर्श केंद्रप्रमुख मा. श्री आंदेलवाड एस.डी. हे आज  नियत वयोमानानुसार वयाची 58 वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत.
एक मित्र व सहकारी पर्यवेक्षीय अधिकारी आपल्यापासून दूर होत आहे ह्याचे दुःख तर होणारच. पण त्यांच्या सहवासात दोन वर्षाच्या कालावधीत मला बरेच काही शिकायला मिळाले. त्यांचे वेळोवेळी विद्यार्थ्यांना व आम्हा शिक्षकांना उत्तम मार्गदर्शन लाभले. सरांच्या कार्यकाळात त्यांनी शाळेला भेटरूपात व वस्तूरुपात मदत केली आहे. त्यांचे आम्ही सदैव ऋणी राहू. सेवानिवृत्तीनंतर त्यांना उत्तम आयु व आरोग्य लाभो हीच आम्हा सर्वांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

संतोष नाईक, पदोन्नत मुख्याध्यापक
 के. प्रा. शा बाळापुर.
....................................

अधिकारपणा कमी नि मित्रत्व जास्त 

बाळापूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री आंदेलवाड एस. डी. सर हे आज सेवानिवृत्त होत आहेत हे आमच्यासाठी खूपच दुःखद बाब आहे. कारण त्यांनी आमच्या रामपूर ( ध. ) शाळेत अनेक उपक्रमासाठी नेहमीच प्रेरणा देत आले होते. त्यांच्या प्रेरणेने आणि प्रोत्साहनामुळे कोरोनाच्या काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू .... या उपक्रमात आम्ही घरातूनच शाळा आणि सुपर संडे हा उपक्रम वर्षभर राबवू शकलो. अशी सुट्टी घालवू या उपक्रमात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन मुलांना गाणे, गप्पा, गोष्टी या विषयावर मार्गदर्शन केले. ते विद्यार्थी प्रिय, उत्तम प्रशासक होते सोबतच एक चांगले मार्गदर्शक आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्वाचे होते. सेवानिवृत्तीनंतरच्या पुढील भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ....! 

- नंदकुमार राजमल्ले, उपक्रमशील शिक्षक, जि. प. प्रा. शाळा रामपूर ( ध. ) केंद्र बाळापूर ता. धर्माबाद
....................................
शब्दांकन :-
नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, ता. धर्माबाद जि. नांदेड, 9423625769

Saturday, 22 May 2021

All kavita


पूर्वी नि आज

पूर्वी भल्या पहाटे लोकं कामाला जात
आज भल्या पहाटे लोकं वॉक करतात

पूर्वी भल्या पहाटे चिवचिव आवाज होई
आज भल्या पहाटे कानी रिंगटोन ऐकू येई

पूर्वी भल्या पहाटे पाणी भरत असे बाया
आज भल्या पहाटे अंगण झाडतोय राया

पूर्वी भल्या पहाटे सकाळी वासुदेव येई घरी
आज भल्या पहाटे प्रत्येक दारावर भिकारी

आज भल्या पहाटेची चित्र बदलली सारी
पूर्वीचीच दुनिया होती आतापेक्षा लई भारी

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769


बालकविता - आईचा बाळ

आईचा बाळ दिसतो हसरा
दुडूदुडू चाले धरून कोपरा

उचलून घ्यावे म्हणून रडतो
सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो

बाळाचे सारेच लाड करतात 
हे हवे ते नको  सर्व पुरवतात

खुदू खुदू जेव्हा बाळ हसतो
सर्वांचा चेहरा आनंदी दिसतो

- नासा येवतीकर, धर्माबाद
  9423625769


काही तरी हरवलं

शून्य नजरेने आकाशात पाहत
भूतकाळात जरासे डोकावलं
तेव्हा कोठे मला जाणवलं की
माझं काही तरी नक्की हरवलं

बालपणीच्या मित्रांसोबतचा वेळ
मैदानावर दिवसभर खेळलेला खेळ
सायंकाळी चौकात खाल्लेली भेळ
सारं चित्र सर्रकन डोळ्यांपुढून सरकलं 
माझं काही तरी नक्की हरवलं

शाळेत मित्रांसोबत केलेली खोडी
पावसाच्या पाण्यात सोडलेली होडी
उगीच पोरांपोरीची लावलेली जोडी
डोळ्यांत पाणी येतंय जेव्हा हे आठवलं
माझं काही तरी नक्की हरवलं

मित्रांपुढे सारे जग फिके फिके वाटे
मित्रांला दुःखात पाहून मनी दुःख दाटे
घाबरलो नाही वाटेवर असो कितीही काटे
जिवाभावाच्या त्या मित्रांना दुरावलं
माझं काही तरी नक्की हरवलं

- नासा येवतीकर


इच्छापूर्ती

मुलांनी काय काय करावं ?
हे पालकांनी का ठरवावं ?
पालकांचीच ईच्छापूर्ती
करण्यासाठी का जगावं

पालकांना वाटे अधुरे स्वप्न
मुलांच्या रूपाने पूर्ण व्हावं
त्याच्यात असो नसो क्षमता
मात्र त्याने स्वप्न पूर्ण करावं

मनी स्वप्न पूर्ण झाले नाही तर
पालकांचा अपेक्षाभंग होतो
पाल्याचा जातो आत्मविश्वास
जीवनात सदा तो मागेच राहतो

कुणाला असते खेळण्याची इच्छा
तर कुणी छान छान पेंटिंग करतो
कुणी असतो अभिनयात निपुण
कुणी कामाची छान सेटिंग करतो

पालकांनो वेळीच सावध व्हा
पाल्याविषयी थोडा विचार करा
त्याचे स्वप्नं त्याला पूर्ण करू द्या
आपले स्वप्नं लादू नका जरा

- नासा येवतीकर, धर्माबाद
 9423625769


कविता - शब्द
 
शब्द ही मेरा धन
शब्द ही मेरा मन
शब्द से बने सुंदर
मेरा प्यारा जीवन ....1

शब्द ही मेरा प्राण
शब्द पे रखो ध्यान
शब्द से बिघडे नाता
जरा संभालो जुबान ....2

शब्द ही मेरी भाषा
शब्द ही मेरी आशा
शब्द से मिले तसल्ली
दूर करे मेरी निराशा ....3

शब्द बिना मै हुं कोरा
शब्द बिना मै अधुरा
शब्द से ही तो जीते है
सुखी जीवन हमारा ....4

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769


खरे समाजसेवक

लोकांची सेवा करणारी माणसं काळानुसार बदलतात
सेवावृत्ती असणारे परिस्थिती पाहून काम करतात

गुलामगिरीतून मुक्त करण्या लढले अनेक क्रांतिकारक
प्राणांची आहुती देऊन बनले तेच देशाचे खरे सेवक

जनतेचे अज्ञान दूर सारण्या ज्योत पेटविली शिक्षणाची
अनेक संकटे झेलून ध्यास घेतला समाज सुधारणांची

कोरोनाच्या संकटात पोलीस डॉक्टर बनले सेवक
दिवसरात्र सेवा करून तेच बनले खरे समाजसेवक

जीवाची पर्वा न करता दिली सेवा जसे  लढतो सैनिक
खरी देशभक्ती दिसली म्हणून तेच देशाचे खरे पाईक

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड
  9423625769



पंखात बळ माझ्या

दोन चिमुकली पाखरे आपल्याच घरट्यात
फडफड करत होती
बाहेर चोच काढून खायला काही तरी
ती मागत होती
तिची आई देखील दूरवर उडत जाऊन
पिलासाठी काहीतरी खाऊ आणत होती
असे काही दिवस चालले 
एके दिवशी घरट्यात कोणीच दिसत नव्हते
पंखात बळ आले म्हणून ती पिले उडून गेली

आपले पोट भरण्यासाठी दूर देशा गेली

माणसाचे आयुष्यदेखील आजकाल या पक्ष्यांप्रमाणे झाले

लेकरं शिकून मोठी झाली चार पैसे कमावू लागली
की त्यांच्या पंखात बळ येते
नि आई बाबाला घरात ठेवून परदेशात नोकरी करायला
चालली कायमची जसे पाखरे उडून गेली कायमची,
कित्येक दिवस वाट पाहतात
डोळ्यातील अश्रू आटून जातात,
पण ती पाखरे पुन्हा त्या
घरट्यात परत येत नाहीत ......
कधीच परत येत नाहीत ......!

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड
9423625769



आयुष्याचे गणित

कुणाच्या आयुष्याच्या थाळीत
खूप काही मांडून ठेवले आहे
सारं बघायला त्याला वेळ नाही

कुणाच्या आयुष्याच्या थाळीत
काहीच मांडून ठेवलेलं नाही
कष्ट करून आयुष्य संपून जाई

निर्माता असे का करतो एक कोडे
सारखे मनात डोकावत असतो
आयुष्यात सारखेपणा का नाही

कुणाला कष्ट करण्याची गरज भासते
तर कुणाला काही करावे लागत नाही
आयुष्याचे हे गणित मला कळत नाही

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड
  9423625769


स्वतःसाठी जगा

जगासाठी नाही तर स्वतःसाठी जगा
सध्याचा काळच वाईट आहे ते बघा

कोणी कोणाच्या जवळ जायचं नाही
दुरूनच सहकार्य करीत चांगले वागा

एकमेकांना बोलून धीर देत राहायचं
मनावर ताण घेऊन उगीच नको त्रागा

जीवनावश्यक वस्तूसाठी नको धडपड
जीवन हेच आवश्यक आहे तुम्ही जाणा

एक पाऊल मागे गेल्याने हार होत नाही
हरून जिंकण्यातच खरा समंजसपणा
 
- नासा येवतीकर, धर्माबाद, जि. नांदेड 9423625769


त्या जुन्या वाटा


लहानपणीच्या आठवतात त्या जुन्या वाटा

चेहऱ्यावर स्पष्ट दिसतात आनंदाच्या लाटा


लहानपणी अनेक बंधने अनेक आठकाठी

हे करू नको ते करू नकोची आडवीकाठी

खेळतच राहत असे पायी रुतला जरी काटा

लहानपणीच्या आठवतात त्या जुन्या वाटा


शाळेला दांडी मारून मित्रांसंगे फिरायला जाणे

घरात लबाड बोलून आवडता सिनेमा बघणे

खिशात त्यावेळी नव्हते जरी रुपयांच्या नोटा

लहानपणीच्या आठवतात त्या जुना वाटा


ती मलाच पाही म्हणून तिचे नाव वहीत लिहलं

चोरी चोरी चुपके चुपके तिला भेटावंसं वाटलं

माझं प्रेम तिला वाटत असेल जरी खोटा

लहानपणीच्या आठवतात त्या जुना वाटा


लहानपणीच्या आठवणीने आता येते हसू

दुःखात मित्रांना पाहून डोळ्यात येती आसू

मदत करावी गरिबांना होवो किती जरी घाटा

लहानपणीच्या आठवतात त्या जुना वाटा


- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड



विस्तव वास्तवातलं

वास्तव सत्य हे कधीही विस्तावासारखं असते
अनेक अन्यायकारक असत्याला जाळून टाकते

लहानपणापणी मुलांना सत्याची शिकवण दिली जाते
हेच बालपणीचे संस्कार आयुष्यभर सोबत राहते

मोठे झाल्यावर सारे संस्कार विसरून खोटे बोलतात
चांगली शिकवण देणारे ही वाईट मार्गावर चालतात

एक खोटं लपविण्यासाठी शंभर खोटे बोलावे लागते
त्यापेक्षा सत्य बोललं तर मनात कसलीही भीती नसते

दुसऱ्यांनी केलेली स्तुती प्रशंसा सर्वाना आवडते
आपल्यातले दोष कुणी दाखवले की राग येते

काही वास्तव गोष्टी सांगितलं की लोकांना कडू वाटते
सत्य स्वीकार करण्यासाठी खूप मोठं मन लागते

- नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड
  9423625769


कविता वाचल्याबद्दल धन्यवाद.....!


Friday, 21 May 2021

International TEA Day


एक कप चहा


प्रिय चहा
चहा या दोन अक्षरी शब्दांत खूप मोठी ताकत आहे. कारण या चहामुळे दोन मनाचे मिलन होते, थोडावेळ एकमेकांना बोलता येते, कितीही घाईत असलो तरी चहा घेण्यासाठी थोडा वेळ विश्रांती नक्की मिळते. चहाला इंग्रजीत एकाक्षरी शब्द म्हणजे टी असे म्हणतात तर हिंदीत चाय म्हटले जाते. तसे राजेश खन्नावर चित्रित केलेलं एक गाणं सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, शायद मेरी शादी का खयाल दिल में आया है, इसिलिए मम्मीने मेरे तुमहें चाय पे बुलाया है। आज ही प्रथा कायम आहे की, मुलगी बघायच्या कार्यक्रमात पोहे खाणे झाल्यानंतर नवरी मुलगी हातात चहाचा ट्रे घेऊन येते आणि आपला परिचय देते. बऱ्याच कामासाठी चहा हे एक निमित्त म्हणून त्याचा वापर केला जातो. एखाद्या ठिकाणी काही सौदा किंवा व्यापार झाला म्हणजे लगेच तोंड गोड करण्याची प्रथा असते. चहा हे एक गोड पेय, त्यामुळे सर्वजण चहा घेतात. दोन मित्र बाजारात खूप दिवसांनी असो वा काही तासानंतर असो त्यांची भेट झाली की, पहिलं वाक्य, चल एक कप चहा घेऊ. चहा पिता पिता मग खूप गप्पाटप्पा, अनेक विषयांवर चर्चा होते. याच दरम्यान गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गप्पा रंगतात. म्हणून काहीजण खास करून टी पार्टी आयोजित करतात, चाय पे चर्चा करण्यासाठी. म्हणजे येथे ही चहा हे एक निमित्त असते. तेच जर मित्राने चहा पिऊ असं म्हटलं नाही तर तो चारचौघात सांगतो त्याने मला साधं चहा सुद्धा विचारलं नाही. घरी नातलग किंवा पाहुणे आले की चहा विचारावं लागते आणि चहा पाजवावे लागते. नाहीतर समाजात साधी चहा देखील दिली नाही म्हणून आपली खूप बदनामी होते. घरी आलेल्या नातलगांची सरबराई करण्याचे प्रमुख साधन म्हणजे चहा. सकाळ व सायंकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात चहानेच होते. लहानपणी कपबशीचा आवाज आला की जाग यायची, कधीकधी चहाचा वास देखील नाकात जायचं आणि मग जाग यायचं. पावसात भिजून आल्यावर आणि हिवाळ्याच्या थंडीत गरम चहा खूप चांगले वाटायचे. चहामुळे तरतरी येते, सर्व काही योग्य होते, असे मनाला वाटते.
दुधाची चहा आणि काळी चहा असे चहाचे प्रामुख्याने दोन प्रकार मोडतात. दुधाच्या चहात साखर, चहापत्ती आणि दूध एकत्रित गरम केल्या जाते तर काळी चहा म्हणजे डिकाशन चहा यात दूध नसते. पण ही चहा दुधाच्या चहापेक्षा चांगली असते. या डिकाशन चहात आद्रक, दालचिनी आणि तुळशीची पाने टाकल्यास ते खूप चांगले वाटतेे. लहान मुलांनी शक्यतो चहा पिणे टाळावे असे घरातील वडील मंडळी म्हणतात मात्र लहान मुलांना दुधापेक्षा चहा पिणे खूप आवडते. सकाळचा चहा आणि पेपर याचे अतूट नाते आहे. चहाविना पेपर वाचावे वाटत नाही आणि पेपरविना चहा प्यावे वाटत नाही. चहा आणि बिस्कीट याचे नाते देखील असेच आहे. काही मंडळी चहासोबत पाव म्हणजे ब्रेड किंवा खारी असे पदार्थ देखील खातात. जेव्हा खूप काम करून जरासा थकवा जाणवायला होते त्यावेळी चहा पिण्याची ईच्छा निर्माण होते. माणसाला स्वयंपाकातले कोणते पदार्थ तयार करता येवो किंवा न येवो चहा मात्र करता आले पाहिजे. नाही तर मित्रांमध्ये आपले हसे होते आणि मित्र म्हणतात, तुला, साधी चहा करता येत नाही. चहा करता आली तर त्याचे अनेक फायदे होतात. स्वयंपाक शिकण्याची पहिली पायरी म्हणजे चहा करता येणे.
चहाचा शोध कसा लागला असेल ? हे एक संशोधन करण्याची बाब आहे. एक व्यक्ती झाडाखाली पाणी उकळत ठेवला होता तेव्हा वरून झाडाचे एक पान त्या उकळत्या पानात पडले तेव्हा त्या पाण्याला त्या पानाचा वास आला. त्याने ते पिऊन बघितले तर त्याचा थकवा दूर झाल्याचे जाणवले. अश्याप्रकारे चहाची सुरुवात झाली. भारतातल्या लोकांना हे चहा वगैरे काही माहीत नव्हते. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. अगदी सुरुवातीला सकाळी सकाळी इंग्रज लोकं भारतीय लोकांच्या घरापुढे या पानांची पुडी अगदी मोफत टाकू लागले. भारतीयांना त्या पानांची चव कळाली आणि जरा गोडी लागली. मग तेच पाने फुकट ऐवजी काही पैसे देऊन घ्यावे लागू लागली. यापद्धतीने चहाचा प्रचार व प्रसार वाढला. आज चहा पत्तीचे अनेक कंपनी चहा विक्री करतात. पूर्वी चहा पत्ती म्हणजे सुपर डस्ट एवढंच माहीत होतं. पण आज चहाचे अनेक कंपन्यामार्फत विक्री होत असून मोठ्या प्रमाणावर उत्पादन देखील करण्यात येत आहे. यातून भरपूर पैसा देखील मिळत आहे. साध्या चहाच्या दुकानावरून अनेक लोकांची प्रगती झाली आहे. यात देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. महाराष्ट्रात येवले अमृततुल्य चहा प्रत्येक जिल्ह्यात स्थान मिळविले आहे. कमी भांडवलावर चहाची विक्री कोठेही करता येणे अगदी सोपे आहे. रेल्वेत अनेक मंडळी सकाळी सकाळी चहा विकून आपल्या संसाराला चांगल्याप्रगती पथावर नेले आहेत. बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारातील मुख्य ठिकाण, थिएटर, मार्केट, शाळा, विद्यालये, महाविद्यालयाच्या परिसरात चहाची विक्री करून आर्थिक स्थिती मजबूत करता येऊ शकते. म्हणूनच वर म्हटले आहे, साधी चहा करता येत नाही, तुला. ते जर जमलं तर आपण सुखी जीवन जगू शकतो. चहाच्या व्यवसायावर आज लाखो लोकं जगत आहेत, कोणी चहाची पत्ती विकून तर कोणी गरमागरम चहा विकून. काहीजण म्हणतात चहा शरीरासाठी घातक आहे पण लाखो बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आपला एक कप चहा काही विघ्नसंतोषी ठरणार नाही. म्हणून जास्त विचार करू नका, चला एक कप चहा घेऊ या ....!

*कविता - " चहा "*

टपरीवरचा चहा

एकदा पिऊन पहा

त्यात असते प्रेम

नि थोडं जिव्हाळा

कुठेही मिळत नाही

असा गोड चहा

घोटभर पिताक्षणी

दूर होई कंटाळा

किंमत असते कमी

म्हणून टाळू नका

चव घेतल्याशिवाय

तुम्ही राहू नका

चार पैसे मिळती

संसार चाले त्याचा

एक कप चहा पिऊन

त्यास हातभार द्यायचा


- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद
9423625769


Wednesday, 19 May 2021

Good Man

चांगला माणूस

कधी कधी मनात हा प्रश्न पडतो की, चांगला माणूस कोणाला म्हणावं ? जो आई बाबाचं ऐकतो त्याला चांगला माणूस म्हणावं का जो बायकोचं ऐकतो त्याला म्हणावं ? मित्रांचे सल्ले ऐकून वागतो त्याला चांगलं म्हणावे की बहीण-भावाचे ऐकून वागतो त्याला म्हणावं ? सासू सासाऱ्यांचे ऐकणाऱ्याला चांगले म्हणावे की शेजाऱ्याचे ऐकून वागणाऱ्याला चांगले म्हणावे ? खूप खोलवर विचार केल्यास या प्रश्नांची उकल लवकर होत नाही तेंव्हा डोके गरगरायला लागते आणि डोके दुखू लागते. एखादा व्यक्ती आयुष्यभर जरी चांगला वागला नाही तरी अंत्यविधीच्या वेळी प्रत्येकजण चांगला माणूस होता असे म्हणतात, हे ही कोडे अजून सुटलेले नाही. सर्वांनी आपणांस चांगला माणूस म्हणावं म्हणून प्रत्येकाची आयुष्यभर धडपड चालू असते. आपल्या चांगुलपणाचा कोणी फायदा घेतला की मग तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहत नाही. समाजात असे ही पाहायला मिळते की, आपणांस कोणी चांगला म्हणो किंवा ना म्हणो आपण आपल्या मर्जीनुसार वागायचे. कोणाचे काही ऐकून घ्यायचे नाही. मात्र आपले म्हणणे प्रत्येकांनी ऐकलेच पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो. अश्या लोकांना समाजात वावरतांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणून चांगला माणूस होणे केंव्हाही चांगले. सर्वांचे ऐकून आपल्या मनाला आणि बुद्धीला पटेल त्याप्रमाणे वागणारे माणसेच या जगात यशस्वी आहेत. आपण मेल्यानंतर आपणांस सर्वजण चांगला माणूस होता असे म्हणावे असे वागू या. चला तर मग आपण ही चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करू या. त्यासाठी एकच करायचं आहे,

बोलणाऱ्या माणसाचे बोलणे पूर्ण ऐकून घ्या आणि त्यानंतर बोला.

🄽🄰🅂🄰

दिनविशेष माहिती - ईद-ए-मिलाद ( Eid )

सण वेगळे, संदेश एकच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला म...