नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण राष्ट्रीय विज्ञान दिन यांविषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
सी. व्ही. रमन आणि ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’
भारतीय विज्ञानविश्वात डॉ. सी. व्ही. रमन यांचे नाव अत्यंत गौरवाने घेतले जाते. त्यांनी भौतिकशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण शोध लावला, जो आज “रमन इफेक्ट” या नावाने ओळखला जातो. त्यांच्या या ऐतिहासिक शोधाच्या स्मरणार्थ भारतात २८ फेब्रुवारी हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून साजरा केला जातो.
२८ फेब्रुवारी १९२८ रोजी डॉ. रमन यांनी प्रकाशाच्या विखुरण्याविषयी (Scattering of Light) महत्त्वाचा शोध लावला. एखाद्या पारदर्शक पदार्थातून प्रकाश जात असताना त्याच्या तरंगलांबीमध्ये (wavelength) सूक्ष्म बदल होतो, हे त्यांनी सिद्ध केले. या घटनेला “रमन इफेक्ट” असे नाव देण्यात आले.
या शोधामुळे पदार्थांची रचना आणि गुणधर्म समजून घेण्यास मोठी मदत झाली. आजही रसायनशास्त्र, वैद्यकीय संशोधन, औषधनिर्मिती आणि भौतिकशास्त्रात रमन इफेक्टचा उपयोग केला जातो.
डॉ. रमन यांच्या या अद्वितीय संशोधनासाठी त्यांना १९३० साली भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. विज्ञान क्षेत्रातील हा सन्मान मिळविणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरले.
डॉ. रमन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केलेल्या शोधाच्या स्मरणार्थ भारत सरकारने १९८६ पासून २८ फेब्रुवारी हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून घोषित केला. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि संशोधन संस्था येथे विज्ञान प्रदर्शन, प्रकल्प स्पर्धा, व्याख्याने आणि विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
या दिनाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे आणि संशोधनाची प्रेरणा देणे हे आहे.
डॉ. सी. व्ही. रमन यांचा “रमन इफेक्ट” हा शोध भारतीय विज्ञानाच्या इतिहासातील सुवर्णक्षण मानला जातो. त्यांच्या कार्यामुळे भारताचा जागतिक स्तरावर मान उंचावला. “राष्ट्रीय विज्ञान दिन” हा दिवस विज्ञानाचा प्रसार होण्यासाठी आणि नव्या पिढीला संशोधनाची प्रेरणा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून केव्हापासून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला ?
बरोबर उत्तर आहे, १९८६ पासून २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला
दुसरा प्रश्न - नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण होते ?
बरोबर उत्तर आहे, डॉ. सी. व्ही. रमन हे नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ.
तिसरा प्रश्न - डॉ. सी. व्ही. रमन यांनी शोध लावलेल्या प्रयोगाचे नाव काय ?
बरोबर उत्तर आहे, रमन इफेक्ट डॉ. सी. व्ही. रमन यांनी शोध लावलेल्या प्रयोगाचे नाव होते.
चौथा प्रश्न - डॉ. सी. व्ही. रमन यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार देण्यात आला ?
बरोबर उत्तर आहे, १९३० यावर्षी डॉ. सी. व्ही. रमन यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - रमन इफेक्टचा शोध केव्हा लावण्यात आला ?
बरोबर उत्तर आहे - २८ फेब्रुवारी १९२८ रोजी रमन इफेक्टचा शोध लावण्यात आला.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
No comments:
Post a Comment