नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
कसे आहात ? मजेत ना !
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो.
आजच्या कार्यक्रमात आपण साहित्यिक राम शेवाळकर यांच्या विषयी माहिती पाहू या.
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......
प्रा. राम शेवाळकर
राम बाळकृष्ण शेवाळकर हे साहित्यिक, उत्तम कीर्तनकार आणि प्रभावी वक्ते होते. राम शेवाळकर यांचा जन्म २ मार्च १९३१ रोजी अमरावतीतील अचलपूर याठिकाणी झाला. त्यांचे वडील विदर्भात ‘कीर्तनकेसरी’ म्हणून प्रसिद्घ होते. राम शेवाळकर हे आपल्या वडिलांच्या अनुकरणातून लहान वयातच कीर्तने पाठ करून ती सादर करीत. त्यामुळे त्यांच्यात सभाधीटपणा आणि अमोघ वाणी आली. त्यांच्यावर संस्कृत महाकाव्ये, मराठी संतसाहित्याच्या माध्यमातून वाङ्मयीन संस्कार झाले. त्यांची आई गोपिका यांचे राम शेवाळकर यांच्यावर जीवापाड प्रेम होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अचलपूर येथेच झाले.
पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून संस्कृत व मराठीत एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. वाशीम येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेड येथील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. या सुमारासच त्यांनी संस्कृतीविषयक साहित्यनिर्मितीही आरंभली. लहानपणापासूनच ते काव्यरचना करीत होते. ‘असोशी’ (१९५६) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर ‘रेघा’(१९६७) आणि ‘अंगारा’ (१९८९) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. निसर्गातील चैतन्याचा आणि सृजनशक्तीचा आविष्कार त्याच्या निरनिराळ्या रूपांतून पाहणे, त्यांना शब्दरूप देणे, हे त्यांच्या कवितेचे लक्षणीय वैशिष्ठ्य होय.
१९९४ साली गोव्यात पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा संस्थांच्या कामात राम शेवाळकरांचा सहभाग होता.
‘पाणियावरी मकरी’ (२००८) हे त्यांचे आत्मचरित्र. त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांत अमेरिकाचा पुरस्कार ‘मॅन ऑफ द ईयर’ (१९९७), बॉस्टन येथील संस्थे मार्फत साहित्य धुरंधर पुरस्कार, (१९९७), दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानाचा कुसुमाग्रज पुरस्कार (१९९९) आदींचा समावेश आहे. अशा या थोर साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांचे ३ मे २००९ रोजी नागपूर येथे निधन झाले.
मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा.
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या
पहिला प्रश्न - राम शेवाळकर यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, राम शेवाळकर यांचा जन्म २ मार्च १९३१ रोजी अमरावतीतील अचलपूर याठिकाणी झाला.
दुसरा प्रश्न - राम शेवाळकर यांना अमेरिकाचा कोणता पुरस्कार मिळाला ?
बरोबर उत्तर आहे, राम शेवाळकर यांना अमेरिकाचा ‘मॅन ऑफ द ईयर’ पुरस्कार मिळाला.
तिसरा प्रश्न - राम शेवाळकर यांचा पहिला काव्यसंग्रह कोणता ?
बरोबर उत्तर आहे, असोशी’ (१९५६) हा राम शेवाळकर यांचा पहिला काव्यसंग्रह.
चौथा प्रश्न - १९९४ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे भरले होते ?
बरोबर उत्तर आहे, १९९४ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गोव्यातील पणजी येथे भरले होते.
आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न - राम शेवाळकर यांचे निधन कोठे झाले ?
बरोबर उत्तर आहे - राम शेवाळकर यांचे ३ मे २००९ रोजी नागपूर येथे निधन झाले.
चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏
( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )
संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
No comments:
Post a Comment