Saturday, 14 February 2026

दिनविशेष माहिती - 15 फेब्रुवारी ( Sant Sevalal Maharaj )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 
कसे आहात ? मजेत ना !
 
मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण यांच्या विषयी माहिती पाहू या. 
लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकू या ......

          संत सेवालाल महाराज
संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत, संत आणि समाजसुधारक होते. सेवालाल महाराजांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी गुत्तीबल्लारी कर्नाटक राज्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिमा नाईक राठोड आणि आईचे नाव धरमळी माता असे होते. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर धार्मिक व संस्कारशील वातावरणाचा प्रभाव टाकला, ज्यामुळे पुढे त्यांनी समाजजागृतीचे कार्य केले.
त्या काळात बंजारा समाज भटक्या स्वरूपात जीवन जगत होता. समाजात अज्ञान, अंधश्रद्धा आणि काही वाईट प्रथा प्रचलित होत्या. त्यांनी समाजाला शिक्षण, स्वच्छता आणि नीतिमत्तेचा मार्ग दाखवला. त्यांनी स्त्रियांना अधिकार मिळवून देण्यासाठी व व्यसनमुक्तीसाठी कार्य केले. संत सेवालाल महाराजांनी समाजाला योग्य दिशा देण्याचे महान कार्य केले.
लहानपणापासूनच त्यांच्यात आध्यात्मिकता आणि सेवा वृत्ती दिसून येत होती. ते अत्यंत साधेपणाने जीवन जगत आणि लोकांमध्ये राहून त्यांना नैतिकतेचे धडे देत. 
ते म्हणत कसाईन गावढी मत वेचो. अर्थात खाटीकला गाय विकू नका. 
पशू प्राण्यावर प्रेम करा हा त्यांचा मुख्य संदेश होता. त्यांनी बळीप्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले.
संत सेवालाल महाराजांनी बंजारा समाजात एकोपा आणि संघटन निर्माण करण्यावर भर दिला. त्यांनी लोकांना सत्य, प्रामाणिकपणा, अहिंसा आणि परस्पर प्रेम यांचा संदेश दिला.
त्यांनी बंजारा बोलीभाषेत भजने, लोकगीताच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. त्या काळी निरक्षर असूनही त्यांनी लोकांना ज्ञानाचा मार्ग दाखवला
त्यांच्या शिकवणुकीमुळे बंजारा समाजात नैतिक व सामाजिक जागृती झाली.
संत सेवालाल महाराजांनी ईश्वरभक्ती आणि सत्कर्म यांचा समन्वय साधला. त्यांनी लोकांना केवळ पूजा-अर्चा नव्हे तर चांगले आचरण आणि सेवाभाव यांचे महत्त्व पटवून दिले. “समाजाची सेवा हीच खरी पूजा” असा त्यांचा संदेश होता.
दरवर्षी १५ फेब्रुवारी रोजी त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि मध्यप्रदेश या राज्यांत मोठ्या प्रमाणावर मिरवणुका, भजन-कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांच्या नावाने मंदिरे आणि स्मारके उभारण्यात आली आहेत.
संत सेवालाल महाराजांचे जीवन हे समाजसेवा, एकता आणि नैतिकतेचे प्रतीक आहे. त्यांनी बंजारा समाजाला स्वाभिमान आणि योग्य दिशा दिली. आजही त्यांचे विचार समाजाला प्रेरणा देतात. दिनांक ४ डिसेंबर १८०६ रोजी त्यांचे निधन झाले. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे त्यांची समाधी आहे, ज्याला बंजारा समाज 'काशी' मानतात.
त्यांच्या शिकवणुकीतून आपण सेवा, सदाचार आणि बंधुभाव यांचे महत्त्व शिकायला हवं. 🙏
आज संत सेवालाल महाराज यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांचे स्मरण करून समाजहिताचे कार्य करण्याचा संकल्प करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. 🙏


मुलांनो, तुम्हांला ही माहिती कशी वाटली ? नक्की कळवा. 
चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहू या 

पहिला प्रश्न - संत सेवालाल महाराज यांचा जन्म कोठे झाला ?
बरोबर उत्तर आहे, गुत्तीबल्लारी कर्नाटक राज्यात संत सेवालाल महाराज यांचा जन्म झाला

दुसरा प्रश्न - संत सेवालाल महाराज यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
बरोबर उत्तर आहे, भीमा नाईक राठोड असे संत सेवालाल महाराज यांच्या वडिलांचे नाव होते.

तिसरा प्रश्न - संत सेवालाल महाराज यांनी कोणत्या बोलीभाषेत भजने, लोकगीताच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले ?
बरोबर उत्तर आहे, संत सेवालाल महाराज यांनी बंजारा बोलीभाषेत भजने, लोकगीताच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. 

चौथा प्रश्न - संत सेवालाल महाराज यांची समाधी कोठे आहे ?
बरोबर उत्तर आहे, वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांची समाधी आहे

शेवटचा पाचवा प्रश्न - पोहरादेवीला बंजारा समाज काय मानतो ?
बरोबर उत्तर आहे - पोहरादेवीला बंजारा समाज 'काशी' मानतात.

चला पुन्हा भेटू या उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 🙏

( वरील सर्व माहिती इंटरनेट वरून संकलित करण्यात आले आहे. )

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

No comments:

Post a Comment

दिनविशेष माहिती - 19 फेब्रुवारी ( Chatrapti Shivaji Maharaj )

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,  कसे आहात ? मजेत ना !   मी नासा येवतीकर, दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण ...